✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शिवस्वरूप खंडोबा - एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति"

व
विवेकपटाईत यांनी
Sat, 09/26/2015 - 09:41  ·  लेख
लेख
इंद्रं मित्रं वरुणं अग्निं आहुः अथो इति दिव्यः सः सुऽपर्णः गरुत्मान् l एकं सत् विप्राः बहुधा वदंति अग्निं यमं मातरिश्वानं आहुःl (ऋग्वेद १/१६४/४६) [सत्य स्वरूपी ईश्वर एकच आहे, पण ज्ञानीं लोक त्याला इंद्र, मित्र, वरुण आणि अग्नि असें म्हणतात. देवलोकीं राहणारा सुंदर पंखांचा पक्षीही तोच. जगातील विभिन्न जाती पंथातले लोक त्याला विभिन्न नावांनी ओळखतात. कुणी त्याला अग्नी, कुणी यम, कुणी खुदा, कुणी गॅाड, कुणी वाहेगुरू या नावाने ओळखतात. कुणी 'खंडोबा' या नावानेहि]. आजकाल टीवीवर 'खंडोबा'च्या जीवन चरित्रावर मालिका सुरु आहे. मालिकेत खंडेराय हे महादेवाचे अवतार आहे, असे दाखविले जाते. खंडेराय हे धनगर समाजातले होते. काहींच्या मते देत्यांचा राजा बळी यांनी खंडेरायांना जेजुरीचे क्षेत्रपाल नेमले होते. एक मात्र खंर, शेकडों/ हजारों वर्षांपासून लोक त्यांची पूजा करतात, त्या अर्थी त्यांनी आपल्या आयुष्यात काही भव्य-दिव्य केल असेल. आपल्या प्रजेला निश्चित सुखी ठेवले असेल. काही तथाकथित पुरोगाम्यांना वाटते, मालिकेत खंडेरायाचे चरित्र विकृत करून दाखविले जात आहे. त्यांना हे सर्व ब्राह्मणी षड्यंत्र वाटते. पण मला तर वाटते या अतिविद्वान लोकांना देशाच्या मूळ सर्वसमावेषक संस्कृती बाबत कुठलेहि ज्ञान नाही. आसेतु हिमालय पर्यंत पसरलेला हा विस्तृत आणि विशिष्ट भू भाग भारत भूमी म्हणून वैदिक काळापासून ओळखला जातो. प्राचीन काळापासून विभिन्न जनजाती समूह इथे एकत्र नांदत आहे. त्यांची जात-पात भाषा वेगळी तरी त्यांचे आणि भारत भूमीचे भविष्य सर्वांनी एकत्र राहण्यातच आहे, हे प्राचीन वैदिक ऋषींनी ओळखले होते. एकत्र राहण्यासाठी सर्वाना आपल्यात समावून घेणे गरजेचे. त्या साठी सर्व जमाती आणि जातीय समूहांच्या परंपरेचा सम्मान करणेहि गरजेचे. ईश्वराची कल्पना सर्व जातीय समूहांनी आपापल्या परीने वेगवेगळी केली. कुणी आपल्या पूर्वजांना ईश्वर मानले, कुणी प्रकृतीला ईश्वर मानले, कुणी सर्पांची पूजा करायचे तर कुणी लिंग पूजा करायचे, तर कुणी वृक्षांना देवता मानायचे. हे सर्व पाहूनच तुलसीदास यांनी म्हंटले आहे, “जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी". पण सर्वांचा उद्देश्य एकच, सत्य मार्गावर जाण्यासाठी भगवंताच्या कृपेची प्राप्ती. हे ओळखूनच कदाचित् उपनिषदकरांनी, ईश्वराची नवीन संकल्पना पुढे आणली. यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति । सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते ॥ (ईशान उपनिषद /६) जो सर्व प्राणीमात्रांमध्ये भगवंताला पाहतो, तो कुणाचा हि द्वेष करीत नाही. अर्थात प्रत्येक प्राण्यामध्ये ईश्वराचा निवास आहे. तात्पर्य ईश्वराच्या प्रत्येक स्वरुपाची पूजा उपासना करताना आपल्या इष्ट देवताची कल्पना त्या ईश्वरीय स्वरुपातहि करू शकतो. भगवंतानी गीतेत हीच भावना रोखठोक शब्दात सांगितली ते म्हणतात, अर्जुन, मीच सर्व जीवांचा आदि, मध्य आणि अंत आहे. मीच विष्णू आहे, मीच शंकर आहे, कुबेर आहे, अग्नि आहे, मेरू पर्वत आहे, कार्तिकेय आहे, महासागर आहे, वृक्षांमध्ये अश्वत्थ आहे, अश्वांमध्ये उचैश्रवा आहे, गजेंद्रामध्ये ऐरावत आहे आणि सुरभी गायहि आहे. मी सर्पांमध्ये वासुकी आहे, नागांमध्ये अनंत नाग आहे, वरुण आहे दैत्यांमध्ये प्रल्हाद आहे, .....अर्थात त्या काळी माहित असलेल्या सर्व ईश्वरी स्वरूपांमध्ये एकच ईश्वर आहे हि भावना लोकांमध्ये रुजवली. काळ पुढे गेला, भरतखंडात जनसंख्या वाढली, नवे नवे विचार जन्मले आणि त्या सोबत देवतांची संख्याहि वाढत केली. प्रत्येकाला आपला देव हा श्रेष्ठ वाटणारच. जिथे श्रेष्ठत्व तिथे भांडणेहि होणारच. आपल्या पुराणकारांनी, या वरहि उपाय शोधला. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिमायेची संकल्पना लोकांच्या मनात रुजवली. सर्व स्त्री देवता म्हणजे आदिमायेचे स्वरूप. पुरुष देवता म्हणजे विष्णू किंवा महेश. इंद्राला पराजित करणारा गवळी समाजातला गोवर्धन गिरधारी हा विष्णू अवतार म्हणून प्रसिद्धी पावला तर धनगर समाजातील खंडोबा हे महादेवाचे अवतार ठरले. अश्या रीतीने समाजाला एकसुत्रात बांधण्याचे कार्य आपल्या ऋषी मुनी आणि पुराणकारांनी केले. सर्वांच्या परंपरेंचा आणि उपासना पद्धतींचा सम्मान केला. नाव वेगवेगळे असले तरी ईश्वर एकच आहे, हि भावना जनतेत रुजवली. पण आज आपल्या देशाचे दुर्भाग्य, स्वत:ला पुरोगामी(????) म्हणविणारे लोक समाजात दुही माजविण्याचे कार्य, मोठ्या जोमात करतात आणि स्वत:ला धन्य मानतात. प्रत्येकाला तो दुसर्यापासून कसा वेगळा आहे, हे दाखविण्यातच आपली उर्जा व्यर्थ करतात. अश्या अतिविद्वान लोकांना ‘खंडेराय’ मालिकेतहि षड्यंत्र दिसेल. पण ईश्वराला मानणारे आणि श्रद्धावंत लोक ‘खंडोबा’च्या स्वरुपात महादेवाचे दर्शन करतात आणि महादेवात खंडेरायांचे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
12208 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

छान आहे. आवडला लेख.

मांत्रिक
Sat, 09/26/2015 - 10:00 नवीन
छान आहे. आवडला लेख. ईश्वराच्या विविध स्वरुपात फरक करणारे १.५शहाणे या छोट्याशा प्रयत्नाने शहाणे होतील असे वाटत नाही. पण असो. तुमचा हेतु व उपक्रम स्तुत्य आहे.
  • Log in or register to post comments

छान आहे.

जगप्रवासी
Sat, 09/26/2015 - 12:00 नवीन
छान आहे.
  • Log in or register to post comments

खंडेराय हे धनगर समाजातले होते

भीमराव
Sat, 09/26/2015 - 19:16 नवीन
खंडेराय हे धनगर समाजातले होते, तर मग 'धनगर वाड्यात घुसला' या गाण्यामधल्या 'देव जातीचा गं वाणी, सवत धनगराची बानी' या ओळींचा आधार कोणता?
  • Log in or register to post comments

मला स्वत:लाहि खंडोबाच्या जीवन

विवेकपटाईत
Sat, 09/26/2015 - 19:28 नवीन
मला स्वत:लाहि खंडोबाच्या जीवन चरित्राविषयी जास्त माहिती नाही. लेखनाचा विषय लेखनाचा विषय वैदिक काळापासूनच समाजातील विभिन्न जाती पंथांना एक सूत्रात बांधण्याच्या प्रयत्ना बाबत आहे. सर्वसमावेशक भारतीय संस्कृती बाबत आहे. समाजाला जोडण्याचे कार्य काहिंना आवडत नाही, एवढेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

बाप रे बाबुदादा! कुठून कुठून

मांत्रिक
Sat, 09/26/2015 - 19:29 नवीन
बाप रे बाबुदादा! कुठून कुठून गाणी आणता असली! एखादा लेख लिहायला हरकत नाही तुम्ही. आम्हालाही हा अनमोल ठेवा वाचायला मिळेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भीमराव

आवो मांत्रिक बोवा ल्हान

भीमराव
Sat, 09/26/2015 - 20:07 नवीन
आवो मांत्रिक बोवा ल्हान पनापासुन ह्ये गाणं ऐकत आलोय राव, मला वाटायचं की खंडोबा ,भैरोबा हे सगळे घोड्यावरले देव शैव पंथी आन वाणी हे निदान आमच्याकडे तरी विरशैव लिंगायतच आसतात तवा खंडोबा वाणी आसु शकतो. बाकी धागाकर्ते सांगतायत ते पटनेबल आहे. हिंदु धर्माची लवचीकता अन सर्वसमावेशकता ह्याच्यामुळं प्रत्येक जाती प्रजाती मुख्य धर्मधारेत राहुन सुद्धा आपापले कुल दैवत पुजत राहीली आहे, आन सर्वात भारी काय तर ह्या देवदेवतांच मुख्य देवांबरोबरचे काय ना काय तरी संबंध दाखवुन ठेवलेत. पन एक समान गोष्ट ही कि प्रत्येक देवाची मुर्ती आहे म्हन्जे आसं बघा की जर आत्ताच्या जातींपैकी ब-याचशा जाती पुर्वी स्वतंत्र चालना-या हुत्या आन त्यांना प्रयत्नपुर्वक मुख्य धर्मधारेत आनलं गेलं आसेल तरी मुळात सगळे मुर्तीपुजकच असावेत. बळी आन खंडोबाचं वर सांगीतल्यालं आदी यकदा वाचल्यालं कुठतर काय पटलं नाय पन
  • Log in or register to post comments

खंडोबा = खोंडा हब्बा?

श्रीनिवास टिळक
Sat, 09/26/2015 - 20:11 नवीन
(१) "आपल्या पुराणकारांनी… ब्रह्मा, विष्णू, महेश संकल्पना [भारतीयांच्या] मनात रुजवली." स्व. डॉ. राम मनोहर लोहिया यांचे खालील उद्गार (स्वैर भाषांतर माझे) या संदर्भात स्मरणीय आहेत: "श्रीरामांनी भारतवर्ष उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत एकजीव आणि एकसंध केले; भगवान श्रीकृष्णांनी तेच कार्य पूर्व ते पश्चिम दिशेने केले; आणि शिवजी तर सर्व भारतवर्ष व्यापून राहिले आहेत." (२) "धनगर समाजातील खंडोबा हे महादेवाचे अवतार ठरले.…" महादेवाची व्याप्ती भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरुपात आढळून येते. उदाहरणार्थ कर्नाटकात लिंगायत समाजात शिवासाठी जळत्या निखाऱ्यावरून चालत जाण्याची प्रथा आहे". तिला खोंडा हब्बा म्हणतात. खंडोबा = खोंडा हब्बा असं काही समीकरण होऊ शकेल का?
  • Log in or register to post comments

पटाईतराव ___/\___

बोका-ए-आझम
Sat, 09/26/2015 - 23:01 नवीन
मस्त आणि विचार करायलाा लावणार लेख. पुरोगामी ही आजकाल शिवी बनली आहे, त्यामागे अशा तथाकथित मूर्ख पुरोगाम्यांच्या वागणुकीचा खूप वाटा आहे.
  • Log in or register to post comments

पटाईत राव , अप्रतिम लेख !!

प्रसाद गोडबोले
Tue, 09/29/2015 - 16:37 नवीन
पटाईत राव , अप्रतिम लेख !!
अशा तथाकथित मूर्ख पुरोगाम्यांच्या वागणुकीचा खूप वाटा आहे.
अगदी अगदी , अशा एका मुर्ख पुरोगामी विद्वानांना आम्ही ओळखतो , ते कोणत्याही वेदाचा भाग नसलेला एका पुस्तकावरुन समस्त वैदिक धर्माविषयी काहीच्या बाही अनुमान काढतात अन सनातन धर्माला नावे ठेवत असतात ... बाकी सनातन वैदिक तत्वज्ञानाचा अभ्यास शून्य !! असो .
एकं सत विप्रा: बहुधा वदन्ति !
काय सुंदर वैदिक श्लोक आहे हा ! ह्याच्या सारखाच समान अर्थ असलेला हा अजुन एक आमचा आवडता श्लोक : यं शैवा: समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदान्तिनो बौध्दा बुध्द इति प्रमाणपटव: कर्तेति नैयायिका:। अर्हन्नित्यथ जैनशासनरता: कर्मेति मीमांसका: सो यं वो विदधातु वांछितफलं त्रैलोक्यनाथो हरि:॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

बाबुदादा, श्रीनिवास टिळक

विवेकपटाईत
Sun, 09/27/2015 - 09:52 नवीन
बाबुदादा, श्रीनिवास टिळक ,बोका-ए-आझम - प्रतिसादाबाबत धन्यवाद. बाकी खंडोबा बाबत आणखीन माहिती वाचायला मिळाली तर आनंद होईल.
  • Log in or register to post comments

सुंदर.

दत्ता जोशी
Sun, 09/27/2015 - 13:26 नवीन
नक्की वाचायला आवडेल. पण देव आणि दानव युधान्विषयी वेळ मिळाला कि लिहितो.
  • Log in or register to post comments

कृपया गैरसमज पसरवणं थांबवा .

तुडतुडी
Tue, 09/29/2015 - 16:24 नवीन
कृपया गैरसमज पसरवणं थांबवा . खंडोबा हा कुठलाही देव नाहीये . तो फक्त १ सरदार होता .त्याला बाणु नावाच्या धनगराच्या बाईशी लग्न करायचं होतं पण धनगर खाली जात (?) म्हणून इतरांनी आक्षेप घेतला . तेव्हा धनगरांनी आपल्या फायद्यासाठी ह्या खंडोबाचा देव म्हणून प्रसार करायला सुरवात केली . ब्राम्हण त्याला देव म्हणून स्वीकारायला तयार नवते . मग त्याला शिवा चा अवतार वगेरे प्रसार करायला सुरवात झाली . गावोगावी धनगरांनी त्याच्या पूजा अर्चा करायला सुरवात केली . आत्ताच्या सुशिक्षित काळात सुधा गणपती दुध पितो हि वार्ता वार्यासारखी पसरते मग त्याकाळी काय हो , अडाणी जनता . खंडोबाच्या देवत्वाची बातमी पसरली . महात्मा बसवेश्वर स्वतः मोठे शिवभक्त होते . त्यांनी त्यांच्या पुस्तकात खंडोबाच्या चारित्र्यहिनतेवर खरपूस टीका केली आहे . महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींनी खंडोबाच्या उपासनेवर 'हरी-हरांना सोडून क्षुद्र आणि काल्पनिक देवतांची उपासना' करणं हे कलियुगाचा अंत जवळ आल्याचं लक्षण आहे म्हणून सांगितलंय. आपल्या अध्यात्मात खंडोबाचा देव म्हणून उल्लेख झाल्याचा पुरावा कोणी देवू शकेल काय ? (१६ व्या शतकात प्रसिद्ध झालेलं मल्हारी महात्म्य किवा खंडोबा देव्स्थानांकडून प्रसिद्ध झालेल्या आरत्या नव्हे ). ह्या खंडोबाची ५ वि बायको चंदा मुसलमानाची . आता मुसलमान आपल्या देशात कधी आले ? तेव्हा काय मणी मल्ल सारखे राक्षस होते का पृथ्वीवर ? मणी मल्ल हे दरोडेखोर किवा लुटारू होते . त्यांना मारून लोकांना मोठ्या भयापासून मुक्ती दिल्यामुळे अडाणी , देवभोळ्या लोकांनी त्याला देव मानायला सुरवात केली .
  • Log in or register to post comments

अभ्यासोनि प्रकटावे

प्रसाद गोडबोले
Tue, 09/29/2015 - 16:42 नवीन
तुडतुडी ताई , अधिक अभ्यासाकरिता समर्थांनी रचलेली खंडोबाची आरती येथे देत आहे : पंचानन हय वाहन सूर भूषित निळा खंडा मंडित दंडित दानव अवळीला मणी मल्ल मर्दूनी तो धूसर पिवळा करी कंकण बाशिंगे सुमनांच्या माळा जयदेव जयदेव जय शिव मल्हारी वारी दुर्जन असुरा भाव दुस्तर तारी ll १ ll सुरवर सत्वर वर दे मजलागी देवा नाना नामे गाईल ही तुमची सेवा अघटीत गुण गावया वाटतसे हेवा फणीवर शिणला तेथे नर पामर केवा जयदेव जयदेव जय शिव मल्हारी वारी दुर्जन असुरा भाव दुस्तर तारी ll २ ll रघुवरस्मरणी शंकर हृदयी निवाला तो हा मल्लांतक अवतार झाला यालागी आवडे भावे वर्णिला रामी रामदास जिवलग भेटला जयदेव जयदेव जय शिव मल्हारी वारी दुर्जन असुरा भाव दुस्तर तारी ll ३ ll
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

आपणच अभ्यासोनी प्रकटावे

याॅर्कर
Tue, 09/29/2015 - 20:41 नवीन
तुडतुडी ताईंचे म्हणणे अगदी बरोबर वाटते. समर्थांनी मल्हारी महात्म्यच्या आशयाने किंवा ते ऐकून आरती लिहली असेल. कारण खंडोबाचा महिमा 12व्या 13 व्या शतकात सुरू झाला.आणि मल्हारी महात्म्य त्यानंतरच्या काळामध्ये लिहले गेले.नेमका खंडोबाचा काळ कोणता?त्या सिरिअलमध्ये कृतयुगातील(सत्ययुग) कथा म्हणून सांगितले आहे,म्हणजे रामायणाच्या आधी?त्यावेळी इथे सगळे दंडकारण्य असावे असे वाटते.मग कुठली जेजुरी आणि कुठली पाली असे म्हणतात मुसलमान भक्त खंडोबाला मल्लू खाॅ या नावाने ओळखत.आणि म्हणे चांदाई नावाची मुसलमान बायकोही होती( कृतयुगात मुसलमान कसे?) . बुद्धीभेद आहे सगळा हा.म्हणून प्रत्येकाने आपल्या परीने 'अभ्यासोनी प्रकटावे'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

तुडतुडी ताई, लेख पुन्हा वाचा.

विवेकपटाईत
Tue, 09/29/2015 - 19:57 नवीन
तुडतुडी ताई, लेख पुन्हा वाचा. लेखनाचा उद्देश्य खंडोबा कोण होता हा नव्हे नव्हे तर आसेतु हिमालय पर्यंत पसरलेल्या समाजात पसरलेल्या विभिन्न श्रद्धा स्थानांना एकसूत्रात बांधण्याचा प्रयत्नाबाबत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

मूळ मल्हारी महात्म्यात बानू

तुडतुडी
Tue, 09/29/2015 - 16:44 नवीन
मूळ मल्हारी महात्म्यात बानू आणि म्हाळसाचा उल्लेखच नाहीये . In Fact त्याच्या लग्नाचाच उल्लेख नाहीये . कन्नड साहित्यात त्याच्या बायकोचा 'मळव्व' असा उल्लेख आहे . कन्नडमध्ये बानूचा उल्लेख नाही
  • Log in or register to post comments

ओके . आपण संदर्भ द्यावा , मी

प्रसाद गोडबोले
Tue, 09/29/2015 - 16:56 नवीन
ओके . आपण संदर्भ द्यावा , मी घरी विचारुन कन्फर्म करुन कळवेनच . आणि असे असले तरीही
खंडोबा हा कुठलाही देव नाहीये
हे तुमचे विधान कोणत्याही प्रकारे सिध्द होत नाही . अद्वैत हेच संपुर्ण आर्य सनातन वैदिक धर्माचे सार आहे आणि म्हणुनच केवळ खंडोबाच नव्हे तर मणी मल्ल बानु म्हाळसा आणि अगदी तुम्ही , आम्ही सारेच देव आहोत !!

“Never forget the glory of human nature! We are the greatest god. Christs and Buddhas are but waves in the boundless ocean which I AM.”

- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

आम्हा पामरांची पावलं कर्माचं

प्यारे१
Tue, 09/29/2015 - 18:18 नवीन
आम्हा पामरांची पावलं कर्माचं गहूभर पुढं उपासनेचं तांदूळभर मागं अशी ग्यानबा तुकाराम करत असताना एकदम वामन उडी घेऊन ज्ञानाच्या अद्वैताचा घास कशाला घेताय माऊली???????????????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

आम्हा पामरांची पावलं कर्माचं

प्रसाद गोडबोले
Tue, 09/29/2015 - 18:48 नवीन
आम्हा पामरांची पावलं कर्माचं गहूभर पुढं उपासनेचं तांदूळभर मागं अशी ग्यानबा तुकाराम करत असताना
प्यारेबुवा , आपण चेष्टेत लिहिले आहे की गांभीर्याने लिहिले आहे हे कळाले नाही . चेष्टेत लिहिले असेल तर ह्यॅ ह्यॅ ह्यॅ आणि सीरीयस्ली लिहिले असेल तर ... गेल्यावर्षी ( बहुतेक सप्टेंबर महिन्यातच ) आपली ह्या विषयावर चर्चा झाली होती तेव्हा मी जे म्हणालो होते तेच परत सांगतो : संदेह हेचि अज्ञान | निषेश तुटला तेचि ज्ञान | निसःदेही समाधान | होये आपैसे || श्रीराम || फक्त हा एक संदेह , की मी अजुनही अपुर्ण आहे , संपवला की सुटलोच की !!पाहिले तर खुप सोप्पे आहे ... पाहिले तर खुप अवघड ! आता ह्या पेक्षा जास्त काय बोलु ?
यालागीं मौनेंचि बोलिजे । कांहीं नहोनि सर्व हो‍ईजे । नव्हतां लाहिजे । कांहीच नाहीं ॥ ३३ ॥ चां६५ ||
असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

:)

प्यारे१
Tue, 09/29/2015 - 18:54 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

“Never forget the glory of

यशोधरा
Tue, 09/29/2015 - 17:12 नवीन
“Never forget the glory of human nature! We are the greatest god. Christs and Buddhas are but waves in the boundless ocean which I AM.” - Swami Vivekananda
अफाट!! __/\_
  • Log in or register to post comments

रा चिं ढेरे

पैसा
Tue, 09/29/2015 - 21:14 नवीन
ढेरे यांच्या पुस्तकातले काही सन्दर्भ टायपायचे आहेत. मोबाइल वरुन कठीण आहे. मिपा नीट सुरु झाले की टंकते.
  • Log in or register to post comments

कित्ती अभ्यास करतात नै लोक !!

बिन्नी
Tue, 09/29/2015 - 21:17 नवीन
कित्ती अभ्यास करतात नै लोक !! ते ही वाद घालण्यासाठी !!!
  • Log in or register to post comments

तुमच्या कडुन अशा लिखाणाची अपेक्षा न्हवती...

द-बाहुबली
Wed, 09/30/2015 - 00:45 नवीन
सुखद धक्का दिलात.
  • Log in or register to post comments

मी दासबोध वाचलाय . चीड येते

तुडतुडी
Wed, 09/30/2015 - 12:25 नवीन
मी दासबोध वाचलाय . चीड येते त्यांचे स्त्रीयांबद्दल्चे आणि ब्राम्हणेतर लोकांबद्दल चे विचार वाचून . पत्नीला कधीही सखी समजू नये. तिच्याशी कुठलीही गुपितं शेअर करू नयेत .त्यांच्या स्त्रीच्या पतिव्रतेच्या कल्पना तर चिडच आणतात . इतरांनी ब्राम्हणांच ऐकावं . चुकीचं असलं तरीही . गुरु उच्चवर्णीयच असावा . काय आहे हे ?आणखीही काय काय असेल पण ह्याच्या पुढचा दासबोध वाचायची इच्छा नाही झाली . कुठली योगी , ब्रह्मज्ञान प्राप्त केलेली व्यक्ती असे उद्गार काढील काय ? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला कोणी ब्राह्मण तयार नवता . का तर ते क्षत्रिय नाहीत . रामदास स्वामी तयार होते . जिजाबाईंनी काशीहून गागाभट्टाना बोलावल पण रामदासांकडून राज्याभिषेक करून द्यायला नकार दिला . रामदासांनी रामांवर सुंदर काव्य रचली असतील . बलोपासनेच महत्व सांगितलं असेल , हनुमंताची मंदिरं बांधली असतील पण त्यांच्या योग्सामार्थ्याची , दैवी शक्तीची चुणूक कोणाला आल्याची माहिती उपलब्ध आहे काय ? तेव्हा सामान्य माणसाप्रमाणे रामदासांनीही खंडोबाला देव मानलं असेल तर त्यात आश्चर्य नाही .
हे तुमचे विधान कोणत्याही प्रकारे सिध्द होत नाही .
तो देव आहे हे हि सिद्ध होत नाही .
अद्वैत हेच संपुर्ण आर्य सनातन वैदिक धर्माचे सार आहे आणि म्हणुनच केवळ खंडोबाच नव्हे तर मणी मल्ल बानु म्हाळसा आणि अगदी तुम्ही , आम्ही सारेच देव आहोत !!
yes . एकदम correct .मग मणी , मल्लाची आणि आपली सुधा मंदिरं बांधली गेली पाहिजेत . आपल्या नावाने पण उपासना सुरु झाल्या पाहिजेत . आपणही जोडीदाराला सोडून एकापेक्षा अनेक लग्न केली तर व्यभिचार न मानता देव म्हणून आपल्यालाही सूट मिळाली पाहिजे . आपल्या नावानेही कोंबडी , बकरी कापली गेली पाहिजेत . ताली भरण्यासारख्या अर्थहीन प्रथा आपल्या नावानेही केल्या गेल्या पाहिजेत नाही का . खिक
  • Log in or register to post comments

___/\___ एक साथ नमस्ते!

प्यारे१
Wed, 09/30/2015 - 12:29 नवीन
___/\___ एक साथ नमस्ते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

बापरे!

पैसा
Wed, 09/30/2015 - 13:12 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

समर्थ रामदास चमत्कार करणारे

विवेकपटाईत
Wed, 09/30/2015 - 19:27 नवीन
समर्थ रामदास चमत्कार करणारे नव्हते. ज्या काळात देवस्थाने उध्वस्त होत होती, त्यांनी देवळे बांधली हनुमंताची. हनुमंत प्रमाणे बलिष्ठ होण्याचे सामर्थ्य महाराष्ट्रातल्या जनतेला दिले. त्यांची तुलना फक्त आजच्या रामदेव बाबाशी होऊ शकते. स्वत: समर्थ बना, चमत्कार होत नाही, घडवावे लागतात. समर्थांनीहि चमत्कार घडविले आणि बाबा रामदेवांनीहि. आज काही मराठा नेता समर्थांचे योगदान नाकारतात आहे, उद्या भाजपवाले, त्यांच्या विजयात रामदेवांचा काही वाटा होता, याला नकार देण्याची संभावना नाकारता येत नाही. (खरे धार्मिक लोक चमत्कारांवर विश्वास ठेवीत नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुडतुडी

मूळ लेखातील आशयापासून अवांतर

प्रसाद प्रसाद
Wed, 09/30/2015 - 14:49 नवीन
मूळ लेखातील आशयापासून अवांतर – नुकतेच श्री रा. चिं. ढेरे यांनी खंडोबावर लिहिलेले संशोधनात्मक पुस्तक वाचले. त्यांनी केलेल्या संशोधनानुसार मैलार आणि माळव्व अथवा माळज अथवा मालचि अर्थात म्हाळसा ह्या मुळच्या कन्नड देवता आहेत. त्यासंबंधीचे शिलालेख कर्नाटकात १० ते ११ व्या शतकापासून सापडतात. मात्र ह्या देवता स्वतंत्र असून एकमेकांशी काही संबंध त्या काळात नव्हता. नंतर कोणी महाराष्ट्रीयाने खंडोबाचा आणि मैलाराचा संबंध जोडून हे दोन्ही देव एकच असे गृहीत धरून मैलाराला खंडोबा ऊर्फ मल्लारी ऊर्फ मार्तंड भैरव केले आणि मल्लारीमहात्म्य या नावाने चरित्र लिहिले, चरित्र कर्त्याने सदर कथा ब्रह्मपुराणातील असल्याचा भास निर्माण केला आहे. मुळत: कर्नाटकातील माळव्व ही देवता मैलारापेक्षा उच्च श्रेणीतील. देवतांचे उन्नयन (ढेरेंचा शब्द) होण्याच्या प्रक्रियेत म्हणजे स्थानिक देवता ते सर्वमान्य, कुलदेवता स्थित्यंतरात महाराष्ट्रात खंडोबा आणि म्हाळसा पती पत्नी झाले. साधारणत: १२ व्या शतकाच्या पुढे खंडोबा महाराष्ट्रात आला, पण सर्वमान्य होण्यासाठी १६ वे शतक यावे लागले. कबिरांसारखे श्रीगोंदेकर मुस्लीम संत श्री शेख मुहम्मद यांनी तसेच संत एकनाथांनी खंडोबासारख्या कनिष्ठ देवतेची पूजा, उपासना केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मल्लू खान, अमजत खान अशा मुस्लीम नावानेही हा देव ओळखला जातो. वरील मते श्री रा. चिं. ढेरे यांची असून मला जसे आठवते ते लिहिले आहे. ढोबळ चुका असू शकतात. पटाईत साहेब आपला लेख उत्तम आहे. झी मराठी वरची सिरीयल बघताना ज्या प्रकारे म्हाळसा रंगविली आहे (बऱ्याच पुराणांचा/कथांचा अभ्यास करून ही व्यक्तिमत्वे लिहिली आहेत म्हणे) आणि जी पार्वतीचा अवतार आहे (म्हणे), तिचे एकूण व्यक्तिमत्व आणि वागणे बघून सासू-सुनांच्या मालिकेतल्या खुनशी सासू–सुना बऱ्या वाटतात. खंडोबा महानियती शिवाय बोलत नाही, बहुतेक कोठारेनी लेखकाला सांगितले असावे, ठराविक एपिसोड नंतर महानियतीची टेप वाजवलीच पाहिजे! देव कितीही मोठा असला तरी त्याचे भक्तच त्याला खाली खेचतात की काय असे ह्या मालिका आणि ज्यावरून ह्या मालिका घेतल्या अशी पुराणकारांविषयी शंका येते. आपण जे लिहितो/दाखवतो त्यामुळे आपण ज्याचे चरित्र लिहितोय/दाखवतोय त्यांना खालुतेपणा येतोय हे कळत नसेल का?
  • Log in or register to post comments

पुस्तकाचे नाव

कपिलमुनी
Wed, 09/30/2015 - 16:41 नवीन
पुस्तकाचे नाव कळेल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद प्रसाद

दक्षिणेचा लोकदेव-खंडोबा

प्रचेतस
Wed, 09/30/2015 - 16:51 नवीन
दक्षिणेचा लोकदेव-खंडोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

प्रसाद प्रसाद. अगदी असंच मी

तुडतुडी
Wed, 09/30/2015 - 16:55 नवीन
प्रसाद प्रसाद. अगदी असंच मी त्या पुस्तकात वाचलं आहे . पण ते ढेरेंच पुस्तक नवतं . 'लोककथेतील देव ' असं काहीतरी पुस्तकाचं नाव होतं बघा . त्यात चित्रांसकट पुरावे दिले होते . सकाळ मध्ये सुधा काही वर्षांपूर्वी असाच एक लेख आला होता . त्यात पुस्तकाचा संदर्भ नवता पण लेख अभ्यासपूर्ण होता . १२ वर्षं झाली तरी जय मल्हार मधला गणेश तेवढाच छोटा आहे .त्याला मोठं नं होण्याचा आजार झालाय का ? खिक . शंकरांना नुसतं गंगाधर म्हणलं म्हणून पार्वती एकदा संतापून कैलास सोडून गेल्याचं कुठतरी वाचलं होतं . ती त्यांना सांगेन होय दुसर्या बाईशी लग्न करायला . कैच्या कै
  • Log in or register to post comments

तुडतुडीताई,

तर्राट जोकर
Wed, 09/30/2015 - 17:04 नवीन
तुडतुडीताई, हिंदूंनी देव कोणाला मानावे किंवा मानू नये याचेही फतवे निघतात का? तुमच्या मते सिद्ध झालेले देव कोणते आणि कसे याची यादी देता काय? नाही म्हणजे खात्री करून पुजा करावी म्हणतो आम्ही.
  • Log in or register to post comments

हा हा हा...काय गंमत आहे बघा

याॅर्कर
Wed, 09/30/2015 - 17:19 नवीन
दुसर्या धाग्यावर आम्हाला हिंदूविरोधी आयडी म्हणून डिवचायचं आणि इकडे स्वतःमात्र समर्थ आणि खंडोबाला हिणवायचं...... म्हणजे काय म्हणायचे? तुडतुडीबाईंना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

रा चिं ढेरे

पैसा
Wed, 09/30/2015 - 20:16 नवीन
रा.चिं.ढेरे यांची लोकदैवतांचे विश्व, आनंदनायकी, लज्जागौरी वगौरे पुस्तके माझ्या संग्रही आहेत. त्यातून त्यांचे भारतभरच्या देवतांची माहिती घेऊन केलेले संशोधन आपल्यासमोर येते. त्यासाठी त्यांनी अनेक लोककथा, प्रथा, देवळे, मूर्ती इ. चा पद्धतशीर अभ्यास करून आपले निष्कर्ष मांडले आहेत. मुख्य भाग याप्रमाणे: आदिम रहिवाशांचे देव हे निसर्गातले होते. त्यातही जनन करणारी माता ही खूप महत्त्वाची होती. भूमी ही आईच्या स्वरूपात पुजली गेली. भूमी म्हणजे क्षेत्र. आणि त्या क्षेत्रात बीज आरोपण करणारे ते क्षेत्रपाळ. असे क्षेत्रपाळ सर्व भारतभर होतेच. वारुळाच्या स्वरूपात ही भूमी बर्‍याच ठिकाणी पुजली जात होती. तिला मग लज्जागौरी, रेणुका, यल्लामा, एकवीरा इ. नावे ठिकठिकाणी मिळाली. त्याच्या कथा त्यांनी दिल्या आहेतच. तर मुरुगन हा दक्षिणेतला प्रमुख क्षेत्रपाळ. तसेच महाराष्ट्रात भैरोबा, रवळनाथ, जोतिबा, खंडोबा वगैरे. दक्षिणेत हे सगळे क्षेत्रपाळ स्कंद स्वरूप पावले. खंडोबा हा स्कंद चा अपभ्रंश दिसतो. मुरुगन आणि स्कंदाच्या दोन बायका, मुरुगनने खंडोबाप्रमाणेच धनगरांपैकी असलेल्या दुसर्‍या बायकोचा अनुनय करून तिला जिंकून घेणे इ. प्रचंड साम्यस्थळे सर्व कथांमधे आहेत. षष्ठी हीच सटवाई/यमाई स्कंदाची दुसरी पत्नी मानली गेली. स्कंद षष्ठी लाच खंडोबाचा उत्सव असणे (चंपाषष्ठी) इ. पुरावे ढेरे यांनी वापरले आहेत. या सर्व लोकदैवतांचे संस्कृतीकरण करताना त्यांची नावे आणि कार्ये हळूहळू बदलत गेली. आर्यांचा रुद्र आणि संहारक स्वरूपामुळे तसेच शिवाच्या गणात सामील करणे सोपे असल्याने हे सर्व क्षेत्रपाळ शिवस्वरूप पावले. ही सर्व आपल्या पिढीतही चालू असलेली प्रक्रिया आहे. गोव्यातल्या चंद्रेश्वर भूतनाथ स्थानाबद्दल एका पुजार्‍याला विचारले तर महादेवाचे तांबडी सुर्ला आणि कुर्डी ही गोव्यातील दोनच देवळे खरी महादेवाची. बाकी सगळे मुळात क्षेत्रपाळ असे त्याने सांगितले होते. आदिम आणि आर्य/संस्कृत देवतांच्या एकीकरणाची ही प्रक्रिया फक्त शिवगणांपुरतीच मर्यादित नाही. खंडोबाची पत्नी म्हाळसा समजली गेली. तिचे कानडी नाव मळव्वा. या नामातील त्यातील मूळ धातु मले. याचा अर्थ मोहवणारी. त्यावरून तिला विष्णूचा एक अवतार मोहिनीस्वरूप दिले गेले. गोव्यातही महालसा मोहिनीस्वरूप असल्याचे मानले जाते. नेवाशाची म्हाळसा ही मोहिनीस्वरूप आहे. म्हणजे ती विष्णुच्या परिवारातही सामील करून घेण्यात आली. त्यातही मोहिनी स्वरूप हे पुरुषाने घेतलेला स्त्री अवतार असल्याने स्त्री दैवते आणि पुरुष दैवते ही पुन्हा एकच असल्याचा संकेत मिळतो. म्हणूनच विष्णुला मोहिनीराजा नाव मिळाले. एकेकाळी शैव आणि वैष्णव हे आपसात भयंकर वैरभाव बाळगून होते. त्यांना एक करण्यासाठी मग खंडोबाचा प्रधान विष्णु होता, भगवान शंकर रामभक्त होते. राम हा शंकराचा भक्त होता. इ कथा रचल्या गेल्या. या सगळ्याचा हेतू सर्व विखुरलेल्या लोकांना एकत्र करणे हाच होता. गौडपादाचार्यांचे अद्वैत मत या एकत्रीकरणासाठीच अस्तित्वात आले असावे.
  • Log in or register to post comments

व्वा! दंडवत घ्या पैसाताई!

मांत्रिक
Wed, 09/30/2015 - 20:25 नवीन
व्वा! दंडवत घ्या पैसाताई! कृपया लोकदेवतांवर एखादा स्वतंत्र धागा काढा ही नम्र विनंती! खूप आवडेल वाचायला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

एकेकाळी जे घडायचे ते घडून

द-बाहुबली
Wed, 09/30/2015 - 20:30 नवीन
एकेकाळी जे घडायचे ते घडून गेले... पण या चालुकाळी अमिशने शिवा ट्रिलॉजी रचुन सगळे पौराणीक स्टफ रिलोडेडे केले आहे त्याला काही तोड आहे का ? त्या पांचटपणावर का चर्चा अजुन घडली नाही या मिपावर ? तुडतुडी प्लीस तेक नोट ऑफ धिस एंड स्टार्ट अ न्यु थ्रेड ऑबॉट लाइफ अंड लाइज ऑफ अमिश फॉर शिवा ट्रिलोजी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

इथे उद्देश फक्त सत्य समोर

तुडतुडी
Mon, 10/05/2015 - 14:19 नवीन
इथे उद्देश फक्त सत्य समोर मांडण्याचा आहे .विनाकारण कोणाला हिंवायचा नाही . खंडोबा, येडोबा ,म्हसोबा ,चांदोबा हे हिंदू देव मानले गेलेले असले तरी 'मानण्यात' आणि 'असण्यात ' फरक असतो . मला हिंदू असल्याचा अभिमान आहे किवा हिंदू धर्माविषयी कळकळीने बोलत असते ह्याचा अर्थ हिंदू धर्मातल्या चुकीच्या गोष्टींना पण माझा पाठींबा आहे अस नाही . आणि तुम्ही नेमका हाच तुम्ही गैरसमज करून घेतलाय . मला फक्त एवढंच म्हणायचं होतं कि हिंदूंमध्ये चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टी आहेत पण काही लोक 'हिंदू धर्मात प्रत्येक गोष्ट वाईट आहे असा गैरसमज पसरवत असतात . ' माझा आक्षेप त्याला आहे . असो . कर्नाटक मध्ये बिदर जवळ 'मैलार' नावाचं गाव आहे . हे गाव 'भूताचं गाव' म्हणून ओळखलं जातं . इथे सुर्योदायाआधी आणि सूर्यास्तानंतर कोणालाही थांबण्याची परवानगी नाही .आजूबाजूला घरं किवां दुकानं वगेरे बांधायला परवानगी नाही . ज्या काही लोकांनी तपासून बघण्याचा प्रयत्न केला त्यांना अनुभव आले म्हणे . ह्या गावाची ग्रामदेवता 'खंडोबा' किंवा मैलार .म्हणूनच ह्याचं सत्य माहित असलेल्यांनी त्याची 'क्षुद्र' म्हणून भलावण केली आहे
चालुकाळी अमिशने शिवा ट्रिलॉजी रचुन सगळे पौराणीक स्टफ रिलोडेडे केले आहे त्याला काही तोड आहे का
हल्ली लोकांना शिवा ट्रिलॉजी सारखं मसालेदार आणि मनोरंजक हवं असतं . मग देवावर विनोदी , कार्टून किवा मग कैतरी मनोरंजनात्मक गोष्टी निघतात . अमिशचा अध्यात्मिक अभ्यास काय ? त्याची अध्यात्मिक लायकी काय ?whats ap , फेसबुक ,कॉम्पुटर , tab मध्ये रमलेल्या आणि धर्मशास्त्राचा , अध्यात्माचा काहीही अभ्यास नसणाऱ्या आजच्या पिढीला हे पुस्तक भावणार हे आमिष ने हेरलं .तुमच्यासारखे लोक ते डोक्यावर घेणार आणि त्यातलंच खरं मानणार हे दुर्दैव त्याला माहीतच आहे .कारण हिंदू अध्यात्म्शास्त्रातला 'शिव' तुम्हाला माहित नाही हे आमिष ला माहित आहे.त्याने जे लिहिलंय त्याला आधार , पुरावा काही आहे का ? खर तर ह्या पुस्तकांवर बंदी घातली जायला हवी . पण तुमच्यासारख्या लोकांमुळे ती घालता येत नाही
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा