Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मधुरा देशपांडे on Mon, 01/18/2016 - 01:12
सिरीया आणि युद्धजन्य परिस्थितीतले इतर देश आणि तिकडून जर्मनीत येणारे निर्वासित, या सगळ्याबद्दल सध्या सगळीकडेच चर्चा आहे. यामागे जर्मनीची भुमिका इतकी ओपन कशी, इतर युरोपीय देशांनी निर्बंध घालूनही, आधीच ग्रीस-स्पेन यांचे आर्थिक संकट डोक्यावर असताना देखील जर्मनी मात्र सतत निर्वासितांचे स्वागत आहे अशीच भुमिका घेऊन आहे असं चित्र आहे. अगदी युरोपियन युनियन कडूनही याबाबत विरोधी भूमिका दिसली परंतु जर्मनीत निर्वासितांचे ग्रुप्स येतच होते. त्यांना मदत करण्यासाठी सरकार आणि नागरिक सगळेच पुढाकार घेत होते. परंतु ३१ डिसेंबर ला कलोन या शहरातील मध्यवर्ती भागात अनेक अरब आणि नॉर्थ आफ्रिकन लोकांकडून लुटमार, आणि विशेष करून स्त्रियांना छेडखानीच्या घटना घडल्या आणि अचानक रेफ्युजीज बद्दलचा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेस आला. नेहमीच्या सुरक्षित वातावरणातून असे काही घडल्यानंतर हा निर्णय योग्य की अयोग्य, आता तरी जर्मनीने सीमा सुरक्षित कराव्या आणि आता निर्वासितांना अजून मदत करू नये इथपासून तर या एका घटनेमुळे सरसकटीकरण करू नये, चार लोकांमुळे ४०० लोकांना बदनाम करू नये, आणि अजूनही जर्मनीने निर्वासितांना मदत करावी अशा सर्व बाजूंनी विरोधी प्रतिक्रिया उमटल्या. फक्त राजकीय पातळीवरची ही बाब मोठ्या प्रमाणात इतर नागरिकांनाही प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. तर त्या अनुषंगाने अधिक चर्चा करण्यासाठी, काही प्रत्यक्ष अनुभव शेअर करावेसे वाटले म्हणून हा धागा. या बाबतीत जाणकारांनी भर घातली तर अजूनच उत्तम. थोडी पार्श्वभुमी पाहिल्यास पहिले आणि दुसरे महायुद्ध आणि त्यानंतर पुन्हा दिमाखात उभा राहिलेला हा देश. त्या युद्धाच्या आठवणी इथल्या नागरिकांना आता नको आहेत. आता शांतता नांदावी म्हणून हे लोक शक्य तेवढे प्रयत्न करतात. कधीही कुणी स्वतःहून हा विषय काढत नाही. पण त्यांच्या इमारती, किल्ले, राजवाडे इथे इतिहास दिसतोच, पण त्यांची शांततेची भुमिकाही दिसते. त्यातून सतत ‘जे घडलं ते पुन्हा घडू नये यासाठी आपण प्रयत्न करू’ असेच दाखवले जाते. अगदी ‘एसएस’ ही दोन अक्षरं गाड्यांच्या नंबरप्लेटवरूनही वगळली जातात, स्वस्तिक हे नाझींचे चिन्ह इथे ओपनली कुणी काढू शकत नाही आणि ज्यूच काय, इतर कुठल्याही धर्माबद्दल, देशाबदल कुणी ओपनली वाईट बोलू-लिहू शकत नाही. आणि हे कायदे पाळले जातात, कारण तशी व्यवस्था कार्यरत आहे. इथे राहणारे लोक, टुरिस्ट सगळ्यांसाठीच जर्मनी हा अत्यंत सुरक्षित देश समजला जातो आणि ते तसं होतंही. दुसऱ्या महायुधानंतर निर्वासित म्हणून आलेले अनेक तुर्किश लोक हे आता अनेक वर्षे जर्मनीत आहेत. त्यांच्या अनेक पिढ्या इथल्याच आहेत. जर्मनीतील कुठल्याही भागात तुर्किश लोकांची दुकाने दिसतीलच. यांच्यातही काही कट्टर आहेत, म्हणजे बायकांचे कपडे इत्यादी बाबत, काही बरेच ओपन आहेत. पण आपण बरे आपले काम बरे अशी यापैकी बहुतेकांची भुमिका आहे. म्हणजे त्यांचे स्पेसिफिक असे काही भाग आहेत, जिथे इतर भागांपेक्षा अस्वच्छता आहे, पत्यांचे अड्डे आहेत, मवालीगिरी करणारे लोकही तिथे दिसतात, बायकांसोबत ४-५ पोरं हमखास दिसतातच वगैरे. पण तेही त्यांच्यापुरते. बाकी बाबतीत कायद्याचा धाक बाळगून आहेत. इतर शिकलेले लोकही आहेत जे सगळीकडे नोकरी करतात. क्वचित प्रसंगी तुर्किश-जर्मन अशा जोड्यांबाबत ऑनर किलिंगच्याही घटना ऐकीवात आहेत, पण अनेक असे लोक आनंदाने संसारही करतात. एकूणच सार्वजनिक रीत्या त्यांचा इतर कुणाला फारसा उपद्रव नाही. असेच पाकीस्तानीही आहेत, इकडे काहीतरी काम करत आता स्थिरावलेले. काही फार पूर्वीपासून असलेले भारतीय देखील आहेत. पण सार्वजनिक रीत्या त्रासदायक असे प्रकार दिसत नाहीत. इथे आल्यानंतर ३ वर्षात कधीही असुरक्षित वाटले नव्हते. पण मग अचानक गेल्या वर्षभरात, त्यातही मागच्या ६ महिन्यात वेगळे अनुभव येऊ लागले. मग मिडियातही याबद्दल जास्त वाचायला, ऐकायला मिळू लागले. जवळच्या मुख्य शहरात स्टेशनवर अनेक बेघर, भिकारी लोक दिसू लागले. इतरत्र फिरतानाही आफ्रिकन्-अरेबिक वंशाचे रिकामटेकडे लोक दिसू लागले. पण याच बरोबर अनेकदा हिंदी भाषिकही होते, जे पाकिस्तानमधून पळून आलेत पण निर्वासितांच्या नावाने आलेत. मग इथे या देशाने त्यांना राहायला जागा दिली आहे, कपडेलत्ते, यांच्या मुलांची शिक्षणं, आजारपणं हे सगळंच आलं. त्यांना ग्रोसरी स्वस्तात, त्यांच्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट फुकट. इथल्या लोकांनाही सुरूवातीला प्रचंड कळवळा. कारण यांनी तेवढी गरिबी पाहिलेली नाही, आताच्या जनरेशनने पाहिली नाही आणि पुर्वीच्या लोकांना जुने दिवस कुणावर नको असे वाटते. इथले लोक सढळ हस्ते या लोकांना मदत करत होते. कधी भिकार्‍यांना हातातले पैसे देणे, जुने कपडे त्यांच्यापर्यंत पोचवणे, त्यांच्यापैकी काहींना जमेल तसे फिरायला नेऊन चांगल्या हॉटेलात जेवण देणे, खास मदतीसाठी कार्यक्रम आयोजित करून मदत गोळा करणे अशा अनेक प्रकारे. ठिकठिकाणी निर्वासितांचे स्वागत आहे असे पोस्टर्स लागले होते. आणि हे रेफ्युजीज सरळसरळ गैरफायदा घ्यायचे, घेतात. मागच्या महिन्यात दुकानात चोरी करताना एका ग्रुपला पकडलं, पण त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही. एकदा स्टेशनवर एक माणूस पैसे देत होता आणि शक्य तेवढा समजावून सांगत होता की समोरच्या दुकानात जा, तिथे खायला मिळेल, तर तो रेफ्युजी त्याला खुणेने सांगत होता की एवढे पैसे पुरत नाहीत. आणि अजून मागून घेतले, ते पैसे पुरेसे असताना देखील. ग्रोसरी शॉप्स्मध्ये फाळांच्या सेक्शनमध्ये तर हे लोक हमखास फळं तोंडात टाकणार. दरम्यान काही शाळांमध्ये मुलींना आणि त्यांच्या घरच्यांना नोटीस देण्यात आल्याचेही ऐकले, की मुलींचे कपडे जपून वापरा, त्यांना अनोळखी लोकांनी फोटो काढणे वगैरेपासुन सावध करा. कारण रेफ्युजीजने मुलींचे मुद्दाम फोटो काढले अशा घटना घडल्या. मग ट्राम मध्ये पाकिटमारांपासून सावध राहा असे बोर्ड लागले. चोर्याम वाढल्या, रस्त्यावर फिरताना जे सहजपणे फिरायचो, त्यात बदल जाणवू लागला. रस्त्यावरच्या कचर्यात सहज लक्षात येईल इतकी वाढ झाली. ऑटोबाह्न म्हणजेच हायवेजवर सायकलवर किंवा पायी लोक दिसतात आणि ते बहुतेक हेच असतात. कारण यांना इथले नियम कुणी सांगितले नसावेत आणि सांगितले तरी ते पाळायचे असतात हे त्यांच्या डोक्यातही नसावं. त्यात इथल्या लोकांना हे पूर्वी खूपच कॅज्युअल होतं. ऑलमोस्ट सगळीकडे लोक सहजपणे एखाद्या कॉफी शॉपमध्ये जाताना बाहेर सायकल आणि त्यात बास्केटमध्ये सामानाची पिशवी असे बिनधास्त ठेवायचे. काही हरवलं तरी सापडेल अशी लोकांना खात्री होती, तसे अनुभव होते. बरं यांच्याकडे आयफोन्स, उत्तम पैकी शुज आणि बाकी सामान इतके चांगल्यापैकी आहे की हे रेफ्युजीज आहेत हे कळणारही नाही. यांची जरा गैरसोय झाली की हे लोक तक्रार करणार की मुद्दाम दुर्लक्ष होतंय आणि त्यावर शक्य तिथे सरकारकडून लक्ष दिले गेले. आणि मग घडली ३१ ची कलोनची घटना. आता भडका उडाला. आता ३१ ची रात्र म्हणजे तसेही अनेक लोक टाईट असणार, पण म्हणून असा गैरफायदा घेण्याच्या घटना नव्ह्त्या. भारतात आणि जर अशा वेळी आरडाओरड केली, दाद मागितली तर काहीतरी होऊ शकेल, मुलीही प्रत्युत्तर देऊ शकतील कदाचित, निदान गर्दीच्या ठिकाणी मदत मागता येईल. पण इथे तसेही होऊ शकत नाही, कारण इतर कायदे पाळले जातात, तसेच हा कायदाही हातात घेऊन चालत नाही. पोलीसही मनात आले की मारहाण करु शकत नाहीत. अनेक बंधनं आणि नियम आहेत. एकूणात परिस्थिती गंभीर होते आहे, आणि लोक ती हाताळायला अजून तेवढे समर्थ नाहीत, पोलीसही नाहीत आणि त्यातून हे वाढतच चाल्लंय. भारतीयांच्या दृष्टीकोनातून बघितले, तर बहुतांशी भारतीय, आशियायी लोक हे इथे येताना शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने आलेत. कित्येकांचा व्हिजा ३-४ महिने फार डिटेल इन्व्हेस्टिगेशन होऊन मग झाला. त्यासाठी आम्ही २००-३०० युरोज भरले. का? तर भारतात बोगस कागदपत्रे तयार होतात म्हणे, यांचा विश्वास नाही भारतातल्या सिस्टीमवर. आता हे काही प्रमाणात खरं आहेच, पण यात प्रामाणिक लोक जास्त भरडले जातात. इथे येऊनही आम्ही सगळे नियम पाळतो, पैसा कमावतो त्याचा कितीतरी वाटा टॅक्स म्हणून भरतो. ओळखीतल्या अनेक जण भारतातले चांगले शिक्षण आहे, जर्मन शिकलेले आहेत आणि तरीही नोकरीसाठी सतत 'तुमच्या देशातलं हे सर्टिफिकेट आम्हाला मान्य नाही' हे कारण ऐकून कंटाळले आहेत. पण त्याच वेळी कुठ्लीही शहानिशा न करता, खरे गरजू कोण आणि इतर कोण याबाबत काहीही माहिती नसताना लाखोंनी लोक आलेत आणि त्यांच्यासाठी सगळ्यांनी मार्केट्स ओपन केलीत. खास सोयी सुविधा दिल्यात. त्या देशातल्या परिस्थितीबद्दल पूर्ण कणव आहे, तिथले जीवन अवघड होते म्हणून ते लोक इथे आलेत हेही मान्य आहे, पण म्हणून ही सगळी काही एका देशाची जबाबदारी नाही. त्यावर काही लिमिट हवी, नियम हवेत असे मग अशा पार्श्वभूमीवर जास्त जाणवते. ३१ तारखेच्या घटने नंतर अनेक मोर्चे निघाले, आता ‘त्या’ रेफ्युजीजना डीपोर्ट केले जावे, त्यांना शिक्षा मिळावी म्हणून निषेध नोंदवला गेला. त्यानंतर मग आता अशाच स्वरूपाच्या इतर ठिकाणांच्या घटनाही प्रकाशात आल्या. गंमत अशी की इथेही काही जणांनी मुलींनी यापासून दूर राहा असे सल्ले दिले. पण त्याच वेळी काही रेफ्युजीजनी निर्लज्जपाने त्यांची कागदपत्रं फाडून टाकली, ‘मेर्केल यांनी आम्हाला बोलावले आहे, आता आम्हाला चांगली वागणूक द्यायलाच हवी’ अशा पद्धतीच्या त्यांच्या प्रतिक्रिया आल्या. जर्मनीची इतकी ओपन भूमिका असण्यामागे स्वस्तात लेबर मिळवणे हा एक उद्देश आहे असं दिसतंय आणि युद्धानंतरची आलेली भूमिका हेही एक. एक कलीग म्हणाला की मी पण इथे बाहेरून आलो, पण या देशाने मला स्वीकारलं. आता मीही मदत करायला हवी. पण ७०-८० च्या दशकात इथे आलेले लोक आणि आता येणारे लोक यात फरक आहे. जर्मनीची तेव्हाची स्थिती वेगळी होती आणि आता बदलली आहे अचानकपणे आलेल्या या लोकांना घेताना बऱ्याच बाजूंचा विचार व्हायला हवा आहे. आर्थिक बाजू इतर देशांपेक्षा चांगली असली तरीही लाखो लोकांना फुकट राहू देणे हेही तेवढे सोपे नाही. यांची ऑफिसेस, दवाखाने या सगळ्यात मनुष्यबळ कमी पडतंय. भाषा हा एक महत्वाचा प्रश्न आहे. शिवाय त्यांना शिक्षण द्यावे लागेल. त्याशिवाय ते कुठे मोठे काम करू शकणार नाहीत. सध्या पोलीस पण हतबल आहेत. अनेक लोकांना सामावून घेताना ज्या बर्यामच बाजूंवर विचार व्हायला हवा, विशेषतः लॉंग टर्म साठी. कदाचित वरच्या पातळीवर त्यासाठी काही प्रयत्न चालू असतील, पण ते सर्वसामान्य लोकांना तरी अजून दिसत नाहीयेत. शिवाय यामागचे काहीतरी राजकारणी डावपेच असतील की ज्याबद्दल माझा तेवढा अभ्यास नाही, परंतु कलोनची घटना आणि इतरही गुन्हेगारीचे वाढते प्रमाण ही चिंता दिवसेंदिवस वाढते आहे. हे जर असेच चालू राहिले, तर अजून काही वर्षात बरेच प्रश्न जर्मनी समोर उभे राहतील. आता या अशा घटनेतील गुन्हेगारांना पकडले जाईल का, त्यांच्यावर काही कारवाई होईल का, अजूनही येत असणाऱ्या निर्वासितांच्या संख्येवर बंधनं येतील का, निर्वासितांसाठी काही कडक नियम केले जातील का असे अनेक प्रश्न सध्या अनुत्तरीत आहेत. पुढच्या काही महिन्यात कदाचित यामागची जर वेगळी भूमिका असेल, तर ती ठळक पणे दिसेलही, पण तोपर्यंत सध्याची इथली परिस्थिती अजून वाईट न होऊ देणे यासाठी शासकीय पातळीवर अजून प्रयत्न होणे आणि नागरिकांनी सतर्क राहणे हेच सध्याचं चित्र दिसतंय. काही सबंधित बातम्या - कलोन१, कलोन२, कलोन३, जर्मनी१, जर्मनी२, युरोप ----- . . (अनाहितामधे पूर्वप्रकाशित)
  • Log in or register to post comments
  • 8706 views

प्रतिक्रिया

Submitted by हुप्प्या on Mon, 01/18/2016 - 03:04

Permalink

उदारमतवादाची नशा

जर्मनी व अन्य युरोपियन देशाच्या नेत्यांना आपल्या उदारमतवादाची नशा चढली आहे असे वाटते. ह्या नशेच्या तारेत त्यांनी असे ठरवले की तमाम सिरियन निर्वासितांना आपण सामावून घ्यायचे. आपल्याच पायावर कुर्‍हाड मारून घ्यायचा हा अव्यापारेषू व्यापार का केला जात आहे हे इतिहासच सांगेल. पण ते एक घातक पाऊल आहे असेच दिसते आहे. जिथे स्त्रियांना कनिष्ठपणाची वागणूक दिली अशा समाजातून, जिथे स्त्रिया बुरख्याआड किंवा हिजाबच्या आड लपवल्या जातात अशा देशातून जेव्हा हे लोक जर्मनीसारख्या देशात येतात तेव्हा कमी कपड्यातल्या, बियर वा अन्य मद्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पिणार्‍या, पोहण्याच्या तलावापाशी बिकिन्या घालून बिनधास्त वावरणार्‍या स्त्रिया बघून काय वाटत असेल ते ओळखणे अवघड नाही. ह्या स्त्रिया उथळ आहेत, सहज उपलब्ध आहेत, उपभोग्य आहेत अशा प्रकारचे विचार त्यांच्या डोक्यात येत असणार. आणि त्यातून असले अत्याचार घडत असणार हे उघड आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात परक्या लोकांची आयात करत असताना हे विचार करणे आवश्यक होते. पण ते झालेले दिसत नाही. सिरियाच्या अंतर्गत यादवीत होरपळलेल्या लोकांना आसरा द्यायला अतीश्रीमंत सौदी व अन्य अरबी देशांनी साफ नकार दिला आहे हेही विचारात घेतले पाहिजे. ह्या युरोपियन देशात जेव्हा केव्हा निवडणुका होतील तेव्हा काय स्थित्यंतरे होतायत ह्याची मला उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Mon, 01/18/2016 - 07:30

Permalink

परवा "right in your door"

परवा "right in your door" म्हणजे एक बसभरून निर्वासित मेर्केलच्या थेट घरापाशीच उतरले आणि इतर देशांना निर्वासित घ्या अशी गळ घालणार असे बाइ म्हणाल्या.
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Mon, 01/18/2016 - 08:48

Permalink

हे पहा

http://www.thelocal.de/20160115/town-bans-asylum-seekers-from-pools-after-spate-of-harassment म्युनिचमधे सार्वजनिक जलतरण सुविधा वापरण्यास स्थलांतरित मुस्लिमांना बंदी घातली आहे. बिकिनी अत्यंत तोकड्या कपड्यातील स्त्रिया पहाण्याची सवय नसल्यामुळे तशा दिसल्या की हे लोक त्यांच्याशी लगट करु पहातात. ह्या बातमीतले पोस्टर पहा ज्यावर असे करु नका असे सांगायची वेळ त्या तलावांच्या प्रशासनावर आली आहे. अर्थातच आधी असे काही होत नव्हते. पुरुष स्त्रिया मुक्तपणे पोहत होत्या. पण हे रानटी, मागास संस्कृतीतून स्थलांतरित झालेले लोक ह्या प्रकाराचा बट्ट्याबोळ करत आहेत. आता काय ह्या लोकांचा मान राखण्याकरता तमाम जर्मन बायकांनी आपल्या स्वातंत्र्याला मुरड घालायची का? का म्हणून? ह्या उपटसुंभ लोकांना आणायची अशी काय गरज होती?
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Mon, 01/18/2016 - 10:15

Permalink

जे जर्मनीत तेच भारतात....

जर्मनीत सिरियन निर्वासितांचा प्रश्र्न तर इथे बांगलादेशी निर्वासितांचा. तसेच अल्बानियन नागरिकांचा प्रश्र्न फ्रान्स मध्ये. निर्वासितांना थारा देणे म्हणजे "अरबाने उंटाला तंबूत पाय ठेवायला देणे." असो, आमच्या बाबांच्या मतानुसार...."परक्या लोकांच्या बाबतीत दाखवलेली, दया-क्षमा-शांती, ही गृहस्थ माणसाला जरी भुषणावह असले तरी, देशासाठी आत्मघातकीच ठरते."
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Mon, 01/18/2016 - 10:27

Permalink

ह्म्म्म्म

हे असं होणारच होतं. निर्वासीतांना आश्रय देताना आपण आश्रीत आहोत आणि होस्ट कंट्री आपल्यावर उपकार करते आहे हि भावना स्पष्टपणे समजाऊन सांगितली पाहिजे. शिवाय, होस्ट कंट्री आपलं कायमस्वरुपी निवासस्थान नसुन परिस्थिती सामान्य होताच आपल्याला परत जायचं आहे. त्यावेळी होस्ट कंट्री परवानगी देईल त्यांनाच कायम राहाता येईल असंही जाणावुन द्यायला हवं. जे लोकं नोकरी-धंद्याच्या निमीत्ताने परदेशी जातात किंवा अगदी कॅनडा/ऑस्ट्रेलिया वगैरे देशांत अगदी सन्मानाने मायग्रेट होतात ते सुद्धा स्थानीक जगाशी जास्तितजास्त जुळवुन घेण्याचा प्रयत्न करतात. मग जे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतुन जीव वाचवायला म्हणुन येतात त्यांना असला माज का येत असावा? भिकार्‍याला ओकार्‍या का येतात? परिस्थितीने अत्यंत गांजल्यामुळे हि परिस्थिती येत असावी? शतकापुर्वी युरोप मधुन अमेरीकेत मायग्रेशन झालं, आताही दक्षीणा अमेरीकेतुन तिथे सर्वाधीक मायग्रेश होतं. तिथेही अशाच समस्या येत असाव्या काय...
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Mon, 01/18/2016 - 14:08

Permalink

मला जाणवलेले काही मुद्दे

१) युरोमेरीकनांची मध्यपुर्वेतील भावनिक गुंतवणूक ऐतिहासिक काळापासून काहीना काही कारणाने वेळो वेळी चालत आलेली आहे म्हणून त्यांच्या एकुण चर्चेचाही भाग अधिक बनत असावेत. त्यात त्यांचा विवीध-धार्मीक, ओट्टोमन कालीन, इझ्राएल आणि तेल कारणांनी झालेले मध्यपुर्वेतील हस्तक्षेप, उत्पादने आणि शस्त्रास्त्रांची निर्यात, त्यांच्या धर्माचा आणि एन जी ओंचा कथित मानवतावाद अशा अनेक कारणांची गुतांगुंत त्यात असण्याची शक्यता वाटते. २) जर्मनीत आलेले निर्वासीत अत्यंत शिस्तीत राहीले असते तरीही तेथील उजव्यांचे राजकारण आणि प्रचार जसा व्हावयाचा तसाच झाला असता त्यात अरब निर्वासितांच्या बेशीस्तीच्या प्रदर्शनाने त्यांना विषय तापवत ठेवण्यासाठी आयते कोलीत मिळाले असे दिसते. एकुण त्यांच्या प्रसारमाध्यमांनी ३१ डिसेंबर- १ जानेवारी च्या रात्री झालेल्या महिलांवरील अती प्रसंगांवरून चर्चेची दिशा हायजॅक केल्या प्रमाणे दृश्य दिसते आहे. ३) जगभर युद्धे आणि नैसर्गिक आपत्ती येत असतात लोक निर्वासित होत असतात, निर्वासितांना सांभाळताना मुख्य समस्या आर्थिक तरतुदींची असते, बहुतांश ठिकाणचे निर्वासित आश्रीतांची अभिप्रेत भूमिका पारपाडत असावेत, जगभरच्या निर्वासितांच्या बातम्या येतात ३१ डिसेंबर- १ जानेवारी कोलोन घटनेसारखी आश्रीत निर्वासितांकडून स्थानिकांच्या स्त्री दमनाची बातमी यापुर्वी ऐकण्यात नव्हती. ४) ३१ डिसेंबर- १ जानेवारी कोलोन आणि तत्सम शहरांमध्ये जे घडले त्या बाबत काही वृत्तातून विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे जर्मनांकडून अद्याप मिळताना दिसत नाहीत ती म्हणजे एवढ्या घटना होऊनही आणि आजच्या प्रत्येकाच्या हातात आयफोन इत्यादी कॅमेरा उपकरणे असण्याच्या काळात अशा घटनांचे छायाचित्रीकरण होऊन बातम्यामध्ये आले असते, अथवा पोलीसी कारवाई वेगाने होऊन एवढ्या सगळ्या घटना एकाच वेळी ठरवल्या प्रमाणे कशा झाल्या याचे उत्तर जर्मन प्रशासनाकडून अपेक्षीत होते त्यावर दोन आठवडे उलटूनही काहीच प्रकाश पडत नाही हे आश्चर्यकारक वाटते. ५) उर्वरीत भारतातून येणार्‍या तरुणांच्या वागण्याबाबत गोवेकरांच्या नाराजीचा सूर आपण मिपावरील एका धाग्यातूनही ऐकला, शिक्षण-नौकरी साठी मोठ्या शहरात येणार्‍या बॅचलर्सचे मोकाट वागणे अशा समस्या छोट्या स्तरावर भेडसावतच असतात, निर्वासितांना घेताना कॅनडा सारखे देश स्त्रीयांची टक्केवारीही पुरेशी येते आहे हे पहात असावेत, ज्यांना कौटूंबीक सपोर्ट नाही त्यांना स्थानिक पालक उपलब्ध करणे, जर्मन भाषेचे शिक्षण देणे वगैरे गोष्टी जर्मनांसाठीही नव्या नसाव्यात केवळ, न साभांळता येईल एवढा मोठा लोंढा अचानकपणे आणून उरावर बसवण्याचे कारण नव्हते. सिरीयाच्या शेजारचा इजिप्त वैचारीक-सांस्कृतीकदृष्ट्या सिरीया आणि नॉर्थ आफ्रीकन दोन्हींनाही जवळचा आणि सोपा निर्वासितांसाठी जर्मनीने इजिप्तच्या बजेटची काळजी घेतली असती तरीही पुरेसे असते. ६) मानवी स्थलांतरे अल्पप्रमाणात कोणत्याही समुदायास झेपुन जातात, पण मोठ्यासंख्येने अचानक स्थलांतरांबाबत तसे होताना दिसत नाही, अनेक शतकांपासून रहात असलेल्या समुदायांचे इंटीग्रेशन अद्यापही अवघड जाते ( हे लिहिताना मला युरोपातील भारतीय वंशाचा रोमानी समुदाय सुद्धा आठवतो आहे ) यावर मानवी समुदायांना ठोस उपाय अद्याप सापडलेला नसताना टाळण्याजोगे मोठ्यासंख्येने अचानक स्थलांतरांबाबत जर्मन नेतृत्वाने विचार करणे जरुरी होते असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Mon, 01/18/2016 - 15:27

Permalink

मध्यपूर्वेतून येणारे

मध्यपूर्वेतून येणारे निर्वासितांचे लोंढे हे युरोपपुढचे मोठे संकट ठरणार आहे असेच दिसत आहे... धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते अशी ही सामाजिक-राजकिय समस्या युरोपची मोठी डोकेदुखी (किंवा त्यापेक्षा बरेच काही जास्त) ठरणार आहे :(
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Mon, 01/18/2016 - 15:35

Permalink

अतिशय नेमकं विश्लेषण केलं आहे

अतिशय नेमकं विश्लेषण केलं आहे आहे लेखात. कलोनची घटना हादरवून टाकणारीच होती. जर्मनी आणि बाकी युरोप भर हा प्रश्न येणार्या काही दिवसात वाढतच जाणार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Mon, 01/18/2016 - 16:46

Permalink

पश्चाताप

जर्मनीला या स्थलांतरीताच पश्चाताप करावा लागणार आहे
  • Log in or register to post comments

Submitted by अस्वस्थामा on Mon, 01/18/2016 - 18:36

Permalink

हे ऐकलं तेव्हाच भयंकर वाटलं

हे ऐकलं तेव्हाच भयंकर वाटलं होतं. सुदैवाने सध्या युकेवाले खुशीत असतील "बरं झालं आपन दारं बंद ठेवलीत म्हणून".. याचा परिणाम युरोपियन युनियन वर काय होतोय ते पहायच आता.. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on Mon, 01/18/2016 - 18:36

Permalink

मला फार पुर्वीपासुन म्हणजे हे

मला फार पुर्वीपासुन म्हणजे हे स्थलांतर चालु झाल्यापासुनच ह्या परिणामांची शंका वाटत होती. तसे मी माझ्या एका कलीगशी बोलुनही दाखवले होते की जर्मनीला याचे थोड्याफार प्रमाणात का होईना पण परिणाम भोगावे लागतील. पण तोही याबाबतीत सहमत नव्हता. कारण की येथील कायदा व सुव्यवस्था यावरील अवाजवी विश्वास. कलोनची घटना यांना आता हादरवुन टाकत आहे. या लोकांना दिलेल्या मदतीची किंमत तर नाहीच उलट माज चढत आहे. http://www.truthrevolt.org/news/syrian-refugees-trashing-germany सुरक्षीत वाटणारं जर्मनी असुरक्षीत होत चाललं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by धनावडे on Mon, 01/18/2016 - 18:38

Permalink

हे वाचून एकच म्हण किंवा

हे वाचून एकच म्हण किंवा वाक्यप्रचार आठवला "घ्या गोंदून"
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Mon, 01/18/2016 - 18:53

Permalink

जर्मनीचा किंवा रादर ज्या ज्या

जर्मनीचा किंवा रादर ज्या ज्या देशांनी ह्या निर्वासितांना दारं उघडी केलीत त्यांनी त्यांच्या स्वत:च्या पायावर कुर्‍हाड मारुन घेतलेली आहे. अजुनही वेळ गेलेली नाही. लष्करी बळाचा वापर करुन परत हाकलुन द्या सिरिया मधे. कशावरुन आयसिस ची लोकं ह्या निर्वासितांच्या बुरख्याआडुन युरोपात घुसलेली नाहित? हि जमात अत्यंत भिकार असते. घेणार्‍याने घेता घेता देणार्‍याचे हातही घ्यावे ची म्हण ते लिटरली हात छाटुन घेउन सार्थ करतील तेव्हा हे मुर्ख जागे होतील. ही तर सुरुवात आहे. हि बांडगुळं स्थिरस्थावर होउन मुळ झाडाला शोषणार बघा.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Mon, 01/18/2016 - 19:09

Permalink

हे निर्वासित त्यांच्याच

हे निर्वासित त्यांच्याच धर्माच्या मध्यपूर्वेतील राष्ट्रात न जाता युरोपात कसे थडकले डायरेक्ट ? त्यांचा धर्म असलेल्या देशात ते कलोनच्या घटनेसारखे वागतील तर भयानक शिक्षा होईल.मग इतर देशात मात्र हे आमच्या धर्मात हे नाही झेंडा जाळा,मुलींनी बुरखा घालायलाच हवा वगैरे धर्माच्या नावावर दहशत पसरवत कसे राहू शकतात? मर्केल बाईंनी नोबेल पीस प्राइझची तयारी केली का स्वतःसाठी? का नाझी हत्याकांडांची काळी पार्श्वभूमी असलेल्या आपल्या देशाची प्रतिमा यानिमित्ताने त्या उजळू पाहात होत्या? कालच फेसबुकवर अरबी लैंगिक छळवादाचा त्रास कसा जर्मनीभर पसरु लागलाय त्याची लिंक पाहिली. मानवतेच्या नावाखाली सुरु झालेला हा इस्लामी दहशतवाद तर नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 01/18/2016 - 19:12

Permalink

हात दाखवून अवलक्षण केलंय

हात दाखवून अवलक्षण केलंय मर्केल बाईंनी..
  • Log in or register to post comments

Submitted by Jack_Bauer on Mon, 01/18/2016 - 19:49

Permalink

जगभरचा पुरोगामी जिहाद

हा प्रोब्लेम फ़क़्त जर्मनी पुरता नसून युरोप मध्ये पसरलेला आहे. जेष्ठ प्रत्रकार भाऊ तोरसेकर यांचा एक अप्रतिम लेख ह्या विषयावर आहे. त्या लेखात भाऊ असं म्हणतात :
एकट्या कलोन शहरात रेल्वे स्थानक ते कॅथेड्रल या छोट्या परिसरात हजारहून अधिक अरब मुस्लिम निर्वासितांनी महिलांशी इतके अत्याचार केले, की ६०० हून अधिक महिला तक्रार करायला पुढे आल्या. योगायोग किंवा विरोधाभास बघा. जर्मनीच्या पंतप्रधान अंजेला मार्केल नववर्षाच्या शुभेच्छा जनतेला देत असताना या घटना घडत होत्या आणि ते भाषण जर्मन भाषेत होत असताना, त्याचा तर्जुमा अरबी अक्षरात दाखवला जात होता. जर्मनीत अरबी भाषेतले भाषांतर टिव्हीवर कशाला दाखवावे? तर गेल्या वर्षभरात तिथे अकरा लाख अरबी निर्वासितांना आश्रय देण्यात आलेला आहे. त्यांनाही मर्केल यांचे शब्द कळावेत, म्हणून त्याचे भाषांतर दाखवले जात होते. ते किती निर्वासितांनी वाचले ठाऊक नाही. पण त्यातून मर्केल यांनी नवागतांना सभ्यपणे वागायला सांगण्यापेक्षा निर्वासितांच्या विरोधात बोलणार्‍या आपल्याच जर्मन नागरिकांना दम भरण्याचे काम मात्र अगत्याने केले. थोडक्यात जेव्हा नवागत भणंग अरबी निर्वासित जर्मन महिलांवर लैंगिक अत्याचार सार्वजनिक जागी करत होते, तेव्हा त्यांच्या पुरोगामी राष्ट्रप्रमुख आपल्याच पिडीत नागरिक महिलांना दम भरत होत्या. आज हाच जगभरच्या पुरोगामीत्वाचा खरा चेहरा झालेला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Mon, 01/18/2016 - 19:50

Permalink

अगदी वाट्लं तसं झालंय.

अगदी वाट्लं तसं झालंय. सत्यानाश करून घेणार जर्मनी. दीर्घकाळ तिथे राहिलेल्या निनाद यांचाही अनुभव आणि मत ऐकायला आवडेल. पूर्वी बराच काळ जर्मन कुटुंबात रहाण्याचा अनुभव असल्यानं आता ते किती चिडले असतील याची कल्पना आहे. एकूण या निर्वासितांचंही काही खरं नाही. कधी अशीही शंका येते की अमेरिकेने जर्मनीला (युरो) मागे टाकण्यासाठी हे मुद्दाम घडवले असेल का? या निर्वासितांना जॉर्डन ते अफगाणिस्तानपर्यन्त कुठेही ठेवता आले असते तर मग युरोपच का? बाबा वांगा या महिलेने १९९६ पूर्वी भविष्य वर्तवल्यानुसार हा प्रकार वाढत जाउन २०४३ मध्ये रोममध्ये इस्लाम स्थापन होणार आणि २०६३ मधे पुन्हा क्रिश्चन लोकं रोममध्ये आपला धर्म परत आणतील. ( ख खो दे जा- हे पहायला मी तर नसेन हे नक्की..!)
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Mon, 01/18/2016 - 20:32

Permalink

निओ नाझी, आर्यन ब्रदरहूड किंवा तत्सम उजव्या चळवळी

यांनी अजून याच्यावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही? आश्चर्याची गोष्ट आहे. अर्थात जर्मनीसारखा एकेकाळी टोकाचा वर्णद्वेष्टा असलेला देश एका मर्यादेच्या पलिकडे हे सहन करणारही नाही असं वाटतंय. मूळ स्वभाव जात नाहीच. फक्त त्यातून कुणी नवा भस्मासूर निर्माण होता कामा नये.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Wed, 01/20/2016 - 15:22

In reply to निओ नाझी, आर्यन ब्रदरहूड किंवा तत्सम उजव्या चळवळी by बोका-ए-आझम

Permalink

+१२३४५६७८९

+१२३४५६७८९
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 01/21/2016 - 14:35

In reply to निओ नाझी, आर्यन ब्रदरहूड किंवा तत्सम उजव्या चळवळी by बोका-ए-आझम

Permalink

अर्थात जर्मनीसारखा एकेकाळी

अर्थात जर्मनीसारखा एकेकाळी टोकाचा वर्णद्वेष्टा असलेला देश एका मर्यादेच्या पलिकडे हे सहन करणारही नाही असं वाटतंय. मूळ स्वभाव जात नाहीच. फक्त त्यातून कुणी नवा भस्मासूर निर्माण होता कामा नये. याउलट जर्मनी "वर्णद्वेष्टा भूतकाल वापरून आपल्याला दुरान्वयानेही दोषी ठरवले जाऊ नय" यासाठी पराकोटीची काळजी (गिल्ट काँप्लेक्स ठेऊन) घेते असेच दिसते... काही वेळेस त्याचा गैरफायदाही घेतला जातो.
  • Log in or register to post comments

Submitted by मोगा on Mon, 01/18/2016 - 21:49

Permalink

..,

उत्तर ध्रुवावरुन भारतात घुसलेल्यांचं काय करायचं ?
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Tue, 01/19/2016 - 09:49

In reply to .., by मोगा

Permalink

तुम्ही पहिले तुमची बायको संभाळा हो!

जगाची चिंता मग करा.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 01/18/2016 - 22:09

Permalink

स्थलांतरित (आणि विशेषतः कमी

स्थलांतरित (आणि विशेषतः कमी उत्पन्न असलेले स्थलांतरित) लाँग रनमध्ये अर्थव्यवस्थेला फायदेशीर ठरतात असा एक अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे. (सगळ्या अर्थशास्त्रीय सिद्धांतांप्रमाणे तो "आडाखा" या सदरात बसतो.) त्यामुळे अजून आशावाद बाळगायला हरकत नाही. -संपादित- @अस्वस्थामा काहीही झालं तरी यूके दार किलकिलंसुद्धा करणार नाही. ईयूने जास्त बडबड केली तर "आम्हाला काढून टाका" असं म्हणून मोकळे होतील. (ईयू अर्थातच हे करणं शक्य नाहीये.) सध्या "अडगेपणा" ही यूकेसाठी बेस्ट स्ट्रॅटेजी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 01/18/2016 - 22:14

Permalink

खूपच गंभीर व जटील प्रश्न आहे.

सिरिया व आजूबाजूच्या प्रदेशातील निर्वासितांचा प्रश्न म्हणजे धरलं तर चावतंय अन सोडलं तरी चावणारच आहे असा आहे. निर्वासितांसाठी दारे बंद केली तरी भौगोलिकदृष्ट्या युरोप या युद्धभूमीपासून लांब नसल्याने या ना त्या प्रकारे युरोपियन देशांना झळ पोचणारच आहे. कदाचित मोठेपणा घेऊन अन थोडा त्रास सहन करून दीर्घकाळासाठी स्वस्त कामगार मिळवणे असा उद्देश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी अमेरिकेतल्या मिनियापोलिस या शहरात राहतो. इथे १९९१ साली जवळपास २५ हजार सोमालियन शरणार्थी आले. आज त्यांची लोकसंख्या ५० हजारांच्या आसपास असावी. आमच्या शहरातल्या काही उपनगरांत जिथले राहणीमान तुलनेत आर्थिकदृष्ट्या स्वस्त आहे तिथे सोमालियन मूळ असलेले लोक बहुसंख्येने दिसतात. सोमालियन महिला कुठेही चटकन ओळखू येतात कारण बुरख्यासारखा त्यांचा वेश. चेहरा मात्र झाकलेला नसतो केवळ डोक्यावर हिजाब असतो. त्यांच्यापैकी बरेच लोक खाजगी कार्यालयांत, इस्पितळात सफाई कामगारांची कामे करताना दिसतात. त्यांच्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण खूप आहे अशा बातम्या मात्र फारशा दिसल्या नाहीत. दीड वर्षांपूर्वी इथे जन्मलेली सोमाली काही मुले-मुली इस्लामिक स्टेटमध्ये सामिल होण्यासाठी टर्कीला जाताना विमानतळावर पकडली गेली तर काही तिकडे पोचण्यात यशस्वी झाली. इथल्या सोमाली समाजाच्या धुरीणांनी प्रशासनाबरोबर सहकार्य करून अशा प्रकारांना यशस्वीपणे पायबंद घातला आहे असे सध्या तरी दिसते. अमेरिकेत जन्माला येऊन इथे लहानाचे मोठे होऊनही सोमाली वंशाच्या युवकांना जिहादी युद्धात सामिल व्हावेसे वाटते ही खूपच वाईट बाब आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Mon, 01/18/2016 - 23:37

In reply to खूपच गंभीर व जटील प्रश्न आहे. by श्रीरंग_जोशी

Permalink

मिनेसोटातील मुस्लिमांना अमेरिकन संविधानापेक्षा शरिया आवडतो

https://www.youtube.com/watch?v=9CXpL8kYqfM एक माहितीपट बनवणारा चित्रपट निर्माता मिनेसोटाला गेला. तेथील रस्त्यांवर चालणार्‍या मुस्लिम युवकांना त्याने प्रश्न विचारला की तुम्हाला अमेरिकन कायद्याच्या आधिपत्याखाली रहायला आवडेल की शरियाच्या? आणि बहुतांश युवक (जे बहुधा मूळ सोमाली असावेत) त्यांची उत्तरे शरियाच बरा अशा अर्थाची होती. देवाचे कायदे हे माणसाच्या कायद्यांपेक्षा श्रेष्ठच असतात अशीही काही उत्तरे होती. शरियात काय आहे? शरिया ह्या कायद्यानुसार समलैंगिक संबंध केल्यास मृत्यूदंड, इस्लाम धर्म सोडून अन्य स्वीकारल्यास मृत्यूदंड, मुस्लिम धर्माची वा प्रेषिताची निंदा केल्यास मृत्यूदंड आहे. तसेच चोरी केल्यास हात तोडणे, बलात्कार केलेला आढळल्यास, त्या बलात्कारी स्त्रीला दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा, बुरखा नसल्यास चाबकाचे फटके असेही प्रकार आहेत. तीन वेळा तलाक म्हणून पुरुष बाईला घटस्फोट देतो मात्र स्त्रीला असे काही करता येत नाही, पुरुष एका वेळी चार विवाह करु शकतो पण स्त्रीला असे काही करता येत नाही. ह्या सवलतींचा जनकही शरियाचे नियमच आहेत. अमेरिकेत वाढलेल्या सोमाल्यांना हे कायदे जास्त योग्य वाटत असतील तर खुद्द सोमालिया व अन्य मुस्लिम देशात रहाणारे लोक काय विचाराचे असतील ते ओळखणे अवघड नाही. http://www.nbcnews.com/id/17665989/ns/business-us_business/t/target-shifts-muslims-who-wont-ring-pork/#.Vp0o4fkrLcs ही बातमी पहा. मिनियापोलिस ह्या मिनेसोटातील मोठ्या शहरातील एका दुकानात कॅशियरची नोकरी करणार्‍या सोमाली लोकांनी गिर्‍हाईकांनी पोर्क (डुकराचे मांस) असणारे पदार्थ विकत घेतले असतील तर ते स्कॅन करुन गिर्‍हाईकाच्या पिशवीत भरायला नकार दिला. म्हणजे नोकरी स्वीकारताना ते दुकान पोर्क विकते का नाही ते बघायचे नाही मात्र नोकरी धरल्यावर असे नखरे करायचे. एकंदरीत जर्मनीचीच ही अमेरिकन आवृत्ती आहे. इथले डेमोक्रॅटिक राज्यकर्ते अशा मुस्लिम धर्मांध लोकांबाबत कमालीचे बोटचेपे आणि भिडस्त बनताना दिसत आहेत. ओबामा आणि हिलरी ह्यात आघाडीवर आहेत!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 01/18/2016 - 22:27

Permalink

लेखन चांगला आहे

जर्मनीमधल्या परिस्थितीचा उत्तम परामर्श या लेखात यशस्वीपणे घेतला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निशदे on Tue, 01/19/2016 - 05:49

Permalink

३१ डिसेंबरच्या घटनेबद्दल

३१ डिसेंबरच्या घटनेबद्दल वाचले होते. पण प्रत्यक्ष तिथे असणार्‍याचा अनुभव आज प्रथमच कळाला. निर्वासितांना सामावून घेताना जर्मनीची पद्धत काय आहे याबाबत वाचावयास आवडेल. याबाबत कोणाला माहिती आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Tue, 01/19/2016 - 13:00

Permalink

या विषयावर जास्त माहिती

या विषयावर जास्त माहिती नव्हती . धागाकर्त्याचे व प्रतिसाद कर्त्यांचेही आभार. एकंदरीत परिस्थिती अवघड आहे तर!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Wed, 01/20/2016 - 12:53

Permalink

माहितीपूर्ण लेख! सिरीयन

माहितीपूर्ण लेख! सिरीयन निर्वासितांना विनाकारण दयाबुद्धी दाखवून देशात आश्रय दिल्याच्या कृत्याचे वाईट परीणाम युरोपिअन देशांना भोगायला लागणार आहेत. आपल्या चुकीची फार मोठी किंमत त्यांना द्यावी लागणार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Wed, 01/20/2016 - 14:16

Permalink

स्थलांतरितांना नवीन ठिकाणी

स्थलांतरितांना नवीन ठिकाणी जुळवून घेणं अवघड जातच. प्रत्येक ठिकाणचे मॅनर्स/नियम समजवून घ्यायला वेळ लागतोच. देसी लोक देखील यथेच्छ काशी घालतात. सगळीकडे. अस्वच्छता, लेचिंग, फुकटेगिरी वगैरे वगैरे. अम्रिकेत जाऊन बीच वर मोठमोठ्या झूम लेन्सवापरून बायकांचे बिकिनीमधले फोटो काढणारे भारतीय महाभाग माहिती आहेत. या निर्वासितांना त्यावरून नावं ठेवणं पटलं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by मधुरा देशपांडे on Wed, 01/20/2016 - 15:19

In reply to स्थलांतरितांना नवीन ठिकाणी by अनुप ढेरे

Permalink

देसी लोक, त्यांची अस्वच्छता,

देसी लोक, त्यांची अस्वच्छता, फुकटेगिरी हे सगळं आहेच, त्या वागण्याचे समर्थन अजिबातच नाही, परंतू निर्वासितांच्या बाबतीत हे प्रमाण प्रचंड जास्त आहे. कलोनची घटना आणि त्यानंतर अजून काही अशाच घटना या मोठ्या प्रमाणात पुढे आल्या, पण त्याही आधीपासून स्थानिक वृत्तपत्रात दररोज चोरी, एकट्या बायकांना त्रास देणं, चार लोकांनी मिळून ट्रेन मध्ये एकट्या बाईला त्रास देणे अशा बातम्या सतत दिसतात आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. जे इथे आजवर फारसं दिसलं नाही. मी लेखात लिहिलंय त्याप्रमाणे, अनेक तुर्किश लोक इथे असूनही आजवर अशा पद्धतीच्या, इतक्या तीव्र घटना कमी होत्या. त्या अचानक वर्षभरातच वाढल्या हे नक्कीच वेगळं आहे. त्यांना जुळवून घ्यायला वेळ लागेल, पण त्यांच्याकडून तशी तयारी न दिसता अरेरावी जास्त दिसते आहे. नियम माहिती नसतील तरीही ते समजावून सांगणे जर्मनी किंवा युरोपमधील शासनाची आणि ते पाळणे ही निर्वासितांची जबाबदारी आहे. पण तसं होताना दिसत नाही हा प्रश्न आहे. फक्त अस्वच्छता किंवा फुकटेगिरीपेक्षाही, सामाजिक सुरक्षितता कोलमडली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Wed, 01/20/2016 - 16:00

Permalink

भयावह आहे

खर्‍या निर्वासितांच्या आडून पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसले असतील तर ते भयावह प्रकरण आहे. https://en.wikipedia.org/wiki/Muslim_population_growth https://en.wikipedia.org/wiki/Islam_in_Germany https://en.wikipedia.org/wiki/Syrians_in_Germany थोडेफार विकि वर शोधले तर हे वाचायला मिळाले आणि डोके गरगरले.
  • Log in or register to post comments

Submitted by भाकरी on Wed, 01/20/2016 - 16:49

Permalink

पण समजा अगदी जर्मनीने ठरवलं...

...की या निर्वासिताना येउ द्यायचं नाही तरी ते अंमलात कसं आणणार? देशाभोवती भिंत बांधून? EUकरणाचा एक उद्देश होता/आहे की युरोपमधल्या देशात मुक्तपणे ये/जा करता यावी. या निर्वासिताना रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याला खीळ बसणारे. एकंदरीत अवघड आहे. या लोकाना बाहेर काढण्याच्या / ठेवण्याच्या प्रयत्नात "सुक्याबरोबर ओलेही जळू नये" म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Wed, 01/20/2016 - 18:54

In reply to पण समजा अगदी जर्मनीने ठरवलं... by भाकरी

Permalink

रेफ्युजी कार्ड वगैरे तत्सम

रेफ्युजी कार्ड वगैरे तत्सम कैतरी सोय असेल ना. तसंही वर्णावरुन ओळखायला अवघड जाणार नाही. फक्त वेरिफिकेशन नीट करणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com