Skip to main content

कधी थांबणार हा क्रूरपणा???????

लेखक श्रीगुरुजी यांनी शुक्रवार, 20/01/2017 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
काय वेडेपणा चाललाय! सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली जालिकट्टू नावाची क्रूर प्रथा पुन्हा एकदा सुरू करावी यासाठी तामिळींचा जीव चाललाय. काही ठिकाणी बंदी झुगारून जालिकट्टू आयोजित करण्याचे प्रयत्न झाले. पण पोलिसांनी ते हाणून पाडले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम् यांनी तर केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झुगारून जालिकट्टू पुन्हा सुरू करण्याचा अध्यादेश काढावा अशी विनंती करण्यासाठी थेट दिल्ली गाठून पंतप्रधान मोदींची भेट घेतली. सर्वात वाईट भाग म्हणजे संगीतकार रहमान, माजी जागतिक बुद्धीबळ विश्वविजेता विश्वनाथन् आनंद याने सुद्धा जालिकट्टू पुन्हा सुरु करण्यासाठी पाठिंबा दिलाय. ही आमची अत्यंत जुनी परंपरा आहे, आम्ही ती चालू ठेवणारच, आमच्या परंपरेवर बंदी घालण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला कोणी दिला अश्या आविर्भावात निदर्शने सुरू आहेत. जालिकट्टू तामिळींच्या जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे. जुनी परंपरा, प्रथा इ. गोष्टी खर्‍या असल्या तरी असल्या प्रथेत मुक्या प्राण्याचा छळ होतोय त्याचं काय? ते बैल काय स्वतः यातना सहन करून तुमची करमणू़क करण्याकरता या जगात आलेत का? एका वाहिनीवर दाखवित होते. एका बैलाभोवती सातआठ लुंगीधारी उभे होते. त्यातला एकजण बैलाची शेपटी ओढून जोरात पिरगाळत होता. दुसरा एकजण शेपटी दाताखाली धरून चावत होता. अरे कशासाठी त्या बैलाला यातना देता? परंपरा आणि प्रथा म्हणून? ही कसली क्रूर परंपरा? मुक्या प्राण्याला यातना देऊन कसली आलीय करमणू़क आणि प्रथा? अंगात एवढी मस्ती असेल तर एकमेकांशी फ्रीस्टाईल कुस्त्या खेळा की. प्राण्यांचा छळ का करता? स्वतःच्या जिव्हालौल्यासाठी व करमणुकीसाठी मुक्या प्राण्यांना यातना देऊन त्यांचा छळ करण्याची प्रथा व परंपरा खूप जुनी आहे व जगात अनेक देशात ती अजून जिवंत आहे. स्पेनमध्ये बुलफाईट प्रकारात एका बैलाला गल्लीबोळातून पळविले जाते. अनेक जण बैलाच्या मागे पळून त्याला जखमी करायचा प्रयत्न करीत असतात. बैल पळताना बाजूला उभे असलेले बघ्ये बैलाला छोटे बाणाच्या आकाराचे लोखंडी भाले फेकून मारतात. अंगात ठिकठिकाणी भाले घुसलेला तो बैल शेवटी बुलफाईटच्या मैदानात येतो. तिथे तलवारी घेऊन तीनचार जण त्याला तलवारीने जखमी करतात. शेवटी मुख्य मॅटॅडोर येतो व जीवाच्या भीतिने आकांताने धावून थकलेल्या, तलवारीच्या वारांमुळे व अंगात घुसलेल्या भाल्यांच्या जखमांच्या यातनांनी कळवळणार्‍या बैलाचे मस्तक तो तलवारीच्या एका घावात घडावेगळे करतो. जमलेले हजारो प्रेक्षक या मुक्या प्राण्याच्या यातनामय कत्तलीचा आनंद लुटत असतात. मुक्या प्राण्याला इतक्या यातना देताना आनंद कसा मिळू शकतो? वेदनांनी कळवणार्‍या बैलाच्या वेदनांनी करमणूक कशी होऊ शकते? भारत देखील या घॄणास्पद प्रकारापासून दूर नाही. शेतीसाठी बैल वापरण्याआधी मोठ्या दांडक्याने बैलाचे वृषण चेचून भुगा करून टाकतात जेणेकरून तो गायीबरोबर आपले नैसर्गिक कृत्य करू शकणार नाही. माणूस त्याची नैसर्गिक उर्मीसुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी नष्ट करतो व तीसुद्धा अत्यंत वेदनादायक पद्धतीने. उर्मिला पवार यांच्या 'आयदान' पुस्तकात बैलाच्या खच्चीकरणाचे वर्णन दिले आहे. दांडक्याने वृषण चेचले जात असताना बैलाला किती यातना होत असतील. माणूस त्याला एवढ्या यातना का देतो? बैलाचे वृषण खच्ची करण्याचे काम करणार्‍या नराधमाचे वृषणही असेच चेचून काढले पाहिजेत म्हणजे त्याला त्या यातना कशा असतील ते कळेल. बैलगाडीला जोडण्यासाठी बैलांच्या तळपायात खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविण्यासाठी आधी बैलाला खाली बसवून आडवे पाडतात व त्याचे चारही पाय बांधून मग खिळे ठोकून नाल बसवितात. नाल बसविताना बैलाच्या डोळ्यातून वेदनांनी पाणी वाहत असते. कशासाठी हा क्रूरपणा? मला कधी कधी वाटते की बैलांच्या तळतळाटामुळेच कदाचित शेतकर्‍यांची हलाखीची परिस्थिती असावी. आपल्याला यातना देणार्‍याला बैलांचे शिव्याशाप भोवत असतील. काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये झालेली'पारंपारिक' मेंढ्यांची टक्कर दाखवित होते. जमलेले प्रेक्षक दोन मेंढ्यांच्या आपापसातील टकरीचा आनंद लुटत होते. दोन्ही मेंढे आपल्या पूर्ण ताकदीनिशी दुसर्‍याच्या कपाळावर जोरदार धडक मारत होते. दोघांनाही वेदना होत असणारच. कदाचित कपाळाची हाडेही मोडत असतील. आणि असल्या क्रूर प्रकाराचा प्रेक्षक आनंद लुटत होते. काही ठिकाणी कोंबड्यांची झुंज सुद्द्धा लावतात. या झुंजीत कोंबड्याच्या एका पायाला ब्लेडचा अर्धा तुकडा बांधलेला असतो जेणेकरून समोरच्या कोंबड्याचे रक्त निघेल. दोन्ही कोंबडे मूर्खासारखे एकमेकांशी लढाई करून जखमी होतात व माणसे आपली करमणूक करून घेतात. बैलगाडी शर्यत हा असाच एक क्रूर प्रकार. सुदैवाने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकाराला सुद्धा बंदी घातली आहे. तरीसुद्धा बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू करावी यासाठी महाराष्ट्रात जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या शर्यतीतही बैलांना जोरात पळविण्यासाठी शेपटी पिरगाळणे, खिळा लावलेल्या चाबकाचे फटकारे लावणे असे क्रूर प्रकार केले जातात आणि वेदना होत असताना भीतिने बैल जोरात गाडी पळवितात कारण आपली उच्च प्रथा आणि परंपरा! नवसासाठी व धार्मिक परंपरेसाठी कोंबड्या, बकर्‍या कापणे हा प्राण्यांना यातना देण्याचाच एक प्रकार. हे बळी थांबावेत म्हणून संत गाडगेबाबांनी प्रबोधन करण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु अजूनही हा प्रकार सुरूच आहे. मांग जातीत एखाद्याचे लग्न ठरताना किंवा त्याआधी काही वर्षे लग्नासाठी नवर्‍यामुलाच्या नावाने एक डुक्कर सोडले जाते. ऐन लग्नाच्या वेळी हे डुक्कर पकडून त्याला जिवंत जाळून त्याचे मांस खाल्ले जाते. जिवंत जळताना त्या डुकराला किती भयानक वेदना होत असतील. प्रथा व परंपरा या नावाखाली हे क्रूर प्रकार कायमच सुरू राहणार का? जिव्हालौल्यासाठी जिवंत प्राणी क्रूर पद्धतीने मारणे हे जगभर सर्वत्र केले जाते. कासव, शिंपले, बेडूक, खेकडे इ. प्राण्यांना जिवंतपणीच उकळत्या पाण्यात टाकणे, बदक/हंस इ. प्राण्यांची आत असलेली मान बाहेर काढण्यासाठी त्याच्या तोंडासमोर खाणे धरणे व खाणे खाण्यासाठी त्याने मान सरळ केल्यावर मानेवर घाव घालून त्यांना मारणे अशा क्रूर पद्धतीने हे प्राणी जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मारले जातात. अरे प्राणी मारायचा असेल तर निदान त्या प्राण्याला भूल देऊन वीजेचा शॉक देऊन वेदनारहीत मरण तरी द्या. हालहाल कशाला करता? मुक्या प्राण्यांना प्रथा व परंपरेच्या नावाखाली आपल्या करमणुकीसाठी व जिव्हालौल्यासाठी वेदना, यातना देऊन त्यांचा छळ करणे व नंतर मारून टाकणे हे अत्यंत क्रूरकर्म आहे व या प्रकाराचा मला अतिशय संताप येतो. हे सर्व प्रकार तातडीने कायमस्वरूपी बंद व्हायला हवेत. सुदैवाने सर्वोच्च न्यायालय याविषयी सक्रीय असून या प्रकाराला कायद्याने बंदी घालण्यात येत आहे ही समाधानाची गोष्ट आहे.

वाचने 74908
प्रतिक्रिया 282

प्रतिक्रिया

In reply to by चिनार

क्ऱुपया २ अनरिलेटेड गोष्टी मिक्स करू नका. पुनरुत्पादन कुणी 'करायला लावायची ' गरज नाही. मनोरंजनाकरताचे दुसऱ्या प्राण्यावर केलेले अत्याचार प्रकृती नसून विकृती आहेत. गाढवाला पाणी पाजणाऱ्या नाथांच्या महाराष्ट्रात अजूनही ही चर्चा व्हावी - हेच वाईट आहे

या खेपेला गुर्जींचा स्टान्स अजिबातच पटलेला नाही. अगदी जैन मुनींसारखेच वाटत आहे. श्वास घेताना सुद्धा अनेक सूक्षम्जंतू मरतात.

आपण लिहीलेल्या लेखा बाबत मि असहमत आहे. बैलंचि शर्यत ही खास बैलाकडूंन केलि जाते. या बैलाना इत र कोणतेही काम लावले जात नाही. तसेच त्याना मारहांन केलि जात नही. या शर्यति चा हा नियम आहे. आपन शेति व पाळीव जनावरा बाबत किति माहिती आहे या बाबत शंका आहे. बैलांचे खच्चीकरंन है योग्य मानसाकडूंन केले जाते.

In reply to by Ranapratap

येस मागं आपुन सकाळ ऍग्रो वन मंदी एक न्यूज वाचला होता, जुन्नर साईडला एक रेसिंगच्या बैल समथिंग 15 का 20 लॅक्स ला विकला गेला हुता. तेच्या ओनर ने सांगितला हुता रोज त्येला वन केजी व्हाईट बटर (लोणी) ओन्ली शोल्डर मालिशला युज होत असे. त्येंचा डायट बी लैच रिच हुता, तवा त्येंनी रेस मंदी पळावे म्हणूनश्यांनी त्येंना लैच ओप्रेशन सहन कराया लागते असा काय नाय.

क्रूरपणाची उदाहरणे खूप सापडतील, तेव्हा खरंच कोणकोणता क्रूरपणा थांबवावा असं होऊन जाईल.. शेतीमधे किटक, कृमी आणि अळ्या मारायला जबरदस्त औषधे असतात. जबरदस्त म्हणजे ती काम कशी करतात हे बघायचे. साधारणपणे घरात झुरळांवर, मुंग्यांवर हिट स्प्रे केलं की ते तडफडून मरतात असं आपल्या डोळ्यांनी दिसतं. शेतातल्या किटक-कृमी-अळ्यांवर जी औषधे काम करतात त्यात दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे सिस्टेमिक (आंतरप्रवाही) व दुसरा कॉन्टॅक्ट (स्पर्शजन्य). आपण घरात जे हिट स्प्रे वापरतो तो सिन्थेटिक पेस्टिसाईड ह्या प्रकारात येतो. ह्यात किटकाच्या रंध्रांमधून रासायनिक पदार्थ थेट आत शरिरात घुसतात व त्याच्या मज्जातंतूंवर हल्ला करुन त्यांचे काम थांबवतात, जीवंत राहण्यासाठी चालू असलेल्या सर्व क्रिया बंद पडतात. एक जीव असा तडफड तडफड करत मरुन जातो. सिस्टेमिक म्हणजे हे औषध झाडांमधे शोषले जाते, झाडांच्या रसवाहिन्यांमधून फिरुन ते पेशीपेशींपर्यंत पोचते, मग अळी-किटक कुठलाही भाग तोडून खाऊ लागले की हे औषध त्यांच्या पोटात जाते व त्याच्या चेतासंस्थेवर घातक परिणाम करुन त्यांना पॅरालाइज करतं. लुळं पडल्याने किटक-अळी काही खाऊ शकत नाहीत व उपासमारीने त्यांचा मृत्यू होतो. (ही किटकनाशके रोप व फळांमधे तशीच राहतात व धूवून जात नाहीत हे विशेष. त्यांचे रेसिड्यू सापडतात व ते मनुष्यास कॅन्सर करतील इतपत हानिकारक असू शकतात. झाडांना दिल्यावर ही ४० दिवसांपर्यंत झाडांमधे राहू शकतात. ) कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्शजन्य किटकनाशके थेट किटकांच्या शरिरात प्रवेश करतात, धमन्यांतून सर्व शरिरात प्रवाहित होऊन मेंदूवर आघात करतात, पॅरालाइज होऊन किटक खाऊ शकत नाही व मरतात. (ही किटकनाशके धुवून निघून जातात, मनुष्यास तसा थेट त्रास शक्यतो होत नाही.) मी ज्या सेंद्रीय औषधांसोबत काम केलंय त्यांची मोड ऑफ अ‍ॅक्शन ह्यापेक्षा थोडी वेगळी होती, पानांवर फवारले असता पानांचा भाग कुरडणार्‍या अळीचा तोंडाचा भाग सूजून येतो व ती काही खाऊ शकत नाही, उपाशीच फिरत राहते व दोन-ते-चार दिवसात प्रचंड उपासमारीने तिचे मरण ओढवते. (ह्याचे झाडांवर व माणसांवर परिणाम होत नाहीत.) अजून एक प्रकार म्हणजे प्रीडेटर स्पीसिज, ज्या किटकांचा प्रादुर्भाव झालाय त्या किटकांना खाद्य म्हणून वापरणारे किटक-पक्षी-कृमी आणून सोडणे. ह्यात प्रीडेटर सुखाने बागडत असलेल्या कृमी-किटकांवर निर्मम हल्ला करतात त्यांचे नैसर्गिक इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याआधीच मारले जातात. हे सगळं मनुष्य आपल्या स्वार्थासाठी घडवून आणतो. अशा अनेक मोड ऑफ अ‍ॅक्शन असतात ज्यावर खूप विचार संशोधन करुन किटकाला कसे मारायचे ह्याची औषधे तयार होतात आणि वापरली जातात. किटक-कृमींना त्यांचे नैसर्गिक हक्क न देता जीव घेतला जातो. तसेच झाडा-झुडपांनाही अनैसर्गिक रित्या वाढवून, अत्याचार करुन जास्त फळे, फुले काढायला भाग पाडलं जातं. गाईला दूधासाठी इण्जेक्शन देण्याची कथा तशाच झाडांनाही बर्‍याच यातना असतात. तरीही लोक शाकाहाराची इतकी भलामण करतात की बस.... त्यामुळे दृष्टीआड सृष्टी असलेली बरी असते. =))

मुक्या प्राण्यांना प्रथा व परंपरेच्या नावाखाली आपल्या करमणुकीसाठी व जिव्हालौल्यासाठी वेदना, यातना देऊन त्यांचा छळ करणे व नंतर मारून टाकणे हे अत्यंत क्रूरकर्म आहे व या प्रकाराचा मला अतिशय संताप येतो.
मलाही संताप येतो. पण मी दुग्धजन्य पदार्थ आहारात वापरतो. गायी-म्हशींचे दुध काढत असतांना त्यांना यातना होत असाव्यात. या गायी-म्हशींना रोज सहन कराव्या लागणार्‍या यातनांपेक्षा 'छळ करणे व नंतर मारून टाकणे' हे नैतिकदृष्ट्या अधिक सरस किंवा कसे हे मला माहीत नाही. त्यामुळे मी नैतिक श्रेष्ठत्वाची भुमिका घेऊ इच्छित नाही. तुमच्या लेखात तुम्ही ते श्रेष्ठत्व घेतलेले दिसते हे मला जाणवले. तुम्ही कुठल्याही प्राण्याला यातना न होता तुमचे आजपर्यंतचे जीवन व्यतित केले आहे हे पाहून तुमचे कौतुक वाटते.

त्येनला हारत असलेल्या डिबेट मंदी बी स्कोर करायचा असल .तेच्यामुळं त्ये डास बी मारत नसल्याचे स्टेट करत असेल नी. बिज्या तर काय रिजन दिसत नाय :P .

जल्ली कस्ली परंपरा पण सर्वोच्च न्यायालयात विरोधी निकाल देणार साहेब हिंदीभाषिक नसला म्हणजे मिळवली. नाहीतर काही अण्णा लोक्स परत हिंदीविरोधाचे राजकारण करायला पण मागेपुढे पाहणार नाहीत.

तामिळनाडू सरकारने जल्लीकट्टूवर काढलेल्या अध्यादेशाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. राष्ट्रपतींनी त्यावर काही आक्षेप घेतले नाहीत तर जल्लीकट्टू अधिकृतपणे साजरा करता येईल. या प्रकारात बैलांचा खरोखरच अमानुष छळ होत आहे का की नेहमीप्रमाणे पुरोगाम्यांनी हे मीठमसाला लावून चित्र उभे केले आहे हे समजायला मार्ग नाही. काहीही झाले तरी प्राण्यांचा छळ होऊ नये हे नक्कीच वाटते. पण त्याचबरोबर हा प्रकार करणारे सगळे शेतकरी मूर्खच हे चित्र मिडियामध्ये उभे केले जात आहे ते योग्य आहे का हे पण तपासून बघायचा काहीतरी मार्ग हवा असे पण वाटते. (एक प्राणीप्रेमी) ट्रुमन

In reply to by गॅरी ट्रुमन

सर्वोच्च न्यायालयात निर्णय प्रलंबित असताना केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पहायला हवी होती. त्याऐवजी तामिळींच्या दबावाखाली येऊन जालिकट्टूला परवानगी देण्याच्या अध्यादेशाला हिरवा कंदील दाखविला. भाजपला तसेही तामिळनाडूत फारसे स्थान नाही व भविष्यात तामिळनाडूतून भरघोस खासदार/आमदार निवडून येण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे अध्यादेशाला पाठिंबा देऊन भाजपला निवडणुकीत नारळच मिळणार आहे. त्यामुळे अध्यादेशाला विरोध करून निदान उच्च नैतिक भूमिका तरी घेता आली असती. परंतु अध्यादेशाला केंद्र सरकारने दबावाखाली पाठिंबा दिलेला अजिबात आवडलेला नाही. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे विचारी व संतुलित विचारांचे आहेत. ते दबावाखाली या अध्यादेशावर सही करणार नाहीत अशी अपेक्षा आहे. जर त्यांनी देखील या अध्यादेशाला मान्यता दिली, तरी सुद्धा पेटा किंवा इतर काही प्राणीप्रेमी संघटना तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन अध्यादेशाला स्थगिती मिळवतील अशी दाट शक्यता आहे. एकंदरीत यावर्षी तरी जालिकट्टूला कायदेशीर मान्यता मिळणे अवघड आहे. जालिकट्टूला परवानगी मिळावी यासाठी तामिळींचा जीव चालला आहे. जालिकट्टू हा त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे. सुशिक्षित व आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळविलेले विश्वनाथन् आनंद, ए आर रहमान, श्री श्री रविशंकर, कमल हासन, रविचंद्रन अश्विन इ. आंतरराष्ट्रीय कलाकार, खेळाडू सुद्धा प्राण्यांचा छ्ळ करण्याच्या या प्रकाराचे परंपरेच्या नावाखाली समर्थन करताहेत ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. हिंदू उत्सवांमध्ये, जत्रेमध्ये केल्या जाणार्‍या प्राणीहत्येविरूद्ध कायम आवाज उठविणारे अंनिसवाले सुद्धा मूग गिळून गप्प आहेत.

मुळात जल्लीकट्टू किंवा बैल गाड्याच्या शर्यती ह्या ग्रामीण शेतकऱ्यांच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे, त्यामुळे हे खेळ परत चालू झाले पाहिजेत. मी लहानपणापासून गावी बैल गाड्यांच्या शर्यती पाहत आलोय , त्यात जसा पैसा आणि बक्षीस ह्या गोष्टी येवू लागल्या तसे थोडी फार क्रूरता येवू लागली. मात्र ह्या क्रूर गोष्टीवर बंदी घालून हे खेळ परत चालू करायला हवेतच. कारण ह्या गोष्टी करणारे लोक अपवादात्मक आहेत आणि बैलांची काळजी घेणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच बैलांच्या बाबतीत केल्या जाणार्या काही प्रकारना काही कारणे आहेत अन्यथा त्यांची शेतीची उपयोगिता कमी होईल. तसेच आजच्या जागतिकीकरणाच्या आणि भांडवलशाहीच्या जमान्यात शेतकरी सुधा त्यांच्या नफ्या तोट्याचा विचार करणार च, म्हातार्या बैल किंवा गाई ला विकण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीच. खर्या प्राणीप्रेमी संस्थांनी शेतकरी क्रूर आहे असे समजून हि म्हातारी जनावरे सांभाळावीत. बैलांना त्रास होतोय म्हणून ट्रक्टर वापरा म्हणणारी मंडळी मला आधुनिक शेतीचे जनक वाटतायत, हि लोक उद्या स्वताच्या धान्याची पक्ष्यापासून सुरक्षा करणाऱ्या शेतकऱ्याला हि क्रूर ठरवतील. शेतीचे नुकसान करणाऱ्या माकडांना हटवणार किंवा हाकलणार्या शेतकर्यांना हि क्रूर ठरवतील. खर्या प्राणीप्रेमी लोकांचा आदर राखून एवड सांगतो प्राणी आणि निसर्गाची इतर अनेक गंभीर प्रश्न आहेत त्याचा जरूर विचार करावा. कालच महारष्ट्रात काही वाघ आणि बिबटे मारल्याची बातमी वाचलीय. अवांतर> जल्लीकट्टू मिळणारे समर्थन फक्त खेळ सुरु करावा म्हणून नाहीये, अनेक तमिळ शहरी लोकांनी हा खेळ पहिला सुधा नाही. It is matter of tamil pride. लोकांना तामिळनाडू बाहेरची शक्ती (भलेही ती सर्वोच न्यायालय का असेना) तमिळ परंपरा बंद करतेय याचा राग आलाय. माझा एक मित्र ह्या आंदोलनात भाग घेता यावा म्हणुन त्याची planned holiday पुढच्या महिन्यापासून असून सुधा आता गेलाय.

In reply to by अमितदादा

संस्कृतीच्या नावाखाली मुक्या प्राण्यांचे हाल करणे किंवा त्यांचा छळ करणे निषेधार्ह आहे. या प्रकारात थोडीफार क्रूरता म्हणजे किती प्रमाणात क्रूरता चालू शकेल? शर्यतीत धावणार्‍या बैलांना दारू पाजून पळविणे, गाडी पळविताना शेपटी पिरगाळणे, बारीक खिळे लावलेल्या चाबकांचा वापर करणे, जोरात धावण्यासाठी टाचण्या किंवा पिना टोचणे इतपत क्रूरता चालेल का? गावाकडच्या लोकांना शर्यतीची एवढी आवड असेल तर गावातल्या धट्ट्याकट्टया तरूणांना गाडीला जुंपावे व त्यांची शर्यत लावावी. आपल्या आनंदासाठी बैलांचा छळ कशासाठी? जालिकट्टूची कालच एक चित्रफीत पाहिली. त्यात पळणार्‍या बैलाची शेपटी वारंवार पिरगाळताना दिसत होते. एका भागात दोन बैल एकत्र येऊन एकत्र झुंझायला लागल्यावर त्यांना बाजूला करण्यासाठी त्यांच्या डोळ्यात माती फेकताना दिसत होते. जालिकट्टूत धावणार्‍या बैलांना दारू पाजणे, डोळ्यात तिखट टाकणे इ. प्रकार केले जातात असे वाचनात आले आहे. तामिळींना जालिकट्टू हा अस्मितेचा प्रश्न केलाय यात काहीच नवल नाही. कोणत्याही प्रश्नावर जनमत समर्थन मिळविण्यासाठी त्याला प्रादेशिक अस्मितेची फोडणी देणे हे नवीन नाही. दहीहंडीवर न्यायालयाने अनेक निर्बंध लादल्यावर त्याला महाराष्ट्रीयन अस्मितेची जोड देण्याचे प्रकार झाले होतेच. जालिकट्टू त्याला कसा अपवाद असणार?

In reply to by श्रीगुरुजी

या प्रकारात थोडीफार क्रूरता म्हणजे किती प्रमाणात क्रूरता चालू शकेल? शर्यतीत धावणार्‍या बैलांना दारू पाजून पळविणे, गाडी पळविताना शेपटी पिरगाळणे, बारीक खिळे लावलेल्या चाबकांचा वापर करणे, जोरात धावण्यासाठी टाचण्या किंवा पिना टोचणे इतपत क्रूरता चालेल का?
अहो ह्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी नाही होत हो उगाच generalization करू नका, मी बैलांच्या शर्यती वरील गोष्टी न करता आणि करता, दोन्ही पद्धतीने पाहिलेल्या आहेत. आणि जिथे ह्या गोष्टी होतात तिथे यांना पूर्ण बंदी घालून शर्यती खेळवल्या पाहिजेत. क्रूरतेचा हि अतिरेक नको आणि तथाकथित प्राणीप्रेमाचा हि अतिरेक नको, खेळ हा खेळ राहूदे.
गावाकडच्या लोकांना शर्यतीची एवढी आवड असेल तर गावातल्या धट्ट्याकट्टया तरूणांना गाडीला जुंपावे व त्यांची शर्यत लावावी. आपल्या आनंदासाठी बैलांचा छळ कशासाठी?
याबद्दल काही प्रतिवाद करत नाही, फक्त आश्चर्य व्यक्त करतो. बोकड आणि कोंबडी कापनार्याना तुम्ही काय सल्ला द्याल याचा विचार करतोय मी सध्या. उगाच अतिरेकी भावनिक मुद्दे मांडू नका.
दहीहंडीवर न्यायालयाने अनेक निर्बंध लादल्यावर त्याला महाराष्ट्रीयन अस्मितेची जोड देण्याचे प्रकार झाले होतेच.
प्रत्येक खेळातील धोकादायक गोष्टी, क्रूरता कमी करून खेळ हा खेळ आपण ठेवू शकतो, न्यायालयाने हि दहीहंडी बंद नाही केली त्यावर निर्बंध घातले तसेच निर्बंध घालून जालिकट्टू आणि बैल गाडी च्या शर्यती सुरु झाल्या पाहिजेत अस ठाम मत आहे.

In reply to by अमितदादा

बोकड आणि कोंबडी कापनार्याना तुम्ही काय सल्ला द्याल याचा विचार करतोय मी सध्या.
हा प्रश्न कोणी श्रीगुरूजींना विचारू शकेल असे स्वप्न जरी पडले असते तरी त्यावर विश्वास ठेवला नसता :)

In reply to by अमितदादा

अहो ह्या गोष्टी प्रत्येक ठिकाणी नाही होत हो उगाच generalization करू नका, मी बैलांच्या शर्यती वरील गोष्टी न करता आणि करता, दोन्ही पद्धतीने पाहिलेल्या आहेत.
हा युक्तीवाद म्हणजे दारू पिऊन काही सगळ्यांचीच लिव्हर खराब होत नाही किंवा तंबाखू/सिगरेटमुळे सगळ्यांनाच काही कॅन्सर होत नाही अशा युक्तिवादासारखा आहे.
आणि जिथे ह्या गोष्टी होतात तिथे यांना पूर्ण बंदी घालून शर्यती खेळवल्या पाहिजेत. क्रूरतेचा हि अतिरेक नको आणि तथाकथित प्राणीप्रेमाचा हि अतिरेक नको, खेळ हा खेळ राहूदे.
अशा गोष्टी नियमितपणे घाऊक प्रमाणात होतात याविषयी न्यायालयाची खात्री झाल्यानेच यावर बंदी घातली गेली आहे. जर एखाद्या तुरळक ठिकाणी क्वचित असे होत असते तर न्यायालयाला बंदी घालावीच लागली नसती.
याबद्दल काही प्रतिवाद करत नाही, फक्त आश्चर्य व्यक्त करतो. बोकड आणि कोंबडी कापनार्याना तुम्ही काय सल्ला द्याल याचा विचार करतोय मी सध्या. उगाच अतिरेकी भावनिक मुद्दे मांडू नका.
अजिबात कापू नका किंवा कोणत्याही प्रकारे त्यांना मारू नका हाच सल्ला मी देईन.
प्रत्येक खेळातील धोकादायक गोष्टी, क्रूरता कमी करून खेळ हा खेळ आपण ठेवू शकतो, न्यायालयाने हि दहीहंडी बंद नाही केली त्यावर निर्बंध घातले तसेच निर्बंध घालून जालिकट्टू आणि बैल गाडी च्या शर्यती सुरु झाल्या पाहिजेत अस ठाम मत आहे.
दहीहंडीत प्राण्यांचा सहभाग नसतो आणि दहीहंडीत फक्त माणसांचा सहभाग असल्याने व तो ऐच्छिक असल्याने आणि मानवाला आपले बरेवाईट समजण्याचे तारतम्य व बुद्धी असल्यानेच न्यायालयाने पूर्ण बंदी न घालता निर्बंध घातले. जलीकट्टू किंवा बैलगाडा शर्यतीतील प्राण्यांचा सहभाग सक्तीचा असतो. सहभागी न होण्याचा, छळ होऊ न देण्याचा पर्याय त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे त्यावर बंदी आवश्यक आहे. बादवे, जलिकट्टू माणसांसाठी सुद्धा धोकादायक आहे. कालच वाचलेल्या एका वृत्तानुसार मागील सहा वर्षात जलिकट्टूमध्ये १४ लोकांचे प्राण गेले आहेत व किमान १००० जण जखमी झाले आहेत. हा प्रकार मानव व प्राणी या दोघांसाठीही वाईट आहे.

In reply to by श्रीगुरुजी

असो शेवटी हे तुमच मत आहे, त्याच्याशी मी सहमत नाही. लवकरच बैलांच्या शर्यती वरील बंदी उठेल अशी आशा आहे.
अजिबात कापू नका किंवा कोणत्याही प्रकारे त्यांना मारू नका हाच सल्ला मी देईन.
मग असाच सल्ला द्यायचा ना बैल गाडीच्या समर्थकांना, त्यांना तरुण मुलांना जुपा असे अतिरेकी सल्ले देताय यावरून तुमचे बैल प्रेम दिसून येते मात्र मनुष्य द्वेष दिसून येतो :)). बैलांच्या भावनांचा विचार करताय लोकांच्या हि करा थोडा :)) संघाला आता गाई बरोबर बैल पण पूजनीय झाले कि काय (हलके घ्या)

In reply to by अमितदादा

बैलांच्या शर्यतीवरील बंदी कधीही उठविली जाणार नाही अशी मला आशा आहे. मी दिलेल्या अतिरेकी सल्ल्यातील उपहास तुमच्या लक्षात आलेला दिसत नाही. मी इथे जे विचार मांडलेत त्या विचारांचा व संघाचा काहीही संबंध नाही. हे माझे विचार आहेत. माझे विचार संघ ठरवित नाही किंवा संघाचे विचार मी आंधळेपणाने फॉलो करीत नाही. या विषयाबद्दल संघाचे काय विचार आहेत त्याच्याशी मला कर्तव्य नाही. संघाने किंवा मोदींनी सुद्धा जालीकट्टू किंवा बैलांच्या शर्यतीला पाठिंबा दिला तरी माझा क्रूर प्रकारांना विरोध कायम राहील.

In reply to by श्रीगुरुजी

अहो गुरुजी मी हि उपहासच केला होता..मलाही माहित आहे कि संघाचा ह्या विषयाशी संबंध नाहीये, तसेच तुमच ते वाक्य सुद्धा जास्त स्ट्रेस करायची गरज नाही. असो तुम्ही तुमचा मताशी ठाम आहात मी माझ्या, त्यामुळे चर्चा इथेच थांबवतो. एक मात्र नक्की बैल गाड्यावरील बंदी नक्की उठणार काही निर्बंध घालून.

जल्लीकट्टूला विरोध = हिंदूंच्या परंपरांना विरोध !!! (म्हणजे हिंदुविरोधी) जल्लीकट्टूका पाठिंबा = गोवंशाच्या सदस्यांच्या छळाला पाठिंबा (म्हणजे पुन्हा हिंदुविरोधी) आता काय करावे बुवा?

In reply to by नितिन थत्ते

मी इथे हिंदूविरोधी/हिंदूसमर्थक किंवा हिंदू/अहिंदू इ. चष्म्यातून बघतच नाही. प्राणी व पक्ष्यांचा छळ कोणाकडूनही होत असेल तरी माझा त्याला विरोधच आहे. मग ते जालिकट्टू असो किंवा बैलगाडी शर्यत असो किंवा गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत बैलांकडून ओढले जाणारे गणेशाचे रथ असो किंवा शेतकर्‍यांकडून होणारे बैलांचे खच्चीकरण असो किंवा बैलांचा पायात खिळे ठोकून नाल ठोकणे असो किंवा शर्यतीत पळविले जाणारे घोडे असो किंवा जत्रेत बळी दिले जाणारे प्राणी असो किंवा इदला कापले जाणारे बकरे असो . . . ज्या प्रकारात मनोरंजनासाठी, परंपरेसाठी, जिव्हालौल्यासाठी प्राणी किंवा पक्ष्यांचा छळ होतो किंवा त्यांचे हाल केले जातात, त्या सर्व प्रकारांना माझा विरोध आहे.

श्रीगुरुजी,भाजप काँग्रेस ब्राह्मण ब्राह्मणेत्तर वाद गेला खड्ड्यात,या तुमच्या धाग्याला सलाम ,अगदी माझ्या मनातल्या भावना मांडल्या आहेत.मी स्वतः ग्रामिण भागात राहात असल्याने हे अत्याचार रोज बघतो,कधीकधी मांसाहारी असल्याने स्वतःचीच चीड येते. आमच्या भागात कडक्डत्या उन्हात बैलगाडीत खच्चून ऊस भरतात व बैलाला जुंपतात,अक्षरषः फेस येतो त्यांच्या तोंडातुन,पाय मोडतात क्ववीत.ह्या विषयाला वाचा फोडल्याबद्दल धन्यवाद (माहीतीसाठी- मी पेटा संघटनेचा स्वयंसेवक आहे,व या क्रुर प्रथांविरोधात जागृती करत असतो)

In reply to by टर्बोचार्जड फिलॉसॉफर

मांसाहाराची लागलेली चटक कशी सोडवावी????? या धाग्यात काहि प्राण्यांची शिकार केल्याचं तुम्ही लिहिलेलं आठवतय..

बैंलांचे खच्चीकरण हे नक्की केव्हा पासुन चालु आहे ? म्हणजे आधीच्या काळात असे केले जात होते काय ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- माशा अल्लाह माशा अल्लाह :- Asmara { اسمرا - ماشالله } { वरिजिनल ;) }

१. जल्लीकट्टू बंद करण्यामागे नक्की (आणि खरी) कारणे कोणती? २. एकीकडे गोमांस भक्षण आणि विक्री (भारत अव्वल गोमांस विक्रेता आहे) चालू असताना फक्त खेळालाच बंदी का? बंदी क्रूरपणावर आणायची असेल तर कुठल्याही प्रकारचे Animal/Bird/Fish (in fact any living being) slaughter आधी बॅन करायला हवे. Slaughter चालू ठेऊन खेळावर बंदी आणणे म्हणजे एक भयानक आणि क्रूर जोक आहे. ३. प्राण्यांना इजा होत असेल तर ती होऊ नये म्हणून निर्बंध हवेत. खेळ बंद करणे हा त्यावरचा उपाय नाही. जसे क्रिकेट खेळताना चेंडू लागून आजपर्यंत असंख्य प्राण गेले आहेत पण खेळावर बंदी आली का? उलट चेंडू लागू नये म्हणून हेल्मेट/गार्ड घालणे सक्तीचे झाले. असेच इथेही करता येऊ शकते. ४. ज्या PETA ने petitions सादर केल्या त्या PETA ला bull fighting, animal slaughter, पाळीव प्राण्यांवर घराघरात होणारे अत्याचार, इत्यादी बाबींचा सोयीस्कररित्या विसर पडलेला दिसतो. या सगळ्या बाबींची कारणमीमांसा केली गेली आहे का? क्रूरपणा थांबवायचा असेल तर अवश्य थांबवा पण खेळांना क्रूरपणाचे लेबल लावून actual क्रूरपणा पाठीशी घालू नका.

In reply to by स्थितप्रज्ञ

१. जल्लीकट्टू बंद करण्यामागे नक्की (आणि खरी) कारणे कोणती?
जल्लीकट्टूत वापरण्यात येणार्‍या बैलांना मोकळे सोडण्याआधी दारू पाजण्यात येते, त्यांच्या डोळ्यात तिखटासारखे पदार्थ टाकले जातात जेणेकरून ते वेदनेने व जीवाच्या भीतिने धावत सुटतील. बैल धावत असताना त्यांच्या वशिंडाला घट्ट धरून लोंबकळत राहणे हा प्रकार या खेळात चालतो. हे करताना वशिंडाला दुखापत होण्याची शक्यता आहे. बैलाच्या आजूबाजूला अनेकांनी बैलाला घेरलेले असते. बैलाची शेपटी करकचून ओढणे, शेपटी धुण्याचा पिळा पिळल्यासारखी पिरगाळणे, शेपटी दातांनी चावणे इ. प्रकार चालतात. हे प्रकार बैलाला वेदना देणारे व हाल करणारे असल्याने सर्वोच्च न्यायालयाने यावर बंदी घातली आहे.
२. एकीकडे गोमांस भक्षण आणि विक्री (भारत अव्वल गोमांस विक्रेता आहे) चालू असताना फक्त खेळालाच बंदी का? बंदी क्रूरपणावर आणायची असेल तर कुठल्याही प्रकारचे Animal/Bird/Fish (in fact any living being) slaughter आधी बॅन करायला हवे. Slaughter चालू ठेऊन खेळावर बंदी आणणे म्हणजे एक भयानक आणि क्रूर जोक आहे.
सहमत. हे प्रकार सुद्धा बंद करायला हवेत.
३. प्राण्यांना इजा होत असेल तर ती होऊ नये म्हणून निर्बंध हवेत. खेळ बंद करणे हा त्यावरचा उपाय नाही. जसे क्रिकेट खेळताना चेंडू लागून आजपर्यंत असंख्य प्राण गेले आहेत पण खेळावर बंदी आली का? उलट चेंडू लागू नये म्हणून हेल्मेट/गार्ड घालणे सक्तीचे झाले. असेच इथेही करता येऊ शकते.
क्रिकेट खेळताना असंख्य प्राण गेले नसून प्राण गेल्याची मोजकी उदाहरणे आहेत. माणसांना क्रिकेट खेळणे किंवा न खेळणे याचा निर्णय घेण्याची सारासार बुद्धी आहे व हक्क आहे. खेळायचा निर्णय घेतल्यास जायबंदी न होण्यासाठी उपाय योजण्याचा पर्याय आहे. जल्लीकट्टूमध्ये सामील व्हायचे का नाही हा हक्क बैलांना नाही. आपले होणारे हाल व छळ सुद्धा ते थांबवू शकत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारांवर बंदीच हवी.
४. ज्या PETA ने petitions सादर केल्या त्या PETA ला bull fighting, animal slaughter, पाळीव प्राण्यांवर घराघरात होणारे अत्याचार, इत्यादी बाबींचा सोयीस्कररित्या विसर पडलेला दिसतो.
पेटाबद्दल मला तितकीशी माहिती नाही. परंतु पेटाने जिथेजिथे प्राण्यांवर अत्याचार होतात अशा सर्व ठिकाणी विरोध करावा अशी माझी अपेक्षा आहे.

काही वर्षांपूर्वी चीनमधील दोन विचित्र प्रकार वाहिन्यांवर पाहिले. चीनमध्ये म्हणे असा शोध लावला आहे की अस्वल प्राण्याचा पित्ताशयातील रस मानवाच्या अनेक रोगांवर गुणकारी असतो. हे प्रसिद्ध झाल्यानंतर चीनमधील अनेक खेड्यातील लोकांनी कोठूनतरी अस्वल पकडून आणले. नंतर त्याच्या पित्ताशयापाशी जखम करून पित्ताशयातून वाहणारा रस गोळा करण्यासाठी जखमेवर एक पिशवी बांधून ठेवली. काही ठराविक तासानंतर पिशवीत जमा झालेला रस ते कोणत्यातरी औषधी कंपनीला विकतात. या प्रकारात घरातील एखाद्या अंधार्‍या तळघरात अस्वलाला साखळदंडाने जखडून ठेवलेले असते व त्याच्या पोटावरील जखम कायम उघडी ठेवतात जेणेकरून पित्ताशयातून पाझरलेला रस पिशवीत गोळा करता येईल. एका दुसर्‍या बातमीत चीनमधील एक वाघांचे अभयारण्य दाखविले होते. त्या अभयारण्याची सहल करणारे पर्यटक एका मोठ्या व्हॅनमधून जातात. अशाच एका व्हॅनचा टपावर एक कोंबडी ठेवलेली होती. व्हॅनने अभयारण्यात प्रवेश केल्यावर आजूबाजूला असणार्‍या १०-११ वाघांपैकी एका वाघाने एका झेपेत व्हॅनच्या टपावरील कोंबडी तोंडात पकडून गट्टम् केली. एक दुसरी व्हॅन जात असताना व्हॅनच्या टपाला असलेल्या खिडकीतून एकाने एक कोंबडी हवेत फेकली. ती कोंबडी पंख फडफडत जमिनीवर उतरत असताना एका दुसर्‍या वाघाने हवेत झेप घेऊन तिचा चट्टामट्टा केला. व्हॅनमध्ये एक चिंकी आपल्या मुलाला हसतहसत टाळ्या वाजवित हे प्रेक्षणीय दृश्य दाखवित होती. नंतर त्या भागात एक डंपर आला. डंपरच्या पाठीमागच्या भागात एक बैल ठेवलेला होता. वाघांच्या गराड्याजवळ आल्यावर डंपरचालकाने डंपर थांबवून मागचा भाग उतरता केला. त्यामुळे बैल उतारावरून घसरून खाली जमिनीवर पडला. तो उठण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच्याभोवती १०-१२ वाघ जमा झाले. पुढचे सांगण्याची गरज नाही.

व्हॅनमध्ये एक चिंकी आपल्या मुलाला हसतहसत.... ????????????? श्रीगुरुजी, माझ्या माहितीप्रमाणे चिंकी हे आक्षेपार्ह संबोधन आहे.... आपला राग ठिके पण रेसिझम आवरा... विसंगती होतेय...

In reply to by संदीप डांगे

पहिल्या लिंकनुसार - चिंकी हा शब्द आक्षेपार्ह, रेसिस्ट इ. आहे सांगणार्‍या व्याख्या व अर्थ : A racist term, derived by the word "chink", to describe anyone of Eastern Asian descent (i.e. Chinese, Korean, Vietnamese, etc.). Not a "cool" term since it has been used against us in a negative fashion for centuries in the United States. Racist term used to describe anybody that is oriental. While not really as racist as it derogatory counterpart chink, it is, while not as explicit, describing the eyes of those of East Asian descent (aka China, Japan, Korea, Vietnam, the Philippines, etc.). The word usually doesn't have the same racial effect when used by two Asians, as opposed to the exchange of someone of another race (i.e: Caucasian-Asian, African American-Asian, Hispanic-Asian, etc.). An Offense To Asian People adj. "chinese-like"; when ones eyes are pointy at the corners चिंकी हा शब्द आक्षेपार्ह, रेसिस्ट इ. नाही सांगणार्‍या व्याख्या व अर्थ : To refer to Chinese food. high eyes; also a british term for chinese food A cool person who is probably of Asian origin. (adj) 1. Inferior or cheap in quality. 2. Tacky. 3. Of Chinese (or Japanese) origin. The origins of the first two arise from cheap chinese imports and older video games. One could speak of chinky graphics and music (characterized by fast-paced and tinny notes). Cold. It is the Chinese equivalent of nippy (Japanese); cold or chilly. Poorly made or of bad quality. eyes that are red and appear to be low due to smoking weed A term used to label oriental people. The term "chinky" is derived from the Chinese word "Chin", which is the name of the Chin Dynasty in China. The term "chink" was first introduced to describe the unique look of the Chinese people; particularly their long braided hair and exposed forehead. when someone is kinky and Chinese. A chinese person from mainland china as opposed to Hong Kong China. Must be understood comparatively to have said meaning. या वेगवेगळ्या व्याख्यातून व अर्थातून चिंकी हा शब्द आक्षेपार्ह, रेसिस्ट इ. आहे का नाही हे ठरविणे अवघड आहे. ___________________________________________________________________________________________ दुसर्‍या लिंकमधून - Union home minister Rajnath Singh on Friday told mediapersons that the government was considering introducing two new Sections in the IPC, Section 153-C and Section 509-A. The proposed Section 153-C relates to imputations and assertions prejudicial to human dignity and makes words, both spoken and written, or signs attempting to discriminate against individuals on the basis or race, or indulging in activity intended to use criminal force or violence against a particular race, a non-bailable offence punishable with imprisonment up to five years with fine. Stating that a final call on the above recommendations of the Bezbaruah panel, set up in February 2014 to examine concerns of north-eastern people living in different parts of the country, was yet to be taken, home minister Singh said the pros and cons of the proposed IPC amendments were being debated by the government. Once finalized, a Bill may brought in Parliament to amend the Criminal Law. The Bezbaruah panel, in its report, had noted that most common demand of northeastern people living in other parts of the country was to make derogatory references such as 'chinki'', 'chinese', 'chi chi chu chu' or 'momos' based on race, identity or physical features, a punishable offence. म्हणजे एखाद्याचा उल्लेख चिंकी असा करणे याबद्दल हा दखलपात्र गुन्हा आहे असा बदल करण्याविषयी केंद्र सरकार विचार करीत आहे. या मागणीचे कायद्यात रूपांतर झाले आहे का नाही हे मला माहिती नाही. यापूर्वी दलित, मद्रासी, हरिजन, महार इ. शब्दांना देखील आक्षेप घेण्यात आलेला होता. हे शब्द वापरणे हा गुन्हा समजावा अशी मागणी केली गेली होती. गोडसे हा शब्ददेखील असंसदीय आहे असा निर्णय देखील लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दिला होता, परंत तो निर्णय नंतर मागे घेण्यात आला होता.

In reply to by श्रीगुरुजी

चिंकी हा शब्द इशान्य भारतीयांनादेखील वापरला जातो ज्यांना तो खूप ऑफेंसिव्ह आणि रेसिस्ट वाटतो.

इथल्या लोकांचे इलॉजिकल प्रतिसाद बघुन हसावे की रडावे हे कळेनासे झाले आहे.मुक्या प्राण्याच्या बाजूनं उभे रहायचे दिले सोडून कायच्या काय आर्ग्युमेंट सुरु आहेत.तुम्ही पेस्ट कंट्रोल करता का ,डास मारता का वगैरे हास्यास्पद कमेंट आहेत. इथे गोल्डन् रुल वापरा.म्हणजे तुम्हाला तुमच्या जगण्याच्या अधिकारात हस्तक्षेप करणारे प्राणि उदां ढेकुण ,पाली, डास वगैरेंचा त्रास होत असेल तर जरुर त्यांना मारावे.पण तुमच्या वाटेला क्वचीत जाणारे प्राणी बैल,कोंबड्या,शेळी,मेंढा वगैरेंचे मनोरंजनासाठी हाल करु नये इतकेच धागकर्त्यांने मांडले आहे. मी स्वतः मांसाहारी आहे,पण मी सिंथेटिक मांस उत्पादन व शोधाच्या बाजूने आहे,सध्या गुगलचे सहसंस्थापक सिंथेटिक मांसासाठी संशोधनाला मदत करत आहते,माझे विसा कार्ड वापरुन या संशोधनासाठी दोन वर्षापुर्वी दहा डॉलर इतकी अल्पशी मदतही केली आहे या कार्यासाठी.जर असे सिंथेटिक मांस उपलब्ध झाल्यास I will definitely switch for it.

गुरूजी तुम्हाला मॅच्युरिटी कधी येणार? केवळ मनोरंजनासाठी म्हणून जर प्राण्यांना वेदनादायक त्रास होत असेल,तर ते निंदणीय आहेच,पण इथे सुद्धा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर सगळं अवलंबून असतं,परवाच मी चिकन आणायला गेलो होतो,दुकानदाराने माझ्या समोर कोंबडी कापली,मला जरा वाईट ही वाटत होते कारण लहानपणासून माझ्यावर पण विशिष्ट संस्कार झालेत,पण नंतर आणि विचार केला कि अन्नसाखळी नावाचा काहितरी प्रकार असतो कि नै?जेव्हा आपल्या भावना अधिकच सात्विक होतात तेव्हा सगळ्या गोष्टीचा राग येत असतो,पण सगळेच लोक सात्विक बनावेत हा अट्टाहास कशासाठी? राजसिक आणि तामसिक हे गुण पण आवश्यक आहेत,सात्विक अभिनिवेशातून तुम्ही सारासार विचार केला नाही.प्राण्यांना त्रास देणारे ते मूर्ख आहेत वगैरे बोलणे म्हणजे एक प्रकारची अपरिपक्वताच आहे,फाॅरेनात गायी/बैल/इतर प्राणी एका यंत्रात घालून त्यांचे धड शरीरापासून वेगळे करून मारतात नंतर सोलून मांस काढतात,आता ते सगळे प्रगत देश आहेत,त्यांनाही मूर्ख म्हणणार का? आणि जलीकट्टू च्या आडून तुम्ही तुमचा वेजेटेरिअन अजेंडा सुद्धा रेटत आहात. आणि तुम्ही मूल न होऊ देणारी जोडपी,प्रसूतीवेदना याबद्दलसुद्धा ही काहीतरी बोलत आहात,हे सगळं लिहण्यापूर्वी कोणाचा दृष्टांत वगैरे झाला कि काय? बादवे,एक कुतूहल म्हणून प्रश्न ब्रह्मचारी आहात का?

मांसाहार आणि जल्लीकट्टू/बैलगाड्या शर्यत हे एका पारड्यात मोजता येणार नाही. अन्न म्हणून प्राणी मारणं हे नक्कीच अ‍ॅक्स्पेप्टेबल आहे. सर्व प्राणिविश्वात तुम्ही दुसर्‍या सजीवाचा बळी घेतल्याशिवाय जगूच शकत नाही. सो बीफ निर्यातीवर बंदी वगैरे मुद्दे हास्यास्पद आहेत. तो जीव घेणं कमी वेदनादायक बनवू शकता येईल. मांसाहाराला नाही हलालला विरोध करायला हवा. मौज म्हणून प्राण्यांना टॉर्चर करणं किंवा अन्न नसलेल्या गरजांसाठी प्राण्यांना वापरणं यावर चर्चा होऊ शकते. लेदर/रेशीम सर्कस शेती इत्यादी...

जालिकट्टू सुरू करण्याच्या तामिळनाडू सरकारच्या अध्यादेशाला केंद्र सरकारने मान्यता देऊन तो प्रस्ताव राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे पाठविला व आजच विद्यासागर राव यांनी त्याला अनुमती दिल्यामुळे उद्या जालिकट्टू होणार अशा बातम्या आहेत. मुळात कोणत्याही अध्यादेशाला राष्ट्रपतींची संमती लागते. राज्यपाल याबाबतीत कसा निर्णय घेऊ शकतात? जालीकट्टूला परवानगी देणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मुळात कोणत्याही अध्यादेशाला राष्ट्रपतींची संमती लागते. राज्यपाल याबाबतीत कसा निर्णय घेऊ शकतात?
मी वाचलेल्या माहितीनुसार , काही वेळा राष्ट्रपती स्वताचे अधिकार होम मिनिस्ट्री कडे देवू शकतात, ह्या केस मध्ये तेच झाल आहे. सेन्ट्रल होम मिनिस्ट्री ने हा अध्यादेश आधीच संमत केलाय त्यामुळे त्याला राष्ट्रपतीच्या विशेष मंजुरीची गरज नाही.

In reply to by अमितदादा

उद्या जालिकट्टू सुरू होण्याआधीच घाईघाईत जालिकट्टूविरोधी याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून अध्यादेशाला स्थगिती आणावी अशी मनोमन इच्छा आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अहो सर्वोच न्यायालय सुद्धा या पूर्ण प्रोसेस मध्ये सामील आहे अन्यथा ह्या संधर्भातील सर्व याचिकेवरील अंतिम निर्णय केंद्र सरकार च्या विनंती वरून एका आठवड्यासाठी पुढे ढकला नसता. सरकार अध्यादेश काढून ह्या वर्षीचा खेळ पार पडणार हा अंदाज सर्वोच न्यायालयाला नसावा असे म्हणणे धाडसाचे ठरेल. एका आठवड्याने काही निकाल येवो ह्या वर्षीचे खेळ पार पडलेले असतील. पुढच्या वर्षी सरकार नवीन कायदा आणेल ज्यातून performing animal ह्या category मधून बैलांना वगळण्यात येयील आणि जल्लीकात्तू आणि बैल गाड्यांच्या शर्यतींचा मार्ग मोकळा होईल.

जल्लीकाट्टूबद्दल विरोधी मतं व्यक्त करण्याआधी ही लिंक वाचावी. जल्लीकाट्टूला विरोध करण्यामागे PETA सारख्या संघटनेचा अंतस्थ हेतू वेगळाच असणार ही शंका होतीच. ही लिंक वाचून त्यात तथ्य असल्याचं जाणवतंय. http://www.marathipizza.com/about-jalikatu-festival-and-controversy/

In reply to by बोका-ए-आझम

पटतोय हा लेख! मुळात प्राणांच्या बद्दलची भावनिकता प्रमाणाच्या बाहेर दाखवण्याची गरज नाहीये असं वाटतं. होता होईल तेवढी प्रत्यक्ष हिंसा आपल्या हातून होणार नाही याचा आटोकाट प्रयत्न करण्याची मानसिकता बाळगायला हरकत नाही. पण शेतीच्या कामासाठीपण बैलाला त्रास देऊ नये वगैरे वास्तविकतेशी धरून होणार नाही. अवांतर: मागे एकदा रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांबद्दल असंच "अपार" प्रेम दाखवणाऱ्या एका "प्राणीप्रेमी" असणाऱ्या सद्याच्या मंत्रीमहोदयाना स्टेशनवरील रेल्वेरुळाखाली मरणाऱ्या असंख्य उंदारांबाबतीत काय करणार असे विचारल्यावर निरुत्तर झाल्याचे आठवले.

In reply to by बोका-ए-आझम

जालिकट्टूवर बंदी घालण्यामागे 'पेटा'चा अंतस्थ हेतू काय आहे याला माझ्या दॄष्टीने फारसे महत्त्व नाही. वरील लेखानुसार जालिकट्टूवर बंदी घालण्यामागे आंतरराष्ट्रीय षडयंंत्र आहे. कृत्रिम गर्भधारणा करून देणार्‍या परदेशी कंपन्यांना फायदा मिळावा हा त्यामागील अंतस्थ हेतू आहे. वरील लिंकमधील खालील वाक्ये पुरेशी बोलकी आहेत. जल्लीकट्टू हा प्राण्यांवर अत्याचार करणारा खेळ तर आहेच, शिवाय ह्यात अनेकांचे प्राण ही गेले आहेत. २०१० ते २०१४ ह्या चार वर्षांत, सुमारे ११०० लोक जखमी आणि १७ लोक मृत्युमुखी पडले होते. गेल्या २ दशकांमध्ये जवळपास २०० लोक जागीच मरण पावले आहेत. जर एखाद्या खेळात २० वर्षात २०० जणांचा मृत्यु होत असेल, हजारो माणसे जखमी होत असतील व त्याचबरोबरीने बैलांवरही अत्याचार होत असतील तर अशा हिंसक प्रकारावर बंदी घालायलाच हवी. याच लिंकनुसार,
सौदे फक्त शेतावर कामासाठी लागणाऱ्या जनावरांसाठी होत नाहीत – गाईंना गाभण ठेवण्यासाठी पुष्ट बैल हवा असतो – म्हणून देखील असतात. फक्त चांगली पैदास करण्यासाठी एवढ्या तगड्या जनावरास १२ महिने पोसणं शेतकऱ्यांना अश्यक्य असतं म्हणून केवळ हंगामापुरता सौदा होतो आणि गाई गाभण रहातात.
जर गाई गाभण करणे हाच पुष्ट बैल निर्माण करण्याचा हेतू असेल तर त्यासाठी जालिकट्टूसारखा हिंसक प्रकार कशाला हवा? हा प्रकार न करतासुद्धा पुष्ट बैल तयार करता येतील व ज्या शेतकर्‍यांना अशा बैलांकडून आपल्या गाई गाभण करून हव्या असतील त्यांच्याकडून त्यासाठी किंमत लावता येईलच की. जल्लीकट्टू जर बॅन झाला तर ह्या बैलांना पोसणे थांबणार आणि त्यातून त्या जातींची पैदास थांबणार – ज्यामुळे स्थानिक जाती नामशेष होत जातील अशी भीती आंदोलक व्यक्त करत आहेत आणि म्हणून जल्लिकट्टूला विरोध होतोय. जर जल्लीकट्टू खरंच असाच बंद झालाच तर तामिळनाडूला, ह्या प्रजातींच्या जतनासाठी आणि पुनरोत्पादनासाठी कृत्रिम संयोग म्हणजे Artificial Insemination Technique (AIT) कडे वळावं लागेल. हा प्रचार म्हणजे पूर्ण अतिशयोक्ती आहे. जालिकट्टू बंद झाला म्हणून बैलांची पैदास का थांबेल? या बैलांना पोसण्याची किंमत शेतकर्‍यांकडून वसूल करता येईलच. तशीच वेळ आली तर सरकारकडूनही अनुदान लाटता येईल.
AI चा खर्च शेतकऱ्यांना परवडणारा नाही, असं जल्लीकट्टू बंदी विरोधकांचं म्हणणं आहे. शिवाय, नैसर्गिक संभोगातून संथ परंतु सतत होणारी उत्क्रांतीची प्रक्रिया AI मुळे थांबते – असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. परंतु जल्लीकट्टू बंदी कायम राहिली तर हे घडणारच आणि — ABS, Genex Cooperative अश्या अनेक AIT कंपनीजला मोठा बिझनेस मिळणार हे उघड आहे.
पायस मिल्क प्रोड्युसर कंपनीसारख्या भारतीय कंपन्या देखील कृत्रिम गर्भधारणा या क्षेत्रात आहेत. जालिकट्टूवर बंदी घालण्यामागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असून कृत्रिम गर्भधारणा करून देणार्‍या परदेशी कंपन्यांना फायदा मिळावा हा पेटाचा त्यामागील अंतस्थ हेतू आहे हा अतिरंजित आरोप क्षणभर खरा मानला तरी हा फायदा पायससारख्या भारतीय कंपन्यांनाही मिळू शकतो. जालिकट्टूवर बंदी घातली तर तगड्या बैलांची पैदासच बंद होईल हा आरोपच मुळात पोकळ आहे आणि जालिकट्टूवर बंदी घालण्यामागे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असून कृत्रिम गर्भधारणा करून देणार्‍या परदेशी कंपन्यांना फायदा मिळावा हा पेटाचा त्यामागील अंतस्थ हेतू आहे हा आरोपही अतिरंजित आहे. जालिकट्टूमध्ये होणार्‍या बैलांवरील अत्याचारांबद्दल व ते का केले जातात आणि ते कसे थांबविता येतील याबद्दल लेखकाने काहीही लिहिलेले नाही. या प्रकारात आजवर ज्या माणसांचे मृत्यु झाले, जखमी झाले यावर या लेखकाचे काहीही भाष्य नाही. हे प्रकार कसे थांबविता येतील याविषयीही लेखकाने मौन बाळगले आहे. या प्रकारात बैलांचा होणारा छळ, मानवी हानी इ. प्रकारांकडे पूर्ण दुर्लक्ष करून जालिकट्टूवर बंदी हा परदेशी कंपन्यांना फायदा मिळविण्यासाठी केलेला आंतरराष्ट्रीय कट आहे या कांगाव्यावरच संपूर्ण लेख लिहिला आहे. आजच्या युगात असल्या हिंसक प्रकाराची गरजच काय यावरही लेखकाने भाष्य केलेले नाही. एखादी प्रथा, परंपरा समाजासाठी घातक असेल तर ती प्रथा, परंपरा बंद करायला हवी. सतीप्रथा, केशवपन इ. सारख्या घातक प्रथा अशामुळेच थांबल्या. जालिकट्टू व त्याचबरोबरीने दहीहंडी, होळी पेटविणे इ. प्रकारही बंद व्हायला हवेत.

तथाकथित हिंदुत्ववाद्यांचे कसे ख्रिस्तीकरण झाले आहे ह्याचा हा चांगला पुरावा आहे. भारतीय ख्रिस्ती हिंदूच असे म्हणता म्हणता हे हिंदुत्ववादी पाश्चात्य नैतिकता कोळून पीत आहेत. तामिळ लोकांचे अभिनंदन आणि प्राणी प्रेमाच्या नावाखाली शेपूट खाली घालणाऱ्या खोट्या हिंदुत्ववाद्यांचा निषेध. जल्लीकट्टू सारखे खेळ भारतीय पेगन लोकांच्या जीवनाचा भाग आहेत. ह्यांत काही क्रूरता वगैरे नसून लोक आणि प्राणी ह्यांच्या संबंधाचा उत्सव आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. खरे तर मोदी सरकारने इथे पुढाकार घेऊन पाहिजे तर घटना दुरुस्ती आणून हिंदू प्रथांचे रक्षण करायला पाहिजे होते.

व्हॉटसअप वर आलेले एक फॉरवर्ड इथे चिकटवत आहे. मी जल्लीकट्टू समर्थक किंवा विरोधक किंवा मोदी समर्थक किंवा विरोधक नाही याची कृपया नोंद घेऊनच पुढील फॉरवर्ड वाचावा. चर्चेच्या दृष्टीने काही मुद्दे आहेत का एवढे तपासणेच हा यामागचा हेतू आहे. ------------------------------------------------- जलीकट्टू वर बंदी प्रकरण - एक फसलेले राष्ट्र विरोधी कारस्थान ! खरे तर जलीकट्टू वरून तामिळनाडू मध्ये काहीतरी चालू आहे आणि न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला काही लोक विरोध करीत आहे आणि आपला याच्याशी काही संबंध नाही असे बऱ्याच जणांना वाटते आहे. मी देखील याच भ्रमात होतो पण मी ज्या कंपनीसाठी पुण्यामधून काम करतो आहे ती तामिळनाडूची असल्यामुळे मी एकदा सहजच तेथील एकाला गमतीने विचारले आणि मी जे ऐकले ते ऐकून डोक्याला मुंग्याच आल्या ! हे प्रकरण वाटते एवढे साधे नाही हे लक्षात आले आणि प्रत्यक्ष मोदींनी लक्ष घालून सर्वोच्य न्यायालयाचा निर्णय अध्यादेशाद्वारे का फिरवला हे ध्यानात आले ! जलीकट्टू हा खरे तर तामिळनाडूचा गावागावात चालणारा एक पारंपरिक उत्सव आणि खेळ प्रकार. या वेळेस, अत्यंत उत्तम अश्या देशी बैलांचे प्रदर्शन भरवले जाते. बैलाची निगा किती उत्तम प्रकारे राखली आहे, त्याचा डौल आणि त्याचा सुधृडता हे निकष असतात. या सर्व बैलांमध्ये शर्यत लावली जाते, यावेळी बैलांबरोबर त्याच्या बाशिंडाला ( पाठीवरचा उंचवटा धरून 60 सेकंदापर्यंत त्याच्या मालकाने पळणे हे देखील एका शर्यतीचे स्वरूप असते. बैलाच्या शिंगाला नाणी बांधून ते हस्तगत करणे हे देखील यामध्ये सामील असते. या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे वर्षभर बैल आपल्यासाठी राबतो तर वर्षातून एक दिवस आपण बैलाबरोबर खेळले पाहिजे असा असतो आणि या एका प्रतिष्ठित कार्यक्रमाकरिता शेतकरी अत्यंत प्रेमाने आपल्या बैलाला तयार करतात. या कार्यक्रमाकरिता जर्सी बैल चालत नाही. आणि जर्सी बैल या शर्यतीत टिकत देखील नाही. या शर्यतीत गावागावातून बैल भाग घेतात आणि भाग घेतलेल्या धष्टपुष्ट बैलांमध्ये सर्वात उत्तम बैलाला गावनंदीचा मान मिळतो आणि त्या गावातील गोवंश संवर्धनाचे काम तो करतो. आता या सर्व प्रकरणा मध्ये राष्ट्रविरोधी गतिविधि कोठे आली असा प्रश्न आपणास पडला असेल. PETA ( People for the Ethical Treatment of Animals ) या अमेरिकन संस्थेच्या भारतीय शाखेने या खेळामुळे बैलाला क्रूरतेची वागणूक मिळते असा दावा करून न्यायालयात या खेळावर बंदी आणण्याची मागणी केली. आणि न्यायालयाने ती मान्य करून हि बंदी आणली. खरी गोम इथेच आहे. जर या अमेरिकन संस्थेला प्राण्यांच्या बद्दल एवढा कळवळा असता तर त्यांनी ज्या खेळामध्ये एकही बैल मेल्याची नोंद नाही त्या खेळाला Target करण्या ऐवजी दर वर्षी लक्षावधी जनावरांची कत्तल करणारया अन्य सणांना Target केले असते. मग हाच खेळ त्यांनी का निवडला ? लक्षात घ्या, PETA हि अमेरिकन संस्था आहे आणि जर्सी गायींची संकल्पना जन्माला घालणारा देश देखील अमेरिका आहे. जर्सी गायीच्या प्रभावामुळे अगोदरच आपला देश आजारी देश म्हणून गणला जातो हे आपणास माहीत आहेच. पण तामिळनाडूमध्ये देशी गायींची संख्या अजूनही फार मोठ्या प्रमाणात आहे त्याचे श्रेय जलीकट्टू या खेळाला द्यावे लागेल. या खेळाला बंदी घातल्यास गावनंदी या संकल्पनेस धक्का लागून देशी बैलाचे महत्व कमी होईल आणि देशाच्या इतर भागाप्रमाणे तामिळनाडूत देखील जर्सी गायींचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होईल. यामुळे तामिळनाडू मध्ये सर्व जनता याला विरोध करते आहे. त्यांच्या फेसबुक आणि व्हाट्सअँप वर केवळ हाच विषय फिरतो आहे. हे कारस्थान अमेरिकन संस्थेचे असल्याने तेथील लोकांनी उस्फूर्तपणे पेप्सी आणि कोक याचे सेवन करू नये असे आवाहन केले आहे. मरीना बीच (चेन्नई) येथे विरोध कारणयासाठी पहिल्या दिवशी काही हजार लोक जमले आणि दुसरया दिवशी हि संख्या लाखाच्या घरात गेली ! कॉलेज युवकांनी देखील मोठ्या प्रमाणात विरोध करण्यास सुरवात केली आहे. काल येथील शाळांना सुट्टी देण्यात आली होती. सामान्य व्यक्तींपासून ते असामान्य व्यक्तीपर्यंत तामिळनाडू मधील सर्व जण या निर्णयाविरुद्ध एकवटले आहेत. थोडक्यात सांगायचे तर तामिळनाडू मधील जनमानस अस्वस्थ आहे ! याची नोंद न घेतील तर ते मोदी कसले ? मोदींनी स्वतः लक्ष घालून सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाला बदलण्यासाठी अध्यादेशाची तयारी सुरु केली आहे. PETA च्या फंडिंग ची देखील चौकशी सुरु झाली आहे. केंद्र सरकारच्या पाठिंब्यामुळे आणि तामिळनाडूच्या जनतेच्या भावनेमुळे हि बंदी उठणार हे नक्की !

In reply to by संदीप डांगे

'पेटा' हा मूळ लेखाचा विषय नाही. मी वरील लेख वाचला. मी पेटाचा सदस्य नाही. सदस्य व्हावे असे वाटत आहे. 'पेटा'विषयी अजून माहिती काढून नंतरच सदस्यत्वाविषयी निर्णय घेईन.

जालीकट्टूवर बंदी केवळ बैलांवर होणाऱ्या अन्यायामुळे घातली गेली नसावी असे वाटते. या खेळात(जर जालीकट्टू खेळ असेल तर बैल हे यातील बॅट किंवा बॉल याप्रमाणे एक साधन ठरते) ४३ लोकांचा मृत्यू कालपर्यंत झाला होता. या मृतांमधील सर्वच लोक आर्थिकदृष्ट्या निम्नवर्गातील, अल्पशिक्षीत, ग्रामीण भागातील होते. तामीळ लोकांच्या दबावाला बळी पडून केंद्रातल्या सरकारने व तामिळनाडू सरकारने जालीकट्टूला परवानगी दिली, त्यानुसार आज विविध भागात जालीकट्टू साजरा(?) झाला यात २ तरूण मृत्यूमुखी पडले व कित्येक जखमी झाले. कोणतेही सुरक्षेचे नियम न पाळल्याने, बैलाला श्रीगुरूजी म्हणतात त्याप्रमाणे विविध मार्गाने टॉर्चर केल्याने तो बेकाबू झाल्याने हे मृत्यू झाले. आधीप्रमाणे आता पण मृत लोक हे महान तामिळ परंपरा जपण्यासाठी आंदोलन करणाऱ्यातले नव्हते. विश्वनाथन आनंद, आर आश्वीन, कमल हासन, आर रेहमान यांचे नातेवाईक जखमी किंवा मृतांत नाहीत. केवळ मतांसाठी फॅनॅटीक्स लोकांची टोळी तयार करणे हे भारतासाठी नविन नाही, मात्र या सर्वामुळे न्यायालयासारख्या संस्था कमजोर होतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. आजचे जालीकट्टू चे बळी:
http://indianexpress.com/article/india/tamil-nadu-jallikattu-held-in-pu…

In reply to by पुंबा

आज जालिकट्टूमुळे फक्त २ जणांचाच मृत्यु झाला आहे. जखमींची संख्या जेमतेम ८३ आहे. २०१० पासून आजतगायत जेमतेम १९ जणांचा मॄत्यु झाला आहे (प्रतिवर्ष सरासरी ३ पेक्षाही कमी) आणि जेमतेम ११०० जण जखमी झाले आहेत (प्रतिवर्ष सरासरी १४० फक्त). आपली हजारो वर्षांची परंपरा, प्रथा, संस्कृती जपण्यासाठी इतकी किरकोळ किंमत देताना आक्षेप घ्यायचे कारण नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अहो तुम्हीच वरती त्या मेलेल्यां दोघांसारखे अन जखमी ८३ सारखेच काहीजण बैलांच्या ऐवजी जुंपा वगैरे सुचवले आहेत ना? मग आता असल्या क्रूर संवेदनाहीन (अन मांसाहारी सुद्धा असलेल्या) माणसांपैकी २ ठार झाले काय किंवा ८३ मोडले काय तुम्ही लक्ष देऊ नयेत. तुम्ही सच्चे प्राणीप्रेमी आहात तुम्हाला मनुष्य सोडून सगळ्या प्राण्यांचा कळवळा आहे..

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी, जलिकट्टू मिनिटभर बाजूला ठेवू. पण तुम्ही हेल्मेटसक्तीच्या वेळेस ज्या निर्णय स्वातंत्र्याची हिरिरीने भलामण करत होतात त्यातल्या तुमच्याच बर्‍याचशा म्हणण्याला इथे तुम्हीच कॉन्ट्रॅडिक्ट करताय, नाही का ? म्हंजे त्याच धर्तीवर ज्यांना अशा खेळातले धोके माहित असून देखील त्यात भाग घ्यायचा आहे त्यांना घेऊ दिला पाहिजे असेच तुमचे तेव्हाच्या म्हणण्यानुसार मत असायला हवे की नाही ? की हेल्मेटसक्तीबद्दल तुमचे मतपरिवर्तन झालेले आहे ? (इथे फक्त सहभागी माणसांबद्दल बोलतोय की ज्यांना सहभाग ऐच्छिक असल्याने त्यांच्या निर्णयस्वातंत्र्यावर ही गोष्ट असावी असं तुम्ही वरती क्रिकेटसंदर्भातल्या प्रतिसादातपण म्हटलंय म्हणून हा प्रतिसाद. बैल, पेटा, मोदी कोणीही मध्ये आणू नयेत. )

In reply to by अस्वस्थामा

हेल्मेटचा इथे काहीच संबंध नाही. जालिकट्टूत भाग घेणे किंवा न घेणे हे माणसांच्या इच्छेवर अवलंबून आहे. ज्यांना भाग घ्यायचा त्यांना तो घेऊ देत. परंतु बैलांना त्यातील धोके, बरेवाईट समजण्याइतकी बुद्धी नाही व त्यांची तेवढी उत्क्रांती देखील झालेली नाही. जालिकट्टूत भाग घ्यायचा का नाही हा पर्यायच त्यांच्यासमोर नसतो. त्यामुळे या प्रकारात बैलांना न आणता ज्यांना ज्यांना स्वतःच्या ताकदीचे प्रदर्शन करण्याची इच्छा आहे अशा तिथल्या तगड्या तरूणांनी गर्दीतून धावावे व इतरांनी त्यांच्या खांद्याला लोंबकळून बक्षिस मिळवावे.

In reply to by श्रीगुरुजी

बरेवाईट समजण्याइतकी बुद्धी नाही व त्यांची तेवढी उत्क्रांती देखील झालेली नाही.
श्रीगुरुजी, हाच न्याय संपूर्णपणे सर्व प्राणिजमातीला लावावा काय? मग सध्या वापरातील व्यवसायपूरक, पाळीव, करमणुकीचे वगैरे सगळ्या प्राण्यांचं करायचं काय? हे म्हणजे संपूर्ण उत्क्रांती आणि माणसाची जडणघडण यालाच आव्हान नाहीये का?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

बैलांवर अत्याचार करून व त्यांचा छळ करून स्वतःच्या करमणुकीसाठी जालिकट्टूत पळविण्याचा आणि उत्क्रांतीचा काही संबंध आहे का?

In reply to by श्रीगुरुजी

तो संदर्भ तुमच्या वरील वाक्याला अनुसरून आहे. स्वतःचं बरंवाईट ठरवण्याची बुद्धी तर कोणत्याच प्राण्याला नाही. मग त्यांचं काय करायचं? आणि मग असे "बुद्धिहीन(?)" प्राणी स्वतःच्या उपजीविकेसाठी माणूस वापरत आला आहे ना? ते त्या प्राण्यांना विचारून थोडेच होते? आणि आजही करत आहेच की? वर दुधाबाबतीत विचारला गेलेला प्रश्न अत्यंत रास्त आहे. आणि अत्याचार म्हणाल तर, घोड्याला रेसमध्ये पळवण्यात कधी कोणाला काही अत्याचार वाटले नाहीत. जालिकट्टु हि एक कॉन्स्पिरसी आहे हे उघड दिसतंय. एकदोन ठिकाणचे किस्से पाहून त्यावर अत्याचार ठरवणे योग्य नाही. बाकी ठिकाणी त्या बैलावर त्या स्पर्धेसाठी घेतली गेलेली मेहनत आणि नंतरचे कोडकौतुक याचीही बेरीज वजाबाकी नको का करायला? शिवाय अत्याचार होत असतील तर त्याविरुद्ध कायदा आहेच की! आहे त्या कायद्याची अंमलबजावणी नीट करता येत नाही म्हणून बंदीच घातलेली बरी हे योग्य वाटत नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

स्वतःचं बरंवाईट ठरवण्याची बुद्धी तर कोणत्याच प्राण्याला नाही. म्हणूनच त्यांच्या नैसर्गिक कमकुवतपणाचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर अत्याचार करू नयेत किंवा त्यांचा छळ करू नये. घोड्याला रेसमध्ये पळविणे हा सुद्धा त्यांच्यावर केला जाणारा अत्याचारच आहे. विशेषतः त्यांच्या पाठीवर त्यांचा क्रमांक टॅटूसारखा डागणे व त्याची गरज संपल्यावर त्याला गोळी घालून मारून टाकणे हे भयावह आहे. जालिकट्टुवरील बंदी ही कॉन्स्पिरसी वगैरे अजिबात नाही. जालिकट्टू समर्थकांची बाजू अत्यंत लंगडी आहे त्यामुळेच जालिकट्टूवर बंदी म्हणजे आंतरराष्ट्रीय कारस्थान, परंपरा व संस्कृतीला विरोध, साहसी क्रीडाप्रकाराला विरोध इ. शब्द वापरून दिशाभूल सुरू आहे. जालिकट्टूत अत्याचार होण्याची फक्त एकदोन उदाहरणे नाहीत. बैलांची शेपूट जोरात ओढणे, शेपूट पिरगाळणे, शेपूट दाताने चावणे, त्यांच्या डोळ्यात तिखट किंवा माती फेकणे, त्यांच्या वशिंडाला लोंबकळत राहणे, त्यांना दारू पाजणे इ. छळाचे प्रकार सातत्याने सर्वत्र सुरू आहेत व ते सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. याबाबतीत खालील वृत्तांत बोलका आहे. http://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/A-tussle-between-judge… यातील काही उतारे - “Can the entertainment of a gathering be a justification for inflicting pain upon bulls is a question to be posed to the consciousness (sic) of society,” Justice R. Banumathi (now a Supreme Court judge) said while banning jallikattu for the first time during her stint at the Madurai Bench of the Madras High Court on March 29, 2006. Rejecting the argument based on culture in her 2006 judgement itself, Ms. Justice Banumathi said: “We cannot talk about culture and civilisation if we do not uphold the dignity of life.” Why should we allow such inhuman act on dumb animals when they enjoyed statutory protection under the Prevention of Cruelty to Animals (PCA) Act, 1960? the judge asked, and went on to lament: “We have become insensitive to violence and cruelty. We do not give a thought or a second glance although we see it every day around us. Once one becomes inured to cruelty, the form it takes becomes irrelevant. Cruelty to animals can easily be replicated towards people too.” Wondering why should animals also not enjoy fundamental rights, the judge said: “Man may have dominion over the animals but that dominion should not extend to causing cruelty under the guise of conducting jallikattu, rekla (bullock cart) race and oxen race.” ... At the same time, we are also not unmindful of the fact that the conduct of such sport events results in a large number of fatalities and injuries. “Equally, the allegations of cruelty to animals in such sport events also cannot be brushed aside as without substance. There are overwhelming materials to prove violent and cruel treatment of the animals in such sport events. Taking note of bulls’ behavioural ethology of exhibiting a fight or flight response when exposed to perceived threat, the judges said: “This instinctual response to a perceived threat is what is being exploited in jallikattu or bullock cart races... Jallikattu demonstrates a link between actions of humans and the fear, distress and pain experienced by bulls.” Finally on the crucial ground of culture and tradition, the apex court said: “Jallikattu or bullock cart race, as practised now, has never been the tradition or culture of Tamil Nadu. Welfare and the well-being of the bull is Tamil culture and tradition. They do not approve of infliction of any pain or suffering on the bulls. Tamil tradition and culture are to worship the bull and the bull is always considered the vehicle of Lord Siva. “Yeru Thazhuvu, in Tamil tradition, is to embrace bulls and not overpowering them to show human bravery.” Most important of all, the Supreme Court judges took note of a report filed by Animal Welfare Board of India with respect to cruelty meted out to the bulls despite court imposed guidelines in 2013 and said: “We are sorry to note, in spite of the various directions issued by this Court... the situation is the same and no action is being taken by the District Collectors, police officials and others to see that those directions are properly and effectively complied with and the animals are not being subjected to torture and cruelty. Being dumb and helpless, they suffer in silence.”

In reply to by श्रीगुरुजी

(इथे फक्त सहभागी माणसांबद्दल बोलतोय की ज्यांना सहभाग ऐच्छिक असल्याने त्यांच्या निर्णयस्वातंत्र्यावर ही गोष्ट असावी असं तुम्ही वरती क्रिकेटसंदर्भातल्या प्रतिसादातपण म्हटलंय म्हणून हा प्रतिसाद. बैल, पेटा, मोदी कोणीही मध्ये आणू नयेत. )
एवढा ढळढळीत ढिस्क्लेमर टाकून पण तुम्ही "हेल्मेटचा इथे काहीच संबंध नाही. जालिकट्टूत भाग घेणे किंवा न घेणे हे माणसांच्या इच्छेवर अवलंबून आहे." या एका वाक्यात उत्तर दिले आहे (इतर प्रतिसाद बाद). आपले हे मत असल्याने आपला आधीचा प्रतिसाद जिथे तुम्ही ही माहिती दिलीत,
आज जालिकट्टूमुळे फक्त २ जणांचाच मृत्यु झाला आहे. जखमींची संख्या जेमतेम ८३ आहे. २०१० पासून आजतगायत जेमतेम १९ जणांचा मॄत्यु झाला आहे (प्रतिवर्ष सरासरी ३ पेक्षाही कमी) आणि जेमतेम ११०० जण जखमी झाले आहेत (प्रतिवर्ष सरासरी १४० फक्त).
तो ही या धाग्यसंदर्भात निरर्थक ठरतो. जालिकट्टूचे काय व्हायचे ते होवो, तुम्हाला तुमच्या मतांची सरमिसळ लक्षात आली तरी पुरे. (परत एकदा : बैल, पेटा, मोदी कोणीही मध्ये आणू नयेत. तुमच्या व्यक्तींच्या निर्णयस्वातंत्र्यासंदर्भातल्या कॉन्ट्रॅडिक्टरी मतांबद्दल हे दोन्ही प्रतिसाद होते. )