तापतो उन्हाळा, निसर्ग देई गारवा

ऋतु हिरवा जनातलं, मनातलं
हंगामी भाज्या आणि फळे यांनी बाजार नुसता फुलला आहे. द्राक्षांचे घडच्या घड टोपल्या भरून दिसत आहेत. हिरवी आणि काळी ... आता द्राक्षे स्वस्त ही झाली आहेत. कलिंगडं, टरबूज, खरबूज यांचे ठिकठिकाणी स्टॉल लागले आहेत. हातगाड्यांवर केरळी लोक हे एवढे मोठाले फणस घेऊन बसले आहेत. कैऱ्या , करवंदे बघून तोंडाला पाणी सुटत आहे. ताडगोळे खरेदी करायला लोकांची गर्दी उसळत आहे. चिक्कूच्या टोपल्या भरल्या आहेत. काजूची पिवळी केशरी बोन्डे किंवा काजूची फळे कलात्मक रित्या टोपल्यात बायांनी लावून ठेवली आहेत. त्यांचे रंग लोकांना आकर्षित करून घेत आहेत. जवळच काजूबियांच्या टोपल्याही भरल्या आहेत. केळीचे अख्खे लोंगर विकायला आणून ठेवले आहेत. बायका गावठी भाज्या घेऊन ह्या भर उन्हात डोक्यावर नुसता एक टॉवेल टाकून बसल्या आहेत. ताजी वांगी, वडीच्या अळूची पाने, चवळीच्या शेंगा, कारली, माठाची पालेभाजी, घोळ .. एक पालेभाजी , वाळकी ( काकड्यांचा एक प्रकार ) , पेरू असे जे काही शेतात पिकले असेल ते सर्व घेऊन आल्या आहेत. नारळपाणी वाल्यांची दुकाने वाढली आहेत. म्हणजे शहाळी विकणाऱ्यांची .. त्याला लोक हल्ली नारळ पाणीच म्हणतात. उसाच्या गुर्हाळामध्ये गर्दी आहेच ..पण लाकडी यंत्रावर रस काढून देणारेही हातगाडी घेऊन फिरत आहेत. काही बायका मासे विकायला ही बसल्या आहेत. आणि हो .... जुड्या बांधलेल्या खेकड्यांची टोपली पाहूनही कुणाच्या तोंडाला पाणी सुटू शकते. वेगवेगळ्या प्रकारचे पिकलेले आंबेही बाजारात दिसू लागलेत. पण तिकडे फारसे लक्ष जात नाहीये. पण जेव्हा फळांचा राजा हापूस मोठ्या प्रमाणात बाजारात येईल , तेव्हा या सगळ्या फळांकडे कोणाचे लक्ष ही जाणार नाही. पण अरेरे ... फोटो काढून घेण्याचे राहूनच गेले !
वर्गीकरण
लेखनप्रकार

9 टिप्पण्या 2,387 दृश्ये

Comments