मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वजनाचा काटा -८

सुबोध खरे · · काथ्याकूट
वजनाचा काटा -८ गरोदरपण -- बऱ्याच मुलिंचं लग्न झालं कि वजन वाढायला सुरुवात होते. याची काही कारणे अशी आहेत. लग्न ठरेपर्यंत मुली आपल्या एकंदर रूपाबद्दल आणि वजनाबद्दल जास्त जागरूक असतात. त्याच बरोबर लग्नामुळे आयुष्यात होणाऱ्या आमूलाग्र बदलाबद्दल मुलीला जशी उत्सुकता असते तसाच एक तणाव ही असतो. नवरा कसा मिळेल? सासर कसे मिळेल? या गोष्टींमुळे खाल्लेले "अंगी" लागत नाही. हा परिस्थिती लग्न ठरले कि बदलू लागते. भावी नवऱ्याबरोबर फिरायला जाणे आणि बाहेर खाणे किंवा नातेवाईकांकडे गेल्यावर सुग्रास अन्न मिळणें हे सहजी होऊ लागते. शिवाय आत्तापर्यंत असलेला तणाव कमी होऊ लागतो. त्यामुळे खाल्लेले "अंगी" पण लागू लागते साखरपुडा, लग्न, मधुचंद्र या पायऱ्या चढता चढता मग वजनाच काटा जो डावीकडे असतो तो मध्यभागाकडे झुकू लागतो. आजकाल बऱ्याच वेळेस करियर सासरी स्थिरस्थावर होण्यासाठी वेळ हवा इ कारणांमुळे पहिले मूल लांबणीवर टाकले जाते त्यामुळे बऱ्याच मुलींचा काटा अगोदरच उजवीकडे झुकू लागलेला किंवा झुकलेला असतो. कारण लग्न समारंभासाठी घेतलेले ब्लाउज होईनासे होतात.अशा मुली आता वजन कमी करायला हवं आहे असे म्हणू लागतात. पण त्यात फारसा जोर नसतो. बऱ्याच वेळेस जनाचे आणि मनाचे समाधान करण्यासाठी" डाएटिंग" सुरु होते अशा मोरपंखी दिवसात नवीन बाळाची चाहूल लागते आणि दुधात साखर पडल्याचा आनंद होतो. मग पहिला हल्ला घरच्यांकडून होतो. " आता तुझा डाएटिंग वगैरे बंद कर". त्यातून आपल्या मराठी किंवा हिंदी धारावाहिक मध्ये मुलगी गरोदर झाली म्हणजे जगावर उपकार केल्यासारखे असते. जरा म्हणून कुठे वाकली, पटकन उठली कि आई किंवा सासू "अगं अगं अशी पटकन उठू नकोस या दिवसात तुला जपायला पाहिजे" याचा मोठा परिणाम आया /सासवांवर होत असतो. मग काय वजनाचा काटा फारच पटकन उजवीकडे झुकू लागतो. ज्यांना पहिल्या दोन तीन महिन्यात उलट्यांचा फार त्रास होतो. त्यांना उलट्या बंद झाल्या कि दुप्पट खाण्यासाठी जबरदस्ती केली जाते. याचा परिणाम काय? तर बहुसंख्य बायका पहिल्या बाळंतपणानंतर सुदृढ होऊन बसतात आणि मग ते वजन हटता हटत नाही. नवरे सुद्धा विचार करतात चवळीच्या शेंगेसारखी असलेली आपली बायको सुरणाचा गड्डा कशी झाली? मूळ आपले वजन "प्रमाणात" असावे यासाठी हल्ली मुलींना जास्त कष्ट करावे लागतात. शाळेत रोज जाताना मज विघ्ने येति नाना यासारखे चहुबाजूनी सुग्रास खमंग पदार्थांची रेलचेल असताना स्वतःवर नियंत्रण कसे ठेवायचे हा सदा सर्वकाळ असणारा प्रश्न आहे. परंतु ज्या मुलींनी गरोदर होण्याचे योजलेले आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच वजन नियंत्रणात आणायला सुरुवात केली पाहिजे तसेच लोह कॅल्शियम इतर खनिजे आणि जीवनसत्त्वे यांनी भरपूर असा आहार घेण्यास सुरुवात केली पाहिजे म्हणजे गरोदरपणात या तत्वांची कमतरता भासणार नाही. गरोदरपणाच्या नऊ महिन्यात स्त्रीचे एकंदर १२-१३ किलोने (सरासरी) वजन वाढते. यापैकी ३ किलो वजन बाळाचे ३ किलो वजन गर्भाशय(२ किलो) आणि स्तनाचे (१ किलो) ३ किलो वजन गर्भजल आणि वार ( प्लॅसेंटा) आणि ३-४ किलो आईच्या शरीराचे (यात २ किलो रक्तद्रव आणि दोन किलो शरीरद्रव) येतात. याचा साधा सरळ अर्थ असा आहे कि १२-१३ किलोपेक्षा जास्त वाढलेले वजन हे आईचे वजन असते. ( त्यात बहुतांशी चरबीच असते) जुन्या काळात (म्हणजे फार जुना नाही) पण ६०-७० वर्षांपूर्वी मुलींचे १६-१७ व्या वर्षीच लग्न होत असे आणि १८ व्य वर्षी पहिले बाळंतपण येत असे. त्यामुळे मुलीकडे स्वतःची वाढ पूर्ण होण्याच्या अगोदरच बाळंतपण नशिबी येत असे. यामुळे तुला आता दोन जीवांसाठी खायचे आहे सारखे वाक्प्रचार ऐकायला मिळत. तेंव्हा आजच्या सारखी अन्नाची रेलचेल नसे. अन्नधान्याचे दर आजमितीस पूर्वीपेक्षा कितीतरी कमी आहेत. किमान वेतन रोज १६० रुपये आहे. यामुळे शहरात अगदी झोपडीत राहणारी मुले सुद्धा कुरकुरे मॅग्गी सारखे प्रक्रिया युक्त पदार्थ खाताना दिसतात. "तुला आता दोन जीवांसाठी खायचे आहे" असे वाक्प्रचार रूढार्थाने वापरले जातात पण त्याचा संदर्भ बदलला आहे. आता ९५% टक्के मुली (निदान शहरात) २२-२३ वयानंतर पहिल्या बाळंतपणासाठी येताना दिसतात. वाढ पूर्ण झालेली आणि सुदृढ अशी मुलगी जेंव्हा गरोदर असते तेंव्हा हा वाक्प्रचार कसा उलट लागू पडतो ते पहा. पहिल्या २० आठवड्या पर्यंत बाळाचे वजन फक्त २५०-३०० ग्रॅम असते. म्हणजे ६० किलो वजनाच्या आईच्या फक्त ०.५ % वजन. आता १००.५ साठी जर आपण २००% अन्न खाल्ले तर काय होईल? २० आठवड्यानंतर मुलाचे वजन भरभर वाढते पण तरीही जन्माचे वेळेस मुलाचे वजन ३ किलो(७ पौंड) च्या आसपासच असते म्हणजे परत आईच्या वजनाच्या ५% पेक्षा कमी(आईचे वजन वाढून आता ७० झालेले असते).म्हणजे १०५ साठी २०० टक्के खाल्ले कि उरलेले वजन "अंगावरच" चढते. पुढचे सहा महिने आई बाळाला दूध पाजत असते. जन्मास आलेल्या बाळाला एका वेळेस फक्त ३० मिली दूध लागते. ( मुलाच्या जठराची क्षमता तितकीच असते) दिवसात सहा वेळेस दूध पाजले तरीही ते १८० मिली च होईल. याचा अर्थ बाळासाठी लागणारे अन्न किती कमी आहे ते लक्षात घ्या. सहा महिन्याच्या मुलाचे वजन साधारण दुप्पट पेक्षा थोडे जास्त असते.( पाच महिन्याला बाळाचे वजन जन्माच्या वेळच्या वजनाच्या दुप्पट आणि एक वर्षाला तिप्पट असायला हवे) म्हणजेच बाळाचे वजन सात किलो च्या आसपास असते. म्हणजेच बाळाचे वजन सहा महिन्यात ४ किलोने (किंवा ६६६ ग्रॅम महिन्याला) वाढते. पूर्वी दर दीड दोन वर्षात पाळणा हलत असे आणि तेंव्हा आज सारख्या सोयी सुविधा नसत.बऱ्याच वेळेस मुलीबरोबर तिची आई सुद्धा बाळन्तीण असे. तेंव्हा आई कडून कोड कौतुक करून घेणे जरा कठीणच असे. बायकांना पाट्या वरवंट्यावर कामे करावी लागत. पाणी भरावे लगे, आडातून पाणी काढून कपडे धुवून वाळत घालावे लागत, झाडणे, पुसणे/ सारवणे करावे लागे. भांडी घासावी लागत. एवढ्या सगळ्या कष्टासाठी त्यांना अर्थात खाणे जास्त लागत असे. आता नळ सोडला कि पाणी येते. मिक्सर वर दोन मिनिटात चटणी वाटणे सारखी कामे होतात. झाडणे, पुसणे भांडी घासायला बहुतांश मध्यमवर्गीय स्त्रियांकडे मोलकरणी असतात. चार पावले चालण्यापेक्षा आज काल मुली रिक्षा करताना दिसतात. पण निसर्ग आपले काम करतच असतो त्यामुळे गरोदर झाल्यावर भूक तेवढीच लागते. शिवाय मुलाला दूध पाजत असताना स्त्रियांना भूकही चांगली लागते. त्यातून सुग्रास अन्न सहज सदा सर्वत्र आणि तेंव्हा पेक्षा जास्त स्वस्त असे उपलब्ध आहे. मग वजनाचा काटा ० ते १०० तीन सेकंदात जातोच. सांगण्याचा अर्थ एवढाच आहे कि पूर्वीसारखे खाणे पिणे चालू असले तरी पूर्वीसारखे शारीरिक कष्ट आता नाहीत त्यामुळे अंगावर चरबी चढणे हि गोष्ट सर्व(सा)मान्य झाली आहे. आज तुम्ही ( निसर्गनियमाने)एकामागोमाग एक होणारी मुले संततिनियमनाने थांबवली आहेत मग त्या अनुषंगाने वाढणारे वजन थांबवायला हवे. संततिनियमना सारखी वजन "कंट्रोल" करणारी गोळी नाही का म्हणजे जोवर तुम्ही गोळी खाता तोवर "काहीही" खाल्लेले चालेल असे मला एका सुदृढ महिलेने विचारले. मी हसून अर्थात नकार दिला. दुर्दैवाने नवऱ्याने वजन वाढले आहे सांगितले कि रुसवे फुगवे होतात तुम्हाला काय माहिती मुलाला जन्म द्यायचा दूध पाजायचे म्हणजे किती कष्ट होतात अशी संभाषणे होतात. सासूने काही बोलले तर "तुम्ही" माझे खाणे काढू नका म्हणून "प्रेमळ" संवाद होतात. याला उपाय काय? आपले वजन गरोदरपणा पूर्वी किती आहे याची प्रथम नोंद ठेवणे आवश्यक आहे. तेच मुळात जास्त असेल तर वजन कमी करण्याची सुरुवात आहारतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ यांच्या सल्ल्याने करावी. त्याच प्रमाणे केवळ भूक लागते म्हणून सदा सर्वकाळ "चरणे" बंद करावे. माझ्याकडे येणाऱ्या सदृढ गरोदर महिलांची काही उदाहरणे अशी आहेत. यात डोहाळे लागले, नवरे/आई वडील "कौतुक" करतात याचा अंतर्भाव आहे. १) मला रोज एक "कॅडबरीचा" बार लागतोच. , २) मला सारखी शेवपुरी पाणीपुरी खाविशी वाटते. नवरा म्हणाला तीन प्लेट तरी एका वेळेस खाते. ( हे रात्रीच्या जेवणाच्या पूर्वी) ३) मला रोज "मागचा पुढचा" भात लागतोच. यात प्रमाण किती ते विचारायचे नाही. आता गरोदरपणात वाढलेले वजन पुढे बाळाला "दूध पाजते" म्हणून कमी होण्याचे नाव घेत नाही. मग वर्ष दोन वर्ष अशी गेली कि पुढे ते कमी करण्यासाठी कोणतीही प्रेरणा राहत नाही. मुद्दाम एखाद्या नर्सरी/ प्ले ग्रुप शाळेशी जाऊन पहा. अडीच तीन वर्षाची गोंडस मुले आणि त्यांच्या गुटगुटीत आया हे सहज दिसणारे दृश्य झालेले आहे. मागे लिहिल्याप्रमाणे एका ताईंनी मुलाच्या मागे पळण्यात किती व्यायाम होतो त्यामुळे इतर व्यायामाची गरजच नाही असे ठासून सांगितले होते. गैरसमज, थोडीशी दुराग्रही वृत्ती, मी "जशी आहे तशी" लोकांनी स्वीकारली पाहिजे हा आग्रह आणि बहुतांशी आळस आणि कष्ट करण्याच्या तयारीचा आणि प्रेरणेचा अभाव यामुळे हि समस्या जातील पण गंभीर होत चालली आहे हि मात्र वस्तुस्थिती आहे.

वाचने 17589 वाचनखूण प्रतिक्रिया 29

पिलीयन रायडर Mon, 02/13/2017 - 21:33
तुम्ही म्हणताय ते सगळं खरंय. माझं गरोदरपणात पहिले ३-४ महिने फार वजन वाढलं नाही तर मी हट्टाने डॉक्टरांकडुन काही तरी औषध द्या म्हणुन दुधात टाकायची पावडर घेऊन आले. शेवटच्या ३ महिन्यात झपाट्याने वजन वाढलं तर मला भयानक आनंद झाला होता. =)) पण ते वजन कमी करण्यात ३ वर्ष गेले. बाळांतपणानंतर शरीरात काही महत्वाचे धातु वगैरे कमी होतात का डॉक? कारण मला २-३ वर्ष कायम थकवा, विसराळुपणा वगैरे व्हायचं. आणि त्यातुन व्यायाम करायला कधी उत्साह वाटलाच नाही. पण आता वाटतंय की तेव्हाच परत व्यायाम करायला हवा होता. १.सीझर झालेलं असेल तर कधी पासुन व्यायाम करु शकतो? २.केवळ खाण्याचे प्रमाणच नाही तर जेवणात जास्त दुध तुप - डिंकाचे लाडु वगैरे प्रकार वाढल्यानेही वजन वाढते. पण हे खाणेही आवश्यकच आहे. मग गरोदरपणातही व्यायाम करत रहावा का? (अर्थात डॉक्टरच्या सल्ल्याने.. ) ३. बाळ रात्री झोपत नाही आणि दिवसाची कामे चुकत नाहीत. अशावेळेस व्यायामाला खरंच उत्साह येत नाही. अशावेळेस तुम्ही काय सल्ला द्याल. ४. संपुर्ण ९ महिन्यात अणि काही महिने नंतरही आयर्न - कॅल्शियमच्या गोळ्या चालु असतात. त्यांचा शरीराला खरंच किती उपयोग होतो? ५. बाळंतपणानंतर स्त्रीच्या शरीरातले कोणते घटक कमी होतात किंवा त्यांची झीज होते. जे एकंदरोत आरोग्यासाठी तातडीने भरुन काढलेच पाहिजेत?

In reply to by पिलीयन रायडर

सुबोध खरे Tue, 02/14/2017 - 19:56
पि रा ताई १.सीझर झालेलं असेल तर कधी पासुन व्यायाम करु शकतो? एक महिन्यानंतर / आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने २.केवळ खाण्याचे प्रमाणच नाही तर जेवणात जास्त दुध तुप - डिंकाचे लाडु वगैरे प्रकार वाढल्यानेही वजन वाढते. पण हे खाणेही आवश्यकच आहे. मग गरोदरपणातही व्यायाम करत रहावा का? (अर्थात डॉक्टरच्या सल्ल्याने.. ) दूध, तूप, डिंकाचे लाडू खाणे मुळीच आवश्यक नाही. गरोदरपणात व्यायाम करण्यास मुळीच हरकत नाही. शेतमजूर आदिवासी स्त्रिया शेवटच्या घटकेपर्यंत शारीरिक मेहनत करीत असतात पण त्यांना होणारी बाळे काही दीड पावणे दोन किलोची होत नाहीत. ती पण अडीच ते तीन किलो वजनाचीच असतात. ३. बाळ रात्री झोपत नाही आणि दिवसाची कामे चुकत नाहीत. अशावेळेस व्यायामाला खरंच उत्साह येत नाही. अशावेळेस तुम्ही काय सल्ला द्याल. मनोनिग्रह असणे आवश्यक आहे ४. संपुर्ण ९ महिन्यात अणि काही महिने नंतरही आयर्न - कॅल्शियमच्या गोळ्या चालु असतात. त्यांचा शरीराला खरंच किती उपयोग होतो? बाळाने शरीरातून घेतलेले अन्न घटक पुनर्भरण होते. ५. बाळंतपणानंतर स्त्रीच्या शरीरातले कोणते घटक कमी होतात किंवा त्यांची झीज होते. जे एकंदरोत आरोग्यासाठी तातडीने भरुन काढलेच पाहिजेत? नाही. आपले वजन तीन किलोने कमी झाल्याने आपल्या शरीराचा किती ऱ्हास होईल? जुजबी. सविस्तर नंतर

कंजूस Tue, 02/14/2017 - 08:50
dr ने आताच्या लाइफस्टाइलवर लिहिलय ते खरं आहे. मागे जाणं अशक्य आहे. खा गोळी ( प्रत्येक ओढवलेल्या आजारावर गोळी असलीच पाहिजे आणि त्या गोळ्या न देता इतर सल्ले देणारे डॅाक पेशंट्सना आवडत नाहीत.) आणि हो बरी असा फंडा आहे. कच्छी समाजात फार चांगल्या रीती दिसल्या. अर्थात ती लाइफस्टाइल इतर करिअरवाल्या रजा टाकणाय्रा मुली करू शकणार नाहीत.

सूड Tue, 02/14/2017 - 15:08
"जशी आहे तशी" लोकांनी स्वीकारली पाहिजे
हे अगदी सोबत शिकणार्‍या मुलीच्या बाबतीत पाहिलं आहे. स्वीकारलं पाहिजे, स्वीकारलं पाहिजे म्हणत शेवटी लॅप्रोसक्शन का काय ते करुन आली. जर्मनीला जायच्या आधी, लोकांना सांगायला कारण होतं डॉक्टर म्हणाले आता ऑपरेशन करुन वजन कमी करुन घ्या नाहीतर सांध्यांना त्रास होईल.

In reply to by सूड

सुबोध खरे Sat, 02/18/2017 - 20:35
लॅप्रोसक्शन का काय ते करुन आली. लायपो सक्शन (LIPOSUCTION). म्हणजे चरबी नळी घालून बाहेर काढणे. हा वजन कमी करण्याचा उपाय नाही तर एखाद्या ठिकाणी ( कमरेवर, नितंबावर) चरबी गोळा झाली असेल तर तेवढ्यापुरती कमी करण्याचा उपाय आहे. याने फार तर १-२ किलो वजन कमी होते. दुर्दैवाने बहुसंख्य (LIPOSUCTION) करणारी दुकाने हि वस्तुस्थिती सांगत नाहीत. यावर पुढे एक लेख लिहिणार आहे.

पिलीयन रायडर Tue, 02/14/2017 - 19:59
आजच रुजुता आणि करिनाने फेसबुकवर लाईव्ह सेशन केले आहे गरोदरपणावर. अर्थात त्यातुन काही ठोस माहिती मिळेल अशी आशा नाहीये. मोघमच बोलतात हे लोक. पण तरीही बघायला हरकत नाही. रुजुताची काही पुस्तके आवडली आहेत, काही समजलीच नाहीत. पण तरीही उत्तम आहेत. तुम्हाला खूप पैसे मिळाले तर काय कराल अशा प्रश्नाला माझे उत्तर रुजुता दिवेकरकडे अपॉईंटमेंट मिळवणे असे आहे. पण गमंत म्हणजे, रुजुता योग आणि आहार ह्यात इतकी एक्सपर्ट असुनही तिच्यापेक्षा करीनाच्या चेहर्‍यावर नेहमीच जास्त तेज असते. खास करुन आजकाल रुजुता तेवढी फ्रेश दिसत नाही.

फेदरवेट साहेब गुरुवार, 02/16/2017 - 12:51
नातेवाईकांकडे गेल्यावर सुग्रास अन्न मिळणें हे सहजी होऊ लागते. हे काही कळले नाही. लग्नाआधी माहेरचे नातलग खायला घालत नाहीत ? का ते सुग्रास नसते?

In reply to by फेदरवेट साहेब

सुबोध खरे गुरुवार, 02/16/2017 - 18:43
साहेब, लग्न ठरले किंवा झाले कि मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार म्हणून माहेरी कोडकौतुक होते आणि तिच्या आवडीचे पदार्थ केले जातात आणि आग्रहाने खायला घातले जातात. तसेच नवीन सुनेला नातेवाईक अगत्याने घरी बोलावतात तेंव्हा ति पहिल्यांदा आपल्या घरी आली म्हणून "रोजचेच जेवण" दिले जात नाही तर काहीतरी "खास" बनवले जाते आणि आग्रहाने खिलवले जाते.

स्थितप्रज्ञ गुरुवार, 02/16/2017 - 19:07
मुद्दाम एखाद्या नर्सरी/ प्ले ग्रुप शाळेशी जाऊन पहा. अडीच तीन वर्षाची गोंडस मुले आणि त्यांच्या गुटगुटीत आया हे सहज दिसणारे दृश्य झालेले आहे.
अगदी पटले. याबरोबरच या गोंडस मुलांचे बापही तितकेच गुटगुटीत बघायला मिळतात.

In reply to by स्थितप्रज्ञ

सुबोध खरे गुरुवार, 02/16/2017 - 19:52
याबरोबरच या गोंडस मुलांचे बापही तितकेच गुटगुटीत बघायला मिळतात. यात काय संशय? पंचविशी तिशीलाच ढेरी सुटलेले कितीतरी पुरुष दिसतात. यांच्या पट्ट्याचे बक्कल सुरुवातीला "पुरोगामी" आणि नंतर "अधोगामी" होते. आणि आता असे लोक उरा-उरी भेटण्याच्या ऐवजी उदरा-- उदरी भेटतात.

लीना कनाटा Fri, 02/17/2017 - 05:52
असे लोक उरा-उरी भेटण्याच्या ऐवजी उदरा-उदरी भेटतात :) (: डॉक्टर काका, तुमच्या सगळ्या लेखांच्या ( १ ते ७) लिंक्स इथे द्या म्हणजे जिम्नॅसूना आधीचे लेख शोधावे लागणार नाहीत.

डॉक्टर साहेब , ही लेखमाला थोडी ऑफ ट्रॅक झाली आहे अस का वाटत आहे 1) बरेच दिवसांनी भाग येता आहेत 2) काय कराव ह्याच्यावर भर कमी आणि आपण कुठे चुकतो ह्यावर भर जास्त पडतो आहे 3) व्यायाम - आहार आणि लाइफ स्टाइल हे तिन्ही कुठे कुठे सुधारता येईल हे पण डायरेक्ट सांगाल तर बर होईल आम्ही ह्या विषयात बर्‍या पैकी अडाणी आहोत अस समजून काही चुकल असेल तर अपराध पदरात घ्या (किवा एप्रन मध्ये) :)

सुबोध खरे Mon, 02/20/2017 - 13:43
प्रत्येक व्यक्तीने आहार तज्ञांकडून व्यवस्थित आहाराची आखणी करून मगच उपचार सुरु करावेत. केवळ माझे धागे वाचून किंवा जालावरील ज्ञानाने करू नयेत असेच मी सुचवेन. आणि ते उपचार करीत असताना काय करावे याबद्दल आतापर्यंत लेखमालेत मी बरेच मुद्दे सुचवले आहेत ते असे आहेत. काटा वजनाचा -३ एकंदर आपण जे अन्न खातो त्याचा ७० % हिस्सा हा शरीराचा चयापचय ( METABOLISM) या साठी वापरला जातो.२० % भाग हा आपल्या एकंदर हालचालीसाठी वापरला जातो आणी १० % हा शरीर गरम ठेवणे आणी अन्न पचवणे यासाठी जातो. याचा अर्थ असा आहे कि आपल्याला लागणाऱ्या ७० % ऊर्जेमध्ये आपण फेरफार करू शकत नाही. राहिलेल्या ३० % पैकी १० ते १५ % मध्ये फेरफार करू शकतो. म्हणजेच हया वापरल्या जाणार्या उर्जेतच बदल करून वजन वाढवू किंवा कमी करू शकतो. स्थूल माणसे आपण जास्त खातो हे मुळात मान्य करीत नाहीत स्थूल माणसे प्रत्येक घासात "जास्त" अन्न पदार्थ खाताना आढळतात. शिवाय घास पटापट गिळताना आढळतात. त्यामुळे त्यांचे पोटाकडून जास्त भरण्याचे संकेत येईपर्यंत त्यांनी जास्त खाल्लेले असते. शिवाय घास पटकन गिळल्या मुळे त्या पदार्थाची नीट चव जाणवतच नाही. मग तोंडाला स्वाद येण्यासाठी अजून घास घेतला जातो आणि हि प्रक्रिया चालू राहते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गरमागरम बटाटे वडा खाताना दिसणारी माणसे. तोंडात असलेला वाफाळलेला वड्याचा घास जिभेला स्पर्श होतो न होतो तोच गिळून होतो. याच्या विरुद्ध गरीब लोक वड्याला तोंडी लावून पोळी किंवा भाकरी खाताना मुद्दाम पहा. त्यांचा वडा गार असतो आणी ते पोळीचा घास नीट चावून चवी चवीने खाताना दिसतात. आणी वर चव येण्यासाठी मिरचीचा तुकडा तोंडी लावतात. लहान घास घ्या आणि तो नीट चावून खा म्हणजे त्या पदार्थाचा आपल्याला नीट स्वाद मिळेल आणि फुकटचे पोटात "भरणे" कमी होईल. आपल्या जुन्या शास्त्रात एक घास बत्तीस वेळा चावून खा असे म्हटले आहे याचा अर्थहि हाच आहे. दुर्दैवाने आवडीचे अन्न दिसले कि आपले पोट भरले आहे या संदेशाकडे माणूस दुर्लक्ष करत राहतो आणी मग काही काळाने हे संवेदक नीट काम करेनासे होतात किंवा मेंदू त्यांच्याकडे "दुर्लक्ष" करायला शिकतो वजन कमी करण्याचा कोणताही उपाय करण्याच्या अगोदर आपण काय आणी कसे खातो आहे याची नीट उजळणी करा. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ काटा वजनाचा --४ आपले वजन जास्त असेल आणी आपलयाला थंड बसलेल असताना सुद्धा सतत घाम येत असेल तर त्याचा साधारण अर्थ असा आहे कि आपण आपल्या गरजेपेक्षा जास्त अन्न खात आहात. एक महिन्यात ७-८ किलो वजन कमी करणे हा हेतू न ठेवता दर महिन्याला एक ते दीड किलो वजन कमी होईल या उद्देशाने आपण जायला हवे.म्हणजे वर्षभरात आपण १२-१५ किलो वजन कमी करू शकू. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- काटा वजनाचा --५ आहार तज्ञांकडून व्यवस्थित आहाराची आखणी करून मगच तसे करावे. यामुळेच केक बिस्किटे शीतपेये वेफर्स यासारखे प्रक्रिया करून त्यातील चोथा काढून टाकल्याने पदार्थ फार पटकन शोषले जातात आणि त्यामुळे लठ्ठ्पणाला आमंत्रण मिळते. हे "प्रक्रिया करून चोथा काढून टाकलेले" असे अन्न पदार्थ आहेत ज्याने वजन पटकन वाढते असे "एक भरपेट" जेवण तुम्ही करत असलेल्या दहा दिवसांच्या(DIET) मिताहाराच्या इतके असते. म्हणूनच बरेच लोक महिनोन महिने "डाएट" करत असतात तरीही त्यांचे वजन काही कमी होत नाही. कारण मी दहा दिवस डाएट केला आता एक दिवस तरी मला "पोटभर खाऊ दे" असे ते स्वतःला( आणि इतरांना) सांगत असतात केवळ पोट भरण्यासाठी मैद्याचे नान किंवा भात खाल्ला तर लगेचच तो आपल्या चरबीला भेटायला जाईल. पण कोला सारखी पेये अति चरबीयुक्त अन्न आणि शेवटी आईस्क्रीम( ११% चरबी आणि २४% साखर) सारखे पदार्थ खाऊन लोक सरळ झोपायला जातात.यामुळे लोक वयाच्या २५ पासूनआम्लपित्ताला आणि लठ्ठपणाला बळी पडताना दिसतात. आपण दीड इंचाच्या जीभेसाठी( चव आणि स्वाद) पदार्थ खातो तर ते लहान घास घेऊन बत्तीस वेळा चावून त्याचा आस्वाद घ्या. मूळ मुद्दा -- दारूमुळे वजन वाढत नाही तर "बेताल" वागण्याने वजन वाढते. मुळात तुमचे वजन दोन महिन्यात पंधरा किलोने वाढत नाही तर ते दोन महिन्यात कमी करण्याचा अट्टाहास कशासाठी. मी पैसे देतो आहे तर त्याचा मोबदला मला ताबडतोब मिळाला पाहिजे अशा आजच्या जमान्यातील इन्स्टण्ट मनोवृत्तीचे हे फळ आहे. जीवनात खाणे हा एकच आनंद नाही. उत्तम संगीत, उत्तम मित्र, उत्तम पुस्तके, उत्तम साथीदार असे अनेक आनंद असताना माणसे मात्र फक्त "खाण्यात" आनंद शोधात असल्याने ते "अंगावर" चढणारच. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- काटा वजनाचा --६ आपण दुसऱ्या व्यक्ती बरोबर असता तेंव्हा आपण २८ % जास्त जेवता आणि तेच एका ५-६ जणांच्या गटात असलात तर हेच ७५ % पर्यंत अधिक खाल्ले जाते.आपण इतरांच्या उपस्थितीत आपण किती खातो आहे यावर आपले बारकाईने लक्ष राहत नाही. माणसे एकदा सुग्रास खाण्याच्या मोहात पडली कि तात्पुरत्या आनंदासाठी( temporary gratification) परत परत खात राहतात आणि मग "प्राण जाई पार वजन न जाई" अशी स्थिती येते. साधा एक समोसा जास्त खाल्ला तर तितक्या कॅलरी जाळण्यासाठी चार ते पाच तास "वेगाने" चालावे लागते आणि जो माणूस रोज १८०० च्या ऐवजी १४०० कॅलरीचा आहार घेतो आहे त्याच्या दृष्टीने एक समोसा खाणे म्हणजे एका दिवसाचा मिताहार फुकट गेल्यासारखा आहे. किंवा एक साधे ६० ग्रॅमचे चॉकलेट खाल्ले तर ३१५ कॅलरी आपल्या पोटात जातात त्या जाळण्यासाठी २ तास वेगाने चालावे लागेल. http://www.idiva.com/news-health/what-does-300-calories-look-like/1883 याच साठी आपण "जाता जाता काय तोंडात टाकतो" आहोत याचे सदा सर्वकाळ "भान" असणे आवश्यक आहे

एमी Fri, 02/24/2017 - 12:15
चांगली मालिका आहे. पण खरे डॉक, वाढलेल्या वजनाबद्दल बर्याचदा वाचायला मिळतं. तुम्ही कमीतकमी एक भागतरी कमी वजनाबद्दल लिहाल का? त्याचे काही दुष्परीणाम असतात का वगैरे...

Dr prajakta joshi गुरुवार, 04/20/2017 - 21:13
ज्या स्त्रीयांचे खाण्या पिण्याचाही ठिकाणा नसतो व खुप कष्अटाची कामे करतात अशा झोपडपट्टीतील स्त्रीया देखील बाळासहीत बाळशेदार का दिसतात??

In reply to by Dr prajakta joshi

सुबोध खरे Fri, 04/21/2017 - 00:14
झोपडीतील माता स्वतः सुदृढ नसतात. बहुतेक वेळेस त्या कमी वयाच्या असल्याने (१८-२०) त्यांची त्वचा तुकतुकीत असते एवढेच. बहुसंख्य या ऍनिमिया कुपोषण याने पीडित असतात. बाळाच्या बाबतीत मात्र निसर्ग काळजी घेत असतो. आई कुपोषित असेल तरीही पोटात असताना ते आई कडून आवश्यक द्रव्ये मिळवत असते. आईला गफारच कुपोषण झाले तर गोष्ट वेगळी. शिवाय आईच्या प्रकृतीचा तिला येणाऱ्या दुधाच्या दर्जाशी संबंध नसतो. गरीब किंवा श्रीमंत आईचे दूध तितकेच पौष्टिक असते. यामुळे नवजात बालक (पूर्ण दिवसांचे असेल तर) गुटगुटीत असते आणि जोवर ते आईचे दूध पिते आहे तोवर सुदृढ असते. बाळाच्या मेंदूची ९५% वाढ हि वयाच्या १ वर्षेपर्यंत पूर्ण होते. म्हणूच आईच्या कडेवर असलेली मुले गुटगुटीत असतात आणि एकदा चालायला लागली कि डोके मोठे आणि हातापायाच्या काड्या अशी परिस्थिती दिसते. मेंदूची वाढ १ वर्षेपर्यंत( मूल आईचे दूध पीत असे पर्यंत) जवळ जवळ पूर्ण होत असल्याने गरीब किंवा श्रीमंत असो. बुद्धिमत्तेमध्ये फरक पडत नाही. बाकी खुरटलेली वाढ असलेली मुले नंतर पौष्टिक आहार मिळाला तर झपाट्याने वाढताना दिसतात याचे कारण शरीर २१ वर्षेपर्यंत( पुरुषात आणि १८वर्षे स्त्रीमध्ये) वाढू शकते.

In reply to by सुबोध खरे

राघवेंद्र Fri, 04/21/2017 - 00:44
उत्कृष्ट प्रतिसाद !!! बऱ्याच शंका दूर झाल्या. डॉक्टर तुमच्या प्रतिसादातून उप-शंका आपोआप दूर होतात. धन्यवाद

दिपुडी Sat, 04/22/2017 - 23:06
डॉ.अतिशय सुंदर लेख आहे.माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्याल का?माझी ऊंची 5.4आहे आणि वजन 58 किलो आहे.मी सद्या 20 आठवडे ची गर्भवती आहे hb 12.1 आहे.जर गर्भारपणात वजन 10 12 kg ने वाढले म्हणजे ते जवळपास 65 पर्यन्त जाईल .हे खुपच जास्त वजन होउ शकेल का?माझे आधीचे वजन 54 kg स्थिर होते जवळपास गेली 8वर्षे

दिपुडी Sat, 04/22/2017 - 23:15
तसेच विनाकारण वजन वाढू नये म्हणून मई अरबट चरबट काहीही खात नाही.सकाळी 1 डिश पोहे उपमा आणि 1 ग्लास दूध नंतर 12ला 1 ग्लास ताक त्यानंतर 1 पोळी भाजी .4वाजता बीट वा गाजर वा एखादे फळ आणि दिवसभरात 3 बदाम 3 खजूर अणि 9 ते 10 मनुके रात्रि परत जेवणच् यात काही बदल सुचवावा असे तुम्हाला वाटतेय का.असल्यास कृपया सांगा धन्यवाद

सुबोध खरे Mon, 04/24/2017 - 12:25
वर सुचवल्याप्रमाणे गरोदरपणात साधारण १२ किलोने वजन वाढते( वाढणे अपेक्षित आहे) यातील सात आठ किलो वजन प्रसूती झाल्यावर ६ आठवड्यात आपोआप कमी होईल. ३ किलो मुलाचे, ३ किलो वर आणि गर्भजल आणि १-२ किलो गर्भाशयाला असलेला अतिरिक्त रक्तपुरवठा कमी झाल्याने तेंव्हा सर्वसाधारण पणे तुम्हाला सद्य स्थितीत वजन कमी कसे होईल याची चिंता करणे आवश्यक नाही. फक्त केवळ भूक लागते म्हणून किंवा थोडासाच भात उरला आहे म्हणून संपवण्यासाठी खाऊ नका. आपण काय खातो आहे आणि का खातो आहे त्याकडे लक्ष द्या. ताजे, रुचकर आणि सकस "स्वतःला आवडेल" असे अन्न "प्रमाणात" खा. गरोदर होण्यापूर्वी जे पदार्थ खात होतात तेच चालू ठेवा. बीट गाजर सारखे पदार्थ "बाळाच्या सुदृढ प्रकृती"साठी खाणे आवश्यक नाही. तुम्हाला आवडत असतील तर खा. उगीच पौष्टिक आहे म्हणून बकरीचे दूध आणि ओवा, बाळंतशोप किंवा कारले अशासारखे अचाट आणि अफाट पदार्थ आहारात अंतर्भूत करण्याची गरज नाही. बाळाच्या पोषणाची काळजी निसर्गाकडे सोपवा. एक लक्षात ठेवा- अंबानी टाटा बिर्ला यांच्या घरात पाच किलोची मुले जन्माला येत नाहीत आणि रस्त्यावर जन्माला येणारी मुले दीड किलोची नसतात. भारतात साधारण सर्वच मुले तीन किलोच्या आसपासचा असतात.

दिपुडी Sun, 09/03/2017 - 07:39
माफ करा डॉ.हा प्रश्न इथे विचारात आहे पण माझी due डेट 4 सप्टेम्बर आहे.मात्र अजूनही माझी डिलीवरी झाली नाही वा त्या सदृश्य् काहीही त्रास जाणवत नाही.मात्र घरातील लोक मला अति काळजीपोटि अप्रत्यक्षरित्या त्रास देत आहेत.जसे की बाळा चे वजन जास्तच वाढले तर खुप त्रास होईल सिझेरिअन करावे लागेल वगैरे वगैरे यात खरच तथ्य आहे का?बाळ due डेट पूर्वी जन्माला येते तसे नंतर येण्यात काय धोके आहेत का?मला खुपच भीति वाटत आहे माझ्या गायनक ने मला तसे काहीच सांगितले नाहिये.5 सप्टे ला बोलावले आहे

सुबोध खरे Tue, 09/05/2017 - 11:47
आपली प्रसूतीची तारीख ४ सप्टेंबर होती. मग काळजीचे काहीच कारण नाही. गरोदर पण हे ९ महिने १० दिवस किंवा २८० दिवस असते. यात ३६ आठवडे झाल्यावर बाळाची वाढ आईच्या पोटात किंवा प्रसूती झाल्यास बाहेर एकाच वेगाने होते. त्यामुळे ३६आठवड्यनंतर केंव्हाही प्रसूती झाली तरी बाळाला काहीच अपाय नसतो. या कालावधी मध्ये बाळाची वाढ दिवसाला साधारण २५ग्रॅम ने होते त्यामुले एखादा आठवडा जास्त झाला तर बाळाची वाढ फारतर १७५-२०० ग्राम ने वाढेल. त्यामुळे ती चिंता नसावी. ५ तारखेला आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांनी बोलावले आहे तेंव्हा निःशंक पणे जाऊन या. एखांदा आठवडा पुढे मागे झाल्याने काहीही फरक पडणार नाही. इतर शंकांसाठी व्यनि करा किंवा ९८१९१७००४९ वर फोन करा.