✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

निवडणुका २०१७, चर्चा आणि अंदाज

अ
अनुप ढेरे यांनी
Fri, 01/13/2017 - 15:41  ·  लेख
लेख
निवडणुकांचा नवा सीझन थोड्याच दिवसांत सुरू होईल. त्याच्या चर्चा आणि अंदाज यासाठी हा धागा. महाराष्ट्रातल्या महापालिकांच्या निवडणुका आहेतच पण त्याहून महत्वाच्या निवडणुका इतर पाच राज्यांच्या विधानसभांसाठी आहेत. पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपुर आणि उत्तराखंड या पाच राज्यांच्या निवडणुका पुढल्या महिन्यात ४ तारखेपासून सुरू होतील. निकाल ११मार्चला लागतील. आम आदमी पार्टीसाठी गोवा आणि पंजाब अत्यंत महत्वाचे असतील. पार्टी दोन्ही राज्यात जोरदार प्रयत्न करत आहे असं दिसतय. ग्लोरिफाईड मुंसिपाल्टीचे मुख्यमंत्री केजरीवालांना आपलंचं महत्त्व वाढवायला ही सोनेरी संधी आहे. काँग्रेससाठी पंजाब महत्वाचं असेल कारण त्याच एकाठिकाणी त्यांना जिंकायचे चांन्सेस आहेत. उ.प्र.मध्ये काँग्रेसची अखिलेश बरोबर युती होईल असा अंदाज आहे. मुख्यतः तिरंगी लढतीत काँग्रेसच्या ५-६% मतांनी स.पा.ला भरपूर फायदा होऊ शकेल. भाजपासाठी उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश अत्यंत महत्वाचे असतील. उत्तराखंडमध्ये भाजपा जिंकायची शक्यत असताना उत्तर प्रदेशात काय होईल हे कोणाच्या बा ला नक्की सांगता येणार नाही. २०१४मध्ये ७४ सीट घेणार्‍या भाजपा+ ला इथे हारणं लाजिरवाणं ठरेल. इथला पराभव हा थेट मोदी आणि डिमनिटायझेशनवर प्रश्न उपस्थित करेल. ( गेल्या दोन वर्षातल्या प्रत्येक निवड्णुकीबद्दल हेच म्हटलं गेलय की त्या मोदींच्या परिक्षा होत्या. पण यावेळी हे खरच आहे असं वाटतय. मोदी स्वतः उ.प्र. मधले खासदार आहेत.) समाजवादी पक्षातल्या यादवीचा भाजपावर काय परिणाम होईल त्याचा वेध घेणारा लेख वाचला. http://www.thehindu.com/news/national/other-states/BJP-watches-Yadav-feud-hopes-for-a-three-cornered-fight-in-U.P./article17030245.ece?homepage=true लेखात म्हटलय की भाजपाला एकत्र स.पाशी लढायला आवडेल. त्रिकोणी लढत भाजपाला हवी आहे. हे पटलं नाही. माझ्यामते स.पा. तले तुकडे भाजपाच्या पथ्यावर पडतील.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
62894 वाचन

💬 प्रतिसाद (139)

प्रतिक्रिया

अवघ्या वर्षभरापुर्वी स्मृती

पुंबा
Tue, 01/24/2017 - 16:16 नवीन
अवघ्या वर्षभरापुर्वी स्मृती इराणी यांचे नाव उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार होण्याच्या शर्यतीत आघाडीवर होते, सध्या मात्र भाजपात कोणाच्याही नावाची चर्चा नाही. भाजपात उत्तर प्रदेश जिंकू शकेल असा एकही नेता नाही हे अत्यंत लज्जास्पद आहे. केवळ मोदींच्या नावावर मते मागितली आणि तरीही हारले तर सरळसरळ नोटाबंदीच्या विरोधातील कौल मानले जाईल आणि एखाद्या लोकल नेत्याला उमेदवारी दिली तर फुटीची शक्यता असा सध्याचा भाजपपुढचा पेच आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments

हो

गॅरी ट्रुमन
Tue, 01/24/2017 - 22:39 नवीन
भाजपात उत्तर प्रदेश जिंकू शकेल असा एकही नेता नाही हे अत्यंत लज्जास्पद आहे.
हो. नव्यांपैकी उत्तर प्रदेशात नेता म्हणून पुढे करता येईल असा एकही चेहरा भाजपकडे नाही. केशवप्रसाद मौर्य त्यांच्या नावावर निवडणुक जिंकून देऊ शकतील अशी स्थिती नाही. माजी प्रदेशाध्यक्षांपैकी लक्ष्मीकांत वाजपेयी, कलराज मिश्रा हे वृध्द झाले आहेत. कल्याणसिंगही वृध्द झाले आहेत आणि सध्या राजस्थानात राजभवनात त्या मानाने आरामाचे पद भूषवत आहेत. प्रत्येक निवडणुकांमध्ये भाजप मोदींवर अवलंबून राहू शकत नाही. लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींच्या नावावर मते मागणे समजू शकतो पण महापालिका निवडणुकांपासून सगळ्या निवडणुकांमध्ये मोदींचे नाव कसे चालेल? जर पक्षातला कोणताच नेता तेवढ्या ताकदीचा नसेल तर निदान दुसर्‍या पक्षातला चांगला नेता तरी आयात करायचा-- जसा आसामात सरबानंद सोनोवालांना आयात केले. पण उत्तर प्रदेशच्या राजकारणात आयात तरी कोणाला करायचे हा पण प्रश्नच आहे :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

++११

पुंबा
Fri, 01/27/2017 - 16:45 नवीन
++११ वरूण गांधी वगैरे फक्त चमकोगिरी वाटते. स्मृती इराणी निदान उ.प्र. मध्ये तरी विस्मृतीत गेल्यात जमा आहेत. राजनाथांना पुन्हा उ.प्र. मध्ये जाणे कितपत रूचेल, कल्पना नाही. एकूण, काँग्रेसपेक्षा भाजपमध्ये नेतृत्वाबद्दलचा गोंधळ अधिक वाटतो. तेव्हा, सद्यस्थितीत, मायावतींचेच पारडे सर्वात जड वाटते. एक तर त्यांच्या पक्षाची हवा वास्तवात असली तरी दिसत नाही, शिवाय, छोट्या पण मागासलेल्या जातींची मोट बांधण्याचे मायांचे कसब जबरदस्त आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

या सर्व चर्चा

arunjoshi123
Mon, 01/30/2017 - 15:02 नवीन
या सर्व चर्चा महाराष्ट्राबद्दल देखिल झालेल्या आणि आज इथे भाजपचे सरकार व्यवस्थित चालत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

महाराष्ट्र भाजपात उप्र इतका

पुंबा
Mon, 01/30/2017 - 15:22 नवीन
महाराष्ट्र भाजपात उप्र इतका सावळा गोंधळ होता म्हणता? फडणवीस, तावडे, खडसे, मुंडे, गडकरी, मुनगंटीवार ह्या सगळ्यांना मर्यादीत की होईना जनाधार होता. इतर नावांवर सहमती झाली नाही तरी गडकरी हा समर्थ पर्याय हायकमांडपुढे होताच. तसे उप्र मध्ये नाही असे दिसते. आणि सगळ्यात महत्वाचे, अडीच वर्षापुर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात जमिन आस्मानाचा फरक आहे. आज उत्तर प्रदेशात मोदी लाट तेव्हाइतकी शक्तीमान आहे असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

उत्तराखंडमध्ये काँग्रेस

गॅरी ट्रुमन
Tue, 01/24/2017 - 16:32 नवीन
उत्तराखंडमध्ये भाजपला यश मिळेल असे दिसते. तरीही काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. १. २०१३ मधील उत्तराखंडमध्ये आलेल्या पुरानंतर मदतकार्याची काँग्रेस सरकारने हेळसांड केली होती हे जगजाहिर आहे. त्यावेळी मुख्यमंत्री होते विजय बहुगुणा. भाजपने याविषयावरून बहुगुणांच्या सरकारवर भरपूर टिकाही केली होती. या विषयावरून लोकांमध्ये असंतोष आहे हे लक्षात आल्यावर मार्च २०१४ मध्ये हायकमांडने विजय बहुगुणांना हटवून हरीश रावत यांना मुख्यमंत्री केले होते. आज हेच विजय बहुगुणा (आणि त्यांची भगिनी रीटा बहुगुणा जोशी) भाजपमध्ये आहेत. त्यामुळे या प्रकरणावरून जो फायदा भाजपला मिळू शकला असता तो मिळेलच असे नाही. कारण या प्रकरणाचे खलनायकच आज भाजपमध्ये आहेत. २. उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार यांच्यातील अंतर फार नसते. २०१२ मध्ये ७० पैकी २५ मतदारसंघांमध्ये हे अंतर ५% पेक्षा कमी होते. त्यापैकी १३ जागा काँग्रेसने, ११ जागा भाजपने तर २ जागा अपक्षांनी जिंकल्या होत्या. इतके कमी अंतर दोन उमेदवारांमध्ये असेल तर अगदी २% चा स्विंगही निकाल बदलू शकतो. अशा प्रसंगी अपक्ष, बंडखोर उमेदवार उभे राहणे, त्यांनी मते खाणे हे प्रकार बरेच जास्त महत्वाचे होतात. तसे बघितले तर काँग्रेस आणि भाजपने इतक्या कमी फरकाने जिंकलेल्या जागांच्या आकड्यात फार फरक नव्हता. अ‍ॅन्टी इन्कबन्सी आणि काँग्रेसचे गेल्या काही वर्षात झालेले पतन लक्षात घेता या जागांवर भाजपपेक्षा काँग्रेस अधिक व्हल्नरेबल आहे हे नक्कीच. पण तरीही अपक्ष, बंडखोर इत्यादींमुळे अधिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. उत्तराखंडमध्ये कुठे किती अपक्ष आणि बंडखोर उभे आहेत हे अजून बघितलेले नाही आणि ते बघायला तितका वेळ होईल असे वाटतही नाही. ३. राज्याच्या मैदानी भागात (हरिद्वार, उधमसिंग नगर, काशीपूर इत्यादी) बसपने हातपाय रोवायचा प्रयत्न केला होता. २००७ आणि २०१२ मध्ये बसपला राज्यात सुमारे १२% मते होती. त्यानंतर बसपचा र्‍हास झाला आहे. बसपची कमी झालेली मते भाजपपेक्षा काँग्रेसला जायचा संभव जास्त. उधमसिंग नगर आणि हरिद्वार जिल्ह्यांमध्ये विधानसभेच्या २० जागा आहेत. तसेच नैनीताल जिल्ह्यात हल्द्वानीसारख्या जागा मैदानी प्रदेशात आहेत. त्याचप्रमाणे देहरादून जिल्ह्यातील देहरादून कॅन्टसारख्या जागा मैदानी प्रदेशात आहेत. या मैदानी जागांमध्ये काँग्रेसनी अन्यथा मिळवली असती त्यापेक्षा २% मते जरी जास्त मिळवली तरी काँग्रेस आणखी काही जागा जिंकू शकेल. ४. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने राज्यातील ५ पैकी सर्व ५ जागा जिंकल्या होत्या. माजी मुख्यमंत्री रमेश पोखरीयाल हरिद्वारमधून तर अजय तामता अलमोडामधून लोकसभेवर निवडून गेले होते.हे दोघेही उत्तराखंड विधानसभेचे सदस्य होते. पोखरीयाल यांनी देहरादून जिल्ह्यातील दोईवाला ही जागा तर अजय तामता यांनी अलमोडा जिल्ह्यातील सोमेश्वर ही जागा २०१२ मध्ये जिंकली होती. जुलै २०१४ मध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकांनंतर अवघ्या अडीच महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये या दोन्ही जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. मागच्या वेळी जिंकलेली जागा पोटनिवडणुकीत गमावावी लागणे हे काही फार उत्साहवर्धक चित्र नसते. त्यातूनही आपल्याच पक्षाच्या खासदारांनी रिकामी केलेली विधानसभेची जागा आणि त्याहूनही आपल्याच पक्षाच्या माजी मुख्यमंत्र्यांनी रिकामी केलेली जागा गमावणे आणखी वाईट. आणि हा पराभव झाला होता मोदीलाट येऊन अडीच महिनेच झाले होते तेव्हा!! ५. मोदी सरकारने उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट आणणे आणि मग ती कोर्टाने रद्दबादल करणे वगैरे प्रकारांमुळे हरीश रावत यांना थोडासा तरी फायदा होईलच. तसेच रावत हे विजय बहुगुणांपेक्षा अधिक चांगले प्रशासक आहेत यात काहीच शंका नाही. त्यामुळे २०१४ मध्ये काँग्रेस सरकारविरूध्द असंतोष होता तो त्यांनी काही प्रमाणात तरी कमी केला असेल असे वाटते. अर्थातच उत्तराखंडमध्ये काँग्रेस जिंकेल असे मला वाटत नाही. पण काँग्रेसला अगदी पूर्णपणे "राईट ऑफ' करणे अयोग्य ठरेल असे आता तरी वाटते.
  • Log in or register to post comments

जहाल गोमूत्र अने कांग्रेस संविधान

गामा पैलवान
Tue, 01/24/2017 - 19:26 नवीन
ए फेवे शाहेब, स्साला, तुला आंख मारलेली नाय दिसते? तू इतना गुस्सा खाते की माजा गोमूत्र जहाल होते? आशा कशा बोलते तू? तू गुस्सा खाल्ला पछी तुजा पानी बद्धू जहाल होनार नी? :-D ते ज्यावदे. तू जे कांग्रेस कान्स्टीट्यूसन बोलते नी, ते शुं साथे खाय जावे? बोलेतो कोई नया चखना मार्केट में आया है क्या भाय? मारो हिसाबमां, कांग्रेस कान्स्टीट्यूसन मदी एकच सेन्टेन्स हाय. सबकुच गांधी! ए, तेच्यावरून आपला मोहनदास गांधी याद आला. सत्योतेर साल पहेला त्याने काय केला होता माहितीये? १९३९ मदी कांग्रेसने सुभासला प्रेसिडेंट इलेक्ट केला नी. पण हा मोहनदास ज्याम आखडून रायला. एव्हरी मन्थ बिर्ला पासेथी मोहनदासला बे त्रण हजार रुपिया पाकेटमनी भेटायचा. पण कदी चार आणा खर्चा करून कांग्रेसचा मेंबर बनला काय? आखिरमदी सुभास डिकराला हाकून लावलाज नी. कांग्रेस अशाच हाय. तवा तू ज्यादा झेंगटमदी पडू नको. तुज्या सवाल एकदम चोक्कस, पण तेला जवाब कायबी नाय भेटणार. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

उत्तर प्रदेशच्या १९९१ पासूनच्या राजकारणाचा आढावा

गॅरी ट्रुमन
Tue, 01/24/2017 - 23:45 नवीन
भाजपचा उत्तर प्रदेशात आलेख उतरता होता तो भाजपने केलेल्या काही चुकांमुळे. १९९१ मध्ये भाजपने विधानसभा निवडणुक जिंकून कल्याणसिंग मुख्यमंत्री झाले खरे पण त्यावेळीही भाजपला जनता दलात झालेल्या फुटीचा बराच फायदा झाला होता. १९८९ ते १९९१ दरम्यान राममंदिर आंदोलनामुळे काँग्रेसकडून उच्चवर्णीय मतदार आपल्याकडे वळविण्यात भाजपला यश आले. पण त्याचवेळी वि.प्र.सिंगांचा जनता दल आणि चंद्रशेखर-मुलायमसिंगांचा समाजवादी जनता दल यांच्या मतांची बेरीज जवळपास भाजपला मिळालेल्या मतांइतकीच होती. अर्थातच मंडल आयोगामुळे वि.प्र.सिंगांच्या जनता दलाने काही मतदार आपल्याकडे खेचून आणले. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की १९९१ मध्ये भाजपला विजय मिळाला खरा पण तो बर्‍याच अंशी या तांत्रिक कारणामुळे होता. १९९२ मध्ये मुलायमसिंग समाजवादी जनता दलातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा समाजवादी पक्ष स्थापन केला. १९९३ च्या विधानसभा निवडणुकांसाठी समाजवादी पक्षाने कांशीराम यांच्या बहुजन समाज पक्षाशी युती केली. बसपला त्यापूर्वी सर्वांनीच कमी लेखले होते. पण १९९३ मध्ये झाले असे की मुलायमसिंगांनी चंद्रशेखर आणि वि.प्र.सिंग या दोन्ही जनता दलांना १९९१ मध्ये मिळालेल्या मतांपैकी (जे दोन गट १९९३ च्या उत्तर प्रदेश निवडणुकांपूर्वी एकत्र येऊन आणखी एक जनता दल तयार झाले होते) जवळपास २/३ मते आपल्याकडे ओढली. त्यात बसपच्या मतांची भर पडली. त्यातून १९९१ प्रमाणे झालेले मतांचे विभाजन टळले. त्यातून झाले असे की भाजपची मते १९९१ पेक्षा वाढूनही जागा मात्र १९९१ पेक्षा कमी मिळाल्या. जोपर्यंत सप आणि बसप एकत्र होते तोपर्यंत भाजपला हताशपणे जे काही चालले आहे ते बघण्याशिवाय काही करता येत नव्हते. तेव्हा या दोघांना एकमेकांपासून दूर करणे क्रमप्राप्त झाले होते. तेव्हा मे १९९५ च्या शेवटी कांशीराम-मायावतींना हाताशी धरून मायावतींना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा द्यायचे कबूल करून त्यांच्यात फूट पाडण्यात भाजप यशस्वी झाला. त्यातच २ जून १९९५ रोजी मायावतींवर सपाच्या कार्यकर्त्यांनी (खरे तर गुंडांनी) हल्ला केला. त्यातून मायावती थोडक्यात बचावल्या. त्यानंतर सप-बसप एकत्र यायची शक्यता पूर्णच मावळली. भाजपचे एक उद्दिष्ट सफल झाले. भाजप-बसप फार काळ एकत्र नांदणे शक्यच नव्हते. त्यातच बसपने प्रत्येक वेळी भाजपला होईल तेव्हा आणि होईल तसे डिवचणे सुरू केले. त्याकाळी भाजप रामनामाचा जप करत असे. त्याचवेळी दक्षिणेतील द्रविड चळवळीचे नेते पेरीयार रामस्वामी नायकर यांची जयंती मायावतींच्या उत्तर प्रदेश सरकारने साजरी केली. या नायकरांनी राम म्हणजे उत्तरेतील आर्य संस्कृतीचे प्रतिक आणि रावण म्हणजे दक्षिणेतील द्रविड संस्कृतीचे प्रतिक इत्यादी म्हणून रामावर जोरदार टिका केली होती. नेमकी त्यांचीच जयंती उत्तर प्रदेश सरकारने साजरी करून भाजपला डिवचले. दोन पक्षांमधले मतभेद वाढल्यावर शेवटी भाजपने पाठिंबा काढून घेतला आणि राज्यात राष्ट्रपती राजवट आली. १९९६ च्या लोकसभा निवडणुका राष्ट्रपती राजवटीतच झाल्या. या निवडणुकांमध्ये भाजपने १९९१ पेक्षा एक जागा जास्तच जिंकली.पण निवडणुकांनंतर केंद्रात देवेगौडांचे संयुक्त मोर्चाचे सरकार आले आणि या सरकारमधील घटकांनी ऑक्टोबर १९९६ ची विधानसभा निवडणुक एकत्र लढवली. तर बसप-काँग्रेस युती झाली. परत एकदा भाजपविरोधी मतांचे विभाजन टळले. १९९६ मध्ये विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास १९९३ प्रमाणेच लागले. पण १९९३ मध्ये सप-बसप युतीला बाहेरून जनता दल आणि काँग्रेसने पाठिंबा दिला होता त्यामुळे मुलायमसिंग मुख्यमंत्री बनू शकले. १९९६ मध्ये मुलायमसिंगांना मायावती पाठिंबा देणे शक्य नव्हते. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट चालूच राहिली. मार्च १९९७ मध्ये परत एकदा भाजप आणि बसप एकत्र आले. पहिले ६ महिने मायावती आणि नंतरचे ६ महिने कल्याणसिंग मुख्यमंत्री राहणार असा अजब करार दोन पक्षांमध्ये झाला. पहिले ६ महिने मायावतींना भाजपने काहीही खळखळ न करता पाठिंबा दिला. पण कल्याणसिंग मुख्यमंत्री झाल्यावर मात्र मायावतींनी महिन्याभरात पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी कल्याणसिंगांनी घाणेरड्या राजकारणाची परिसीमा दाखवून दिली. काँग्रेसचे आमदार फोडून त्यांचा "लोकतांत्रिक काँग्रेस पक्ष" झाला. बसपचे आमदार फोडून त्यांचा "जनतांत्रिक बसपा" झाला. या फोडलेल्या आमदारांचा पाठिंबा घेऊन कल्याणसिंगांनी आपले बहुमत सिध्द केले. इतकेच नाही तर या सगळ्या आमदारांना त्यांनी मंत्रीही बनविले. उत्तर प्रदेश विधानसभेच्या ४२५ सदस्यांपैकी एकूण ९३ मंत्री कल्याणसिंगांच्या मंत्रीमंडळात होते. या मंत्रीमंडळातच रघुराज प्रताप सिंग उर्फ राजाभय्या हा एक नंबरचा अट्टल गुंड आणि दरवडेखोर सुध्दा मंत्री होता. हा प्रकार पूर्णच असमर्थनीय होता. तरीही या जंबो मंत्रीमंडळाच्या शपथविधीला अटलबिहारी वाजपेयी सुध्दा उपस्थित होते.आणि पत्रकारांनी त्यांना याविषयी प्रश्न विचारल्यावर "ते विधानसभेत निवडून गेलेले आमदार आहेत त्यामुळे त्यांना मंत्री बनण्यापासून रोखले जाऊ शकत नाही" असे लंगडे समर्थनही केले होते. स्वच्छ चारित्र्याबद्दल नावाजलेल्या वाजपेयींना ही गोष्ट नक्कीच शोभली नव्हती. नंतर २००२ पर्यंत कल्याणसिंग, रामप्रकाश गुप्ता आणि राजनाथसिंग हे मुख्यमंत्री झाले हे अन्य एका प्रतिसादात लिहिले आहेच. २००२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप ८८ जागांसह तिसर्‍या क्रमांकावर गेला. सर्वात जास्त जागा जिंकल्या मुलायमसिंगांच्या सपाने १४५ तर त्याखालोखाल मायावतींच्या बसपाने १०० जागा जिंकल्या. २००२ च्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने अजितसिंगांच्या लोकदलाशीही युती केली होती आणि अजितसिंग वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. अजितसिंगांसारखा संधीसाधू राजकारणी शोधून सापडणार नाही. हा मनुष्य वि.प्र.सिंगांपासून मनमोहनसिंग सरकारपर्यंत प्रत्येक सरकारमध्ये (चंद्रशेखर सरकारचा अपवाद वगळता) मंत्री होता.त्याला परत वाजपेयींनी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी जवळ केले. २००२ मध्येही १९९६ प्रमाणेच परिस्थिती आली. कोणाकडेच बहुमत नसल्यामुळे कोणीच मुख्यमंत्री बनू शकले नाही. आणि भाजपने १९९६ मध्ये केली तीच चूक परत एकदा केली. २००२ मध्ये भाजप आणि बसपचे परत एकदा सरकार बनले आणि मायावती तिसर्‍यांदा भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनल्या. या सरकारला अजितसिंगांच्या पक्षाचे आमदार आणि इतर काही लहान पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा होता आणि कामचलाऊ बहुमत होते. २००२ मध्ये तिसर्‍यांदा भाजपने बसपला पाठिंबा का दिला? त्याचे एक कारण म्हणजे गुजरात दंगलींनंतर वाजपेयी सरकारला बाहेरून पाठिंबा देणारा चंद्रबाबू नायडूंचा तेलुगु देसम पक्ष पाठिंबा काढून घेईल अशी भिती भाजपला होती. ३ मार्च २००२ रोजी तेलुगु देसम पक्षाचे नेते आणि लोकसभा अध्यक्ष जी.एम.सी बालयोगी यांचे अपघातात निधन झाल्यानंतर गुजरात दंगलींच्या निषेधार्थ तेलुगु देसमने आपल्या अन्य कोणा खासदाराला लोकसभा अध्यक्ष बनू दिले नाही त्यामुळे ते पद शिवसेनेच्या मनोहर जोशींना मिळाले. तसेच गुजरात दंगलींविषयी लोकसभेत चर्चा झाली त्यावेळी तेलुगु देसमच्या खासदारांनी नरेंद्र मोदींवर जोरदार टिका केली होती. जर तेलुगु देसमने पाठिंबा काढला तर बसपाचा पाठिंबा मिळावा यासाठी हा प्रयत्न होता. पुढे भाजप-बसपचे दीड वर्षात परत बिनसले आणि मायावतींचा पाठिंबा भाजपने काढून घेतला. त्यानंतर आमदारांची तोडफोड करून परत एकदा मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री झाले. हा सगळा घटनाक्रम लक्षात घेतला तर समजते की मायावतींना मोठे करण्यात आणि आपल्याच पायावर कुर्‍हाड मारण्यात भाजपचाच हात होता. १९९५ मध्ये बसपाला पाठिंंबा देणे समजू शकतो. कारण सपा आणि बसपाला दूर करणे अत्यंत गरजेचे होते. पण १९९७ आणि २००२ मध्ये "उत्तर प्रदेशात स्थिर सरकार मिळावे" या उदात्त उद्देशाने हे करायची काय गरज होती हे मला आजपर्यंत समजलेले नाही. ज्याप्रमाणे सुरवातीला काँग्रेसला आणि नंतर भाजपला रोखणे ही जबाबदारी भगवान श्रीकृष्णाने केवळ आपल्यालाच दिली आहे असा समज करून समाजवादी गटाच्या पक्षांनी सुरवातीला जनसंघ-भाजपशी आणि नंतर काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला तसेच काहीसे भाजपने मायावतींना पाठिंबा देऊन उत्तर प्रदेशात केले. उत्तर प्रदेशात स्थिर सरकार देणे ही काय केवळ भाजपची जबाबदारी होती का? मनमोहनसिंगांना नाकर्तेपणा बद्दल दोष दिला जातो पण वाजपेयींनाही कल्याणसिंगांना वेळीच आवरण्यात अपयशच आले होते. केंद्रात शुध्द चारित्र्याचे वाजपेयी पंतप्रधान असताना उत्तर प्रदेश सरकारमध्ये राजाभय्या मंत्री राहू दिला गेला!! त्यातून झाले असे की भाजपचा या चुकांमुळे आलेख उतरता झाला आणि तो अगदी २०१४ पर्यंत. २०१४ मध्येही मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार होते म्हणून. अन्यथा भाजपला ८० पैकी १० जागाही मिळणे कठिण होते. असो. या प्रतिसादात १९९१ ते २००३ या काळातील उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा आढावा घेतला आहे. निवडणुक होणार्‍या राज्यांच्या राजकारणाचा आढावा या लेखात विविध प्रतिसादांमध्ये घ्यायचा मानस आहे. भविष्यात कुठल्याही चर्चेत संदर्भ हवा असेल तर इथले प्रतिसाद कॉपी-पेस्ट केले की झाले :)
  • Log in or register to post comments

त्याचवेळी दक्षिणेतील द्रविड

अनुप ढेरे
Sat, 01/28/2017 - 22:43 नवीन
त्याचवेळी दक्षिणेतील द्रविड चळवळीचे नेते पेरीयार रामस्वामी नायकर यांची जयंती मायावतींच्या उत्तर प्रदेश सरकारने साजरी केली. या नायकरांनी राम म्हणजे उत्तरेतील आर्य संस्कृतीचे प्रतिक आणि रावण म्हणजे दक्षिणेतील द्रविड संस्कृतीचे प्रतिक इत्यादी म्हणून रामावर जोरदार टिका केली होती.
पेरियार, EV Ramaswamy यांची दोन वाक्यात बोळवण थोडी अन्फेअर आहे. पण धाग्याचा तो विषय नाही सो बरोबर आहे. इछ्छुकांसाठी ही अजून माहिती. पेरियार हे द्रविड चळवळीचे अध्वर्यु म्हणता येतील. टोकाचे हिंदी विरोधी, ब्राह्मण्य विरोधी व्यक्तिमत्व. जाती विरोधी काम खूप. सामाजिक न्याय, जातिविरोध(पण त्याच वेळेला एका जातिचा पराकोटीचा द्वेष करणारे), स्त्री मुक्ती, बुद्धीप्रामाण्यवाद आणि नास्तिकता यांच्या आधारावर द्रविड चळवळ उभी केली. आंबेडकरांइतके मोठे. सेल्फ रिस्पेक्ट चळ्वळ सुरू करणारे. द्रमुक सुरू करणारे अण्णादुराई यांचे शिष्य. (निवडणुक राजकारणात शिरायचं का नाही यावरून मतभेद होऊन अण्णादुराईंनी द्रमुक स्थापन केला. त्यातून पुढे करुणानिधी, एम्जीआर वगैरे मांदियाळी) अधिक माहिती. https://en.wikipedia.org/wiki/Periyar_E._V._Ramasamy सो मुद्दा हा की केवळ राम हा परका मांडणारे पेरियार ही ओळख अपुरी आहे. बसपाला ते जवळचे (आणि वरील केसमध्ये सोयिस्कर) वाटण्याचे कारण त्यांचा राम विरोध अधिक जातिव्यवस्थेविरोधात लढ्यात पेरियार या नावाला असलेलं वजन असं दुहेरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

रामस्वामी नायकर

गॅरी ट्रुमन
Sun, 01/29/2017 - 21:00 नवीन
बरोबर आहे. रामस्वामी नायकर हे त्यापेक्षा बरेच मोठे होते. या चळवळीचे पाच महत्वाचे नेते आहेत डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, पेरीयार रामस्वामी नायकर आणि केरळमधील एळवा समाजाचे नारायणगुरू. या पाचांनी काही वेगळे सामाजिक विचार सांगितले असे अजिबात नाही. तर त्यांचे मुद्दे एकच होते. यापैकी डॉ. आंबेडकर अर्थातच सर्वात परिचित. तेव्हा केवळ दलित अस्मिता वगैरे मुद्दे पुढे आणायचे असतील तर डॉ.आंबेडकरांच्या नावाने काही सोहळा भरवला असता तर ते समजता येते. पण डॉ.आंबेडकरांच्या नावानी कुठला कार्यक्रम न करता रामस्वामी नायकरांच्याच नावाने तो कार्यक्रम का केला असावा? भाजपला रामावर टिका करणार्‍याच्या नावानेच कार्यक्रम आयोजित करून डिवचण्यापलीकडे कुठला उद्देश त्यात होता असे मला तरी वाटत नाही. कदाचित मी चुकीचा असेनही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

पेरियार वैगेरे मंडळी

arunjoshi123
Mon, 01/30/2017 - 15:44 नवीन
पेरियार वैगेरे मंडळी देशद्रोही होती. त्यांना दक्षिण भारत हा वेगळा देश पाहिजे होता. या कर्मठ नास्तिकाचे सारे तत्त्वज्ञान आता कचर्‍यात निघालेल्या आर्यन इन्व्हेजन थेरीवर आधारित होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

आर्यन इन्व्हेजन थेअरी आत्ता

फेदरवेट साहेब
Mon, 01/30/2017 - 16:24 नवीन
आर्यन इन्व्हेजन थेअरी आत्ता आत्ता कचऱ्यात निघाली आहे का पेरियार राजकारण करत होते तेव्हाच निघाली होती आणि तरीही पेरियार तिच्याकडे सोईस्कर डोळेझाक करत होते ? कुठल्याही वेळी माणूस समोर जी त्याकाळात असलेली फॅक्ट आहेत तीच डोळ्यासमोर ठेऊन काम करणार न?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

आर्यन इन्वेजन थेरी हा

arunjoshi123
Tue, 01/31/2017 - 10:41 नवीन
आर्यन इन्वेजन थेरी हा धाग्याचा विषय नाही. पण तरीही... ती मांडली तेव्हा मांडणार्‍या लोकांची मानसिकता पाहून , राजकारण पाहून अनेक इतिहासकारांनी त्यातला फोलपणा तत्क्षणी दाखवला होता. पण असे इतिहासकार नॅशनालिस्ट असल्याने अर्थातच देशद्रोही मंडळीनी सोयीस्कररित्या खास देश तोडण्यासाठी ती थेरी स्वीकारली. त्या थेरीला तेव्हाही काही अर्थ नव्हता, आजही नाही. पण इंग्रजाच्या तोडो आणि राज करो नितिला या लोकांची थेट साथ होती. म्हणून सत्य काय आहे याचेशी त्यांना कधीच काही देणेघेणे नव्हते. ब्राह्मण ही देशातली सर्वात प्रखर राष्ट्रवादी जात आहे नि होती. हे लोक फक्त आणि फक्त ब्राह्मणद्वेष्टे होते. आणि म्हणून हे लोक थेट भारतद्वेष्टे होते. ===================== जेनेटिक्स, कार्बन डेटिंग इ गोष्टींचा शोध लागला म्हणून नशीब. नैतर आजही राष्ट्रवादी इतिहासकारांना मूर्खात काढायची परंपरा चालू राहिली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

अजो, आर्यन इन्वेजन थियरी खोटी

पुंबा
Tue, 01/31/2017 - 11:17 नवीन
अजो, आर्यन इन्वेजन थियरी खोटी असल्याचा ढळढळीत पुरावा जो सर्व इतीहासकार मान्य करतात असा मिळाला आहे का? मी नेटवर शोधायचा प्रयत्न केला परंतू, फार परस्परविरोधी माहिती मिळत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

ती थेरी खोटी असल्याचा कोणताही

arunjoshi123
Tue, 01/31/2017 - 12:21 नवीन
ती थेरी खोटी असल्याचा कोणताही अद्यतम पुरावा जो तुम्हाला नेटवर मिळत आहे तो इथे पेस्टवा. शक्यतो २०१० नंतरचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

ये क्या बात हुई? तुम्हीच

संदीप डांगे
Tue, 01/31/2017 - 12:33 नवीन
ये क्या बात हुई? तुम्हीच टाकलंय ना इथे कि ती थेरी आता कचऱ्यात निघाली आहे तर कचऱ्यात निघाल्याचा पुरावाही तुम्हीच द्यायला हवा, नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

आर्यन इन्व्हेजन थिअरी

अनुप ढेरे
गुरुवार, 02/02/2017 - 10:09 नवीन
आर्यन इन्व्हेजन थिअरी मांडणार्‍याने ती खरी असल्याचा पुरावा द्यायला हवा राईट? असा काही पुरावा आहे का हे तुम्हाला माहिती आहे का? माझ्या माहितीप्रमाने आर्यन इन्व्ह्जन थिअरी प्रूव्ह करणारा पुरावा नाही मिळालेला अजून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

ती मांडली तेव्हा मांडणार्‍या

फेदरवेट साहेब
Tue, 01/31/2017 - 14:34 नवीन
ती मांडली तेव्हा मांडणार्‍या लोकांची मानसिकता पाहून , राजकारण पाहून अनेक इतिहासकारांनी त्यातला फोलपणा तत्क्षणी दाखवला होता असं मोघम तुम्ही सांगितलं अन आम्ही ऐकलं , हे होणे नाही. तेव्हा 'त्यातले फोलपण लक्षात आल्यावर इतिहासकारांनी त्यातला फोलपणा दाखवून दिला होता' ह्यातले ते इतिहासकार कोण? त्यांनी कुठल्या लेखात/निबंधात/पुस्तकात आर्यन इन्व्हेजन थेअरी मांडल्यागेल्या नंतर किती 'लगेच' त्याचे खंडन केले होते, असे साद्यांत पुरावे द्या कसे, समर्थनीय पुरावे असल्यास मी माझी ज्ञान अपडेट करून घेईनच हे वेगळे सांगणे नलगे. दुसरे म्हणजे, ब्राह्मण जात "सर्वात प्रखर देशभक्त" होती हे कसे ठरले ? ते एक असो, तुमच्या म्हणण्यानुसार ब्राह्मणद्वेषापायी , ह्या 'देशद्रोही' लोकांनी ब्राह्मण/आर्य उपरे असल्याच्या बाता मारल्या होत्या, तुमच्या माहिती करता सांगतो, अश्या बाता मारण्यात एक पुस्तक आहे 'आर्क्टिक होम ऑफ वेदाज' त्याचे लेखक आपले लाडके लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते, अन ते पुस्तक आर्य बाहेरचे ह्या आधारावरच बेतलेले आहे, त्यात मूळ आर्यस्थान, सोमवल्ली म्हणजे नेमके कुठले झाड वगैरेवर उहापोह आहे, तेव्हा आता १. लोकमान्य टिळक देशभक्त नव्हते का? २. लोकमान्य टिळक सर्वात प्रखर देशभक्त जातीचे नव्हते का? किंवा ३. टिळक देशभक्तही नाही अन सर्वात प्रखर देशभक्त जातीचे पक्षी ब्राह्मण जातीचेही नव्हते का? ह्यांची उत्तरे द्यायचे कष्ट करा जरा अरुण जोशी साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

नंतर किती 'लगेच' त्याचे खंडन

arunjoshi123
गुरुवार, 02/02/2017 - 00:45 नवीन
नंतर किती 'लगेच' त्याचे खंडन केले होते, असे साद्यांत पुरावे द्या कसे,
खंडन जरी लगेच केलेले असले तरी पुरावे लगेच मिळणार नाहीत. मूळात ती थेरी मांडली देखिल "झटक्यात" नव्हती. एक झाड मांडलेले होते. त्यातली एक फांदी भारतात. त्यात (साला) आक्रमण अँगल हळूहळू टाकला गेला. मग तोच (फकस्त सोईचा म्हणून) फोफावला गेला. तुम्हाला पुरावे द्यायचे म्हणजे काय करायचं? मॅक्समूलरचे सगळे तत्त्वज्ञान आणि त्याला झालेला एतद्देशीय विरोध वाचा. मोप झालं. ================
ब्राह्मण जात "सर्वात प्रखर देशभक्त" होती हे कसे ठरले ?
हे झालं की तिकडे चर्चून =========================
लेखक आपले लाडके लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते, अन ते पुस्तक आर्य बाहेरचे ह्या आधारावरच बेतलेले आहे, त्यात मूळ आर्यस्थान, सोमवल्ली म्हणजे नेमके कुठले झाड वगैरेवर उहापोह आहे, तेव्हा आता १. लोकमान्य टिळक देशभक्त नव्हते का?
जगातली सगळी शाळेत जाणारी मुले आपल्या सौ. ल्यूसीबाई इथिओपिआवाले या आपल्या आद्यमाता आहेत असे मानतात. टिळकांनी जसा कायनू बायनू अभ्यास केला तसा मानववंशशास्त्रज्ञांनी देखिल केला आणि दोघे ही आपापल्या निश्कर्षाप्रत आले आहेत. आता आद्यमाता इथिओपिआवासिनी आहेत असे मानणारी मुले जर देशभक्त असतील तर टिळक आहेत, नैतर नाही. (माझा आणि त्यांचा वैयक्तिक परिचय नाही, नैतर मी विचारून सांगीतलं असतं.) ========================
२. लोकमान्य टिळक सर्वात प्रखर देशभक्त जातीचे नव्हते का?
(बाहेरून आलेले देशभक्त नसतात असं मी कुठं टाइप करून बसलोय की काय?) अहो बाहेरून या नैतर अजून कुठून या, काय फरक पडत नाही. पारशी, ज्यू, मुस्लिम बाहेरून आलेत आणि कट्टर देशप्रेमी आहेत हे मी पाहतच आहे. प्रश्न आक्रमण थेरीचा आहे. आक्रमण करणे, अर्धा उपखंड विस्थापित करणे, अर्धा गुलामच नव्हे तर कायमचा (४००० वर्षे, इ) बुद्धिभ्रष्ट करणे, बाटवणे (न म्हणावे अतिशूद्र सोडून देणे, बाटवणे म्हणावे तर स्वतःला अल्पसंख्यच ठेवणे), इ इ वर बोलणे चालले आहे. ============== टिळक आणि तत्सम बरेच लोक इंग्रजी काव्याचे शिकार मात्र होते. भारतातली फांदी कापायला जगातले झाड कापणे टिळकांच्या सामर्थ्यापलिकडचे होते. म्हणून त्यांनी काळाचा महिमा म्हणून थेरी स्वीकारली असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

म्हणून त्यांनी काळाचा महिमा

फेदरवेट साहेब
गुरुवार, 02/02/2017 - 07:15 नवीन
म्हणून त्यांनी काळाचा महिमा म्हणून थेरी स्वीकारली असावी. हीच शंका पेरियार ह्यांच्याबद्दल जिवंत ठेवायला काय हरकत ? त्यात कश्याला अनमान करावा म्हणतो मी जोशी? टिळकांनी काळाचा महिमा म्हणून स्वीकारली अन पेरियार ह्यांनी त्याच काळाचा महिमा म्हणून स्वीकारली व त्यांच्या सोयीची होती म्हणून वापरली असे म्हणले तर पेरियार ठामपणे देशद्रोही म्हणायचा कार्यकारणभावच नाहीसा होणार नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

हिच शंका मंजे कोणती शंका?

arunjoshi123
गुरुवार, 02/02/2017 - 13:35 नवीन
हिच शंका मंजे कोणती शंका? टिळक म्हणले का "उत्तर ध्रुव + पुणे + रत्नागिरी" = टीळकीस्तान. मी दिलेलं ते शाळेचं उदाहरण नीट वाचा. आपण मागे कधीतरी कुठून तरी आलो असे काहीबाही शोध लावणं वेगळं आणि अशा बाहेरून आलेल्या (चला आपण मान्य करू हो) लोकांशी आजही युद्ध चालू आहे असं (उगाचच) मानून वेगळी चूल थाटणं वेगळं. अहो, पेरियारना देशद्रोही नाही मानलं तर आंबेडकर मूर्ख ठरतात. आंबेडकरांनी अख्खा समाज सुधारावला, धर्म बदलला पण कधी द (फॉर दलित्स्थान) नाही काढला. आज ते भारताचे हिरो आहेत. आज दक्षिणेत दलितस्थान /द्रविडस्तान/द. पाकिस्तान असता तर काय झालं असतं? ती फाळणी कशी असती? आजचे रिलेशन कसे असते? त्या बेटावरच्या श्रीलंकेने एवढा भंड आणून सोडलाय... ============== व्यक्तिशः मला आंबेडकरांच्या शेजारी पेरीयारांचे नाव लिहिलेले अजिबात आवडत नाही. बनिया लोकांनी ब्राह्मण लोकांचा द्वेष करावा आणि इंग्रजांनी रचलेले अशास्त्रीय असिद्ध वर्गीकरण चेपून, बनिया चालवत असलेल्या काँग्रेसला ब्राह्मणी म्हणत, द्रविड / दलित, उत्तर /दक्षिण असे/घोळ घालत, वेगळे राज्य मागावे आणि मरेपर्यंत भूमिका न बदलणे ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

दोन मुद्दे

गॅरी ट्रुमन
Mon, 01/30/2017 - 16:53 नवीन
पेरियार वैगेरे मंडळी देशद्रोही होती. त्यांना दक्षिण भारत हा वेगळा देश पाहिजे होता.
भारतातून फुटून निघावे अशी मागणी असलेल्या बर्‍याच चळवळी होत्या. पेरीयार रामस्वामी नायकर हे द्रविड चळवळीचे पितामह होते. त्यातूनच जन्माला आलेल्या डीएमके पक्षाचीही मागणी (सुरवातीच्या काळात) त्याच स्वरूपाची होती.पण १९६२ च्या चीन युद्धानंतर डीएमकेला समजले की आपले भवितव्य भारत देशाशीच निगडीत आहे त्यामुळे अण्णादुराईंनी १९६२ च्या युध्दानंतर ती मागणी सोडून दिली आणि तो पक्ष मुख्य प्रवाहात आला. पुढे १९६७ मध्ये अण्णादुराई राज्याचे मुख्यमंत्रीही झाले. उत्तरपूर्व भारतातील फुटिरतावादी चळवळीच्या नेत्यांनीही आपली फुटून निघायची मागणी सोडून दिल्यावर ते मुख्य प्रवाहात आले. लालडेंगासारखे मिझोरामचे मुख्यमंत्रीही झाले. तेव्हा पूर्वीच्या काळी कधीतरी फुटून निघायची मागणी केली होती हे आयुष्यभर देशद्रोही असल्याचा शिक्का कपाळावर वागवावा लागण्यासाठी पुरेसे आहे का? जर का काही दहशतवादी कृत्ये केली असतील तर जरूर कारवाई करावी. पण एखाद्या संघटनेची फुटून निघायची मागणी पूर्वी होती पण आता ती मागणी सोडून देऊन मुख्य प्रवाहात कोणती संस्था येऊ इच्छित असेल तर त्यात इतके वाईट आहे का? त्यातूनही द्रविड चळवळ ही मुख्यत्वे वैचारीक होती आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यात कोणताही हिंसाचार झालेला नव्हता की कुणा देशद्रोह्याचे समर्थन त्यांनी केलेले नव्हते. ही माहिती चुकीची असल्यास जरूर सांगावे ही विनंती. तसे असेल तर एवढा आक्षेप का घ्यावा?
या कर्मठ नास्तिकाचे सारे तत्त्वज्ञान आता कचर्‍यात निघालेल्या आर्यन इन्व्हेजन थेरीवर आधारित होते.
आपल्या परंपरेप्रमाणे कर्मठ अस्तिक असणे आणि कर्मठ नास्तिक असणे या दोन्ही गोष्टी तितक्याच मान्य करता येण्याजोग्या आहेत. त्यामुळे ते कर्मठ नास्तिक होते हे आक्षेप घेण्यायोग्य कारण असू नये. शेवटी नास्तिकांनाही आपल्या परंपरेत स्थान आहेच. दुसरे म्हणजे त्यावेळी जरी आर्यन इन्व्हेजन थिअरी खोटी आहे हे सिध्द झाले असले तरी कोणाला ती खरी आहेच असे म्हणून आपली मते मांडायची असतील तर त्याकडे 'तो वेडा आहे' असे म्हणून दुर्लक्ष करणेच सर्वात श्रेयस्कर नाही का? समजा आज कोणी सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो असे गृहित धरून अशी कोणती मांडणी केली तर त्याला 'ठार वेडा' सोडून दुसरे काय म्हणणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

भारतातून फुटून निघावे अशी

arunjoshi123
Tue, 01/31/2017 - 14:09 नवीन
भारतातून फुटून निघावे अशी मागणी असलेल्या बर्‍याच चळवळी होत्या.
संस्थाने म्हणजे वैचारिक लोकांच्या चळवळी नव्हे हो! आणि मिझोरामची जेन्यूइन केस होती. इथे द्रविड राज्यांना कै धाड बडवली नव्हती.
की कुणा देशद्रोह्याचे समर्थन त्यांनी केलेले नव्हते.
जिन्ना देशद्रोहीच असावेत बहुधा.
पण एखाद्या संघटनेची फुटून निघायची मागणी पूर्वी होती पण आता ती मागणी सोडून देऊन मुख्य प्रवाहात कोणती संस्था येऊ इच्छित असेल तर त्यात इतके वाईट आहे का? त्यातूनही द्रविड चळवळ ही मुख्यत्वे वैचारीक होती आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यात कोणताही हिंसाचार झालेला नव्हता की कुणा देशद्रोह्याचे समर्थन त्यांनी केलेले नव्हते. ही माहिती चुकीची असल्यास जरूर सांगावे ही विनंती. तसे असेल तर एवढा आक्षेप का घ्यावा?
मूळ प्रवाहात येऊन फार कै उपकार नै केले. एकतर तर दाक्षिणात्य राज्ये कधीच भारत बाह्य संस्कृतीची नव्हती. या लोकांनी शुद्ध ब्राह्मणद्वेषापोटी तसा हंगामा उभा केला. शंभरदा खोटं बोलायचं!! यांच्यामुळे हिंदी भारताची राष्ट्रभाषा झाली नाही आणि स्थानिक लोकांना ज्ञान आणि सत्त्तेतून बाहेर ठेवले गेले. आजही ब्रह्मद्वेषाचे वीष तामिळनाडूत संहत आहे. यात वैचारिक देखिल काही नाही. चार दक्षिणेतल्या राक्यातले ब्राह्मण उत्तरेचे एजंट! काहीही? खाज थांबल्यावर ती होत होती तेव्हाची स्थिती वाइट ती वाइटच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

जेन्युईन केस

गॅरी ट्रुमन
Wed, 02/01/2017 - 14:42 नवीन
मिझोरामची जेन्यूइन केस होती. इथे द्रविड राज्यांना कै धाड बडवली नव्हती.
मिझोरामची केस जेन्युईन होती आणि तामिळनाडूची केस जेन्युईन नव्हती हे तुमच्या दृष्टीने विचार केला तर. अशा चळवळी करणार्‍या प्रत्येकाला आपली केस जेन्युईन आहे असेच वाटत असते.
जिन्ना देशद्रोहीच असावेत बहुधा.
स्वतंत्र द्रविड राष्ट्र व्हावे अशी पेरियार रामस्वामी नायकरांची मागणी होती. एका अर्थी जीनांच्या स्वतंत्र पाकिस्तान व्हावी या समकक्ष मागणीमुळे पेरियारांनी जीनांबरोबर हातमिळवणी केली होती. पण मुस्लिम लीगने केलेल्या हिंसाचारात द्रविड चळवळीतल्या कोणाचाही सहभाग होता असे मला तरी कुठे आढळलेले नाही. दुसरे म्हणजे जीनांचे समर्थन म्हणजे स्वतंत्र पाकिस्तानचे समर्थन हा अर्थ मी घेतो. स्वतंत्र पाकिस्तानचे समर्थन करणारे सगळेच देशद्रोही का? अविभाजित भारत राहिला तर प्रचंड डोकेदुखी होईल आणि कधीच शांतता राहणार नाही म्हणून पाकिस्तानची घाण नाहिशी झाली तर चांगलेच होईल या उद्देशाने स्वतंत्र पाकिस्तानचे समर्थन करणारेही देशद्रोही का? बरं त्रावणकोरचे दिवाण सी.पी.रामस्वामी अय्यर यांचे काय? त्रावणकोर संस्थानच्या राजाने १९४७ मध्ये संस्थान स्वतंत्र देश होईल असे जाहिर केले होते त्यावेळी सी.पी.रामस्वामी अय्यर यांनी जिन्नांशीही बोलणी केलीच होती. लोकमान्य टिळकांच्या वेळी पाकिस्तानची संकल्पना अर्थातच लोकप्रिय झाली नव्हती.पण त्यांनी लखनौ करार करून मुस्लीम लीगच्या नक्की कोणत्या मागण्या मान्य केल्या हे सर्वमान्य आहे. त्यांचे काय? लाला लजपत रायांचे काय? ते सगळेही देशद्रोहीच का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

हे तुमच्या दृष्टीने विचार

arunjoshi123
गुरुवार, 02/02/2017 - 00:03 नवीन
हे तुमच्या दृष्टीने विचार केला तर
अहो कोणाच्याही दृष्टीने विचार केला तरी उत्तर प्रदेशात खूप ब्राह्मण आहेत हे तामिळ नाडूच्या स्वातंत्र्याचे कारण कसे असू शकते? काय तरीच काय?
पण मुस्लिम लीगने केलेल्या हिंसाचारात द्रविड चळवळीतल्या कोणाचाही सहभाग होता असे मला तरी कुठे आढळलेले नाही.
१. कास्मिरात एक नेता आहे. तो त्याच्यामते हिंसाचारवादी नाही पण भारतविरोधी आहे. असले गांधी जास्त डेंजर नाही का? तो विषय नाही. २. दक्षिणेत दक्षिण पाकिस्तान नव्हता. आणि लीगची ज्या निजामाला सहानुभूती होती तो आंध्रच द्रविडस्तान मधे हवा होता या लोकांना. शिवाय त्या काळात प्रथा होत्या पण जातीयवाद आजच्यासारखा कट्टर नव्हता. प्रॅक्टीकली हिंदू१ + मुस्लिम्स विरुद्ध हिंदू२ असा दंगा असंभव.
अविभाजित भारत राहिला तर प्रचंड डोकेदुखी होईल आणि कधीच शांतता राहणार नाही म्हणून पाकिस्तानची घाण नाहिशी झाली तर चांगलेच होईल या उद्देशाने स्वतंत्र पाकिस्तानचे समर्थन करणारेही देशद्रोही का?
हे लोक सर्वात मोठे देशद्रोही आहेत असे मानावे. अविभाजित भारताकडे पाहू. भारतात राहिलेल्या आणि पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांत काय फरक आहे? म्हणजे १९४७ मधे होता? बलोच, पंजाब, सिंध, पूर्ब बंगाल इथे राहणारे मुस्लिम कमी भारत प्रेमी आणि उत्तर प्रदेश आणि आंध्रचे जास्त देशप्रेमी असा हिशेब होता कि काय? जे लोक पाकिस्तानात गेलेल्या घाणीपासून आपण बचावलो असे विचार करतात ते आज देशात असलेल्या मुस्लिमांशी देखिल गद्दार आहेत असा सरळ अर्थ निघतो. उद्या पश्चिम उत्तर प्रदेश एक उत्तर पाकिस्तान बनला तर हे लोक पुन्हा म्हणणार ' बरं झालं , घाण गेली.' आणि हे योग्य नाही. काँग्रेसने देश तोडला नि उपकार झाले म्हणणारे बरेच आहेत. पण लोक विसरतात कि "पाकिस्तानी तालिबान्यांचे (ही जगातली सर्वात हाय टर्बिडीटीची घाण)"आजोबा पणजोबा "पूर्व पाकिस्तान असू शकतो तर पश्चिम भारत का नाही?" असे म्हणत. बाय द वे , घाण गेली नाही, ती उराशीच आहे आणि सुसज्ज आणि सशस्त्र आहे. तेच जे मुसलमान भारतात आहेत ते कूल आहेत. त्यांना कोनतेही वाईट डोहाळे लागलेले नाहीत. ही पाकी घाण (?) गेली नसती तर भारतात चार पंतप्रधान मुसलमान झाले असते, आणि विश्वशांती राहिली असती. असो. ============ रामस्वामी अय्यर नक्कीच देशद्रोही आहेत. ============== लखनौ करारात काय राष्ट्रद्रोही मला आढळ्ललं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

का?

गॅरी ट्रुमन
गुरुवार, 02/02/2017 - 14:37 नवीन
अहो कोणाच्याही दृष्टीने विचार केला तरी उत्तर प्रदेशात खूप ब्राह्मण आहेत हे तामिळ नाडूच्या स्वातंत्र्याचे कारण कसे असू शकते?
तुम्ही मिझोरामची केस जेन्युईन होती असे म्हटले आहेत. जर द्रविड लोक उत्तर भारतात खूप ब्राह्मण आहेत हे त्यांच्या प्रदेशाच्या स्वातंत्र्याचे कारण मानत होते तर मिझोरामचे लोकही भारताच्या इतर भागातील लोक आपल्या वंशाचे नाहीत म्हणून आम्ही भारतीय नाही हे एक कारण मानत होते. जर मिझो लोकांचे बरोबर असेल तर द्रविड लोकांचे काय चुकले?
शिवाय त्या काळात प्रथा होत्या पण जातीयवाद आजच्यासारखा कट्टर नव्हता.
नक्की?
प्रॅक्टीकली हिंदू१ + मुस्लिम्स विरुद्ध हिंदू२ असा दंगा असंभव.
का बरं? अयोध्येच्या शुजाच्या पदरी हिंदू सैनिक होते ते पानिपतमध्ये मराठ्यांविरूध्द अब्दालीच्या बाजूने लढले होते. राजा मानसिंग अकबराच्या बाजूने राणा प्रतापविरूध्द लढला होता इत्यादी इत्यादी.... हिंदूंमधील दुही ही शतकानुशतकांपासून चालत आलेली आहे म्हणूनच परकीयांचे राज्य आपल्यावर होऊ शकले.
उद्या पश्चिम उत्तर प्रदेश एक उत्तर पाकिस्तान बनला तर हे लोक पुन्हा म्हणणार ' बरं झालं , घाण गेली.' आणि हे योग्य नाही.
अजिबात नाही. पाकिस्तान होऊन घाण गेली असे म्हणायचे कारण हे की त्यांना आपल्याबरोबर एक देश म्हणून राहायचे नव्हते हे उघड होते आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे काहीही करण्यासाठी १९४७ म्हणजे खूप उशीर झाला होता. जर रामपूर, अमरोहा, देवबंद येथील पाकिस्तानशी सहानुभूती बाळगणारे लोक जर पाकिस्तानात चालते झाले तर नक्कीच घाण गेली असे म्हणू पण जर त्यांना वेगळा उत्तर पाकिस्तान हवा असेल तर मात्र ते नक्कीच चालायचे नाही. त्यांना अगदी दयामाया न दाखवता निर्दयपणे ठोकून काढले पाहिजे. पश्चिम उत्तर प्रदेशात (आणि कदाचित बंगालमध्ये) अजून वेळ गेलेली नाही त्यामुळे परिस्थिती अजूनही सांभाळता येऊ शकेल.पण पश्चिम पंजाब इत्यादी भागात १९४७ मध्ये तसे नव्हते. इट वॉज टू लेट. जे पश्चिम पंजाबमध्ये झाले तेच बंगाल, आसाम आणि इतर ठिकाणी होऊ द्यायचे की नाही हे आपल्याच हातात आहे.
हे लोक सर्वात मोठे देशद्रोही आहेत असे मानावे.
उठल्यासुटल्या सगळ्यांना देशद्रोही म्हटल्यामुळे दोन गोष्टी होतात. एकतर देशद्रोही हा शब्द अगदीच बुळबुळीत बनून जातो.आणि दुसरे म्हणजे या कारणामुळे राष्ट्रवादाचे समर्थक स्वतःला हास्यास्पद बनवितात. जर का आता म्हणजे २०१७ मध्ये जर कोणी वेगळा देश वगैरे मागत असेल तर तो नक्कीच देशद्रोह झाला.पण आजच्या काळाचे परिमाण आपण १९४७ च्या परिस्थितीशी लावू शकत नाही. सी.पी.रामस्वामी अय्यरटाईप लोकांना स्वतंत्र देश हवा होता म्हणजे त्याचे नक्की काय परिणाम होतील हे पूर्णपणे उलगडले होते का?की ब्रिटिश राजवटीत संस्थानिकांना त्यांच्या घराच्या उंबरठ्यापर्यंत स्वातंत्र्य होते तशाटाईपचे स्वातंत्र्य १९४७ नंतरही आपल्याला उपभोगायला मिळेल अशी त्यांची कल्पना होती?तसे असेल, त्यांना या मागणीचे नक्की परिणाम काय होतील हे त्यावेळी जाणवले नसेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या या मागण्यांमुळे हिंसा झाली नसेल आणि सरदार पटेलांनी दांडुका हातात घेतल्यानंतर का होईना त्यांना आपली चूक उमगली असेल आणि ते मेनस्ट्रीममध्ये आले असतील तर अशांना देशद्रोही मानणे अयोग्य आहे असे मला वाटते. हैद्राबादचा निजाम मात्र याला अपवाद आहे. एकतर त्याच्या रझाकारांनी हिंदूंवर अत्याचार केले होते आणि १९४७-४८ मध्येच हैद्राबादचा प्रश्न यु.एन मध्येही नेला गेला होता. असे काही इतर संस्थानिकांनी केले होते का? मग सगळ्यांना एकजात देशद्रोही असे लेबल चिकटवले तर त्या लेबलची किंमत कमी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

छान प्रतिसाद! आवडला!

संदीप डांगे
Fri, 02/03/2017 - 09:13 नवीन
छान प्रतिसाद! आवडला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

पंजाबमध्ये अमरिंदरसिंग काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

गॅरी ट्रुमन
Fri, 01/27/2017 - 14:20 नवीन
आज राहुल गांधींनी पंजाबमधील मजिठा विधानसभा मतदारसंघात केलेल्या प्रचारसभेतील भाषणात एक महत्वाची घोषणा केली. आणि ती म्हणजे कॅप्टन अमरिंदरसिंग हे काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील. ही घोषणा करायला इतका उशीर का केला हे समजत नाही. खरे तर प्रतापसिंग बाजवा विरूध अमरिंदर या अंतर्गत भांडणात अमरिंदर यांची बाजू हायकमांडने घेतल्यावर ही घोषणा करणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. असो. जे काही असेल ते. आता यापुढे तरी अमरिंदर आडपडदा न ठेवता प्रचारात पूर्णपणे झोकून देतील आणि काँग्रेसला विजय मिळवून देतील ही अपेक्षा. (पंजाबमध्ये काँग्रेस जिंकावी असे वाटणारा) ट्रुमन
  • Log in or register to post comments

अगदी अगदी. पंजाबमध्ये सत्ता

पुंबा
Fri, 01/27/2017 - 16:48 नवीन
अगदी अगदी. पंजाबमध्ये सत्ता पालटणे अत्यंत गरजेचे आहे. आता आप आणि कॉग्रेसच्या भांडणात परत अकाली-भाजपा युतीच्या तोंडात सत्तेचा गोळा पडू नये म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

आआप आणि पंजाब

गामा पैलवान
Mon, 01/30/2017 - 13:49 नवीन
सौरा, केजरीवाल देशद्रोही आहे. त्यातून पंजाब पडलं सीमावर्ती राज्य. ही सीमाही भारताच्या कट्टर शत्रू पाकिस्तानची. केजरीच्या हातात पंजाब पडणं अतिशय धोकादायक आहे. कोणीही येवो पण केजरी नको. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

भाजप अकाली दल कोणत्याही

arunjoshi123
Mon, 01/30/2017 - 15:22 नवीन
भाजप अकाली दल कोणत्याही हालतीत नको आणि आआप चालेल असे म्हणणारांस ईश्वर सद्बुद्धी देवो. =================== काँग्रेसचं कै नै. म्हणजे ती जिंकली नै जिंकली तरी चालतं. शेवटी (१०० चूका केलेला का होइना पण) तो राष्ट्रीय पक्ष आहे. पण आम आदमी पक्ष? पाकिस्तानच्या सीमेवर? आर यू इन यूर सेन्सेस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

देशद्रोही आहे की नाही ते

पुंबा
Mon, 01/30/2017 - 15:43 नवीन
देशद्रोही आहे की नाही ते माहित नाही पण आपच्या ताब्यात पंजाब जाऊ नये असे वाटते. कॅ. अमरींदर सिंगांमुळे काँग्रेस जिंकू शकते आणि जिंकावी असे वाटते. पण भाजप- अकाली नको. पण अनेक लोक सांगतात त्याप्रमाणे पंजाबच्या युवा वर्गात केजरीवाल भयाण फेमस आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

निवडणूकांचं जाऊ द्या, पण

arunjoshi123
Mon, 01/30/2017 - 15:24 नवीन
निवडणूकांचं जाऊ द्या, पण पंजाबमधे सरकार बदलणं का म्हणे इतकं आवश्यक आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

पंजाबमधे काँग्रेस का जिंकावी?

arunjoshi123
Mon, 01/30/2017 - 15:31 नवीन
पंजाबमधे काँग्रेस का जिंकावी? मंजे असे तुम्हाला का वाटते? ===================== आर्थिक प्रगती, राजकीय स्थेर्य, दहशतवाद, सामाजिक समता, सामाजिक सुधार, लॉ अँड ऑर्डर, वा अशा कोणत्या महत्व्वाच्या बाबतीत अकाली-भाजप सरकारने अशी अक्षम्य चूक केली आहे कि ते पुनः सत्तेवर येऊ नयेत असे वाटावेत? ==================== बाय द वे, मणिपूरमधे आता मात्र काँग्रेस येऊच नये असे तुम्हाला वाटायला पाहिजे. अति झालं हसू आलं असा प्रकार असला तरी तिथे भाजप येऊ नये असे वाटते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

लॉ अँड ऑर्डर: ड्रग्ज. कित्येक

पुंबा
Mon, 01/30/2017 - 15:39 नवीन
लॉ अँड ऑर्डर: ड्रग्ज. कित्येक अकाली दलाचे आमदार प्रत्यक्ष या धंद्यात आहेत असे वाचले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

+१

फेदरवेट साहेब
Mon, 01/30/2017 - 16:28 नवीन
+१ पंजाबात लॉ अँड ऑर्डर मुळातच किचकट प्रकार आहे. शीख धर्माच्या तत्वानुसार धार्मिक शीख शस्त्रधारी असणे हा एक नियम आहे (कृपाण धारण करणे) त्यामुळे बरेच प्रॉब्लेम असावेत असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

पुरवणी प्रतिसाद

फेदरवेट साहेब
Mon, 01/30/2017 - 16:38 नवीन
पंजाबातली विधिव्यवस्था हा विषय चर्चेला घेतल्यावर खूप उप मुद्दे पुढे येतात १. स्त्री सुरक्षा, मागे खूपशा केसेस मध्ये चालत्या बस मधून स्त्रियांना फेकून देणे वगैरे प्रकार झाले होते. ह्यातल्या बहुतांशी बसेस ह्या बादल कुटुंबियांच्या, त्यांच्या नातलगांच्या वगैरे होत्या असेही रिपोर्ट्स होते. २. एनआरआय लोकांनी पंजाबी मुली मारणे, हुंडाबळी वगैरे प्रश्नांवर बादल सरकार ने काही खास केल्याचे ऐकिवात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

सरकारने केसेस लढवायला नकार

arunjoshi123
Tue, 01/31/2017 - 14:50 नवीन
सरकारने केसेस लढवायला नकार दिला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

फार डावी वृत्तपत्रे वाचत जाऊ

arunjoshi123
Tue, 01/31/2017 - 18:30 नवीन
फार डावी वृत्तपत्रे वाचत जाऊ नका. भारताच्या अन्य ठिकाणांच्या मानाने ह्या सगळ्या गोष्टींत पंजाब फार बरा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

अकाली दलाचे कित्येक आमदार? आम

arunjoshi123
Tue, 01/31/2017 - 14:47 नवीन
अकाली दलाचे कित्येक आमदार? आम आदमी पार्टी सोडून इतर कोणीही केलेले असे आरोप दाखवता येतील का? एखाद्या आरोपीने नाव घेतले म्हनून अकाली दलाचेनेते गुन्हेगार ठरत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

बरं.. ईडी चौकशी करतच आहे,

पुंबा
Tue, 01/31/2017 - 17:17 नवीन
बरं.. ईडी चौकशी करतच आहे, येतील अजून लोक जाळ्यात.इथे आणि इथे थोडी अधिक माहिती मिळेल या भोला स्कॅमबद्दल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

मंत्रीशालकाचीदेखील चौकशी सुरू

पुंबा
Tue, 01/31/2017 - 17:30 नवीन
मंत्रीशालकाचीदेखील चौकशी सुरू आहे.
K S Makhan and Jagsir Sidhu are not the only leaders who have been summoned by the ED. Earlier the cabinet minister and brother-in-law of deputy chief minister Sukhbir Badal was also summoned.
संदर्भः इंडीया टुडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

आगा बयो, म्हणून पंजाबात

arunjoshi123
Tue, 01/31/2017 - 18:22 नवीन
आगा बयो, म्हणून पंजाबात काँग्रेसचं सरकार हवं? अहो , जगातल्या (जगातल्या बरं, भारतातल्या नाही.) मादक पदार्थांमुळे बट्ट्याबोळ झालेल्या सर्वात वाईट जागांमधे मणिपूर ही एक आहे.)तिथे काँग्रेसची १५ वर्शे सत्ता आहे. म्हणजे मणिपूरचा ड्रग प्रॉब्लेम १०० पैकी ८० असेल (जस्ट एक स्केल मांडायचा म्हणून) तर पंजाबचा २ ते ३ देखिल नाही. ड्रग्जच्या समस्येच्या ज्या लोकांना इतका पुळका आला आहे त्यांनी पंजाब विसरून (हो, पूर्णतः विसरून) मणिपूरमधे काँग्रेस पाडा असा तीव्र प्रचार केला पाहिजे. https://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/12284227 Although Manipur makes up only 0.91% of the country's population, the state's intravenous drug account for 23.1% of the nation's HIV cases. Manipur has an estimated 30,000 drug addicts, approximately 1/2 of which are intravenous drug users. लक्षात घ्या, ज्या राज्याची लोकसंख्या देशाच्या १% देखिल नाही तिथे २३% ड्र्ग रिलेटेड एच आय वी केसेस आहेत. भारतात ड्रग अ‍ॅडिक्शन रेट ०.२५% आहे, पंजाबात ०.८०% आहे, मणिपूरमधे २.०% आहे. वास्तवात हा दर अजूनच जास्त आहे कारण मणिपूरमधे लॉ अँड ऑर्डर नावाची गोष्ट नाही आणि क्राइम रिपोर्टींग नाही. ============= अकाली पाकी टॅक्टीकला तोंड द्यायला फेल होताहेत, पण काँग्रेसी तर म्यानमारी टॅक्टीकपुढे फेल झालेत. ते पंजाबात आले तर पंजाबची वाट लावणार यात वाद नाही. अकालायांच्या एक दोन लोकांना ड्र्ग्ज लॉबीने फोडले आहे, पण काँग्रेसच्या काळात अख्खा पक्ष लॉबीच्या खिशात असेल. (कॅप्टन सोडून बहुतेक) ================ आआप बद्दल बोलायची लायकी नाही माझी. ड्र्ग घ्या पण आम्हाला मते द्या, ड्र्ग घ्या पण जातीयवाद करू नका, ड्र्ग्ज घ्या पण भ्रष्टाचार करू नका, इ इ एकायला मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

अहो, इथं विषय पंजाबचा चाललाय.

पुंबा
Wed, 02/01/2017 - 11:19 नवीन
अहो, इथं विषय पंजाबचा चाललाय. मणिपुरमध्ये काँग्रेस यावी कोण म्हणतंय? उगाच मणीपुर कशी जगातली सगळ्यात भयानक जागा आहे हे कशाला सांगताहात? पंजाबची केस अशी आहे की, सलग दहा वर्षे सत्तेत राहील्याने अकाली-भाजप युती आणि ड्रग माफिया यांच्यात चांगलंच साटंलोटं निर्माण झालं आहे. अनेक पाहण्यांनुसार, सर्वेक्षणांनुसार पंजाबमध्ये ड्रगची समस्या अतिशय उग्र आहे. मात्र अकाली-भाजप हे सतत नाकारत आहेत. पंजाबमधील सत्य परिस्थिती सांगणार्‍या प्रत्येक जण शिख धर्माची इमेज खराब करण्यासाठी हे करत असल्याचा कांगावा करत आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी कुठलीही ठोस पावले उचलली गेली तर नाहीतच वर सत्ताधार्‍यांमधीलच अनेक नेते या माफियांशी संगनमत करून असल्याचे सिद्ध होते आहे. अशा वेळी अमरिंदर सिंग मात्र आपण ही समस्या पुर्णपणे सोडवू असं आश्वासन देत आहेत. माझ्या मते, एक स्ट्राँग नेता ज्याचे असे हात असे ड्रग माफियांनी ओले केलेले नाहीत( असा आरोप कुणीही केलेला माहित नाही, तुम्हाला असेल तर सांगा), तो या समस्येशी निश्चितच लढू शकतो. १० वर्षे अनिर्बंध सत्ता उपभोगल्यावर आता पंजाबी लोकांनी भाकरी फिरवून कॅ. ना संधी द्यावी असे वाटते, जर ते यात अपयशी ठरले तर पुन्हा पाच वर्षांनी हाकलता येइलच की. सारा भारत काँग्रेसमुक्त व्हावा आणि सगळीकडे भाजपच सत्तेवर यावा असले काही मत नसल्याने मी प्रत्येक केसचा स्वतंत्र विचार करू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

जो पक्ष आपल्या एका राज्याला

arunjoshi123
Wed, 02/01/2017 - 23:05 नवीन
जो पक्ष आपल्या एका राज्याला जगातले सर्वात भयानक ड्रगपिडित राज्य होण्यापासून वाचवू शकत नाही त्याला दुसरीकडे तीच समस्या सोडवण्यासाठी निवडणे म्हणजे विनोदी प्रकार आहे.
अनेक पाहण्यांनुसार, सर्वेक्षणांनुसार पंजाबमध्ये ड्रगची समस्या अतिशय उग्र आहे.
नाही हो. आकडे कळत नाहीत का तुम्हाला?
सारा भारत काँग्रेसमुक्त व्हावा आणि सगळीकडे भाजपच सत्तेवर यावा असले काही मत नसल्याने मी प्रत्येक केसचा स्वतंत्र विचार करू शकतो.
हे चांगलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

ब्वार्र...जगातलं सग्गळ्ळं

पुंबा
गुरुवार, 02/02/2017 - 11:19 नवीन
ब्वार्र...जगातलं सग्गळ्ळं सग्गळ्ळं तुम्हालाच कळतं.. चालू द्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: arunjoshi123

तुमची मणिपूरवरची माया फार

arunjoshi123
गुरुवार, 02/02/2017 - 13:14 नवीन
तुमची मणिपूरवरची माया फार पातळ आहे. खरंच तुम्हाला आकडे कळत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा

खोट्या केसेस काढून देईन

वरुण मोहिते
Mon, 01/30/2017 - 17:05 नवीन
असं पण केजरीवालांचा एक आश्वासन आहे ज्याला अनेक जणांनी पाठिंबा दिलाय कारण बादल सरकार ने अनेकांवर खोट्या केसेस टाकल्या होत्या . त्यात छोट्या बांदलांचा मेहुणा हाच ड्रग तस्कर आहे असेही पटवून देण्यात केजरीवाल यशस्वी झालेत . तरी हि कित्येक ठिकाणी मतदानाच्या आदल्या दिवशी डेरा सच्चा सौदा आणि बाकी धर्मगुरूंच्या आदेशानुसार मतदान होत. त्यामुळे पाहणं रोचक आहे .काँग्रेस ला बहुमत नाही मिळणार पण आप पेक्षा एक जागा जास्त मिळावी किमान . अवांतर - आप बद्दल काहीच अनुमान काढता येत नाहीये अजून दिल्ली ला गेलो तर कित्येक लोक खुश आहेत सरकार वर अजूनही . आणि काही सडकून टीका करतात पण अजूनही खुश असणाऱ्यांचा प्रमाण जास्त आहे . पंजाबी काही मित्र आहेत ते असच चर्चेत सांगत आहेत ये टाइम झाडू . गोव्यात आव्हान उभं केलाय . व्यक्तिशः मला तरी त्यांचा आक्रस्ताळी आणि अनेक उलट्या सुलट्या निर्णयाचं राजकारण नाही आवडत .
  • Log in or register to post comments

सपातील यादवी

गॅरी ट्रुमन
Mon, 01/30/2017 - 17:20 नवीन
सपामधील यादवीमध्ये नक्की काय चालू आहे हे खरोखरच कळेनासे झाले आहे. जेव्हाजेव्हा वाटते की ही सगळी फिक्स्ड मॅच आहे तेव्हा मधूनच अशी एखादी बातमी येते त्यातून गोंधळ वाढतो. आजच मुलायमसिंग यादवांनी त्यांना अखिलेशने काँग्रेसबरोबर केलेली युती मान्य नाही आणि ते युतीसाठी प्रचार करणार नाहीत असे म्हटले आहे. तसेच काँग्रेसच्या उमेदवारांविरूध्द निवडणुक लढवा असे आपल्या समर्थकांना सांगितले आहे अशीही बातमी आहे. एकूणच काय चालू आहे हे समजत नाही.
  • Log in or register to post comments

मी जर असतो तर काँग्रेस ला ३० जागाही दिल्या नसत्या

वरुण मोहिते
Mon, 01/30/2017 - 19:51 नवीन
असंही म्हणाले. शिवपाल यादव डिसेन्ट आहेत, आणि माझ्या मुलाच्या हातात मी सर्व दिलंय नाहीतर बादलांकडे बघा पंजाब मध्ये अजूनही मुख्यमंत्री पद सोडत नाहीत हे सगळं नेताजी बोले . प्रचार करणार नाही कारण सपा सक्षम होता सत्तेत यायला म्हणजे आता नाही आला तर अखिलेश वर ह्याची जबाबदारी असणार . ज्या अर्थी निवडणूक आयोगापर्यंत जावं लागलं त्या अर्थी नेतांजींच्या मनाला ह्या वयात तरी लागली आहे हि गोष्ट त्यामुळे फिक्स नक्कीच नाहीये . निवडणुकांनंतर बॉल परत आपल्या कोर्टात यावा असेच त्यांना वाटत असणार .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा