Skip to main content

पुराणातील वांगी ?

लेखक Jack_Bauer यांनी सोमवार, 13/07/2015 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडील काही लोक हे आपल्या पूर्वजांनी काय केले याचेच कौतुक करण्यात मग्न असतात . आपल्या पूर्वजांनी केले असेल भले, पण त्याचा आपण काहीही उपयोग करून न घेता किंवा त्यात काही भर न टाकता नुसतेच बडबड करत बसण्यात काय अर्थ आहे ? मला अशा लोकांचं खरच आश्चर्य वाटत. दुसर्यांनी केलेली प्रगती किंवा शोध याचे कौतुक करून आपल्या भारतात हे का नाही करू शकलो ह्याचा विचार करण्याऐवजी "काय त्यात एवढं , हे तर भारतात १००० वर्षांपूर्वीच होत" अस म्हणण्यात कसला अभिमान ? आपण काही उदाहरणे बघू ज्यात अ म्हणजे एखादा शोध किंवा तंत्रज्ञान आणि ब म्हणजे वरील प्रकारच्या लोकांकडून आलेल्या प्रतिक्रिया व माझी प्रतिक्रिया : अ : अणूबॉम्बचा शोध ब : हें , आपल्याकडे आग्नेयास्त्र होत पूर्वी. महाभारतात वापर केला होता. कुरुक्षेत्रावर अजून काहीही उगवत नाही !!! मी : असू शकेल , पण आपण त्या तंत्रज्ञानाचा आजच्या वापरासाठी काय उपयोग केला ? आजही आपण अनेक शस्त्रास्त्रे रशियासारख्या देशाकडून आयात करतो आणि करोडो रुपये यावर दर वर्षी खर्च होतात . भारताच्या अणूविषयक कार्यक्रमासाठी युरेनियम बाहेरून आयात करतो , reactors आयात करतो. मग आपल्याकडील ह्या पूर्वजांकडील ज्ञानाचा नुसताच बढाई मारून काय फायदा ? अ : विमान ब: आपल्याकडे विमानाचा शोध प्रथम लागला , अमेरिकेत नाही . रामायणापासून उल्लेख आहे विमान वापरल्याचा . vimanas नावाची एक documentary पण आहे त्यावर. मी : ठीक आहे , पण आज आपल्या भारताची काय स्थिती आहे ? करोडो रुपये खर्चून आपण आज फ्रांसकडून विमाने विकत घेत आहोत. विमानाची technology जर आपल्याकडे आधीपासून होती तर पण आपण आज त्याचा आपल्या देशासाठी काय उपयोग करून घेतला ? अ : प्रोग्रामिंग ब : आपली संस्कृत प्रोग्रामिंगसाठी बेस्ट आहे असे नवीन संशोधन झाले आहे. आपल्याकडे हे आधीपासूनच आहे, हे C /C ++ वगैरे आत्ताच आहे. मी : आपण जे बोललात त्यातच सगळ आलं. संस्कृत हि आपली भाषा , ती प्रोग्रामिंगसाठी चांगली हे आपल्याला पाश्च्यात्त देशातील लोकांनी सांगितल्यावर आपल्याला कळते ? संस्कृत प्रोग्रामिंगसाठी वापरता येईल कि नाही तो भाग वेगळा , पण तिकडचे लोक आपल्या संस्कृतवर संशोधन करून जगाला सांगतात आणि आपण फ़क़्त हो हो बघा आम्ही किती भारी , आमची संस्कृत किती भारी असे म्हणत बसण्यातच धन्यता मानतो. मग तिकडचाच कोणीतरी त्यावर अधिक संशोधन करतो आणि patent मिळवून ते तंत्रज्ञान आम्हालाच विकतो. अ: शस्त्रक्रिया / एखादं नवीन मशीन किंवा तंत्र ब : आपल्या भारतात सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी अमुक तमुक इतकी अवघड शस्त्रक्रिया केली होती. आपल्या भारतात हि गोष्ट तेव्हापासूनच माहीत होती . हे इतक्या वर्षांनी शोधून काढलं या पाश्च्यात्त लोकांनी . मी : आपल्याला माहित होतं ना आधीपासून पण सध्या आपण त्याचा काय फायदा करून घेतोय ? आज भारत अनेक औषधे , मशिन्स , medical parts परदेशातून आयात करतो . operation करण्यासाठी डॉक्टरनी भारतीय part X रुपयांना आणी परदेशी पार्ट ८X रुपयांना असे सांगितल्यावर कितीतरी जण महाग असूनही परदेशी पार्ट वापरा असं सांगतात. कदाचित भारतीय पार्ट चांगला असेलही , पण quality बाबतीत तो विश्वास वाटत नाही. याची कारणे अनेक असू शकतील जसे कि परदेशी कंपन्यांचे aggressive मार्केटिंग वेगैरे पण शेवटी भारतातील पैसा बाहेर जातो आहे हे सत्य राहतेच. मग सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी अमुक तमुक इतकी अवघड शस्त्रक्रिया केली होती याचा आपल्याला सध्या काय उपयोग झाला ? मला भारताला किंवा आपल्याकडील प्रत्येक गोष्टींना नावं ठेवायची नाहीत. परवाची इस्रोची कामगिरी बघून खूप अभिमान वाटला. किती तरी अमेरिकन मित्रांना हे माझ्या भारतातील संशोधकांनी करून दाखवलं अस मी अभिमानाने सांगितलं. मोदींचा "स्वच्छ गंगा " प्रोजेक्ट , पूर्वीपासून आपण नद्यांना पूजनीय मानत आलो आहोत आणी आता तिच्या सफाईसाठी प्रयत्न करतो आहोत ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे अगदी सम्राट अशोकाच्या काळापासून चर खणणे, बांध घालून पाणी जिरवणे ह्या गोष्टी केल्या जायच्या, सध्या महाराष्ट्रात राबवली गेलेली "जलयुक्त शिवार योजना " आणी त्यामुळे वर्धा आणी नागपूर येथे मुबलक उपलब्ध झालेले पाणी हे चर खणणे, बांध घालून पाणी जिरवणे ह्यामुळेच शक्य झाले. आपल्याकडे असलेले पुराणातील ज्ञान आपण वापरून आज आपला उत्कर्ष कसा होईल हे पाहीले तर त्या ज्ञानाचा सदुपयोग झाला असे म्हणता येईल . दुसर्यांनी केलेल्या कष्टांमूळे लागलेले शोधांच क्रेडीट ज्याचं त्याला देऊन आपल्याला काय करता येईल ह्याचा विचार न करता नुसतेच आमचे पूर्वज असे होते आणी आपल्याकडे अमुक तमुक आधी पासूनच होते असं म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात काय अर्थ आहे ?

वाचने 60598
प्रतिक्रिया 171

प्रतिक्रिया

In reply to by संदीप डांगे

गावाकडचा किस्सा रोचक आहे. आईन्स्टाईन आणि भृगुऋषी यांची निव्वळ तळी उचलणारे लोक सारखेच याबद्दल सहमत. मात्र आईन्स्टाईन आणि आपले ग्रंथ या दोहोंचा डीटेल अ‍ॅनॅलिसिस झालेला आहे, त्यात अजूनतरी अचाट शक्ती वगैरे सापडलेल्या नाहीत. "असतील की, तुम्ही सगळे ग्रंथ पाहिलेत का? तुम्हांला कशावरनं सगळं येतंय?" वगैरे प्रश्न विचारणार्‍यांना याचे अ‍ॅटिट्यूड आणि अ‍ॅप्टिट्यूड दोन्हीही नसते असे निरीक्षण आहे. तेव्हा कुंपणावर बसून मजा पाहणार्‍यांनी स्वतः थोडातरी एफर्ट घेऊन मग बोलावे असे माझे मत आहे. हेही अर्थात दोन्ही बाजूंना लागू आहे, पण सध्या निरर्थक भूतकालरंजनात मग्न होणार्‍यांचा सुळसुळाट झाल्याने त्यांनाच जास्त झोडपले जाते, बाकी काही नाही. त्यामुळे "अगोदर त्यांना सांगा" वगैरे निव्वळ रडीचा डाव आहे. ज्यांना आपल्या संस्कृतीची इतकी पडलीय, ज्यांची अस्मिता हागर्‍यापादर्‍या कारणावरून दुखावण्याइतकी तकलादू आहे, त्यांनी अगोदर आपल्या संस्कृतीचा जरा तरी अभ्यास करावा. जुने ग्रंथ कुठले आहेत, त्यांची भाषा-लिपी काय आहे, त्यांचा काय अभ्यास झालाय हे थोडेतरी बघावे. जनरली अशा लोकांना चार वेदांची नावेही धड माहिती नसतात असे निरीक्षण आहे. इतक्या अगाध ज्ञानाच्या आधारे जेव्हा इतरांचे अजेंडे बाहेर काढण्याची गोष्ट करतात तेव्हा काय बोलावे ते समजत नाही.

In reply to by बॅटमॅन

भूतकालरंजनाचा उगम का व कुठून झाला हे शोधले तर माझ्यामते ह्या वादावर तोडगा सापडण्याची शक्यता आहे. बहुतेक इंग्रजांच्या काळातच किंवा नंतर, नक्की कधी ते सांगता येणार नाही पण 'तिकडे पहा, किती (महान, हुशार, शिस्तबद्ध, श्रीमंत) लोक आहेत, नाही तर आपले लोक' असा आपल्याच लोकांना नालायक ठरवण्याचा प्रघात इंग्रजांकडून उसना घेऊन, अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या आणि इंग्रजमिंध्या लोकांनी बाटग्या मुल्लाच्या थाटात जोरदार बांग देत सुरू केला. या एतद्देशीय स्वाभिमानी लोकांना मानाहानीकारक वाटणे साहजिकच होते. पण त्यांची एक मोठी समस्या होती की ना काळ त्यांच्यासोबत होता, ना सत्ता, पुर्वजांची मौल्यवान अशी ज्ञानसंपत्ती. मधल्या पीढींच्या संवर्धन, संगोपन न करण्याच्या सवयीने म्हणा किंवा हे ज्ञान जतन केले नाही तर दोन हजार वर्षांनी आपल्या लोकांना खाली मान घालावी लागेल अशी दूरदृष्टी त्यांचेकडे नसेल त्यामुळे म्हणा, किंवा मुसलमानी सत्तेच्या काळात झालेल्या विध्वंसामुळे म्हणा, कुठल्यातरी कारणाने हे ज्ञान, माहितीचे संकलन लुप्त झाले. सांप्रत लोकांकडे काही कथा/आख्यायिकांशिवाय आपले दावे पुढे रेटायला काहीच हातात नाही. परत वाद पण अशा लोकांशी घालायचाय जे वेगळ्या विचारपद्धतीच्या शिकवणूकीतून तयार झालेत. त्यांना हवे असलेले पुरावे विशिष्ट फॉर्मॅट मधेच हवेत. ह्यांचे पुरावे त्यांना ग्राह्य नाहीत. बरीचशी एकतर्फी पद्धत आहे. त्यामुळे प्रश्न विचारणारे भुवया उडवून विचारतायत आणि आपल्या इतिहासावर विश्वास असून उत्तर देता येत नाही अशी विचित्र परिस्थिती झाली. कुठल्याही देशाच्या लोकांना यापद्धतीने वागवल्या गेले असते तर त्यांनी तेच केले असते जे आज काही भारतीय करतात. आज आपल्या दिव्य भूतकाळाची भलामण करणारे कुठून तरी काही तरी ऐकून, स्वतःचं थोडं कल्पनारंजन त्यात जोडून देतात ठोकून. हे प्रचंडच चुकतंय. ज्यांना खरंच आपल्या भूतकाळाचा अभिमान बाळगायचा आहे त्यांनी तेवढे कष्ट उपसायला हवेत. पुरावे ठिकठिकाणे जाऊन शोधायला हवेत. त्याचा शिस्तबद्ध रेकॉर्ड तयार करायला पाहिजे. पण हे कोण करणार नाही. कारणे तीन: १. पुर्वजांचे ज्ञान, नियम, पद्धती परत मिळवण्यापलिकडे गेल्यात. आकाश पाताळ एक केले तरी मिळणार नाहीत. मिळाले तर फक्त काही खुणा मिळतील, त्यापेक्षा जास्त काही नाही. २. 'तसे काही खरंच होतं का नाही' असा स्वतः देशी स्वाभिमानी व्यक्तींचा डळमळीत विश्वास. ३. सांप्रत काळात जे सहज भौतिक सुख मिळतंय त्याचा आरामात उपभोग घेतांना येणारा न्यूनगंड टाळायला पोकळ ज्ञानाच्या अहंकारी पिंका टाकायला हव्या असतात. खरोखर योग्य पद्धतीने संशोधनाचे काम सोडून एकमेकांवर चिखलफेक करणे इतकाच ह्या भूतकालरंजनाचा उद्देश झालेला आहे. 'असं काही नव्हतंच' म्हणणारे ह्याबद्दल संशोधन करणारच नाहीत. "असंच होतं" म्हणणार्‍यांनी करणं जरा अवघड आहे हे वरच्या तीन कारणात आपण बघितलं. खरं संशोधन सोडून धर्म, जाती, डावे/उजवे, वर्ण, वर्ग आणि काय काय असे सगळे बिनमहत्त्वाचे मुद्दे येत राहतात. कारण ह्या वादाचं खरं कारण दोन्ही बाजूंचा अहंकार आहे. नारळीकरांना काय कारण पुराणातले दावे खोडून काढायचे? स्वतःचा अहंकार सुखावण्यापलिकडे काय होईल त्याने? जर त्यांना खरंच प्रचंड विश्वास आहे की असं काही नव्हतंच त्याचे विश्लेषण तरी का करावे? जसं मिड-ब्रेनच्या धाग्यावर काही लोकांनी म्हटले की जे धडधडीत खोटं आहे त्याची परिक्षा तरी का करावी? तरी नारळीकर ती करतात. का? केवळ विशिष्ट शिक्षणपद्धतीतून आलेला अहंकार. दुसरे कसे चूक आहे हे दाखवून द्यायची खुमखुमी. दुसरीकडे ज्योतिष हे शास्त्र आहे हे सिद्ध करण्याची कोण धडपड? मॉडर्न सायन्सच्या शास्त्र या संज्ञेत ते बसत नाहीये तर कशाला जबरदस्ती बसवण्याचा प्रयत्न करायचा? हा सरळ सरळ बनाव आहे ज्योतीषवाल्यांचा. त्यांना मॉडर्न सायन्सकडून मान्यता पाहिजे. त्यांची खोटी दुकाने उघडी पडतील म्हणून ते घाबरतात. लाखो ज्योतिषात एखादा सिद्धहस्त असतो, बाकीचे अशांच्या पुण्याईवर आपली दुकाने रेटून नेत असतात. असो.

In reply to by संदीप डांगे

नारळीकरांना काय कारण पुराणातले दावे खोडून काढायचे? स्वतःचा अहंकार सुखावण्यापलिकडे काय होईल त्याने? जर त्यांना खरंच प्रचंड विश्वास आहे की असं काही नव्हतंच त्याचे विश्लेषण तरी का करावे? जसं मिड-ब्रेनच्या धाग्यावर काही लोकांनी म्हटले की जे धडधडीत खोटं आहे त्याची परिक्षा तरी का करावी? तरी नारळीकर ती करतात. का? केवळ विशिष्ट शिक्षणपद्धतीतून आलेला अहंकार. दुसरे कसे चूक आहे हे दाखवून द्यायची खुमखुमी.
असं वाटत नाही. त्यांनी ते दाखवून दिलं तर इतका त्रास व्हायचं कारण काय? इतकं असेल तर करा तुम्हीही अभ्यास अन पाडा खोटे नारळीकरांना. शिवाय संशोधकांनी आपल्या ग्रंथांचाही अभ्यास केलेला आहे. त्यातून बर्‍याच रोचक गोष्टी समोर आलेल्या आहेत, पण ते बघणार कोण? समोरचे लोक माझं ऐकत नाहीत म्हणून रडत बसण्यात कै अर्थ नाही. अभ्यास करा, तो पब्लिश करा अन त्याचा प्रसार करा. हे न करता निव्वळ "आमच्याकडे काही नाही तरी लोक उगीच चेष्टा करतात" छाप डिफेन्सिव्हपणा करण्यात कै अर्थ नाही. मुळात आपल्याकडे काहीच नसतं तर ठीक होतं, हे जस्टिफाईड झालं असतं. पण बरेच काही असूनही त्याचा अभ्यास न करता फक्त जे अभ्यास करतात त्यांना शिव्या घालणे मला पटत नाही. अभ्यास करुन त्यांनी तुम्हांला न रुचणारे निष्कर्ष काढले ना? मग ते कसे चूक आहेत ते पाहण्याची जबाबदारी तुमची आहे. स्वतः काहीच न करता ज्यांनी काहीतरी केले त्यांना शिव्या घालण्यात काय अर्थ आहे इतके फक्त मला सांगा. हे जरासे ब्रिगेडी इतिहासकारांसारखे वाटते. "शिवाजीमहाराजांचा खोटा इतिहास लिहिला गेला" इ.इ. सांगतात, पण त्यांच्या खर्‍या इ. इतिहासामागील पुरावे विचारले की तोंड बंद होते त्यांचे. आणि हे कोणी करणार नाही वगैरे चूक आहे. विविध ज्ञानशाखांतून याबद्दल प्रचंड काम सुरू आहे. बरेच गोरे आणि काही भारतीयही यात आघाडीवर आहेत. पण बघायचे कष्ट कवण घेतो?

In reply to by बॅटमॅन

मला वाटतं आपण दोघंही एकच गोष्ट वेगवेगळ्या भाषेत सांगतोय. कुठलाही दावा करणार्‍यांच्या हाती पुरेसा पुरावा असावा असंच तुमचंही म्हणणं आहे आणि माझंही. बेनेफिट ऑफ डाऊटचा गैरफायदा घेऊन उगाच कुणी 'हे तर आमच्याकडे आधीपासून होतं' अशी पोकळ अहंकारी पिंक टाकणं मलाही मंजूर नाहीच. तसंच एखाद्या नामवंत संशोधकाचे स्वतःचे मत त्यांनी फार अभ्यासांतीच व्यक्त केले असणार हा भाबडा विचारही मंजूर नाही. भूतकालरंजन करणार्‍यांना असं का वाटत असावं याचं विश्लेषण मी केलं. तुम्ही म्हणता संशोधन करणारे करत आहेत, त्यातून ज्या रोचक गोष्टी समोर येत आहेत, मग त्या कुठे आहेत? त्याचा गाजावाजा का होत नसावा? कुठे आहेत ती संशोधनं? विमानिका शास्त्र या तथाकथित ग्रंथाला फोल ठरवणार्‍या संशोधनाची लिंक चटकन मिळते. एखादी काहीतरी सिद्ध झाल्याची मिळाली आहे का? त्याचा हिरिरिने प्रचार झालाय का? अभ्यास करुन त्यांनी तुम्हांला न रुचणारे निष्कर्ष काढले ना? मग ते कसे चूक आहेत ते पाहण्याची जबाबदारी तुमची आहे. स्वतः काहीच न करता ज्यांनी काहीतरी केले त्यांना शिव्या घालण्यात काय अर्थ आहे इतके फक्त मला सांगा. नारळीकरांनी लिहिलेल्या लेखावर आक्षेप एवढाच होता की कथा कादंबर्‍यांतून परिपूर्ण वैज्ञानिक माहिती (त्यांना ज्या फॉरमॅटमधे हवी तशी) मिळत नाही म्हणून ते पुराणग्रंथांना उडवून लावतात. कशावरून त्यांनी काय निष्कर्ष काढावा हा त्यांचा प्रश्न आहे. तो मला रुचतोय, नाही हा माझा प्रश्न आहे. इथे खर्‍या विज्ञानाला काय फायदा झाला? माझ्यामते तरी पुराणग्रंथांवर/कथांवर आधारून 'आमच्या कडे हे आधीच होतं' असं नुसतं ठोकून देणं आणि 'ते तसं नव्हतंच' असं तथाकथित अभ्यास करून मांडणं दोन्ही चूकच. जेव्हा पुराणं ही शास्त्रिय माहितीचे अधिकृत स्त्रोत नाहीतच तेव्हा त्यांना 'ते तसे का नाहीत' म्हणून विचारणं पटत नाही. 'ते तसे नाहीत म्हणून मी जे म्हणतो तेच सत्य' हे कितपत बरोबर? उदाहरणार्थ, त्या लेखात एका ठिकाणी ब्रह्मदेवाच्या कालमापनाचा आणि पृथ्वीवरच्या कालमापनाचा संदर्भ दिला आहे. ब्रह्मदेवाचे काही क्षण म्हणजे पृथ्वीवरची काही युगे असं ग्रंथात्/कथेत म्हटल्याचं सांगतात. पण त्याच ठिकाणी आइन्स्टाइनने सर्वप्रथम मांडलेली वेळेच्या सापेक्षतेची संकल्पना पुराणग्रंथात उल्लेखली आहे ह्या बाबीवर जोर न देता तमुक राजा पृथ्वीवरून ब्रह्मदेवाकडे कसा पोचला याबद्दल काहीच नाही म्हणुन आश्चर्य व्यक्त करतात. त्या कथेत गणिती तपशील अमूक ढमुक नाही असे त्यांचे म्हणणे. त्यांचा प्रश्न रास्त आहेच. पण एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्याला बगल देण्यासाठी दुसरा बिनमहत्त्वाचा मुद्दा पुढे आणून त्यावर सोयिस्कर चर्चा करणे याने काय सिद्ध होते? आपला सोयिस्कर मुद्दाच कसा सर्वार्थाने सर्वोच्च महत्त्वाचा आहे हे पटवून सांगणे किती योग्य. म्हणून म्हटले कशावरून त्यांनी काय निष्कर्ष काढावा हा त्यांचा प्रश्न आहे. मॉडर्न सायन्सच्या काही मान्यता आहेत. त्या मान्यतांच्या बाहेर जगात काहीच घडत नसतं असा त्यांचा (अहंकारी) दावा असतो. त्या मान्यता कालांतराने बदलल्या की नव्या मान्यतांना डोक्यावर घेतले जाते. नवे पुरावे समोर आले की जुन्या मान्यता टाकून दिल्या जातात. म्हणजेच पुरावे उपलब्ध नाहीत म्हणून एखाद्या गोष्टीची शक्यताच नाकारणे हे बरोबर नाही. प्रस्तुत लेखात त्यांनी ती शक्यताच सपशेल नाकारली आहे. आणि ते सतत नाकारत आले आहेत. एक विज्ञानवादी म्हणून ही भूमिका माझ्यामते तरी योग्य नाही. बाकी ज्याच्या त्याच्या विचारांचा प्रश्न. तरी अशा शक्यतेचे सूत धरून धर्म/जाती/देश वैगेरेंचा स्वर्ग गाठून 'आम्ही कसे जात्याच हुशार आहोत कि नाइ बघा' चा दंभ मिरवणार्‍यांना कानफटात हाणाविशी वाटते ते वेगळे. आणि हे कोणी करणार नाही वगैरे चूक आहे. विविध ज्ञानशाखांतून याबद्दल प्रचंड काम सुरू आहे. बरेच गोरे आणि काही भारतीयही यात आघाडीवर आहेत. पण बघायचे कष्ट कवण घेतो? >> भूतकाल किंवा पुराणकाळ रंजन करणार्‍यांना पटापट दाखले देऊन तोंडावर पाडण्यास विज्ञानवादी लोक अहमहमिकेने पुढे असतात. कुठे भारतीयांच्या ओरिजीनल ज्ञानाचं कौतुक होत असेल तर तिथे मूग गिळून गप्प असतात. तुम्ही जे प्रचंड काम सुरू आहे म्हणताय त्याबद्दल मात्र कुठेही कोणीही बोलत नसतं.

In reply to by संदीप डांगे

भूतकालरंजन करणार्‍यांना असं का वाटत असावं याचं विश्लेषण मी केलं. तुम्ही म्हणता संशोधन करणारे करत आहेत, त्यातून ज्या रोचक गोष्टी समोर येत आहेत, मग त्या कुठे आहेत? त्याचा गाजावाजा का होत नसावा? कुठे आहेत ती संशोधनं? विमानिका शास्त्र या तथाकथित ग्रंथाला फोल ठरवणार्‍या संशोधनाची लिंक चटकन मिळते. एखादी काहीतरी सिद्ध झाल्याची मिळाली आहे का? त्याचा हिरिरिने प्रचार झालाय का?
केरळ स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स, chakravala algorithm or the pulverizer for solving diophantine equations, पाणिनीचे संस्कृत व्याकरण आणि त्याचा आधुनिक भाषाशास्त्रावरचा खोल प्रभाव, दिल्लीतला विनागंज विष्णुस्तंभ, wootz steel, सुश्रुतसंहितेतील सर्जरीची डीटेल आणि शास्त्रीय वर्णने, टिपू सुलतानाची रॉकेट्स, दक्षिणेतले मंदिरस्थापत्य, वेरूळसारखी वरून खाली खोदलेली देवळे ही अनेकांपैकी काही उदाहरणे आहेत. यांपैकी प्रत्येक उदाहरणाचे संशोधन होऊन त्याला संशोधकांनी आणि सामान्य लोकांनीही चिकार डोक्यावर घेतलेले आहे. साधे गुगलून पाहिल्यासही याचे प्रत्यंतर येईल. पण भूतकालरंजन करणार्‍यांना यांपैकी कशाचे फारसे पडलेले नसते. चक्रवाल अल्गोरिदम आणि केरळ स्कूलसारखे हिरे समोर असताना वैदिक गणित नामक दगडाशी खेळणारे हे लोक, यांच्या काय नादाला लागता....असोच. बाकी प्रतिसादाबद्दल बोलायचे तर किमान काहीएक अभ्यास करून बनलेले मत हे भले मग पूर्ण अनबायस्ड नसले तरी तुलनेने ठीकच असते. याचा अर्थ मी त्यांचा पूर्ण समर्थक वगैरे नाही, फक्त दोन पक्षांत तुलना केली असतानाचे मत सांगितले.

In reply to by बॅटमॅन

तुम्ही जी उदाहरणे दिलीत तीच डोक्यात ठेऊन बोलत होतो आता पर्यंत. त्यामुळेच... असो. आता नारळीकर अथवा त्यांच्यासारखं मत असणारे यांच्या विषयी थोडं. ही लोकं कायम भूतकालरंजकांवर का उखडलेली असतात? याचे कारण भूतकालरंजकांच्याच न्यूनगंडातून आलेल्या अहंगंडात आहे. मॉडर्न सायन्सने (वा एखाद्या व्यक्तीने) सांप्रत काळात एखादा महत्त्वपूर्ण शोध लावला आणि त्याचा यथोचित सन्मान होत असेल तर काहींच्या (जे पूर्वी पाश्चात्त्यांकडून दुखावले गेलेते) 'यात काय मोठं, हे तर आमच्याकडे आधीच होतं, तुम्ही काय मोठे तीर मारलेत' अशा अर्थाच्या पि़ंका पडतात. हे पिंकसम्राट जे नवे शोध लागले त्यांनाच टार्गेट करत असल्याने जेन्युइन भारतीय शोधांकडे लक्ष देण्याची त्यांना गरज वाटत नाही. आता होतं काय की सांप्रत काळात कुठलाही शोध लावायचा म्हणजे खायचं काम तर नाही. आधी भयंकर रीसर्च करा, त्याचे शेकडो प्रयोग करा, काही सिद्धांत मांडा, ते जाणकारांकडून ठोकबजावून मान्यताप्राप्त करून घ्या. अशा सगळ्या दिव्यांतून जाऊन कुठेतरी हजारोत एखाद्या संशोधकाचे स्वप्न साकार होते. त्यातही मॉडर्न सायन्समधे ज्याने सगळ्यात आधी जाहीर केलं त्यालाच त्या शोधाचा मान मिळतो. मॉडर्न सायन्समधे संशोधकाच्या नावाला अतोनात महत्त्व आहे. त्यांच्या कष्टाचं, बुद्धीमत्तेचं कौतुक केलंच पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. यातलं काहीही न करणारे आणि शष्प माहित नसणारे उगाच डीवचल्यासारखं, "हुं, त्यात काय एवढं" असं म्हणायला लागले तर कोणाचीही तळपायची मस्तकात जाणारच. मग तो अशा दावे करणार्‍यांची बिन-पाण्याने करायला मागे पुढे पाहणार नाहीच. माझ्यामते नारळीकरांचा पुराणकथांवरच्या रागामागे हीच मीमांसा असेल, असं वाटत तरी आहे. शेवटी काय तर विज्ञान राहतं बाजूला आणि लोक फक्त अहंकाराच्या लढाया करत राहतात. त्यापेक्षा खरं विज्ञान कुठल्याही अहंभावाशिवाय लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. ते प्राचीन असो वा अर्वाचीन. त्याचा उचित सन्मान राखणे सर्वांच्याच हिताचे आहे. आपल्या प्राचीन संस्कृतीमधे ज्या काय पद्धती होत्या, त्या तशाच का होत्या, अशा का नव्हत्या असले भोचक प्रश्न आजचा काळ डोळ्यासमोर ठेवून विचारणे चूक आहे. भारतीय प्राचीन विज्ञान संस्कृती आजच्या पाश्चिमात्त्य विज्ञान संस्कृतीपेक्षा पूर्णपणे वेगळी असण्याची भरपूर संभावना आहे. आजचं विज्ञान हे समाजकेंद्रित वाटतं, प्राचीन काळातलं कदाचित व्यक्तिकेंद्रित/व्यक्तिपुरतं मर्यादित असेल. म्हणून ते काळाच्या ओघात लुप्त झालं. आजच्या नियमांनुसार तेव्हाच्या प्रश्नांची उत्तरे मिळवणे कठीण आहे. कारण त्यांचे प्रश्न, त्यांची उत्तरे आणि ती मिळवण्याची त्यांची पद्धत याचा सांप्रत समाज कदाचित कल्पनाही करू शकणार नाही. याची उदाहरणं जागोजाग पाहायला मिळतात, पिरामिड्स हे त्यातलंच एक. शेवटी तुमच्या मताला दुजोरा देऊन ही उपचर्चा संपवतो. समर्थांचंही तेच म्हणणं आहे. अभ्यासोनि प्रकटावे, नाहीतर झाकोनि असावे प्रकटोनि नासावे, बरे नव्हें ||

In reply to by संदीप डांगे

मधल्या पीढींच्या संवर्धन, संगोपन न करण्याच्या सवयीने म्हणा किंवा हे ज्ञान जतन केले नाही तर दोन हजार वर्षांनी आपल्या लोकांना खाली मान घालावी लागेल अशी दूरदृष्टी त्यांचेकडे नसेल त्यामुळे म्हणा, किंवा मुसलमानी सत्तेच्या काळात झालेल्या विध्वंसामुळे म्हणा, कुठल्यातरी कारणाने हे ज्ञान, माहितीचे संकलन लुप्त झाले. सांप्रत लोकांकडे काही कथा/आख्यायिकांशिवाय आपले दावे पुढे रेटायला काहीच हातात नाही.
जुने मिपाकर फार फिरकायचे नाहीत असे म्ह्टले तरी पण या विषयावर लिहायची खुमखुमी कितीही म्हटले तरी कमी करता येत नाही. समजा त्या काळी इतके ज्ञान होते-- कुरूक्षेत्रावर अ‍ॅटम बॉम्बचा वापर केला होता तर मग लढाई घोडे आणि रथ वापरून का केली जायची (की तसे काव्यात लिहिले आहे) हो डांगे साहेब? आताच्या काळात अणुयुध्द होऊ शकेल.पण एकीकडे अणुबॉम्ब वापरायचा आणि त्याच युद्धात खंदे वीर धनुष्यबाण- गदा आणि तलवारी घेऊन लढत आहेत असे चित्र अणुबॉम्बच्या सध्याच्या काळात कुठेच उभे राहणार नाही.मग त्याकाळी का बरे उभे रहावे?

लेखकाशी काही अंशी सहमत! जे तंत्र आपण वापरूच शकत नाहीत तर त्याचा काय फायदा? उगा आमचे पुर्वज लै भारी ! असं म्हणायचे. त्यापेक्षा खरंच करून दाखवा एखादे अस्त्र महाभारतात लिहील्याबरहुकूम आणि करावे तोंड बंद पुरोगामी पुरोगामी म्हणतात त्यांचे !

तुम्हाला यातलं लिंकिंग कळलेलं दिसत नाही. >> मान्य अहे. कृपया लिंकिंग समजावून सांगितलत तर बरं होईल आपल्याकडे असलेले पुराणातील ज्ञान वापरून आज आपला उत्कर्ष कसा होईल हे पाहीले तर त्या ज्ञानाचा सदुपयोग झाला असे म्हणता येईल हा मुख्य मुद्दा मांडायचा आहे.>> तेच म्हणायचय मला पण . हआपल्याकडे प्रचंड ज्ञान उपलब्ध आहे हो. पण आपण त्याचा उपयोग कारण नहि. नुसती पूर्वजांना नावं ठेवत बसतो . त्याची कारण अशी देत येतील १. हे ज्ञान संस्कृत मध्ये असल्यामुळे ते उजेडात येत नहि. (संस्कृत शिकण्यात कोणाला इंटरेस्ट आहे ? इंग्लिश महत्वाची ) २. ज्ञानाने भरलेले अनेक दुर्मिळ ग्रंथ परकियांनी नष्ट केले (उदा . नालंदा ,तक्षशीला हि पूर्वीची विद्यापीठं . ज्यात अफाट ज्ञान साठवलेलं होतं ). ३. काही गोष्टी पूर्वजांनी मुद्दामच ग्रंथांमध्ये नमूद करून ठेलेल्या नाहीयेत . ते ज्ञान चुकीच्या लोकांच्या हाती लागू नये म्हणून . असं ज्ञान गुरु शिष्य परम्परेकडून पुढे सरकवल जायचं . पण आता ती परंपराही राहिली नाही . आणि ते ज्ञान हि लुप्त झालं त्यापेक्षा खरंच करून दाखवा एखादे अस्त्र महाभारतात लिहील्याबरहुकूम आणि करावे तोंड बंद पुरोगामी पुरोगामी म्हणतात त्यांचे >> आपल्या पूर्वजांना काही काळात नाही असं म्हणणार्यांनी तसा प्रयत्न करून बघावा कि . कुणी अडवलंय ?

In reply to by तुडतुडी

आपल्या पूर्वजांना काही काळात नाही असं म्हणणार्यांनी तसा प्रयत्न करून बघावा कि . कुणी अडवलंय ?
प्रयत्न चालू आहेत, तयार झाल्यावर पाककृती अगोदर मिपावरच टाकण्यात येईल .

In reply to by तुडतुडी

>>पण आपण त्याचा उपयोग कारण नहि. नुसती पूर्वजांना नावं ठेवत बसतो . आपण नावं ठेवत नाही , आपण पूर्वजांच कौतुक करत बसतो स्वतः सध्या उपयोगी पडेल असं काहीही न करता ..

आपण पूर्वजांच कौतुक करत बसतो स्वतः सध्या उपयोगी पडेल असं काहीही न करता >>> आपण आधुनिक शास्त्रज्ञांच कौतुक करत बसतो . त्यातला १ हि प्रयोग स्वतः न करता

In reply to by तुडतुडी

आपण आधुनिक शास्त्रज्ञांच कौतुक करत बसतो . त्यातला १ हि प्रयोग स्वतः न करता
यत्ता १०वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या माणसासाठी हे वाक्य चूक आहे. प्रयोगशाळेत प्रयोग करवून घेतातच.

In reply to by तुडतुडी

आपण पूर्वजांच कौतुक करत बसतो स्वतः सध्या उपयोगी पडेल असं काहीही न करता >>> आपण आधुनिक शास्त्रज्ञांच कौतुक करत बसतो . त्यातला १ हि प्रयोग स्वतः न करता
प्रयोग करत बसण्यापेक्षा त्या आधुनिक शास्त्रज्ञांनी लावलेले शोध आपण वापरतो आपल्याला उपयोगी पडतील अश्या प्रकारे.

In reply to by बॅटमॅन

अरे हो, बॅटमॅन भौ, तुमचं ते संस्कृत काव्य या विषयावरचं कुठं आहे हो (एका प्रतिसादात वाचलं होतं). सापडत नै. जमेल तर टाका इथे. :))

च्यायला, दर आयडी-पिढीत (ही वर्षाला बदलते इथे) हेच प्रश्न, असेच एक-दोन हेकट आणि तरीही दर वेळेस (किमान) शंभरीची खात्री. धागाकर्त्यास प्रतिसादाला रुपया मिळत असता तर मी रोज ह्या आणि ह्याच ज्वलंत विषयावरचे धागे काढले असते. ;) (किमान तारतम्याची आशा बाळगणारा)

लेख आवडला. पण हाच लेख समजा २०१० किंवा २०१२ मध्ये लिहिला असतात तर ट्रिपल सेंच्युरी पण मारली असतीत. आता त्याच त्याच विषयावर काथ्या कुटून कंटाळा आला असावा निदान माझ्यासारख्या जुन्या मिपाकरांना तरी. तेव्हा यात काथ्या कुटायला नवीन मिपाकरच सरसावतील. जुने मिपाकर फारसे फिरकायचे नाहीत इथे असा माझा कयास आहे.

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

शमत आहे. मलाही टंकाळा आला आहे. त्यामुळे फिरकलोच नाही (अर्थात मी उलट्या बाजुने बोलायचो बरं का ;) )

In reply to by मृत्युन्जय

तुमचे रामायण महाभारतावरचे निबंधीय प्रतिसाद आमच्या ज्ञानात भरपूर भर टाकून गेले होते बरं का. आम्हाला अजून आठवतायत बरं का..!! ;)

मिपा च्या पुराणात पण ही वांग्याची भाजी बरेच वेला झालीये

जुन्या लोकांना ते फार जुने आहेत्, त्यांनी चार पावसाळे जास्त पाहिलेत असं सारखं सारखं सांगून नक्की काय सुचवायचं असतं? सेम टू सेम प्रतिसाद, सेम टू सेम विचार जर आढळत असतील तर जुन्या लोकांनी कष्ट घेऊन लिण्का पुरवाव्यात. नव्यांनाही जुन्या विषयांवर बोलायला आपल्याकडे काही नवं व वेगळं आहे का याचा अंदाज घेता येईल. तसंही इथं कुणी जगाला शाणं करायला येत नसतं, मनातलं बोलायचं असतं, इतरांचं त्यावरचं मत ऐकायचं असतं, आपलं मत/ज्ञान/विचार चाचपून बघायचे असतात. इथल्या एका धाग्याने, प्रतिसादाने जग हलणार नसतं. (पण प्रतिसादकर्त्याचं/धागाकर्त्याचं जग मुळासकट हलू शकतं.) ह्यावरून म्हातारे लोक तरूणांच्या प्रकरणांकडे कसे पाहत असतात ते आठवलं. अनुभव घेऊन झालेला असतो. त्यात काय राम नाही हे दिव्यज्ञान झालेलं असतं. नव्या पोरांकडे, 'का हे असा व्यर्थ वेळ वाया घालवतात' टाईप लूक टाकत असतात. पिकलेल्या पानांनी आपण पिकलोय म्हणून नव्याने कुणी हिरवे होऊच नये असं म्हणणं जरा विचित्रच नाही का?

अनयुझ्वल क्लेम्स रिक्वायर अनयुझ्वल प्रूफ असे इंग्रजीत म्हणतात. म्हणजे तुम्ही अवाच्या सवा दावे करत असाल तर त्याकरता अवाच्या सवा पुरावे आवश्यक आहेत. हजार वर्षापूर्वी कुणालाही अणुबॉम्ब, विमाने, लेझर, टीव्ही हे माहित नव्हते. असल्या कुठल्या गोष्टीचे शोध लागले नव्हते हे म्हणणे असामान्य नाही. हे प्रस्थापित ज्ञान आहे. असे म्हणणार्‍याला संस्कृत वाचा, कुठलेसे प्राचीन ग्रंथ वाचा वगैरे सल्ले देणे मूर्खपणाचे आहे. कारण त्यांच्या दाव्यात असे अवाच्या सवा, अचाट आणि अफाट काही नाही. याउलट आपल्याकडे सग्गळे सग्गळे आधीच होते, आम्हाला संस्कृत कळत नाही म्हणून, नाहीतर आम्हीच सगळे शोध लावून चुकलो आहोत हे सिद्ध करता आले असते वगैरे अचाट आणि अफाट दावे आहेत. युरोपियन व अन्य पाश्चात्य लोकांना जे आत्ताआत्ता अथक मेहनतीनंतर मिळाले, ज्या मेहनतीचे, प्रतिभेचे, संशोधनाचे अनेक पुरावे ढळढळीत उपलब्ध आहेत हे शोध हजारो वर्षे आम्हाला आधीच अवगत होते. असला दावा काहीच्या बाही अचाट आहे. तो सिद्ध करायला तसेच अचाट पुरावे असायला हवेत. तसे नसतील तर ह्या फुकाच्या बाता आहेत. त्यात काहीही दम नाही. रिकामटेकड्या लोकांनी, पोकळ अभिमान बाळगणार्‍यांनी मारलेल्या फुशारक्या आहेत.

म्हणजे तुम्ही अवाच्या सवा दावे करत असाल तर त्याकरता अवाच्या सवा पुरावे आवश्यक आहेत.>>> ज्या मेहनतीचे, प्रतिभेचे, संशोधनाचे अनेक पुरावे ढळढळीत उपलब्ध आहेत>>> हे अवाच्या सवा पुरावे तुमच्या समोरच अनेक ग्रंथांमध्ये दिले आहेत. तुम्हाला ते वाचायला नको. करायला नको. साधी सोपी गोष्ट घ्या .electrical आणि इलेक्ट्रोनिक्स विषयावर चा अगस्ती ऋषींचा ग्रंथ घ्य. त्यातला विद्युत घाट निर्माण करण्याचा साधा प्रयोग तरी करून बघितलाय का ? नसेल बघितला तर ह्या विषयावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे का ? हजारदा तेच सांगून सुधा तुम्हाला काळात नसेल तर तुमच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते . हे ज्ञान जर तुम्हाला समजत नाही , झेपत नाही . म्हणून असं काही नव्हतंच च टुमण लावलंय . म्हणतात न कोल्ह्याला द्राक्षे आंबट . :-)

In reply to by तुडतुडी

साधी सोपी गोष्ट घ्या .electrical आणि इलेक्ट्रोनिक्स विषयावर चा अगस्ती ऋषींचा ग्रंथ घ्य. त्यातला विद्युत घाट निर्माण करण्याचा साधा प्रयोग तरी करून बघितलाय का ? नसेल बघितला तर ह्या विषयावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार आहे का ? हजारदा तेच सांगून सुधा तुम्हाला काळात नसेल तर तुमच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते . हे ज्ञान जर तुम्हाला समजत नाही , झेपत नाही . म्हणून असं काही नव्हतंच च टुमण लावलंय . म्हणतात न कोल्ह्याला द्राक्षे आंबट .
माझ्याकडे चार वर्षांची इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकीची पदवी आहे. चार वर्षांत विद्युत घटासंबंधी जे काही अभ्यासलं ते सारं पाश्चात्यांनी लिहिलेल्या संदर्भग्रंथांमधून. अगस्ती ऋषींच्या ग्रंथाचा उल्लेख चार वर्षांच्या अभ्यासात कुठेच आढळला नाही. मात्र आता अभ्यासायला आवडेल. तुम्ही सविस्तर संदर्भ देऊ शकाल का? शिवाय मला संस्कृत तितकंसं जमत नाही. खरं सांगायचं तर "देव" शब्द चालवण्यापलिकडे मला संस्कृत येतच नाही. तुम्ही त्या संदर्भांचे मराठी भाषांतर करायला मदत कराल का?

In reply to by तुडतुडी

इलेक्ट्रॉनिक्स, अणूबॉम्ब वा विमान ह्या गोष्टींचे वर्णन कुठल्याशा ग्रंथात असणे हा पुरावा असू शकत नाही. तो वाचून, तो अमलात आणून कुणीतरी खरोखरचे अण्वस्त्र, इलेक्ट्रॉनिक उपकरण वा विमान बनवून ते अपेक्षेप्रमाणे वागते आहे उदा. उडू शकणारे विमान तरच तो पुरावा म्हणता येईल. पुस्तकांमधे अनेक कपोलकल्पित, कवीकल्पना असू शकतात. भा रा तांब्यांच्या एका कवितेत "पंख फडकती घोड्यांना मौज दिसे ही थोड्यांना" अशी ओळ आहे ह्याचा अर्थ तांब्यांच्या काळात उडणारे घोडे होते आणि ही कविता हा त्याकरता पुरावा आहे असे म्हणणे जितके हास्यास्पद आहे तितकेच अगस्ती ऋषींच्या ग्रंथाचा दाखला देणे आहे. निव्वळ लेखी शब्द हा त्या तंत्रज्ञानाचा पुरावा असू शकत नाही. तसा प्रयोग करून सिद्ध करून दाखवायची जबाबदारी ते लिहिलेले खरे होते म्हणणार्‍यांची आहे. ज्यांना ते पूर्ण काल्पनिक वाटते आहे त्यांना पुरावा द्यायची गरज नाही. कारण त्या तथाकथित तंत्रज्ञानाचे कुठलेही ठोस अस्तित्त्व नाही हा पुरावा पुरेसा आहे, पुन्हा एकदा, निव्वळ लेखी शब्द हा पुरावा नाही.

In reply to by हुप्प्या

ही तर खूप नंतरची गोष्ट झाली हुप्प्याशेठ. अगोदर ग्रंथांमध्ये तरी नक्की काय उल्लेख आहेत ते दाखवा म्हणावं. काहीच माहिती नसता नुसत्या फुकाच्या गप्पा मारणे इतकेच ज्यांना जमतेय त्यांचे नादास लागो नका ऐसा सल्ला देतो ऐसाजे.

बॅटमॅन. तुम्ही सगळी ऑपरेशन करून बघित्लीयेत वाटतं . विमान , अणुबॉम्ब स्वतः तयार करून बघितलंय वाटतं . प्रयोग करायची गरज त्याला असते ज्याला त्या सिद्धांताबद्दल शंका असते . आम्हला कुठलीही शंका नहि. त्यामुळे प्रयोग करण्याचा प्रश्न आहे . शंका तुम्हाला अहेत. त्यामुळे प्रयोग तुम्ही करायला आहेत .

In reply to by तुडतुडी

प्रयोग करायची गरज त्याला असते ज्याला त्या सिद्धांताबद्दल शंका असते . आम्हला कुठलीही शंका नहि.
याबद्दल जाणकार जास्त बोलतीलच. पण साधारणपणे याला आंधळी श्रद्धा म्हणू हवं तर. त्याला शास्त्र म्हणू नका ना मग.
त्यामुळे प्रयोग करण्याचा प्रश्न आहे . शंका तुम्हाला अहेत. त्यामुळे प्रयोग तुम्ही करायला आहेत .
हे उरफाटे तत्वज्ञान झाले. म्हणजे गोमूत्रात अथवा स्वमूत्रात कँसर बरा करण्याचे गुणधर्म आहेत असा तुमचा ठाम विश्वास असेल तर ते तुम्ही सिद्ध करायचे नाही. पण "ते तसे कसे नाही" हे ज्यांना शंका असेल त्यांनी करायचे ? याउप्पर कोणी केलेच प्रयोग आणि सिद्ध केले की तुम्ही चूक आहात (उदा. विमान शास्त्राबद्दलचा रिसर्च पेपर) तर तुम्ही त्यांनाच दोष देऊन रिकामे होणार. हे म्हणजे चित भी मेरी आणि पट भी मेरी.. तुम्ही काय म्हणताय त्याचा तुम्हाला तरी तार्किक बोध होतोय का ?

तुडतुडी, तुम्हांला संस्कृतचा स देखील माहिती असेल तर अफाट अन अचाट विधाने तुम्ही करणार नाही. त्यामुळे तुमची विधाने नॉट ईव्हन राँग या क्याटेगरीत आहेत. चालूदेत तुमचे निरर्थक अत्मरंजन. बनवा त्या वैदिक गणितावर चालणारा सुपरकम्प्यूटर. बाकी त्या ग्रंथाचे नाव कळेल का हो? इलेक्ट्रॉनिक्स विषयावरच्या? की वर्तमानपत्रात दिलेले नाही?

बॅटमॅन - तुम्हाला मेडिकल चा म आणि इंजिनीरिंग चा इ जरी माहित असेल तर ज्याविषयी आपल्याला काही माहित नाही किवा काळात नाही त्याबद्दल बोलू नये हे समजलं असतं . तुमचं आधुनिक सायन्स वापरा आणि दाखवा कि पाऊस पाडून आणि थांबवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या . एबोला , एड्स सारखे आधुनिक रोग बरे करून दाखवा . नसेल जमत तुमच्या आत्मरंजनातून बाहेर पडा .

In reply to by तुडतुडी

तुमचं आधुनिक सायन्स वापरा आणि दाखवा कि पाऊस पाडून आणि थांबवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या .
कॄत्रिम पाऊस वगैरे गोष्टी ऐकल्या तरी आहेत का? बेसिक साक्षरता असलेल्या माणसापर्यंतही ही न्यूज बहुधा पोहोचली असावी. बाकी आधुनिक सायन्सचा वापर आम्ही रोजच करतो, प्रयोगशाळेतले प्रयोगही थोडे थोडे केलेले आहेत. तेव्हा आमच्या खात्यावर लहानशी का होईना, जमा आहे. पण तुमच्या खात्यावर बढाईखेरीज काय आहे? कुठलाही जुना ग्रंथ कधी पाहिला आहे का? मगाशी इतक्या बढाया मारत होता ना, अगस्त्य ऋषींच्या ग्रंथाचे नाव तरी ठाऊक आहे का? लै मागणे नै. जमल्यास बघा. नै आठवलं तर तुम्हांला परत गूगल नामक आधुनिक तंत्रज्ञानाचाच वापर करावा लागेल. तुमचे वैदिक गणिताधारित सुपरकम्प्यूटर बनवून दाखवा इतकंच असेल तर. ० आणि ०.०००००००००१ या दोन्हीमध्येही शेवटी शून्य ते शून्यच राहते हे सत्य विसरल्याने असा त्रास होतो. चालायचंच, नविन तंत्रज्ञानाने त्याच्या विरुद्ध वाटेल तसे नि तितके लिहायची मुभा दिलेली आहे. त्यातच तुमच्यासारखे पोकळ अभिमानवाले हात मारून घेतात. चालूद्या. :)

वांग्यांचे ज्येश्ठ अभ्यासक Jack_Bauer यांना शतकी धाग्यासाठी विशेष मदत केल्याबद्दल बॅटमॅन, अत्रुप्त, प्रगो आणि तुडतुडी यांना सव्वा सव्वा किलो वांगी देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. ;)

तुम्ही जे मुख्य आहे ते सोडून नावावरच अडून बसलाय त्यातून तुम्हाला केवळ शब्दछल करण्यात इंटरेस्ट असावा असं दिसतंय .कधीकाळी पावसाच्या ४ सारी पाडल्या असतील तर आम्ही कृत्रिम पाऊस पडून दाखवला म्हणून कोण कुटून वाटतंय . किती मिलीलीटर कृत्रिम पाऊस पडून दाखवला हो ?लै मागणे नै. जमल्यास बघा. नै आठवलं तर तुम्हांला परत गूगल नामक आधुनिक तंत्रज्ञानाचाच वापर करावा लागेल. शेंबड्या पोरांनी सुधा कृत्रिम पावसाचं नाव ऐकलय हो . पण नुसतं नावच झालं . पाऊस कुठंय ? आणि ते एड्स , एबोला बद्दल कै बोलला नै ते . आता असले हास्यास्पद प्रतिसाद बंद करावेत हि विनंती . प्यारे१. ठांकू . वांग्याचं भरीत खायची लै इच्छा होत होती बघा . काही दिवसांपासून .

In reply to by तुडतुडी

तुम्हांला नावही सांगता येत नाही म्हणजे कळालं काय ते. बाकी काही वेळेस तरी का होईना पाऊस पाडून दाखवलेला आहे. तुमच्या अगस्त्यमुनींप्रमाणे किती बॅटर्‍या बनवल्यात म्हणे तुम्ही? आणि त्या कितीचे व्होल्टेज देतात? याचे उत्तर कधीच येणार नाही, कारण जे आडात नाही तेच तुम्ही आहे म्हणून दाबून सांगताय. आडात सोनेचांदीप्लॅटिनम सगळे आहे, पण पितळ नसले तरी तेच आहे म्हणून तुमची बोंब सुरूये त्याला आता काय करणार. :) बाकी शेंबड्या पोराने ऐकले तरी तुम्ही मात्र ऐकले नसावेसे दिसते.

In reply to by बॅटमॅन

अरेय बाबा त्या बॅटर्‍यांना मी हवं तर तुझा संगणक जोडुन देतो. इलियड वर उजेड टाका ना जरा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

दोन मिनिटं ब्याट्या ईलियानावर कसा प्रकाश टाकणार म्हणून चक्रावलो होतो...

तुडतुडी ताई, आजच आमच्या इन्फोसिसच्या नारायणमूर्तींनी म्हटले आहे---भारतातील आय.आय.टी आणि आय.आय.एस.सी सारख्या संस्थांमध्ये ६० वर्षांमध्ये लोकांच्या जीवनात मूलगामी परिणाम घडवून आणेल असे एकही संशोधन झालेले नाही. आणि ते बरोबरही आहे. पण मग जास्त महत्वाचा प्रश्न कोणता? असे मूलगामी संशोधन कसे होईल हे बघणे की पन्नास हजार वर्षांपूर्वी आमच्याकडे काहीतरी होते म्हणून उगीचच स्वतःला धन्य समजणे?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

पण मग जास्त महत्वाचा प्रश्न कोणता? असे मूलगामी संशोधन कसे होईल हे बघणे की पन्नास हजार वर्षांपूर्वी आमच्याकडे काहीतरी होते म्हणून उगीचच स्वतःला धन्य समजणे?
+१ मुदलात लेख हेच म्हणतोय थोडक्यात. पण काही लोकांचे "climing the victim card and blaming the world" हे इतके टोकाचे होते की मुद्दा राहतो बाजूलाच. अगदी लेखक म्हणतोय तसे "बरे बुवा असेल पूर्वी पण आता भविष्यातल्या जडण घडणीसाठी त्याचा वापर करता येत असेल तर पाहुया ना" त्याला ही विरोध आहे. थोडक्यात "आमच्याकडे होते हे मान्य करा" आणि आम्हाला ग्रेट म्हणा, बाकी . आता "bionic prosthetics" तयार होताहेत जे की अगदी आपल्या अवयवांसारखेच असतील. ते तयार झाले ही आपण आपली पुराणे घेऊन क्रेडिट क्लेम करायला तयार.. चीड याचीच जास्त येते. तयार तर करायचे नाही (आता परत या काळात जर आधी होते तर) पण मानभावीपणा मात्र मुलखाचा..

बाकी काही वेळेस तरी का होईना पाऊस पाडून दाखवलेला आहे. तुमच्या अगस्त्यमुनींप्रमाणे किती बॅटर्‍या बनवल्यात म्हणे तुम्ही? आणि त्या कितीचे व्होल्टेज देतात?>>> किती वेळेस , किती मिलीलीटर , त्यातून कुठली पिकं घेतली ? किती लोकांना प्यायला पाणी मिळालं हे हे सांगता येत नाही ना. त्या रोगान्वारच्या औषधाबद्दल सुधा काही सांगता येत नाहीये. त्या बॅटर्‍या कितीचे व्होल्टेज देतात हे बघायचंय न तुम्हाला . मग करा कि त्यांनी सांगितल्याप्रमाणे . आणि स्वतःच बघा कितीचे व्होल्टेज मिळतंय ते . माझ्या सांगण्यावर कशाला विश्वास ठेवताय ? बरे बुवा असेल पूर्वी पण आता भविष्यातल्या जडण घडणीसाठी त्याचा वापर करता येत असेल तर पाहुया ना>>> exactly . मला हेच म्हणायचय . आपल्याकडे जे काही आहे त्यावर कुठलाही संशोधन होत नाही .कुणालाही त्याबद्दल कुतूहल नाही कि जाणून घ्यायची , शोधून काढायची इच्छा नाही . जे आपलं आहे ते वाईट . आणि इंग्लंड , अमेरीकावाल्यांच सगळं चांगलं हाच आपला गैरसमज आहे . त्यांना आपण नावं ठेवतच नाही आहोत . पण आपल्याकडे जे आहे ते शोधायचा प्रयत्न होत नहि. परकीयांनी वापरलेलं उष्ट खाण्यातच आपल्या लोकांना धन्यता वाटते . अनेक गोष्टी आपल्याकडे आधीपासूनच असूनसुद्धा त्यांची पेटंट केवळ आपल्या नालायक पणामुळे दुसर्यांकडे गेली आहेत . आता ह्याचं संशोधन करायचं म्हटलं तरी कोण करणार ? संस्कृत चं जावू द्या . आपली मातृभाषा तरी लिहिता वाचता किती जणांना येते ? मग कशाचं डोम्बल्याच संशोधन. आणि मग आपल्याकडे असं काही नाहीच त्यांच्याकडेच सगळं आहे म्हणून ओरड करायला मोकळे .

In reply to by तुडतुडी

जुन्या ग्रंथांत सगळे काही आहे हा दावा तुमचा, सबब तो सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची. आमची नव्हे. इतके बेसिक तर्कशास्त्रही कळत नसेल तर मजा आहे. चला, अजून करमणूक करा आमची.

In reply to by तुडतुडी

नै बाकी सगळे आमचे प्रतिसाद तुम्ही इग्नोरलेत ते जौ देत. किमान या एका प्रतिसादाला तरी नीट वाचा. (उत्तराची अपेक्षाच नै.)

In reply to by बॅटमॅन

काय बॅटमॅनकाका तुम्हीपण... अहो आपले भारतीय ही विमाने घेऊन उडत उडत तिकडे पिरामिडवर घिरट्या घालायला जायचे. इजिप्तवाल्या लोकांना हे काय प्रकार माहित नव्हता म्हणून त्यांनी ते कोरून ठीवलंय. आपल्या कडे तर कॉमन होतं ना मग कशाला कोरून ठेवतील? सांगा बरं आजपण आपल्या शाळेतली पोरं चित्र काढतांना डोंगर, त्याच्यामागून उंगवणारा सुर्य, पुढुन वाहणारी नदी असंच चित्र काढतात की नाही? की विमानं, कारा, बाइका, ट्रॅफ्फिक, बिल्डींगी असं काही काढतात?

जुन्या ग्रंथांत सगळे काही आहे हा दावा तुमचा, सबब तो सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची. आमची नव्हे>>> जुन्या ग्रंथात नुसते डावेच नाहीत तर त्यांची प्रोसेस आणि पुरावे सुधा आहेत . सबब ते वाचण्याची जबाबदारी तुमची . आमची नव्हे . दुसर्याला तर्क शिकवण्यापेक्षा वाचण्याचे कष्ट घेतले म्हणजे काही बेसिक गोष्टी क्लिअर होतील .

In reply to by बॅटमॅन

मेल्या, पुराणात विमानं उडत होती म्हणशील तर काय जीभ झडेल तुझी? "सत्य वदे वचनाला नाथा" ऐवजी तुला नुसते "क्यिर्र" कसे ऐकू येते रे?

In reply to by बॅटमॅन

पुलंची प्रतिभा अफाट आहे पण कुठल्या प्रसंगाला पुलंचे कुठले वाक्य चपखल बसेल ते ओळखणे हेही येरागबाळ्याचे काम नव्हे! असो.

In reply to by तुडतुडी

ग्रंथात उल्लेख असणे हा फक्त ग्रंथात उल्लेख आहे ह्याचा पुरावा असू शकतो. त्या वापरुन विमान वा अन्य प्रगत वस्तू बनवल्या तरच तो ठोस पुरावा असू शकतो. कारण ग्रंथातील उल्लेख हा निव्वळ कल्पनारंजन असू शकते. अनेक कविता, अरेबियन नाईटस, वेताळ पंचविशी अशा अनेक पुस्तकात अत्यंत रम्य पण कपोलकल्पित गोष्टी आहेत. म्हणून निव्वळत पुस्तकातले खरे नाही. अगदी प्रोसेस आणि विधी तपशीलवार दिले असले तरी. आज विमानविद्या आहे, इलेक्ट्रोनिक उपकरणे आहेत ह्याचा पुरावा पुस्तके हा दिला जात नाही. उडणारी विमाने, चालणारी उपकरणे दाखवता येतात. जोवर पुराणातील वांग्यांचे ठोस अविष्कार दिसत नसतील तर त्या पुस्तकी मंत्रतंत्रांचे महत्त्व अत्यंत मर्यादित, ऐतिहासिक पण काल्पनिक दस्तावेज इतकाच. हा पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रयत्न आहे ह्याची प्रस्तुत लेखकाला जाणीव आहे पण तरी एक शेवटचा प्रयास.

झोंबी लोकांनी १० हजार वर्षांपूर्वी सुपरकॉम्प्युटरचा शोध लावला होता.परवा अमेरिकेचे यान प्लूटोपलीकडे गेले.झोंबी लोकांची याने १० हजार वर्षांपूर्वीच त्याच्या दुप्पट अंतर लीलया पार करत असत.झोंबी लोकांच्या शनीच्या कड्यावर वसाहती होत्या.तिथे बुलेट ट्रेन, न्युक्लिअर रिअ‍ॅक्टर, स्मार्ट सिटी या सगळ्या गोष्टी होत्या.सूर्यावरील तापमानही सहन करू शकेल असे मटेरिअल बनविले होते झोंबी लोकांनी.त्या मटेरिअलची घरे बनवून सूर्यावरही वसाहत होती आणि तिथे मनुष्यवस्ती असल्याचे झोंबीपुराणातील ४७७ व्या खंडातील १९२ व्या अध्यायातील २१४ नंबरच्या श्लोकात उल्लेख आहेत.पृथ्वीवरही झीरो ग्रॅव्हिटी त्यांनी तयार केली होती.पृथ्वीवरून चंद्रावर जाणारा ब्रीज त्यांनी बांधला होता. त्यावरून झोंबी लोकांच्या गाड्या २००० किलोमीटर प्रतिमिनिट इतक्या महाप्रचंड वेगाने जात असत.अनेक लोक नोकरीला चंद्रावर असत आणि विकेंडाला पृथ्वीवर येत असत आणि सोमवारी सकाळी लवकर निघून सकाळी ८ ला चंद्रावरील ऑफिसात हजर असत. झोंबी लोकांनी कित्ती प्रचंड प्रगती केली काय सांगू. सध्याची मानवी प्रगती त्यापुढे काहीच नाही. या सगळ्याला पुरावा मागता? अहो झोंबीपुराणात झोंब्यस्त ऋषींनी केलेले प्रयोग तुम्ही करून न बघताच असे प्रश्न विचारता? आणि झोंबी लोकांनी इतकी प्रगती केली होती हे खोटे असेल तर ते सिध्द करायची जबाबदारी तुमची. आम्ही आमच्या मनाला येईल ते दावे करणार. काय समजलात?

वैमानिक शास्त्र, यंत्र सर्वस्व -by rishi भारद्वाज ऋग्वेद - ह्यात वेगवेगळ्या यानांची माहिती दिली आहे अथर्ववेद , आयुर्वेद - ह्यात रोग आणि त्यांच्या औषधांबद्दल माहिती दिली आहे . षड्दर्शन समुच्चय - by हरिभद्र वैशेशिका, उलूक कांड -by महर्षी कणाद . ह्यात atomic system आणि physics बद्दल माहिती आहे . तसेच Time आणि space बद्दल सुधा सांगितलंय . सांख्य आणि योग -by rishi कपिल . ''enery can neither be created nor be destroyed. It can be convereted to one form to another form' हा सिद्धांत ह्याच्यात सांगितलाय . तसंच जैविक उत्क्रांती संबंधी ह्यात माहिती आहे .

In reply to by तुडतुडी

वैमानिक शास्त्र हा ग्रंथ फ्रॉड असल्याचे अगोदरच सिद्ध झालेले आहे. बाकी ॠग्वेदात कुठल्या यानाची माहिती आहे जरा सांगा बघू. काये, आमच्या तोकड्या बुद्धीने केलेले वाचन बहुधा अपुरे पडले असेल. आपण वाचन केलेत तर सांगावे. आयुर्वेदाबद्दल सहमत. अथर्ववेदात मुख्यतः अमुक रोग झाला तर काय मंत्र म्हणायचा इतकेच दिले आहे. ते म्हणून तुम्हांला गुण आलाय का? असल्यास सांगावे, सायन्स जर्नलमध्ये शिफारस करतो आत्ताच्या आत्ता. बाकी कणादांनी एक फक्त एकोळी सिद्धांत मांडला म्हणून आपल्याकडे न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर होतेच, बरोबर? त्या हिशेबाने मीही दुसर्‍या आकाशगंगेतल्या राज्याचा स्वामीच आहे. पुरावे मिळणार नाहीत आणि पुरावे विचारणारे मूर्ख, पाखंडी, इ. आहेत. सेम विथ कपिलऋषी. नक्की कुठल्या अध्यायात दिलेय? तुम्हांला आहे ना माहिती, मग सांगा की आम्हां अडाणी जनांना. आम्हीही मिळवू नवीन ज्ञान. ग्रंथातील कितव्या अध्यायात काय विधान आहे हे जरा दाखवा, आम्ही अडाणी लोक तुमचे उतराई होवू. आपल्या इतिहासाबद्दल तुम्हांला खूप माहिती आहे असे दिसते, तरी तुम्ही हे ज्ञान वाटावे अशी विनंती आहे. त्याने आमचाही फायदाच होईल.