मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

देशभक्‍ताची व्याख्या!

डॉ. सुधीर राजाराम देवरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री आठ वाजता पंतप्रधानांनी देशाच्या नागरिकांना उददेशून केलेल्या भाषणात ‘1000 आणि 500 च्या नोटा आता कागदाचे तुकडे झाल्या’ची घोषणा केली. पण नागरिकांना आपल्याकडचे हे चलन बदलायला पन्नास दिवसांची मुदत दिल्याने सर्वत्र आनंद झाला. त्यांच्या या निर्णयाचे देशभर स्वागत झाले. निर्णयावर टीका केली तर आपण काळा पैसा बाळगणारे आहोत असा संदेश जाईल की काय या भीतीनेही बरेच लोक निर्णयाचे स्वागत करू लागले. आपण अर्थतज्ञ नाही. चलनवाढ, काळापैसा, स्मगलींग, नकली नोट यातले आपल्याला काही कळत नाही. मात्र दैनंदिन गरजांसाठी आपल्याला चलन हवे असते आणि ते कमवण्यासाठी आपण नोकरी, विविध प्रकारची कामे, उद्योग करत असतो. अशा चलनाबद्दल जेव्हा विशिष्ट निर्णय घेतले जातात त्यावर हा सर्वसामान्य माणूस आपल्या अनुभवातून काही प्रतिक्रिया देऊ लागतो. तशीच ही माझी सामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे. चेकने व्यवहार करावे असे शासनातर्फे सांगितले जाते. म्हणून सर्वत्र चेकचा वापर करायचे ठरवले: दुध वाल्याला चेक देऊन पाहिला, त्याने घेतला नाही. पेपर वाल्याला चेक देऊन पाहिला, घेतला नाही. भाजी वाल्याला चेक देऊन पाहिला, घेतला नाही. इथंपर्यंत आपण समजू शकतो, पण डॉक्टरांना अनेकांनी चेक दिला, त्यांनीही चेक घेतला नाही. जुन्या नोटा घेतल्या नाहीत आणि काहींनी तर रूग्णांवर उपचारच केले नाहीत. मोठे व्यवहार चेकने करणे ठीक. पण किरकोळ व्यवहार आपण चेकने करू शकणार नाही हे पावलोपावली लक्षात येते. उदाहरणार्थ, एखादा गरीब माणूस चारपाचशे रूपयाचा किराणा घ्यायला गेला आणि दुकानदाराला तेवढ्या रकमेचा चेक देऊ लागला तर? प्रत्येक चेकला स्लीप भरून बँकेत जमा करावा लागतो. म्हणून संपूर्ण व्यवहार पारदर्शक असूनही वेळेच्या नियोजनासाठी आपल्याला छोट्याशा रकमेसाठी हे नको असते. प्रत्येक व्यवहार आपण चेकने करू लागलो तर चेकच देशाचे चलन होईल. चेकचा अतिवापरही पैशांच्या देवाणघेवाणीपेक्षा धोकादायक ठरू शकेल. नोटा नकली येऊ शकतात तर चेक नकली होणे फार सोपी गोष्ट आहे. नकली चेकने व्यवहार करणारे स्मगलर पकडले जाऊ शकणार नाहीत. अविश्वास वाढत जाईल. असे वारंवार होऊ लागले की आधी अनोळखी लोकांकडून कोणी चेक स्वीकारणार नाही. नंतर हा विश्वास ओळखीच्या ग्राहकांवरही दाखवला जाणार नाही. क्रेडीट कार्डस् काढू म्हटलं तर त्यासाठी जिल्ह्याला जावे लागते. तालुका स्तरावर कार्डस् मिळत नाहीत, असे स्टेट बँकेकडून आताच समजले. (सगळ्याच प्रकारच्या कार्डसची विश्वासार्हता किमान आज भारतात तरी अजून नाही.) पेटीएम – वॉलेट सारख्या सुविधा सरसकट कुठेही वापरता येत नाहीत. म्हणजे चलन हेच विश्वासार्ह आणि खणखणीत असणे गरजेचे आहे. आज भारतातील फक्‍त 6 टक्के लोक कॅशलेस व्यवहार करतात. बाकी 94 टक्के लोक रोखीत व्यवहार करतात. याचा अर्थ 94 टक्के लोकांजवळ बेहिशोबी पैसा आहे असे म्हणता येत नाही. भारतासारख्या अवाढव्य लोकसंख्येच्या देशात, ग्रामीण भागात, डोंगराळ भागात व अतिदुर्गम भागात 100 टक्के कॅशलेस व्यवहार होणे शक्य नाही. म्हणून इतर छोट्या छोट्या आणि कमी लोकसंख्येच्या देशांशी तुलना आपल्याला करता येणार नाही. 1978 मध्ये मोरारजी देसाईंनी हजारांच्या नोटा बंद केल्या होत्या तेव्हा आमच्या गावात हजाराची एकही नोट नव्हती. ती कशी असते हे ही गावातल्या लोकांना माहीत नव्हतं. म्हणून त्या निर्णयाचा सर्वसामान्य माणसावर अजिबात परिणाम झाला नाही. (आणि तेव्हाही काळ्या पैशाला आळा बसला नाही. ज्या ज्या देशांनी आपले चलन बदलले त्यांचे अनुभव वाईट आहेत.) नरेंद्र मोदींनी ज्या नोटा बंद केल्या, आज खेड्यापाड्यातल्या मजुरांजवळही फक्‍त त्याच नोटा आहेत! कारण 86.5 टक्के व्यवहार या नोटांनी होत होता. पंतप्रधान जेव्हा या नोटा बंद करण्याची घोषणा करत होते त्या वेळी सुध्दा एटीएम मशीन मधून 500 - 1000 च्याच नोटा बाहेर येत होत्या. आणि भाषण ऐकल्याबरोबर या नोटा (मध्यरात्रीपासून नव्हे तर त्याच वेळेपासून) कोणी स्वीकारत नव्हतं. पश्चिम बंगाल मधील मालदात अनेक गरीब लोकांच्या खात्यात त्यांच्याच हाताने कोणाचे तरी पैसे लाखांच्या आकड्यांत जमा होत आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रोजंदारीने लोक कामाला लावले जाताहेत. 8 नोव्हेंबर नंतर पहिले तीन दिवस (रात्रभर सुध्दा) दुपटीच्या भावाने सोने – चांदी खरेदी होत होती. कोणी लांब पल्ल्याच्या रेल्वेची एसी तिकीटे खरेदी करून दोन दिवसांनी रिफंड (नवीन चलनात) मागत होते. सरकारी दवाखाने, मेडीकल स्टोअर्स, पेट्रोलपंप, घरपट्टी- पाणी पट्टी भरणे, इतर बिले आदी ठिकाणीही पैसे बदलण्याच्या उद्देशानेच गर्दी होत होती. आज कोणी डॉलर खरेदी करताना दिसतोय. कुणी घर खरेदीत अडकवताना दिसतो. कोणी हिरे खरेदी करतो तर कोणी विविध प्रकारच्या इस्टेटीत पैसे अडकवू लागला. काही खाजगी बडे लोक आणि शासनाशी या ना त्या निमित्ताने संबंधीत असलेले लोक तीन तीन कोटी रूपये बदलून देण्याचे आश्वासन देताना स्टींग ऑपरेशनमध्ये दिसू लागलीत. यात खाजगी बँकर्स पण आहेत. हिस्सारहून विमानाने अडीच कोटी रूपये पूर्वोत्तर भारतात पाठवले गेलेत आणि ते विशिष्ट संस्थेचे आहेत म्हणून प्रमाणपत्र पुढे केले गेले. रक्कम पकडली तरी (हा काळा पैसा होता) शासन काहीच करू शकले नाही. आज सापडलेले काळे पैसे हे फक्‍त हिमनग असू शकतं. यापेक्षा कितीतरी पट पैसा जिरवला गेला असेल. जिरवला जातोय. एका गावातील एका व्यक्‍तीकडे (शेतकरी नव्हे) रूमभर 1000 आणि 500 च्या नोटा आहेत. (ही अफवा नसून त्या व्यक्‍तीकडे काम करणार्‍या नोकराने सांगितलेली घटना.) रोज एक पोते भरून नोटा काढल्या जातात. त्या नोटा 90 नोकरांच्या आणि त्यांच्या पत्नींच्या खात्यावर रोज विभागून रांगा लाऊन खात्यात जमा केल्या जाताहेत. काही नोटा याच पध्दतीने बदलल्या जात आहेत. म्हणजे काळा पैसा अशा पध्दतीने पध्दतशीरपणे जिरवला जातोय. ही गोष्ट उघड झाली नाही तर तो पैसा पांढरा होऊन उजळमाथ्याने व्यवहारात येईल. 2000 च्या नोटेत पुन्हा साठवला जाईल. बँकांमध्ये खात्यांवर प्रचंड प्रमाणात पैसा जमा होत आहे. पण हा पैसा सर्वसामान्य लोकांनी घरात ठेवलेला पैसा आहे. हात खर्चासाठी साठ सत्तर हजार रूपये आपल्या जवळ ठेवणे हा गुन्हा नक्कीच नाही. म्हणून याला काळा पैसा म्हणता येणार नाही. ग्रामीण भागातील बहुतांश लोकांचे अजूनही कोणत्याच बँकेत खाते नाही. लोक पैसा जवळ ठेवतात. पण हा पैसा त्यांच्या कष्टाचा असतो. काळा पैसा बाहेर काढता येत नाही तरी सामान्य लोकांजवळच्या पांढर्‍या पैशाने बँका भरून गेल्या. काळा पैसा बाळगणारे लोक सरकारपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. काळा पैसा बाहेर काढण्याचा नोटाबंदी हा प्रामाणिक प्रयत्न असेलही. परंतु हा प्रयत्न भाबडा ठरू नये. ज्यांनी या आधीच काळा पैसा जमिनीत गुंतवला त्याचे काय? ज्यांनी याआधीच सोन्यात गुंतवला त्याचे काय? ज्यांनी याआधीच घरांमध्ये- भूखंडांमध्ये- हिर्‍यांमध्ये गुंतवला त्याचे काय? आणि आता जो काही काळा पैसा असेल तो कशापध्दतीने जिरवला जातोय हे काही चॅनल्सच्या स्टींग ऑपरेशन्समधून दिसून येत आहे. (स्टींग ऑपरेशन्सपेक्षा कितीतरी पटीने लोक हे पैसे सर्वत्र जिरवत असतील, त्यांची गणती नाही. नोटा बदलण्याचेही रोज नियम बदलतात. ज्याच्याकडे काळा पैसा सापडेल त्याला 200 टक्के दंड होईल असे आधी सांगीतले गेले आणि परवा संसदेत अशा लोकांचे 50 टक्के कापण्याचे बील सादर केले. 200 टक्के वरून 50 टक्यावर येण्याचे कारण काय? सर्वसामान्य लोकांकडे 30 डिसेंबर नंतर एखादी नोट शिल्लक राहिली तर ती कागदाचा तुकडा होईल. पण बेईमान लोक या कायद्याच्या आधाराने 1 जानेवारी 2017 नंतरही आपल्या नोटा 50 टक्के देऊन पांढर्‍या करून घेतील. अशी सवलतीने काळापैशावाल्यांना सांभाळून घ्यायचे होते तर नोटाबंदीचे फलीत काय?) एकंदरीत देशातील काळा पैसा फुकट जाण्याऐवजी बर्‍यापैकी जिरताना दिसतो आहे. मात्र पाकिस्तानात छापल्या जाणार्‍या आणि बांगलादेश व नेपाळमार्गे वितरीत होणार्‍या पैशाला ताप्तुरता लगाम बसला हे नक्की. हा लगाम कायमस्वरूपी बसू शकेल का हा ही प्रश्न आहेच. नोटाबंदीनंतर दोन तीन दिवस काश्मीरातील दगडफेक थांबली होती. पण ती आता पुन्हा सुरू झाली. दहशवाद्यांकडे दोन हजारच्या खर्‍या नोटाही सापडू लागल्या. 2000 च्या नकली नोटा तर तिसर्‍या दिवसापासून सुरू झाल्या. केवळ पाकिस्तान मधून येणारा नकली पैसा आपण रोखू शकत नाही आणि देशातील काळा पैसा कायदेशीरपणे पकडू शकत नाही म्हणून सव्वाशे कोटी लोकांचे चलन बंद करण्याएवढा मोठा निर्णय घ्यावा लागला असे म्हणावे तर ही आपली नामुष्की आहे. आपण हे युध्द हरलोत असेच म्हणावे लागेल. डोंगर पोखरून फक्‍त उंदीर निघणार असेल तर हे सर्व भयानक आहे!... एका सर्वेनुसार ‘रद्द केलेल्या नोटांचे वापरातील प्रमाण 86 टक्के होते. देशात सुमारे 17 लाख कोटी रूपयांच्या नोटा वापरात आहेत. रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार सुमारे 400 कोटी रूपयांच्या नोटा बनावट आहेत. केवळ 400 कोटी रूपयांच्या बनावट नोटा नष्ट करण्यासाठी 17 लाख कोटी रूपयांच्या नोटांचा वापर थांबवण्याची गरज होती का’ असे प्रश्न विचारले जात आहेत. आज जी यंत्रणा चलन बदलासाठी वापरली गेली तीच जर 400 कोटी रूपयांच्या बनावट नोटा पकडण्यासाठी आणि संशयित काळाबाजार करणार्‍यांवर छापे टाकून पकडायला वापरली असती तर कमी कष्टात बरंच काही साधता आलं असतं. मात्र नोटाबंदीचा हा निर्णय आता मागे घेणं यापेक्षा भयानक ठरू शकतं. म्हणून आता जे काही झालं ते यशश्वी व्हावं असंच प्रत्येक नागरिकाला मनापासून वाटतं. 9 नोव्हेंबर पासून काही दिवस भाजीपाला सडला, तो घ्यायला लोकांकडे सुटे पैसे नव्हते. अनेक ट्रका रस्त्यांवर पडून होत्या. भाजीवाला 500 रूपये घेऊन सुटे कुठून देणार, प्रवाश्यांना खिशात पैसे असून जेवता आले नाही. सुटे पैसे नाहीत म्हणून बस मध्ये प्रवास करता आला नाही. रेल्वेतही तीच अवस्था. हॉस्पीटल्समध्ये पैशांशिवाय इलाज झाला नाही. काही लोक, काही लहान बालकं दगावली. कोणी बँकेच्या रांगेत हार्ट अॅटकने वारले. बँक कर्मचारी अॅटकने वारले. कोणाच्या लग्नाची फसगत. स्मशानभूमीत फसगत. बँक कर्मचार्‍यांवरील अतोनात ताण. आतापर्यंत या सर्जिकल स्ट्राईक्स मध्ये 75 सर्वसामान्य लोक वारले. मात्र काळा पैसा जवळ आहे म्हणून कोणी हार्टअॅटक येऊन वारला वा आत्महत्या करून वारला अशी एकही बातमी अजून ऐकायला- वाचायला मिळाली नाही! ज्या नागरिकांचे अजून कोणत्याच बँकेत खाते नाही अशा मजूर, भटक्या, आदिवासी व ग्रामीण लोकांचे सर्वात जास्त हाल झाले. या निर्णयाचे चांगले आणि वाईट असे दूरगामी परिणाम होणार आहेत. नवीन नोटांच्या आकाराचे साचे एटीएम मशीनमध्ये नसल्याने एटीएम व्यवहार ठप्प होते – अजूनही आहेत. नोटा बंद करायचा निर्णय घेणारे जे कोणी दोन तीन लोक असतील त्यांना एटीएम मशीनची रचना (हार्डवेअर) नवीन नोटांसाठी मॅन्युअल पध्दतीने दुरूस्त करावी लागतील याची कल्पना नसावी. देशभरातील दोन लाख वीस हजार एटीएम मशीन्स मॅन्युअल पध्दतीने अपडेट (रिकॅलिब्रेशन) करणे सोपी गोष्ट नाही. नवीन नोटा जुन्या नोटांच्या आकाराच्या छापल्या असत्या तरी एटीएम सेवेचा इतका बोजवारा उडाला नसता. बँकेतून द्यायलाही चलन अपूर्ण पडत आहे. नवीन चलनाची जी व्यवस्था व्हायला हवी होती ती झाली नाही. 500 रूपयाच्या नोटा छापायला 11 नोव्हेंबरला सुरूवात झाली. काळा पैसा, सोने, भूखंड, स्मगलर या सर्वांचा विचार केला तरी अजून काहीतरी या व्यवस्थेत खोट आहे. फक्‍त एक उदाहरण सांगतो. आपल्याला असे अनेक उदाहरणे आठवतील: एखाद्या व्यापार्‍याचे शहरात चार पाच दुकाने असतात. रहायला मोठी बिल्डिंग असते. तरीही त्याच्याजवळ नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असते. मात्र पोष्टात काम करणारा लिपिक नॉन क्रिमिलियर मध्ये बसत नाही. कारण त्याला मिळणार्‍या प्रत्येक पैशाचा हिशोब त्याच्या पेस्लीपमध्ये असतो. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्याला पूर्ण फी भरावी लागते. या देशात फक्‍त नोकरवर्गानेच आयकर भरावा आणि नोकरवर्गाच्या मुलांनीच प्रचंड फुगवलेली शैक्षणिक पूर्ण फी भरावी असा अलिखित नियम झाला आहे. हे कधी आणि कोण बदलेल? प्रत्येक नागरिकाचे खरे उत्पन्न कागदावर कधी येईल? जास्तीतजास्त नागरिक आपला प्रामाणिक प्राप्तीकर कधी भरतील? (सध्या फक्‍त 4 टक्के नागरिक प्रा‍प्तीकर भरतात.) ‍नोकरी करत नसलेले पण करप्राप्त उत्पन्न असलेले बरेच लोक आयकर का भरत नाहीत? ‘‘कोणाचे काम करून देताना कधीच लाच घेत नाही, नियमांतर्गत (वा नियमबाह्य) कामे करून देण्यासाठी लाच देत नाही, आपला योग्य तो प्राप्ती कर (इनकम टॅक्स) देशासाठी भरतो, निवडणूकीत जो नागरिक आपले मत विकत नाही आणि जो उमेदवार मते खरेदी करत नाही, तो खरा देशभक्‍त.’’ अशी देशभक्‍ताची व्याख्या केली तर किती देशभक्‍त आपल्या देशात सापडतील? म्हणून सर्वात महत्वाची बाब म्हणजे मानवी नैतिकता. ती नसेल तर कोणी कोणतेही कायदे करो, कोणतेही चलन बंद करो वा नवीन आणो, लोकपाल आणो. अनैतिक व्यवहारांसाठी सगळीकडे पळवाटा आहेत. (हजाराच्या नोटांत लाच दिली- घेतली जात होती ती आता दोन हजाराच्या नोटेत सुटसुटीतपणे देता- घेता येईल. पैसेही कमी जागेत साठवता येतील.) आपण नैतिकता पाळणार नसू तर सचोटी येऊच शकणार नाही कधी. म्हणून हा फक्‍त सरकारी यंत्रणेचा प्रश्न नाही. आपण सर्व मिळून चांगले काही करू शकलो तरच हे होऊ शकेल. अन्यथा नाही. आज इतके सारे होऊनही बेईमानी लोक आपल्या घरात ऐषारामात गात असतील: आम्हास नाही तोटा शोधण्यास पळवाटा कितीही करा खोटा आम्ही करू तो मोठा (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.) – डॉ. सुधीर रा. देवरे इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: sudhirdeore29.blogspot./

वाचने 6924 वाचनखूण प्रतिक्रिया 38

गामा पैलवान 02/12/2016 - 00:06
डॉ.सुधीर देवरे, जर तुम्ही म्हणताय इतकी भीषण परिस्थिती आहे, तर भाजपला स्थास्व निवडणुकांत इतकं मोठं यश का मिळालं? सुपडा साफ व्हायला हवा होता ना? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

ट्रेड मार्क 02/12/2016 - 00:57
धागालेखक नुसते लेख पाडतात. तुम्ही प्रश्न विचारले, प्रतिवाद केला तरी उत्तर द्यायला ते फिरकत नाहीत किंवा फिरकले तरी "मी विचार मांडलेत, घ्यायचे तर घ्या नाहीतर निघा" हा विचार असावा.

=)) =)) =)) हा लेख विरोधी पक्षांकडे पाठवा. त्यांच्यातल्या नेहमीच्या यशस्वी विचारवंतांनाही खूप खूप खूप विचार करूनही इतका विपर्यास करणे जमलेले नाही ! चला, हा लेख एकांगी आहे हे लपवण्याची सुद्धा काळजी लेखनात घेणे जरूरीचे समजले गेले नाही. अर्थातच, त्यावर काही खास प्रतिसाद देण्याची तसदी वाचविल्याबद्दल लेखकाचे अनेक आभार ! ;) :)

सुज्ञ 02/12/2016 - 10:04
काय लिहिलंय यार . मी म्हणतो वेळ जात नसेल तर उत्तर वा दक्षिण ध्रुवावर फिरून यावे. कशाला स्वतःचा आणि लोकांचा वेळ वाया घालवता

बाजीप्रभू 02/12/2016 - 10:36
NDTV, ABP News, आजतक, नॅशनल दस्तक हे चॅनेल एकदम चालू झाल्यासारखे वाटले. बायदवे, नोटबंदीचा निर्णय "राबडी देवी"ने जरी घेतला असता तरी हा "बाजीप्रभू" तिच्या बाजूने उभा राहिला असता. नोटबंदीचं औषध हे काही आत्ताच बाजारात आलेलं नाहीये, बऱ्याच देशांनी आपल्या लोकांना पाजून बरे केलेले आहे.

In reply to by संदीप डांगे

बाजीप्रभू 02/12/2016 - 11:45
अमेरिका :- १४ जुलै १९७९ सोविएत युनियन :- १९९१ ब्रिटन :- १९७१ घाणा :- १९८२ (चुकीच्या पध्दतीने हाताळल्यामुळे अपयशी) मॅनमार:- १९८७ (गरीब असला तरी भरतापेक्षा भ्रष्टाचार तुलनेने कमी) बाकी यूरोप मध्ये कॅशलेस हे नोटबंदी नंतरच झालेले आहे. किती % ते आंतरजालावर सापडेलच.

In reply to by संदीप डांगे

बाजीप्रभू 02/12/2016 - 12:35
तेच तेच वाचून तुम्ही बोर व्हाल. आपल्या कथ्याकूट मधे यावर बरेच धागे येऊन गेलेत. कसे बरे झाले?= ८ नोव्हेंबरनंतर मिपावर आलेले ७०% धागे यावरच आहेत. आधी काय होते? => जे भारतात आज आहे तसं. नंतर काय फरक पडला? => ते आता विकसित देश म्हणून गणले जातात (अपवाद घाणा, म्यानमार) थोडक्यात सारांश हा कि पूर्वी त्या देशांत पारदर्शकता नव्हती आणि आता आली. कॅशच्या रोगामुळे होणारे इतर साईड इफेक्ट एकतर बंद झाले किंवा कमी झाले.

In reply to by बाजीप्रभू

थॉर माणूस 02/12/2016 - 14:02
अमेरीकेने कुठल्या नोटा अवैध ठरवल्या होत्या? ही माहिती माझ्यासाठी नवी आहे. कृपया याविषयी थोडे सविस्तर लिहा.

In reply to by थॉर माणूस

बाजीप्रभू 02/12/2016 - 14:43
सध्या इथे थोडी मुशाफिरी करावी लागेल तुम्हाला, https://en.wikipedia.org/wiki/Nixon_shock https://en.wikipedia.org/wiki/Obsolete_denominations_of_United_States_currency Although they are still technically legal tender in the United States, high-denomination bills were last printed on December 27, 1945, and officially discontinued on July 14, 1969, by the Federal Reserve System.

In reply to by बाजीप्रभू

संदीप डांगे 02/12/2016 - 14:47
denomination चा अर्थ काय आहे हे जरा मला पुन्हा समजून घ्यायला लागेल बॉ! फक्त हि 2000 हजाराची नोट त्यात कुठे बसते तेवढं क्लिअर झालं की बास..

In reply to by बाजीप्रभू

थॉर माणूस 05/12/2016 - 10:00
:) हे सगंळ वाचलेलं असल्यानेच तुम्हाला विचारलं मी. कारण मला तरी अमेरिकेने अशी तडकाफडकी नोटबंदी वगैरे केलेली माहिती नाही. आपल्या लिंक मधे देखील मला कुठेही अमेरिकेने नोटबंदी केल्याचं दिसलं नाही. आजही $१०००० ची नोट बँकेत Legal tender म्हणून स्विकारली जाणे अपेक्षित आहे. त्यांनी नोटा छपाई बंद करून बँंकेत येत असलेल्या नोटा पद्धतशीरपणे संपवल्या. तरीही आजदेखील $१००००, $५००० च्या काही नोटा कलेक्टर्स आइटम्स म्हणून बाजारात आहेत आणि त्या आजही कायदेशीर आहेत.

In reply to by थॉर माणूस

सुनील 05/12/2016 - 10:29
+१ ब्रिटनमध्येही जी नोटबंदी झाली १९७१ साली त्याचे कारणही अगदीच वेगळे होते. तत्पूर्वी अस्तितवात असलेली पेन्स-शिलिंग-पाउंड अशी त्रीस्तरीय चलनव्यवस्था बदलून ब्रिटनने १९७१ साली पेन्स-पाउंड अशी द्वीस्तरीय दशमान पद्धत स्वीकारली, हे त्या नोटबंदीचे कारण होते. थोडक्यात, काळा पैसा वा कॅशलेस सोसायटी करण्यासाठी या देशांनी नोटबंदी केलेली नव्हती.

In reply to by नितिन थत्ते

सुज्ञ 02/12/2016 - 14:21
पेडगाव ट्रिप मारण्यापेक्षा स्वतः थोडी माहिती शोधा आधी आंतरजालावर . बंदी रातोरात झ्हाली का ? तिथे किती माणसे मेली ? न्युज चॅनल नि किती माणसे मेलेली दाखवली ? नक्की त्यांना काय फायदा झ्हाला ? तिथेही लोकांना देशभक्ती चे डोस दिले होते का ? वगैरे तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील

In reply to by नितिन थत्ते

बाजीप्रभू 02/12/2016 - 14:48
रातोरात केली का? हा मुद्दा गौण आहे. केली होती हे महत्वाचं. कारणंहि तिचं होती जी आपली होती. FBI च्या सल्ल्यामुळे केली होती ऐकून आहे. याच दिवशी सोन्याचं आणि डॉलरचा संबंध तोडण्यात आला होता.

In reply to by बाजीप्रभू

बाजीप्रभू 02/12/2016 - 14:58
आणि FBI हि काही "गायीचं दूध" काढणारी संस्था नाहीये. त्यामुळे त्यांच्या सल्ल्यामधे गुन्हेगारीशीच रिलेटेड कारणं असावीत.

In reply to by बाजीप्रभू

अभिजित - १ 02/12/2016 - 18:33
अमेरिकेत आज हि २५ टक्के यवहार कॅश मध्ये होत आहेत .. इथे हा मोगली अख्ख्या देशाचा गळा घोटू बघत आहे .. कॅशलेस व्हा नाहीतर मरा ..

In reply to by अभिजित - १

असं आहे बघा, एकूणच तुम्हाला कॅशलेस हा प्रकार अजिबात पटण्याजोगा नाहीये असं तुमच्या एकूण प्रतिसादावरून वाटतं. तर मग तो का पटत नाही यावर चर्चा संभवु शकते. उगाच गळा घोटने वगैरे मोठे शब्द वापरल्याने विपर्यास होतो हे एक आणि उगाच द्वेष दिसून येतो हे दुसरे. बघा पटत असेल तर दोन गोष्टींवर तुमचं मत मांडा -१. कॅशलेस का चांगलं नाही? २. ते गळा वगैरे कसा घोटला जातोय? अवांतर: कुठल्याही देशाला कॅशलेस होण्यासाठी खूप पूर्वतयारी लागते (अमेरिकाही नाही अजून). आपण तर खूपच बेसिक पायरीवर आहोत. त्यामुळे तुम्ही १५ एक वर्षे निश्चिन्त राहायला हरकत नसावी.

In reply to by बाजीप्रभू

थॉर माणूस 05/12/2016 - 10:21
बाकिच्या देशांमधल्या घटनांचादेखील नोटबंदीशी संबंध कसा ते कृपया सांगा, कारण... १९९१ मधे रशिया फुटल्यामुळे करन्सीमधे बदल झाले १९७१ मधे ब्रिटनने आपल्या करन्सीचे डेसिमलायजेशन केले (आपण ४ आणे, ८ आणे वरून १०पैसे २५पैसे वर आलो तसे) १९८७ मधे म्यानमारच्या त्यावेळच्या जवळपास हुकूमशाही पद्दतीच्या वन पार्टी सिस्टीममधून अध्यक्ष झालेल्या ने विन नी तडकाफडकी नोटा बंद केल्या, जे ८ ऑगस्ट १९८८ च्या उठावामागचे एक कारण होते (आंग स्यू की या उठावामधूनच पुढे आल्या).

संदीप डांगे 02/12/2016 - 14:51
देवरे साहेब, तुम्ही इथे फक्त गोग्गोड बातम्या द्यायला हव्यात.. त्या खऱ्या असो व खोट्या त्याबद्दल कोण विचारणार नाही, मात्र जर का वैट्ट बातम्या द्याल तर तुम्ही पैसे खाता, देशद्रोही आहात असे म्हटल्या जाईल हे लक्षात ठेवा. शांतता, अच्छे दिन येतंच आहेत...

In reply to by संदीप डांगे

गामा पैलवान 02/12/2016 - 15:01
संदीप डांगे,
त्या खऱ्या असो व खोट्या त्याबद्दल कोण विचारणार नाही,
तुम्ही दाखवलेल्या आस्थेबद्दल आभार. मात्र खऱ्याखोट्याची चिंता तुम्ही करू नये ही विनंती. मिपाकरांची खरंखोटं जाणून घ्यायची कुवत आजूनही शाबूत आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by तेजस आठवले

तेजस आठवले 02/12/2016 - 18:12
+१ गा. पै . यांच्या साठी. चुकून प्रतिसाद खाली पडला.

मृत्युन्जय 02/12/2016 - 18:07
या विषयावर इतके चर्वितचर्वण झाले आहे की आता वेट आणि वॉच करायचे ठरवले आहे. परत परत काय तेच तेच दळण दळायचे? किती वेळा? आणि तुम्ही नोटाबंदीच्या बाजुने मत दिले की लगेच भक्त म्हणुन हिणवले जाणार. विरोधी मत अस्णारे तर नुसतेच "आम्हाला लोक देशद्रोही म्हणतात" म्हणुन गळे काढतात. प्रत्यक्षात त्या लोकांना कुणी हिंग लावुन विचारत नाही आहे.

In reply to by मृत्युन्जय

यशोधरा 03/12/2016 - 17:37
प्रत्यक्षात त्या लोकांना कुणी हिंग लावुन विचारत नाही आहे.
दुखणे तेच आहे, ते तुलाच समजत नाय!

मारवा 02/12/2016 - 18:30
हा आदर्श पर्याय आहे असे माझे मत आहे यात एकाच व्यक्तीच्या दोन निर्णया संदर्भांत विरोधी भुमिका घेतली असे नसुन इश्यु बेस्ड विरोध वा इश्यु बेस्ड समर्थन हा त्याचा अर्थ असतो. अर्थात अ‍ॅड होमिनेम च टीका करायची असल्यास ही साधी बाब लक्षात येणे अवघड आहे. व इझमीस्ट व्यक्ती असेल तर अजुन अवघड. त्यात मराठी आंजा असेल तर मग क्या कहने