श्री. मारुती गोळे हे एक सामान्यांच्या गर्दीतलं असामान्य नाव! नुकताच त्यांनी आग्रा ते राजगड केवळ ३४ दिवसांत पायी चालत जाण्याचा अभिनव उपक्रम केला आहे. त्यानिमित्ताने आपल्या बुवांनी घेतलेली ही मुलाखत. ही मुलाखत जुळवून आणण्यासाठी ज्ञानोबाचे पैजार ह्यांचे विशेष आभार!
१७ ऑगस्ट १६६६ रोजी राजे आग्र्यामधून गायब झाले. त्याला १७ ऑगस्ट २०१७ रोजी ३५१ वर्षे पूर्ण झाली, म्हणून या दिवशी, १४५० कि.मी. अंतराच्या या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. "३००व्या वर्षपूर्तीला मी जन्मलो नव्हतो आणि ४००व्या वर्षपूर्तीला मी नसेन, मग 'आहे तरुण तर घ्या चालून' असे मी व माझ्या सहकार्यांनी ठरवले व ही मोहीम हाती घेतली." असे श्री गोळे म्हणतात. महाराजांनी हे अंतर २२ दिवसांत पार केले होते. सुरुवातीला श्री. गोळे यांनी या मोहिमेसाठी ६० दिवसांचे नियोजन केले होते. पण जशी मोहीम सुरू झाली, तसे या मावळ्यांचे बळ वाढत गेले व ह्या मोहिमेचे ३४ दिवसांमध्ये पुनर्नियोजन करण्यात आले. आग्र्याहून सुटकेच्या प्रवासात शिवाजी महाराजांना कोणकोणत्या अग्निदिव्यांमधून जावे लागले असेल याची किमान एक टक्का तरी जाणीव व्हावी, तसेच महाराजांच्या या मोहिमेबद्दल कमालीची गुप्तता पाळली गेली असल्यामुळे याची फारशी माहिती कोठे उपलब्ध नाही, महाराज नक्की कोणत्या मार्गाने आले याबद्दलदेखील अनेक प्रवाद आहेत, त्यामुळे महाराजांच्या या धाडसी मोहिमेची अधिकाधिक माहिती मिळवणे, हे या अभ्यास मोहिमेचे उद्दिष्ट होते. आग्र्याला महाराजांना जेथे नजरकैदेत ठेवले होते (सध्याचे जयसिंग हाउस), तेथील माती श्री. गोळे यांनी आग्र्याहून निघताना बरोबर घेतली आहे. ही माती ते राजगडावर नेणार आहेत व तेथे या मातीमध्ये वृक्षारोपण करणार आहेत. वाटेवरच्या काही ठिकाणी त्यांची राहायची सोय झाली, काही मराठा सरदारांनी त्यांना मदत केली, पण काही वेळा स्वतःची सोय स्वतःच करावी लागली. मुक्कामाची जागा निश्चित नसल्यामुळे, आयत्या वेळी जिथे होईल तिकडे राहून त्यांनी नेटाने ही मोहीम अंतिम टप्यापर्यंत पोहोचवली. २०१२ पासून सुरू केलेल्या भटकंतीमध्ये श्री गोळे यांनी आतापर्यंत भारतातले व भारताबाहेरचे एकूण ५१३ किल्ले पालथे घातले आहेत. सिंहगड-राजगड-तोरणा-लिंगाणा-रायगड असे एकूण पाच किल्ले एकाच दिवसात (१६ तास ५५ मिनिटात, साधारण ७२ किलोमीटर ) सर करण्याचा पराक्रम त्यांच्या नावावर आहे. आजपर्यंत त्यांनी २२९ वेळा सिंहगड सर केला आहे. चिरपरिचित किल्ल्यांव्यतिरिक्त अनेक अपरिचित गुहांची व मंदिरांची भटकंती श्री. गोळे यांनी केली आहे. यामध्ये सिंधुदुर्गमधील मनसंतोष गड, मनमाडमधील गोरखगड, कर्जतजवळील मच्छींद्रगड, गडचिरोलीमधला टिपागड यांचा समावेश आहे. अशा ह्या दुर्गवेड्या माणसाची अत्रुप्त आत्मा ह्यांनी घेतलेली मुलाखत! धागा जड होऊ नये म्हणून प्ले लिस्ट तयार करून पहिल्या भागाची लिंक दिली आहे. पुढचे भाग आपोआप प्ले होतील.

वाचने
7116
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुलाखतकारांनी मुलाखत उत्तम
मुलाखतकारांनी मुलाखत उत्तम
In reply to मुलाखतकारांनी मुलाखत उत्तम by पद्मावति
त्या बद्दलची माहिती तु नळीवर वाचता येईल...
In reply to मुलाखतकारांनी मुलाखत उत्तम by निशाचर
खूप सुंदर
वाह!
छान झाली मुलाखत
Guruji rocks
अतिशय उत्तम झाली आहे मुलाखत.
उत्तम मुलाखत .
एका कसलेल्या मुलाखतकाराने
उत्त्म
छान मुलाखत. पण बुवांकडून