Skip to main content

शिवजयंती तारखेनुसार कि तिथीनुसार…

लेखक shawshanky
गुरुवार, 18/02/2016 या दिवशी प्रकाशित केले.
महाराजांच्या जन्मतिथीबाबतचा वाद जुनाच आहे. महाराजांचा जन्म १६३० कि १६२७.मात्र तो इतिहासाच्या अभ्यासाचा मुद्द आहे. या विषयी येथे चर्चा करण्याचे कारणनाही. महाराजांचा जन्म इंग्रजी तारखेप्रमाणे १६३० साली झाला हे आता सिद्धही झाले आहे आणि मान्यही! भारत इतिहास संशोधक मंडळाच्या शिवचरित्र प्रदीप या पुस्तकात फार विस्ताराने हि चर्चा करण्यात आली आहे .येथे आम्ही एक वेगळा मुद्दा चर्चेस घेत आहोत.वास्तविक यावर चर्चा करण्याचेही कारण नव्हते. तरीही ती करणे भाग पडत आहे.महाराजांची जयंती, त्यांच्या आयुष्यातील सर्वच घटना आपण अभिमानाने साजर्या करतो. त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा आजही रायगडावर अभिमानाने साजरा केला जातो.महाराजांच्या पुण्यतिथीला या पुण्यश्लोक राजाच स्मरण करताना महाराष्ट्राच्या डोळ्याच्या कडा ओलावतात. या घटना तिथीप्रमाणे साजर्या कराव्यात कि तारखेप्रमाणे हा प्रमुख वाद आहे. वाद टाळू इच्छिणारी मंडळी म्हणतील का हा मुद्दा घ्या? महाराजांविषयी अभिमान आहे तर त्यांचं आयुष्यातील घटना दोन्ही दिवशीसाजरे करा… मात्र आम्ही येथे वैचारिक पातळीवर मुद्दे मांडीत आहोत हे लक्षात घ्यावे. दोन्ही दिवशी घटना साजर्या करा, हे या प्रश्नावरील उत्तर नव्हे. किंबहुना सर्व महाराष्ट्राचे या बाबतीत एकमत होऊन ह्याप्रश्नावर तोडगा निघावयास हवा. शिवकालीन घटना तारखेप्रमाणे साजर्या करणे हि चूक नसून शिवकालीन घटनांच्या बाबतीत इंग्रजी तारीख वापरणे (घटना साजर्या करण्यासाठी) हीच मुळात चूक आहे, असे आम्हास वाटते. आपल्या संस्कृतीने कालगणनेसाठी स्वतःची पद्धती शोधून काढली आहे जी फार शास्त्रीय आहे. प्राचीन काळापासून अनेक संस्कृतींनी आप-आपल्या कालगणना पद्धती शोधून काढल्या आणि वापरल्या. मात्र या संस्कृतींवर, देशांवर जेंव्हा काही संकटे आली अक्रमने झाली बर्याच ठिकाणी पराभूत संस्कृतीच्या परंपरा नामशेष झाल्या आणि आक्रमकांच्या परंपरा लादल्या गेल्या. काही वर्षांनी त्या परंपरा त्या संस्कृतीत मातीत रुजल्या आणि आज त्या विनासायास चालू आहेत. जखमांचे घाव विरले आणि नवीन पिढ्यांनी या संस्कृती आपल्या म्हणून स्वीकारल्या. जगभरात अनेक ठिकाणी असे झाले आहे. आपल्या संस्कृतीचे अभिमानास्पद वैशिष्ट्य असे कि आपल्याकडे तब्बल नऊ शतके आक्रमण होऊनही,आपल्या स्वतःच्या संस्कृती परंपरा लयास गेल्या नाहीत. हे जगाच्या इतिहासात अपवादानेच घडले असावे किंवा नसावे. आपल्या इतिहासातील पराभूत कालखंडाचाही हा महत्वाचा भाग आहे, आणि त्यामुळे त्याबद्दल आपल्या मनात आदर असला पाहिजे. शिवपूर्व काळात मराठी (मोडी लिपीतील) पत्रामध्ये फारसी कालगणना वापरलेली दिसते. मात्र शिवकालातील पत्रांमध्ये सुरुवातीचे काही अपवाद वगळता मराठी तिथी आणि संवत्सर वापरले आहे किंवा दोन्हीचा वापर केलेला दिसतो. याचा अर्थ मराठी तिथी अधिकाधिक वापरावी हा शिवकालातील प्रघात आहे असे दिसते शिव्रज्याभिशेकानंतर राज्याभिषेक शक सुरु झाले हे तर आपण सर्व जाणतोच.दुसरीकडे महाराजांनी जाणीवपूर्वक एक गोष्ट केली हे आपल्या ध्यानात येईल .आक्रमणाअगोदर भारतीय परंपरेत ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या जैसे, राज्याभिषेक(महाराजांच्या अगोदर शेवटचा राज्याभिषेक ३०० वर्ष अगोदर झाला होता) ,राज्यकर्त्यांची नाणी पाडणे, राज्याभिषेक शक सुरु करणे, ह्या गोष्टी महाराजांनी सुरु केल्या. तसेच फारसी शब्दांचे मराठी प्रतिशब्द तयार करवून घेतले आणि त्याचा एक शब्द कोश बनवला, रूढ केला. याचे कारण हि सर्व पारतंत्र्याची प्रतीके होती. शारीरिक पारतंत्राबरोबरच प्रतीकात्मक पारतंत्र्यहि महाराजांनी खोडून काढले. अशा राजाची जयंती आपण पारतंत्र्याच्या प्रतिकांनी म्हणजे इंग्रजी कालगणनेनुसार साजरी करणे चूक नाही का? महाराजांच्याचविचारांना आपण हरताळ फासत नाही का? इंग्रजी कालगणना आज आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य आहे आणि दैनंदिन व शासकीय,आर्थिक आणि व्यावहारिक वापरतआहे हे मान्यच! मात्र सध्याच्या काळासाठी आपण मान्य केलेले हे गृहीतक आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये एकसूत्रता यावी यासाठी आपण इंग्रजी कालगणना मान्य केली आहे, आणि वापरत आहे. शिवकालीन घटनांच्या सोहळ्यासाठी इंग्रजी तारीख वापरण्याचे काहीच कारण नाही! आपल्या संस्कृतीप्रमाणे आणि संस्कृती बाबतीत साजर्या करावयाच्या घटना या संस्कृतीप्रमाणेच साजर्या झाल्या पाहिजेत न कि,आंतरराष्ट्रीय पद्धतीप्रमाणे! किंबहुना ज्या घटना मुळातच तिथीप्रमाणे नमूद आहेत, त्यासाठी इंग्रजी प्रतिदिनशोधून काढण्याचा अट्टाहास सांगितलाय कुणी? तिथीचे इंग्रजी रूपांतरण करण्यामध्ये एक फार मोठी तांत्रिक अडचण आणि तांत्रिक चूक उद्भवण्याची शक्यता सुद्धा आहे मात्र त्याचा इथे उल्लेख करणे आम्हास सयुक्तिक वाटत नाही कारण, मुळात इंग्रजी कालगणना अमान्य आहे. आता एक महत्वाची गोष्ट जी आम्हास समजून येईल ती हि कि आम्ही आमचे सर्व पारंपारिक उत्सव तिथीप्रमाणेच साजरे करतो, अगदी आमचे नववर्ष सुद्धा! आमच्या मते, त्यामुळे शिवकालीन उत्सवांच्या बाबतीत आम्हास तिथी कि इंग्रजी तारीख हा प्रश्न पडण्याचे कारणच नाही आणि सार्वत्रिक एकमताने तिथीप्रमाणेच ते साजरे केले पाहिजेत. महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना: जन्म: फाल्गुन वद्य(कृष्ण) तृतीया शके १५५१- यावर्षी ८ मार्च २०१५ राज्याभिषेक:- ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९५ यावर्षी ३१ मे २०१५ (शिवराज्याभिषेक शक ३४२ प्रारंभ) पुण्यतिथी: चैत्र पौर्णिमा, हनुमानजयंती शके १६०१, यावर्षी ४ एप्रिल २०१५ सर्वांनीच या मताशी लगेचच सहमत व्हावे असे नाही. विशेषतः पूर्वापार तारखेप्रमाणे शिवकालीन उत्सव साजरे करणारे हे म्हणू शकतील कि आम्ही आमची प्रथा का बदलावी? मात्र आम्ही वर दिलेले स्पष्टीकरण म्हणजे त्यांची (तारखेप्रमाणे साजरे करण्यारांची) चूक दाखवून देण्यासाठी नाही तर, तिथीप्रमाणे शिवकालीन घटना साजर्या करणे हेच आपल्या संस्कृतीला आणि महाराजांच्या प्रयत्नांना धरून असल्याचे पटवून देण्याचा प्रांजळ प्रयत्न आहे. मात्र सर्वात महत्वाचे म्हणजे, या घटना साजर्या झाल्या पाहिजेत. आपण सुदैवी आहोत कि आपण अशा मातीत जन्मलो ज्या मातीत हा सूर्यपराक्रमी राजा जन्मला, बाजी, तानाजी सारखे वीर योद्धे जन्मले आणि स्वराज्याचा प्रत्येक पाइक जन्माला आला. त्यांचे गुणगान गावे तितके थोडेच आहे. कारण या इतिहासाच्या विचारांमध्येच आपल्या उज्वल भविष्याचा राजमार्ग आहे. ।।प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपति शिवाजी महाराज।।

वाचने 10005
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

मी काय म्हणतो, शिवाजी महाराजांनी सुरु केलेल्या शिवशकाप्रमाणेच का साजरी करू नये? किमान राज्याभिषेक आणि पुण्यतिथी तरी नक्कीच शिवशकाप्रमाणे साजरी करता येईल, काय म्हणता? ')

In reply to by स्वामी संकेतानंद

शिवाजी महाराजांनी सुरु केलेल्या शिवशकाप्रमाणेच का साजरी करू नये?
म्हणजे काय? शिवशक हे काय वेगळे क्यालेंडर नाही. नेहेमीचेच हिंदू पारंपरिक क्यालेंडर, फक्त आरंभबिंदू सरकवलेला.

महाराजांच्या जन्मतिथीबाबतच्या वादात वेळ-श्रम-पैसा खर्च करून दुफळी माजविण्यापेक्षा, तोच वेळ-श्रम-पैसा महाराजांची जाज्वल्य राष्ट्रभक्ती जनमानसात रुजविणार्‍या कार्यक्रमांवर खर्च केला तरच ती महारा़जांसाठी खरी आदरांजली ठरेल.

दोन्ही साजर्या करा, फक्त ते साजरे करणे विधायक असावे उदा. गड-किल्ल्यांचे संवर्धन. टिळे लाऊन, झेंडे घेऊन, हॉर्न वाजवत लोकांना त्रास द्यायचा असेल किंवा राजकीय शक्तिप्रदर्शनच करायची असतील तर तिथी-तारखा पुस्तकातच बर्या.

In reply to by sagarpdy

टिळे लाऊन, झेंडे घेऊन, हॉर्न वाजवत
आजच सकाळी ५:३० ला हे पाहिले! ह्यातून महाराजांबद्दलचा आदरभाव कसा व्यक्त होतो, हे मात्र समजत नाही.

In reply to by यशोधरा

हे मात्र समजत नाही..... असा आदरभाव व्यक्त करण्याचे बरेच फायदे आहेत. १. मोठ्या व्यक्तींची पूजा केली की, बरीच सामाजिक कामे करता येतात. २. इतर धर्मिक स्थळे जर आवाज करत असतील तर आम्ही पण करायला पाहिजे, असा उदात्त विचार ह्या मागे असतो. ३. आपापल्या पक्षांची ताकद पण ह्या अशा निमित्ताने आजमावता येते. ह्याचा उपयोग पुढे निवडणूकीच्या वेळी होतो. ४. अनावश्यक आवाज करणे, रस्त्यावर कचरा करणे, फूटपाथ वरून गाडी चालवणे किंवा फूटपाथ वर गाडी पार्क करणे, हे पण अशावेळी करता येते.ह्याच्यामुळे लोकांची सहनशक्ती वाढते. (शिवाजी महाराजांच्या काळात नियमांची काटेकोर अंमल बजावणी होत होती, त्यामुळे पुढे लोकांची सहनशक्ती कमी झाली.ह्याचाच फायदा पुढे ब्रिटिशांनी घेतला.आता परत पारतंत्र्य नको असेल तर, लोकांची सहनशक्ती वाढायलाच पाहिजे, असे माझे मत आहे.) ५. तरूण रक्ताला रस्त्यावर यायला वाव मिळतो. ६. अशा कार्यक्रमामुळे व्यापारी, नौकरी करणारे ह्यांना घरबसल्या दान करण्याचे पुण्य मिळते. ७. आपण किती धार्मिक आहोत अशी जाहीरात पण ह्या निमित्ताने करता येते. ८. गाड्यांचे हॉर्न पण ह्या निमित्ताने चेक करता येतात.कुणाचा हॉर्न जास्त मोठा हे पण समजते. अज्जुन बरेच फायदे आहेत. सध्या तरी आम्ही गोंदवलेकर महाराजांच्या भक्तांच्या कृपेने, ह्यातल्या बर्‍याच गोष्टींचा आनंद घेत आहोत. (स्वगत : प्राणी अनावश्यक आवाज करत नाहीत.मनुष्य मात्र अनावश्यक आवाज फार करतो.त्यामुळे माणासाला प्राणी म्हणावे का?)

In reply to by sagarpdy

हेच मी माझ्या मावस बंधू ना सांगायला गेलो तर पार आमची जात कोणती हा प्रश्न विचारला का तर म्हणे मराठा असतातर असला प्रश्न विचारला नसता

।।प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपति शिवाजी महाराज।।
काही शब्द गाळले आहेत काय???

In reply to by सुनील

मुद्दा प्रखर राष्ट्रवादाचा असलेकारणे असले "गाळप" होणे अपेक्षीत आहे. गाळलेल्या जागाही वाचणारा अडाणी मिपाकर नाखुस मावळा

होऊन जाऊ दया सिंहगज्रना "प्रौढ प्रताप पुरंदर" "महापराक्रमी रणधुरंदर""क्षत्रिय कुलावतंस्""सिंहासनाधीश्वर" "महाराजाधिराज""महाराज" "श्रीमंत""श्री""श्री""श्री" "छत्रपती""शिवाजी""महाराज"की"

काल रात्री २ वाजायच्या सुमारास काही "शिवभक्त" तरुण गाडीवरून भगवा हातात घेऊन तुफान वेगाने आणि पूर्ण क्षमतेने हॉर्न वाजवत जाताना दिसले आणि ऊर भरून वगैरे आला. स्वतः महाराजांनी त्यांना काय बक्षीस दिले असते, याचा विचार करतो आहे.

आज काल पोवडे सुद्धा कमी ऐकायला मिळ्तात! कोणी एफ एम वर पोवडा ऐकायला का?

माझे व्यक्तिगत मत अंशत: sagarpdy यांच्या मताजवळ म्हणजे दोन्हीही दिवस साजरे करण्यास अथवा पैकी कोणताही साजरा करण्यास हरकत नसावी, किंवा खरेतर शिवरायांच्या कोणत्या न कोणत्या चांगल्या गोष्टीचे स्मरण रोज दररोज करणे अधिक श्रेयस्कर. पण आता धागा लेखकाने तिथी पंचांगावरून वाद काढलाच आहे तर या निमीत्ताने लोकमान्य टिळक (ज्यांना आपण सहसा परंपरावादी म्हणून ओळखतो आणि पंचांग या विषयाचाही त्यांचा बर्‍यापैकी अभ्यास असावा) -त्यांनी जन्मतारखे बाबतही काही अग्रलेख लिहिले असावेत पण सध्याचा इतिहास संशोधन स्तर पुढचा असण्याची शक्यता असल्यामुळे तुर्तास इथे त्याचा संदर्भ देत नाही- त्यांच्या शिवरायांबद्दलच्या इंग्रजी अग्रलेखात खालील प्रमाणे उल्लेख येतो.
मराठी अनुवाद: मानवी स्वभावात आदर्श वीरपुरुषांची पूजा ही खोलवर रुजली आहे; आणि आपल्या मनास प्रेरणा देऊ शकेल अशा स्वदेशी आदर्श वीरपुरुषाच्या पूजेची, आपल्या राजकीय आकांक्षेस पूर्ण ताकद देण्याकरिता गरज आहे. या कारणासाठी, शिवाजी हे भारताच्या इतिहासातील एकमेव आदर्श वीरपुरुष आहेत. .... शिवाजींनी अंगिकारलेल्या पद्धती सध्याच्या पिढीनेही अंगिकाराव्यात असा उपदेशही केला जात नाही आणि तशी अपेक्षाही अजिबात केली जात नाही. ..... शिवाजीच्या जीवनातला प्रत्येक प्रसंग हा आजच्या काळात कोणीही जसाच्या तसा नकलवावा, असे कधी कोणास स्वप्नातही वाटत नाही. ती प्रेरणा, ज्या प्रेरणेने शिवाजीस त्याच्या कार्यास उद्युक्त केले, पुढील पिढीने सतत नजरेसमोर ठेवण्यास योग्य आदर्श म्हणून, त्या प्रेरणेसच पुढे केल्या जाते. .... पर्यायी अनुवाद: मानवी स्वभावात राष्ट्रिय नेत्याचा उदो उदो करणे/ (जयजयकार करणे) हे खोलवर रुजली आहे; आणि आपल्या मनास प्रेरणा देऊ शकेल अशा स्वदेशी आदर्श वीरपुरुषाच्या पूजेची, आपल्या राजकीय आकांक्षेस पूर्ण ताकद देण्याकरिता गरज आहे. या कारणासाठी, शिवाजी हे भारताच्या इतिहासातील एकमेव आदर्श वीरपुरुष आहेत. .... शिवाजींनी अंगिकारलेल्या पद्धती सध्याच्या पिढीनेही अंगिकाराव्यात असा उपदेशही केला जात नाही आणि तशी अपेक्षाही अजिबात केली जात नाही. .... शिवाजीच्या जीवनातला प्रत्येक प्रसंग हा आजच्या काळात कोणीही जसाच्या तसा नकलवावा, असे कधी कोणास स्वप्नातही वाटत नाही. ती प्रेरणा, ज्या प्रेरणेने शिवाजीस त्याच्या कार्यास उद्युक्त केले, पुढील पिढीने सतत नजरेसमोर ठेवण्यास योग्य आदर्श म्हणून, त्या प्रेरणेसच पुढे केल्या जाते. मूळ इंग्रजी उतारा: Hero worship is a feeling deeply implanted in human nature ; and our political aspirations need all the strength which the worship of swadeshi hero is likely to inspire our minds. For this purpose Shivaji is the only hero found in Indian history. ...... It is not preached nor is it to be at all expected that the methods adapted by Shivaji should be adapted by the present generation. .... No one ever dreams that every incident in Shivaji’s life is o be copied by any one at present . It is the spirit which actuated Shivaji in his doings that is held forth as the proper ideal to be kept constantly in view by the raising generations. संदर्भ मिपा धागा लेख
टिळक प्रेरणा शिवाजीमहाराजांपासूनच घेण्यास सांगत आहेत, पण शिवाजी महाराजांनी अंगिकारलेल्याच पद्धती अंगिकारुन परंपरेसाठी परंपरा पाळावी असे टिळकांना किमान केवळ उपरनिर्देशित टिळकांचा अग्रलेख लिहिताना तरी अभिप्रेत नसावे, -टिळकांचेच इतरत्र एखादे परंपरेची पाठराखण करणारे मत मिळणारच नाही असे तुर्तास सांगता येणे कठीण- पण तरीही केवळ तिथीनुसारच करा यावर किती भर द्यायचा यासाठी टिळकांच्या उपरोक्त मताची अल्पशी दखल धागा लेखक घेऊ शकतील का ? मला पंचांग आणि कॅलेंडरचे फारसे कळत नाही तरीही दसरा दिवाळी हे सण ऋतू निगडीत आहेत आणि भारतीय पंचांगांची ऋतू निष्ठता कदाचित अधिक बरी असल्यामुळे जमेल तेव्हा असे सण तिथीनुसार करावेत पण परदेशात असताना भारतीय ऋतूंचा संदर्भ लागणे आणि सुट्ट्या जुळून येणे कठीण त्यामुळे सण सामुहीकपणे करणे बर्‍याचदा जवळच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही साजरे केले जाते. जन्म तारखा आंतरराष्ट्रीय कॅलेंडरची सवय झाल्यामुळे तशा लक्षात ठेवणे सोपे जाते. म्हणून कॅलेंडरनुसार जन्मतारीख साजरी करण्यात व्यक्तीशः वावगे वाटत नाही. मागच्या पिढ्यांमध्ये सगळे लोक धोतर घालत आता पोषाख बदलला आहे, असे थोडे थोडे बदल होतात काळ बदलला तसे जराशा प्रमाणात बदल स्विकारण्यास हरकत नसावी.

In reply to by माहितगार

जन्म तारखा आंतरराष्ट्रीय कॅलेंडरची सवय झाल्यामुळे तशा लक्षात ठेवणे सोपे जाते. म्हणून कॅलेंडरनुसार जन्मतारीख साजरी करण्यात व्यक्तीशः वावगे वाटत नाही.
सहमत आहे. मी स्वतः तरी एकही दिवस भारतीय पंचांगाप्रमाणे लक्षात ठेवत नाही.आज पौर्णिमा आहे की अमावास्या याचा पत्ताही मला नसतो आणि कुठलीही तिथी असली तरी त्यामुळे मला त्याचा काही फरकही पडत नाही. अगदी दिवाळीसारखे भारतीय सण जरी असले तरी यावर्षी दिवाळी कधी येणार आहे (ऑक्टोबरमध्ये की नोव्हेंबरमध्ये) अशा स्वरूपाचाच प्रश्न पडतो. त्यामुळे जर इतर सर्व गोष्टींमध्ये रोमन कॅलेंडर पाळत असू तर याही गोष्टीत ते पाळले तर काय बिघडले? (सांगलीतील एक सद्गृहस्थ मला माहित आहेत.ते सर्व दिवस भारतीय पंचांगाप्रमाणे लक्षात ठेवतात. उदाहरणार्थ मी पौर्णिमेच्या दिवशी पुण्याला गेलो, पंचमीला परत आलो वगैरे वगैरे. अशा मंडळींची गोष्टच वेगळी.पण तशी सवय नसेल तर सगळ्या गोष्टींमध्ये रोमन कॅलेंडरच पाळले तर त्यात काय चुकले?)

shawshanky भाऊ लेख मागच्या वर्षी लिहिला होता का ?? आधी कुठे प्रदर्शित केला होता का ?? आपल्या जे लिहील आहे दिल्यास उत्तम होईल असे वाटते. असल्यास लिंक द्यावी अवांतर : तुमच नाव मराठीत कसे लिहायचे, गुग्ल्या गडबडतो आमचा

भारतीय पंचांगांची ऋतू निष्ठता कदाचित अधिक बरी असल्यामुळे
साफ चूक! भारतीय पंचांगाची ऋतुनिष्ठता ही दर तीन वर्षांनी केल्या जाण्यार्‍या अधिक मास नामे "जुगाडा" मुळे आहे! ग्रेगरीयन कालगणनेतही जुगाड करावा लागतो पण तुलनात्मकदृष्ट्या अगदी कमी (दर चार वर्षांनी १ दिवस). सबब, ग्रेगरीयन क्यलेंडरची ऋतुनिष्ठता अधिक आहे!

In reply to by सुनील

हो या विषयात मी अगदी चूक असू शकतो, हि चर्चा कदाचित मला ह्या बाबतीतला माझा परस्पेक्टीव्ह सुधारण्यास मदत करेल. या मुद्द्यावर आपले मत मांडण्यासाठी आभारी आहे. सुनील यांना अजून कुणी दुजोरा अथवा विरुद्ध बाजू मांडू इच्छिते आहेका

In reply to by सुनील

बादवे, ऋतूचक्रानुसार अधिक योग्य असे क्यालेंडर १९५६ मध्ये भारतीय वैज्ञानिकांनी सुरु केले आहे (नेतृत्व : मेघनाद साहा) http://web.archive.org/web/20080424080733/http://www.bjp.org/today/may_… https://en.wikipedia.org/wiki/Indian_national_calender BOSS लिनक्स सारखेच हे कोणीच वापरत नाही !