Skip to main content

स्वरचित महाभारत : भाग शेवटचा

लेखक मिडास यांनी रविवार, 22/01/2017 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटचा गाव मागे टाकून खूप वेळ झाला होता. चालून चालून त्यांच्या पायात गोळे आले होते. थोडाच वेळ आधी बर्फ पडून गेला होता. हवेतला गारवा वाढंतंच चालला होता. आणि अचानक धीरगंभीर आवाजात कोसळणारा जलप्रपात समोर आला. मंत्र टाकल्यासारखे सगळे एकाच जागी खिळून राहिले. तशी जायला दोन दगडांची वाट होती. पण एखादी उडी मारायला लागली असती. पण त्यांच्या काकडलेल्या शरीराला ती उडी सहन झाली नसती. इथून पुढे जाणं शक्य नाही हे त्यांना कळून चुकलं होतं. द्रौपदी तर मटकन खालीच बसली. मग भीमानेच एक बऱ्यापैकी मोठा दगड त्या दोन दगडांवर रचला आणि त्या कामचलावू दगडावरून त्यांनी तो धबधबा पार केला. धबधब्याचे उडालेले तुषार त्यांना भिजवून गेले खरें पण न जाणो पाण्याच्या आशेनं कुणी तरी जंगली जनावर तिथे यायची शक्यता होती. जितका जमेल तितकं चालण्याचा निर्धार करून ते पुढे निघाले. भिजल्या मुळे द्रौपदीची वस्त्रं तिच्या सर्वांगाला चिकटली होती. तिच्या कडे पाहून नकुल सहदेवाने डोळे मिचकावल्याचे अर्जुनाने पाहिले. पण त्यात वासनेपेक्षा खोडकर पणाच जास्त होता. वाटेत पठार लागल्यावर मात्रं त्यांनी रात्री तिथेच मुक्काम करायचं ठरवलं. पांडवांनी इथून तिथून काही पाचोळा आणि काटक्या गोळा करून त्यांची चूल पेटवली. मागच्या गावात भीक मागून मिळवलेला शिधा त्यांनी त्या कुचकामी शेकोटीभोवती बसून वनभोजनाच्या थाटात खाल्ला. आकाशात तारे लुकलुकत होते. द्रौपदी ऊबेकरता म्हणून भीमाच्या मांडीवर डोकं टेकून आडवी झाली. तिला तसं बघून त्याही स्थितीत अर्जुनाला मत्सर वाटला. जणू विशेष काही घडलंच नाही असं दाखवत ते सहाही जण शिळोप्याच्या गप्पा मारू लागले. "तू काहीही म्हण दादा! पण आपण राजवाडा सोडायलाच पाहिजे नव्हता," सहदेव म्हणाला. "सहदेवा, वय झालं तुझं. आता तरी नसतां शहाणपणा सोडून दे. तुझ्या कुवतीच्या बाहेरच्या बऱ्याच गोष्टी आहेत जगात याचं भान ठेव. " युधिष्टिर त्याच्या नेहमीच्या शांत आवाजात म्हणाला. "काय चुकलं सहदेवाचं ? 'पराक्रमाला' वयाचं बंधन असतं शहाणपणाला नव्हे" नकुल आपल्या भावाची कड घेत म्हणाला. हा टोला आपल्यालाच आहे हे न समजण्याइतका अर्जुन काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. (क्रमशः)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1377
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया