Skip to main content

औरंगाबाद - पुणे २४० किमी - सायकलप्रवास.

लेखक डॉ श्रीहास यांनी सोमवार, 13/02/2017 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
सायकलींग मी का करतो ? सायकलींग नी मला काय मिळालं ? हे प्रश्न मला कधीच पडले नाहीत. सायकल चालवणे हा माझा दिवसभरातील खूपच आनंदाचा भाग आहे. औरंगाबाद कट्ट्याच्या शेवटी शेवटी अचानकच "मी सायकलने पुण्याला येतो" असे बोलून गेलो आणि प्रशांत, मोदक, आनंदराव मंडळींनी ते उत्साहाने उचलून धरले. बस्स.. काहीही विचार न करता औरंगाबाद पुणे सायकलने पार करायचे ठरले. या आधी एक दीड वर्ष सायकलिंगच्या वेडेपणाची लागण झाली होती. नियमीत सायकलींग नंतर १००-१५० किमी मारणं अवघड वाटेनासं झालं होतं पण २३०-२४० किमी सायकलींग जरा जास्तच होणार होतं. १०० किमी करायचं ठरवलं आणि ४ तास काही मिनीटात झालं होतं (औरंगाबाद-जालना आणि परत) ४० किमी तर आठवड्या ३-४ वेळेस व्हायचंच. हळूहळू ताकद गोळा होत होती पण त्याहीपेक्षा महत्वाचा होता अनुभव की लांबच्या राईड्स मुळे येत होता. पण आता ठरवलं कि आता पुण्याला जायचंच.. तसे २०० + किमी करायचे तर नगरला जाऊन परत येणं हा एक पर्याय होता पण त्यात मजा नसती आली , मग पुण्याचा बेतच फायनल केला. आता तयारी सुरू केली मनाची ,कारण त्यावरच हे सगळं होणार होतं .... आता जास्त फाफट पसारा न मांडता माझ्या सायकलवारी वर्णनावर येतो :)) १० डिसेंबरला जवळ जवळ सगळी तयारी झाली होती, स्वत:चीच गाडी सपोर्ट व्हेईकल म्हणून होती, स्पेयर ट्युब्स होत्या पण रोड बाईकचं पंक्चर कधी काढलं नव्हतं की ट्युब बदलली नव्हती; मग अभिजीत दादाच्याकडे जाऊन ट्युब बदलण्याता शाॅर्ट कोर्स केला आणि ट्युब बदलतांनाच ट्युब पंक्चर करून ठेवली. आता मात्र धाबं दणाणलं, नवी ट्यूब आणणे पंक्चर काढणे ही सगळी जबाबदारी दिपकवर ( हाच गाडी घेऊन आला सोबत पुण्यापर्यंत ) टाकून OPD साठी निघालो. तो पर्यंत अभिजीत दादानी मिहीरशी बोलून त्याची सायकल (स्पेअर १ म्हणून) मागवून ठेवली , अंतरिक्षकडून कारला सायकल अडकवायचा स्टॅंड पण दादानीच घेऊन ठेवला होता माझ्यासाठी _/\_ (हे सर्व औरंगाबादकर सायकल मित्र..! ) नेहमी ५ पर्यंत संपणारी OPD त्याच दिवशी ६:३० पर्यंत लांबली. मग घरी येऊन सगळी तयारी सुरू केली. ८-१० पाण्याच्या बाटलइलेक्टृऑक्ट्रॉल बेक्कार लागतं म्हणून TANG घेतलं, केळी,चिक्की (हा सर्वात उत्तम एर्नजी बार!!) असं माझं इंधन घेतलं, दोन मोबाईल फोन, एक पावर बॅंक, चार्जर, एक्स्ट्रा चष्मा, एक्स्ट्रा हँड ग्लोव्हज् आणि जास्तीची सायकलींग शाॅर्ट घेतली. .हे सगळं ह्यासाठी कारण कुठल्याही गोष्टीसाठी मला थांबायचं किंवा परत यायचं नव्हतं !! रात्री झोपण्याआधी सगळं सामान गाडीत भरलं. रात्री झोप लागणं मुश्किल होतं आणि अस्वस्थ का होईना झोपलो. सकाळी ४:३०-४:४५ ला निघायंच होतं त्यामुळे ३:३० लाच उठून उरलेली तयारी केली, ४:१५ ला बायकोनी २ आम्लेट्स करून दिली (आणि ह्या सगळ्या खटाटोपीसाठी तीनं फुल्ल सपोर्ट केलाच होता) निघेपर्यंत ४:५० झाले, निघालो एकदाचा. सायकल वारी सुरू झाली..!! . हिवाळा असल्यानी चांगलाच अंधार होता, पण गाडीच्या लाईट्स मध्ये व्यवस्थीत दिसत होत आणि मोजून ५ व्या मिनीटाला शहराबाहेर पडलो. साधारण विसेक किमी नंतर पेट्रोलसाठी गाडी थांबली तेव्हाच टाॅयलेटला जाऊन आलो. परत सायकलींग सुरू. हळूहळू थंडी जाणवू लागली, पण ह्याचा फायदा घेऊन सुसाट सायकल हाणायला सुरू केली. मध्येच गाडी जवळ बोलावून स्पीड बघीतला तर २८-२९ चा होता (माझ्या मानानी फारच चांगला होता). गंगापूरला १:३० तासानी पोहोचलो आणि प्राडाॅ.बिरूटे सर भेटणार म्हणाले म्हणून थांबलो पण सर काही दिसले नाहीत म्हणून १० मिनीटांनी निघालो. . ५० किमी ला देवगड आलं तिथे चहाचा ब्रेक घेतला तोपर्यंत व्यवस्थीत उजाडलं होतं. दिपकला सांगीतलं तू पुढे जा १०-१५ किमी मग मी आलो की परत तसचं पुढे जायचं. आता चांगलं राईडींग सुरू होणार होतं. मग दर २५-३० किमी नंतर पाण्याच्या बाटल्या भरून घेणे आणि पुढे निघणे असा कार्यक्रम सुरू झाला. नगर आधी २० किमी वर लिलीयम पार्क ला CCD मधे काॅफीसाठी थांबलो व मोदक दादांना फोन केला आणि नगरजवळ आलोय सांगितलं. . तिथुन निघाल्या निघाल्या अतिशय जीवघेणा म्हणजे ८-१० च्या स्पीड नी चढावा लागणारा चढ आहे , मग एका ओव्हरलोडेड ट्रकशी स्पर्धा करत तो चढ पार केला आणि त्यानंतर जो उतार लागला.... व्वा.. जन्नत !! सलग ३-३.५ किमी फक्त उतार वा वा वा !!! नगर ला नितीन पाठक साहेब भेटणार होते पण एका लग्नासाठी ते पुण्याला गेले होते. त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा ते पुण्याहून निघाले असं कळलं. नगरचा स्टाॅप रद्द करून पुढे निघालो. नगर शहरात रहदारी मुळे वेग बराच मंदावला होता पण हे अपेक्षितच होतं. . शहरा बाहेर पडतांना एक दुधवाला (अॅक्टीव्हावर बरं का) जवळ येऊन बराच वेळ निरखून सायकल बघत होता मग मीच विचारलं पुणे किती अंतर आहे इथून? मग तो आश्चर्यचकीत होऊन म्हणाला "सव्वाशे किमी" पुढे तो सगळा वेळ मराठीमिश्रीत हिंदीत बोलत होता (सायकल चालवणाऱ्याशी मोटारसायकल किंवा स्कुटर वाले हिंदीमध्ये का बोलतात देवच जाणे) औरंगाबादहून आलोय पुढे पुण्याला जातोय सांगितल्यावर आदरयुक्त भाव अवतरले होते त्याच्या चेहेऱ्यावर !! १० वाजले तेव्हा नगर च्या बाहेर पडलो होतो(सकाळपासुन १२५ किमी) ऊन तापायला सुरू झालं होतं, मग बसेस चा नेहमीचा स्टाॅप म्हणजे 'स्माईल स्टोन' एका मोठ्या आणि त्रासदायक चढानंतर आलं तेव्हा थकवा जाणवायला सुरू झाला होता, पण दर ५ किमीला पाण्याचा मोठा घोट घेऊन राईडींग चालू होतं. एक गोष्ट प्रकर्षानी कळली ती म्हणजे आज पर्यंत जेवढे चढ पुण्याला जातांना लागायचे त्याच्या तिप्पट चढ प्रत्यक्षात आहेत !! वाऽऽऽऽट लागली होती पण ठरवलं होतच की वेग कितीही कमी झाला तरी उतरून सायकल नाही चालवायची बास्स् ह्यावरच सगळे चढ पार केले.. ह्या दरम्यान नितीन पाठकांचे २-३ फोन येऊन गेले पण सायकलवर असल्याने ऐकूच आले नाहीत आणि बोलणं नाही झालं, एका ब्रेक दरम्यान (बहूदा शिरूर गाव किंवा त्या आधी) बोलणं झालं आणि पाठक साहेब रस्त्यातच भेटले, ह्यापुर्वी न बघीतल्यामुळे मी त्यांना ओळखलं नाही पण त्यांनी मात्र मला ह्यामुळे ओळखलं कारण ह्यावेळेस फक्त मीच सायकलवर असणार होतो नगर-पुणे हायवेवर असं त्यांनीच सांगीतलं ;)) त्यांच्याशी १० मिनीटे बोलून पुढे निघालो.. वाघुर्डे गावाबाहेर पाणी भरण्यासाठी थांबलो असतांना एक हाॅटेलवाला जवळ येऊन विचारू लागला "रेस आहे का ? बाकी लोक कुठे आहेत ? रेस नाही तर कशाला सायकल चालवता आहात ? सायकलची किंमत काय ?" इथंपर्यंत ठिक होतं आणि मी पण यथाशक्ती उत्तरं देत होतो , जसा तो म्हणाला एक चक्कर मारतो माझं डोकंच फिरायला लागलं मग मीच म्हणालो की बास् झालं राहू द्या निघायचं आहे मला आणि मी सटकलो , हा किस्सा रात्री जेव्हा सायकल गृपला सांगीतला तेव्ह शेफ केडी (केदार दिक्षित) म्हणाले डाॅक तुम्ही फाऽऽर सौजन्यानी घेतलं नाही तर मी सायकलच्या जवळ जरी कोणी आलं तरी "पाच फूट दूऽऽऽऽऽर "असं ओरडतो म्हणे म्हणजे समोरचा ६-७ फूट दूरच थांबतो !! मला पटलं आता पुढच्या वेळी करुन बघयचं आहे तसं :)) मोदक दादा, खुद्द सरपंच , सागर पाध्ये आणि नकुल पाठक ही मंडळी रांजण गावच्या २५ किमी अलिकडे पोहोचली होती.... मला घ्यायला चक्क ५५ किमी सायकलवर आले होते हे लोकं _/\_ मोदक दादांनी तर नगरपासून सोबत येण्याची इच्छा दर्शवली होती पण माझी रोडबाईक आणि त्यांची हायब्रीड असा वेग जुळला नसता शिवाय माझ्याकडे सपोर्ट व्हेईकल असल्यामुळे तो प्लॅन कॅन्सल झाला होता ! इथून पुढे मात्र मानसिक बळावरच सायकलींग केलं कारण काही चढ नकोसे झाले होते. रांजणगाव जवळ आलं तेवढ्यात पाण्याच्या बाटलीचं झाकण उडून रस्त्यावर पडलं कळेपर्यंत मी १० फुट पुढे आलो होतो , सायकल वरुन बाजूला उतरलो तेवढ्यात वेगानी एक ट्रक बाजूनी गेला आणि त्याच्या हवेनी पडलेलं झाकण उडुन माझ्याजवळ आलं. फोनाफोनी मध्ये कळलं की सगळी मंडळी रांजणगावला पोहोचली म्हणून. सायकल दामटायला लागलो आणि रस्त्यातला एका विचारलं किती अंतर आहे रांजणगाव तर तो म्हणाला हे इथंच आहे १ किमी वर पण ते प्रत्यक्षात ५ किमी वर होतं हे रांजणगावला पोहोचल्यावर कळलं !!! रांजणगावला मंदिराबाहेर हे चार जणं मस्त पेरू , लस्सी असं खात-पित बसले होते. तासभर गप्पा मारता मारता बराचसा शीण कमी झाला होता. सव्वा दोन ला सगळे जण निघालो. मी आणि सागर पाध्ये एकमेकांना पेसिंग करत मस्त २७ च्या स्पिड नी पुढे निघालो मागून प्रशांत, मोदक आणि नकुल येत होते, साधारण २० किमी नंतर ऊसाचा रस पिण्यासाठी वाघोलीच्या अलीकडे थांबलो तर माझा बालवाडीपासूनचा मित्र अद्वैत फक्त मी सायकल वर येतोय म्हणून भेटायला ३०-३५ किमी वरून आला, ५-१० मिनीट्स गप्पा मारून निघालो पुढे परत ५-७ किमी नंतर खराडीला माई वडेवाले कडे वडा सांबारसाठी ब्रेक घेतला (बेकार सांबार होतं) तिथून निघालो आणि खराडीला २०० किमी क्राॅस झाले होते ( स्ट्रावा नी २८-३० किमी खाल्ले कारण २३०+ ऐवजी २०४ किमी दिसत होते ) तेव्हा थांबायचा निर्णय घेतला , माझी आणि प्रशांतची सायकल कारच्या कॅरियरला अडकवली; बाकी लोक तसेच पुढे निघाले आणि मी सूस रोडला भावाकडे गेलो. . १० तासात २३० किमी अंतर पार केलं होतं मी त्या दिवशी. नकुलची पण पहिलीच १०० किमी ची राईड झाली होती, बाकी लोकांची पण १२५+ ची सायकलींग झाली होती, आदल्या दिवशीच देशपांडेमामांची २००किमी BRM झालेली होती. त्याच दिवशी रात्री बरेचसे मिपाकर जे सायकल गृपचे मेंबर आहेत (अमित मनोहर, केदार दिक्षीत, देशपांडेमामा,अंजनेय, सागर पाध्ये, नकुल पाठक, मोदक आणि त्यांचे एक दोस्त "५० फक्त") असे रंगला पंजाब नावाच्या ठिकाणी भेटलो मस्त २-३तास गप्पा आणि झक्कास जेवण असा लक्षात राहील असा वेळ घालवला. दुसऱ्या दिवशी ८ ला सकाळी निघाले परतीच्या प्रवासाला खुप साऱ्या आठवणी घेऊन. . आता दर वर्षी सायकलवरची पुणेवारी ठरवलेली आहे , डिसेंबर मधे !! औरंगाबाद-पुणे सफरीसाठी आणि एकंदर सायकलिंगसाठी मिपाचा सायकल सायकल गृप फार म्हणजे फारच स्फुर्ती देणारा ठरला !! ह्यातल्या प्रत्येकाला माझ्यावर जेवढा विश्वास होता तेवढा कदाचित मला पण माझ्यावर नव्हता. हा गृप ही माझ्या सायकलींग मुळे झालेली खरी कमाई आहे. सायकलींगनी मला इतके वेग वेगळ्या प्रोफेशनचे, विचारसरणीचे आणि माझ्यापेक्षा वेगळे असुनही माझ्यासारखे सायकलवेडे मित्र दिले. औरंगाबाद, लातूर, पुणे, बंगलोर, आॅस्ट्रेलीया आणि अमेरिकेपर्यंत हा मित्रपरिवार पसरलेला आहे. ज्या कोणालाही मी माझ्या औरंगाबाद-पुणे सायकल राईडबद्दल सांगीतलं त्यांच्यापैकी सायकल चालवणाऱ्या एकाही व्यक्तीनी हे म्हटलं नाही की का जायचं इतकं लांब किंवा उगाच कशाला नसत्या उचापती ; मात्र इतरांपैकी जवळ जवळ सगळ्यांना हे प्रश्न पडले होते ! सायकलींग करणाऱ्या किंवा इच्छूक लोकांनी सायकलींगसोबत नियमीत चालणं (मला पळायला फारसं जमत नाही ) किंवा पळणं गरजेचं आहे कारण ह्यात पायाचे वेग वेगळे स्नायूंचे गट वापरले जातात आणि संपूर्ण क्षमता वाढायला चांगलीच मदत होते. Cross training म्हणतात ह्या प्रकाराला ज्याचा मला बराच फायदा झाला. ह्या शिवाय सायकलींग नंतरचं स्ट्रेचींग फार महत्वाचं असतं. ह्यावर बरेचदा चर्चा झाल्या आहेत पण मला माझ्या पुणेवारीसाठी खुप फायदा झालाय ह्या सगळ्याचा !! तुम्हीही सायकल चालवत रहा, चालत पळत रहा. पुढील आव्हानांसाठी शुभेच्छा. :) (मोदक दादांचे खास आभार कारण मला लिहीतं केलं आणि लिखाणासाठी मदत देखील केली )

वाचने 45188
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

डॉक्टरसाहेब, पुणे वारीचं खरंच कौतुक आहे. सालं इतक्या दूर जाऊ शकतो यावर विश्वासच बसत नै. पण, मनापासून तुमचं कौतुक आहे.
+++++११११११

In reply to by दिपस्वराज

हेच कौतुकाचे बोल...पुढच्या अशक्य वाटणाऱ्या प्रत्येक साहस/सफरीसाठी पुरेशी उर्जा देऊन जातात.... Appreciation साठी _/\_.

डॉक सोबत सायकलिंग करायचे भाग्य लाभणार होते म्हणुन रांजनगाव पर्यंत सायकल ने जायचे आणि डॉकसोबत परत यायचे असे ठरले. मोदक दादा यांनी नगर पर्यंत जाण्याचा प्रस्ताव मांडला पण डॉकची रोड बाईक आणि स्पीड याचा अंदाज असल्याने तो प्रस्ताव नामंजुर झाला. सकाळी ९ वाजता decathlon भेटायचे ठरले सागर (जर्मन टाईम) ९ ला पोहचला मी आणि मोदक ९:४५ पर्यंत पोहचलो. डॉक येण्यापुर्वी आपण रांजनगावला पोहचलो पाहिजे, तुम्हि नाहि आलात तर मी एकटा जाईल -- ईती सागर. त्यामुळे आम्हि लगेच निघालो. व डॉक येण्याच्या आढी आधी पोहचलो ...... पुढचा प्रवास आणि खादाडी याबद्दल डॉक ने लिहिले आहेच. या वर्षी नगर पर्यंत येण्याचा प्रयत्न करुत सोबत आनंदराव आणि ईतर मिपाकर असतीलच, अणि शेफ केडी कट्ट्याची तयारी करतील