प्रस्तावना :
गेले काही दिवस मिपावर फार मजेशीर प्रकार चालु आहे (म्हणजे तसा तो आधी पासुन चालु असावा, माझ्या निदर्शनास नुकताच आलाय.) काहीतरी अल्पस्वल्प वाचनाने आपले स्वतःचे काही तरी एकांगी मत बनवुन घ्यायचे, ते पकडुन कचकुन लेख पाडायचा , भले मग इतरांच्या भावना दुखावल्या जाओ न जाओ आपल्याला त्याच्याशी काय . बरं त्यातल्या कोणी प्रतिवाद केला तर सौम्य प्रतिवाद असल्यास परत आपलेच मत रेटुन लावायचे, तोडीचा प्रतिवाद असल्यास असहिष्णुता असहिष्णुता अशी बोंब ठोकायची अन यदा कदाचित वरचढ प्रतिवाद असेल तर वैयक्तिक टिपण्णी, व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला, वैयक्तिक मार्केटिंग स्ट्रेटेजीवर टीका असे म्हणत कोणते तरी अत्मसत्य ठोकुन द्यायचे.
(संपादित)
बर्यापैकी उद्विग्न झालो होतो ,असूर्या नाम ते लोका अंधेन तमसावृता तांस्ते प्रेत्याभिगच्छंति ये के चात्महनो जनाः ||३|| ईशावास्योपनिषदातिल हा श्लोक मनात सतत घोळत होताच ..... अन अजुनही सरांनी सांगितले तसे "माफ करायचे " जमत नाही पुर्णपणे!
खरे तर काही लिहावेसेच वाटत नव्हते , पण यु ट्युबवर सर्फिंग करता करता हा अभंग डोळ्यासमोर आला. आपल्या तुकोबांचाच ! हो , हो , ह्या इथे कोनाड्यात फोटो लावलाय ना त्याच तुकोबांचा !! जवळपास ५-६ महिने झाले चैतन्यने मला सांगितले होते की नक्की ऐक म्हणुन पण आज योग आला .
खरेच काय योग आहे ! कदाचित ह्या सार्याच्या मिसळपावमंथनाच्या निमित्ताने आपल्या श्रध्दांचीच आपल्या निष्ठांचीच परीक्षा पाहिली जात असावी. तुकोबांच्या काळातही असेच काहीसे झाले असेल की काय ? कदाचित ह्या सगळ्या स्वमतांध लोकांच्या मागुन बाप्पाच परीक्षा पहात असावा आपली !!
https://www.youtube.com/watch?v=EDpmBf-A1jI
_______________________________________________________________
कमोदिनी काय जाणे तो परिमळ |
भ्रमर सकळ भोगीतसे || धृ ||
तैसे तुज ठावे नाही तुझे नाम |
आम्हीच ते प्रेम सुख जाणो || १ ||
माते तृण बाळ दुधाची ते गोडी |
ज्याची न ये जोडी त्यासी कामा || २ ||
तुका म्हणे मुक्ताफळ शिंपी पोटी |
नाही त्याची भेटी भोगती ये || ३ ||
फुलाला काय माहीत की त्याचा काय सुगंध आहे अप्रतिम ! भ्रमर त्याचा पुर्ण उपभोग घेत असतो ! तसेच काहीसे आपले नाते आहे बाप्पा. तुला काय माहीत की तुझे नाव कित्ती गोड आहे ते , ते प्रेमसुख काय अप्रतिम आहे हे आम्हीच जाणतो ! गाई साठी जे खाद्य गवत आहे तेच वासरा साठी अमृततुल्य दुध आहे त्यांची बरोबरी अशी बरे होणार ! शिंपीणीच्या पोटात मुक्ताफळ(?) असेल पण तिला काही त्याचा भोग घेता येत नाही ते सुख भोगणारे औरच !!
अहाहा ! तुकोबा तुकोबा !!
_____________________________/\__________________________________
कित्ती सोप्पं आहे हे सारं बाप्पा ! आम्हीच उगाच अवघडात शिरतो , वादात पडतो अन शांती गमावुन बसतो ! पण मग माऊली मग अलगद बाळाला उचलुन घेतात असे कडेवर !
धाकुटयाचे मुखीं घांस घाली माता । वरी करी सत्ता शाहाणियां ॥१॥
ऐसें जाणपणें पडिलें अंतर । वाढे तों तों थोर अंतराय ॥ध्रु.॥
दोन्ही उभयतां आपण चि व्याली । आवडीची चाली भिन्न भिन्न ॥२॥
तुका म्हणे अंगापासूनि निराळें । निवडिलें बळें रडतें स्तनीं ॥३॥
आता चालु दे काथ्याकुट. खुशाल करा अध्यात्माची , वैदिक उपनिषदोक्त धर्माची बदनामी . आता कसलीच हरकत नाही . तुम्ही थोरले आहात , ज्येष्ठ आहात, जाणते आहात ..... आम्हाला अपला आमचा भोळाभावच बरा!
बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥
विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥
तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥
पांडुरंग | पांडुरंग |
_____________________________________________________________
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A...
______________________________________________________________________
प्रतिक्रिया
17 Nov 2015 - 3:13 am | टवाळ कार्टा
झोपत नाहीस का रे :)
17 Nov 2015 - 7:01 pm | प्रसाद गोडबोले
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी । यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥
;)
=))
17 Nov 2015 - 8:04 pm | बॅटमॅन
बॅटमॅन रात्री का जागतो त्याचे उत्तर या श्लोकात आहे.
17 Nov 2015 - 5:12 am | जयन्त बा शिम्पि
तुकारामांची गाथा अभ्यासावीशी वाटते, परंतु सार्थ ज्ञानेश्वरी सारखी "सार्थ गाथा" कुठे आन्तर्जालावर आढळली नाही. गाथा तशी सोपी असली तरीही काही वेळा 'आकलनशक्ती' ची गाडी अडतेच! अशा वेळी वरच्यासारखे लेखच वाचनात आले, तरच 'तुका म्हणे' ते समजते. सम्पुर्ण गाथेचा सरळ मराठीत अर्थ कोठे मिळेल हे कुणीतरी येथे लिहिल काय? लेख छानच आहे, आणखे असेच येवू द्या.
17 Nov 2015 - 5:33 am | मारवा
बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥
न कदाचित तुम्हाला अपेक्षीत नसावा.
असो.
17 Nov 2015 - 8:15 am | अत्रुप्त आत्मा
खिक्क!
17 Nov 2015 - 8:26 am | नाखु
लिखाण रसाळ आणि ओघवते.
पण काय आहे प्रगो, सध्या संतसाहित्याची "अवहेलना,आणि (स्वतःला) सोयीस्कर अर्थ काढून टीकाच करणे हे उच्च बुर्झ्वा पुरोगामीत्वाचे लक्षण आहे.
ताजे उदाहरण जरा हा लेख संत साहित्याचे ओझे पहा.
मी तिथेही प्रैसाद दिला आहेच.
बाकी पांडुरंग हरी !!! वासुदेव हरी!!!
17 Nov 2015 - 10:25 am | सस्नेह
अगदी, अगदी !
हा भ्रमर कमोदिनीची झैरात करताना कधी दिसत नाही ! आणि दुसऱ्या कुठल्या परिमळाला नावेही ठेवत नाही, बिचारा !
ज्यांनी परिमळ भोगलाच नाही, ते मात्र झैराती आणि वादविवादातच दंग असतात...
17 Nov 2015 - 10:39 am | मांत्रिक
धन्यवाद प्रगोसाहेब!
अतिशय सुंदर अभंगाची आठवण करुन दिलीत. पण या प्रयत्नाने संतसाहित्य आणि अध्यात्म, यांच्यावर अनाठायी टिका करणारे, या अभंगाचे रसग्रहण वाचून शहाणे होतील असे वाटत नाही. काय आहे साहेब, विज्ञान आणि अध्यात्म यांचा खरा अर्थ काय? त्यांचा हेतू काय? त्यांचे मार्ग एकमेकाला खरोखरच छेद देतात की पूरक ठरतात? त्यांचा खरा उद्देश मानवाची सेवा हाच आहे किंवा नाही? हे एखाद्या सच्च्या वैज्ञानिकाप्रमाणे तपासून न पाहता केवळ एखादा दहशतवादी ज्याप्रमाणे स्वैर गोळीबार करत सुटतो, त्याप्रमाणे अध्यात्म-साधु-संत यांच्यावर कडूजहर टिकेच्या फैरी झाडत बसायचे, हाच मेंदूला फारसा शिणवटा न देणारा उद्योग असल्याने असली मंडळी तोच मार्ग स्वीकारतात.
मुळात विज्ञान विरुद्ध धर्म हा लढा भारतीय नसून पाश्चात्य आहे. विज्ञान व वैज्ञानिक यांची धर्मसत्तेच्या मान्यतेने अतिशय छळवणूक, प्रसंगी जिवंत जाळणे, फासी देणे वगैरे प्रकार केले गेले. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीत कदाचित धर्माविषयी कडवट वृत्ती निर्माण होणे साहजिक आहे. इथे तसे का व्हावे हे समजत नाही. असो.
17 Nov 2015 - 10:42 am | स्पा
काहिहि कळले नाही, कसलेसे रसग्रहण दिसते
17 Nov 2015 - 11:29 am | अत्रुप्त आत्मा
17 Nov 2015 - 6:01 pm | सूड
मेल्या, म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण ह्या असल्या कमेंटींनी काळ सोकावतोय.
17 Nov 2015 - 11:05 am | नितीनचंद्र
न पटलेल्या आणि भारतीय तत्वज्ञान म्हणौन मान्य असलेल्या कशावरही जर हे थोतांड आहे किंवा तत्सम लिहले गेले तर कमोदीनी काय जाणे अशी प्रतिक्रिया द्यावी झाले.
शेणात दगड मारुन आपल्या अंगावर उडवुन घेण्यापेक्षा उत्तम.
17 Nov 2015 - 4:23 pm | एस
हम्म! वस्तुस्थितीचा विपर्यास याहून उत्तम असू शकत नाही. याला कांगावा असे म्हणतात. तुकोबांच्या अभंगाआडून केलेला.
17 Nov 2015 - 5:20 pm | बॅटमॅन
या धाग्याला कांगावा म्हणायचे असेल तर अतिशय खेदाने असहमती नोंदवीत आहे. तुमचेकडून ही अपेक्षा नव्हती. असो.
17 Nov 2015 - 5:29 pm | एकजटा अघोरी
सहमत!
यनावालांनी ओंकार आणि गायत्री या अत्यंत पवित्र, कोणताही वाईट अर्थ आणि कृती अपेक्षित नसलेल्या मंत्रांविषयी जितके अवमानकारक लिहिले आहे, त्या तुलनेत हा धागा काहीच नाही. कारण प्रगोंनी थोडं कडक लिहिलं असतं तर परतः
१) तुम्ही अध्यात्मवाले कांगावाखोर, अतिरेकी..
२) तुमची साधना अपयशी..
३) तुमचा क्रोध तुमच्या ताब्यात नाही..
४) झैरात न करणारे भ्रमर व्हा आणि..
५) खरं अध्यात्म तुम्हाला कळतच्च नाही मुळ्ळी (ते फक्त यनावालांना कळतं)
वगैरे वगैरे निरर्थक बडबड सुरु. जणू एखाद्या मनुष्याने अध्यात्म साधनेच्या मार्गाला लागलं की दुस-याचं वाट्टेल ते ऐकून घ्यायची, खपवून घ्यायची तयारी ठेवावी. हास्यास्पद आहे हा प्रकार.
17 Nov 2015 - 6:23 pm | एस
ठीक आहे. मी कांगावा हा शब्द मागे घेतो. पण ह्या धाग्यात श्री. प्रगोंनी व्यक्त केलेली मते ही मला माझ्या निरीक्षणानुसार वस्तुस्थितीचा विपर्यास वाटतो. अध्यात्म कशाला म्हणावे किंवा श्रद्धा कशाला म्हणावे यात मतमतांतरे असू शकतात. पण त्या धाग्यांवर प्रच्छन्न वैयक्तिक टीका आणि शिविगाळ करणारे बेताल आयडी हे कुठल्या बाजूचे होते हे इथे उद्धृत करण्याची गरज नाही.
कुठल्याही नास्तिकाला एखाद्याच्या वैयक्तिक श्रद्धांबद्दल, जोपर्यंत त्या वैयक्तिक स्तरावर आहेत, अंधश्रद्धा नाहीत आणि इतरांना त्याचा कसलाही त्रास नाही तोपर्यंत कुठलाच आक्षेप घेण्याची गरज भासत नाही. एखाद्याचे सश्रद्ध असणे हा अधिकार जसा एक खरा नास्तिक खुल्या मनाने मान्य करतो, त्याचप्रमाणे एखाद्याचा अश्रद्ध असण्याचा अधिकार कुणी अध्यात्मवादी म्हणा वा इतर, हे कधी मान्य करताना मला वैयक्तिकरित्या कधी दिसलेला नाही. इथे नास्तिकांना वा विज्ञानवाद्यांना नेहमीच हेटाळणी आणि दहशतीचा सामना करावा लागलेला आहे. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे जितके एका बाजूला आहे आणि वापरण्याची मुभा आहे तितकेच ते इतर बाजूंनाही दिले पाहिजे हे कोणी करताना दिसत नाहीये. ही एकीकडे विवेकवादाची मुस्कटदाबी करायची आणि त्याचबरोबर दुसरीकडे उलट विवेकवादीच कसे आढ्यताखोर आहेत आणि ते कसे तथाकथितरित्या इतरांच्या भावनांना, श्रद्धांना लाथाडतात, तुच्छ मानतात अशी ओरडही करायची ह्याल मी 'कांगावा' असे म्हणेन.
हा प्रतिसाद कुणा एका धाग्यापुरता, प्रतिसादापुरता किंवा व्यक्तीपुरता नसून मी माझे सर्वसाधारण आकलन मांडले आहे. त्यात काही चूक असेल असे मला दाखवून दिल्यास योग्य तो बदल करायला मी तयार आहे. याच स्वरूपाच्या वैचारिक सहिष्णुतेची अपेक्षा मीही केल्यास ते वावगे ठरू नये! :-)
17 Nov 2015 - 6:33 pm | बॅटमॅन
जर पुरेशा संयत शब्दांत अश्रद्धपण मांडले तर लोक टीका करत नाहीत हे पाहिले आहे. नेटवर सर्वच अस्मिता टोकदार होतात त्याला इलाज नाही. शिवाय सध्याच्या काळात डॉमिनंट विचारधारा अश्रद्धांची आहे त्यामुळे सश्रद्धांना आपली सहानुभूती जास्त आहे. असो.
17 Nov 2015 - 7:07 pm | स्पा
हल्ली नास्तिक स्वता हुन काड्या करतात असे निरीक्षण जास्त आहे. अर्थात आस्तिकांना ही अक्कल कमीच आहे. काहीही प्रतिक्रिया दिली नाही तर असले वांझोटे वाद होणार नाहीत. म्हणते दुनिया वेडा तर म्हणु द्या, जर आपण आपल्या तत्वांवर ठाम असू तर इतर कोण काय म्हणतय त्याने काहीच फरक पडायला नको
18 Nov 2015 - 2:37 am | संदीप डांगे
अगदी हेच मत माझेही नास्तिकांबद्दलही आहे. करतात लोक श्रद्धेने, अंधश्रद्धेने करु देत ना.. उद्या तुम्हालाच कोणी नरबळी म्हणून देत असेल तर बोंबला की.
नास्तिक असो वा आस्तिक. प्रत्येकाला अहं प्यारा. मी कुठे मूर्खतर ठरत नाही ना अशी सुप्त भीती असते. त्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याची हुक्की येते. हे वाद नास्तिक-आस्तिक नसून केवळ आणि केवळ शुद्ध अहंकाराचे आहेत. (यात काही धाग्यांवर मीही प्रतिसाद दिले आहेत, तर ते माझ्या अहंकारातूनच दिले आहेत असे समजावे. अजून साधनेत तेवढी प्रगती नैये.) स्वतः करतो ते शहाणपणाचे असे नुसते समजून चालत नाही तर त्याला फॅनफॉलोईंगही लागते तरच आपण करतोय ते बरोबरच आहे असा आत्मविश्वास येतो. माणसाची मूळ वृत्ती आहे हो बाकी काय नाही.
याबद्दल विपष्यना करत असतांना गुरुंनी छान समजवुन सांगितले होते. साधना एकट्याचीच आहे, ती एकट्यानेच करायचे, एकट्याचीच त्यात प्रगती होईल, दुसर्याचा/ला काहीही उपयोग नाही. मग ती अशी सर्वांनी एकत्र येउन का करायची? संघात बसून का करायची? तर सुरुवातीला काहीही मिळेपर्यंत मन संभ्रमात असतं, ते भटकतं. आपण करतोय तो येडेपणातर नाही ना असे म्हणून मन साधनेत चांगलीच खिळ घालू शकतं. यावर उपाय काय तर समविचारींसोबत साधनेला बसावं. चार इतर लोक करतायत त्यांचं मानसिक समाधान असतं की बुवा ते करतायत म्हणजे हे काही चुकीचं तर नाही. माणसाला सपोर्ट लागतो. लॉजिक फक्त मेंदूत असतं, (प्रत्यक्षात ते सत्य असेलच असे नसत) त्या लॉजिकला सपोर्ट करतं मन. आणी मनाला सपोर्ट लागतो चार इतर लोकांचा. मग तो आस्तिक असो वा नास्तिक. सगळे फॅनफॉलोईंगच्या भानगडीत अहंकाराचे षड्डू ठोकित असतात. आपण त्याला आस्तिक-नास्तिक वाद म्हणतो. विज्ञानवादी असो वा अध्यात्मवादी, कुणालाही इतर कुणाचा अपमान करण्याची गरजच का पडावी? कारण आपला अपमान होतोय ही जाणीव होते म्हणून. जिथे अहंकार आहे तिथेच अपमानाची जाणीव असते. म्हणून चवताळून प्रतिहल्ले होतात.
18 Nov 2015 - 12:07 pm | मारवा
नास्तिक असो वा आस्तिक. प्रत्येकाला अहं प्यारा. मी कुठे मूर्खतर ठरत नाही ना अशी सुप्त भीती असते. त्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याची हुक्की येते. हे वाद नास्तिक-आस्तिक नसून केवळ आणि केवळ शुद्ध अहंकाराचे आहेत.
लॉजिक फक्त मेंदूत असतं, (प्रत्यक्षात ते सत्य असेलच असे नसत) त्या लॉजिकला सपोर्ट करतं मन. आणी मनाला सपोर्ट लागतो चार इतर लोकांचा. मग तो आस्तिक असो वा नास्तिक. सगळे फॅनफॉलोईंगच्या भानगडीत अहंकाराचे षड्डू ठोकित असतात.
शंकराचार्य
17 Nov 2015 - 7:10 pm | मांत्रिक
धन्यवाद बॅटाण्णा!
याबाबत पुलंचं उदा. उत्तम ठरावं. नास्तिक व अश्रद्ध असूनही त्यांचं नास्तिकपण कुठेच अंगावर धावून येत नाही. पुलंनीही धर्म, देवता, साधूसंतांची थट्टा केली आहे. पण ती थट्टादेखील इतकी निर्लेप निरागस आहे की कट्टर आस्तिक मनुष्यालादेखील ती कुठेच खुपत नाही.
17 Nov 2015 - 7:17 pm | एस
संयतपणाच्या आवश्यकतेबद्दल सहमत.
माझी सहानुभूती अश्रद्धांना आहे असे म्हणूयात. :-)
17 Nov 2015 - 7:30 pm | प्रसाद गोडबोले
तुकोबा तर म्हणत आहेत की जाऊन्दे , आता त्याचीही अपेक्षा नाही :)
बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥१॥
विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥२॥
तुका म्हणे तुम्ही करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥३॥
_________________________________/\_______________________________________
17 Nov 2015 - 7:51 pm | मारवा
कांगावा हा चुकीचा शब्द आहे सहमत नाही.
18 Nov 2015 - 12:38 pm | बाळ सप्रे
+१००
मुद्द्यावर भाष्य न करता मुद्दा मांडणार्याचा अधिकार / शिक्षण/ वाचन वगैरेवर हल्ला करणे, मुद्द्याचा प्रतिवाद करून श्रद्धा कुठल्या अंगाने उपयुक्त व निरुपद्रवी आहे हे न मांडता भावना दुखावून घेणे हे अशाप्रकारच्या उद्विग्नतेचे कारण आहे.
लागट शब्दांचा वापर देखिल वादविवादाला मुद्द्यांपासून दूर नेण्यास कारणीभूय ठरतो. कारण मग प्रतिवादाऐवजी आणखी लागट शब्द शोधून प्रतिवार करणे हेच ध्येय उरते.
18 Nov 2015 - 1:50 pm | मारवा
आम्ही काय बाबा असेच
आमी त अडाणी आमी अशेच बरे
हा पण एक प्रकारचा अभिनिवेषच असतो.
20 Mar 2018 - 9:16 am | वनफॉरटॅन
तुम्ही मला नवीन धागा टाकायला एक जबर्या मोटीव्हेशन दिलेलं आहे.
17 Nov 2015 - 6:00 pm | सूड
सुंदर!!
17 Nov 2015 - 6:25 pm | विवेकपटाईत
सहा आंधळ्यांना पूर्ण हत्ती दिसलास नाही, प्रत्येकांनी स्वत:च्या दृष्टीकोनातून चांगले -वाईट वर्णन केले. ज्ञान चक्षु उघडूनच आपण पूर्ण हत्ती पाहू शकतो आणि आज तर विशिष्ट स्वत:ला पुरोगामी म्हणवून घ्यायचे असेल तर श्रद्धास्थानांना दुखविणे गरजेचे. शेवटी 'सार सार को गहि रहै थोथा देई उडाय' हि वृत्ती पण असायला पाहिजे.
17 Nov 2015 - 9:02 pm | वडाप
यकमेकाच्या उरावरच बसाय लागलंत.भंडारा डुंगरावरच कट्टा लावा.कुटुया टाळ चार तास.
17 Nov 2015 - 9:06 pm | मांत्रिक
कुटा खरंच कुटा. कदाचित ईश्वरी शक्तीची ओळख होईल पण.
बाकी बरेच जण येथील. वडाप गाडी कधी काडताय?
18 Nov 2015 - 11:41 am | भाऊंचे भाऊ
हा चैतन्य महाशय कोण जाणून घ्यायची उत्सुकता हा लेख वाचुन निर्माण झाली.
18 Nov 2015 - 12:19 pm | मोगा
हं
18 Mar 2018 - 7:04 am | चामुंडराय
>>> शिंपीणीच्या पोटात मुक्ताफळ(?) असेल पण तिला काही त्याचा भोग घेता येत नाही ते सुख भोगणारे औरच !!
हे शिंपल्याच्या पोटात मोती असतो परंतु त्याचा त्या शिम्पल्याला काहीच उपयोग नाही तर तो मोती धारण करणारा त्याचे सुख उपभोगतो असा याचा अर्थ असेल काय?
18 Mar 2018 - 9:02 am | प्रसाद गोडबोले
ह्म्म, तुम्ही म्हणता तसाच अर्थ असावा बहुतेक ! अन्यत्र एकेठिकाणी तसाच अर्थ दाखवला आहे !
असो. ह्या निमित्ताने परत एकदा हा अभंग वाचला गेला ऐकला गेला , आनंद झाला !!
धन्यवाद !