देहभार
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
सर्व प्रथम, मी वजनावरचे कुठलेही लेख अजून तरी वाचलेले नाहीत, तस्मात हा लेख कोणत्याही लेखाला प्रत्युत्तर नाही. दुसरी गोष्ट, माझा शरीरशास्त्राचा आभ्यास नाही. ‘मी शरीर नसून मला शरीराची जाणीव आहे’ या स्वानुभवातून आणि रोजच्या जगण्यातून केलेलं हे लेखन आहे. माझ्या मते, वजन घटवण्याचे इतर उपाय कष्टदायक वाटले तरी काहीशा निश्चयानं ते पार पाडता येतील. या लेखातले अनुभव वरकरणी सोपे वाटले तरी जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला तर त्यांची प्रचिती निश्चित येईल.
______________________________
पहिली गोष्ट, आपण शरीर नाही; आपल्याला शरीराची जाणीव आहे. तस्मात, वजन शरीराला आहे, आपल्याला नाही. हा शरीराशी डील करण्याचा फंडा आहे. या एका उलगड्यासरशी ‘मी आणि वजन’ ही मनाला बसलेली गाठ सुटते. तुम्ही प्रश्नापासनं वेगळे होता आणि कोणताही प्रश्न सोडवायला मजा येण्यासाठी हे वेगळं होणं प्रार्थमिक आहे.
दुसरी गोष्ट, शरीराचं वजन किती हा दुय्यम प्रश्न आहे. मुख्य प्रश्न तुम्हाला रोजचं जगायला उत्साह वाटतो की नाही हा आहे. जर तुम्ही पुरेसे उत्साही असाल तर शरीराचं वजन योग्य आहे. त्यासाठी इतर कोणत्याही गुणोत्तराची आवश्यकता नाही. तस्मात, मनाचा उत्साह हा मूळ निदर्शक आहे, वजन नाही. तुम्ही सहजतेनं आणि उत्साहानं रोजची कामं करू शकत असाल तर वजन पाहाण्याची गरज नाही, ते आटोक्यातच आहे.
उत्साहाला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. एक, कडाडून लागणारी भूक आणि दुसरी, शांत झोप. जर तुमच्या भूक आणि झोप या गोष्टी समाधानकारक असतील तर उत्साह परिणामस्वरुप आहे.
याबाबतीत एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे वय काहीही असो, तुमची कामप्रेरणा सलामत हवी. याचा अर्थ व्यक्ती कामुक असायला हवी असा नाही तर प्रणय-सक्षम असायला हवी. याचं एक खास कारण आहे. निसर्गाचा मूळ हेतू प्रोलिफरेशन (सातत्य टिकवणं) आहे. तुमचा व्यक्तिगत हेतू कितीही उदात्त किंवा सामान्य असला तरी निसर्गाला त्याची काहीच कल्पना नसते. तस्मात, व्यक्ती जितकी कामविन्मुख तितकी ती निसर्गाच्या दृष्टीनं निरुपयोगी. इन फॅक्ट, सक्षम कामप्रेरणा हे शरीराची इंडोक्राईन सिस्टम (अंत:स्त्रावी ग्रंथींचं काम) सुयोग्य चालल्याचं लक्षण आहे.
तिसरी गोष्ट, शरीर हे अन्नाचं रूपांतरण आहे. त्यामुळे भोजनाचा नुसता नित्यक्रम असून उपयोग नाही, तो सोहळा झाला पाहिजे. भोजनाची मजा न येण्याची दोनच कारणं आहेत. एक, भूकेनं जेवण्याऐवजी ‘वेळेनं’ जेवणं आणि दोन, चवीनं जेवण्याऐवजी ‘अन्नाचा अॅनॅलिसिस करणं’, म्हणजे कॅलरीज, फॅट्स, प्रोटीन्स, फायबर्स असले प्रकार मनात घेऊन जेवणं. भोजन हा भूक आणि अन्न यांचा समागम आहे आणि तृप्ती ही भोजनाची परिणिती आहे. तस्मात, जेवण केवळ भूक लागल्यावर आणि निव्वळ स्वादानं केल्यानं ते शरीराला उपकारक ठरतं. इतर प्रत्येक सजीव याच पद्धतीनं भोजन करुन निरामय जगतो.
शेवटची गोष्ट, व्यायाम कष्टदायक आणि बराचसा निरुपयोगी आहे कारण त्यात केवळ अन्नमयकोषावर काम होतं. प्राणायाम महत्त्वाचा आहे कारण तो प्राणयमकोषावर काम करतो आणि परिणामत: अन्नमयकोषावर काम करतो. प्राण हे शरीराचं इंधन आहे, त्यामुळे जेवढा श्वासाचा जोम उत्तम तेवढ्या शरीराच्या प्रक्रिया सक्षम. कपालभाती आणि भस्त्रिका हे दोन प्राणायाम आणि जोडीला अनुलोम-विलोम केल्यास श्वासाचा जोम कायम राहातो.
शरीराचं आरोग्य तीन प्रक्रियांवर अवलंबून आहे : श्वसन, अभिसरण आणि उत्सर्जन. श्वसन व्यवस्थित असेल तर अभिसरण आणि उत्सर्जन या प्रक्रिया आपसूक सुधारतात.
शरीराची लवचिकता हा आरोग्यासाठी महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे पाच आसनं करणं फायद्याचं ठरतं. १) फूट रोटेशन, २) टोरसो रोटेशन, ३) शोल्डर रोटेशन, ४) वज्रासनात केलेला नाभी ते हृदय असा मसाज, आणि ५) सर्वांगासन. शरीराच्या लवचिकतेमुळे अभिसरण आणि उत्सर्जन या क्रिया सहज होतात.
आणि सरते शेवटी, खेळ हा व्यायामापेक्षा केंव्हाही श्रेष्ठ आहे. तस्मात, वयानुरुप टेबल-टेनीस, बॅडमिंटन किंवा त्यासारखा कोणताही खेळ दिनक्रमात सामील करणं हे आरोग्य आणि उत्साहाला अत्यंत पूरक आहे. अर्थात, खेळ योग्य ते ट्रेनींग घेऊन खेळायला हवा तरच त्याची मजा आहे. एकदा मजा यायला लागली की खेळाचं सातत्य टिकून राहातं आणि आपण तनामनानं कायम उत्साही राहातो.
प्रतिक्रिया
आवडला लेख.
+१
धन्यवाद !
शेवटची गोष्ट, व्यायाम
शरीर पाच कोषांचे बनले आहे
+१
प्रार्थमिक हा शब्द म्हणताना
धन्यवाद!
प्राणायाम महत्त्वाचा आहे कारण
दुरुस्तीसाठी व्यनि केला आहे.
खरं सांगायचं तर उत्तम भुक,
वरच्या प्रतिसादात उत्तर दिलं आहेच
ओके
मस्त लेख्..
मानस आणि महायोग
छान लेख. उत्साह व आत्मविश्वास
छान लेख आवडला .