Skip to main content

आक्रमक चीनचा धोका

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 11/07/2017 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानला शिव्या देण्याची भारतीय नेते आणि जनता यांना तशी सवय झाली आहे. किंबहूना पाकिस्तानला शिव्या दिल्याशिवाय आमची देशभक्ती सिद्धच होत नाही. शत्रू जेवढा छोटा तेवढ्या शिव्या जोरात. हा भारतीयांचा ढोंगीपणा नेहमी पहायला मिळतो. चीनबद्दल मात्र आमची ब्र काढायची हिम्मत नसते, तिथे आम्ही भारतीय पेग गिळून गप्प बसतो. असो. पाकिस्तानबद्दल सध्या पुरे.


चीनने व्यापलेला प्रदेश, पूर्व आणि पश्चिमेस दोन्हीकडे .


चीनबद्दल विचार करताना इतिहासात किती मागे जावे हे कळत नाही. केवळ आजच्या वर्तमानाचा विचार तर पुरेसा नसतोच. अगदी इंग्रजी राजवटीतही इंग्रजांना चीनचा धोका लक्षात आलेला होता. त्यामुळे भारत चीन यांच्यामधे असलेल्या तिबेटला बफर स्टेट मानलं जात असे. तिबेटवरही भारताचा अधिकार असल्याने चीनच्या सीमा भारतापासून दूर होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यावरही तिबेटचे अनेक अधिकार आपल्याकडे होते. पण तिबेट चीनकडे गेले तसा चीनी धोका अधिक जवळ आला. पुढेही कुरापती काढण्यात चीनने कोणतीही कसर ठेवली नाही. १९६२ च्या युद्धापर्यंत अनेक प्रकारे चीनने भारताला सतावले, आजमावले. त्याला कणखर उत्तर न मिळाल्याने चीनची हिम्मत वाढली असावी. पुढे चीनने आक्रमण केले इ. तेव्हापासून काही भाग चीनने बळकावला. नंतरच्या ५० वर्षातही चीनने कुरापती काढणे बंद केले नाही. पण धोका असूनही आम्ही पाकिस्तान पाकिस्तान मोठा करत चीनकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत राहीलो. अरुणाचल प्रदेशमधे आमचे पंतप्रधान गेले तर त्याला चीन आक्षेप घेते. तिथल्या नागरीकांना चीन स्टेपल्ड व्हिसा दिला जातो. १९६२ नंतर प्रत्यक्ष युद्ध झाले नसले तरी इतर अनेक पातळ्यांवर चीन खेळ्या खेळत राहीले. एक प्रकारे हा चीनचा गनिमी कावाच आहे. दोन सैन्ये युद्धात परस्परांना समोरासमोर भिडतात, त्यांची शस्त्रे अस्त्रे एकमेकांचा सामना करतात. शक्तीचा कस लागतो. पण ही वेळ येइल तेव्हा येइल. तोवर शक्ती ऐवजी युक्तीने चीन खेळते आहे.

काराकोरम हायवे .


पूर्वी किल्ल्याला जसा वेढा घातला जात असे तसे चीनने भारताला सर्व बाजूने वेढायला सुरुवात केलेली आहे. हे एका वर्षात झालेले नाही. हे अनेक वर्षांच्या स्ट्रेटेजी आणि त्यावर घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे. राज्यकर्त्या व्यक्ती बदलल्या पण त्याच धोरणांवर काम होत राहीले. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. चीनकडून निदान एवढे तरी शिकण्यासारखे आहे. जम्मू-काश्मीरच्या निमित्ताने पाकिस्तानवर आमची आगपाखड नित्याची पण पाकव्याप्त जम्मू-काश्मीरात चीनचा वावर आम्हाला तितका महत्त्वाचा विषय वाटत नाही. CEPC, काराकोरम हायवे च्या निमित्ताने चीन-पाकिस्तान सहकार्याचा नवा अध्याय पहायला मिळत आहे. आजवर पाकिस्तानसमोर हिम्मत दाखणारा भारत आता तीही दाखवू शकेल अशी स्थिती नाही कारण पाकिस्तानच्या आतमधेच आता चीन ठाण मांडून बसला आहे. म्हणजे फक्त पाकिस्तानशी नव्हे तर या पुढच्या काळात सामना चीनशीही करावा लागेल. भारताच्या प्रत्येक शेजार्‍याशी चीनने संधान बांधले आहे. नेपाळ, भूतानमधेही चीनचा प्रयत्न सुरु आहे. नेपाळ्मधे तर चांगले यश मिळालेले आहे. काही नेपाळी पक्षांनी स्वतःला माओवादी म्हणवून घ्यायला सुरुवात केली आहे. हे एक उदाहरण झालं. एव्हरेस्ट इ आणखीही तपशील देता येइल.

.


नुकत्याच नरेंद्र मोदी यांनी अमेरीकेला भेट दिली. त्यातून नक्की काय साध्य झाले. व्हिसासंबंधी काही निर्णय झाला का ? भारताला व्यापारासाठी काही फायदा झाला का ? की भारत संरक्षणसामग्रीच्या बाबतीत गिर्‍हाईक झाला. अभ्यास झाला पाहीजे. त्यांनी इस्राईललाही भेट दिली. आम्ही लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. राष्ट्रप्रमुखांच्या गळाभेटींच्या बातम्यांनी आता इस्राईल आणि अमेरीका हे भारताच्या चीन, पाकिस्तान विरोधातल्या लढाईत आपल्याला साथ देतील असा समज करून घेऊन मोकळे होतो. पाहुण्याच्या हातून साप मारणे ही म्हण पराराष्ट्र धोराणात फार काळ अंमलात आणता येत नाही कारण सगळीच कामे आऊटसोर्स करता येत नाहीत. पाकिस्तानचा विषय निघाला की इस्लामी दहशतवाद, अफझलखानाचे चित्र त्या खालचे दहशतवादाचा सामना असाच करावा लागतो हे वाक्य. पण चीनच्या बाबतीत मात्र बौद्ध धर्म, त्याचा भारतातच झालेला उगम. युआन श्वांग, सम्राट अशोक सगळं कसं गोड गोड. ज्याच्यापुढे काही चालत नाही त्या बलवानाचा बलात्कारही गोड असं सिद्ध करणारे युक्तिवाद सुरु होतात. यालाच आम्ही पराभूत मनोवृत्ती म्हणतो. वैचारीक पातळीवर, अगदी गप्पांमधेही आम्ही चीनचा पराभव करायला कचरतो. इतकी भिती नेणीवेत ठासून भरलेली असते. तिला शब्दरूपही आम्ही देऊ शकत नाही कारण त्या भितीची आम्हाला जाणीवच झालेली नसते. गांभीर्याने चीनच्या आव्हानाचा विचार करू लागलो तर प्रश्न सुटू शकतील. उत्तरे सापडू शकतील. गनिमी कावा आम्हालाही लढता येइल. चीनची वाढत जाणारी शक्ती हाच चीनचा मायनस पॉइंटही आहे. कारण त्याच शक्तीमुळे आपल्या सगळ्या शेजार्‍यांना चीनने शत्रू केले आहे. सगळीकडे चीनचे सीमा विवाद आहेत. मंगोलिया भारताकडे आशेने पहात आहे. पुढील काळात खूप दूरदृष्टी ठेवून योजना आखाव्या लागतील. चीनबरोबरची लढाई अवघड आहे पण अशक्य नाही. एक भारतीय म्हणून जे मनात आलं ते लिहीलं पण अधिक माहीती मिळावी ही इच्छा आहे. मिसळीवर अनेक अभ्यासक आहेत. प्रत्यक्ष चीनमधे राहीलेले सदस्यही आहेत. तेही निश्चित या विषयावर आमचे अधिक प्रबोधन करतील ही अपेक्षा. धन्यवाद ! ashutoshjog@yahoo.com
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6618
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

काराकोरम पास वाटत नाहीय हा, एवढी हिरवळ? मॉर्फ वाटतो.

@ आशु जोग चीनचे अभ्यासक असलेले आमचे एक स्नेही म्हणतात त्याप्रमाणे China is a country with everything in surplus. तो एक ताकदवान देश आहे आणि त्याची महासत्ता होण्याची आकांशा दुर्दम्य आहे ह्यात वादच नाही. त्यासाठी स्वतःच्या आर्थिक साम्राज्याची मजबूत बांधणी आधी कारण्याएव्हढे शहाणपणही त्यांच्याकडे मुबलक आहे. पण शक्ती वाढली की शत्रूपण वाढतात आणि तिथेच खरी संधी असते. चीन हा एक असा देश आहे ज्याचे उत्तर कोरिया, रशिया, मंगोलिया, कजाकिस्तान, किर्गिस्तान, तजाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत, नेपाळ, भूतान, म्यांमार, लाओस आणि वियतनाम अश्या स्वतःच्या सर्व १३ शेजारी देशांशी सीमावाद आहेत. (तिबेट आता वेगळा देश किंवा स्वायत्त प्रदेश राहिलेला नाही आणि पाकिस्तानला चीनच्या सीमा पाकव्याप्त काश्मीर प्रदेशातून आता थेट भिडलेल्या आहेत त्यामुळे तेराच शेजारी म्हणूयात.) चीनला त्याच्या समुद्री सीमांवरही जोरदार आव्हानाचा सामना करावा लागत आहे - दक्षिण-पूर्वेतले झाडून आठही समुद्र-शेजारी म्हणजे जापान, दक्षिण कोरिया, फिलीपींस, वियतनाम, मलेशिया, ब्रुनेई, इंडोनेशिया आणि तैवान चीनच्या अरारेवीला उत्तर देण्यासाठी एकत्र आले आहेत. सगळ्याच देशांवर विकासाची स्वप्ने विकणे, दादागिरी करणे किंवा पैसे उधळण्याची खेळी कामी येतेच असे नाही. त्यामुळे चीनला त्याच्या वसाहतवादी धोरणांना मुरड घालावीच लागणार आहे.

In reply to by अनिंद्य

१९५०-६० च्या दशकापर्यंत जागतिक राजकारणात असलेले ब्रिटिशांचे स्थान जसे अमेरिकेने हिसकावून घेतले तसे अमेरिकेचे स्थान आता चीनने हिसकावून घेतले नाही म्हणजे मिळवली.

In reply to by अनिंद्य

अनिंद्य छान माहीती.

सिपेक ला प्रत्युतर म्हणुनच तर चाबाहर डिप्लोमसी खेळली गेली ना. मला वाटतं भारत आपल्या परीने चिन वर दबाव आणाण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्या गोष्टी थोड्याच आतरजालावर आणी वॉट्साअ‍ॅप देणार.

दुर्दैवाने आतापर्यंतच्या कुठल्याच सरकारने चीन विरुद्ध ठोस धोरण अवलंबिले नाही. मोदींच्या सरकारकडुन अपेक्षा आहेत व सध्यातरी त्यांचे धोरण कडक वाटतेय.

In reply to by योगेश लक्ष्मण बोरोले

खूप दीर्घकालीन योजना आखाव्या लागतील. जशा चीनने आखल्या.

पाकिस्तानला शिव्या देण्याची भारतीय नेते आणि जनता यांना तशी सवय झाली आहे. किंबहूना पाकिस्तानला शिव्या दिल्याशिवाय आमची देशभक्ती सिद्धच होत नाही. शत्रू जेवढा छोटा तेवढ्या शिव्या जोरात. हा भारतीयांचा ढोंगीपणा नेहमी पहायला मिळतो. चीनबद्दल मात्र आमची ब्र काढायची हिम्मत नसते, तिथे आम्ही भारतीय पेग गिळून गप्प बसतो. असो. पाकिस्तानबद्दल सध्या पुरे.
हे सुरुवातीचे बेसलेस अन पाल्हाळीक स्वगत सोडल्यास, बऱ्यापैकी माफक उत्तम लिहिलेत तुम्ही, पाकिस्तान अन चीन तुलना होऊच शकत नाही, अन चीन तसंही पाकिस्तान खालसा करणारच आहे (सुरुवात झाली आहे, संदर्भ : सीपीईसी प्रकल्प अन त्यातल्या कलमांचा अभ्यास न करता पाक ने चीन ला पाकिस्तानात मुक्त संचार करायला दिलेली परवानगी) , चीन विरुद्ध भारतीयच मूग गिळून बसतात असं नाही तर महाबलाढ्य अमेरिका सुद्धा व्यापारी हिते अन केलेल्या निवेशापोटी चीन बद्दल जरा आस्तेकदमच धोरण ठेवते, एकंदरीत चीन बद्दल काहीतरी ठोस धोरण हवे हे मात्र नक्की.

उत्तम प्रतिसाद अधिक माहितीच्या प्रतीक्षेत

अविनाश धर्माधिकारी सरांची हि तीन भाषणे ऐका , Tibet : India - China's Battleground | Shri. Avinash Dharmadhikari (Ex-IAS) यामध्ये चीनचा धोका १९५० पासून तिबेट गिळंकृत केल्यानंतर कसा वाढत गेला याचा जबरदस्त आढावा घेतला, अगदी डोळ्यात झणझणीत अंजन घातल्यासारखा. China Long March चे सुद्धा दोन भाग आहेत, भाग १ आणि भाग २ ज्यात माओने चीनी कमुनिस्त क्रांती कशी यशस्वी केली याबद्दल आहे. हि भाषणे जरूर बघा.

ते चीन बद्दल नंतर बोलू..... पण तुम्ही "पुणे स्टेशन ते कोथरूड बस स्टँड" ह्या प्रवासाच्या पी.एम.टी.च्या तिकिट दराची चौकशी केलीत काय? किंवा तो प्रवास केला आहे का? नास्तिकांना फक्त आरोप करता येतो, हेच सत्य......

In reply to by मुक्त विहारि

पण तुम्ही "पुणे स्टेशन ते कोथरूड बस स्टँड" ह्या प्रवासाच्या पी.एम.टी.च्या तिकिट दराची चौकशी केलीत काय?
हे नक्की काय आहे? तुमचा आत्ताचा धागा वाचुन हे वाक्य कुठेतरी वाचलंय असं वाटलंच. चीनच्या धाग्यावर हे का लिहावं वाटलं तुम्हाला?

In reply to by पिलीयन रायडर

तुमचा आत्ताचा धागा वाचुन हे वाक्य कुठेतरी वाचलंय असं वाटलंच
त्याचं काय आहे . . . बूंद से गयी

आतिशय धोकादयक देश अहे ह चिन.