Skip to main content

माझ्या मामाचे ऐतिहासिक गाव

लेखक प्रश्नलंका यांनी मंगळवार, 08/03/2016 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
LekhHeader आपल्यातल्या बहुतेकांचे आजोळ हे एक बालपणी सुट्टीतलं हक्काचं दंगा घालायचं ठिकाण असेल. भरपूर भावंडं असतील तर मग काय त्यात अजूनच भर. अशा मामाच्या गावी जायची एक ओढ असते आणि तेव्हाच्या कडु-गोड सगळ्याच आठवणी परत अनुभवायची मजा मोठं झाल्यावर पण अधून मधून खुणावत असते. माझं आजोळ म्हणजे सातारा जिल्ह्यातलं रहिमतपूरजवळ "साप" नावाचं छोटसं गाव (इथे नावातच फक्त साप आहेत हो!). माझ्या एक मावशीचे गावातच सासर असल्याने आम्ही सगळी मावस भावंडे आजी आजोबांना भरपूर सतावत असू. मग दरवर्षी परिक्षा संपली की आम्ही आजोबांच्या मागे लागायचो आम्हाला घेउन जाण्यासाठी. मामाचा वाडादेखील गाण्यातल्या ओळींसारखा चिरेबंदी होता, तेव्हा कधी एकदा सुट्टी लागतेय आणि आम्ही तिथे जमतोय असचं आम्हाला व्हायचं. दिवसभर आजीच्या भोवती आम्ही पिंगा घालायचो. तिच्यासोबत सकाळी सकाळी गोठयात धार काढायला जायचं, दुपारी शेतात जायचं, ऊस, करवंदं, जांभळं मनसो़क्त खायची आणि संध्याकाळी परत आल्यावर हातपाय धुवुन सगळ्यांनी एका सुरात शुभंकरोती म्हणायची. आजीचा स्वयंपाक होइपर्यंत पत्त्यांचे डाव रंगायचे. एकदाची जेवणे उरकली की आमचा मोर्चा वळायचा आजोबांकडे गोष्टी ऐकण्यासाठी. आजोबा सैन्यात होते त्यामुळे ते बहुतेक वेळेस त्यांच्या आर्मीतल्या गप्पा सांगायचे. याचबरोबर आमच्या आजोळच्या गावांत एक राजवाडा आहे. त्या राजवाडयाच्या पण अनेक गोष्टी ते सांगायचे. काही खर्‍या, काही दंतकथा पण लहानपणी त्या सगळ्याच छान छान गोष्टीच वाटायच्या. जसं की गावाचं नाव साप कसं पडलं? तर ' पूर्वी चंद्रागिरी टेकडीजवळ कमंडलू नदीच्या पात्रालगत राजापूर नावाचे गाव होतं. व सध्याच्या साप गावाच्या जागेवर घनदाट जंगल होतं. येथील गुराखी रोज गाई चारण्यासाठी जंगलात जात असे. तिथे एका वारुळातून रोज एक साप बाहेर येऊन गाईचे दूध पित असे. एक दिवस त्या गुराख्याने ते वारुळ खोदून सापाला मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वारुळातून स्वयंभू महादेवाची पिंड निघाली. याठिकाणी गाव वसवावे, असा दृष्टांत झाला आणि त्याठिकाणी लोकवस्ती झाली. त्या लोकवस्तीला ‘साप’ हे नाव मिळालं. वारुळात गुराख्याला जी पिंड सापडली त्याठिकाणी तेव्हा मंदिरही बांधलेले आहे. तर पूर्वीच्या राजापूर म्हणजे चंद्रगिरीलगत जुन्या गावचे भग्नावशेष आजही पाहायला मिळतात. तर तसं गावात हुंदडून पण कधी गावातल्या या वास्तू अथवा इतिहास अशा गोष्टींबद्दल जास्त विचार केला नव्हता. आजोबांकडून ऐकलेल्या गोष्टी या 'गोष्टी' म्हणूनच होत्या. पण 'शर्यत' आणि 'खो-खो' तसेच 'राजा शिवछत्रपती' अशा मालिकांमधून जेव्हा ओळखीचा परिसर आणि मुख्य म्हणजे वाडा पाहिला तेव्हा मात्र आजोळच्या गावाबद्दल, गावाच्या इतिहासाबद्दल कुतुहल वाटू लागलं. तर यंदाच्या भारतवारीत आणि आजोळ गावी गेल्यावर हा राजवाडा आवर्जून पहायचा असं ठरवलं होतं (तेवढंच नवर्‍यासमोर भाव पण खाता येईल असा सुप्त हेतू.!! ;) ). आजोबांशी बोलताना कळालेला थोडक्यात इतिहास असा, पूर्वी शाहू महाराजांच्या काळी इंद्रोजी कदम म्हणून एक पराक्रमी आणि तालेवार असा सरदार होऊन गेला. तो गावातल्या कदम घराण्याचा प्रसिद्ध असा पूर्वज. लिखित नोंद अशी की इ.स. १७३७ (मार्च) मध्ये बाजीरावाने झील तलाव (दिल्ली) येथें दिल्लीकर मोगलांचा जो पराभव केला, त्या लढाईंत "इंद्रोजी कदम यांसी बोटास गोळी लागोन दोन बोटें उडोन गेलीं.". यावेळी इंद्रोजी कदम हे शिंद्यांच्या दळातील एक मातब्बर सरदार होते. पुढें रामराजे यांनां बार्शी पानगांवहून आणविण्याकरितां जी पेशव्यांची विश्वासाची मंडळी गेली होती. तीत हे इंद्रोजीहि होते (जानेवारी १७५०). तर या कदम सरदारांनी आपल्या गावी बांधलेला हा त्यांचा वाडा. आजोबांच्या मते इंद्रोजी आणि खंडोजी (की कंठोजी) कदम यांनी त्याकाळी बांधलेला हा वाडा आहे. बांधणीनुसार तो पुढे-मागे नंतरच्या काळात अजून वाढवलेला असावा असं वाटतं. सध्याचे त्यांचे वंशज शिंद्याच्याबरोबर उत्तरेत गेल्यावर तिथेच स्थायिक झाले असले तरी वाड्याच्या निमित्ताने त्याचा गावाशी थोडाफार संपर्क आहे. पूर्वी त्यांनी वाड्यासाठी एक दिवाणजी आणि गावाच्या व्यवस्थेसाठी त्याचे विश्वासू व त्यांच्याच भावकीपैकी एक म्हणून माझ्या आजोबांच्या पूर्वजांकडे पाटीलकीची जबाबदारी दिली गेली. पूर्वी वाड्यात कोणी रहात नसले तरी गावचा राबता असायचा. सध्या चित्रीकरण वगैरे मुळे वाड्याला चांगले दिवस आल्याने तशी पर्यटकांना प्रवेशबंदी आहे. या वेळेस गावी गेल्यावर आजोबांना विचारल्यावर त्यांनी वाडा पहायची व्यवस्था केली. MainGate1 MainGate2 सर्वसाधारण ५ एकर पसरलेला हा वाडा तसा बाहेरून एखाद्या गढीसारखा दिसतो. सहा बुरुज तसेच चारही दिशांची तटबंदी अजूनही सलामत आहे. १७व्या शतकापासून कधी युद्धाचा प्रसंग तसाही आला नसावा त्यामुळेही तसेच थोडाफार वापर राहिल्यामुळे तो अजूनही शाबूत असावा. buruj main gate design महा-दरवाजावर हत्तीरोधक खिळे अजूनही व्यवस्थित आहेत. अर्थात दरवाजासोबतच त्यांना दिलेल्या रंगामुळे ते अगदी नव्यासारखे दिसतायत. तिथेच असलेल्या छोट्याशा दिंडी-दरवाजातून आम्ही आत गेलो. आत गेल्यावर मुख्य दरवाजावर असलेला नगारखाना दिसतो (ही ऐकीव माहिती). InsideMainVada इथे मुख्य दरवाजातून आत आल्यावर उजव्या हाताला पाग्याची पडझड झालेली जागा दिसते ('शर्यत' चित्रपटात याच जागी बैल बांधलेले दिसतात.. :) ). डाव्या हाताला हत्तीच्या अंघोळीचा हौद आणि मोठी विहिर दिसते. हत्तींचा हौद आता बर्‍यापैकी दुरवस्थेत आहे. विहिर वापरात असून वाड्याच्या परिसरातली झाडं त्यावरच वाढली आहेत. vihir मुख्य इमारतीत प्रवेश केल्यावर प्रथमतः समोर वाड्याची चौसोपी रचना दिसते. इथेच आपण खुश होऊन जातो. वाडा बर्‍यापैकी ऐसपैस आणि चारी बाजून दगडी जोत्यासह प्रशस्त ओसरी असलेला आहे. इथे चारी बाजूस दगडी चौरंग, बैठका या अजूनही आहेत. ओसर्‍यांच्या कोपर्‍यावर पुरुषभर उंचीचे रांजण आहेत. chausopi rachana इथून आम्ही ओसरीच्या एका कोपर्‍यावर असलेल्या जिन्यावरुन पहिल्या मजल्यावरच्या दरबार सदरेच्या ठिकाणी गेलो. darbar 1 darbar2 ही दरबाराची जागा. इथली दोन्ही बाजूची कवाडे आणि नक्षीदार खांबांची रचना खरंच खूप सुंदर आहे. इथे पूर्वी शाळेची होण्यपूर्वी गावातली प्राथमिक शाळा भरायची (माझी आई कधी काळी इथे बसून शिकलेय. :) ). आता चित्रीकरणाच्या निमित्ताने का होईना पण या जागेची डागडुजी आणि निगा राखलेली दिसतेय. हे एक छानच. darbar pillar design पहिल्या मजल्यावर बाकी भाग मात्र तसाच रिकामा थोडासा अडगळीसारखा दिसला. वेगवेगळ्या हेतूने बांधलेल्या जागा अजून साफ होऊन समोर यायच्या आहेत असं दिसतं. इथे या फोटोमध्ये कोपर्‍यातले रांजण आणि दगडी चौरंग दिसतायत बघा. chaurang परत दुसर्‍या बाजूने आम्ही ओसरीवर आलो. तिथून आतल्या बाजूस जाण्यासाठी नक्षीदार सागवानी दरवाजा होता. inside door design आतल्या खोल्या रिकाम्या असल्याने (तिथेच आसपास माजघर वगैरे असावे बहुतेक) तिथे न थांबता मागच्या दारी तुळशी वृंदावनाच्या चौकात आलो. तिथे बर्‍यापैकी जीर्णोध्दाराचे काम चाललेले होते. तिथल्याच इमारतीचा काही भाग मात्र अगदी रहाण्यालायक असा रिनोवेट केलेला आहे. चित्रीकरणादरम्यान लोकांची राहण्याची/थांबण्याची व्यवस्था इथे होते असं सांगण्यात आलं. खरं तर वाड्याचा हा भाग अगदी पर्यटकांसाठी रहायला उपलब्ध करुन द्यायला हरकत नसावी असं वाटलं. अशा एखाद्या ठिकाणी राहण्याची मजा भारीच असेल. tulas खरं तर बरेचशा बंद दरवाजांच्या भागात तसेच मागच्या नव्याने नीट केलेल्या बागेत वगैरे जाऊन यायची इच्छा होती पण वेळेअभावी शक्य नाही झाले. पण जेवढे पहायला मिळाले त्यानेही खूप छान वाटलं. सध्या तरी चित्रीकरणातच वाडा व्यस्त आहे पण मराठी चित्रपटसृष्टीच्या निमित्ताने का होईना पण नजरेच्या समोरचाच तरीही दुर्लक्षित असा ऐतिहासिक वारसा जपला जातोय आणि पहायलाही मिळतोय हे ही नसे थोडके. आता तर कदम-इनामदारांच्या सध्याच्या वंशजांनी वाड्याचे पुरातन सौंदर्य जपून नुतनीकरण करायचे मनावर घेतलेले दिसतेय तेव्हा पुढे मागे ही सुंदर वास्तू पर्यटकांसाठीही खुली झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. (चित्र- किलमाऊस्की) https://lh3.googleusercontent.com/-30BrcUCiylI/Vse9f0jd4uI/AAAAAAAAAFQ/OPRqSDu-re8/s788-Ic42/footer.png

वाचने 18984
प्रतिक्रिया 40

प्रतिक्रिया

मस्त. वाडा म्हणजे जवळपास गढ़ीच आहे. असाच भला थोरला प्रशस्त वाडा मेणवलीला आहे. नाना फ़डवणीसांचा तो वाडा अलीकडेच आतून पाहिला होता.

In reply to by प्रचेतस

माफक आणि रास्त दरात खाजगी पर्यटन केले तर दोहोंचीही सोय होईल (साव्धानता म्हणून फक्त कौटुंबीक व शिफारसी वरून अभ्यासू विना कौटुंबीक प्रवाश्यांना द्यावी). किमान देखभाल खर्च वसूल होईल हे ही नसे थोडके !!!!

In reply to by नाखु

अगदी हेच मी येताना आजोबांना सांगून आले. पण सध्या चित्रीकरणासाठी वाड्याचा जास्त वापर होत असल्याने तेच लोकं त्यांना हवी तशी डागडूजी करून घेतात. त्यामुळे बर्‍यापैकी देखभाल घेतली जातेय.

In reply to by गिरकी

अगं हो.. पण वाड्याचे वंशज अजूनही येतात तिथे रहायला. शक्यतो उन्हाळ्यात. त्यामुळे तिथे इतर लोकांना जास्त प्रवेश नाहीच देत. पण सिनेस्टार लोकांना रहायला मिळते तिथे शूटींग च्या दरम्यान.

कसला टोलेजंग वाडा आहे ! आणि मुख्य म्हंजे अजून सुस्थितीत आहे.

लव्हली !!!!!! जाता येईल का इथे बघायला?

पर्यटकांना जाउ दिले तर पाहता येईल, पण त्याचबरोबर मूळ वास्तूचे सौंदर्यही खराब करतात, बहुसंख्य पर्यटक! माहिती आणि फोटो दोन्हीही मस्त!

खूप सुंदर वर्णन आणि फोटो.. स्वाती

वाडा चिरेबंदी .....सुरेख फोटो आणि छान वर्णन. खूप छान वाडा आहे, अश्या वाड्यात खरच एक दिवस राहायला मिळाल तर काय मज्जा येईल.

ही तर गढीच आहे की :) छान लेख! आवडला :)

मस्त आहे वाडा. अशा वाड्यात एकदातरी रहायला आवडेल.

आवडला वाडा आणि माहितीही.

किती सुंदर आहे हा वाडा. सुरेख लिहिलं आहेस गं.प्रत्यक्ष पहायला हवाच असा आहे वाडा

सुंदर. हे असे चित्रपटात, मालिकांमध्ये दाखवले जाणारे वाडे प्रत्यक्ष बघणे, अशा गावात लहानपणीच्या सुट्ट्या घालवायला मिळणे हे किती छान वाटतं. धन्यवाद लंके या जागेची ओळख करून दिल्याबद्दल.

खूप छान लिहिलंयस आणि फोटो तर किती आवडलेत काय सांगू! सिनेमावाले आणि पर्यटक वाड्यात काही नको ते फेरबदल करत नाहीत ना हे मात्र बघावे लागेल.

सुरेख लेख लंके.नव्याच जागेची ओळख करून दिलीस.वाड्याचा इतिहासहि छान लिहिला आहेस. मस्त गढि आहे.बघायला मिळाली तर फार आवडेल.

वाडा म्हटल्यावर जशी वास्तू डोळ्यांसमोर येते - अगदी तसा वाडा आहे!

सुरेख आहे वाडा! सागवानी दरवाजा, बैठकीची खोली एकदम मस्त. चौसोपी रचना आणि मधली मोकळी जागा खूप आवडली.

ह्या वाड्यात राहणार्‍या लोकांचा हेवा वाटला. खूप सुंदर वास्तु आहे.

वाड्यात काही जुनी कागदपत्रे आहेत का? त्यातून अजून काही समजायला मदत होईल. या काळातल्या वाड्यात बहुदा भिंतीवर काढलेली सुंदर चित्रे असतात, त्यातली काही वाड्यात आहेत का? मेणवलीमधला नाना वाडा, वाईतील मोतीबाग, शनिवार वाडा इथे काही चित्रे आजही आहेत. वर्णन आणि छायाचित्रांवरून वाडा इतर पेशवेकालीन वाड्यांप्रमाणेच आहे. बाहेरचा चौक, आतला चौक, नगारखाना अगदी शनिवार वाड्याच्या संरचनेप्रमाणेच आहे. दुसर्या मजल्यावरच्या लाकडी खोलीस दिवाणखाना असे म्हणतात. (इथे त्याचे उदाहरण पहा https://kevinstandagephotography.files.wordpress.com/2015/05/nana-wada-… ) तो बहुदा दुसर्या मजल्यावर बाहेरच्या चौकात असे. इंद्रोजी कदम यांचे नाव असलेली अजून एक हकीगत अस्सल पत्रात आहे ती अशी. कर्नाटकातील कडाप्पा येथील अब्दुल माजिदखान काबुल केलेली खंडणी देइना. गनीम मिया म्हणून त्याचा चुलतभाऊ असून त्यांचा उभयतांचा बेबनाव होता. शहाजीराजांच्या ताब्यातल्या जुन्या जहागिरीचे परगणे आता कडप्प्याच्या नबाबाच्या ताब्यात होते. पत्र असे आहे - "सरदारांनी जाऊन कडप्प्यास मोर्चे दिले. अब्दुल माजिदखान पूर्वेस जवळच सिधोट येथे गेला होता. तो एकाएकी तयारीनिशी कडप्प्यावर चालून आला. तारीख २४ सप्टेंबर १७५७ रोजी सकाळी पाउस असता मराठयांचा सरदार हरबा बापू याने त्याच्याशी सामना केला. मागाहून विसाजी कृष्ण त्याचे साह्यास धावून आला. इंद्रोजी कदम, सोनजी भापकर अश्या अवघ्यांनी तोंड लावले. दोन कोसांच्या भुईवर सव्वाप्रहरपावेतो रण झाले. खासा अब्दुल माजीदखान गोळी लागून ठार झाला. नऊ हत्ती व पाचशे घोडे पाडाव झाले. त्यांचे चारशे माणूस ठार झाले, हजार जखमी झाले. श्रीमंतांचे फौजेस मोठे यश आले. अमाचेकडील संभाजी बाजी घोरपडे, बाजीपंत व पन्नास माणूस ठार जाले. बाजीपंताने शर्थ केली. सर्वांनी मेहेनत केल्याचे सार्थक झाले. झुन्जाचे रात्रीसच कडापे घेतले. पुढे तहाचा मजकूर निमे मुलुख व दहा लाख रोख बोलत आहो. बळवंतराव (मेहेंदळे) बहुत प्राक्तनवान, त्यांच्या शहाणपणास जोडा नाही."