मेरी दुनिया मे तुम आई, क्या क्या अपने साथ लिए
लेखनप्रकार
एखादं गाणं मनाचा ठाव घेतं कारण त्याची शायरी, संगीत संयोजन आणि गायकांनी केलेली कमाल सगळं वातावरण भारुन टाकतं. कैफ़ी आझमींचा क़लाम, मदनमोहनची अफलातून चाल आणि रफ़ी समवेत लतानं जमवलेला अत्यंत नज़ाकतदार रंग म्हणजे हे गाणं.
मेरी दुनिया मे तुम आई, क्या क्या अपने साथ लिए,
तन की चांदी, मन का सोना, सपनोंवाली रात लिए ।
मेरी दुनिया मे तुम आई.....
पहिल्या दोनच ओळीत रफीचा मखमली आवाज आणि `सपनोंवाली रात लिए' हा एंड पॉइंट, प्रेयसी आपल्या प्रियकराच्या दुनियेत आणखी कायकाय घेऊन आली असेल याची उत्कंठा निर्माण करतो.
मग सतारीचा सुरेख पीस वातावरणाची खुमारी वाढवतो आणि पुढच्या आणखी दोन ओळी नवी कमाल करुन जातात. `दिलमें दिलकी बात लिए ' ही जीवघेणी शब्दयोजना आणि नंतर येणार्या `अरमां की बारात लिए' या समेवर येणार्या ओळीत, रफीनी `बारात' हा शब्द इतका कहर गायला आहे की आता गाणं क्षणभर इथेच थांबावंस वाटतं !
तनहा तनहा, खोया खोया, दिलमे दिलकी बात लिए,
कबसे यूं ही फिरता था मैं, अरमां की बारात लिए ।
त्यावर मग लतानी दिलेला रिस्पॉन्स आणि त्यात गायलेली `आंखोंमें ये रात लिए' ही ओळ काळजाचा ठाव घेते. पण कैफी़ आझमी पुढे आणखी सितम करतात. `कैसे जाऊं सखियोंमें अब, तेरी ये सौगात लिए' ... सौगात ही जागा लतानी अशी काय बहारदार घेतली आहे, कितीही वेळा ऐकलं तरी पुन्हा एकदा ऐकावी अशी !
ढलका आंचल, फैला काजल, आंखोंमें ये रात लिए,
कैसे जाऊं सखियोंमें अब, तेरी ये सौगात लिए ।
नंतर इंटरल्यूड म्युझिकमधे जे काय स्वरसंयोजन आहे ते गाणं आणखी मिस्टीकल करतं आणि गाण्याची लय वाढते..... इथे रफी आणि लताची जुगलबंदी श्रवणीय आहे.
सीनेकी ये धड़कन सुनले न कोई,
हाए, हाए, हाए, देखे ना कोई,
ना जाओ, ना जाओ,
हटो, हटो, डर लगता है,
सुनो, सुनो,
डर लगता है,
मग रफीच्या या ओळी शायरीची परमावधी गाठतात. `दिलमें कितनी कलीयां महेकी, कैसे कसे फूल खिले', हे इतकं लोभस वर्णन आहे की आपण थक्क होतो. पण त्या पाठोपाठ, `नाज़ूक, नाज़ूक, मीठे मीठे, होठोंकी खैरात लिए' या ओळी येतात आणि कहर करुन जातात. `खैरात' या शब्दावर तर जान कुर्बान आणि रफीनी तो शब्द असा काही गायला आहे की मशाल्ला!
दिलमें कितनी कलीयां महेकी, कैसे कसे फूल खिले,
नाज़ूक, नाज़ूक, मीठे मीठे, होठोंकी खैरात लिए ।
मेरी दुनिया मे तुम आई, क्या क्या अपने साथ लिए ।
_____________
मग पुन्हा सुरेख इंटरल्यूड म्युझिक आहे. त्यानंतर होणार्या लता-रफीच्या जुगलबंदी नंतर, लताकडे सम सोपवतांना, रफी ज्या अंदाजा़त` रात है अपनी,......' म्हणतो तेव्हा प्रियकर आणि प्रेयसीच्या मिलनासाठी रात्रसुद्धा न संपणारी आणि निरंतर झाल्यासारखी वाटते.
चांदसे कैसे आंखे मिलाऊं,
बाहोंमें आओ, तुमको बता दूं,
बस भी करो,
अब ना डरो,
रात है अपनी,......
समेवर येण्यापूर्वीच्या ओळीत `बदली जाए चाल मेरी', ही शब्दयोजना लतानी सुरांना संपूर्ण समर्पित होऊन गायली आहे. इथे कैफी़जींनी `बदली जाए चांदनी' अशी शब्द योजना केली असती तर ती अजून मोहक झाली असती. त्यातून उत्तररात्रीनंतरच्या पहाटेचा महौल जाणवला असता.
त्यानंतर जे काय वाद्यसंयोजन आहे, समेवर येण्यापूर्वीचा जो पिक-अप केलायं त्याबद्दल मदनमोहनजींना सलाम!
समेवर येतांना `हाथोंमें अब हाथ लिए' या ओळी लतानी अशा काही म्हटल्या आहेत की तीला स्वरसाम्राज्ञी का म्हणतात ते कळतं.
पायल छनके, कंगना खनके, बदली जाए चाल मेरी,
मंजिल, मंजिल, चलना होगा, हाथोंमें अब हाथ लिए ।
गाण्याच्या शेवटी रफीनी पुन्हा पहिल्या ओळी तितक्याच लाघवीपणे म्हणून हे गाणं असंच सुरु राहावं, हा मिलनाचा सिलसिला संपूच नाही अशी आस निर्माण करुन गाणं अजरामर केलं आहे.
मेरी दुनिया मे तुम आई, क्या क्या अपने साथ लिए,
तन की चांदी, मन का सोना, सपनोंवाली रात लिए ।
वाचने
2567
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
क्या बात है.
In reply to क्या बात है. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डिबी,
In reply to डिबी, by संजय क्षीरसागर
येस्सर.
डिबी,
बारातलिए । कैसे जाऊं सखियोंमें अब, तेरी येसौगातलिए । मंजिल, मंजिल, चलना होगा, हाथोंमें अबहाथलिए । आणि या ओळीत .... नाज़ूक, नाज़ूक, मीठे मीठे, होठोंकीखैरातलिए । खैरात हा शब्द कैफी़जींना कसा सुचला असेल याचं नवल मला कायम राहील. रफीनी तो शब्द गातांना जो काय कहर केलायं तो वेगळाच !