Skip to main content

स्वत:ला काय समजतो रे ?

लेखक चिनार यांनी शनिवार, 11/06/2016 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
       कॉलेजला असताना सतत माझे तिरपे बोलणे ऐकून आणि आत्ताचे माझे उपहासात्मक (त्याच्या भाषेत 'बकवास') लिखाण वाचून वैतागलेला एक मित्र परवा तुळशीबागेत भेटला.(त्याला मित्र  म्हणावे लागते कारण तो माझ्या फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये आहे आणि आम्ही तुळशीबागेत भेटलो कारण दोघांचेही लग्न झालेले आहे !) खूप दिवस फरार असलेला गुन्हेगार एके दिवशी अचानक नाक्यावर चहा पिताना दिसल्यावर एखाद्या पोलिसाला जसा आनंद होईल  तसाच काहीसा आनंद मला त्याच्या चेहऱ्यावर दिसला. विचार करा, रविवारी दुपारी, तुळशीबागेत बायकोची  टिकल्या अन हेयरक्लिपांची दोन तासांची खरेदी चळवळ मुलीला कडेवर घेऊन भोगलेली असूनही त्याच्यात मला दिसताक्षणी चोपायचा पेशन्स शिल्लक होता ! म्हणजे आमचे संबंध किती मधुर असावेत ह्याची कल्पना येईल.  किंवा बायकोमुळे भोगलेल्या त्या दोन तासांचे फ़स्ट्रेशन काढण्यासाठी कोणीतरी बकरा सापडला ह्याचाही तो आनंद असू शकेल. (कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे या गाण्याचा अर्थ अश्यावेळी अलगद उलगडतो.) आता तुळशीबागेतल्या सिक्स लेन एक्स्प्रेस हायवेला लाजवेल इतक्या मोठ्या गल्लीत तो अचानक समोर आल्यामुळे त्याला टाळतासुद्धा येईना. शेवटी हसून ओळख दाखवावीच लागली. काय, कसं काय विचारून झाल्यावर त्याने डायरेक्ट मुद्द्याला हात घातला. "स्वत:ला काय समजतोस रे तू ?" मी दचकून आजूबाजूला पाहिलं तर त्या प्रश्नामुळे तिथल्या अफ़ाट जनसमुदायाला काहीही फरक पडला नव्हता.  "का? काय झालं?” ,मी उलट प्रश्न केला. "खूप लिहीतोयेस आजकाल. जो दिसेल त्याची मजा उडवतोयेस. तसा चांगला लिहितोस तू पण अती झालं आणि हसू आलं असं नको व्हायला...नाही का?" मला सगळ्यात पहिले जाणवली ती त्याची बदललेली भाषा. अस्सल विदर्भी भाषेचे सदाशिव पेठेत स्थलांतरण झाल्यासारखे वाटत होते. आणि नुसतेच स्थलांतरण नाही तर लवकरच परमनंट रेसीडंसशिप मिळणार अशी परिस्थिती होती. कारण दहा वर्षापूर्वी हेच वाक्य त्याने खाली लिहिलेल्या शब्दात म्हटले असते. "लय लिहून राहिला तू आजकाल. जो दिसेल त्याची मजा उडवून राहिला. नाही...चांगलं लिहीतं  तू पन अती हु राहिलं आता. समजतं कोन तू स्वताले" आता खरच त्याची भाषा बदलली होती की कडेवरच्या चीमुरड्यासमोर तो असं बोलत होता देव जाणे. "अरे झालं काय पण? काय लिहिलेलं आवडलं नाही तुला?", मी त्याला विचारलं. "सगळंच रे. जगाचा फार अनुभव असल्याच्या आविर्भाव आणून लिहितोस तू. आता हेच बघ, चार-पाच वर्ष नोकरी काय केली तर संपूर्ण कार्पोरेट विश्वावर लिहीशील का तू ? आम्हीपण करतो ना नोकरी इथे." (त्याच्या मुखातून 'संपूर्ण' हा शब्द संपूर्णपणे संपूर्ण आयुष्यात कधी ऐकायला मिळेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मुळात तो चुकुनही कधी माझ्या स्वप्नात आलाच तर त्याक्षणी एखाद्याने बादलीभर पाणी ओतून मला उठवावे ही ईश्वरचरणी प्रार्थना!). असो.आता माझ्या माहितीप्रमाणे हा मित्र आयटीमध्ये कुठल्याश्या कंपनीत आहे. सॉरी सॉरी...परत हे लिखाण त्याने वाचलं तर वांदे होतील. कोणतीही आयटी कंपनी ही  "कुठल्याश्या" सदरात येत नाही. ती एकतर  फॉर्च्यून ५०० किंवा सी एम एम लेव्हल xxx  तरी असतेच. यापैकी काही नसलं,तरी ती एक आयटी कंपनी असल्यामुळे तिची कुचेष्टा करणं हा दखलपात्र गुन्हा आहे. असो. तर मला कळेना की ह्याचा नक्की राग माझ्या लिखाणावर आहे की मी आयटीवर लिहित नाही यावर आहे. कारण आयटी 'दखलपात्र' सुद्धा नसणं हा तर अजामीनपात्र गुन्हा आहे. "अरे पण तुझ्या आयटी इंडस्ट्रीवर कुठे लिहिलंय मी अजून?", मी म्हणालो. "प्रयत्न सुद्धा करू नकोस !!! आधीच अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालायेस. आयटीचा गंधही नाहीये तुला.तुझ्यासाठी ते हिंदी सिनेमे वगैरे विषय ठीक आहे. हॉलीवूडवर लिहून आधीच तुझी पातळी कळलीये आम्हाला. आयटीवर लिहून तोंडावर आपटशील." आता याचं नक्की कुठे जळतंय ह्याचा हळुहळु अंदाज यायला लागला. आयटी आणि हॉलीवूड ह्याचं काय नातं आहे माहिती नाही पण बहुतांश आयटीवाले पूर्वजन्मीचं देणं असल्यासारखं हॉलीवूडवर प्रेम करतात. मग मी जरा त्याची थट्टा करायची ठरवलं. "माझं जाऊदे रे. तू लिही ना तुझे अनुभव आयटीमधले.", मी म्हणालो. "कामं असतात आम्हाला. वेळ नसतो अजिबात. तुझ्यासारखं कंपनीत पाट्या टाकायला जात नाही आम्ही." "कामं असतात म्हणजे ते कॉपी-पेस्ट वालेच ना? आणि मी कुठे म्हणतोय कंपनीत बसून लिही म्हणून. पण हे असं तुळशीबागेत फिरण्यापेक्षा घरी बसून वेळ सत्कारणी लाव." झालं !! आता वर्मी घाव बसला होता. कॉपी-पेस्ट हा शब्द ऐकल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव शिफ़्ट डीलीट करताना असतात तसे निर्दयी झाले होते. कॉपी-पेस्ट हे जगभरातल्या चाकरमान्यांचे आवडते तंत्रज्ञान (!) आहे, तिथं आयटी, बिगर आयटी असा भेदभाव नाही. पण कॉपी-पेस्ट केलंय हे जाणवून देणे अपमानास्पद समजले जाते. शिवाय या तंत्रज्ञानाचा उगम आयटी क्षेत्रात झालेला असल्यामुळे प्रत्येक आयटीवाल्याचे ते एक अदृश्य शस्त्र आहे. इथे मी डायरेक्ट त्या अदृश्य धनुष्याला प्रत्यंचा बांधायचा पराक्रम केल्यामुळे सुटणारा बाण आता मलाचं  झेलावा लागणार होता. मलातर त्याच्या नजरेतूनच अग्नीबाण सुटताना दिसत होते. "काय समजतो रे स्वत:ला तू ? नुसतं कॉपी-पेस्ट करतो होय रे आम्ही? आयटीचा लॉँगफॉर्म तरी माहितीये का तुला? कधी कुठल्या आयटी कंपनीत गेला आहेस का ? तुला कोण आतमध्ये घेणार म्हणा ? एक आयटी कंपनी किती वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करते माहितीये का तुला? ते सोड रे...प्लॅटफॉर्म म्हणजे काय हे तरी माहितीये का? किती टेक्नोलॉजीजचे नाव ऐकली आहेत रे तू ? कॉपी-पेस्ट करण्यामागे कोणती टेक्नोलॉजी आहे माहितीये का? तू लिहितोस त्यातलं तरी किती ओरिजिनल असतं ? कुठून तरी कॉपी-पेस्ट करत असशील?" माझं सोडा...त्याच्या कडेवरच्या चिमुरड्याचे तोंड पाहण्यासारखे झाले होते. (कदाचित घरी त्या चिमुरड्याच्या  वडिलांना इतकं बोलायची संधी मिळत नसेल !) आणि इकडे ह्याची बडबड सुरूच होती. पण अजून माझं काम फत्ते व्हायचं होतं. शेवटी आगीत आणखी तेल ओतण्यासाठी मी त्याला मधेच थांबवलं. "जायला कशाला हवं त्यासाठी आयटी कंपनीमध्ये? उघड सत्य आहे हे. कॉपी-पेस्ट !! तेव्हढंच करता तुम्ही. आणि तसं नसेल तर एक दिवस गुगल न वापरता काम करून दाखव बरं." परत वर्मी घाव बसला ! त्याचे अग्निबाण परत सुरु झाले. "बस्स....गुगल !!!! तेव्हढीच तुम्हा लोकांची अक्कल !! तुम्हाला वाटते गुगलवर सगळं मिळतं एका सेकंदात...हो ना? मी सांगतो ते कोड्स गुगलवर शोधून दाखव मग कळेल तुला किती कठीण असते ते." "म्हणजे तुम्ही गुगलवरूनच शोधता एवढं तर खरं आहे ना!! ते शोधायला जे काही लागतं तेव्हढंच तुमचं स्किल!!!" "तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये रे. तुला वाटतं तेच खरं असं काही नाहीये. म्हणूनच तुझं लिखाण आवडत नाही मला.एकदा त्या ह्युमन रिसोर्सवाल्यांवर पण असंच लिहिलं होतंस तू." "त्याचं काय आता? एचआरविषयी सगळ्यांचे हेच मत असते. मी फक्त लिहून दाखवलं एवढंच." "असं काहीही नाहीये. चांगले एचआरसुद्धा असतात." मी उत्तर देणार तेव्हढ्यात मला एक गोष्ट आठवली आणि मी तिथल्या तिथे शब्द गिळले. ह्याच्या विरोधाचं कारण बरचसं कौटुंबिक होतं. कारण माझ्या आठवणीप्रमाणे ह्या साहेबांची पत्नी एचआर होती. आणि तेंव्हा ती आसपासच कुठेतरी असल्यामुळे साहेब सतर्क होते. आता मलाही शांत बसणे भाग होते अन्यथा  भर तुळशीबागेत हिंसाचार झाला असता. "जाऊदे रे..एखाद्या वेळेस लिहिल्या जातं असं काहीतरी. तू दुर्लक्ष कर. मी तर म्हणतो तू वाचू नकोच मी लिहिलेलं.", मी म्हणालो. "वाचतचं नाही मी. आणि खरच किती लोकं वाचतात ही सुद्धा शंका आहे मला." आता निर्णायक दणका देणे आवश्यक होते. माझ्या सगळ्या वाचकांची मनोमन माफी मागून मी म्हणालो, "वाचतात रे. रिकामटेकडे लोकं भरपूर आहेत. कारण आयटीमध्ये बरेच मित्र आहेत माझे!!!!!" -- चिनार  http://chinarsjoshi.blogspot.in
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 11894
प्रतिक्रिया 55

प्रतिक्रिया

मार खायचे धंदे.... उत्तम लिखाण....घाव वर्मी वगैरे....शेवटचं ब्रह्मास्त्र....मस्तंच.... ☺☺ :)

तरीच म्हटल, परवा तुळशीबागेत जास्तच गर्दी का झाली होती,नेहमीसारखा काहीतरी हप्त्याचा लफडा असेल असे हे म्हणत होते. जिल्ब्या मारुतीपासून कावरेपाशी येईपर्यंत यांना चांगले दीड-दोन तास लागले.चिनार्या परत जाणार असशील तर सांग रे, "आंबेहळद" बदलून आणायची आहे.

मिपा सार्वकालीन माई


In reply to by चिनार

"मुका"मार लागल्यावर आंबेहळदच लावावी लागते ना रे,लब्बाडा मुद्दाम हळदीने पिवळे करून (या वयात)गोरे (मोरे) करून सोडतोस काय रे. पुन्हा मि.सा.मा.

In reply to by नाखु

तुला नाही गं माई..हळदीला गोरं करून सोडायचं होतं...!! मस्तानीपेक्षाही "आमची ही" जास्त गोरी आहे असे तुझे "हे" त्यादिवशी सांगत होते..

In reply to by अभ्या..

नाही रे..माई मर्त्य मानवात येत नाहीत... त्यांचा कधी जन्म ही झाला नाही आणि मृत्यूही होणार नाही...त्या फक्त आहेत आणि असतात !! बाकी त्यांच्या माहेराविषयी विचारशील तर कैलासात असू शकेल....

हायला चिनार राव तुम्ही तर आय टी वाल्यांच्या चड्डीलाच हात घातलात. झकास

=)) =))

चिनार्‍या काय केलस तु हे !!!!!! आमी आयटी वाले नाय ......

ओ ते कॅापीपेस्ट नाय म्हणायचे सांगून ठेवतो. । । वरचं बघून खाली लिहायचे म्हणा. फारच दणाका दिलाय आइटीकरांना. डान्सबारवाले सुटले. तुळशीबाग पुण्याचे बर्मुडा ट्रायांगल आहे का?

म्हणजे शिक्कामोर्तब झाले आम्ही रिकामटेकडे आयटीवाले आहे ते. मस्त

आमच्या ओळखीच्या एक ताई आहेत बरंका चिनार भाई, म्हणजे बघा १ बाई आहेत (तै आहेत म्हणजे बै असणारच) २ आयटीवाल्या हैत ३ पुणेकर सुद्धा आहेत (ऊगा सीवी बांधतोच आहे त्यांचा तर पुलं म्हणतात तसं "जाज्वल्य शहराभिमान सर्टिफिकेशन" सुद्धा जोड़ावे म्हणले सीवी मधे) तुमचा हा मित्र जसे बोलतो अन जे बोलतो ते वाचुन मला एकदम "देजा व्हू" का कायसं झालं पहा, ते येऱ्यागबाळ्याचे काम नव्हे तेथे पाहिजे अस्सल जाज्वल्य(च) दुर्दैवाने तै मिपावर नाहीत!! असत्या तर तुया बाजार सपा केला असता न लेक त्या तै न!! ताक अन *मिफुस चिनार भाऊ, असं जिनगानीले कट्टायल्यावानी कैच्याकै करू नये, जीवन अनमोल हाय ते असे संपवु नोय! आजलग आत्महत्या करायचे लै मार्ग पायले होते पर आज एक नवा त्या लिस्ट मधे जोड़ा वाटते "मिसळपाव वर पुणे + आयटीवर लिहिणे" तुम्ही तेच केलेना राजे हो !! तुम्ही आम्हाले पायजात आशे फालतू कामं करू नका! हे म्हणजे महाराजबागेतनी वाघाची हजामत कर्याले पिंजर्यात घुसन्यावानी झाले हो! संभायजा (मित्र) बाप्या *मित्रत्वातील फुकट सल्ला

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बाप्पू... तुमचीवाली कायजी पोहोचली. पण आसते एकेकाले मराची हौस ! बाकी तुमच्यासारखे शिपाईगडी मैतर असल्यावर काह्याची चिंता...

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

बापुसाहेब मिसळपाववर आत्मघाताला आमंत्रण म्हणजे १- पुण्यावर लिहीणे २- आयटी वर लिहीणे ३..... ४..... ५..... रीकाम्या जागा भरुन दाखवा ना बापुसाहेब तुमच्या कडुन मौलिक सल्या ची अपेक्षा आहे.

In reply to by मारवा

मारवा जी लिहायला काही नाही हो आधीच उरकत आलोय आम्ही त्यात अजून धिंडवडे निघायचे आमचे!! तस्मात असोच!! :D

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अरे काय बापुसाहेब ते देवानंद स्टाइल म्हणत बरबादीयो शोक मनाना फिजुल था बरबादीयो का जश्न मनाता चला गया किंवा शहीद की मौत सिर्फ एक बार होती है. अस काहीतरी खिलाडुवृत्ती तुमच्याकडुन अपेक्षीत होती अन काय हे धिंडवडे वगैरे घेउन बसलात हो आपण मराठी माणसं दोन द्यायची दोन घ्यायची इत्ता क्या सोचनेका

हाहाहा!! जबराट आहे. आयटीवाल्यांना आवर्जून नावं ठेवणारा स्पावड्या अजून कसा उगवला नाही इथे?? =))

झकास लिहिलंय! आयटीवाली म्हणजे ग्रीन टी फुकट मिळत असतांना विकतचा पिणारी मंडळी ...

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

=)) =))

=))