Skip to main content

शंकराचार्य नामक तळपत्या सूर्यासमोर माझे काजवे चमकवणे

लेखक धनंजय यांनी सोमवार, 24/09/2007 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
आदी शंकराचार्य म्हणजे भारतीय आध्यात्मिक विचारसृष्टीतला तळपता सूर्यच. त्याच्यासमोर डोळे दिपून अंधेरी यायला लागली, म्हणून आता थोडे काजवे चमकवतो. शंकराचार्यांनी वेद, उपनिषदे वगैरेंवरती बरेचसे किचकट लेखन केले आहे, पण आज त्यांच्या शब्दांची ओळख "भज गोविन्दम्" या अत्यंत मधुर गीतामुळे लोकांत आहे. त्याचे धृवपद असे : भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते | संप्राप्ते सन्निहिते काले* नहि नहि रक्षति डुकृ़ञ् करणे ॥ भज गोविंदा भज गोविंदा गोविंदा भज मूर्ख जणा येतां विधिलिखिताच्या काळें नाही रक्षित "डुकृ़ञ् करणे" ॥ इथे "डुकृ़ञ् करणे" हा काय प्रकार आहे? हा कुठल्यातरी तांत्रिक शब्दकोशातला असंबद्ध उतारा आहे. म्हणजे आज एखाद्या पाद्र्याने येऊन गणितकाराला सांगणे "तुझ्या dy/dx ने मरणाच्या काळी रक्षण होणार नाही, ते सोड, येशूचा पंथ धर," किंवा एखाद्या सी-प्रोग्रॅमरला सांगणे झाले "तुझ्या '# include stdio.h' ने मरणाच्या काळी रक्षण होणार नाही, ते सोड, येशूचा पंथ धर". अरे बाबा, गणितज्ञ "dy/dx" आणि प्रोग्रॅमर "# include stdio.h" मरणाच्या काळी वापरतो आहे का? किंवा शब्दकोशातल्या तळटिपा लिहिणारा "डुकृ़ञ् करणे" मरणाच्या काळी वापरतो आहे का? पण तंत्रशिक्षण नसलेल्या पण विचारी माणसास शंकराचार्यांचे (किंवा माझ्या पाद्रीचे) गाणे ऐकून तसे वाटल्यास काय नवल! आपल्या मधाळ जिभेचा पाचर बनवून या प्रतिभावंत आचार्यांनी तंत्रज्ञ -वैज्ञानिकांना सामान्य माणसापासून तोडले. अहो, इ.स.५व्या शतकात भारतात ज्योतिषशास्त्रात पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा विचार सुरू झाला होता. पण तेवढ्यावर विज्ञान थांबून चालत नाही - ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी शेकडो वर्षे कोणालातरी किचकट गणिते आणि निरीक्षणे करावी लागतात. ती कोणी केली नाहीत, मग अजूनही कुंडल्या "पृथ्वी विश्वाचा मध्य" असे मानून मांडतात - (घाटपांडे सर, चुकले असेल तर सुधारा). इ.स.पूर्व ७०० ते इ.स.७०० पर्यंत आयुर्वेदातले महारथी सुश्रुत, चरक आणि वाग्भट होऊन गेले. त्यानंतर सूक्ष्म निरीक्षण करून वैद्यकात संशोधन करणारे भारतात निपजणे बंद का झाले? साधारण त्या काळात स्वतंत्र विचार करणार्‍यांना लोकात भाव मिळेनासा का झाला? यात शंकराचार्य एकटेच नाहीत, पण त्या काळात अवघ्या हिंदू/हिंदी विचारधारेने एका टोकाचे तंत्र-विज्ञान-द्वेष्टे रूप घेतले. म्हणून या रसाळ गोड गाण्याचे धृवपद ऐकतो तेव्हा मी भारतीय विज्ञानाच्या हजार वर्षांच्या निद्रेची, आणि अफगाण-ते-इंग्रज या सर्वांकडून येणार्‍या हिंददेशाच्या पारतंत्र्याची नांदी ऐकतो. झाले. टाकली पिंक. चर्चेचा विषय हा : भारतीय विज्ञानाच्या दीर्घ योगनिद्रेचे कारण त्या काळात झालेला हिंदूधर्मातील बदल आहे, हे तुम्हाला पटते का? नसल्यास तुम्हाला कुठली कारणमीमांसा पटते? --- *या ओळीत "प्राप्ते सन्निहिते मरणे" वगैरे पाठभेद आहेत. या चर्चेत ते न काढले तर चर्चा सुसूत्र राहील. (संपादन : याच्याआधी ती टाकलेली पिंक माझ्यावर परत पडणार होती वगैरे जरा कसेसे वाटायला लावणारे शब्द होते. ते आता संपादून काढून टाकले.)

वाचने 93272
प्रतिक्रिया 74

प्रतिक्रिया

In reply to by साहना

बघा बरं, एवढं झालं तरीही भागवतसाहेब म्हणतात की व्यक्तीहित बाजुला ठेवून आधी राष्ट्रहित बघितले पाहिजे. ते चर्खा-धारी-खादी-एजंट आणि ह्या लोकांच्या बोलण्यात काहीच फरक नाही. आता काय करावे बरे?

In reply to by साहना

पारतंत्र्य जरी असले आणि हिंदू धर्म संकुचित जरी वाटला तर आंबेडकर सारखा गुणी मुलगा १००% निर्धन असून सुद्धा कसा तरी इंग्लंड अमेरिकेत जावून शिकला होता.

In reply to by मारवा

प्रतिसाद आवडला. यावरून माझ्या एका आवडत्या कवितेचे कडवे आठवले - 'फुल मेनी अ फ्लॉवर इज बॉर्न टू ब्लश अनसीन अ‍ॅण्ड वेस्ट्स इट्स फ्रॅग्रन्स ओव्हर डेझर्ट बेअर फुल मेनी अ जेम्स ऑफ प्योरेस्ट रेज सिरीन द डार्क अनफॅदम्ड केव्हज ऑफ ओशन बेअर!'