Skip to main content

पुस्तके सुचवा ना !

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 08/08/2013 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
वाचलीच पाहीजेत अशी काही पुस्तके सुचवा ना ! पुस्तकांच्या नावाबरोबरच त्याची अधिक माहिती मिळाली तर उत्तम. मीही जराशी यादी देत आहे.
पुण्याची अपुर्वाई - अनिल अवचट
... बाबाने पुण्याचे केलेले पर्यटन, पुस्तक वाचताना आपणही बाबाबरोबर पुणे पहात हिंडत आहोत असे वाटते.
राजा शिवछत्रपती - ब. मो. पुरंदरे
... शिवाजी महाराजांचे चरीत्र आहे.
शतदा प्रेम करावे - अरुण दाते
... अरुण दाते यांचा जीवनप्रवास. लता मंगेशकर ते सलमानखान आणि जावेद अख्तर ते जगजीतसिंग यांचे संदर्भ येतात. अतिशय संदर्भसंपन्न पुस्तक आहे.
मना सर्जना - डॉ अनिल गांधी(एम एस)
... एका डॉक्टरने लिहिलेले हे आयुष्यातल्या अनुभवांवरचे हे पुस्तक आहे. एक डॉक्टर आणि एक कुटुंबप्रमुख म्हणून आलेले अनुभव मुख्यतः यात वाचायला मिळतात.
पवनाकाठचा धोंडी - गो. नी. दांडेकर
... पवनेकाठच्या मावळ परिसरात घडलेली ही दोन भावांची गोष्ट आहे. यात धाकट्या भावाला पोटच्या मुलाप्रमाणे वाढवणारा मोठा भाऊ आणि वहिनी आहेत. यावर आधारीत मराठी चित्रपटही आला होता. चंद्रकांत सूर्यकांत यांच्या भूमिका होत्या. गोनीदांच्या लिखाणाची मोहिनी का पडते हे समजण्यासाठी वाचकांनी त्यांची 'माचीवरला बुधा', 'शितू' ही पुस्तकेदेखील अवश्य वाचावीत.
पानिपत - विश्वास पाटील
... पानिपतच्या युद्धावरील ही कादंबरी आहे. कादंबरी असली तरी सत्यावर आधारलेली आहे. लिखाण ओघवते आहे. प्रत्ययकारी आहे. या पुस्तकाने मराठीतील ऐतिहासिक कादंबर्‍यांची पूर्वीचे चौकट मोडून नवी निर्माण केली असे मानले जाते.
अमरनाथ संघर्ष - गिरीश प्रभुणे
... पालावरचं जिणं, पारधी हे विषय सोडून प्रभुणे यांनी वेगळ्या विषयावर लिहिलेले पुस्तक आहे. अमरनाथ हे भारतामधे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. यात्राकाळात राज्याचा वनविभाग काही जमीन अमरनाथ बोर्डाला वापरायला देते. त्याचे भाडेही वसूल करते. मेहबूबा मुफ्ती, गुलाम नबी आझाद यांचे राज्यात शासन असताना ही जमीन बोर्डाकडून काढून घेतली. त्याविरुद्ध हिंदूंनी संघर्ष केला. हिंदूंचा जोर पाहून देशाबाहेर निष्ठा असलेले लोकही त्यात सामील झाले. अखेर मुफ्ती-आझाद यांना माघार घ्यावी लागली. काश्मीरमधील सद्यस्थिती समजून घेण्यास पुस्तक उपयुक्त आहे.
शांतारामा - हे हिंदी चित्रपट दिग्दर्शक व्ही शांताराम यांचे आत्मचरीत्र आहे. पुस्तक अत्यंत रंजक पद्धतीने लिहिले आहे. लेखनसहाय्य शांताराम यांच्या मुलीने म्हणजे मधुरा जसराज यांनी केले आहे. मूकपट, काळेपांढरे बोलपट आणि रंगीत चित्रपट अशा तीनही कालखंडात शांताराम वावरले. भारतीय चित्रपट व्यवसायात होत गेलेले बदलही त्यांनी पाहिले. हिंदी चित्रपटाचा इतिहास म्हणून या पुस्तकाचे मोठे महत्त्व आहे.
आवरण - एस एल भैरप्पा (अनु उमा वि कुलकर्णी)
... हिंदूस्थानावर अल्लाउद्दीन खिलजी, मोह बिन कासिम अशा परक्यांची आक्रमणे झाल्यानंतर या देशाची स्थिती काय झाली? हिंदूस्थानातल्या अनेक देवळांची मोडतोड कशी झाली हे यात वाचायला मिळते. अर्थात हा इतिहास आजचे वर्तमान समजून घेण्यासही उपयुक्त आहे. या पुस्त्कावर गिरीश कर्नाड, यु. आर. अनंतमूर्ती यांनी एकांगी असल्याचा आरोप करीत खूप टीका केली होती. पण मोठा वाचकवर्ग या पुस्तकाला लाभला. एक नवी दृष्टी देणारे हे पुस्तक आहे.
मी इडली आणि ऑर्कीड - विट्ठल कामत
... ही एका हॉटेल व्यावसायिकाची गोष्ट आहे. त्यांनी हॉटेल व्यवसाय कसा वाढवला याबाबत यामधे वाचायला मिळते. शाकाहारी भोजनासाठी प्रसिद्ध असणार्‍या कामत हॉटेलमधे नॉन-व्हेजलाही बदलत्या काळाप्रमाणे विट्ठल कामत यांनी स्थान दिले. वाचताना भारावून जायला होते. पण नीट विचार केला तर अनेक विसंगती सहज लक्षात येऊ शकतात. लेखकाच्या काळात व्यवसाय वाढला असे मानले तरी. वडीलांच्या काळातच कामत हॉटेल्सची संख्या प्रचंड होती. कामत स्वतःला इकोफ्रेंडली व्यावसायिक म्हणवून घेतात. पण हॉटेल व्यवसाय इकोफ्रेंड्ली असूच शकत नाही असे तज्ञांचे मत आहे. अनिल मुकेशपेक्षा शून्यातून उद्योगविश्व निर्मिणार्‍या धीरुभाईंचे मोठेपण अधिक आहे. तेच इथेही. बा द वे काही वर्षापूर्वी 'मी मनू आणि संघ' या नावाचे पुस्तक मराठीत आले होते. त्याच्या शीर्षकाची आठवण झाल्यावाचून राहात नाही.
मुक्तांगणची गोष्ट - अनिल अवचट
... मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची ही कहाणी आहे. डॉ सुनंदा अवचट यांनी या संस्थेची सुरुवात केली. पुढील काळात अनेकांनी याचा लाभ घेतला आणि नव्या जीवनाला सुरुवात केली. पेशंटबरोबर वावरताना त्याच्या मनाचा, मानसशास्त्राचाही मोठा अभ्यास यात पहायला मिळतो.
नॉट गॉन विथ द विंड - विश्वास पाटील
... बर्‍याच गोष्टी काळाबरोबर पाचोळ्यासारख्या उडून जातात. काही गोष्टी मात्र टिकून राहतात. अशाच वर्षानुवर्षे टिकून राहिलेल्या जगभरातील कलाकृतींबद्दल यात वाचायला मिळते. रोमन पोलन्स्कीपासून स्टीवन स्पिलबर्गपर्यंत अनेकांच्या कलाकृतींचे यात रसग्रहण आहे. गॉडफादर आहे, अ‍ॅथेल्लो आहे. पानिपतातला नजीब आणि अ‍ॅथेल्लोमधला इयागो यांचा नेमका काय संबंध आहे हे समजण्यासाठी प्रत्यक्ष पुस्तकच वाचायला हवे. विश्वास पाटील यांचा जगभरातल्या सिनेमाचा आणि साहित्याचा व्यासंग थक्क करायला लावणारा आहे. पाटील यांना एवढा वेळ कुठून मिळतो असा प्रश्न पडतो. त्यांच्या दिवसाला २४ पेक्षा अधिक तास असावेत असा अंदाज आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 69645
प्रतिक्रिया 227

प्रतिक्रिया

In reply to by आशु जोग

वाचलीच पाहिजेत अशी पुस्तके म्हणजे सुशिंची. एकदा वाचायला सुरवात केली की 2-3 कसे जातात काळात नाही.

In reply to by आशु जोग

वाचलीच पाहिजेत अशी पुस्तके म्हणजे सुशिंची. एकदा वाचायला सुरवात केली की 2-3 कसे जातात कळत नाही.

जॉन ग्रिशॅम ची सर्व पुस्तके. 'द लास्ट ज्युरर', 'द असोसीएट' ई. बहुतांशी पुस्तके अमेरिकेतील लवादांवर आहेत. केसेसची पार्श्वभूमी वेगळी असल्याने वाचायला मजा येते. तसेच अमेरिकन कायदे पध्दतीचं छान चित्रण आहे. ही पुस्तके मराठीत मेहता पब्लिकेशन तर इंग्रजीत क्रॉसवर्ड मध्ये मिळतात.

जॉन ग्रिशॅम माझा सर्वात आवडता लेखक आहे

अलीकडेच गिरीश कुबेर यांचे "एका तेलियाने" हे पुस्तक वाचले. सौदी अरेबिया व इतर तेल उत्पादक देशांमधील राजकारण व त्यावरून आंतरराष्ट्रीय राजकारणाला कशी दिशा मिळाली याचे सुंदर वर्णन(इतिहास) या पुस्तकात आहे.

In reply to by mahayog

हा असा प्रतिसाद पाहीजे. नुसती पुस्तकांची यादी फेकण्याऐवजी हे पुस्तक का वाचावं हे कळलं तर बरं असतं अन्यथा पुस्तकांची यादी तर बुकगंगावर पण मिळते ना

not without my daughter (ईराण मधुन मुलिसह सुटका करण्यासठि एका आईने केलेलि धड्पड) मराठि अनुवाद, for here or to go अपर्ना वेलणकर , अनुवाद पण बरेच चांगले आहेत .

एक पुस्तक आहे.. "many lives many masters" यात ७०-८० च्या दरम्यान घडलेली गोष्ट अथवा आत्मचरित्र..डॉ. कडे त्यांच्याच हॉस्पिटल मधली नर्स म्हणुन काम करणारी एक मुलगी काही अगम्य त्रास (विचित्र स्वप्ने, काही गोष्टींची खु भिती) या कारणाने योगायोगाने येते.. तिच्य ट्रिट्मेंट दर्म्यान आलेले अनुभव लिहिले आहेत.. तिच्यावर बरेच उपाय करुन काही फरक पडत नाही म्हणुन डॉ. हिप्नॉटिझम चा पर्याय घेतात.. आणी मग हळु हळु कळत जाते की तिने ह्या आधी जवळ जवळ ८०-९० जन्म घेतले आहेत .. आणी बरिच भिती आधिच्या जन्मातल्या प्रसंगांशी सबंधित आहे.. त्यात ते डॉ. तिला हिप्नॉटिझम दरम्यान अगदी म्रुत्युच्या जवळचे आणी नंतर चे डिटेल्स पडताळतात.. असे बरेच म्रुत्यु शी निगडीत अनुभव ती सांगते .. त्यात सारांश असा की ती मरतान सांगते "मला खुप हलक वाटतय मी खुप उंच उंच जात आहे .. एक खुप मोठी शक्ती प्रकाश दिसत आहे .. जो खुप छान वाटत आहे .. इथे खुप जन आहेत आम्ही सगळे नव्या जन्माची प्रतिक्शा करत आहोत ई. " तो प्रकाश एक शक्ती आहे ज्याला ती मास्टर म्हणते आणी ती शक्ती त्यांच्याशी बोलतेही.. अजुन ही खुप छान आणी बर्याच प्रश्नांन उत्तर मिळेल अस पुस्तक आहे.. जरुर वाचा..

डेज ऑफ गोल्डन सेपिया यास्मिन प्रेमजी (विप्रो च्या अझीम प्रेमजींची पत्नी) यांनी लिहिलेलं पुस्तक. लालजी लाखा नावाच्या गुजरात मधील कच्छ च्या छोट्या गावातील मुलाने मुंबईत येऊन केवळ हुशारी, कष्टाळूपणा आणि प्रामाणिकपणा या आपल्या अंगभूत गुणांच्या जोरावर 'कॉटन किंग ' हे स्थान कसं निर्माण केलं त्याची कथा. स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हणजे साधारण पणे १८५७ सालातल्या मुंबईचे वर्णन आहे.

एक खूप जुनं पुस्तक वाचनात आलंय. स आ जोगळेकर यांचं सह्याद्री. निव्वळ अप्रतिम! इथे प्रचेतस यांनी संदर्भात लिहिलेलं.

एका डोंगर वेड्याने सलग साठ दिवस एकट्याने केलेली भन्नाट डोंगर यात्रा. लेखक श्रीपाद हिर्लेकर

मनोज भाटवडेकरांच एका पुनर्जन्माची कथा! भाटवडेकर मुंबईकर मानसशास्त्रज्ञ. र्‍हुमॅटॉइड अर्थ्राय्टीस नावाच्या भयंकर आजाराशी त्यांनी दिलेल्या लढ्याची ही गोष्ट, अतिशय प्रामाणिकपणे मांडली आहे. अत्यंत वाचनीय. डॉ. अंजली जोशींनी लिहिलेलं मी अल्बर्ट एलिस देखील असंच जबरदस्त पुस्तक. एका मानसशास्त्रज्ञाची वैचारीक बैठक समजून घ्यायला मजा येते. बरोबरीला विवेकनिष्ठ विचारसरणीची तोंडओळखही होते.

In reply to by रायबा तानाजी मालुसरे

तुम्ही छान प्रतिसाद दिलाय. अशाच प्रतिसादांची खरं म्हणजे अपेक्षा होती. अनेकांनी नुसती यादी दिलीये.

अहा, मला ही बर्^याच वाचायच्या राहिलेल्या पुस्तकांची यादी करता आली. इथे नंदा खरेंच्या पुस्तकांचा उल्लेख कसा नाही? असल्यास माझ्या नजरेतून सुटला. "अंताजीची बखर" भन्नाट पुस्तक आहे. सुरुवातीला पार जुन्या लहेज्यातल्या भाषेची सवय नसल्याने वेळ लागतो पण मग जे काही गुंगून जातो की बस्स. पेशवाईच्या उत्तरार्धातील भारतीय समाजाचे चित्र एका संधीसाधू, स्वतःला तोशीस न लागू देता महत्व मिळवण्याचे जमलेल्या एका भटाच्या भूमिकेतून रंगवल्रे आहे. प्रचंड आवडले होते. त्यांचंच "वारूळ" वाचायला घेतलय. "उद्या" हे नंदा खरेंचेच वेगळे पुस्तक. भारतातील तंत्रज्~जनातील अफाट प्रगती, त्याचा केवळ ठराविक वर्गाच्या तुंबड्या भरण्यासाठी होत असलेला कल्पक उपयोग. त्या प्रगतीबरोबर समाजातल्या न बदललेल्या परंपरा, समजूतींची घातली जात असलेली सांगड आणि त्यातून दिसणारे भावनाशून्य त्याहीपेक्षा मेक्~एनिकल भावभावनांचे जग याचे एक ओझरतं भयावह काल्पनिक दर्शन या पुस्तकातून होतं. जीएंची इतर पुस्तके तर आहेतच पण 'माणसं-अरभाट आणि चिल्लर' हे त्याचं वेगळ्या शैलीतलं एक छान पुस्तक. दुर्गा भागवतांच्या ऋतूचक्र, पैस आणि बहुधा भारतीय लोककथांचे काही भाग माझ्याकडे आहेत. तेही मधे मधे वाचायला मजा येते. मारूती चितमपल्लींचं चकवा-चांदण पुरं केलं नाही पण त्याची त्या निसर्गावरची पुस्तकं म्हणजे रातवा, निळावंतीचे दिवस (स्वतंत्र पुस्तक आहे की लेख नक्की आठवतनाहीय्_),नागझिरा ही अप्रतिम पुस्तकं तुम्हाला निसर्गाच्या जवळ, झाडे,प्राणीपक्ष्यांच्या दुनियेत अलगद घेऊन जातात. रा. चिं. मोरविंचीकरांचे 'शुष्क नद्यांचे आक्रोश' हे ही सगळ्यांनी वाचावंच असं म्हणेन. आपल्या खर्^या खुर्^या समृध्द वारश्याची, परंपरेची आपण कपाळकरंट्यांनी कशी वाट लावली आहे ते वाचून खिन्न व्हायला होतं. या लिखाणासाठी या साध्या शिक्षकाने घेतलेले श्रम खरंच वाखाणण्याजोगे आहेत पण त्याच्या उपयोग काय? मला पुस्तकांच्री नावं नक्की आठवत नाही आहेत , बहुधा गंगाजळी असावं. जोशी म्हणून कलकत्त्याच्या एका लायब्ररीत ग्रंथपाल असणार्^यांनी केलेल्या स्फुट लेखनाचे तीन भाग आहेत. ते लेखही फार सुरेख आहेत. मुखवटे हे आ वि जातेगावकरांचं पुस्तकही मला खुप आवडतं. आता मिळेल का माहिती नाही, पण़ वाचा मिळवून. देवी, सरत चाललेल्या परंपरांचं एक वेगळं विश्व आहे. अर्थात ते मला आवडतं कारण आजीच्या परंपरा जपण्याच्या कडक शिस्तीत माझी वाढ झाली, कोकणातले देवदेवतांच्या, अवचारांच्या गोष्टी ऐकत लहानपण गेलेय. त्यामुळे ह्या मराठवाड्यातील वातावरणातल्या गोष्टी असल्या तरी माझ्या विचाराने प्रागतिक पण संस्कारांने प्रतिगामी असलेल्या मनाला त्या भावतात.

२०१६ मधे अनुभवच्या दिवाळीत अंकात सुहास कुलकर्णी यांचा अरुण टिकेकर यांच्यावर प्रदीर्घ लेख आला त्यामधे सुहास कुलकर्णी यांनी येऊ घातलेल्या या पुस्तकाचा उल्लेख केला होता. कॉलेजातून नुकतीच बाहेर पडलेली काही मुले अगदी अनौपचारीकपणे एकत्र यायला लागतात, गप्पांचे अड्डे जमवतात. पुढे स्व-तंत्रपणे अनेक नियतकालिकांसाठी लेखन करणारी युनिक फीचर्स ही संस्था सुरु होते. मग उत्तम दर्जाचे चांगल्या खपाचे मासिक, प्रकाशन संस्थाही सुरु होते. दूरदर्शन मालिकांची निर्मितीही त्यांच्याकडून होते. या लोकांची कामे सगळ्यांना माहीत असतात पण या लोकांची नावे फारशी कुणाला माहीत नसतात. या पुस्तकाच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टी माहीत होतात.

लक्ष्मणझुला’ या लक्ष्मण लोंढेंच्या पुस्तकाबद्दल काही लिहावेसे वाटते. हे पुस्तक हा ३० लेखांचा संग्रह आहे. मूळ लेख पूर्वी ‘अंतर्नाद’ मासिकात सदर रूपाने प्रसिद्ध झाले होते. हे पुस्तक म्हणजे ललितगद्याचा एक उत्कृष्ट आविष्कार आहे. त्यातील लेख हे निसर्ग, विज्ञान आणि सौंदर्य या त्रिमूर्ती भोवती गुंफलेले आहेत. ‘प्रकृती कडून संस्कृतीकडे’ या लेखात हे स्पष्ट केले आहे की उपाशी पोटाने संस्कृतीच्या गप्पा मारता येत नाहीत पण, निदान पोट भरल्यावर तरी माणसाने संस्कृतीकडे वळले पाहिजे आणि तिचा मूलाधार आहे ती प्रेमभावना. माणसाने पर्यावरणाची जी नासधूस चालवली आहे त्यावरील मार्मिक टिपणी एका लेखात केली आहे. निसर्गाने माणसाला हवा, सूर्यप्रकाश, पाणी, जमीन यासारख्या गोष्टी अगदी फुकट दिल्या आहेत पण आपण त्यांची हवी तेवढी कदर केलेली नाही याची जाणीव त्यातून होते. स्थापत्यशास्त्रातल्या प्रगतीचा माणसाला केवढा गर्व असतो. पण जेव्हा आपण सफेद मुंग्यांनी तयार केलेल्या ५-६ मीटर्सच्या उंचीची वारूळे बघतो तेव्हा या नैसर्गिक चमत्कारापुढे आपल्याला नतमस्तक व्हावे वाटते याचे भान आपल्याला एका लेखातून येते. ‘कांचनमृगाच्या शोधात’ हा आपल्याला आत्मपरिक्षण करायला लावणारा लेख. ‘प्रगती’ कशाला म्हणायचे या मुद्द्याभोवती गुंफलेला हा लेख. प्रगतीचा आपण लावलेला ‘सतत वाढ’ हा निकष लेखकाच्या मते चुकीचा आहे. वाढ आणि विकास यातील फरक अगदी चांगल्या प्रकारे समजावून लेखक सुचवतो की प्रगतीची एकमेव फूटपट्टी पैसा हीच नसली पाहिजे. पुस्तकाच्या मध्यात असलेला ‘हृदया हृद्य येक जाले’ हा लेख तर खरोखरच कळसाध्याय म्हणावा लागेल. आता अतिप्रगत संगणक युगात माणूस माणसाशी ‘जोडला’ गेलेला आहे खरे पण तो केवळ मेंदूने. त्याबरोबर माणसे एकमेकांशी हृदयाने जोडली गेली आहेत का हा लेखकाने उपस्थित केलेला प्रश्न आपल्याला अंतर्मुख करून जातो, नव्हे, सतावतो. ‘एक टक्क्याचा खेळ’ हाही एक विचारप्रवर्तक लेख. आपला समाज हा असंख्य गटातटात विभागला गेला आहे. अशा विविध गटांची टक्केवारी काढून मग अल्पसंख्य गटांना कमी लेखण्याचे वा हिणवण्याचे प्रकार सतत चालू असतात. या संदर्भात एका मूलभूत शास्त्रीय सत्याकडे लेखक आपले लक्ष वेधतो. ते म्हणजे मानव आणि चिपांझी माकड या दोघांच्या ‘डीएनए’ मध्ये फक्त १ टक्क्याचा फरक आहे. म्हणजे, अखिल मानवी संस्कृतीच फक्त १ टक्क्याची संस्कृती आहे. तेव्हा अजून माणसामाणसांत भेद वाढवणारी टक्केवारी आपण गाडून टाकायला हवी आहे की नाही? .. तर असे एकाहून एक सरस लेख असणारे हे पुस्तक. प्रत्येक लेख सरासरी ४ पानांचा. हेही एक आकर्षण. निसर्ग –विज्ञान- तत्त्वज्ञान यावरचे सोप्या भाषेतील सुरेख चिंतन. हे पुस्तक माझ्या संग्रही गेली १५ वर्षे आहे. साधारणपणे १०-१२ वर्षांनंतर आपल्या संग्रहातली काही पुस्तके ‘शिळी’ वाटू लागतात. पण हे पुस्तक त्याला नक्कीच अपवाद आहे. दर ३ महिन्यातून मी ते एकदा बाहेर काढतो, त्यातील एखाद्या लेखाचा मनापासून आस्वाद घेतो. आयुष्यभर जवळ बाळगावे असे हे पुस्तक आहे.