Skip to main content

इंदिराजी

लेखक जॉनी यांनी शनिवार, 19/11/2016 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
'गत हजार सालोंका युद्ध हमने जित लिया है.' माजी पंतप्रधान इंदिराजी यांचा आज जन्मदिवस. यानिमित्तानं त्यांच्या कारकीर्दीबद्दल थोडंसं... कित्येक वर्षं नेहरूंची मुलगी यापेक्षा वेगळं स्थान नव्हतंच इंदिराजींचं. गुंगी गुडीया वगैरे म्हणायचे त्यांना. आणि बरंच तथ्य पण होतं त्यात. केरळ सरकार खाली खेचणं सोडलं तर अत्यंत साधारण असाच कार्यकाळ राहिला होता त्यांचा. झंझावाती कारकिर्दीला सुरवात झाली 70-71 साली. जानेवारी 1971 मध्ये आपलं जम्मू ते श्रीनगर विमान हायजॅक करून लाहोर ला उतरवण्यात आलं आणि अतिरेक्यांनी काही मागण्या केल्या. इंदिराजींनी ठाम भूमिका घेऊन दहशतवादासमोर झुकण्यास ठाम नकार दिला. अतिरेक्यांना प्रवाश्यांना सोडावं लागलं पण त्यांनी विमान पेटवून दिलं. तरी इंदिराजींनी पाकिस्तानी विमानांना आपल्या आकाशात बंदी घातलीच. हे काही पहिले पहिले प्रसंग होते. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान मधला बराचसा अनागोंदी कारभार भारताला डोकेदुखी ठरत होता. इंदिराजींनी या प्रश्नाचा काय तो निकाल लावायचाच असं ठरवलं होतं. यात लक्ष घालायला सुरवात केल्यावर त्यांना लवकरच लक्षात आलं की हा प्रश्न काही चर्चातून सुटणारा नाही. त्यांनी याबाबतीत वातावरण निर्मिती करायला सुरुवात केलीच होती. अनेक देशाना भेटी देऊन पाकिस्तान प्रश्न, भारताची बाजू आणि भूमिका याबद्दल माहिती देऊन आंतरराष्ट्रीय राजकारणात आपली बाजू भक्कम करून ठेवण्यात आली. दुसऱ्या बाजूला लष्कराला तयारी करण्याची सूचना देऊन ठेवलीच होती. 3 डिसेंबर 1971 रोजी भारताच्या हवाई हद्दीचा भंग करून पाक विमानांनी अमृतसर, अंबाला आणि इतर ठिकाणी बॉम्बिंग केलं आणि युद्धाला सुरवात केली. पूर्व पाकिस्तान मधून निर्वासितांचे लोंढे भारतात येत होते. त्यातल्याच तरुण मुलांना ट्रेनिंग देऊन 'बांगलादेश मुक्ती वाहिनी' तयार केली. अश्या सगळ्या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराला आदेश दिले की पाकिस्तानात शिरा. तेरा दिवस! तेरा दिवसात पाकिस्तान ला पाणी पाजून भारतीय सेना विजयी झाली आणि नवा बांगलादेश जन्माला आला. ही भारताच्या इतिहासातील सर्व बाजूंनी तयारी करून योग्य संधीची वाट पाहून खेळलेली एकमेव खेळी. जिंकल्याची वार्ता मंत्रिमंडळाला सांगताना इंदिराजी म्हणतात, "गत हजार सालोंका युद्ध हमने जित लिया है". आपल्या मंत्रिमंडळातून इंदिराजींनी सिंडिकेट ग्रुप ला तर काढून फेकलंच होतं. परत त्यांना कुणी गुंगी गुडीया बोललं नसेल. गुजरात आणि बिहार मध्ये भ्रष्टाचारविरोधी विद्यार्थी आंदोलन सुरू असताना भ्रष्टाचाराला पाठिंबा असल्यासारखी काही विधानं त्यांच्याकडून झाली आणि इथे निगेटिव्ह इम्पॅक्ट पडायला सुरुवात झाली. राजनारायण यांनी दाखल केलेल्या खटल्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आला आणि इंदिराजींवर 6 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली गेली. ही बंदी पण झुगारून राजीनामा न देता इंदिराजींनी 25 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर केली आणि सुरु झाला भारताच्या इतिहासातील काळं पर्व. एकछत्री अंमल, कडक सेन्सॉरशिप इत्यादी. याच कालावधीत देशातल्या लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. 1977 साली इंदिराजींनी पुन्हा निवडणुका जाहीर झाल्या आणि 30 वर्षात प्रथमच केंद्रात काँग्रेस ची सत्ता गेली. जनता पार्टी ला लोकांनी प्रचंड प्रमाणात मतदान केलं. याच जनता पक्षाच्या अंतर्गत कलहामुळे इंदिराजी 1980 साली पुन्हा निवडून आल्या. 'गरिबी हटाव' च्या मुद्द्यावर त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या. काही दिवसातच पुन्हा एका काळ्या पर्वाला त्यांना सामोरं जावं लागलं. ते म्हणजे ऑपरेशन ब्लु स्टार. सुवर्ण मंदिरात लपून बसलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी लष्कराला हेव्ही आर्टिलरी चा वापर करावा लागला आणि पवित्र सुवर्णमंदिरात रणगाडे घुसवल्याने शिखांच्या भावना दुखावल्या गेल्या. याचिच परिणीती दंगलींमध्ये झाली. फेब्रुवारी 1984 मध्ये, ज्यांच्या नावावरून पुण्यात पूल आहे, ते लंडन मधील भारतीय अधिकारी रवींद्र म्हात्रे यांचं 'जम्मू काश्मीर लिब्रेशन फ्रंट' च्या अतिरेक्यांनी अपहरण केलं आणि मकबूल भट या त्यांच्या म्होरक्याला सोडण्याची मागणी केली. इंदिराजींची भूमिका तीच, दहशतवादासमोर झुकणार नाही. दोन दिवसात रवींद्र म्हात्रे यांचं टॉर्चर केलेलं प्रेत सापडल्याची बातमी भारतात आली, आणि 4 दिवसात स्पेशल ऑर्डर काढून इंदिराजींनी मकबूल भट ला फासावर लटकावला! 31 ऑक्टोबर 1984 ला याच ऑपरेशन ब्लु स्टार चा रोष मनात ठेवून इंदिराजींची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या करण्यात आली आणि एक झंझावात अखेर थंड झाला.
लेखनविषय:

वाचने 21369
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

७१ चे युद्ध जिंकले असताना, ९३ हजार युद्धकैदी पकडले असताना पाकिस्तान नावाच्या कर्करोगाचे मुळातून निर्दालन करता आले असते. Demilitarisation आणि काश्मीर प्रश्नाचे भारतासाठी समाधानकारक उत्तर मिळवता असते, ते न करता सिमला कराराचे हाडूक मात्र गळ्यात अडकून घेतले.या मुद्द्यांवर चर्चा होताना का दिसत नाही ते इंदिराजींनाच ठाऊक असावे बहुधा.

आर्थिक निर्णयांबद्दलही बोलावे. MRTP (Monopolies and Restrictive Trade Practices) नामक एक महाभयंकर (draconian) आर्थिक कायदा आणण्याचं श्रेयही त्यांच्याच नावावर आहे. या कायद्याचा हेतू हा कुठल्याही उद्योगाला मक्तेदारी किंवा monopoly बनण्यापासून रोखणं हा होता, पण त्यामागचं तर्कशास्त्र फार अजब होतं. समजा बजाज आॅटोच्या एका प्लँटची क्षमता दिवसाला १,००,००० स्कूटर्स बनवायची आहे, तर बजाज आॅटो बाजारात मक्तेदारी निर्माण करु शकते. साधं अार्थिक तर्कशास्त्र वापरलं गेलं नाही, की निव्वळ उत्पादन करुन कुणीही मक्तेदारी बनू शकत नाही. त्यासाठी ते बाजारात विकलंही गेलं पाहिजे. पण निव्वळ उत्पादन करण्याच्या क्षमतेवरुन हे ठरवलं गेलं आणि अशा कंपन्यांना कोटा ठरवून देण्यात आला. परिणामी त्यांची वाढ खुंटली. त्यांना जर इतरत्र कुठे प्लँट काढायचा असेल तर सतराशेसाठ परवानग्या. त्यातून भ्रष्टाचार वाढला. धीरूभाई अंबानींसारख्या लोकांनी यात स्वतःचा फायदा करुन घेतला. कंपन्यांनी किती भांडवल उभारावं यावर नियंत्रण आलं. सर्वात मोठा तोटा म्हणजे खाजगी क्षेत्रातलं job creation थंडावलं. आणि हे सगळं समाजवदाच्या आणि गरिबी हटाओ च्या नावावर बरं का!राजीव गांधींनी आणि त्यांचे पहिले अर्थमंत्री (आणि नंतर विरोधक आणि प्रतिस्पर्धी) विश्वनाथ प्रताप सिंग यांनी त्यात थोडीशी सुधारणा केली, पण १९९१ चं नरसिंह राव- मनमोहन सिंग कृत उदारीकरण सुरु होईपर्यंत त्यात काही ठोस सुधारणा झाल्याच नव्हत्या. मनमोहन सिंग अर्थमंत्री म्हणून तितकेच जबरदस्त होते जितके पंतप्रधान म्हणून निष्प्रभ होते. MRTP ची उचलबांगडी होऊन Competition Act आला, ज्याने अनेक आमूलाग्र बदल घडवून आणले. आणि हे सगळं इंदिरा गांधींनी केव्हा केलं - जेव्हा दुष्काळाने देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती आणि उत्पादन वाढवण्याची गरज होती तेव्हा. नेहरूंच्या सरकारने अर्थव्यवस्थेत ढवळाढवळ सुरु केली होती, पण खाजगी क्षेत्राला स्वातंत्र्य होतं. इंदिरा गांधींनी ते स्वातंत्र्य काढून घेतलं. आणि का - तर आपले समाजवादी credentials दाखवून त्याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी. एक प्रकारे काँग्रेसने उदारीकरणाचं धोरण आणणं हा काव्यगत न्याय होता, कारण आपली अर्थव्यवस्था हा जो mess झाला होता त्याला निस्तरणं ही नक्कीच काँग्रेसची जबाबदारी होती. तेही डाॅ.सिंग यांच्यासारख्या non-political अर्थमंत्र्यामुळे शक्य झालं. त्याबद्दल पी.व्ही.नरसिंहराव या माणसाचं ऋण या देशाने मानलं पाहिजे.

कोटा राजचे कारण होते की विविध रिसोर्सेसची टंचाई असताना एखाद्या कंपनीने जास्त रिसोर्सेस वापरले तर इतर कंपन्यांना कमी रिसोर्सेस वापरायला मिळतील आणि त्यातून इतरांची अडचण होईल. कोटा राज नेहरूंच्या काळातही होते. १९५६ च्या औद्योगिक धोरणात खाजगी कंपन्यांना परमिट लागेल आणि उत्पादन वाढवायचे 'लायसेन्स' जर त्या वाढलेल्या उत्पादनाची देशाला गरज असेल तरच देण्यात येईल असे म्हटले होते. म्हणजे एका अर्थी अमुक एका मर्यादेपेक्षा उत्पादन करण्यावर बंदीच होती आणि त्याचे कारण वर म्हटल्याप्रमाणे टंचाई हे असावे. प्रश्न इतकाच की इंदिरा गांधींच्या काळापर्यंत तितकी टंचाई राहिली होती का? तसे असेल तर इंदिरांनाच लायसेन्स-परमीट-कोटा राज कमी करता आले असते. किंबहुना त्यांनी ते कसे करायला हवे होते हे गुरचरण दास यांच्या इंडिया अनबाऊंड सारख्या पुस्तकात म्हटलेही आहे. त्याउपर इंदिरांनी एम.आर.टी.पी सारखा कायदा आणलाच पण अनेक उद्योगांमध्येही सरकारचे स्थान वाढविले. कुठल्यानाकुठल्या कारणावरून राष्ट्रीयीकरण करणे हा तर स्वातंत्र्योत्तर भारतात स्थायिभाव होताच. खाजगी विमा कंपन्यांमध्ये भ्रष्टाचार चालतो म्हणून नेहरूंच्या काळात विमा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण झाले. इंदिरांनी 'सामाजिक न्याय' या गोंडस नावाखाली बँकांचे राष्ट्रीयीकरण केले हे वर लिहिलेच आहे. कोळसा कंपन्या कामगारांचे शोषण करतात म्हणून कोळसा उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केले आणि कोल इंडिया लिमिटेड स्थापन केली.त्याचबरोबर वीजनिर्मिती क्षेत्रात त्यापूर्वी राज्य सरकारे असायची पण १९७० च्या दशकात केंद्रही त्यात आले आणि एन.टी.पी.सी, एन.एच.पी.सी इत्यादी कंपन्यांची स्थापना झाली. इंदिरांच्याच काळात १९६७ मध्ये इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली. हीच कंपनी पूर्वीच्या काळी असलेला "इसी" टिव्ही बनवत असे. इंदिरांच्या काळात सरकारचा हस्तक्षेप सगळ्या क्षेत्रात वाढलाच आणि अचानक राष्ट्रीयीकरण होऊ शकेल ही भिती entrepreneurial spirit ला नक्कीच मारक होती. एकूणच इंदिरांची कारकिर्द म्हणजे आर्थिक आघाडीवर एक "वाया गेलेला काळ" होता.

तेरा दिवसात पाकिस्तान ला पाणी पाजून भारतीय सेना विजयी झाली आणि नवा बांगलादेश जन्माला आला.
बांगलादेश युध्दाविषयी मला नेहमी एक प्रश्न पडतो.१९७१ चे युध्द होणे क्रमप्राप्तच होते. किंबहुना ते युध्द व्हावे या दृष्टीनेच इंदिरांची पावले पडत होती. आता पश्चातबुध्दीने वाटते की आपण तसे करायला नको होते. पाकिस्तानने हल्ला केला तर तो परतावून लावायची क्षमता आपल्याकडे नक्कीच होती. युध्द आपण नुसता हल्ला परतावून लावण्यापुरते सिमीत ठेवले असते आणि पूर्वेत थेट ढाक्क्यापर्यंत घुसून बांगलादेश निर्माण केला नसता तर बरे झाले असते. तशीही बांगलादेशातील जखम ठसठसत होतीच आणि १९७१ नाही तर कदाचित १९७६-१९७७ पर्यंत बांगलादेश वेगळा झालाच असता. पण पाकिस्तानच्या अंगातील ती जखम आणखी काही काळ ठसठसत राहिली असती तर ते आपल्याला चांगले झाले असते. त्याऐवजी झाले असे की पूर्व पाकिस्तान ही शत्रूच्या अंगातील कॅन्सरची गाठ कापून देण्यात आपण मदत केली. त्यापेक्षा ती कटकट पाकिस्तानच्या डोक्याला आणखी काही वर्षे लागली असती तर बरे झाले असते. त्यावेळी हे इंदिरांच्या लक्षात आले नसेल असे वाटत नाही.पण एक सामान्य माणूस आणि १९७१ मध्ये पडद्यामागे नक्की काय चालू होते याची केवळ विविध लेखांमधून माहिती मिळवून एक पश्चातबुद्धी म्हणून मला हे नक्कीच वाटते.

In reply to by गॅरी ट्रुमन

पाक सैनिकांच्या दडपशाही ला कंटाळून हजारो निर्वासित भारतात येत होते. हे एक कारण म्हणून पुढे येतं. अर्थात नंतर हि ते येत राहिलेच म्हणा..

In reply to by गॅरी ट्रुमन

गॅरी ट्रुमन, बांगलादेश वेगळा काढायचं एक (माझ्या मते महत्त्वाचं) कारण म्हणजे अमेरिकेचा हिंदी महासागरात वावर वाढला होता. तसंच चीनही पाकिस्तानस मदत करंत होता. जर पूर्व पाकिस्तान तसाच राहू दिला असता तर भारतीय नौदलास पूर्व बंगालच्या सागरी सीमा पाळाव्या लागल्या असत्या. बांगलादेश वेगळा झाल्याने त्याच्याशी स्वतंत्र करार करून भारतीय नौदलास बंगालचा उपसागर मोकळा मिळवून दिला. हे युद्ध भारत विरुद्ध पाक एव्हढंच सीमित नाही. अमेरिका आणि चीन दोन्हींना एकत्रितरीत्या पराभूत केलं गेलं आहे. इंदिरा गांधींना आंतरराष्ट्रीय राजकारणाची खोलवर जाण होती. आ.न., -गा.पै.

In reply to by गॅरी ट्रुमन

जनरल झिया-उल-हक यांनी पाकिस्तानचं इस्लामीकरण केलं. तारेक फतेह यांच्या म्हणण्यानुसार ते भुत्तोंच्या तुलनेने उदारमतवादी विचारसरणीला उत्तर म्हणून झियांनी राबवलं कारण भुत्तोंच्या अशा धोरणामुळे पराभव झाला असं त्यांना हेतुपुरस्सर पसरवायचं होतं. अाय.एस.आय. चा वापर करुन भारतात अशांतता माजवणं झियांच्या काळात अजून आक्रमकरीत्या सुरु झालं. पंजाब आणि काश्मीर ही दोन उदाहरणं. याला भुत्तो सिंधी आणि झिया पंजाबी असल्याचाही पैलू आहे. १९७१ च्या निर्णायक पराभवामुळे पाकिस्तान covert operations कडे वळला असं आज आपण म्हणू शकतो. त्यावेळी अर्थातच इंदिरा गांधींच्या मनात असा विचार आला नसावा. नाहीतर भिंद्रनवाले नावाचा भस्मासूर त्यांनी निर्माण केला नसता.

विजुभाऊ,
इतके मूर्खासारखे विधान करत सुटला आहात की पुरावे वगैरे गोष्टी तुमच्यासाठी कधीच महत्वाच्या नसतात हे ओघाने आलेच.
मी मूर्ख आहे तर काय झालं. तुम्ही शहाणे आहात ना! मग तुमच्या शहाण्या मेंदूस कामाला लावा आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्या : १. फिरोझ गांधींची कबर हे काय प्रकरण आहे? पारशी लोकांत कबर बांधतात का? २. अलिगड मुस्लिम युनिव्हार्सिटीत विद्यार्थिनींसाठी इंदिरा गांधी हॉल आहे. इंदिरा गांधी मुस्लिम असल्याशिवाय कोणी हे नाव ठेवेल का? ३. संजय गांधीची सुंता झाली होती. (संदर्भ : जॉन मथाई यांचं पुस्तक) तर सुंता कोणत्या पंथात करतात? ४. मी एका हिंदूशी लग्न करायचा विचारही करू शकंत नाही. - इति इंदिरा गांधी. संदर्भ : जॉन मथाई यांचं पुस्तक. इंदिरा गांधीला हिंदूशी विवाह करण्यात कसला कमीपणा वाटंत होता? तूर्तास इतकं पुरे. आ.न., -गा.पै.