मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिसळपाव शतशब्दकथा स्पर्धा: पहिल्या फेरीचा निकाल !

खेडूत · · स्पर्धा
शतशब्दकथा स्पर्धेचा पहिल्या फेरीचा संपूर्ण निकाल जाहीर करताना आनंद होत आहे. सर्वप्रथम आयोजकांनी परीक्षणासंबंधी विचारणा केल्यावर काहीसं दडपण आलं होतं. कारण मी आधी बऱ्याच शतशब्दकथा लिहिल्या असल्या तरी परीक्षणाचं काम आव्हानात्मक आणि नवीनच होतं. पण अन्य परीक्षक सोबत असणार- त्यामुळे बराच आधार वाटला. प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आणि वेल्लाभट हे अन्य दोघे परीक्षक आहेत. बाकी मिपाच्या कोणत्याही उपक्रमात सहभागी व्हायला आपल्याला सर्वांनाच आवडतं! निवडीचे निकष: शतशब्दकथा या नावातच स्पष्ट होत असल्याने १०० शब्द हा निकष तर होताच, पण त्याशिवाय खालील मुद्दे विचारात घेतले गेले: १. शुद्धलेखन २. विषय ३. मांडणी ४. संपूर्णता ५. सार सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने तीन नवे स्पर्धक निवडण्याचे ठरले. याशिवाय सीक्वल (उत्तरार्ध) लिहायचा या तयारीने आधीच ओढून ताणून धागेदोरे आणले नाहीत ना? याचाही विचार केला गेला. या प्रकारात एक मर्यादा येते, ती म्हणजे किस्सा आणि पूर्ण गोष्ट वेगळे करणे थोडे कठीण आहे. किंबहुना कथा दिली तरी ती निव्वळ कथाबीज वाटेल इतकी लहान होते. तरीही वरील निकष मुख्यत: ग्राह्य धरून सर्व परीक्षकांच्या मते प्रथम व द्वितीय क्रमांकासाठी समान मते पडल्याने व तिसरा स्पर्धक थोडासाच मागे असल्याने आयोजकांशी चर्चा करून या तिघांनाही विजेते म्हणून घोषित करत आहोत . सृजनचौर्य: निमिष सोनार येक रुपाया: चांदणे संदीप थोडक्यात वाचलो!: बहुगुणी पहिल्या फेरीचा संपूर्ण निकाल: वाचकांची मते आणि परीक्षकांची निवड, यानुसार अनुक्रमे खालील सहा स्पर्धक पुढील फेरीत दाखल झाले आहेत. त्यांनी उत्तरार्ध (अर्थातच १०० शब्दांत ) दिलेल्या वेळेत, म्हणजे ३० ऑगस्ट पर्यंत प्रकाशित करावा . शीर्षकात 'अंतिम फेरी' असा उल्लेख करावा. मृत्युन्जय (कथा: लोकमान्य) मधुरा देशपांडे (कथा: निकाल) प्राची अश्विनी (कथा: वन नाईट इन द ट्रेन) निमिष सोनार (कथा: सृजनचौर्य) चांदणे संदीप (कथा: येक रुपाया) बहुगुणी (कथा: थोडक्यात वाचलो!) या निमित्ताने नवीन लेखक लिहीते व्हावेत हा स्पर्धेचा मूळ उद्देश सफल झाला असेच म्हणावे लागेल. सर्वांचा सहभाग उत्साह वाढवणारा आहे. आपल्या काही सूचना असल्यास अवश्य सांगाव्यात. सर्व स्पर्धक लेखक - वाचक आणि प्रतिसादक यांचे खूप खूप आभार ! पुढच्या टप्प्यासाठी शुभेच्छा !! आता वाट पाहूयात दुसऱ्या भागातील उत्तरार्ध कथांची ……

वाचने 10328 वाचनखूण प्रतिक्रिया 45

श्रीरंग_जोशी गुरुवार, 08/20/2015 - 22:07
निमिष सोनार, संदीप चांदणे व बहुगुणी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. निकालात उल्लेखलेल्या सहा जणांच्या व इतरांच्याही सिक्वेल्सच्या प्रतिक्षेत.

चिगो गुरुवार, 08/20/2015 - 22:45
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.. बाकीचे स्पर्धकपण त्यांच्या शशक टाकू शकतात ना?

चिगो गुरुवार, 08/20/2015 - 22:49
सर्व विजेत्यांचे अभिनंदन.. बाकीचे स्पर्धकपण त्यांच्या शशक टाकू शकतात ना?

डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 08/20/2015 - 22:56
सर्व विजेत्यांचे, स्पर्धकांचे आणि स्पर्धेला भरभरून लिहिण्या-वाचण्या-प्रतिसादणार्‍या मिपाकराचे हार्दिक अभिनंदन !!! विजेत्यांनी दुसरी कथा (सिक्वेल) टाकताना, पहिली कथा कोट्समध्ये... {पहिली शशक} टाकून तिच्या खाली दुसरी कथा टाकली तर पहिलाचा संदर्भ सहज लागल्याने दुसरीची मजा अजून खुलून येईल.

अद्द्या गुरुवार, 08/20/2015 - 23:01
सर्व विजेत्यांचे अभिनंदन , आणि ज्यांनी ज्यांनी चांगल्या चांगल्या कथा लिहून आम्हा वाचकांना भरपूर आनंद दिला त्यांचेही अभिनंदन .

चांदणे संदीप गुरुवार, 08/20/2015 - 23:06
मिपाचे आभार! सर्व परीक्षकांचे तर विशेष आभार! सर्व स्पर्धकांचे आभार, ज्यांनी आधिक संख्येने भाग घेत स्पर्धेत रंगत आणली. सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन आणि पुढील फेरीसाठी शुभेच्छा! आता बास! सिक्वल लिहायला घेतो! काय लिहू या विचारात पडलेला ;) Sandy

एस गुरुवार, 08/20/2015 - 23:21
अभिनंदन, अभिनंदन...! सीक्वेल्सच्या प्रतीक्षेत. ह्या धाग्यात वरील शतशब्दकथांच्या धाग्यांचे दुवेही द्यावेत ही विनंती.

प्यारे१ Fri, 08/21/2015 - 00:24
थोडासा आश्चर्यजनक निकाल. काही कथा वेगळ्या धाटणीच्या आणि परिपूर्ण देखील होत्या. जास्त मतं असलेल्या कथांचा विचार केला गेला होता का? की तिकडे नंबर मध्ये आहे म्हणून इकडे नाही असं काही झालंय? अर्थातच निकाल मान्य आहे. आणि विजेत्या कथांच्या लेखकांचं हार्दिक अभिनन्दन (माझी कथा तेवढी भारी नव्हती त्यामुळे तिच्याबद्दल बोलत नाहीच्च. गैरसमज माझा नाही, इतरांचाही नसावा ही अपेक्षा. डोक्यात काही वेगळी नावं होती. असो!)

अभ्या.. Fri, 08/21/2015 - 00:26
निकाल काही पटला नाही. या तीन कथांना निकष कसे लावले गेलेत हेही कळले नाही. नव्या लेखकांना संधी हा नवीनच निकष कधी आणला अन कसा लावला तेही कळले नाही. सहभाग वाढवण्यासाठी म्हणून हे स्पर्धा अर्धी झाल्यावर का सांगताहात हेही कळले नाही. आधीच्या तीन नम्बरांचा निकाल पण असा घोळात लावला. तेथेही कशी सूट अन का ते कळले नाही. . बाकी स्पर्धकांचे अभिनंदन. लगे रहो.

In reply to by प्यारे१

बहुगुणी Fri, 08/21/2015 - 03:08
शत-शब्दकथा-विभागात नवीनच हो, तेही काठावरच पास झालोय! तेंव्हा राग तर सोडाच, आनंदच आहे :-) थोडक्यात वाचलो! आता उत्तरार्ध लवकरच टाकेन. (उद्यापर्यंत थांबायला हवं ना?) निमिष सोनार व संदीप चांदणे यांचे (आणि पुन्हा एकदा या आधीच्या तीन विजेत्यांचे) मनःपूर्वक अभिनंदन!

तुमचा अभिषेक Fri, 08/21/2015 - 00:54
सर्वच स्पर्धकांचे अभिनंदन.. विजेत्यांना पुढच्या राऊंडला शुभेच्छा.. काही शशकच्या सिक्वेलबद्दल उत्सुकता होती, त्यांनी नंबरात नसले तरी लिहाव्यात अशी ईच्छा आशा अपेक्षा.. मी स्वत: तरी लिहितोय बहुतेक :)

पिलीयन रायडर Fri, 08/21/2015 - 08:00
साधारणतः मतदान पद्धतीमध्ये अगदी पहिल्या तिनात नसल्या तरी आघाडीवर असणार्‍या कथांपैकीच कथा परीक्षकांनाही आवडतील असा अंदाज होता (म्हणुनच त्यांना सदस्यांकडुनही मतं मिळाली असणार..) पण निकाल अपेक्षेपेक्षा जरासा वेगळा लागला. असो.. विजेत्यांचे अभिनंदन...!! सिक्वलच्या प्रतिक्षेत..

कोमल Fri, 08/21/2015 - 08:09
"या निमित्ताने नवीन लेखक लिहीते व्हावेत हा स्पर्धेचा मूळ उद्देश सफल झाला असेच म्हणावे लागेल" --- सगळ्या जुन्या लोकांनी आपापल्या आयडीज् चा त्याग करुन नवे आयडी घ्यावे तरच यापुढे त्यांना संधी मिळतील अन्यथा त्यांना पेन्लटी.. 'कॉलेज मध्ये एन्ट्रंस ला चांगले गुण मिळूनही हव्या त्या शाखेला अ‍ॅडमिशन मिळत नाही आणि आपल्याच ओळखीतल्या एखाद्याला कमी गुण असूनही कोट्यामधुन तिथे जागा मिळते' असं काहीसं वाटतं आहे.

नूतन सावंत Fri, 08/21/2015 - 22:22
ज्या कथा बाद न ठरता तपासल्या गेल्या त्याची यादी मिळू शकेल का?म्हजे पहिल्याच प्रयत्नात कुठपर्यंत पोचले हे समजावे म्हणून ही विनंती करत आहे.

एस Fri, 08/21/2015 - 23:54
लोकांचा काहीतरी गैरसमज व्हायला लागलाय. >>>सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने तीन नवे स्पर्धक निवडण्याचे ठरले. याचा अर्थ असा की वाचकांच्या मतदानातील प्रथम तीन क्रमांकाच्या कथा वगळून इतर कथांमधून अजून तीन कथा निवडल्या गेल्या. म्हणजे परीक्षकांची आणि वाचकांची निवड एकच असल्यास एकूण सहा कथांना अंतिम फेरीत स्थान मिळावे यासाठी प्रथम तीन कथा वगळून परीक्षकांनी अजून तीन कथा निवडल्या. यात नवीन लेखकांना प्राधान्य वगैरेचा प्रश्नच येत नाही. या तीन कथा कोणत्या निकषांवर निवडल्या गेल्या ते स्पर्धेच्या व ह्याही धाग्यात सांगितलेले आहे. मिपावर अजून नवीन लेखकांनीही जुन्यांबरोबरच हिरीरीने लिहिते व्हावे हा स्पर्धेचा 'निकष' नसून 'उद्देश' आहे. अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करणे तसे सोपे नाही. ह्यामागे दीर्घकाळ चाललेल्या चर्चा आणि बर्‍याचजणांनी घेतलेले परिश्रम आहेत. तेव्हा काही त्रुटी राहून गेल्या असल्या तरी पुढील स्पर्धांमध्ये त्या दूर करण्याचा आवर्जून प्रयत्न होईल याची खात्री बाळगा. इथून पुढच्या अशा सर्वच स्पर्धांसाठी एक करता येईल की स्पर्धकांनी आपापल्या प्रवेशिका स्वतः प्रकाशित न करता संपादक मंडळाकडे व्यनिअसारख्या माध्यमातून पाठवाव्यात आणि संमंने सर्वच प्रवेशिका एकाच दिवशी स्पर्धकाचे नाव न देता प्रकाशित कराव्यात. मतदानाचा काआवधी संपल्यावर आणि निकाल जाहीर करतानाच मग ज्या-त्या स्पर्धकाचे नाव तिथेतिथे द्यावे. हेच छायाचित्रण स्पर्धांबद्दलही करता येईल. याचा फायदा म्हणजे क्वचित स्पर्धकाचे नाव पाहूनही मत दिले जाते असे कुणास वाटणार नाही. हे माझे वैयक्तिक मत आहे.

In reply to by एस

बहुगुणी Sat, 08/22/2015 - 01:18
इथून पुढच्या अशा सर्वच स्पर्धांसाठी एक करता येईल की स्पर्धकांनी आपापल्या प्रवेशिका स्वतः प्रकाशित न करता संपादक मंडळाकडे व्यनिअसारख्या माध्यमातून पाठवाव्यात आणि संमंने सर्वच प्रवेशिका एकाच दिवशी स्पर्धकाचे नाव न देता प्रकाशित कराव्यात. मतदानाचा काआवधी संपल्यावर आणि निकाल जाहीर करतानाच मग ज्या-त्या स्पर्धकाचे नाव तिथेतिथे द्यावे. हेच छायाचित्रण स्पर्धांबद्दलही करता येईल. याचा फायदा म्हणजे क्वचित स्पर्धकाचे नाव पाहूनही मत दिले जाते असे कुणास वाटणार नाही. +१

In reply to by बहुगुणी

विवेकपटाईत Sun, 08/23/2015 - 12:14
आहे तसेच ठीक आहे. मूळ उद्देश्य लोकांमध्ये लिहिण्याची आणि वाचण्याची अभिरुची जागृत करणे आहे. हार जीतच्या दृष्टीने आपण पाहू नये. वाचणार्यांना कथा आवडली म्हणजे झाले. वाचकांची आवड भिन्न भिन्न असते. जे मला रुचेल ते तुम्हाला रुचणे आवश्यक नाही. सारासार विचार करून परीक्षक निकाल लावतात. तो निकाल कुणाला आवडेल, कुणाला नाही हि आवडणार. बाकी नाव पाहून वाचक मते देतात. मला तरी वाटत नाही.

In reply to by एस

मोहन Sat, 08/22/2015 - 10:40
" पुढच्या अशा सर्वच स्पर्धांसाठी एक करता येईल की स्पर्धकांनी आपापल्या प्रवेशिका स्वतः प्रकाशित न करता संपादक मंडळाकडे व्यनिअसारख्या माध्यमातून पाठवाव्यात आणि संमंने सर्वच प्रवेशिका एकाच दिवशी स्पर्धकाचे नाव न देता प्रकाशित कराव्यात. मतदानाचा काआवधी संपल्यावर आणि निकाल जाहीर करतानाच मग ज्या-त्या स्पर्धकाचे नाव तिथेतिथे द्यावे. हेच छायाचित्रण स्पर्धांबद्दलही करता येईल. याचा फायदा म्हणजे क्वचित स्पर्धकाचे नाव पाहूनही मत दिले जाते असे कुणास वाटणार नाही." जोरदार सहमत.