Skip to main content

प्रवासात न्यायच्या पाककृती

लेखक रेवती यांनी मंगळवार, 08/03/2016 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
LekhHeader वर्षातून कमीतकमी दोनदा प्रवासाला जाणे ही गोष्ट आजकाल सर्रास होताना दिसते. यात तरुणवर्गच नव्हे तर वयस्क व्यक्तीही आनंदाने सहभागी होतात. नातेवाईकांकडे राहणे असेल तर जेवणाचा प्रश्न सहजगत्या सुटतो पण मुक्काम हॉटेलमध्ये असल्यास उदरभरणाच्या सर्व वेळा बाहेरचे खाणे वयोवृद्धांस व क्वचित तरुणाईलाही नको वाटू शकते. बाहेरचे खाणे न सोसवणारे लोक असतील तर घरून पदार्थ बांधून नेण्यास पर्याय नसतो. आमच्याकडे बाहेरचे खाणे ज्येष्ठ मंडळीच नव्हे तर आमचे अपत्यही फारसे पसंत करत नाही. प्रवास करताना मुक्कामी पोहोचल्यावर आजकाल हॉटेल्समधील खोल्यांना जोडलेले छोटेसे स्वयंपाकघर असते. तश्या खोल्या तुम्ही आरक्षित करू शकता. दिवसा स्नॅक्स प्रकारात तुम्ही चिवडा, लाडू, तिखटमिठाच्या पुर्‍या व आणखीची फराळाचे पदार्थ नेऊ शकता. दिवस सुरु करताना व दिवसभराच्या फिरण्यानंतर आपले खाणे हे पोषक व झटपट तयार होणारे असले पाहिजे. त्यातील काही पाककृती देत आहे. पिठले साहित्य- डाळीचे पीठ (बेसन), तेल, फोडणीचे साहित्य, हिरव्या मिरच्या, कांदे, कोथिंबीर, मीठ, आमसूल, जिरेपूड, सुके खोबरे, लागल्यास लाल तिखट. कृती- कढईत जरा जास्त तेलाची फोडणी करावी. तेलात मोहरी, हिंग, हळद, हिरव्या मिरच्या घालून परतावे. मग बारीक चिरलेला कांदा घालावा. कांदा नेहमीपेक्षा थोडा जास्त परतावा. हवे असल्यास लाल तिखट घालावे. त्यावर धुवून चिरलेली कोथिंबीर घालावी. कोथिंबिरीची तडतड थांबली की डाळीचे पीठ, सुके खोबरे घलून मध्यम आचेवर परतत रहावे. खमंग वास आल्यावर ताटात गार होण्यास हे मिश्रण पसरून ठेवावे. पिठले पातळ होणार असल्याने त्याप्रमाणे वरून मीठ, एखादे आमसूल घालावे. भाजलेल्या जिर्‍याची पूड, आवडत असल्यास चिमूटभर साखरही त्यात घालावी. a पिठले तयार करण्याआधी भात करून घ्यावा. त्याची वाफ जिरेपर्यंत अगदी काही मिनिटात पिठले तयार होते. इनस्टंट पिठल्याचे मिश्रण जितके असेल त्याच्या अडीचपट पाणी पातेली उकळण्यास ठेवावे. उकळी आल्यानंतर आपले हे पिठले मिक्स त्यात घालून नीट ढवळावे. गाठी राहू देऊ नयेत. लागल्यास पाणी थोडेसे घालून झाकून वाफ आणावी. पिठले तयार आहे. b कांदा घातलेले मिश्रण एखादा दिवस चांगले राहते. हवा फार उष्ण असल्यास कांदा, हिरव्या मिरच्या व कोथिंबीर वापरू नये फक्त लाल तिखट घालावे. मिश्रण गार झाल्यावर साजूक तूप मिश्रणास चोळून डब्यात भरावे व प्रवासास न्यावे. उप्पीट साहित्य- रवा, कांदा, कोथिंबीर, मिरच्या, आलं, कढीपत्ता, उडीद डाळ, सुके खोबरे, मीठ, साखर, फोडणीचे साहित्य. कृती- प्रथम कढईत तेल घालून मोहरी, हिंग, हिरव्या/ सुक्या मिरच्यांची फोडणी करावी. त्यामध्ये उडीद डाळ घालून हलवावे व लगेच कांदा घालावा. कांदा झाकण न ठेवता परतावा, आल्याचा कीस परतावा. धुवून चिरलेली कोथिंबीर परतावी. मग रवा घालून रंग बदलेपर्यंत परतावे व त्यात सुक्या खोबर्‍याच्या कीस घालावा. मिश्रण परतून ताटात गार होण्यास काढून ठेवावे. कोमट असताना लिंबाचा रस घालून एकत्र करावे म्हणजे पाण्याचा अंश उडून जाईल. रवा गार झाल्यावर त्यात मीठ, साखर, चमचाभर साजूक तूप घालून एकत्र करावे व डब्यात भरून प्रवासास न्यावे. c उप्पीट करण्याआधी रव्याच्या मिश्रणाच्या दुप्पट मापाचे पाणी गरम करण्यास पातेल्यात अथवा मायक्रोवेवमध्ये ठेवावे. पाण्यास उकळी आल्यावर मूठभर फ्रोजन मटारचे दाणे घालावेत. रव्याचे मिश्रण पाण्यात घालून नीट ढवळून वाफ आणावी. d खिचडी साहित्य- तांदूळ, मूगडाळ, फोडणीचे साहित्य, कढिपत्ता, मिरच्या, गोडा मसाला, लाल तिखट, मटार, मका, कोथिंबीर, सुके खोबरे इ. कृती- तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. त्यात कढीपत्ता व आवडत असल्यास हिरव्या मिरच्या घालाव्यात, आवडीप्रमाणे मटार, मका घालावा. जरा परतून डाळ तांदूळ, धुवून चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण कोरडे होईपर्यंत परतावे. त्यात सुके खोबरे, गोडा मसाला व इतर मसाले आपल्या आवडीनुसार घालावेत. मिश्रण ताटलीत गार होण्यास काढावे. अंदाजाने मीठ घालावे. गार झाल्यावर साजूक तूप चोळून कोरडी खिचडी डब्यात भरून प्रवासास न्यावी. e करतेवेळी पातेल्यात पाणी उकळण्यास ठेवावे. उकळी अल्यावर त्यात खिचडीचे मिश्रण घालून आधी मध्यम व नंतर मंद आचेवर वाफा आणाव्यात. मऊ मोकळी खिचडी वाढावी. बरोबर मायक्रोवेवमध्ये भाजलेला पापड, घरून नेलेले लोणचे वाढावे. किचनेटची सोय असलेल्या हॉटेलच्या खोलीत सहसा छोटा फ्रीजही दिलेला असतो. त्यात मी मटारचे दाणे ठेवते. तशी सोय नसल्यास मटार नेऊ नयेत. मुक्कामी गेल्यावर जवळच्या ग्रोसरी स्टोअरमधून २ टोमॅटोज, एखादा कांदा, दह्याचा डबा घेऊन फ्रिजमध्ये ठेवते. खिचडी शिजेपर्यंत ऐनवेळी कोशिंबीर करून वाढता येते. हा पदार्थ मायक्रोवेवमध्येही होऊ शकतो. f दशमी साहित्य- कणिक, थोडे मीठ व थोडे तेल. कणिक भिजवण्यास दूध. कृती- कणकेत मीठ, तेल घालून कालवावे. गार दूध लागेल तसे घालून नेहमीप्रमाणे कणिक मळावी. पंधरा ते वीस मिनिटे तेलाचा हात लावून झाकून ठेवावी. आता कणकेच्या नेहमीप्रमाणे पोळ्या कराव्यात. गार झाल्यावर डब्यात भरून घ्याव्यात. या पोळ्या प्रवासात नेल्यास गार असतानाही मऊ राहतात व चविष्टही लागतात. अशाचप्रकारे पाणी व दूध (किंवा फक्त पाणी) यांचे मिश्रण उकळून त्यात किंचित मीठ घालून ज्वारी, तांदूळ किंवा बाजरीचे पीठ घालावे व मोदकासाठी काढतो तशी उकड काढावी. मिश्रण कोमट झाल्यावर मळून उंडे तयार करावेत. नेहमीप्रमाणे भाकरी करून तव्यावर व थेट गॅसवर भाजाव्यात. भाकरी भाजल्या जाण्यास थोडा वेळ लागतो पण अगदी मऊ राहतात.. (चित्र- किलमाऊस्की) https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

वाचने 23643
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

दशम्यांची पाकृ नवीन कळली. आता करून बघते. बाकीही पाकृ आवडल्या. पूर्वी भूकलाडू, तहानलाडू असायचे. त्याच्या पाकृ माहित नाहीत.

या आयडिया मस्त आहेत. यात परदेशी भर घालायची तर मी एकदा पास्ता केला होता. मुक्कामाच्या ठिकाणी दुकानातून पास्ता आणि पेस्तो आणायचे. रूम मधे पास्ता शिजवून पेस्तो मिसळून लगेच खाता येते.

घरीसुद्धा हे इन्स्टंट प्रकार करून ठेवायला हरकत नाही ! रेवाक्का जिंदाबाद !!

१.दक्षिण भारतात चिंच किंवा लिंबू वापरून फोडणीचा भात करतात. त्याला चित्रान्न किंवा पुलीहारा किंवा लेमन राइस असे म्हणतात . हा पदार्थ प्रवासात बरोबर नेल्यास बरेच दिवस टिकतो . २.गुजरात मध्ये पोळ्या तव्यावर सुकवून त्यांचे खाकरे तयार करतात. हा पदार्थही खूप दिवस टिकणारा आहे आणि प्रवासात बरोबर घेऊन जाता येतो. याची तयार पाकिटे बाजारात मिळतात.

रेवतीजी, मस्त माहिती. अतिशय उपयुक्त. प्रवासात बाहेरचे खाण्यापेक्षा हे खुप आरोग्यदायी. अनाहिता विशेष अंकातील सर्वच लेख अतिशय अप्रतिम!

सर्वकाही उत्तम, पण प्रवासाला जाऊन हेच करायचं? भले किती का इन्टंट असेना. सर्वच पदार्थ घरी बनवून तीन ते सात दिवस टिकणारे असे शोधले पाहिजेत. ठेपले, पराठे, कडक थालीपीठ इ.चे व्हेरियंट्स.

In reply to by गवि

गवि, यातला एकही पदार्थ न घेऊन जाता सहलीला जायला मला आवडेल पण शिनियर लोकांसाठी सगळे करावे लागते. त्यांच्या खाणे व औषधांच्या वेळा नीट पाळल्या तरच सहल चांगली होते. प्रवासात टिकणारे पदार्थ तर पूर्वीपासून आहेत व ते आपल्याला माहित आहेतच! पुरणपोळी, गुळाची पोळी वगैरे.

छानच पाकृ.. प्रवासातच नाही तर वीकडेसमध्ये घरी खाण्यासाठी देखिल करुन ठेवाव्यात म्हणते. साधारण किती दिवस टिकतात हे पदार्थ??

मस्त आहेत सगळ्या पाकृ. मला वाटतं कांदा नाही घातला तर सगळे पदार्थ अजून जास्त टिकतील. हो ना?

हा फार कामाचा धागा आहे. तू सांगितलं होतं तशी खिचडी मागच्या सहलीत नेली होती. आता बाकीचे प्रकारही पुढच्या वेळी करेन. याशिवाय मीही पास्ता आणि रेडी पेस्टो सॉस ठेवते सोबत, झटपट होणारा प्रकार म्हणून आणि खूप साहित्य लागत नाही.

ओले पदार्थ वगळले तर खिचडी, उपमा मिक्स जास्त टिकेल. तसेच आपल्या चवीनुसार वेगवेगळी पिठे एकत्र करून त्यात मीठ, तिखट, जिरेपूड घालून नेले तर ऐनवेळी धिरडी बनू शकतात.

उप्पीट आणि अशी खिचड़ी होस्टल लाइफ मध्ये असतांना आई करून द्यायची. बाकी तिखट मीठाची पूरी प्रचंड आवडीची.

पाककृती खूप छान आणि उपयोगी आहेत. मलाही एका दिवसातच बाहेरच्या खाण्याचा उबग येतो. पण भारतात किचन असलेल्या रूम मिळण जर अवघडच. इ.केटल मध्ये होतील का या रेसिपी?

सर्व पाककृती उपयुक्त आहेत लक्षात ठेवायला पाहिजे. फोटो पण प्रचंड आवडले. विशेषत: उपम्याचा. पुर्ण जेवण झाल्यानंतर पण असा उपमा कोणी समोर ठेवला तर नक्की हादडेन. एखाद्या दिवसाची सहल असेल तर दही भात पण नेता येतो. आधल्या दिवशी भात जरा जास्तच करायचा. पहाटे पहाटे निघायच्या वेळी थोडेसे मिठ घालुन दुधात कालवायचा (दुध घालताना कंजुस पणा करायचा नाही, अगदी साय सुध्दा पातेल्यात वगळायची नाही) आणि मग त्याला विरजण लावायचे. जेवायच्या वेळे पर्यंत मस्त दही लागते आणि ते भातात मुरुन भाताची शिते टम्म फुगतात. या बरोबर तळलेली मसाला मिरची किंवा लिंबाचे गोड लोणचे असले तर अजून मज्जा येते. (राजगडावर पद्मावती मंदिरा मध्ये बसुन असा दहीभात अनेक वेळा चापलेला) पैजारबुवा

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

जेवायच्या वेळे पर्यंत मस्त दही लागते आणि ते भातात मुरुन भाताची शिते टम्म फुगतात. या बरोबर तळलेली मसाला मिरची किंवा लिंबाचे गोड लोणचे असले तर अजून मज्जा येते.
काय त्रास आहे. अरे जरा यांचे खाते कुणीतरी गोठवेल का?!

भारतीय इन्स्टंट फूड! असेच एकदा निरंकारींच्या मेळाव्याला जाणारे शेतकरी दांपत्य बेळगावला ट्रेनमधे भेटले होते. त्यांनी कांदा लसूण आणि सुके खोबरे घालून केलेली मसाल्याची भरली वांग्याची भाजी ३/४ दिवस टिकते म्हणून सांगितले. ती भाजी आणि पातळ मऊ भाकरी त्यांनी आम्हाला खाऊ घातली होती. त्याची चव जन्मभर विसरणे अशक्य आहे! कोणी बेळगावकरांनी नीट पाकृ सांगितली तर लै उपकार होतील! गावाला कामाला येतात त्या बायकासुद्धा कांदा आणि सुके खोबरे भाजून वाटून केलेला मसाला घरात फ्रीज नसतानाही १५ दिवस पर्यंत नीट रहातो म्हणत होत्या. त्याचे विशेषच वाटले.

आम्ही नेहमी ट्रेकला करून न्यायचो...शिवाय भारतात येताना मी बिमानप्रवासात खाण्यासाठीपण करते दशम्या.

रमेश आठवले यांचे बरोबर आहे. वरच्या पाककृती वेस्टन रेल्वेच्या प्रवासात अजिबात उपयोगाच्या नाहीत.एसी तिकिट असेल तरच ठीक आहे.तिकडे गाडी घाट चढून वरती उंचावर जातच नाही.उष्णतेने दिलेल्या पाकृ आंबतात.लाडू ,ठेपले ,चिवडा चालतात.अबू रोडला स्टेशनला पाच रबडी मागितल्यावर लगेच विक्रेता म्हणाला व" एसी तिकिट असेल तरच घ्या अथवा इथे खाण्यासाठीच घ्या. हॅाटेलच्या रूमला जोडून किचन ही कल्पना भारतात तरी अॅलिस इन वंडरलँड आहे.बायकाना स्वयंपाक करायला लागू नये म्हणून तर भटकंतीला जातात.तिथेकुलु मनालीला रात्रदहा वाजता दोघांनी जेवणाची भांडी घासली आणि चंद्राचा शितल प्रकाशात बारा वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो असल्या वर्ण्नाचे भटकंती धागे दाखवा आणि शंभर रु चे बक्षीस जिंका.दहिभाताची कल्पना बयराचदा अमलात आणली आहे.

In reply to by कंजूस

काका, असल्या वर्णानाचे धागे सापडणार नाहीत कदाचित! पण लहान पोरं किंवा ज्येष्ठ नागरिक सोबत असताना.. झाल्यास ट्रेकला वगैरे.. किंवा बाहेरच्या देशात तिन्ही त्रिकाळ बाहेर खाणे अजिबात झेपणारे नसताना हे पदार्थ "अत्यावश्यक" कॅटेगरीत जातात. रेवाक्का.. फारच महत्वाचा धागा आहे! फोटो सुप्पर लाईकल्या गेले आहेत!

धन्यवाद कंजूस आपल्या देशात लोण्याचे तूप करण्याचा प्रघात फार जुना आहे. त्याचे कारण लोणी, तूप या स्वरूपात बरेच दिवस टिकते हेच आहे. लोणचे (लवणा चे ) मिठाचा पुरेसे वापरून केले जाते. ते सुद्धा वर्षभर टिकावे म्हणून.