Skip to main content

लेखन आणि लेखकास वाचवावे की वाचवू नये ?

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 24/02/2017 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर मराठी भाषी संस्थळे येण्यास २० वर्षे झाली याच प्रगतीची एक बाजू बरेच जण वेगवेगळ्या मराठी संस्थळांवर पडीक असतात, आणि त्यात वावगे असे काही नाही प्रत्येक संस्थळाच्या एक मंच म्हणून उजव्या बाजू असतात तसे मर्यादाही असतात. जसे एका बाजूस मोठावर्ग पडीक प्रस्थापीत संस्थळाधीपती झालेला आहे, तसे दुसर्‍याबाजूस आम मराठी नागरीकास वेगवेगळी मराठी संस्थळे आणि विकिपीडिया प्रकार काय आहेत याची काहीच कल्पना नसते, जिथे आधी पोहोचलो तेथे आधी लिहावे एवढेच त्यांना त्या क्षणी समजत असते, लेखन आणि लेखक टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात; त्यांच्या लिहिण्याच्या जागा आणि संस्थळांचे लेखन संकेत पाळले न गेल्यास नवागत लेखकांचे लेखन आणि लेखकास हाकलून लावण्यास क्षणही लागत नाही. नव्या पिढीचा मराठी माणूस मराठीपासून दूर जात असताना हि आलेल्या नव्या होतकरु लिखाणास हाकलून लावण्याची ऐष खरेच परवडणारी आहे का ? मराठी विकिपीडिया वरुन परिघात न बसणार्‍या दोन कविता आज इकडे टाकल्या आणि नंतर इमेलने लेखकांपर्यंत संदेश पाठवला, त्यामुळे मिसळ्पाव माहीत नसलेला एक कवि एक लेखक एक नवा मराठी वाचक इकडे जोडला जाईल हा साधासा विचार, पण या कविता धाग्या खाली जे काही छिद्रान्वेषण चाललेले आहे , त्यामुळे नविन कवि लेखक आणि वाचकांचा आणि लेखन वाचवण्याचे कर्म करणार्‍या माझ्यासारख्या नाचीजचा उत्साह कसा वाढू शकेल ? मराठी विकिपीडियावर "धोरणी, मुत्सद्दी कोण ? मराठे की इंग्रज?" या बद्दल दोन तीनच परिच्छेद कुणीतरी लेखकाने मुद्देसुदपणे मांडले आहेत पण दुर्दैवाने मराठी विकिपीडियाच्या परिघात बसणार नाही हे निश्चित आहे, ते मराठी विकिपीडियावरुन वगळल्या नंतर त्या लेखकाने त्या लेखनाची स्वतःची प्रत जतन केली आहे नाही केली आहे केली असेल तरी त्याला मिसळपाव सारख्या संस्थळाची लगेच माहिती होईल कि नाही काहीच माहित नसते. तर अशा लेखन आणि लेखकास वाचवावे की वाचवू नये ?

वाचने 4730
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

दुसऱ्याचे लेखन येथे टाकण्याऐवजी त्या लेखकास येथे आधी बोलावून त्याला येथे लिहिण्यास प्रवृत्त करणे अधिक योग्य ठरेल. ज्या न्यायाने नवलेखकांचे लेखन इथे आणून टाकले जाते त्याच न्यायाने मराठी विकिपीडियाच्या कार्यशाळेत मराठी संस्थळांची माहिती देणे चुकीचे ठरू नये. अशाने होतकरू लेखकांना विविध पर्यायही उपलब्ध होतील. शेवटी मुक्त लेखन हाच तर हेतू आहे ना.

In reply to by प्रचेतस

मराठी विकिपीडियाच्या कार्यशाळेत मराठी संस्थळांची माहिती देणे चुकीचे ठरू नये.
माझे व्यक्तिगत मतही आपल्या प्रमाणेच असले तरीही कार्यशाळेत प्रत्यक्षात जे घडत असते आणि वेळेच्या उपलब्धतेच्या मर्यादेत ते शक्य होत नाही. पण भविष्यात प्रयत्न आपण म्हणता तसाच असावा अशी माझी इच्छा असताना नेमके अशा नव लेखकांचे मिसळपावसारख्या संस्थळावर स्वागत होऊ शकेल का या बाबत या क्षणीतरी साशंकता वाटते आहे. दुसरे प्रश्न केवळ कार्यशाळेचा नाही ज्ञानकोशीय परिघाच्या मर्यादा कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना अथवा विकिपीडियावर सरळ आलेल्यांना कल्पना नसते. काही वेळा लेखक सरळ विकिपीडियावर लिहितो त्याने त्याची व्यक्तिगत प्रत बनवली आहे नाही आहे हे माहित नसते. एनी वे स्वागत होणार नसेल तर ज्याच्या साहित्याचे भोग त्याच्या पाठी म्हणून सोडून देऊयात. असो.

In reply to by माहितगार

नवीन लेखकांचे इथे स्वागत होणार नाही असा नकारात्मक विचार का करताय तुम्ही हे समजत नाहीये. लेखकाच्या लेखनात दम असेल तर तो येथे नक्कीच स्वीकारला जातो, जरी दम नसला तर हळूहळू तो मिपाच्या स्वभावप्रकृतीशी हळूहळू परिचित होत जाऊन त्यात मिसळून जाऊ शकतो. थोडा वेळ लागेल पण ते होईल हे निश्चित.

In reply to by प्रचेतस

दुसऱ्याचे लेखन येथे टाकण्याऐवजी त्या लेखकास येथे आधी बोलावून
विकिपीडीयावरुन चे वगळणे साहित्यिक दर्जाच्या कारणावरुन होत नाही इतर निकषांवरुन होते, या स्थितीत मराठी आंतरजालाशी जोडण्याच्या प्रयत्नातला एक सांधा जुळल्या जाण्याच्या आधीच तुटून पडू नये म्हणून साहित्य आणले म्हणजे त्यांना कळवण्याची व्यवस्था केली नाही असे नव्हे. लेखन आधी आले आणि लेखक नंतर येऊन जोडला गेला तर आभाळ कोसळणार आहे का ? जेव्हा एखादे साहित्य दुव्यावर आणले आणि तसे केल्याचे लेखक कविला कळवले आणि त्या दुव्यावर चालू असणारी चर्चा दर्जा कसा सुधारवा या एवजी आम्ही कसे हा मंच कसा श्रेष्ठ आहे आणि आलेले साहित्य कसे दुय्यम आहे तेही साहित्यिक अंगाने समिक्षेशिवाय होत असेल तर नवागताचे स्वागत होण्याचे वातावरण आहे असे म्हणण्यासारखी परिस्थिती खचितच नाही असे म्हणावे लागेल. मागे सुधीर देवरे सरांना असेच जोडून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्यांच्या ग्रामीण भागातून खूप कमी वेळासाठी आंतरजाल उपलब्ध असतो त्यात ते लेखन इथे उपलब्ध करु लागले तर अनावश्यक वादात त्यांना गुरफटवण्याचा प्रयत्न मिपाकरांनी केला. कार्यशाळेत मराठी संस्थळांचा उल्लेख करावा असे आपण म्हणता माझीही इच्छा होती पण तुर्तास तरी कोंब फुटण्याच्या आधीच इच्छा मरताना दिसते आहे. चर्चा केलीत आभारी आहे.

In reply to by प्रचेतस

सहमत, survival of the fittest हे तत्त्व इथे लागू होते, टीकेमुळे माहितगार यांचा इगो दुखवल्यासारखा जाणवतोय... @माहितगार साहेब, कविता चांगली असती तर नक्कीच स्वागत झाले असते, आज वीस वर्षे आधीची परिस्थिती नाही, व्यक्त होण्यास अनेक माध्यमं आहेत. हे मुलांनाही माहित आहे, विकीच्या कार्यशाळेत त्याने ती तिकडे अपलोड केली, तिथल्या नियमात बसत नाही म्हणून तुम्ही तिथून निघून इथे टाकली, इथल्या नियमात बसत नाही हे इग्नोर मारले. ते नियमाचे ईथले मालक बघतील म्हणा... आता विरोधी सूर काढणाऱ्याना आपण प्रस्थापित वगैरे म्हणताय हे काही बरोबर नाही, हे अजिबात पटलेले नाही. तुमच्याच ह्या मांडणीत अनेक चुका आहेत...

In reply to by संदीप डांगे

इथे कवितेच्या दर्जा बाबत काय नियम आहेत आणि इथे टाकल्या जाणार्‍या सर्व कविता किमान दर्जास प्राप्त आहेत हे जरासे सिद्ध करुन दाखवाल का साहेब ? माझ्यावर टिका झाल्याने दुखावत नाही त्यात तर्कपूर्णता नाही आणि एक मराठी माणूस जोडण्याचा प्रयत्नाची किंमत नाही हे खुपते. यात इगोचा संबंध कुठे आला ते आपण अधिक जाणत असल्यास आपल्याकडे विचारणेसाठी येत जाईन :) चर्चात्मक मराठी संकेतस्थळातला कमीत कमी नियम लावणारा मंच स्वातंत्र्य असलेला मंच म्हणूनच मी मिपाकडे पहात आलो आहे आणि इगो म्हणून नव्हे लेखन स्वातंत्र्याचा र्‍हास होणार असेल तर मंच सोडले जातात, केवळ इतरत्रच्या स्वातंत्र्याच्या अभावामुळे बरेचजण मिपावर आले असावेत. कुठेही प्रस्थापित झाले की नवागतांवर गाळणी मारुन बाहेर फेकायचे तर फेकावे आधीच्या प्रतिसादातही म्हटले आहे त्या काव्यावर चिकित्सक मुद्देसूद टिका करावी पण त्यात निष्फळता अधिक दिसते आहे.

In reply to by माहितगार

जाऊद्या. डांगेंचं बोलणं मनावर घेऊ नका. तुम्ही मिपा प्रशासनाला विनंती करुन "माहितगार यांच्या मराठी विकिपिडीयासंबंधी कार्यशाळेतील विकीपिडीयाच्या नियमात न बसणारं साहित्य" असा एक टॅब मेनूत लावून घ्या. हाय काय आणि नाय काय. :)

In reply to by माहितगार

अज्ञात लेखकाचं लेखन इथे टाकल्यामुळे त्याला काय प्रोत्साहन मिळेल ? त्याला कळेल तरी का ते इथे प्रकाशित झालंय म्हणून ? आता त्याला कळलंच नाही तर मराठी पुढे न्यायला काय हातभार लागला ? या उप्पर साहित्य उत्तम असेल तर रसिक साहित्यिकाचा शोध घेतातंच . आणि इथेही त्याला चांगले प्रतिसाद मिळतीलच. अर्थात, ती दीर्घ कविता तुमचीच असेल तर सांगा म्हणजे बघता येईल .

In reply to by संजय क्षीरसागर

' संजय क्षीरसागर' हे नाव मला माहित नसेल तर 'संजय क्षीरसागर' अज्ञात व्यक्ति होतात का ? शीर्षकात कविचे नाव लिहिले आहे आणि आपण अज्ञात म्हणू इच्छिता ते कसे ? 'परिचीत' या शब्दासाठी आपण अनवधानाने 'अज्ञात' हा शब्द वापरला असेल तर आपण स्पष्ट करालच.
अज्ञात लेखकाचं लेखन इथे टाकल्यामुळे त्याला काय प्रोत्साहन मिळेल ? त्याला कळेल तरी का ते इथे प्रकाशित झालंय म्हणून ?
कळवण्याची व्यवस्था केलेली आहे हे प्रतिसादांमधून लिहिलेले आहे, -अर्थात अविचारी मठाधिपतींशी वाद नको म्हणून ते आता फिरकतील किंवा कसे या बद्दल शंका असू शकेल- विचारपुर्ण कृती येथल्या मठाधिपती मिपाकरांनाच करता येतात आणि इतरांना करता येत नाहीत असे काही आहे किंवा कसे ?

In reply to by माहितगार

आपण अज्ञात म्हणू इच्छिता ते कसे ? सगळ्यांशी अपरिचित असलो तरी माझ्या लेखनावर मी प्रतिसाद देऊ शकतो तसा तुमचा लेखक / कवी देऊ शकत नाही. समोरची व्यक्ती अज्ञात असल्यामुळे अशा लेखनाशी रिलेट होता येत नाही. अविचारी मठाधिपतींशी वाद नको म्हणून ते आता फिरकतील किंवा कसे या बद्दल शंका असू शकेल- हे कोण ? विचारपुर्ण कृती येथल्या मठाधिपती मिपाकरांनाच करता येतात आणि इतरांना करता येत नाहीत असे काही आहे किंवा कसे ? म्हणजे नक्की काय ? ज्या सदस्यांकडून तुम्हाला प्रतिसाद अपेक्षित आहेत ते जर विचार करु शकत नाहीत असं वाटत असेल तर मग लेखन इथे प्रकाशित करुन उपयोग काय?

In reply to by संदीप डांगे

survival of the fittest हे तत्त्व इथे लागू होते,
साहित्याच्या बाबतीत एखादे साहित्य लोकप्रीय होईल किंवा नाही समीक्षकांच्या स्तुतीस पात्र होईल का नाही याला survival of the fittest चा नियम लागेल तो केव्हा लागेल जेव्हा साहित्यास प्रकाशित होण्याची संधी मिळेल तेव्हा. इथल्या सर्व लेखक कविंना प्रकाशन पूर्व संपादकीय कात्री लावून मगच प्रकाशिअत करा असे सांगा , सेंसॉर होत असलेल्या जगात जे साहित्य प्रसवते त्यात फिट होण्याची क्षमता नाही असे म्हणणार का ? कारण सेंसॉरमुळे साहित्य येऊच दिले जात नाही. इथे सध्या वाद घातला जातो आहे तो अमुक एका तिसर्‍या संस्थळावरच्या सेंसॉर कात्री मुळे इथे सुद्धा त्याला सेंसॉर केले गेले पाहीजे अशा स्वरुपाचा आहे. सर्वायवल ऑफ फिटेस्टचा प्रश्न प्रकाशनानंतर असतो का प्रकाशनपूर्व असतो ?

In reply to by माहितगार

जरी अशा कविता सरसकट कुठूनही(फेसबुक, व्हॉटसऍप) मिपावर टाकणे योग्य वाटत नसले तरी वरील उदाहरणात तुमचे म्हणणे पटते आहे. मला तरी ती कविता तुम्ही म्हणता तशा पद्धतीने (लेखकाला कळवून कॉपीरेटची काळजी घेतली गेल्यास) इथे टाकण्यात काहीच गैर वाटत नाही. ती कविता कशी आहे यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. मला वैयक्तिकरित्या ती कविता फारसी आवडली नाही आणि एखादी कविता फारसी आवडली नाही तर मी मिपावर जे करतो तेच याबाबतीतही केले, प्रतिक्रिया दिली नाही. अवांतर : बाकी बऱ्याचवेळा कविता कशी आहे यापेक्षा कविता लिहिली कुणी यानुसार प्रतिक्रिया दिल्या/टाळल्या जातात हे बऱ्याच वर्षातील माझे वैयक्तिक निरीक्षण आहे. अर्थात हे निरीक्षण वैयक्तिक असल्याकारणाने चुकीचे असू शकते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

आपल्या प्रतिसादा बद्दल आभार, सदर कविता नाही आवडली आणि इग्नोर केली रास्त साहित्यिक टिका केली हे समजण्यासारखे आहेच, आमंत्रित केलेल्या व्यक्तिचा (मग व्यक्तिच्या लेखनाचा साहित्यिक दर्जा काहीही असो अनुभव आपुलकीचा राहीला असता बरे वाटले असते) नकारात्मक होऊ नये म्हणून त्या कविता मी मिपा मालकांना तुर्तास वगळण्यास सांगणार आहे.

In reply to by माहितगार

नक्कीच तुमच्या विचारांना सहमती. ज्याला वाचायचे प्रतिक्रिया द्यायचीय त्याने दयावी. (मग व्यक्तिच्या लेखनाचा साहित्यिक दर्जा काहीही असो अनुभव आपुलकीचा राहीला असता बरे वाटले असते)>>> -- यासाठी +10000

*************** मिपावर लिखाण प्रसिद्ध करणे मिपा "मुक्त संस्थळ" आहे त्यामुळे येथे लिखाण प्रसिद्ध करण्यापूर्वी संपादन होत नाही. मात्र, मिपाच्या धोरणात न बसणार्‍या लेखनावर कारवाई (संपादन किंवा अप्रकाशन) करण्याचा हक्क मिपा राखून आहे. हा हक्क फार अपवादात्मकरित्या वापरला जातो, अशी बर्‍याच मिपाकरांची तक्रार आहे ! :) मिपावरचे लिखाण स्वतः लेखकाने प्रसिद्ध केले नसल्यास, सर्वसाधारण प्रताधिकारांतर्गत, लेखकाची त्या कृतीला परवानगी असण्याची आवश्यकता आहे व तसे लेखनात स्पष्ट लिहिणे आवश्यक आहे. असे असले तरी, शक्यतो स्वतः लेखकालाच त्याचे लेखन येथे प्रसिद्ध करण्यास प्रवृत्त करणे जास्त योग्य होईल. कारण त्यामुळे, लेखकाला त्याच्या लेखनावरील प्रतिक्रियांवरचे आपले मत/बाजू व्यक्त करता येणे शक्य होईल. *************** मुक्त माध्यमांत प्रसिद्ध केलेल्या लिखाणावरील प्रतिक्रिया कोणत्याही सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केलेल्या लिखाणावर बर्‍या-वाईट प्रतिक्रिया येणारच. किंबहुना अश्या मोकळ्या प्रतिक्रियांसाठीच तर लेखन सार्वजनिकरित्या प्रसिद्ध केले जाते, नाही का ? अश्या बर्‍या-वाईट प्रतिक्रिया तर खाजगीत वाचन केलेल्या लेखनावरही होतातच... त्यात केवळ सकारात्मक किंवा गोग्गोड प्रतिक्रिया होत असतील तर तो "अंध फॅन क्लब" किंवा "उल्लु बनावो क्लब" धर्तीचा समुह आहे असे म्हणायला हवे ! मुक्त सामाजिक माध्यमांत, विशेषत: जेथे वाचकांना लेखनावर टिप्पणी करण्याची सोय आहे तेथे अश्या प्रतिक्रिया सगळ्यांना पहायला उपलब्ध होतात. मुक्त म्हणजे नक्की किती मुक्त यासंबंधात रोचक अनुभवासाठी, मुक्तपीठ या नावाप्रमाणे मुक्त असलेल्या प्रसिद्धीमाध्यमाचे वाचन करावे. त्यामानाने मिपाचे बहुतांश सभासद, बहुतांश वेळेस स्वतःहून काही एक मर्यादा बाळगून असतात असे सर्व टीकाकारांना मानावेच लागेल. याउलट, सभ्यतेची/टीकेची मर्यादा ओलांडणार्‍या मिपाकराला इतर मिपाकर विरोध करून मर्यादेत आणतात, हे एक मिपाकर म्हणून मी अभिमानाने सांगू शकतो. माझ्या मते, हा मुद्रण नियंत्रणाचा (censoring) सर्वोत्तम प्रकार आणि मिपाकराच्या प्रगल्भतेचे लक्षण आहे. छापील पुस्तकांवरच्या वाचकांच्या सर्वच प्रतिक्रिया त्या माध्यमाच्या प्रकारविशेषामुळे सगळ्यांना दिसत नाहीत, त्याचा अर्थ त्या चांगल्याच असतात असे अजिबात नाही. सार्वजनिक संस्थळावरच नव्हे तर, इतर सर्व प्रकारच्या लेखन प्रसिद्धीच्या व्यासपिठांवर बरी-वाईट टीका हा सर्वसामान्य अनुभव आहे. लेखक नवीन आहे केवळ याच कारणासाठी, प्रोत्साहनाच्या नावाखाली, गोग्गोड स्तुतीने भरलेल्या प्रतिक्रिया लेखकाच्या प्रतिभेत काही फार मोठी भर घालतात असे नाही. किंबहुना त्या लेखकाला स्वमग्न बनवून अजून काही उच्च करण्यापासून परावृत्त करू शकतात. त्याविरुद्ध, ज्यांच्या लिखाणात कस आहे व टीकेला सहन करून प्रयत्न चालू ठेवण्याची चिकाटी ज्यांच्या अंगी आहे, तेच पुढे यशस्वी होतात. "हॅरी पॉटर कादंबरीमालिका लिहून जगप्रसिद्ध व बिलियनेर झालेल्या जे के राऊलिंगचे पहिले लिखाण रांगेने तब्बल १२ प्रकाशकांनी टाकाऊ ठरवून नाकारले होते" हे एक प्रसिद्ध उदाहरण. साहित्य क्षेत्रात अशी उदाहरणे डझनांनी आहेत. कोणताही लेखक बाहेरच्या स्तुतीने कमी आणि स्वतःच्या अंतप्रेरणेच्या बळावर जास्त यशस्वी होतो... हे उत्तम लेखक होण्याची आस बाळगणार्‍याने विसरून चालणार नाही. याचा अर्थ असा नाही की सार्वजनिक व्यासपिठांवर होणारी सर्वच टीका बरोबर असते. मुक्त संस्थळे समाजाचाच उपसंच असतात, त्यामुळे त्यांच्यात समाजाचे प्रतिबिंब उमटणे अटळ आहे. आपण सार्वजनिक ठिकाणी आपले लिखाण प्रसिद्ध केले म्हणजेच आपण समाजातील सर्व प्रकारच्या लोकांना, सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यासाठी परवानगी देत आहोत, त्याबाबत कुरकूर करणे योग्य नाही, या वास्तवाचे भान लेखकाने (आणि त्यांच्या पाठीराख्यांनी) ठेवणे जरूर आहे. सकारात्मक-नकारात्मक टीकेचा आपल्यात सुधारणा करण्यासाठी उपयोग करावा आणि केवळ खवचट असलेल्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करायला शिकावे. चिडका बिब्बा किंवा हळवे होऊन काही साधणार नाही. आपले पूर्वसूरी, "निंदकाचे घर असावे शेजारी" असे म्हणून गेले ते उगीच काय ? ज्यांना यशस्वी लेखक व्हायचे आहे त्यांनी हे सार्वकालीक वचन विसरून चालणार नाही. *************** लेख/प्रतिसादांत आलेल्या काही वाक्यांबद्दल थोडेसे वर सांगितलेले मुद्दे पाहता, लेख/प्रतिसादांत आलेल्या काही वाक्यांबद्दल परत विचार करणे जरूर आहे असे वाटते, कारण अश्या वाक्यांचा त्यांच्या मतांना/प्रयत्नांना पाठिंबा मिळण्यास उपयोग होईल असे वाटत नाही... जसे एका बाजूस मोठावर्ग पडीक प्रस्थापीत संस्थळाधीपती झालेला आहे "समाजाच्या उपगट करण्याच्या प्रवृत्तीपेक्षा" जास्त काही पुरावे आहेत का यासंबंधी ? नसल्यास, ही प्रवृत्ती अटळ वस्तूस्थिती (constrain) आहे असे समजून काम करावे. कुरबूर करून काही सकारात्मक फरक पडणार नाही. लेखन आणि लेखक टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात हे वाक्य शिष्ट (condescending) वाटते आहे. मुळात, एखाद्या लेखकाला वर आणण्यासाठी खास प्रयत्न करणे हे गटबाजी (पक्षी : कंपूबाजीचे) लक्षण नाही काय ? चांगल्या लेखनाचे योग्य तेवढे कौतूक करणे, त्यावर सकारात्मक टीका करणे ठीक आहे. मात्र, लेखनाच्या प्रतीशिवाय इतर कारणांनी लेखनाला टेकू लावणे अनितीकारक व विरुद्धपरिणामी (counterproductive) होईल. लेखनाचे भले इच्छिणार्‍यांनी, लेखनासाठी व्यासपीठाची संधी खुले करून देणे, हे नक्कीच सकारात्मक व स्पृहणिय पाऊल आहे. अश्या प्रयत्नांचे श्रेय ते प्रयत्न करणार्‍यांना जरूर मिळायला हवे. त्याचबरोबर, मुळात दम नसलेल्या लेखनाला कितीही टेकू लावला तरी काही काळाने का होईना पण ते कोसळणारच. म्हणजेच, चांगले लेखक/लेखन त्यांच्या लेखनाच्या कसावर आणि प्रयत्नांच्या चिकाटीवर यशस्वी व्हावेत/होतात/होतील हे पण तितकेच खरे आहे, ते त्यांचे श्रेय लेखकांकडेच असू द्यावे. ***************

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

या बाबत आमची हि कविता आमच्या विचारांचे प्रतिनिधीत्व करते. प्रतिसादासाठी आभार.

दोन्ही कविता ह्या चोरीच्या दिसत आहेत "मला ती आवडायची,तिला न मी आवडायचो http://www.misalpav.com/node/३८९७३ https://www.facebook.com/143pa/posts/373001079425411:१ कुणीतरी असावे, कवि:समाधान कदम http://www.misalpav.com/node/३८९७४ http://aisiakshare.com/node/३६८४ http://www.maayboli.com/node/52498

In reply to by वाल्मिकी

"मला ती आवडायची,तिला न मी आवडायचो http://www.misalpav.com/node/३८९७३ https://www.facebook.com/143pa/posts/373001079425411:१
फेसबुकची पोस्ट २६ मे २०१२ ची आहे. दोन्ही कविता तंतोतंत जुळत आहेतक. या दोन्ही कविता एकाच व्यक्तीने लिहील्या आहेत का? माहितगार याबद्दल काही खुलासा कराल का?

In reply to by सतिश गावडे

आधीच सांगितल्यानुसार ढिगाने कविता असल्याचा पुरावाच आहे त्या पेजवर...

In reply to by संदीप डांगे

जर दोन्ही व्यक्ती एकच नसतील तर अशीही शक्यता आहे की मूळ कवी राजू पवार आहेत आणि ज्याने फेसबुकवर टाकली त्याने राजू पवार ह्यांची कविता ढापलेली असावी.

In reply to by अभिजीत अवलिया

होय. म्हणूनच माहीतगार यांनी खुलासा करावा असे वातते.

तुम्ही कोणाला किंवा कशाला वाचवताय? आणि ते वाचवणं आहे का नक्की? तुम्ही वाचवलं नाही तर नष्ट होईल असं आहे का? आणि वाचवलं तर जगेल, तगेल असं काही आहे का? बादवे, मिपावरच्या सदस्य लेखकांच्या धागा-कवितांना असं वाचवलं जाण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही कधी तो. असं करा, एक धागा काढा आणि हा असा माल आणून दर वेळी नवा धागा काढण्यापेक्षा त्याच धाग्यात प्रतिसादाच्या रूपाने टाका. भारंभार धागे काढण्याने मराठी विकिपीडियाची काय सेवा होणार आहे कोण जाणे!

In reply to by वाल्मिकी

हा दावा/आरोप करण्याआधी माहितगार यांच्या प्रतिसादाची/स्पष्टीकरणाची वाट पाहणे जास्त योग्य ठरणार नाही का?

१) दोन्ही पैकी एक माल चोरीचा आहे २) माहितगार यांनी सांगितले कि २०१७ मध्ये कार्यशाळेत कविता लिहिली आहे ,हि आधी २०१२ मध्ये प्रकट झाली आहे ,दया इस्का मतलब ?

तसदी बद्दल क्षमा असावी, विकिपीडियातून त्या दोन कविता स्थानांतरीत करण्याची घाई करण्या पुर्वी मीही कदाचित आंतरजालाचा धांडोळा घेऊन विद्यार्थ्यांकडून कन्फर्म करुन घ्यावयास हवे होते. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांशी इमेलने आधीच कळवले आहे, मराठी भाषा दिनाचे कार्यक्रम संपल्या नंतर दुरध्वनी वरुन संपर्क करुन नक्की काय झाले ते तपासता येईल. तुर्तास लेखन / धागे वगळले आहे महाविद्यालयाकडून कन्फर्मेशन आल्यास कविता पुनःप्रकाशितही करता येईल. अर्थात विकिपीडियाच्या निकषात न बसणारे लेखन स्थानांतरीत करण्याची वेळोवेळी गरज भासते हेही तेवढेच खरे. या बाबत परस्पर चर्चेने काही धोरण येत्या काळात आखता आल्यास बरे पडेल असे वाटते. प्रतिसादांसाठी आभार

छापील माध्यमांत प्रतिक्रिया तिथेच येत नाहीत पण अशा संस्थळांवर येतात. लेखनास काही विरोधी मते आहेत आणि ती कोणती हे कळल्याने लेखकाला वाइट वाटते ते समजू शकतो परंतू हे माध्यमच असे आहे. पूर्वी राजाकडे राजकवी,गायक,वादक असायचे. नवीन कोणी कलाकार दरबारात उत्तम कला सादर करून गेल्यावर प्रस्थापित मान्यवर हादरतात. त्यांचाही विरोध होतोच. तसे काही सर्व क्षेत्रांत होते. बाकी विकिमाध्यमाची रचना अशी आहे की त्यास कोणी करमणूकीचे मनोरंजनाचा स्रोत म्हणून पाहात असतील असे वाटत नाही. लेखन फार लोकांपर्यंत न पोहोचल्याने मराठी साहित्याचे नुकसान किती होते यावर संशोधन होणे गरजेचे आहे

In reply to by कंजूस

पूर्वी राजाकडे राजकवी,गायक,वादक असायचे. नवीन कोणी कलाकार दरबारात उत्तम कला सादर करून गेल्यावर प्रस्थापित मान्यवर हादरतात. त्यांचाही विरोध होतोच. >> हे उदाहरण इथे संयुक्तिक आहे असे वाटत नाही. मूलभूत फरक आहे. इथे कोणीही कोणाच्या आश्रयावर नाही जेणेकरुन नवीन कलाकाराची भिती वाटावी...