पिढ्यांमधल्या धार्मिकतेतील बदल - कौलाचं विश्लेषण
भारतीय समाजाची मनोवृत्ती ही कायमच धार्मिक राहिलेली आहे. निरनिराळ्या रुढी, परंपरा आजही अत्यंत प्रेमाने आणि जिव्हाळ्याने पार पाडल्या जातात. त्यात अनेक कर्मकांडांचा समावेश आहे. सण साजरे करणं, दिवाळीसारख्या उत्सवात जल्लोष करणं, गणपती बसवणं, दुर्गापूजा करणं या अनेक सामाजिक सांस्कृतिक गोष्टींना धार्मिक, पौराणिक कथांचा आधार आहे. वैयक्तिक पातळीवरदेखील बारसं, मुंज, लग्न, मरण, तेरावं, श्राद्ध यासारख्या महत्त्वाच्या प्रसंगीदेखील धार्मिक संस्कार करून त्यांचं पावित्र्य जपण्याचा प्रयत्न होतो. यापलिकडे हरताळकेसारखं व्रतं, वेगवेगळ्या देवदेवतांच्या नावांनी बोलले जाणारे नवस, चालणारे उपासतापास या सगळ्यांतूनही 'अमुक देवाला साकडं घातलं, तपश्चर्या केली की माझं भलं होईल' असा दृढ विश्वास आणि श्रद्धा दिसून येते. गेली शेकडो वर्षं या ना त्या प्रकाराने हे सर्व कमी अधिक प्रमाणात चालू आहे. या सर्व परंपरा, रुढी हे भारतीय समाजमनाचं एक मोठं अंग आहे.
या सामाजिक रुढीपरंपरांबरोबच वैयक्तिक धार्मिक स्वभाव, श्रद्धा, देवाची उपासना करण्याची मानसिक ओढ किंवा गरज हाही एक सहज न दिसणारा भाग आहे. नियमाने पूजा करणं, देवळात जाणं, मुलांवर विशिष्ट संस्कार करताना देवाचं नाव घेणं या स्वरूपात तो स्वभाव घराघरातून दिसतो. पावित्र्याची कल्पना, पापपुण्याची कल्पना, आपल्याला सद्गती मिळण्याची इच्छा ही त्यामागे असते. तसंच आपल्या हलाखीच्या परिस्थितीपुढे येणारी हतबलता आणि त्यातून देवाला, सर्वोच्च शक्तीला शरण जाऊन 'तूच माझं रक्षण कर रे बाबा' म्हणण्याची गरजही कारणीभूत आहे.
थोडक्यात, आपल्याला दिसणाऱ्या धार्मिकतेची ही दोन अंगं आहेत - एक सामाजिक, सार्वजनिक तर दुसरी वैयक्तिक. वैयक्तिक धार्मिकता जिथे अधिक आहे तिथेच सामाजिक, जाहीर स्वरूपात ती दिसणार हे 'यत्र वह्निस्तत्र धूम्रः' या न्यायाने उघड आहे. मात्र सध्या भारतात सामूहिक धार्मिकतेला उधाण आलेलं दिसतं. शहराशहरांतून प्रत्येक उत्सव धूमधडाक्याने डॉल्बी भिंतींसकट साजरा होतो. गोविंदाच्या हंड्यांसाठीचे थर दरवर्षी वाढताना दिसतात. महाराष्ट्रीय सण कमी पडले की काय म्हणून दांड्यारास, कडवाचौथ वगैरे इतर राज्यांमधले सणही साजरे होताना दिसतात. हे जे चित्र दिसतं त्यामागे नक्की काय कारण आहे? गेल्या वीसपंचवीस वर्षांत अचानक धार्मिक मानसिकता वाढलेली आहे का, की जेणेकरून आग वाढली त्यामुळे आगीतून येणारा धूरही वाढला? की यामागे इतर कारणं आहेत? हे तपासण्यासाठी मी १२ सप्टेंबर २०१५ ला एक सर्वेक्षण घेतलं. त्यात लोकांना विचारलेला प्रश्न असा
"तुमचे आईवडील तुमच्यापेक्षा अधिक धार्मिक होते की कमी धार्मिक होते?" ते उत्तर देण्यासाठी १. बरेच धार्मिक २. मध्यम धार्मिक आणि ३. कमी धार्मिक असे तीन गट केले. व स्वतः व आईवडील कुठल्या गटांत बसतात ते सांगायला सांगितलं.
सर्वप्रथम सर्वेक्षणाच्या मर्यादेविषयी. हे सर्वेक्षण मी 'ऐसीअक्षरे.कॉम' आणि 'मिसळपाव.कॉम' या दोन मराठी संस्थळांवर घेतलं होतं. या संस्थळांवर वावरणारे लोक हे संपूर्ण भारतीय समाजाचे प्रतिनिधी नव्हेत. किंबहुना सुशिक्षित/उच्चशिक्षित, खाऊनपिऊन सुखी, कॉंप्युटर व इंटरनेट मध्ये प्रवीण, बुद्धिजीवी असा मर्यादित लोकगट आहे. दुष्काळाने होरपळलेला शेतकरी, किंवा झोपडपट्टीत राहाणाऱ्या व्यक्ती, अशिक्षित अर्धशिक्षित कामगारवर्ग असा मोठा समूह त्यातून वगळलेला आहे. त्यामुळे त्यातून निघणारे निष्कर्ष त्या गटापुरतेच लागू आहेत. हे जरी खरं असलं तरी या गटातल्या लोकांचं या सर्वेक्षणातून निर्माण होणारं चित्र डोळे उघडणारं आहे.
एकूण ४९ लोकांनी सर्वेक्षणात भाग घेतला. 'ऐसीअक्षरे.कॉम' वरून ३८, तर 'मिसळपाव.कॉम' वरून ११. हे आकडे कमी असले तरी दोन वेगवेगळ्या संस्थळांवर मिळणारे निष्कर्ष हे बऱ्यापैकी मिळतेजुळते आहेत. त्यावरून प्राथमिकदृष्ट्या विश्वासार्ह असावेत अशी मला आशा आहे. या एकोणपन्नास लोकांनी 'आईवडील १ मी २' या स्वरूपाची उत्तरं दिली. याचा अर्थ आईवडील बरेच धार्मिक, तर मी मध्यम धार्मिक. पिढीमधला बदल मोजण्यासाठी मी या आकड्यांची वजाबाकी केली. २-१ = १ याचा अर्थ या घरासाठी या पिढीत धार्मिकता थोडी कमी आहे. जर उत्तर 'आईवडील १ मी ३' असं असतं तर ३-१ = २ याचा अर्था घरासाठी या पिढीत धार्मिकता बरीच कमी आहे. जर या वजाबाक्या ऋण असत्या म्हणजे -१ किंवा -२ असत्या तर या पिढीत धार्मिकता थोडी जास्त किंवा बरीच जास्त असं म्हणता येईल. मुख्य हेतू विशिष्ट गटात कुठल्या पिढीत किती लोक आहेत हे तपासण्यापेक्षा प्रत्येक घरात होणारा असा बदल, किती प्रमाणात, किती घरांत दिसतो हे तपासून पाहाण्याचा प्रयत्न आहे. त्याचा आलेख खाली दिलेला आहे.
सर्वात प्रथम हे दिसून येतं की 'आपण आईवडिलांपेक्षा थोडे किंवा बरेच कमी धार्मिक आहोत' असं म्हणणारांचं प्रमाण सुमारे ७१ टक्के आहे. याउलट 'आपण आईवडिलांपेक्षा थोडे किंवा बरेच अधिक धार्मिक आहोत' असं म्हणणारांचं प्रमाण फक्त ६ टक्के आहे. त्यातही ज्यांनी 'आईवडिलांइतकेच धार्मिक' असं म्हटलेलं आहे त्यातल्या सुमारे निम्म्यांनी 'आईवडिल नास्तिक, आम्हीही नास्तिकच' असं म्हटलं आहे. म्हणजे सर्वेक्षणात भाग घेणारे सुमारे ८५% लोक हे स्वतः नास्तिक किंवा आईवडिलांपेक्षा कमी धार्मिक आहेत. हा फारच प्रचंड मोठा आकडा आहे. स्वतःला अत्यंत कमी धार्मिक किंवा नास्तिक म्हणवणारांची संख्याही प्रतिसादांमधून जाणवते - हा आकडा सुमारे ८०% आहे.
कुठल्याही पद्धतीने बघितलं तरी या सर्वेक्षणातून काही निष्कर्ष दिसून येतात. सर्वेक्षणात भाग घेणारांमध्ये -
१. बहुतांश नास्तिक किंवा रोजच्या जीवनात धर्माला कमी महत्त्व देणारे आहेत
२. फार मोठ्या प्रमाणात घरांमध्ये आईवडलांपेक्षा मुलं कमी धार्मिक आहेत.
३. आईवडलांपेक्षा अधिक धार्मिक असणारांची संख्या नगण्य - सुमारे ६ टक्के आहे.
हे सर्व एकत्रितपणे पाहिलं तर आपल्याला अचंबा वाटणारं चित्र निर्माण झालेलं दिसतं. बाहेर भारतीय समाजात धर्माचे सोहळे वाढलेले दिसतात, मात्र या गटात वैयक्तिक पातळीवर धर्माचं महत्त्व कमी झालेलं आहे. धूर बराच वाढलेला दिसतो, पण जवळ जाऊन बघावं तर काही ठिकाणी तरी आग कमी झालेली, विझत आलेली दिसते. मग या सगळ्याचा अर्थ कसा लावावा? एक शक्यता अशी आहे की या सर्वेक्षणाला काही मर्यादा आहेत, त्यामुळे त्याचे निष्कर्ष सरसकटपणे सर्व समाजाला लागू पडत नाहीत. या मर्यादा आपण जरा खोलात जाऊन तपासून पाहू.
१. हे सर्वेक्षण एका अत्यंत लहान गटाचं आहे - ही सर्वात गंभीर मर्यादा आहे आणि सुरूवातीलाच ती मान्य केलेली आहे. मात्र हा गट नक्की किती लहान आहे याचा आपण अंदाज घेऊन पाहू. हा गट आहे सुशिक्षित, इंटरनेटमध्ये प्रवीण, खाऊनपिऊन सुखी, मुख्यत्वे शहरांत राहाणारांचा, आणि मुख्य म्हणजे तरुण म्हणता यावं अशा लोकांचा. आता भारतात सध्या ७५ टक्क्यांच्या आसपास साक्षरता आहे. पण तरुणांमध्ये हे साक्षरतेचं प्रमाण बरंच जास्त आहे - २०१५ सालची आकडेवारी पाहिली तर ९०%. म्हणजे गेली पिढी सुमारे ५०% साक्षर आणि आजची पिढी सुमारे ८५-९०% साक्षर - अशा गोळाबेरजेतून हा आकडा येतो. उच्च शिक्षणाबाबत तर गेल्या पिढीत आणि आजच्या पिढीत फारच तफावत आहे. एकंदरीत भारतात सुमारे २० ते २५% लोक कॉलेज पूर्ण केलेले असावेत. त्यातले बहुतांश आजच्या पिढीत. तेव्हा सुशिक्षितांचा आकडा सुमारे २५%चा येतो. हेच बहुतांशी खाऊनपिऊन सुखी गटात आहेत. आणि यांच लोकांकडे कॉंप्युटर प्रावीण्य आहे. तेव्हा सर्वेक्षणात दिसणारा गट लहान असला तरी तो सुमारे २०% लोकांचा बनलेला आहे. आणि हे सांस्कृतिक, आर्थिक, वैचारिकदृष्ट्या वरच्या २० टक्क्यातले आहेत. त्यांचा आदर्श इतर करतात, त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आत्ता लहान स्वरूपात दिसणारे परिणाम हे जसजसा काळ जाईल तसतसे मोठ्या मोठ्या गटात दिसून येतील.
२. कदाचित या गटातही धार्मिक लोक असतील, पण त्यांनी मतं नोंदवली नाहीत - हेही शक्य आहे. त्यामुळे दिसणारे आकडे एवढे मोठे राहाणार नाहीत. मात्र असा प्रश्न उद्भवतो, की अशांनी मतं का नोंदवली नाहीत? जाहीर फोरमवर आपण कमी धार्मिक आहोत हे सांगायला लोकांना कमी लाज वाटते, तर अधिक धार्मिक आहोत हे सांगायला लाज वाटते का? तसं असेल तर तोही मुद्दा महत्त्वाचा आहे. या सुशिक्षित समाजात राहायचं असलं तर धार्मिकतेचा बडिवार कमी व्हायला हवा अशी सार्वत्रिक अपेक्षा त्यातून दिसून येते. तीस-चाळीस वर्षांपूर्वी 'आमच्या घरात पवित्रता जपण्याचे हे धार्मिक नियम आहेत' असं जेवढ्या ठासून सांगितलं जायचं तितकं आज त्या गटात सांगितलं जात नाही. पावित्र्य या कल्पनेची जागा स्वच्छता, सर्वसमावेशकता यांनी हळूहळू घेतली आहे की काय, असा प्रश्न पडतो.
३. सर्वेक्षणात भाग घेणारांची संख्या लहान आहे - जितके जास्त लोक भाग घेतील तितकं स्टॅटिस्टिक्स सुधारतं हे खरं असलं तरी ४९ हा आकडा अगदी लहान नाही. ५४० मतदारसंघात निवडणुकांचे निकाल काय येतील हे ठरवण्यासाठी सुमारे एक लाख लोकांचं सर्वेक्षण घेतलं जातं. म्हणजे प्रत्येक मतदारसंघासाठी फक्त २०० लोक. त्यातही या सर्व्हेचे दोन भाग दोन संस्थळांवर घेतले गेले. त्यांच्यात सर्वसाधारणपणे सारखीच आकडेवारी दिसली. त्यामुळे अशा अनेक संस्थळांवर कौल घेतला तरीही साधारण हीच आकडेवारी मिळेल याची शक्यता जास्त आहे.
यामागची कारणं काय असावीत?
१. शिक्षण - ब्रिटिशांनी जेव्हा भारतीयांना सिव्हिल सर्व्हिससाठी शिक्षण द्यायला सुरूवात केली तेव्हा ते शिक्षण घेणाऱ्या वर्गाला बाहेरच्या जगात काय चाललंय ते कळायला लागलं. लोकशाही, स्वायत्तता, नागरिकांचे अधिकार, राज्यपद्धती या गोष्टींबद्दल जागरुकता आली. त्यातून एक वैचारिक उत्थान झालं, आणि स्वातंत्र्यचळवळीला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली. तेच काहीसं मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यानंतर झालेलं आहे. त्याकाळी साक्षरतेचंच प्रमाण १० टक्क्यांच्या आसपास होतं. उच्चशिक्षित मोजकेच. आताच्या पिढीत साक्षरता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. आणि उच्चशिक्षितांचं प्रमाणही मोठं आहे. शिक्षणातून विज्ञानाची माहिती होते. पृथ्वी कशी जन्मली, तिचं या विश्वातलं स्थान काय, ती गुरुत्वाकर्षणाने सूर्याभोवती कशी फिरते, या व अशा गोष्टींसाठी सोपी वैज्ञानिक स्पष्टिकरणं मिळतात. मग जगात असलेल्या गूढांची संख्या कमी होते. या गूढांचं उत्तर देण्यासाठी गरज असलेल्या 'अत्त्युच्च शक्ती'चं महत्त्व कमी होतं. शिक्षणामुळे थोड्याफार प्रमाणात का होईना, वैज्ञानिक दृष्टिकोन मिळतो. त्यामुळे धार्मिकतेची गरज, विशेषतः कर्मकांडांची गरज कमी होते. हे भारतातच नाही तर इतरत्रही दिसून आलेलं आहे. गॅलप संस्थेने घेतलेल्या सर्व्हेमध्ये जसजसं शिक्षणाचं प्रमाण वाढतं तसतसं देवावरचा विश्वास, धर्माचं महत्त्व आणि धर्मातून जगाच्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यावरचा विश्वास कमीकमी होताना दिसतो.
२. आरोग्य - एके काळी भरमसाठ मुलं व्हायची आणि त्यातली बरीच अकाली मरायची. रोगराईच्या साथी यायच्या आणि धट्टीकट्टी कर्तबगार माणसं, हाताशी येणारी तरुण मुलं त्यात जायची. सदासर्वकाळ दुष्काळांतून पिचत पिचत, अर्धपोटी जगणं हे नेहेमीचं होतं. अशा दीन प्रसंगी देवाचा धावा करण्याची गरज न पडली तरच आश्चर्य. मात्र आता हे चित्र थोडं बदललेलं आहे. सहासात मुलं होण्याऐवजी दोनतीनच मुलं होतात. आणि ती जगतात. त्यासाठी तुटपुंज्या का होईना वैद्यकीय सुविधा आहेत. रोगराईच्या साथी म्हणजे देवाचे कोप वगैरे म्हणण्याची सोय नाही, कारण अनेक साथीच्या रोगांवर ताबा मिळालेला आहे. लोकांचं आयुर्मान वाढलेलं आहे. त्यासाठी देवाकडे धावा करणं किंवा पावित्र्य राखण्यापेक्षा स्वच्छता, ठीकठाक अन्न आणि वैद्यकीय मदत यावर अवलंबून राहाण्याकडे लोकांचा कल राहिलेला आहे. आणि या बदलाचे परिणाम दिसताहेत. म्हणून सुधारलेलं सामाजिक आरोग्य हे धार्मिकतेत घट येण्याचं एक अप्रत्यक्ष कारण आहे.
३. सुबत्ता - दरिद्री माणसाच्या आयुष्यात येणारी दुःखं निवारण्यासाठी लागणारा पैसा नसतो. त्यामुळे मुलाचं ऑपरेशन करता येत नाही, धनदांडग्यांची दडपशाही सहन करावी लागते. दारिद्र्य मोठ्या प्रमाणावर माणसाला हतबल करतं. आणि अशा गांजलेल्या व्यक्तीला देवाचा सहारा घ्यावासा वाटला तर काय नवल? दुर्दैवाने दारिद्र्य आणि अशिक्षितता हे हातात हात घालून जातं. त्यामुळे हे प्रश्न अधिकच बिकट होतात. गॅलपने घेतलेल्या मोठ्या सर्वेक्षणातही http://www.gallup.com/poll/142727/religiosity-highest-world-poorest-nations.aspx हेच दिसून आलेलं आहे. आशिया आणि आफ्रिकेतल्या गरीब देशांमध्ये ९० टक्क्यांवर लोक 'धर्म महत्त्वाचा आहे' असं सांगताना दिसतात. याउलट स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी, फ्रान्स, जपान वगैरे श्रीमंत देशांत फक्त १७ ते ४० टक्के लोक या प्रश्नाला हो असं उत्तर देतात.
४. जागतिकीकरण - जागतिकीकरणाचा फायदा सुशिक्षित, समृद्ध वर्गाला मोठ्या प्रमाणावर मिळाला आहे. भारताबाहेरचं जग प्रत्यक्ष बघून येणं या गटाला परवडू लागलेलं आहे, आणि नवीन संधीही उपलब्ध झालेल्या आहेत. इंटरनेटमुळे सगळं जगच हाताशी आलेलं आहे. यातून काही ना काही प्रमाणात या वर्गाचा परीघ विस्तारलेला आहे. जुनं उगाच जपत बसण्यापलिकडे नवीन, स्वतःला पटेल असं शोधण्याची प्रवृत्ती आणि संधीही वाढलेली आहे. त्यामुळे 'हरतालिका व्रत मी का बरं करावं?' असा प्रश्न विचारण्याची कुवत येते. इतर देशांतल्या तरुणी काही असं व्रत करत नाहीत, पण त्यांचं ठीकठाक चालू आहे की - हे स्वतःच्या डोळ्याने पाहाता येतं. या संस्कृतीच्या सपाटीकरणातून आपल्या वागणुकीतले कंगोरे घासले जातात. हेही एक कारण या वर्गात देवधर्म कमी करण्यामागे आहे.
५. वाढलेल्या संधी - एके काळी जेव्हा टीव्ही नव्हता, इंटरनेट नव्हतं, मोबाइल नव्हतं त्यावेळी लोकांकडे मनोरंजनासाठी साधनं कमी होती. त्यावेळी समाजातल्या मंडळींना एकत्र आणणारं धर्म हे एक महत्त्वाचं सोशल नेटवर्क होतं. लग्न, मुंजी, सत्यनारायण यांसाठी लोक हमखास एकत्र यायचे. रोज देवळांत जाणं, तिथे मैत्रिणींना भेटणं हा अनेक स्त्रियांसाठी हक्काचा वेळ असायचा. कारण त्यापलिकडे फारसं काही करण्यासारखंच नव्हतं. आज अशी अनेक सोशल नेटवर्क्स तयार झालेली आहेत, आणि त्यांमध्ये व्यक्त होण्याच्या वेगवेगळ्या संधी आहेत. त्यातही आपली आवड-निवड जिथे मिळतीजुळती आहे तिथे जाण्याचं आणि इतरत्र न जाण्याचं स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्यामुळे मी म्हणू शकतो की मी या फोटोग्राफीच्या ग्रुपवर जाऊन वेळ घालवेन. केवळ लोक भेटण्यासाठी मला भजनी मंडळात मारून मुटकून जाण्याची गरज नाही.
६. राजसत्ता-धर्मसत्ता चढाओढ - गेल्या साठेक वर्षांत जगाने लोकशाहीची प्रचंड वाढ होताना पाहिलेली आहे. त्यात एकाधिकारशाहीचा ऱ्हास होऊन विविध देशांत लोकशाहीची सुरूवात झालेली आहे. लोकशाहीत जनसामान्याला पटेल अशी सेक्युलर विचारसरणी स्वीकारणं आवश्यक ठरतं. त्यामुळे धर्मांतर्गत बाबी वैयक्तिक लोकांच्या हाती असल्या तरी शासकीय पातळीवर बऱ्यापैकी निधर्मी वागणूक दिसते. अभ्यासाची पुस्तकं लोकशाहीने ठरतात. त्यामुळे त्यातून एकाच धर्माचा संदेश देणं कमी होतं. हे कारण त्यामानाने गौण असावं असं वाटतं. मात्र गेल्या अनेक शतकांत धर्मसत्तेचा प्रभाव सर्वत्र जगभर कमी होताना दिसतो आहे हे मात्र खरं आहे.
७. विज्ञान/तंत्रज्ञानाचा प्रसार - गेल्या पिढीने ज्याची कल्पनाही केली नाही अशी इंटरनेट, कॉंप्युटर आणि मोबाइलसारखी यंत्रं आजच्या पिढीला सहज वापरता येतात. माहितीच्या विस्फोटामुळे टेस्ट ट्यूब बेबी, क्लोनिंग वगैरे शोधांची माहिती चटकन कळते, पसरते. जीवनिर्मितीसाठी देवाची गरज नाही यावर अधिक लोकांचा विश्वास बसतो. त्याहीपलिकडे 'आपलं आयुष्य आपल्या हाती आहे, आणि ते हाताळण्यासाठी नवीन आयुधं आहेत' यातून एक जगण्याविषयी आत्मविश्वास येतो. हा आत्मविश्वासही अप्रत्यक्षपणे देवाधर्माचं महत्त्व आयुष्यातून कमी होण्यासाठी काही प्रमाणात कारणीभूत असावा.
८. शहरीकरण - विसाव्या शतकाच्या सुरूवातीला भारतात मोठ्या शहरांच्या वाढीमुळे शिवाशीव, अस्पृश्यता हे प्रश्न शहरांपुरते गौण झाले. ट्रेनमध्ये बसताना आपल्या मांडीला मांडी लावून कोण बसला असेल हे सांगता येत नाही. हॉटेलात, रस्त्यावर खाताना ते अन्न कोणी बनवलं आहे याचा हिशोब ठेवता येत नाही. ऑफिसात कोण आपल्याबरोबर काम करतं आहे यावर फार ताबा ठेवता येत नाही. आर्थिक प्रगती साधायची तर ही बंधनं सोडून द्यावी लागली. आणि बहुतांशांनी थोड्या थोड्या तडजोडी करत ती सोडून दिली. याच शहरीकरणातून वैयक्तिक धर्माची उठबस कमी होते. कारण एके काळी प्रत्येक समाज जवळजवळ राहात असे, तसं आता इथे होत नाही. त्यामुळे वैयक्तिक कर्मकांडंही चार भिंतींच्या अजूनच आत गेली.
ही सर्वच कारणं सारखीच महत्त्वाची आहेत असं नाही. मात्र गेल्या पिढीपेक्षा आजची पिढी अधिक आरोग्यवान, समृद्ध, सुशिक्षित आहे हे नाकारता येत नाही. तिला असलेल्या नेटवर्किंगच्या संधी वाढलेल्या आहेत, जगाची तिला जास्त ओळख आहे. हातात इंटरनेट-मोबाइलसारखी आयुधं आहेत. कुठचीही माहिती मिळवायची असेल तर तिला ती चुटकीसरशी मिळू शकते. त्यामुळे कोणीतरी सांगितलेलं ऐकून घेण्यापेक्षा तिला स्वतः तपासून बघणं अधिक रुचतं. 'बाबावाक्यं प्रमाणं' हे मानायला ती तयार नाही. आणि जर शब्दप्रामाण्यावरचा विश्वास कमी झाला, तर धार्मिकता कमी होणं साहजिकच आहे.
या सर्वामुळे या सर्वेक्षणातून दिसणारे आकडे अचूक नसले तरी चित्र साधारण बरोबर आहे असं म्हणता येतं.
परिणाम
इंग्लंड व अमेरिकेसारख्या देशात धार्मिकता कमी झालेलीच आहे. अमेरिकेत नव्वदीच्या दशकाआधी फक्त चार टक्के लोक म्हणत 'मी निधर्मी आहे' - आता २३ टक्के लोक ते म्हणतात. इंग्लंडमध्ये चर्चमध्ये जाणारी लोकसंख्या वेगाने कमी होत जाते आहे, आणि तिचं सरासरी वय दरवर्षी वाढतंच आहे. याचा अर्थ चर्चमध्ये जाणारी वयस्क पिढी संपत चाललेली आहे, आणि तरुण लोक तिथे जात नाहीत. वरची कारणं तिथेही लागू आहेत. किंबहुना या प्रगत देशांमध्ये ती आधीपासून लागू आहेत म्हणून तिचा परिणाम आत्ताच दिसायला लागला आहे. भारतात हा परिणाम कधी दिसेल? मुळात दिसेल का? हा परिणाम काही काळाने भारतातही दिसू लागेल याबाबत मला बिलकुल शंका नाही. किंबहुना सुशिक्षित, समृद्ध वर्गात हे स्थित्यंतर दिसायला लागलं आहे हेच या सर्वेक्षणावरून सिद्ध होतं. किती वर्षं लागतील हाच खरा प्रश्न आहे. त्याचं उत्तर देणं सोपं नाही. सर्वसाधारणपणे आपण बऱ्याच बाबतीत अमेरिकेच्या सुमारे पन्नास वर्षं मागे आहोत - तेव्हा अजून सुमारे पन्नास वर्षांनी अगदी स्पष्ट दिसायला लागेल एवढंच भोंगळ उत्तर देता येतं.
पुढच्या पाच ते दहा वर्षांचं काय? इथे खरी रोचक परिस्थिती निर्माण होते. आपण पाहिलं की ३० कोटी लोकांकडे इंटरनेट आहे. त्याचा प्रसार अर्थातच वाढत जाणार आहे. चार वर्षांनी आत्ताच्या वयस्क पिढीतले चारेक कोटी लोक या जगात नसतील. हे अर्थातच मोठ्या प्रमाणावर अशिक्षित, गरीब - त्यामुळे जास्त धार्मिक. याउलट त्यांपेक्षा जास्त सुारे आठ ते दहा कोटी तरुण आपली नवी पिढी बनवतील. देशातलं शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं असेल. गेल्या काही वर्षांप्रमाणेच प्रगती होत राहिली तर समृद्धीचं प्रमाणही वाढलेलं असेल. अर्थातच आपला सध्याच्या सर्वेक्षणाचा जो सुमारे वीस टक्के वर्ग असेल तो वाढून पंचवीसेक टक्के झालेला असेल. म्हणजे मोठ्या प्रमाणावर धार्मिक असणारांची मतदारांमधून पाचेक टक्के घट - आणि मोठ्या प्रमाणावर अधार्मिक असणारांची मतदारसंघात दहा टक्के वाढ झालेली असेल. हा सुमारे पंधरा टक्क्यांचा स्विंग असेल.
सध्याचं भाजपाचं सरकार हे धर्म आणि विकास या दोन्ही डगरींवर पाय ठेवून निवडून आलेलं आहे. पण गमतीची गोष्ट अशी आहे की या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक नसून मारक आहेत. समृद्धी वाढली की धार्मिकता कमी होते. आणि विकास तर हवाच. आणि त्यासाठी हे सरकार निश्चितच कटिबद्ध राहील याची मला खात्री आहे. तसंही भारताने गेली दहा-पंधरा वर्षं सुमारे ७ टक्के विकासदर ठेवलेला आहे. तो किंचित वाढेल किंवा तेवढातरी निश्चित राहील. तोपर्यंत आपला समृद्ध, सुशिक्षित वर्ग पंचवीस ते तीस टक्क्यांपर्यंत वाढलेला असेल. आणि अशिक्षित धार्मिक वर्ग कमी झालेला असेल. या निवडणुकीत विकासाचं आवाहन आणि धार्मिकतेवरचा भर यांचा जो समतोल साधला होता, त्यापेक्षा अधिक झुकतं पारडं विकासाला पुढच्या निवडणुकीत द्यावं लागेल.
मला वाटतं हे चित्र मला दिसतं त्याहीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने भाजपाला दिसत असावं. 'विज्ञानावर आधारित नसलेल्या हिंदू परंपरा त्यागायला हव्या' या अर्थाचं जे विधान मोहन भागवतांनी केलं त्यामागे हीच जाणीव असावी.


वर्गीकरण
प्रतिक्रिया
मिपावर आलेल्या प्रतिसादांचा
असे सर्वेक्षण कुणी आजच्या
हा खरंच अभ्यास करण्यासारखा
यामध्ये तुर्कस्तान आणि
जगातल्या सर्वात धार्मिक पाच
निष्कर्षांची अभ्यासपुर्ण मांडणी.
नक्कीच अभिनंदन घासकडवींचे!!
संपादक मंडळाला विनंती. या
या आलेखचित्राची लिंक चुकीची
वरील प्रतिसादात मला आलेख
वेगळे चित्र.
+१
वैयक्तिक निरिक्षण.
ओके.
मी कर्मकांड नाही केली तरी
समाजातला एक ठिपका जो मिसळपाव
एकदम परफेक्ट बोललास प्यारे!
समाजातला एक ठिपका जो मिसळपाव
बेसिक व्याख्या वेगळ्या आहेत.
बेसिक व्याख्या वेगळ्या आहेत.
ज्ञानेश्वर महाराजांच्या काळी
उत्तम. निदान तिरकसपणा सोडून
धर्म अशा आज्ञा देत नाही.
सगळं मुसळ केरात गेलं.
अतार्किक
मिपावर येणाऱ्या सदस्यांना
हे सर्वेक्षण जरी
सर्वात प्रथम हे दिसून येतं की
म्हणजे सोप्या गोष्टी
तुलनेने सोपी भासणारी गोष्ट
छान विश्लेषण राजेश साहेब. पण
दुसरी बाजू
बरेच मुद्दे पटले नाहीत.
या अर्थाने धर्माचा पगडा
लढायची गरज नाही. समुपदेशनाची
लढतोयसचा अर्थ आपल्या सातारी
पण मला सांगा की, धर्मातील
गाडगेबाबांची मुलगी अत्यवस्थ
अनेक वेळा कपाळावर हात मारून
मूळ लेखातले बहुतेक मुद्दे आणि
धन्यवाद ताई! अगदी महत्वाच्या
नाही हो
ख्रिसमस म्हणा दिवाळी म्हणा -
हेच
दळण देवाचे
वाचक नाखुराजेश , मित्रा
जगाची निर्मिती- big bang
म्हणजे तुमाला तसे पुरावे मिळाले आहेत का?
अनेक दुवे आहेत. मात्र मी इथे
michael Cremo : forbidden archaelogy
मी वर म्हटल्याप्रमाणे, मी