Skip to main content

कुकडेश्वर रानभाजी महोत्सव

लेखक त्रिवेणी यांनी मंगळवार, 23/08/2016 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, २०-२१ आॅगस्टला कुकडेश्वर रानभाजी महोत्सवला गेलो होतो तेथील मनोज हाडवळे यांनी लिहिलेला ृतांत इथे शेअर करते आहे. जुन्नरमध्ये रंगला अनोखा रानभाजी महोत्सव काही दिवसांपुर्वी “लोकसत्ता” मध्ये कुकडेश्वर येथे होणाऱ्या रानभाजी महोत्सवाची बातमी वाचली. मागच्या वर्षीसुद्धा कुकडेश्वरला रानभाजी महोत्सव झाला होता पण माझ्या वाचनात न आल्याने, ती संधी हुकली होती. पण यावर्षीची संधी सोडायची नाही असे मनोमन ठरवूनच टाकले होते. वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून, स्थानिक तरुणांच्या सहभागातून हा रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. वनवासी कल्याण आश्रम गेली ६० वर्ष असे विविध कार्यक्रम राबवत असल्याचे कळले. आहुपे येथे खूप छान प्रकारे अशा रानभाजी महोत्सवाचे आयोजन होत असते, जुन्नरमधील कुकडेश्वराला आताशी सुरवात होत आहे. जुन्नर पर्यटन चळवळीत काम करत असताना, असं काही नवीन होऊ घातलं कि तिथे जाऊन, ते अनुभवण्याची, चांगलं ते अनुकरण्याची प्रबळ इच्छा असते. २१ ऑगस्ट, दिवस ठरला होता. त्याधी एक ५ दिवस मला प्र के घाणेकर सरांचा फोन आला, कि मी पण रानभाजी महोत्सवाला येणार आहे, आदल्या दिवशी तुझ्याकडे येतो, जुन्नरचे नवीन बरेच फिरायचे आहे, ते फिरत येतो, काही सोबत उद्या फिरू. माझ्यासाठी तर हा दुग्धशर्करा योगच होता. घाणेकर सर व त्यांचे सहकारी दिवसभर जुन्नर फिरत, संध्याकाळी पराशरवर पोहोचले. त्यांच्याकडील १०००० पेक्षा जास्त कात्रणांच्या संग्रहातून त्यांनी जुन्नर विषयीची कात्रणे सोबत आणली होती. त्यात अभिजित बेल्हेकर, धर्मेंद्र कोरे यांची २००३ पासूनची अनेक कात्रणे होती. त्यात मी न पाहिलेल्या अनेक गोष्टी होत्या. वयाच्या ६९ व्या वर्षी हि विद्यार्थी वृत्ती मला बरेच काही शिकवून गेली. वर्ष दोन वर्ष थोडफार फिरून, मी सगळं बघितलय म्हणणाऱ्या वृत्ती एकीकडे आणि हे ऋषितुल्य काम एकीकडे. असो. घाणेकरांची एक शाखा आपल्या राजुरी गावी सुद्धा होती. त्याविषयी मी त्यांना नेहमी विचारत असायचो. ती माहिती दाखविण्यासाठी, त्यांनीच लिहिलेली घाणेकर वंशवेल ते घेऊन आले होते. त्यांच्या वंशवेलीतून माझ्या गावचा, राजुरीचा १९५० पासूनच इतिहास कळायला मदत होणार होती. २१ तारखेला, रविवारी आम्ही सकाळी ७ च्या ठोक्याला कुकडेश्वराकडे निघालो, मजलदरमजल करत, रस्त्यात येणारी, त्यांना माहित असलेली, काही मला माहित असलेली ठिकाणे बघत आम्ही कुकडेश्वराला पोहोचलो. जुन्नरच्या पूर्व पट्ट्यातून, पश्चिमेकडे जात असताना, वातावरणात होणारा बदल जानवण्या इतपत होता, इकडचे तापते उन, तिकडच्या शीतल गारव्यात बदलले होते. कुकडेश्वराच्या शिरवाळी हवेतून, कुकडीच्या उगमस्थानी डोंगरमाथ्यावरून वहात येणारे धुके, डोंगरापलीकडच्या वेगळ्या विश्वाची झलक देत होते. सुमधुर आवाजातील संगीताच्या नादामध्ये, तरुण पोरं रांगोळी ठिपक्या ठिपक्याने रांगोळी सांडत होती.. तसं कुकडेश्वराचे मंदिर मी बऱ्याचदा पाहिले होते पण मंदिर कसे पहावे? याचा अनुभव साक्षात घाणेकर सरांकडून घेत होतो, त्यामुळे माझ्यासाठी तर हि पर्वणीच होती. कुकडेश्वराच्या प्रत्येक भेटीत या मंदिराच्या सभोवती विखुरलेले तसेच मंदिराचे दगड खूप साऱ्या कहाण्या नव्यानेच सांगू पहातात. मंदिर पाहून होईपर्यंत, वनवासी कल्याण आश्रमाची गाडी पोहोचली. स्थानिक तरुणांनी नाचणीची पेज स्वागताला तयारच ठेवली होती. कुकडेश्वराच्या ओलसर वातावरणातील गारव्यामध्ये नाचणीच्या आंबट गोड पेजीच्या चवीने नवचैतन्य भरले. वनवासी कल्याण आश्रमाच्या अंजली घारपुरे यांच्याशी ओळख झाली, आपल्या जुन्नर पर्यटन चळवळीची त्यांना माहिती दिली. हा उपक्रम पुढे कसा घेऊन जाता येईल यावर चर्चा झाली. तोपर्यंत कुकडेश्वर परिसरातील आया बाया पारंपारिक वेशभूषेत आपापल्या कल्पकतेने रांधलेल्या रानभाज्यांच्या पीतळ्या, वाट्या, कटोऱ्या घेऊन येऊ लागल्या. सोबतीला नाचणीची लालसर भाकरी, ज्वारी, बाजरी, तांदळाची भाकरी, चपाती आणि घरगुती तांदळाचा भात होताच. या रानभाज्यांच्या खमंग चवीने पावले आपोआप तिकडे ओढली गेली. माझ्यासाठी तर सगळंच नवीन होतं. भाज्यांची नावंही आणि चवही. कोण कोणत्या आणि किती किती भाज्या आल्या होत्या? एकूण २७ प्रकारच्या रानभाजा घेऊन ५८ बायका आल्या होत्या. मग त्यात वयस्कर आजींपासून पोरसवदा पोरी पण होत्या. वनवासी कल्याण आश्रमाने या रानभाज्यांचे परीक्षण करायला त्यांना उत्तेजन म्हणुन बक्षीस द्यायला अभ्यासू परीक्षक आणले होते. मग एका एका रानभाजीची ओळख सुरु झाली. रानभाजीचे नाव वेगळे, चव वेगळी, गुणधर्म वेगळे, करण्याची पद्धत वेगवेगळी. त्यात बरका, चीन्चुर्डे, गोमेठा, तेरा, कुर्डू, शेवगा, चिरका, चावा, चीत्रूक, भारंगी, फानभाजी, खुरसने, कुरुळा, करंजा, म्हसवेल, पाथरी या पालेभाज्या, कर्टुली, गोमेठा, आवळी, सायरधोडे, कोळू, उंबर, भोकरी या फळभाज्या, मायाळूच्या पानांची भजी, हळदा कंदाची भाजी, तर भारंगीच्या फुलांची भाजी असे रानभाज्यांची रास समोर होती. आणि सोबतीला १२ प्रकारच्या तांदळाचे वान ठेवले होते. नाही म्हणायला, यातल्या ४-५ भाज्या खाण्यात आल्या होत्या, प्रत्येक भाजीजवळ जाऊन, त्याची माहिती घेऊन, भाकरीचा तुकडा मोडून भाजीला लावून खाताना काय वाटायचे म्हणुन सांगू [लिहितानासुधा तोंडाला पाणी सुटले आहे]. एक फेरी मारून झाली कि थोडा वेळ बसायचे, तोपर्यंत कोणीतरी नवीन भजी घेऊन आलेले असायचे कि पुन्हा एक फेरी, अशा ३-४ फेऱ्या झाल्या. २७ प्रकारच्या भाज्या खाताना पोट भरत होते पण मन भरत नव्हते. घाणेकर सर भाज्यांची शास्त्रीय नावे सांगत होते आणि मी शक्य होईल तेवढी साठवून ठेवत होतो. स्थानिक तरुण पण आजूबाजूलाच होते. त्यांच्याशी जुन्नर पर्यटन आणि भविष्यातील संधी, त्यात आपला सहभाग यावर चर्चा सुरु होती. तेवढ्यात वनविभागाची गाडी आली. गाडीतून सुनील लिमये सर उतरले. लिमये सर चीफ कॉन्झार्वेटर ऑफ फोरेस्ट वाइल्ड लाईफ या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे ३ जिल्ह्यांचा चार्ज आहे. माझे मित्र Kalyan Taware या अवलियाच्या आर्याबाग सांस्कृतिक ग्रुप या वोट्स अप वर आम्ही एकत्र आहोत. घारपुरे ताईंनी त्यांचे स्वागत केले. मी बाजुलाच होतो, वोट्स अप ग्रुपवर एकत्र असलो तरी प्रत्यक्षात भेट हि तशी पहिलीच. मी त्यांना नाव सांगताच त्यांनी आपुलकीने चौकशी केली. जुन्नर पर्यटनाच्या सगळ्या पोस्ट आवर्जून वाचत असतो हे सांगितले. वन विभागाच्या सोबतीने आपण एकत्रितपणे काय काय करू शकतो यावर आमची ओझरती चर्चा झाली. आर्याबाग सांस्कृतिक ग्रुपच्या आठवणींना उजाळा दिला. मग लिमये सरांसोबत पुन्हा रानभाज्यांच्या आस्वाद घेत एक फेरी झाली. त्यांनी रानपुत्रांचे कौतुक करत, त्यांच्या कामाला उत्तेजन दिले व रानभाज्यांचा येथेच्छ आस्वाद घेऊन पुण्याकडे रवाना झाले. त्यांच्या अनपेक्षित भेटीने माझ्यासाठी रानभाजी महोत्सवात अजुनच चव भरली गेली. जुन्नरमधील पर्यटन चळवळीतील इतरही कार्यकर्ते तोपर्यंत पोहोचले होते. परीक्षकांचे मनोगत झाले, बक्षीस वितरण झाले आणि आता जेवायला आजूबाजूच्या रानपुत्रांच्या घरी जायचे असे ठरले. मधल्या वेळेत पावसाने दोन वेळा हजेरी लावली होती त्यामुळे वातवरणात अजुनच गारवा भरला होता. मंदिराजवळील चढावरच्या घरी गेलो, तांदळाची गरम गरम भाकरी, गोमेठ्याची भाजी, हातसडीचा भात आणि उडदाची आमटी. हे खायला पोटात जागा आणि भूक कुठून आली हेच कळले नाही पण दणकून हाणली. आम्ही तिघांनी १-१ किलो तांदूळ विकत घेऊन निघते झालो. जेवताना मावशींसोबत गप्पा मारत होतो. पावसाळ्यातील त्यांचे जगणे ऐकत होतो. औसेपुनवेला रानभाजा खाणारे आपण इथल्या रानपुत्रांना कधीतरी हौस म्हणुन आणि बऱ्याचदा गरज म्हणुन रानभाज्या खाव्या लागतात हे कळले. काय कारण? पुरामुळे रस्ता वाहून जातो, पावसाची सततधार लागली तर बाजारहाट करत येत नाही, म्हणुन ३-४ महिन्याचा शिधा एकदाच भरून ठेवायचा. बसके घर, त्यातच सगळा संसार. या रानभाज्यांमधील औषधी गुणधर्म यांच्यावर चांगलेच लागू पडतात. आपण जुन्नर पर्यटनात वेगळे तरी काय करत असतो. हि रानसंस्कृती, लोकसंस्कृती लोकांना अनुभवायला देताना निसर्गाला, रानपुत्रांना कुठल्याही प्रकारे त्रास न होता संवेदनशील पद्धतीने आपण जबाबदार पर्यटन करत असतो. हा रानभाजी महोत्सव मला तरी खूप काही शिकवून गेला, भरभरून देऊन गेला. या माध्यमातुन झालेल्या नवीन ओळखी जुन्नर पर्यटन चळवळीतून रोजगार निर्मितीसाठी कशा वापरता येतील याचा अभ्यास तर कधीच सुरु झालाय. पर्यटनातून शाश्वत विकास हे धेय्य ठेवुन शक्य त्या शक्यता पडताळून पहायच्या आहेत. विचारांची तंद्री लागली होती, त्याच तंद्रीत घाणेकर सर आणि आम्ही खूप साऱ्या आठवणी मनात घेऊन, रानभाज्यांची चव ओठांवर साठवून परतीच्या प्रवासाला निघालो. आधी ठरल्याप्रमाणे रस्त्यात लागणाऱ्या तुळजा लेणी पहायला गेलो, घाणेकर सरांची अभ्यासू वृत्ती तीथेही दिसलीच. तुळजा लेणींचे मुखदर्शन घेऊन घाणेकर सर पुण्याकडे रवाना झाले आणि आम्ही राजुरीकडे. माझा तर दिवस कारणी लागला होता. तुम्हालाही जर रानभाजी महोत्सवाचा आस्वाद घ्यायचा असेल तर येत्या रविवारी, २८ ऑगस्टला आहुपे येथे, वनवासी कल्याण आश्रमाने आयोजन केले आहे. त्यासाठी ९६०४६२२६२८ अंजली घारपुरे यांना संपर्क करा. केवळ ३ महिन्यांपूर्वी स्वतःची किडनी आपल्या मुलीला देऊन, त्या रानभाजी महोत्सवाच्या तयारीला लागल्या, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आपण जर निसर्गप्रेमी असाल, काहीतरी वेगळे चाखायची इच्छा असेल तर अहुप्यातील रानभाजी महोत्सवाला आवर्जून भेट द्या, फ़क़्त निसर्गात जाताना आपल्याकडून निसर्गाला काही हानी होणार नाही याची काळजी घ्या. मनोज हाडवळे अध्यक्ष जुन्नर पर्यटन विकास संस्था ९९७०५१५४३८ www.junnartourism.com

वाचने 30429
प्रतिक्रिया 78

प्रतिक्रिया

जाहीर धागा काढणे ही विनंती.. लेकीसह येण्याचा संकल्प करीत आहेत सोबत कुकडेशवर असल्याने स्थानीक "गड-किल्ले-प्रेमी" येताल अशी खात्री वाटते.. चित्रे व लेख अप्रतिम. अश्या रान भाजांचे महोत्सव पवनाथडी/भीम्थडीत भरविले पाहिजेत (भेल-पकोडी-आप्पे-चाट-दोसे असल्यांनी जागा अडवण्यापेक्षा केंव्हाही चांगले) वरील पदार्थांचा वमान करण्याचा हेतू नसून ते आजकाल गाड्यांवर्/उपहारगृहात्/ठेल्यावर सहजी उपल्ब्ध आहेत आणि त्याची चव घ्यायला भीम्थ्डी/पवनाथडी कशाला हवी ? या अनवट भाज्यांची चव शहरी माणसांना सम्जावी /अनुभवावी म्हणून तरी. गाव्रारान तांदुळजा भाजी जेजुरी पायथ्याच्या खेड्यात आणि घोळू व कुर्डु (नक्की नाव काय माहीती नाही) ही भाजी चिंचोली (देहूरोडजवळची ) इथे १५ वर्षांमागे चाखली त्याची आठवण आली. धन्यवाद माणसांच्या रानातला नाखु

In reply to by नाखु

नाखुचाचा, येत्या रविवार आहुपेला आहे, तुम्ही ह्या रविवार बद्दल बोलताय का पुढच्या वर्षीच्या? सांगा म्हणजे प्लान करता येईल, माझ्याइथून दोन तास आहे. मी जाईन अशी शक्यता ९० टक्के आहे.

खाली माहितीची पोस्ट शेअर करत आहे. असाच रानभाजी महोत्सव येत्या २७-२८ तारखेला आहुपे इथे होत आहे. मी तिथे ही जाणार आहे. kukdeshwar

वा! फारच छान माहिती. रानभाजी महोत्सव माहित नव्हता. पुढच्या तारखेला जमवायचा नक्की प्रयत्न करते.

लहाणपणी पावसाळ्यात अनेक रानभाज्या खालल्या आहेत. अनेक दशकांनंतर आज त्यांची चव विसरायला झाली असली तरी, पावसाळा सुरू झाला की त्या भाज्यांची वाट पाहिली जात असे हे अजूनही आठवते. आज या सगळ्या भाज्या पाहून आठवणी जाग्या झाल्या आणि तोंडाला पाणी सुटले :) अजूनही या भाज्या पावसाळ्यात रानोमाळी नैसर्गिकपणे वाढतात आणि वनवासी जन त्या तेथून तोडून विकायला आणतात किंवा स्वतः खातात. यांची खास शेती होत असल्याचे ऐकून नाही. या भाज्या केवळ जैववैविध्य म्हणूनच नव्हे तर चवदार अन्नवैविध्य म्हणून काळजीपूर्वक जतन करून ठेवल्या पाहिजेत. नाहीतर कालाच्या ओघात हा उत्तम अन्नप्रकार नाहिसा होईल.

या भाज्या केवळ जैववैविध्य म्हणूनच नव्हे तर चवदार अन्नवैविध्य म्हणून काळजीपूर्वक जतन करून ठेवल्या पाहिजेत. नाहीतर कालाच्या ओघात हा उत्तम अन्नप्रकार नाहिसा होईल. बाडीस

त्रिवेणी, खरोखर एका अनोख्या आणि अनवट महोत्सवाची ओळख करुन दिल्याबद्दल आभार. अश्या महोत्सवांची जाहिरात करुन त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचायला हवी. जसे अनेक व्यापारी पेठांमध्ये अनेक छोटे उद्योजक येउन भाग घेतात तसेच रानभाज्याचे पदार्थ असे स्टॉलस ही बघायला आवडतील. ( अर्थात ऋतुमानानुसार मिळणार्‍या भाज्या) --मयुरा

एक्काकाकांशी एकदम बाडिस. एकदम अनवट अशा या भाज्या एकदा तरी खाल्ल्याच पाहिजेत. इफ पॉसिबल यांपैकी काहींची शेतीही करता येईलसे वाटते....

खुप चांगली माहीती आहे. मी ३० च्या वर रानभाज्यांच्या रेसिपीज लिहील्या आहेत. पुस्तकाचे काम जरा थांबले आहेत. डोंबीवलीतही दर वर्षी पर्यावरण दक्षता मंच हे रानभाज्यांचे प्रदर्शन भरवत असते. दोन वर्षे माझेही जाता जाता जाणे राहीले आहे.

अतिशय चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. वनवासी विकासाच्या आपल्या कार्यक्रमात सामान्य शहरी माणसांना सामावून घेण्याची वनवासी कल्याण आश्रमाची ही कल्पनाही अभिनव आहे.

त्रिवेणी, खरोखर खूप छान माहिती. या महोत्सवाची ओळख करुन दिल्याबद्दल आभार. आपला अनाहिता कट्टा या निमित्ताने होण्यास हरकत नाही.

त्रिवेणी, खरोखर खूप छान माहिती. या महोत्सवाची ओळख करुन दिल्याबद्दल आभार. आपला अनाहिता कट्टा या निमित्ताने होण्यास हरकत नाही.

आताची पिढी ठराविक पंजाबी श्टैलच्या भाज्या खाते.गवार,दुधी,लाल भोपळा ,परवर ,टिंढा,चवळी,चाकवत ,शेपू,अंबाडी,माठ. खातच नाही -रानभाज्यांचे नावसुद्धा काढणार नाही.फक्त म्युझिअममध्येच ठेवाव्या लागतील.

In reply to by मोदक

आत्ताची/हल्लीची पिढी म्हणले की काहीही खपते /खपवता येते आजकाल असे वाटू लागले आहे मोदक भाऊ आम्हांस

In reply to by कंजूस

ओ काका, टाकळा, कवळा स्वतः रानातनं खुडून आणून भाजी केली आहे. फोडशीची जुडी दिसली तर अजूनही घेतल्याशिवाय पुढे जात नाही. अळूचं फदफदं ऐकायला कसं का वाटेना बनवतो आणि तितकंच आवडीनं खातो पण!!तेव्हा आताची पिढी म्हणजे शिशुवर्गातली पोरं म्हणताय का?

आताची पिढी ठराविक पंजाबी श्टैलच्या भाज्या खाते.गवार,दुधी,लाल भोपळा ,परवर ,टिंढा,चवळी,चाकवत ,शेपू,अंबाडी,माठ. खातच नाही -रानभाज्यांचे नावसुद्धा काढणार नाही.फक्त म्युझिअममध्येच ठेवाव्या लागतील.

सुंदर महोत्सव, एकदम आईच्या हातची चव डोक्यात घुमली, कर्टुली, बबईच्या शेंगा, रानटी मूग, कोहळ्यांच्या फुलांची भजी, हेट्याच्या फुलांची (हातग्याच्या फुलांची) भजी/झुणका, भोकराचे लोणचे, मटाळूची भाजी, पेरल्या मुगाच्या वावरात मधेच उगवणाऱ्या शेरण्या, वाळके, इत्यादी खूप गोष्टी आठवल्या

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आहा ! "शेरनी", "वाळूक" लय दिवसानं आईकले भाऊ हे नावं, अन लहानपनचे गावातले दिवस आठवले.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

आणि गरमागरम उकरपेंडी! आजीची आठवण येऊन राहिली हो गाववाले!

मी शनिवारी पहाटे निघून कुकडेश्र्वर नाणेघाट केले. नंतर घाटघर. दुसऱ्या दिवशी आहुप्याला. रस्ता खराब अत्यंत अरुंद आहे. दोनदा एसटी आल्यावर मला रिव्हर्स घ्यावी लागली. ब्रेक, क्लच दाबू पाय दुखायला लागले. पण जे पाहिले, अनुभवले त्यासाठी हा सगळा त्रास सहन करावा असे हे ठिकाण आहे....

त्ये मद्दी नाच्नीची भाकारवालं ताट दिस्ल्यानं खपल्या गेले आहे.. म्होरच्या टायम्बाला णक्की येनार.

In reply to by अत्रुप्त आत्मा

म्होरल्या बारीनी यायचं करशान तव्हा मपली गाठ घ्येशान... घराला यशान त कोड्यास भाकर आन दारी म्हंगाल त मंग मिसळपाव नाह्य त कढीवडा खायाला भेटन आहुप्यापोत तुमच्यासंगं यानं काय व्हयाचं नाय आम्च्याच्यानी. आईतवारचं आम्हाला कामाव जायाला लागातं. त्याच्यानी मंचरच्या यशीपशीच तुम्हाला रामराम करिन ....