Skip to main content

मोठ्यांचं लहान मन

लेखक संगीतनहुष यांनी गुरुवार, 29/01/2009 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
२६ जानेवारीचा "लिटिल चाम्प्स"कार्यक्रम ऐकला. सावरकरांची गीते आणि हृदयनाथ स्वतः आठवणी व अधिक माहिती सांगणार त्यामुळे अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. जयो ऽ स्तुते हे आपणा सर्वांचे आवडते गाणे आले. काही म्हणा, मंगेशकरांनी गायल्यापासून हे गाणे जणू मंगेशकरांचेच झाले आहे. पण तरीही वाट पहात होतो, हृदयनाथ या गाण्याची चाल व संगीत कोणी कधी केले हे सांगतील, तिच्याविषयी अधिक टिप्पणी करतील याची. खरे तर हे सांगायला लागता कामा नये पण एक पिढी बदललेली आहे, लोकांच्या स्मरणातून ही गोष्ट गेली आहे. फार वर्षांपूर्वी एक सारंगिया होता, त्याचे नाव मधुकर गोळवलकर. त्याने या तेजस्वी कवितेला तशीच ओजपूर्ण चाल लावली, संगीताचे सुंदर सुंदर तुकडे त्यात जुळवले. प्रत्येक कडव्याची चाल वेगळी, शेवटचे कडवे तर जणू मुकुटमणी, अंगावर काटा आणणारे. गाणे रेडियोवर गाजले, प्रचंड लोकप्रिय झाले, सर्वांच्या तोंडात बसले. १९६२-६५ चा सुमार असावा हा. किती गोडगोड गाणी आली होती हो त्या काळात (जुन्या लोकांना "भास्वर , तुजसम भास्वर, तूच भारता"हे गाणे आठवते?) खूप नंतर कधीतरी मंगेशकरांना "सागरा प्राण तळमळला" करायचे होते व त्या तबकडीच्या मागे कोणते गाणे घ्यावे ते शोधताना त्यांच्या हाती जयोस्तुते लागले असावे. गाणे व संगीत अत्यंत सुंदर होतेच, त्यात अगदी काडीमात्र फरक करून त्यांनी ते उचलून घेतले. पुढचा इतिहास सर्वांना ज्ञात आहे. हृदयनाथांनी ही गोष्ट सोडून सगळे सांगितले. ओळीओळीचा अर्थ स्पष्ट करून निरूपण केले. पण तेवढे मुद्द्याचे बोलले नाहीत. व्यक्तिशः माझी फार फार निराशा झाली. गोळवलकरांची कलाकृती त्यांनी पुन्हा प्रकाशात आणली. आम्ही खूप ऋणी आहोत त्यांचे. तितके श्रेय ज्याचे त्याला दिले असते तर मंगेशकरांचे फारसे नुकसान झाले असते असे मला वाटत नाही. दोन शब्दांचा प्रश्न होता फक्त. पण तसे झाले नाही. कोण जाणे, कदाचित गोळवलकरांनीच ती चाल दीनानाथांच्या एखाद्या जुन्या पदावरून चोरलेली असेलही. तसे असले तर तो इतिहास आम्हाला तरी ज्ञात नाही. मग तो इतिहास सांगून आमच्या ज्ञानात तरी भर टाकायची होती. बूंद से तो गयी. असो. सगळ्याच अपेक्षा पूर्ण होत नसतात. त्यापेक्षा आपण हृदयनाथांच्या अद्भुत संगीताचाच रस घेऊया.

वाचने 3016
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

काथ्याकूट (ना): ज्यातून काही निष्कर्ष निघत नाही अशी चर्चा. येथे या प्रश्नाचे उत्तर द्यायला हृदयनाथ येणार नाहीत, गोळवलकर येणार नाहीत की सावरकर येणार नाहीत. मग काथ्या कुटून काय मिळणार? हां आम्हाला ही कहाणी माहित नव्हती ती तुमच्याकडून कळली. त्याबद्दल धन्यवाद. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

In reply to by नितिन थत्ते

खराट्याच्या काड्या सैल झाल्यावर काय करावे ?.... खराट्याला टाईट बांधायला काथ्याच वापरतात ना ? तोही ओला काथ्या. ;-)

In reply to by शंकरराव

खराट्याच्या काड्या सैल झाल्यावर ओला करून कुटून घेतलेल्या काथ्याने पुन्हा बांधून घ्यावा. पण काड्या तुटल्या असे वाटले तर खराटा सरळ फेकून द्यावा. खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल) ता. क. खराटा फेकून दिला तरी घाण साफ करायला पुन्हा दुसरा खराटाच आणावा. शंकररावांकडे मिळतो. आमच्या काथ्या कुटण्याच्या कारखान्याशेजारीच त्यांचे खराट्याचे दुकान आहे. (ह. घ्या)

In reply to by नितिन थत्ते

काड्या तुटून आर्धा झालेला खराटा फेकून न देता मोरी साफ करायला व इतर ब-याच साफाईला वापरतात. आम्ही खराटे विकतो पण आमचे नाव काथ्या नाही ;-) आमचे खराटे ढील्ले पडत नाही.. माल ग्यरंटीचा आहे.. फक्त तिरूअनंतपूरम,वेंगुर्ल,लांजा कडच्या लांब काड्या व 'खराटाच्या' कारखान्यातला स्पेशल कुटलेला ओला काथ्या वापतो खराटा बांधायला ;-) उधारी बंद (कराट्याचे रोकठोक अपल ... खराट्याचे थोक व्यापारी) शंकरराव

In reply to by शंकरराव

=)) =)) =)) =)) =)) आवडलं खराटा (येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)

ओला काथ्या वापरायचे दिवस गेले आता. हल्ली प्लास्टिक्चा खराटा असतो. आणि प्लास्टिकचीच दोरी.. ~X(

आजकाल हे गाणे हृदयनाथ मंगेशकरांचे समजले जाते का? मला आठवते पूर्वी रेडिओ वर लावताना नेहमीच संगीत मधू गोळवलकर म्हणून सांगायचे.

In reply to by फारएन्ड

हो असेचह दिसते. मी तरी वरील लेख वाचेपर्यंत ते गाणे हृदयनाथांचेच आहे असे समजत होतो. जालावर सुद्धा काही ठि़काणी या गाण्याचे संगीतकार हृदयनाथच दिसले. लेखामुळे काही वेगळी माहिती समजली. धन्यवाद. -- लिखाळ.

सा रे ग म प मध्ये नामनिर्देशन करताना संगीत मधुकर गोळविलकर असेच दाखविले होते. विद्याधर

हे गीत मधुकर गोळवलरांनी संगीतबद्ध केलेले आहे, ह्याविषयी कधीच कुणी वेगळा क्लेम केलेला नाही. इथे चर्चाप्रस्तावक जे म्हणता आहेत, ते हे की मंगेशकरांनी त्या एका कार्यक्रमात असा स्पष्ट उल्लेख केला नाही.