Skip to main content

आपण एवढे उद्धट का?

लेखक रविकिरण फडके यांनी शुक्रवार, 26/08/2016 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
['या सार्वजनिक सणांचे करायचे तरी काय' ह्यावर एक प्रतिक्रिया दिल्यानंतर आणि इतरांच्या वाचल्यानंतर काही विचार मनात आले तेव्हा लक्षात आले की हा थोडा general विषय होतो आहे. म्हणून हे नवीन लिखाण.] माझ्या स्वतःच्या आणि इतर जवळचे मित्र व आप्तेष्ट ह्यांच्या परदेशातील विविध अनुभवावरून असे दिसते की आपण भारतीय लोक एकूणच सामाजिक व्यवहारात दुसऱ्यांशी उर्मटपणे किंवा उद्धटपणे वागतो, आपल्यात बऱ्याचदा किमान सौजन्याचासुद्धा अभाव असतो. हे असे का? असे काय झाले की ज्यामुळे आपण भारतीय असे 'वैशिष्ठ्यपूर्ण' बनलो? मी कुणी अभ्यासू, सामाजिक शास्त्रज्ञ, वगैरे नाही. मला पडलेल्या प्रश्नाचा मागोवा scientifically कसा घ्यावा मला माहीत नाही. म्हणून हे पोस्ट. माझ्या मते दोन कारणे संभवतात; एक, आपल्या समाजात समता हे तत्व कधीच नव्हते. त्यास जातीभेद हे बहुधा प्रमुख कारण असावे. जातीच्या उतरंडीत कुणीतरी माझ्या वर असतो, कुणीतरी खाली. बरोबर कुणी नाही. त्यामुळे मी लांगुलचालन करतो किंवा उर्मटपणाने वागतो. दुसरा माझ्यासमान आहे, त्याला माझ्याइतकेच हक्क आहेत, हे आमच्या रक्तातच शिरलेले नाही. ह्याची उदाहरणे द्यायची गरज नाही इतक्या संख्येने ती आपल्याला दिसतात. शिकली सवरलेली माणसे असंस्कृतपणे वागतात, आणि भारतात असेच वागायला हवे असे ते मानतात. दुकानात चार कस्टमर्स पुढे असतानाही मध्ये घुसून आपणास हव्या असलेल्या गोष्टींची मोठ्या आवाजात ऑर्डर देणे, रांगेत घुसणे, कुणी आपल्यापुढे (आपल्या दृष्टीने) जरा हळू गाडी चालवत असेल तर त्याला 'तुम्हारे बाप का रास्ता है क्या' विचारणे, आजूबाजूला कुणी आहे नाही हे न बघता थुंकणे, इ. गोष्टी सामान्य आहेत. एकदा You Tube वर कुणीतरी रफी साहेबांची त्याला आवडणारी गाणी टाकली आणि त्यांची थोडीशी माहिती दिली होती. त्यात रफीच्या जन्मतारखेत एक चूक झाली; 1924 चे 1942 झाले. तर एकाने comment काय टाकावी? 'अबे, तू क्या दो पेग पिया था क्या?' आपण इतके असहिष्णू व असभ्यपणे वागतो. आपण ईशान्य भारतातील लोकांना त्यांच्या दिसण्यावरून हिणवतो. कारण उच्च नीचता भाव आपल्यात भिनलेला आहे. शहरीकरण: लहान गावात ह्या उद्धटपणाला आपसूकच मर्यादा पडतात. सगळेजण एकमेकास ओळखतात. बँकेत काउंटरवरील माणूस मला संध्याकाळी बाजारात नाहीतर सिनेमागृहात भेटतो. आम्ही नावाने एकमेकाला ओळखतो. त्यामुळे उद्धटपणाला किंवा अरेरावीला एक स्वाभाविक मर्यादा पडते. शहरात तसे होत नाही. मी कुणावरही जोरजोरात ओरडू शकतो, भांडण करू शकतो. शहरी जीवनात ताणतणावही खूप अधिक असतात ज्यांचा परिणाम क्षुल्लक गोष्टींवरून वाद आणि भांडणात होतो. ज्यांनी मुंबईतील लोकल गाडीतून बऱ्यापैकी प्रवास केला आहे त्यांना हा मुद्दा लगेच पटेल. आणि हे शहरीकरण वाढतच जाणार आहे. आणि त्याबरोबर आपला उद्धटपणाही. कारण हे शहरीकरण कसे झाले पाहिजे, माणसे इतक्या दाटीवाटीने राहत असताना कोणते नियम पाळले गेले पाहिजेत, ती सर्व घडी कशी घालायला हवी, ह्याबद्दल कोणताही विचार कुठल्याही पातळीवर झाला असण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. आता तो होणेही दुरापास्त आहे. सिस्टीम जेवढी जास्त बिघडते तेवढी ती रुळावर आणणे कठीण होऊन बसते. मी माझ्या मुंबईतील, आणि काही प्रमाणात अन्य शहरातील, अनुभवावरून हे विधान करतोय. आणि शिवाय, सुधारणेची काही गरज आहे हे मान्य करणे ही पहिली पायरी असते. तीच जर कुणालाही चढायची नसेल तर पुढे बोलणे बंद. काही उदाहरणे: 1) रस्त्यावरील वाहतूक: ह्याची एवढी दुर्दशा झाली आहे की काही बोलणे व्यर्थ ठरावे. वाहतूक सुरळीत असण्यासाठी जे जे म्हणून घटक असतात त्यातील एकही धड नाही. वाहतुकीचे नियम, ड्रायव्हर्स चे प्रशिक्षण, सिग्नल सिस्टीम, रोड मार्किंग्स...कुठलाही एलिमेंट घ्या. आपली सरधोपट पद्धत म्हणजे 'प्रॉब्लेम आहे? मग अधिक पोलीस तैनात करा' ही आहे. एक साधा प्रश्न विचारा की कोणत्याही सिग्नलला चार पाच ट्रॅफिक पोलीस कशासाठी हवेत? तेच पोलीस अन्य जास्त महत्त्वाच्या कामाला लावता येणार नाहीत? (आज परिस्थिती अशी आहे की पोलीस नसतील तर कुणीही कुठलाही सिग्नल पाळणार नाही! पण ते कारण नव्हे, परिणाम आहे.) पण हा प्रश्न आपले ट्रॅफिक पोलीस कमिशनर विचारीत नाहीत. ते आपली तीन वर्ष ड्युटी करतात आणि बदली झाली की जातात दुसरीकडे. ह्यातून वाढीला काय लागते तर उद्धटपणा, अरेरावीची वृत्ती, नियम मोडण्याची प्रवृत्ती, प्रसंगी हिंसाचार. 2) जवळपास 1965-70 पर्यंत मुंबईत बस स्टॉपवर लोक रांग लावून बसमद्धे चढायचे. आता आम्ही बस आली की तिच्यावर हल्लाच करतो. हे थांबवणे सहज शक्य होते. बेस्टने फक्त एवढेच करायचे होते की एक जाहिरात द्यायची; रांग नसेल तेथे बस थांबणार नाही. आणि नाही थांबवायची बस जर स्टॉपवर रांग नाही दिसली तर. पण हे तेव्हा नाही केले आणि आता करणे अशक्य आहे. 3) पाश्चिमात्य देशांत, निदान मी हे इंग्लंड मध्ये तरी पहिले आहे, तेही आज नव्हे तर 30 वर्षांपूर्वी, अगदी पोस्ट ऑफिस सारख्या ठिकाणीसुद्धा common queue multiple service windows ही पद्धत असते. आपल्याकडे हे अजूनही अपवादानेच दिसते. का? आपल्याला करता येणार नाही? मुंबईतील रेल्वे स्थानकावर तिकिटाच्या रांगेत उभे असताना अचानक एक खिडकी बंद झाल्यानंतर (उदा, भोजनासाठी) लोक ज्या रीतीने दुसऱ्या खिडकीवर धावतात ते ज्यांनी अनुभवले आहे त्यांना त्यातला त्रास कळेल. पण रेल्वेला त्याचे काय होय? ही बेपर्वा वृत्ती - वि डोन्ट केअर - मग सर्व लोकांत उतरते. 4) सर्वात महत्त्वाचे, शहरात आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही अशा रीतीने वर्तणूक ठेवण्याबद्दलचे नियम घालून देणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे ह्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाले. परिणामी, शहरे म्हणजे फक्त अवाढव्य वाढलेली खेडी असेच त्याचे रूप झाले. राहणे शहरात, मानसिकता मात्र खेडूतांची ह्या विरोधाचा जो काही परिणाम झाला तो आपणा सर्वांना दिसतोच आहे. शहरे कशी असावीत ह्याच्या सुस्पष्ट कल्पना जर राज्यकर्त्यांना असत्या आणि त्या त्यांनी अंमलात आणल्या असत्या तर ह्या भारतीय मानसिकतेला, जी मुळात असमानतेवर आधारलेली आहे, बऱ्याच प्रमाणात मुरड पडली असती. त्यायोगे सर्व समाज हळूहळू सुधारला असता. ती संधी आपण गमावली. सत्तर वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता एकूण लोकसंख्या आणि शहरी लोकसंख्येचे प्रमाण, ही दोन्ही प्रचंड वाढली आहेत. त्याच्या जोडीला आणखी एक गोष्ट वाढली आहे ती म्हणजे, राजकीय पक्षांचा / नेत्यांचा बेजबाबदारपणा. हे सर्व फार घातक रसायन (potent combination) आहे ज्याचा केव्हाही स्फोट होऊ शकतो. नव्हे, तसे ते होतातच आहेत, फक्त लहान प्रमाणात. उदा. भारतात दर वर्षी एक दीड लाख लोक रस्ते अपघातात मरतात. लोकसंख्येचा विचार केला तरी हे प्रमाण फार जास्त आहे. इतर देशात ह्याच्यावर अतिशय गंभीरपणे विचार झाला असता. आपल्याकडे '80% अपघात हे मानवी चुकांमुळे होतात' असे निष्कर्ष काढले की काम भागते. मुद्दा असा आहे की कमीतकमी संघर्षाशिवाय माणसे आपापले व्यवहार करतील अशा सिस्टिम्स आखून दिल्या नाहीत व त्यांची कठोरपणे अंमलबजावणी केली नाही तर हम करेसो कायदा ही वृत्ती, अरेरावी, उद्धटपणा, मग्रुरी, ह्या गोष्टी वाढतच जाणार. नाहीतर, आपली असमानतेवर आधारलेली भारतीय मनोवृत्ती आणि त्यात अस्ताव्यस्त शहरीकरणाची फोडणी, म्हणजे 'आधीच मर्कट तशातही मद्य प्याला' अशी गट व्हायची. नव्हे, झालीच आहे. कालचा दही हंडीचा शिमगा दुसरे काय दर्शवितो? असो. हे माझे विचार झाले. तुम्हाला काय वाटते हे जाणून घ्यायला आवडेल.

वाचने 21454
प्रतिक्रिया 121

प्रतिक्रिया

एका वाक्यात सांगायचे तर..... आपल्याकडे, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार. अशी भावना निर्माण झालेली आहे.असे माझे मत... आणि.....हे सत्य ओळखायची आणि पचवायची ताकद, बर्‍याच लोकांकडे नाही. गेल्या १०००-१२०० वर्षांची गुलामगिरी अद्यापही सुरुच आहे. पुर्वी सरंजामशाही होती आणि आता आमदारकी आणि खासदारकी. असो, तुम्ही व्यक्त केलेल्या मुद्यांशी मी १००% सहमत आहे.

तुमचे मुद्दे एकदम बरोबर आहेत. आणी दिवसेंदिवस हा उन्माद/उर्मटपणा कमी होण्याऐवजी वाढत चाललेला आहे. पण ह्याला उपाय काहीच नाही. कारण दुसऱ्या कुणी लोकांना सुधारण्यापेक्षा लोक स्वतः स्वयंशिस्त झाले तरच हे शक्य आहे. आणी आपण चुकीचे वागत आहोत असे कुणालाच वाटत नाही.

In reply to by अभिजीत अवलिया

+ १ आणि असे सांगणार्‍या माणसाला त्रासच जास्त होतो. खरा तो एकच, "गाडगे बाबा", असे माझे मत.

In reply to by मुक्त विहारि

माझ्या घरातील मुले (माझी आणि माझ्या भावाची) आमच्या बरोबर असतील तर आम्हा घरातील कोणालाच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून देत नाहीत, अगदी चॉकलेटचे व्यार्पर सुद्धा. सिग्नल तोडून देत नाहीत, फोनवर मोठ्याने बोलून देत नाहीत. देव दर्शनाला गेलो तर मध्ये रांगेत घुसून देत नाहीत. अगदी अधिकारवाणीने आणि निरागसतेने म्हणतात आमच्या टीचर ने सांगितलं आहे. कवतुकाने आम्ही सर्व जण त्यांचे आदेश ऐकतो. आपल्याला नाही सुधारता/ सुधरावता आलं तरी ह्या नव्या पिढी कडून नक्कीच अपेक्षा ठेवू शकतो. कारण त्यांना या गोष्टीचे मह्त्व खूप लहान वयातच समजलं आहे.

नुसते उद्धट नाही तर माजुरडे पण. प्रत्येकाने आपली मानसिकता बदलल्याशिवाय यात सुधारणा होणार नाही. आपल्याला सगळ्या चांगल्या गोष्टी इतरांनी केल्या पाहिजेत आणि वाईट गोष्टी इतरांनी करू नयेत असं वाटतं. परिसर स्वच्छ ठेवणे हे सरकारचे काम, वाहतुकीचे नियम दुसऱ्याने पाळावे, भ्रष्टाचार दुसऱ्याने करू नये, माझ्या बहिणीकडे, मैत्रिणीकडे दुसऱ्या कोणी बघू नये पण मी मात्र दुसऱ्या कुठल्याही मुलीची छेड पण काढू शकतो.... अजून बरीच मोठी यादी होऊ शकते. सद्यपरिस्थिती बघता एकूणच सुधारणा अवघड वाटतेय.

आपण एवढे उद्धट का?
साक्षात मिपावर हे वाक्य वाचायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. म्हणून मुद्दाम लॉग-इन होऊन प्रतिसाद दिला!! :) बाकी जाणकारांच्या विवेचनाच्या प्रतिक्षेत... (स्वगतः तेज्याअसला, आमचं पूर्वीचं मिपा र्‍हायलं नाही!!!)

In reply to by पिवळा डांबिस

+ १ मिपाच्या आरंभाच्या काळातील, पेजर जावून स्मार्ट फोन आले आणि पब्लिक पण जरा स्मार्ट झाले.

In reply to by चंपाबाई

हेहेहे, चंबा लैच चान्स पे डयांस हाय. ;)

In reply to by चंपाबाई

चार चार वेळा हाकललं तरी मागच्या दाराने घुसतात आणि त्या रांगेत असलेल्या कस्टमर्स वर जसा तो नंतर येऊन मोठ्या आवाजात ऑर्डर देणारा उलट शिरजोरी करतो तसे करतात.. लबाड झालेत लोक फार ...

प्रत्येकजण स्वतःचाच विचार करतो कुणाची पर्वा नाही लोकल बसेस तर उद्धतपणाचे अड्डे बनले आहेत हल्ली प्रवाशांच्या उतरण्याचीही वाट बघितली जात नाही गाडी स्टेशनात आल्या आल्या तुटून पडतात समोर स्त्री आहे कि लहान मुलं आहेत ,वृद्ध आहेत यांना देणंघेणं नसत खरच हर भयानक अनुभव असतो

एक अनुभव पुणे स्वारगेट बस स्थानका बाहेरचा जेधे चौक, जगातला एक फार मोठा भुलभुलैय्या. एकदा रात्री सिग्नल लाल आहे आणि पादचारी रस्ता ओलांडताय म्हणून थांबलो होतो. (इथला सिग्नल रात्री उशिरा पर्यंत चालू असतो). मागून लोकांनी हॉर्न मारून मारून दणाणून सोडले. एक पोलीस माझ्याजवळ आले आला. मी काच खाली केली. घ्या की साहेब गाडी पुढे. अहो सिग्नल लाल आहे, लोक रस्ता ओलांडतायत. लोकांची काळजी नाही करायची आपण. त्यांचे ते करतात रस्ता बरोबर क्रॉस. चला पुढे. आता सांगा ज्याने हॉर्न मारणाऱ्या लोकांना हॉर्न मारण्याबद्दल खडसावले पाहिजे त्याची ही मुक्ताफळे. कुणा कुणाला शिस्त लावायची? आणी कसा हा देश सुधारायचा ?

In reply to by अभिजीत अवलिया

+१११, माझा एक अनुभव, मी परदेशात आल्यानंतर एका भारतीय मित्राने मला एक गोष्ट सांगितली, तो बोला कि जर येथील स्थानिक कंपनीपुढे एकाच क्षमतेचे किंवा पात्रतेचे भारतीय, चिनी आणि जापनीज उमेदवार असतील तर ते चिनी किंवा जापनीज उमेदवार घेतील कारण ते नम्र असतात तसेच त्यांचं बोलणं मृदू असत. अर्थात त्यावेळी मला त्याच मत पटलं नाही कारण त्याला कोणताही बेस न्हवता. परंतु 2.5 वर्षांनंतर जेंव्हा मी एका कंपनीची मुलाखत देऊन रुजू झालो तेंव्हा मला माझा स्थानिक मॅनेजर बोलला कि भारतीय लोक जेंव्हा काही मागतात तेंव्हा अस वाटत कि त्यांची भाषा विनंती ऐवजी आदेशाची असते. त्यावेळी मला परत माझ्या मित्राचं वाक्य आठवलं. आणि स्वतःच्या स्वभावाच्या केलेल्या परिक्षणातून सुद्धा हे नंतर जाणवलं, त्यामुळं स्वतःला बदलणे क्रमप्राप्त झाले.

In reply to by अमितदादा

भारतीय लोक तांत्रिक दृष्ट्या कमकुवत असतात का?माझ्यामते उत्तर नाही असावे, ती कंपनी हॉस्पिटॅलिटी बिझनेस मधली आहे का? नसल्यास त्या कंपनीवर रेसिजमचा आरोप केल्यास काय चूक असेल?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

नाही हो बापू, त्या मित्राचे ते वैयक्तिक मत होत जे मला त्यावेळी हि नव्हते पटले, ते त्याच interpretation होत. हे कोणत्याही कंपजीच ऑफिसल मत नव्हतं अन्यथा माझ्या सारख्या भारतीय लोकांना नोकरीच नसती मिळाली. माझ्या कंपनीच्या स्थानिक मॅनेजर ने informal बोलतांना त्याच मत व्यक्त केलं जे मला स्वतःचा स्वभाव परीक्षण करताना सत्य आहे असं वाटलं, तसेच त्यावेळी मित्राच्या मताची आठवण झाली.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापू, अमित म्हणतात तसा आदेशात्मक भाषा मला मुंबईला आलो तेव्हा प्रकर्षाने जाणवली, आपल्याकडे सहसा अपरिचित व्यक्तीला आदेशात्मक भाषा आपण वापरत नाही, निदान अकोल्यात तरी, एक प्रकारचे सौम्यसे सौजन्य जाणवते, तुमचा काय अनुभव?

In reply to by संदीप डांगे

असे खासकरून निरीक्षण केले नाही, अकोला पहिल्या श्वासापासून अंगळवणी पडले म्हणून, अन मुंबई मध्ये अकोल्याच्या शिकवणी मुळे! ती म्हणजे "जो माह्यासंग सरका मी त्याच्यासंग सरका, जो हेकोडा चालन त्याले आपुन बी हेकोडे" =)) डांगे बुआ तुम्ही मुंबईत जास्त राहले, तुम्हीच सांगा बापा चार दोन उदाहरणे, म्हणजे मले आठोता येइन जर का मी ते फेस केलं आसन तर!!

In reply to by संदीप डांगे

माझा अनुभव आणि मत. इथली स्थानिक संस्कृती अशी आहे की मुलगा सुद्धा आईला छोट्या छोट्या गोष्टींना थँक्स म्हणतो, तेंव्हा नम्रपणा आणि आभार मानण्याची सवय ह्यांना लहानपणापासून असते. याउलट माझ्यासारखे भारतीय ज्यांना प्रेम आणि मार thank u किंवा sorry ची अपेक्षा न करता भेटलं, जे हवं ते हक्काने मागायचं लाजयच नाय हि सवय लागली त्यात कुठतरी नम्रतेचा अभाव होता अस मला वाटलं. कोणतं चांगलं कोणतं वाईट हे नाही सांगत कारण हा दोन संस्कृती मधील फरक आहे.

In reply to by अमितदादा

अमितदादा या बाबतीत माझं निरीक्षण सांगते. भारतात नोकरीसाठी मुलाखती घेताना जे निकष लावले जातात त्यांत आणि परदेशातील मुलाखतींच्या निकषांमध्ये थोडा फरक आहे. माझ्या व्यवसायाचा एक भाग म्हणून मी बऱ्याच वेगवेगळ्या डेसिग्नेशन्स साठी मुलाखती घेतल्या आहेत(व्ही.पी. सोडून). मला असं जाणवलं की आपल्या लोकांना आत्मविश्वास आणि आगाऊपणा (ओव्हर कॉन्फिडन्स) तसेच स्पष्टवक्तेपणा आणि उर्मट/उद्धटपणा यांत जी पुसट सीमारेषा आहे तीच लक्षात येत नाही. त्यामुळे समोरच्याचा सहज गैरसमज होतो. दुसरं म्हणजे आपण व्यावसायिक औपचारिकतेमध्ये बऱ्याच वेळा मार खातो.

मिसळपाववर ही काही कमी उद्धट मंडळी नाहीत . वैयक्तिक टीका करणे , टीका करताना अत्यंत आक्षेपार्ह्य भाषा वापरणे , हे प्रकार इथेही सुरु आहेत.

In reply to by अभिदेश

सहमत. आपण एखादा लेख लिहिला आणी त्याच्यावर नकारात्मक प्रतिक्रिया आल्या किंवा कुणी उलट प्रश्न केले की बऱ्याच सदस्यांचा पारा चढतो. विरोध असेल तर तो वैचारिक असावा, वैयक्तिक न्हवे. पण असे करायचे सोडून लोक स्कोर सेटलिंगच्या मागे लागतात. माझ्या लेखावर नकारात्मक प्रतिक्रिया देतोस काय, थांब मी पण तुझ्या लेखावर देतो ही वृत्ती. ह्यातून होते काय तर लेख पाहून प्रतिक्रिया देण्यापेक्षा लेखक पाहून प्रतिक्रिया दिल्या जातात.

In reply to by अभिजीत अवलिया

हो हो, अगदी सहमत. आपण नुसते माझे नावच घेतले नाहीत तर विचारही घेतलेत असे वाटत आहे. द्या रॉयल्टी.

In reply to by अभ्या..

"अभि-अभि" आल्यासारखा प्रतिसाद आहे हा अगदी प्रतीध्वनी म्ह्टला तरी चालेल फक्त तीन मध्ये आलाय. हा उद्धटपणा आहे हे बालपणी न सांगीतल्याने, आणि लग्न झाल्यावर सुधरेल या पालकांच्या भाबड्या आशावादाने मुले-मुली दोन्हीही उद्धटपणालाच "बोल्ड्/डॅशींग्/डेरींग/ओपन मांईड" अश्या आवरणात मिरवत राहतात, आणि याचे त्यांनाच काय इतरांनाही वावगे वाटत नाही. वाहतूक नियम पाळल्याने नेभळट ठरलेला नाखु

लेखातील मतांशी १०० टक्के सहमत. आणि नुसते 'एव्हढे' उद्धट नाही तर, खुपच उद्धट व उर्मट देखील ! ! लेखात दिलेली उदाहरणे कमीच आहेत, पण , प्रत्यक्षात, भरपुर ठिकाणी आमचा उद्धट्पणा ठळकपणे दिसतोच. वाढती लोकसंख्या, अपुर्ण साधने, अश्वाश्वती, माझे जग फक्त मी व माझे कुटुंब याभोवतीच फिरणारे, त्यामुळे इतरांबद्द्ल बेपर्वाई, सामाजिक बांधिलकी नुसती तोंडाने म्हणायची, प्रत्यक्ष आपणास त्यातुन किती ओरबाडता येईल याचाच फक्त विचार. या सर्वांना शिस्त कोण आणि कशी लावणार ? मी अजुन तरी एकही मंडळ असे पाहिले नाही कि ज्यांच्याकडून असा एखादा तरी कार्यक्रम / उपक्रम राबवला गेला की ज्यातुन नागरीकांना शिस्तीचे महत्व कळेल. १९७४ - ७५ सारखा ' दंडुका ' सतत कामी येत नाही आणि लादलेली शिस्त व स्वयंशिस्त यात खुप फरक आहे.

संयमाचा अभाव हे पण एक कारण आहे दुसऱ्याच्या आदर , संयम इ इ फालतू गोष्टी मुला ना शिकवायच्या कटकटीत आपण पडत नाही

:-( :-(

"संयमाचा अभाव हे पण एक कारण आहे दुसऱ्याच्या आदर , संयम इ इ फालतू गोष्टी मुला ना शिकवायच्या कटकटीत आपण पडत नाही."

१००% मान्य आहे. स्वतःला न सुधारता जग सुधरेल असे जोपर्यंत लोकांना वाटते हे असेच सुरु राहणार आहे.

In reply to by अजया

स्वतःला न सुधारता जग सुधरेल असे जोपर्यंत लोकांना वाटते हे असेच सुरु राहणार आहे.
1++ Rude

मी लेखकाच्या विचारान्शी सहमत आहे. एक आश्चर्य नमूद करवएसे वाटते ते असे की इतक्या प्रतिसादामधे अजून एकानेहि इथे आवडत नसेल तर परदेशी रहायला जा असे लिहिलेले नाही. काही मिपा सदस्य बदललेले दिसतात. (यावर आता माझ्यावर स्तुतिसुमने उधळली जातील)

१००% सहमत. पुढल्या पिढीवरही तसेच संस्कार होताना दिसतात. उद्दध्टपणा म्हणजेच स्मार्ट्नेस, अरेरावी म्हणजेच गट्स असणे; अशी चुकीची समीकरणे दृढ होताना दिसता आहेत. नियमाप्रमाणे वागणारा बावळट ठरतो.

"""माझ्या स्वतःच्या आणि इतर जवळचे मित्र व आप्तेष्ट ह्यांच्या परदेशातील विविध अनुभवावरून असे दिसते की"""... समस्या अशी आहे की बहुतांशी भारतीय लोकांनी परदेश अनुभवला नाही त्यामुळे आपल्या परिघाबाहेर जग कसं आहे हेच माहित नाही. पण परिस्थिती नक्कीच हळूहळू बदलेल.

In reply to by विशुमित

संस्कारांची, भाषेची, इतिहासाची, विचारांची, लोकसंख्येची, संपत्तीची, देशाची, कशाची पण.

In reply to by अभ्या..

अभ्या भाऊ- तुमची हरकत नसेल तर अदला बदली करण्यापेक्षा वाटून खाऊ की..!! माझा जास्त फायदा होईल. बाकी मी आपल्या स्वदेशातच असल्यामुळे एकत्र राहून बाकी गोष्टींच्या वाटण्या होऊ शकतात.

In reply to by विशुमित

>>>समस्या अशी आहे की बहुतांशी भारतीय लोकांनी परदेश अनुभवला नाही त्यामुळे आपल्या परिघाबाहेर जग कसं आहे हेच माहित नाही. पण परिस्थिती नक्कीच हळूहळू बदलेल. हे समस्ये वरचं उत्तर आहे??? माझ्या मते सामान्यत: शिस्त नसणे, कायद्याचा नि कायद्याच्या थेट रक्षकांचा वचक नसणे, आपल्याला शिक्षा होऊ शकेल अशी भीती नसणे आणि लाच देण्या घेण्यावर असलेला प्रचंड विश्वास ही कारणं दिसतात

In reply to by उडन खटोला

मुद्दा बहुतेक सेल्फ व्हॅल्युएशनचा आहे. आपली समाजाच्या(ह्यात घरापासून देशापर्यंत सगळे आले) दृष्टीने काय व्हॅल्यु आहे आणि त्यासंदर्भात काय कर्तव्ये आहेत ह्याचे अज्ञान हे मूळ कारण असावे. आय मिस यू डीअर संजयजी आणि विवेकजी ;) म्या पळालो बरका ह्या धाग्यावरुन.

In reply to by अभ्या..

कर्तव्यं विसरतात बरोबर. हक्क मात्र ठोकुन आणि वाजवून घेतात लोक. चालायचं.(हे असं चालवून घेतल्यानं आणखी फावतं)

In reply to by उडन खटोला

जो पर्यंत आपण आपल्या परिघामध्ये असतो तो पर्यंत आपल्याला आपल्या आणि आजू बाजूच्या लोकांच्या कृती चालून जातात. पण आपण जेव्हा आपल्या परिघाबाहेरील जग अनुभवतो त्यावेळेस नक्कीच आपल्यात बदल होतो. आणि तोच बदल आपण आपल्या परिघामध्ये आल्यावर इतर लोकांना समजावताना दिसतो. पण सुरवातीला नेहमी प्रतिकार असतो आणि जेव्हा प्रतिकार करणाऱ्याला अनुभव येतो तो पण नक्कीच बदलतो. शहरात येई पर्यंत गावाकडे बहुतेक सगळेच लोक उघड्यावर शौचाला जायचे. त्यावेळेस त्याचे कधीच वावगे वाटत नव्हते. उघड्यावर शौचाला गेले नाही पाहिजे हे माहित असून देखील त्याचे महत्व माहित नव्हते. पण आता परस्थिती तशी नाही. गावाकडे शौचालय बांधून घेतले. माझी मुले शहरातच वाढत असल्यामुळे ते ही गावाकडे गेल्यावर उघड्यावर जात नाहीत. हा झाला माझ्यातील बदल. पण या उलट गावामध्ये अजूनही बहुतांशी लोक उघड्यावरच जातात. त्यांना त्याचे दुष्परिणाम समजवायला गेलो तर 4 ग्यान मलाच शिकवतात. त्याला मी उर्मटपणा नाही म्हणू शकत. त्यामुळे हळूहळू ही परिस्थितीही बदलेल.

In reply to by विशुमित

ह्यात आपण कुठंतरी कमी आणि इतर देश कुठेतरी जास्त चांगले हा दृष्टिकोन दिसतोय. स्वच्छते चे धडे शाळेत मिळतात ओ. जे माझं नाही ते माझं नाही, ते हिस्कावण्याची कृती मी करु नये हे साधं नैतिक कृत्य कुणीतरी समजावून सांगावं? खाल्लेल्या ताटात हागुन (मिपा नुकतंच प्रगल्भ झाल्यानं सगळ्या शब्दांना परवानगी आहे असं समजलंय) घाण करु नये हे अगदी मूलभूत ज्ञान जर आपल्याला नसेल तर आपण काय कुणाला सांगणार?

In reply to by विशुमित

माफ करा असं जनरलाझेशन करणं शक्य नाही. याला गणिती पद्धतीने उत्तर मिळणार नाही. कधी कधी प्रदेशात वास्तव्य करणा-या तथाकथित सुशिक्षित भारतीय व्यक्ती इथे आल्यावर मोकळया श्वासाचे सुख घेतल्यासारखे सिव्हिक सेन्स ची पार काशी (जास्तच सभ्य शब्द) करतात. तर कधी सवईने नम्र शब्द फक्त फेकतात. उलट कधी कधी असेही अनुभव येतात की सुधारणा नक्की होईल अशी आशा वाटायला लागते. एकदा सकाळी सातच्या सुमाराला सायकल वरून जात असताना एका छोट्या चौकात कुठलाही सिग्नल नव्हता. एक BMW SUV येत होती म्हणून वाट देण्यासाठी मी वेग कमी केला ऑल्मोस्ट थांबलो पण ती कार फारच सुरक्षित अंतर ठेवून मी पास होण्यासाठी थांबली होती. मला बाउन्सर होता, असली स्वप्न पण कधी पडत नसल्यामुळे आधी त्याच्या हेतू बद्दल संशय आला. भानावर आल्यावर त्या माणसाला हातानेच धन्यवाद देवून पुढे निघून गेलो.

In reply to by झेन

आखाती प्रदेशात चारचाकी वाहनांनी असे थांबून पायी चालणार्‍या आणि दुचाकीस्वारांना मार्ग देण्याची पद्धत आहे. त्या BMW वाल्याचे बरेच वास्तव्य आखातात गेले असेल.

In reply to by पगला गजोधर

BMW घ्यायची ऐपत आली तर तेव्हढ्या पैशात मी एखादी सदनिका, दुकान किंवा जमिनीचा तुकडा विकत घेणे पसंद करेन. बाकी, पेढ्यांसाठी गणपती बाप्पाच्या नैवद्या पर्यंत थांबा.

Not Sure...if Author is overly sensitive, Or Everyone's being rude in the world. rude

आपल्यात बऱ्याचदा किमान सौजन्याचासुद्धा अभाव असतो. हे असे का? असे काय झाले की ज्यामुळे आपण भारतीय असे 'वैशिष्ठ्यपूर्ण' बनलो?
सौजन्याचा अभाव का असतो हे मोठं कोडं आहे त्याचं उत्तरही माहित नाही पण भारतीयांचं सौजन्य कसं शेण खायला जातं याचं एक उधाहरण देतो. मी पटायात रहातो म्हणून इकडचं उधाहरण. बिच रोडवर चेपून दारू पिऊन मळमळून उलट्या करणाऱ्या जमातीत भारतीयांचा नंबर पहिला. इतर देशीय देखील करतात पण, १) तो जर युरोपियन असेल तर जवळच्या ७/११ शॉपमधून पाण्याची बाटली घेऊन येतो आणि स्वतः साफ करतो. २) तो जर मिडल ईस्टवाला असेल तर जवळच्या क्लीनरला पैसे देतो आणि साफ करून घेतो. ३) तो जर जापनीस असेल तर त्याची कृती पाहून आपल्या डोळ्यात पाणी येतं. तो प्रथम बीचवर असलेली एखादी चेअर रेंटवर टेम्पररी घेतो, उलटीला कव्हर करतो जेणे करून कोणाचा पाय पडू नये. मधल्या वेळात पाणी घेऊन येतो नाहीतर सफाई कामगाराला घेऊन येतो. आणि, तोच जर आपला परमपूज्य भारतीय असेल तर. निर्लज्जपणे निघून जातो. हटकलं तर म्हणतो हे सफाई कामगार काय फुकटचा पगार घेणारेत का? 'अतुल्य भारत' बिरुद अक्षरशः मिरवतात.

आणि पुणे, दिल्ली वगैरे नेहमीचे यशस्वी मुद्दे आले नाहीत? अरेरे! पूर्वीचं मिपा राहिलं नाही! - (नम्र मुंबईकर) बोका-ए-आझम.

आपल्या मनातले विचार दुसर्‍या अनोळखी व्यक्तीने मांडल्यावर बरे वाटते की इतरही काही जणांच्या मनात हाच प्रश्न किंवा मुद्दा आहे. ट्रॅफिकमधल्या रोजच्या वादामुळे, रस्त्यावर कचरा फे़कणार्‍यांमुळे, प्रतिष्ठित सोसायटयांमध्ये कर्कश स्पीकर लावणार्‍यांमुळे असं वाटतं हे acute syndromes आहेत. chronic issue हा आपल्या विचार करण्याच्या पद्धतीचा, इतरांकडे सरसकट दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीचा आहे. मी यात भारतीय अभारतीय वगैरे मुद्दे आणत नाही. हे मी भारतात तरी अनेक ठिकाणी पाहिलं आहे. जपान वगैरे गहिवरून टाकणारी उदाहरणे सोडून द्या. आणि परदेश अनुभवल्या शिवाय एक मूलभूत सभ्यपणा / सिव्हिक सेन्स येऊच नये काय?? यावर उपाय काही सुचलेला नाही. कारण नियम केला तर तो लगेच सोयीसाठी तोडण्याकडे कल असतो. सत्तेची, पैशाची, लोकबळाची (मॉब, ग्रूप इ.), गुंड सामर्थ्याची, सामाजिक स्थानाची मग्रुरी.. पण सभ्य नॉर्मल जॉब करणारे सुद्धा बेमुर्वत पणे वागताना पाहून जेवढी चीड येते तेवढेच अस्वस्थही वाटते की सुशिक्षित लोक असे कसे वागतात..

आपाल्याकड प्रगति हाय ! म्या माज्या बापाबरोबर ज्येव्ढा उद्ढट व्हतो ते परीस माज्या मुली माझ्यासी ज्यादा उड्धट हायती. हे देश बिश चं काय नाय हा प्यीडीचा फरक हाय !

लेखातल्या विचारांशी पुरेपूर सहमत. उर्मटपणाविषयी आणखी एक मुद्दा सांगता येईल. आपल्याला एखादी सेवा देणारा समोरचा माणूस जर थोडी कमी दर्जाची समजली जाणारी (खरे तर असा दर्जा असू नये, पण..)सेवा देत असेल तर आपण त्याच्याशी अजिबात आय काँटक्ट करीत नाही. त्याच्याकडे लक्षही देत नाही. म्हणजे झाडूवाला, वॉचमन, रिक्शाचालक, बस ड्राय्वर-कंडक्टर, हाय वेवर टोल गोळा करणारे कर्मचारी, रस्त्यावर पॅट्रोलिंग करणारे पोलिस इत्यादि. मग थँक यू म्हणणे दूरच. परदेशात प्रत्येकाला ह्लो, तुम्ही कसे आहात एव्हढे तरी विचारतात. शिवाय मला वाटते आपली भाषाच आदेशात्मक आहे. आपण दुकानातल्या विक्रेत्याला 'मला अमुक द्या, तमुक दाखवा',असे म्हणतो. परदेशात 'मी हे विकत घेऊ का/ घेऊ शकतो का?' असे विचारतात. एकदा परदेशातून निघताना एक वापरलेले जुनट दिसणारे भारतीय ऑइंटमेंट चुकून हातपिशवीत राहिले होते. समोरच्या बाईंनी 'हे बरोबर बाळगता येणार नाही' असे सांगितल्यावर तोंडातून चुकून 'हो. हो. काढून टाका ते' असे निघून गेले. त्यावर त्या बाईंच्या झालेल्या प्रतिक्रियेचा अर्थ बर्‍याच वेळाने उमगला.

मात्र एका मुद्द्यावर नाही. "पण हा प्रश्न आपले ट्रॅफिक पोलीस कमिशनर विचारीत नाहीत. ते आपली तीन वर्ष ड्युटी करतात आणि बदली झाली की जातात दुसरीकडे." मला आठवतंय की पुण्याच्या म्युनिसिपल कमिशनरनी दहा एक वर्षांपूर्वी हे धाडस केलं होतं. फुटपाथवरील भाजीवाल्यांनी केलेली अतिक्रमणे हटवण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अतिक्रमणे नगरपालिकेनी काढून टाकली की काही दिवसात परत येतात तेव्हां नगरपालिका काय करीत असते? वगैरे प्रश्न तिरिमिरीने विचारले जात होते. तेव्हां कमिशनरसाहेबांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. ते म्हणाले, "आम्ही आमच्या परीने अतिक्रमणे उठवतो. मात्र ती परत का येतात? ज्या जनतेला ह्या अतिक्रमणाचा त्रास होतो त्यांनी रस्त्यावर भाजी खरेदी करणे थांबवले तर आपसूकच अतिक्रमण थांबेल! रस्त्यावरच्या भाजीवर भयानक प्रमाणात धूळ आणि वाहनांच्या धुरामुळे रसायनांसहित कार्बन बसलेला असतो. चार पावलं जास्त चालून मार्केटमध्ये जाण्याऐवजी आपणच फुटपाथवरची भाजी विकत घेतो आणि मग नगरपालिकेच्या नावानी दवंडी पिटतो." झालं! सगळे नगरसेवक त्यांच्यावर तुटून पडले! पुढच्या सात दिवसात ते सात वर्षांनी वयस्क झाले असणार! प्रत्येक काम सरकारचंच आहे अशी जोपर्यंत आपली मनोधारणा आहे तोपर्यंत आपण असेच खितपत पडणार यात शंका नाही.

In reply to by स्वीट टॉकर

सेम. रिक्शावाल्यांच्या आडदांड वागणुकीला त्यांच्या ट्राफिक रुल न पाळण्याला असेच उत्तर कमिशनरांनी दिले होते. "तुम्ही रिक्शा स्टोपपर्यंत जाता का? मधेच थांबवता का? मीटरचा आग्रह धरता का? रिक्शावाल्याला फास्ट चल असे हुकुम सोडता का? तीनपेक्षा जास्त जण बसता का? सगळे गप्प बसले अथवा परवडत नाही अशी कारणे देत गेले. रिक्शावाल्यांच्या बाबतीत न बोलणेच बरे पण सर्वसामान्यांनी स्वतःची सोय बघताना दुसर्‍याला त्रास होउ नये एवढे पाह्यले तरी ठिक. ज्यांना सगळ्याच गोष्टीचा त्रास होतो त्यांच्याबद्दल न बोलणे इष्ट.

In reply to by स्वीट टॉकर

भारत देशात विविधतेचा वृथा अभिमान आपल्या प्रतिज्ञेतच आहे. आपण या विविधतेला मान तुकवून प्रत्येक धर्मासाठी वेगवेगळे कायदे घटनेत मान्य करून अक्षम्य चूक केली आहे. सार्वजनिक जागेच्या पवित्रतेची आपल्याला आजिबात चाड नाही. न्यायालयांच्या निकालांची चाड नाही. आपल्याला मिळणार्या भत्यांची पगाराची चाड नाही. असो जास्त लिहित नाही नाहीतर देशद्रोहाचा खटला व पाकिस्तानला चालते व्हा ची धमकी !

अतिशय सहमत! लोकांना राजकीय स्वातंत्र्य आधी हवे का सामाजिक सुधारणा या वादात आगरकर जास्त बरोबर होते असं आता वाटायला लागलंय. आपल्याला फक्त स्वातंत्र्य पाहिजे, जबाबदार्‍या नकोत.

खरच सुंदर धागा. आपले काहीतरी चुकतेय हे सर्वांनी इतके मनापासून मान्य केलेय की बस्स. धागा भरकाटावयाचे २-३ प्रयत्न होऊनही तो मूळ रस्त्यापासून तसूभरही लांब गेला नाही. तसेच ह्या सर्व चुकीच्या गोष्टी बंद व्हाव्यात ही तिव्र इच्छा तर इतकी जाणवली की त्याला तोड नाही. Collective cautiousness मधे प्रचंड ताकद असते. त्यामुळेच मला अस वाटायला लागलय की, आपण नक्कीच बदलणार. _/\_

In reply to by शाम भागवत

नक्कीच चांगला बदल घडेल. आता थोडी चांगली बातमी फक्त प्रतक्ष्यात येऊदे म्हणजे झालं. सकाळ मधील बातमी कोल्हापूर:डॉल्बीच्या विसर्जनाचा वज्रनिर्धार http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5632686659589245849&S…ताज्या%20बातम्या&NewsDate=20160827&Provider=-%20सकाळ%20वृत्तसेवा&NewsTitle=कोल्हापूर:डॉल्बीच्या%20विसर्जनाचा%20वज्रनिर्धार(Video)

काही मुद्दे आपण लक्षात घेतले तर असे का होते हे लक्षात येईल १९४७ मध्ये आपली लोकसंख्या ४० कोटी होती आणि आता १२५ कोटीच्या वर गेली आहे. म्हणजे तिपटीपेक्षा जास्त. आपल्या पायाभूत सुविधा तिपटीपेक्षा जास्त वाढल्या का? नाही हे खेदाने म्हणावे लागते. काल बसने जाणारे प्रवासी १०० होते आणि बस ४ होत्या आणि आज प्रवासी ३०० असतील तर प्रगती झाली म्हणण्यासाठी बस १२ नव्हे तर १५ ते २० हव्या होत्या पण प्रत्यक्षात बस ८ च आहेत. हिच स्थिती सर्व शहरांमध्ये पायाभूत सुविधानमध्ये आहे. एक्स्प्रेस वे चालू झाला तेंव्हा त्यावरून जाणारी वहाने किती होती आणि आता हि संख्या किती प्रचंड प्रमाणात वाढली आहे हे पाहून आपल्याला लक्षात येईल. आता मी नागरी जाणीव (सिव्हिक सेन्स) ठेवून स्त्रिया, मुले आणि वृद्धांना पहिल्यांदा जागा द्यायला लागलो तर शक्यता अशी आहे कि मला चार तास तरी बस मिळणार नाही आणि बस मिळाली तरीही त्यात बसायला जागा नक्कीच मिळणार नाही. हे जर रोज व्हायला लागले तर माणूस अगतिक होतो आणि म्हणतो खड्यात गेला सिव्हिक सेन्स. एखाद माणूस खैरनार व्हायचा प्रयत्न करतो पण त्याला सुद्धा मर्यादा पडतात. इतकी दुरवस्था असूनही आपल्याकडे दंगली किंवा जाळपोळ हि इतकी जास्त होत नाही हे थोडेसे आपल्या सहिष्णू वृत्तीत आहे. जेथे जेथे माणसे कमी असतील तेथे माणसाची किंमत जास्त असते. मानवी मूल्ये हि एक भागिले लोकसंख्या अशी असते यामुळे स्वातंत्र्याचे वेळेस असलेले मानवी मूल्य आता १/३ झाले आहे.

In reply to by सुबोध खरे

हे जर रोज व्हायला लागले तर माणूस अगतिक होतो आणि म्हणतो खड्यात गेला सिव्हिक सेन्स.
कहर हसलो...! एकदम सहमत!

In reply to by सुबोध खरे

विमानात बोर्डिंग करताना आसन क्रमांक ठरलेले असतात, प्रत्येकाला आगाऊ माहीतही असतात. प्रवेशासाठी क्रमवारीनुसार पुकारले जाणार हेही ठाऊक असते. पण भारतीय प्रवासी आपल्या कॅबिन बॅगा पायांशी धरून इतरांची वाट अडवत दरवाजापाशी कसेही उभे असतात. डोमेस्टिक फ्लाइट असेल आणि दोन तीन मित्रांचे एक दोन ग्रूप असतील तरीही इतका कालवा असतो की कर्मचारिणी जे क्रमांक पुकारते ते ऐकूही येत नाहीत. दिल्लीहून एखादा ग्रूप शिरला तर विचारायलाच नको. आसनाच्या हातांवरून तंगड्या मार्गिकेमध्ये सोडून मार्गिकेपलीकडच्या आसनावरील मित्राशी समोर तोंड करून गप्पा हाणणे, क्रूने सरळ बसा म्हणून सांगूनाही न जुमानणे, लँड होताना पट्टे घट्ट बांधायचे तर दूरच राहिले, उलट आपापल्या बॅगा वरून खाली घेण्याची शर्यत लागणे, लँडिंग पूर्ण होऊन दरवाजे उघडण्यापूर्वीच निर्गमनदारापाशी रांग लावण्यासाठी इतरांना ढकलून पुढे जाणे, जे हलत नाहीत त्यांना चलो चलो (सिग्नल सुटण्याआधीच पें पें सुरू होते तसे) अशी घाई करणे असले प्रकार पाहिले आहेत. मुळात सौजन्याची कमतरता आहे हेच खरे. न्यू यॉर्कच्या भुयारी रेल्वेतले भारतीयांचे वर्तन सर्वात बेशिस्त असते. उतरायचे नसेल तरीही दरवाजाजवळ उभे राहाणे, उतरणार्‍यांना जागा करून न देणे, गर्दीत अंग चोरून आणि दुसर्‍याला कमीत कमी स्पर्श होईल असे न उभे राहाता धसमस करणे, दरवाजे उघडताच कारण नसताना धाडकन आत घुसणे, स्थिर उभे न राहाता (इतर लोक स्थिर उभे असतात तरी) निष्कारण हातांपायांची हालचाल करणे, कोपर पुढेमागे करणे असे अनेक प्रकार दिसतात. समूहाने समूहात जगण्याची सवय नसणे किंवा सभोवतालाचे आणि स्वतःचे भान नसणे ही दोन कारणे संभवतात. मुंबईत तर दुपारच्या वेळी लोकल गाड्यांना फारशी गर्दी नसते आणि तीन मिनिटांनी पुढची गाडी असते तरीही जिन्यावरून एक पायरी सोडून धाड धाड उतरत धावत येऊन गाडीत उडी टाकताना जवळ उभे असलेल्यांना धक्का बसून ते गाडीच्या दिशेने फेकले जाऊ शकतात इतकेही भान राहात नाही. किंवा काही तिकिट खिडक्या दहाच्या पटीत भाडे असलेल्या तिकिटांसाठीच किंवा काही ठराविक स्थानकांसाठीच्या तिकिटांसाठीच असतात, तसे वर ठळक लिहिलेले असते पण ते न वाचताच (हे अशिक्षित नसतात.)कुठेही रांग लावणे आणि नंबर आल्यावर तिकिट नाकारले गेले तर 'इतना टाइम खडे हैं' म्हणून कांगावा करणे अशा छोट्या छोट्या गोष्टी नेहमी दिसतात. सुविधा कमी आहेत हे खरेच पण आपत्काळातही काही देशांतील लोकांचे वर्तन अतिशय धीरोदात्त असते. दुसर्‍या महायुद्धात ब्रेडच्या एका तुकड्यासाठी शिस्तशीर रांगा लावल्या गेल्याची उदाहरणे आपण वाचतो. माझी स्वतःची आवडती कारणमीमांसा अशी आहे की हे आधुनिकीकरण आणि शहरीकरण (अर्बनाय्ज़ेशन) अजून आपल्यात पुरते मुरलेले नाही. अजूनही मनाने आपण मुक्त मोकळ्या अशा वनवासी आदिम अवस्थेत आहोत. ही भूमी, हे जल, आकाश सारे आपलेच आहे आणि ते कसेही वापरावे ही ट्राय्बल मानसिकता आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. इथे आपल्यामध्ये म्हणजे अर्थातच मिपावासीय नव्हेत तर बहुसंख्य भारतवासीयांमध्ये. शिवाय जातीच्या उतरंडीचा थोडासा प्रभावही अजून आहेच.

In reply to by राही

अजूनही मनाने आपण मुक्त मोकळ्या अशा वनवासी आदिम अवस्थेत आहोत. ही भूमी, हे जल, आकाश सारे आपलेच आहे आणि ते कसेही वापरावे ही ट्राय्बल मानसिकता आपल्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे.
नाही. माझ्यामते आदिवासी उलट निसर्गाच्या जास्त जवळ असतात त्यामुळे ते उपलब्ध गोष्टी अतिशय योग्य प्रकारे वापरतात. आपण जर नासधूस केली तर आपल्यालाच त्रास होईल हे त्यांना ठाऊक असते. जे आहे ते सर्वांचे आहे हेही ते जाणून असतात. बाकी मूळ चर्चेचा विषय हा पीचडीचा आहे त्यामुळे सध्या तरी त्यावर काही भाष्य करता येईल असे दिसत नाही! :)

In reply to by चतुरंग

ट्राय्बल लोक निरागस असतात. पण तो अप्रगत टप्प्यावरचा निरागसपणा असतो. लहान मूल मोठे होताना त्याला बाह्य जगाचे व्यवहार समजू लागले की त्याच्यातली निरागसता लोपते तसेच. मला ग्रामीण जीवन आणि शहरीकरण यांच्यातला फरक मांडायचा होता, जो धागालेखकानेही अधोरेखित केला आहे. नवनवी सार्वजनिक उपकरणे आणि सोयी पुरेशा अवधानाने वापरल्या जात नाहीत. पूर्वीचे रेल्वे स्टेशनांवरचे सार्वजनिक टेलेफोन किंवा रेल्वेची तिकिट छापून देणारी यंत्रे किंवा अलीकडे झोपडपट्टीपुनर्निर्माण योजनेखाली बांधलेल्या इमारतीतल्या लिफ्ट्स इतक्या आडदांडपणे वापरल्या जातात की त्या लगेचच नादुरुस्त होतात. शहरांचे काही नियम असतात. यात ड्रेनेज, सार्वजनिक मालमत्तेचा योग्य आणि हळुवार वापर,(यात पाणी, वीज, वाहातूक साधने वगैरेही येतात.) दुसर्‍याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याला, मालमत्तेला धक्का न लावणे या गोष्टी येतात. पण या गोष्टींचे महत्त्वच मनावर ठसलेले नसते. दुसर्‍याच्या कुंपणावरची फुले फळे तोडताना आपल्याला काही वावगे वाटत नाही. फुलांसाठी फांदी ओढता ओढता ती तुटली तरी अपराधी वाटत नाही. आमच्या इथे मी लावलेल्या रोपांना आधारासाठी वाळलेल्या फांद्या रोवून रोपे त्यांना बांधली होती तर शेजारच्या उंच झाडाची फुले तोडण्यासाठी गोखली म्हणून त्याही बिनदिक्कत उपटल्या जातात. त्यात लहान रोपांचे नुकसान झाले त्याचा विचार/ खंतच नाही. हा विचारच नसणे किंवा याचे भानच नसणे हे मला आदिम संस्कृतीचे लक्षण वाटते. आदिम संस्कृतीमध्ये प्रयेक गोष्ट उपयुक्ततेवर मोजली जाते. घरातला म्हातारा आजारी पडून शिकार किंवा अन्नासाठी बाहेर पडेनासा झाला की त्याचा घरातून मिळणार्‍या अन्नाचा वाटा कमी केला जातो. रोख ठोक व्यवहार आणि उद्याची प्रोविजन नाही. आज हाताशी आहे त्यानिशी जगून घ्यायचे. सभोवतालाचा पोत बिघडला तर उठून दुसरीकडे जायचे ही ती ट्रायबल मानसिकता.