Skip to main content

गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मूलन होऊ शकते काय? -३

लेखक कलंत्री
Published on मंगळवार, 02/12/2008
तरुणपणी मी काही घोषणा ऐकत असे, हसके लिया पाकिस्तान और लढके लेंगे हिंदुस्थान. असे ऐकल्यावर माझे रक्त खवळत असे.बर्‍याच वेळेस शब्दांचा वापर आवश्यकतेपेक्षा नकळतच चांगला अथवा वाईट परिणाम साधत असतो.जसा जसा मी मोठा होऊ लागलो तेव्हा नकळतच त्यांची बाजू काय असावी किंवा काय असू शकते यावर थोडाफार कयास, तर्क बांधू लागलो. तेव्हा मला असे वाटले की ही घोषणा अशी असायला हवी होती, लढके लिया पाकिस्तान और हसके लेंगे हिंदुस्थान. अशी जर घोषणा असती तर? अर्थातच हसके लेंगे साठी पाकिस्तान्यांनी अथवा मुस्लिमांनी आदर्श वागण्याची काही तत्त्वे पाळली असती तर कदाचित अतिरेकाकडे त्यांना जावेही लागले नसते आणि त्यांचा कार्यभागही साधला गेला असता. पाकिस्तानातील अथवा पाकिस्तानधार्जिण्या मुस्लिम लोकांनी खरे तर यावर विचार / आचार केला असता तर? यशवंतराव चव्हाणांचे एक वक्तव्य मननीय आहे, भारतात अनेक आंदोलने होतात, कधी कधी आंदोलक वैफल्यातून अथवा अति उत्साहातून विभाजनाची मागणी करतात. तमिळ वेगळ्या प्रांताची मागणी करतात, पंजाबी वेगळ्या प्रांताची मागणी करतात, बोडो,असामी वेगवेगळ्या प्रांताची मागणी / धमकी देतात. अशावेळेस सर्वसामान्य भारतीय असे वक्तव्य फारसे मनावर घेत नाही, पण मुस्लिमांनी असे काही वक्तव्य केले तर सर्वसामान्य माणूस लगेच मुस्लिम कसे देशविरोधी आहे यावर लगेच वक्तव्य करतात. कोणास ठाऊक हिंदू-मुस्लिम संबंधात भारतीय नकळतच जास्त संवेदनशील होत असतात कदाचित हीच या समस्येची बीज कहाणी असावी. माझ्या लेखमालेच्या संदर्भात मी या ४/५ दिवसात बराच उलट सुलट विचार करीत होतो, प्रश्न विचारत होतो, उत्तरे शोधत होतो, एका प्रश्नाचे उत्तर मात्र मला मिळाले नाही, मला एकही मुस्लिम मित्र का नाही? कदाचित नोकरीमध्ये मुस्लिमांची संख्या कमी असावी, सांस्कृतिक जीवनात त्यांचा प्रभाव कमी असावा, नेमके कारण काहीही असो, मात्र आपणाला मुस्लिम मित्र नाही हे सत्य मला स्वीकारावेच लागले. ( अपवाद एक मुलगी आहे की तिला मी बहीण मानलेली आहे.) परतू जसे मला हिंदू मित्र आहे, ज्यांच्याशी मी चेष्टा, मस्करी, गप्पा, गुजगोष्टी करू शकतो तसा मात्र मुस्लिम मित्र मला नाही. अतिरेकी असो अथवा शांतताप्रेमी पाकिस्तान नागरिक असो, आपले आणि त्यांचे कदाचित प्रत्येक मुद्द्यावर एकमत होणार नाही, पण संवाद नक्कीच झाला पाहिजे यात कोणाचे दुमत असू नये. त्यांच्यापर्यंत आपणाला पोहोचायलाच हवे. सगळेच पाकिस्तानी हे अतिरेकी असतात असा कोणा पाकिस्तान विरोधी व्यक्तींचा पण दावा असणार नाही, असो याबाबत बरेच लिहिता येईल. सर्वात मुख्य म्हणजे आपला ( आपल्या सारख्या नागरिकांचा) पाकिस्तानीशी संवाद सुरू झाला पाहिजे. जे कोणी अतिरेकी बनले आहेत कदाचित त्यांच्यावर तत्काळ आपला प्रभाव त्यांच्यावर पडणार नाही, पण तेथे असलेल्या शांतताप्रेमी, भारतपाक संबंध चांगले व्हावेत यावर विश्वास असणार्‍या लोकांचे हात आपण बळकट केले पाहिजे. कदाचित यावर व्यक्ती म्हणून किंवा संस्था बनवून आपल्याला काहीतरी काम सुरू केले पाहिजे. आपली निष्क्रियता अतिरेक्यांना मूक संमतीच वाटते. माझ्या मते खालील गोष्टी करता येतील. अशा कार्यक्रमामुळे शांतताप्रेमी, बंधुभावावर विश्वास ठेवणारे यांना काहीतरी कार्यक्रम मिळेल. १. सध्या एखादे भारत-पाक मित्रमंडळ अस्तित्वात असेल तर त्या मंडळाला आपण जोडून घेतले पाहिजे, नसेल तर त्याची निर्मिती केली पाहिजे. २.भारतातून अशा नागरिकांना पाकिस्तानामध्ये जाण्यासाठी मदत केली पाहिजे. त्याच प्रमाणे पाकिस्तानामधील अशा समानविचारांच्या नागरिकांना भारतात सन्मानपूर्वेक बोलावले पाहिजे. ३.भारतात पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांना उच्चशि़क्षणासाठी बोलावले पाहिजे, त्यासाठी असलेले विद्यावेतन, शिष्यवृती दिली पाहिजे. ४.पाकिस्तानामध्ये वैद्यकिय सेवा आपल्यासारखी प्रगत नाही. आजारी / दुर्धररोगाने ग्रस्त असलेल्या लोकांना भारताने सर्वतोपरी मदत केली पाहिजे. ५.भारत / पाक शासनाकडे प्रवाश्यांची देवाणघेवाण सुलभ आणि जलद होईल अशी प्रक्रिया राबवली पाहिजे. आजही अनेक मंदिरे, गुरुद्वारे पाकिस्तानात आहे. तसेच अजमेर शरिफावर अनेक पाकिस्तान्यांची भक्ति आहे. योग्य तो प्रचार केला तर साईबाबा हे भारत आणि पाक यांच्या भाविकाचे आदर्श भक्तिस्थान होऊ शकतील. ६.पंजाब आणि पंजाबी पाकिस्तानी लोकांचे सांस्कृतिक जीवन बरेच सारखे आहे. त्यांच्या मध्ये कला आणि कलाकारांचे आदानप्रदान जास्त प्रमाणात होईल अशी योजना आखली पाहिजे. ७.खेळ हा लोकांना चांगल्या पद्धतीने जोडत असतो. भारत पाक मध्ये क्रिकेट, हॉकी, कुस्ती, कबड्डी इत्यादी खेळ खेळले जातात. महाविद्यालयीन, हौशी आणि व्यावसायिक लोकांना वारंवार खेळण्याची संधी दिली पाहिजे. असे सामने आयोजित केले पाहिजे. ८.गरीब लोकांकडून अतिरेकी लोक होण्याची शक्यता जास्त असते. पाकिस्तानातील हुशार मुलांना शि़क्षणासाठी शिष्यवृत्ती देता येईल अशी योजना आखणे. ९.पाकिस्तानामधील वर्तमानपत्रात, मासिकात भारतातील हिंदू-मुस्लिम समाजाच्या चांगल्या भागाचे, सौहार्द, सहिष्णू वागण्याचे वास्तव दर्शन घडवले पाहिजे. १०.भारतातील भागातून पाकिस्तानात त्यांच्या आवडीचे आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी कार्यक्रम घडवून आणावेत ( सध्या असे होत असावे असे मी ऐकतो, भारतातील दूरचित्रवाणीचे कार्यक्रम, चित्रपटाचे पाकिस्तानात बरेच चाहते आहेत असेही मी ऐकतो.) ११.माझ्या एका मित्राने सुचविले आहे की भारत आणि पाकिस्तानाची चलनव्यवस्था एक केली तरी बराच फरक पडू शकतो. १२.दोन्ही देशातील व्यापार वाढविण्यासाठी प्रयत्न करणे. १३.अतिरेकी का बनतात, कसे बनविले जातात, त्यांची दिशाभूल कशी केली जाते, त्यांच्या दारिद्र्याचा आणि भावनांचा वापर कसा होतो याबाबत साहित्य निर्मिती होईल अशी योजना आखणे आणि त्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणे. १४.मुस्लिम आणि हिंदूधर्मग्रंथांतील साम्य याबाबत साहित्य प्रसिद्ध करणे. १५.अतिरेकी हल्ल्यानंतर सामान्य आणि निरपराधांनाच जास्त झळ लागते. भारतातील अथवा पाकिस्तानातील पोळलेल्या लोकांच्या हकिकती प्रसिद्ध करणे. १६.कोणताही धर्माचा अतिरेकी विचार इतर धर्माबद्दल असहिष्णू बनवत असतो. प्रत्येक धर्माच्या या बाजूबद्दल पुस्तके, साहित्य प्रकाशित करणे. १७.भारत जर अखंड राहिला असता तर अखंड भारताचे स्थान आज महासत्तेच्या अग्रभागी राहिले असते. भारत, पाक आणि बांगलाच्या विभाजनाने आपण काय गमावले आणि काय गमावत आहोत याचा सातत्याने प्रचार करत राहणे. १८.जगात अनेक ठिकाणी पाक आणि भारतातील विद्यार्थी, नागरिक, नोकरीदार एकत्र राहत असतात. त्याच्यांमध्ये सामंजस्य निर्माण होईल यासाठी मंडळे स्थापन करणे. १९.बांगला देश आणि बंगालमध्ये रविंद्रनाथाच्या प्रेमाचा समान धागा आहे. असेच धागे भारत -पाक मध्ये ( उदा. भगतसिंग) निर्माण करणे. २०.भारतात मुस्लिमसत्ता जवळजवळ ७०० वर्ष राहिलेली होती. अनेकवेळी राजा मुस्लिम आणि प्रधान हिंदू असा प्रकार असे. अशा एकतेचे साहित्य प्रकाशित करणे. अनेक राजांनी इतरधर्माचा सन्मान केला होता, त्यांना जमिनी,दानपत्रे दिली होती. त्याच्याबद्दलची माहिती पुन्हा प्रकाशित करणे. वरील यादी कमी अथवा जास्त करता येईल. मुख्य म्हणजे हे सोपे आहे, सहज आहे आणि आवश्यक आहे. द्वेष आणि तिरस्काराची भावना भारत आणि पाकिस्तानाला घातकच ठरेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी किती वेळ लागेल? माननीय क्लिंटन ( मिपा अग्रलेखाचे लेखक आणि प्रखर देशभक्त) हे जर सैन्यकारवाईसाठी २००० वर्ष थांबायला तयार असतील तर चर्चा आणि आदानप्रदानाच्या कार्यक्रमासाठी आपण २५ वर्ष द्यायला काहीच हरकत नाही. पुढील समारोपीय लेखात भारताचे विभाजन हे कसे अनैसर्गिक होते आणि त्याचे एकत्र येणे कदाचित अवघड असेल तरी आपण चांगले शेजारी कसे बनू शकतो यावर असावा असा माझा कटा़क्ष असेल. द्वारकानाथ

वाचन संख्या 20625
प्रतिक्रिया 58

प्रतिक्रिया

आर्धा लेख वाचूनच डोक्याला शॉट गेला ... कोणत्या अँगल ने विचार करता हो तुम्ही ?
लढके लिया पाकिस्तान और हसके लेंगे हिंदुस्थान. अशी जर घोषणा असती तर? अर्थातच हसके लेंगे साठी पाकिस्तान्यांनी अथवा मुस्लिमांनी आदर्श वागण्याची काही तत्त्वे पाळली असती तर कदाचित अतिरेकाकडे त्यांना जावेही लागले नसते आणि त्यांचा कार्यभागही साधला गेला असता.
टाळ्या ... माझे हात दुखले आता टाळ्या वाजवून ... ह्यावर एकच उपाय. १. लेखक मोहोदय आणि समविचारी लोकांना पाकिस्तानचं नागरिकत्व दिलं पाहीजे. अशा विचारसरणीची गरज तिकडेच आहे. २. डोक्याचा फ्यूज उडाला - टारझन

In reply to by टारझन

लेखक मोहोदय आणि समविचारी लोकांना पाकिस्तानचं नागरिकत्व दिलं पाहीजे. अशा विचारसरणीची गरज तिकडेच आहे. यांच्याबरोबर भारतीय कलाकारांना बाजूला सारुन पाकीस्तानी कलाकारांचा भरणा करणार्‍या,मसिहा महेश भट्ट यांनाही पाठवून द्यावे. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

अहो त्या २० मुद्द्यांत भारताने पाकड्यांवर इतकी मेहरबानी करण्याऐवजी सीमेवर चीनसारखी एक भक्कम भिंत बांधावी. कमी पैसा आणि श्रम लागतील आणि देखरेखीसाठी सीमा कमी होतील. अहो कलंत्री, शाळेतली अर्ध्या चड्ड्यांतील पोरंही एवढी निरागस नसतात हल्ली.

गांधीवादाची भलामण करणारी ही लेखमाला म्हणजे नुकतीच मुंबईत घडलेल्या घटनेत निरपराध नागरिकंवर बेलगाम आणि बेछुट गोळीबार करून त्यांना जीवे मारणार्‍या दहशतवादाला आपल्या असामान्य शौर्याने सामोरे जाऊन जखमी व शहिद झालेल्या पोलिसांचा आणि कमांडोजचा ढळढळीत अपमान आहे असे मी समजतो! आणि या सबंध लेखमालेचा तीव्र शब्दात निषेध करतो..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

गांधीवादाची भलामण करणारी ही लेखमाला म्हणजे नुकतीच मुंबईत घडलेल्या घटनेत निरपराध नागरिकंवर बेलगाम आणि बेछुट गोळीबार करून त्यांना जीवे मारणार्‍या दहशतवादाला आपल्या असामान्य शौर्याने सामोरे जाऊन जखमी व शहिद झालेल्या पोलिसांचा आणि कमांडोजचा ढळढळीत अपमान आहे असे मी समजतो! निषेध रावणातील खलनायक संपवण्याकरिता रामालाही त्याचा वध करावा लागला होता. आणि तुमचे गांधीही त्याच रामाची पुजा करायचे. यावरुनच काय ते समजा. मनुष्यातील वाईट प्रवृत्ती संपत नसेल तर इतरांच्या प्राणांचे रक्षण करण्याकरिता त्या मनुष्याला संपवणे हाच धर्म आहे. (सावरकरवादी) इनोबा कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by विसोबा खेचर

>>या सबंध लेखमालेचा तीव्र शब्दात निषेध करतो..! पुर्ण सहमत! स्वप्निल

>>गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मूलन होऊ शकते काय? नाही....

२१. भारताला पाक मध्ये सामिल करुन, बांग्र्लादेश, अफगाणला पण एकत्र करावे. त्यातून अखंड पाकीस्थान निर्मान होइल. २२. भारतात असनारी गरिबी, ही पाक मध्ये असलेल्या गरिबीपेक्षा भयान आहे त्यामूळे सर्व मुस्लीमेतरांनी आपल्या पगाराच्या २० टक्के रक्कम पाक मध्ये पाठवावी. २३ विभाजनामूळे उपखंडाचे मोठेच नुकसान झाले आहे त्यासाठी अखंड पाक ने युरोप, अमेरिकेवर हल्ला चढवावा. २४. अतिरेकी का बनतात, त्यांना थोपविने अशक्य असल्यामूळे अखंड पाक मध्ये सर्वच लोकांना देवबंदीच्या मदरस्यांचे शिक्षन मिळेल ह्याची व्यवथा करने मग उगीच अतिरेकी आणि सामान्य नागरीक ह्यात फरक राहनार नाही. २५ झि हिंदी, बाग्ला, मराठी इ वाहीन्यांवर पाकच्या गायकांचे कार्यक्रम भरवून संगीत एकच असते हे पटवून द्यावे. २६. आपले रक्त वाया गेले तरी त्या रक्ताचा रंग एकच असल्यामूळे व हिदू संस्कृती प्रमाने आत्मा अमर असल्यामूळे निधड्या छातीने पुढचे हल्ले पचवावेत. कलंत्री साहेब विथ ड्यू रिस्पेक्ट टु युवर नॉलेज ऍन्ड सिन्सीऍरीटी, तूम्ही भारतातल्या अनेक प्रॉब्लेस कडे दुर्लक्ष करुन ही जंत्री बनवत आहात. प्रत्येक कलमाला खोडून मी निषेध नोंदवनार नाही. त्याची गरज नाही कारण तूम्ही प्रवाहा विरुध्द पोहून मी वेगळा हे दाखवत आहात. काही काही कलमे लिहीताना पुरेसा विचार केलेला जाणवत नाही उदा. एक चलन आणने. लढके लिया पाकिस्तान और हसके लेंगे हिंदुस्थान >> आपली कल्पनाशक्ती खुप भन्नाट आहे. ह्यूमन राइट्स मध्ये काम जरुर करु शकाल. खरच इतिहासापासून न शिकन्याचा आपल्या सर्वांना शाप आहे असे खेदाने म्हणावे वाटते.

In reply to by केदार

तूम्ही प्रवाहा विरुध्द पोहून मी वेगळा हे दाखवत आहात. मला ही असेच वाटत आहे. काही दिवसांपूर्वी मराठी वि इंग्रजी अशी लढाई हा माणूस एकटाच लढत होता त्यावेळी वाटत होते हा मराठीवादी आहे, त्यानंतर बिहार्‍यांना झालेल्या मारहाणीवर महाराष्ट्रातल्या या गांधीने राज ठाकरेंवर आरोप केले आणि बिहार्‍यांवर अशाच काही बंपर ऑफरचा वर्षाव केला तेव्हा वाटले हा राष्ट्रवादी आहे, आता मात्र एवढ्या भारतीयांचा जीव जाऊन सुद्धा यांना त्या पाकड्यांचा/अतिरेक्यांचा पुळका येतोय. काय बोलू आता? 'आयडेंटीटी क्रायसिस' म्हणतात तो हाच का? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

In reply to by इनोबा म्हणे

प्रिय इनोबा, आपला लेख माझ्या र्‍ह्दयावरच आघात करुन गेला. माझी प्रत्येक भुमिका प्रामाणिक आहे. मला माझे मत मांडता येईल पण आज ते मलाही मान्य नाही. आपल्यासारख्या लोकांची मी फसगत करत आहे का? इतक्या आणिबाणीच्या वेळी मी आपणा सारख्यांच्या जखमेवर मिठ चोळत आहे का? आपली काही मानवतावादी, राष्ट्रीय आणि द्रष्टेपणाची भूमिका असावी काय? त्यावेळेस आपण कोणतेही बंधन न मानता तुकारामाच्या भाषेत, ' सत्य असत्याशी मन केले ग्वाही नाही मानियले बहुमता' असा विचार करावा का? असो. द्वारकानाथ

ही केवळ स्वप्न आहेत हो.. जे कधीच शक्य नाहीये ते स्वप्न बघण्यात काय अर्थ्..का खोटी समजूत करून घ्यायची स्वतःची आणि इतरांची? माझा मुळात गांधीवादावर विश्वास नाही. आणि या गोष्टी तर तुम्ही म्हणता त्या प्रमाणे केल्या तरी ते एकतर्फी ट्रॅफिक होईल. भारताकडून आपले राजकारणी करतीलही हे.. पण पाक कडून अशाप्रकारच्या गोष्टी घडणं... अवघड नाही अशक्य आहे. माझ्यामते पाकशी अशा प्रकारचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झालाच तर त्यासारख दुसरं वाईट काही नाही. आवांतर : हा लेख कोण्याही राजकारण्यापर्यंत पोहचू देऊ नये.. नाहीतर आणखी एक "समझोता प्रकरण" लगेच आकार घेऊ लागेल. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

लढके लिया पाकिस्तान और हसके लेंगे हिंदुस्थान अर्रे पण अशी घोषणाच का? दिला आहे ना पाकिस्तान. बसा ना मग गप्प. बाकी तुमच्या १- २० पैकी मुद्द्यांबद्दल काय बोलावे. १. सध्या एखादे भारत-पाक मित्रमंडळ अस्तित्वात असेल .... त्या मंडळाचे अतिरेकी सभासद होतील का? २.भारतातून अशा नागरिकांना पाकिस्तानामध्ये.... ह्याने अतिरेक्यांचे मतपरिवर्तन होईल ? त्या समानविचारांच्या नागरिकांचा बुरखा पांघरून आतंकवादी येतील आणि सगळी डिटेल माहिती घेऊन जाऊन अजून व्यवस्थीत प्लॅन करून हल्ला करतील. ३.भारतात पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांना उच्चशि़क्षणासाठी बोलावले पाहिजे..... आधी सर्व भारतीयांना तरी उच्चशि़क्षण मिळू द्या की हो. इथेच कितीतरी होतकरू विद्यार्थी पैशांअभावी शाळेत सुद्धा जात नाहीत. आधी त्यांची शाळा पूर्ण होईल इतके तरी बघा. तसेच मुद्दा ८ येथील हुशार विद्यार्थ्यांना द्या हो आधी विद्यावेतन, शिष्यवृती. ४.पाकिस्तानामध्ये वैद्यकिय सेवा आपल्यासारखी प्रगत नाही. ... कैक वेळा केली आहे की. कितीतरी अशी ऑपरेशन्स केली आहेत इथल्या डॉक्टरांनी. ५.भारत / पाक शासनाकडे प्रवाश्यांची... केलेच की प्रयत्न. सम्झोता एक्स्प्रेस!!! ती बस ज्यातून वाजपेयी गेले होते. ६.पंजाब आणि पंजाबी पाकिस्तानी लोकांचे सांस्कृतिक जीवन बरेच सारखे आहे. त्यांच्या मध्ये कला आणि कलाकारांचे आदानप्रदान जास्त प्रमाणात होईल अशी योजना आखली पाहिजे. कितीतरी कलाकार येतातच की .. लाफ्टर चॅलेंज पाहिले नाही का आपण? अदनान सामी पण तिथलाच आहे की. आजपर्यंत काय काय नाही केले? समझोता एक्स्प्रेस ७.खेळ हा लोकांना चांगल्या पद्धतीने जोडत असतो. अतिरेकी ग्रेनेड्स ने खेळतात हो. क्रिकेट वगैरे नाही. ९.पाकिस्तानामधील वर्तमानपत्रात, मासिकात भारतातील हिंदू-मुस्लिम समाजाच्या चांगल्या भागाचे, सौहार्द, सहिष्णू वागण्याचे वास्तव दर्शन घडवले पाहिजे. तुम्ही तुनळी वरील हा विडीओ पहिला नाही का? १०.भारतातील भागातून पाकिस्तानात.. तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे ऑलरेडी सुरू आहे. ११.१२ नो कमेंटस १३.१४.१६.२० असे साहित्य उपलब्ध नाही असे वाटते का? ते वाचत नाहीत हाच प्रॉब्लेम आहे ना. १५. अहो तेच तर दाखवतात त्यांना. आपल्या लोकांना हे सगळे सहन करावे लागले आणि आत तुम्ही बदला घ्या हेच तर शिकवतात. १७. अजून खवळून उठतील. http://www.misalpav.com/node/4932 ह्यात काय इच्छा आहे पाहिलेत ना. तारिक जान has a fervent desire to see India, Pakistan and Bangladesh reunited under Islamic rule. १८. परदेशात असताना सगळे एकमेकांशी चांगलेच वागतात हो. माझ्या युनिवर्सिटीत आहेत बांग्लादेशी आणि पाकिस्तानी. अगदी चांगले बोलतात. १९. धागे निर्माण करणे =)) म्हणजे काय? द्वेष आणि तिरस्काराची भावना भारत आणि पाकिस्तानाला घातकच ठरेल भारताने कधीच पाकिस्तानचा तिरस्कार केला नाही. पाकिस्तान सतत करत आले आहे आणि वरीलपैकी बहुतेक सर्व उपाय ऑलरेडी करून झाले आहेत पण त्यांना अक्कल येत नाही म्हणूनच आता युद्ध घोषित करण्याची वेळ आली आहे.

आठवली. "..अहिंसेची नशा दारूपेक्षाही घातक असते.. अट्टल अहिंसाबाज नशेत वाटेल ते बरळत सुटतो..." इ. याचाच प्रत्यय येतो आहे वरच्या लेखात.. "...हसके लेंगे हिंदुस्थान? अर्थातच हसके लेंगे साठी पाकिस्तान्यांनी अथवा मुस्लिमांनी आदर्श वागण्याची काही तत्त्वे पाळली असती तर कदाचित अतिरेकाकडे त्यांना जावेही लागले नसते आणि त्यांचा कार्यभागही साधला गेला असता..." हे वाक्य लिहिल्यावर परत वाचायचे कष्ट घेतलेत का? मुळात तुमच्या देशाबद्दल अशी घोषणा दुसरा देश कसा करू शकतो? आता झालाय ना वेगळे तुम्ही मग "तुमचा देश तुम्हाला आणि आमचा आम्हाला लखलाभ "इथपर्यंतच का थांबू शकत नाही? कमीतकमी या क्षणी तरी अशी वाक्य लिहू नका. याला मीठ चोळणं म्हणतात. असल्या वाक्यांपेक्षा जे. पी. दत्ता च्या पिक्चर मधलं "दूध मांगो खीर देंगे, कश्मिर मांगो चीर देंगे" हे वाक्य कधीही प्रिय आहे.

In reply to by एक

नवीन उजवी विचारसरणी.. अहिंसा ही अफूची गोळी आहे. ती एखाद्याला द्यावी म्हणजे बाकीच्यांचे मनोरंजन होते. पुण्याचे पेशवे

In reply to by एक

>> "..अहिंसेची नशा दारूपेक्षाही घातक असते.. ..." इ. सहमत आहे.... आपण विवेकी आहोत, निरपेक्ष आहोत असे म्हणवून घेणारे सुद्ध अनेकदा याच मध्ये बसत असतात. 'गांधीप्रणित अहिंसेला' भारतात इतका मान कसा काय मिळतो याचे आश्चर्य वाटते. आपल्याला पाठीचा कणा ताठ ठेवायला शिकवणार्या व्यायामांची गरज आहे असे वाटते. -- लिखाळ.

In reply to by एक

एकदम बरोबर, हे वाचून आचार्य अत्र्यांचे अजून एक वाक्य आठवले - "हिंसेने जेवढी हिंसा केली नसेल, तेवढी हिंसा अहिंसेने केली !" [फाळणीनंतरच्या परिस्थितीची पार्श्वभूमी होती ह्या वाक्याला]

या लेखमालेचे नाव "वेताळ पंचविशी" असे ठेवावे. वेताळ मौनधारी विक्रमादित्याला नित्यनवीन गोष्टीत रमवून बोलते करतो आणि मग मौन सुटल्यावर झाडावर लटकतो. पण विक्रमादित्य काही हट्ट सोडत नाही... ह.घ्या. आणि हो यातील विक्रम आणि वेताळ आलटून पालटून दोन्ही बाजू आहेत (लेख लिहीणारे आणि माझ्यासकट प्रतिसाद देणारे :-) ) बाकी या यादीतील बर्‍याच गोष्टी निर्मला देशपांडे करत असत. त्याला का बरे फळे आली नाहीत याचा विचार करतोय....

काल अतिरेक्यांनी वार केले तेव्हा ओरडलो आणि आज तुम्ही वार केलेत त्याने नि:शब्द झालो!! चतुरंग

In reply to by चतुरंग

अतिशय सुंदर प्रतिसाद! मान्य! स्वप्निल

लहानपणी ऐकलेली गोष्ट मला सध्या आठवत आहे, जी येथे सर्वांनाच माहीत असेल: एका लहान मुलाला शाळेत मारामारी करताना शिक्षक पकडतात आणि आईकडे तक्रार करतात पण आई दुर्लक्ष करते. असेच दुर्लक्ष तिच्याकडून सतत प्रत्येक गुन्ह्याकडे मुलगा मोठा होत असताना होते. वाईट सवयी लागत लागत तो मुलगा शेवटी मोठा गुन्हेगार होतो आणि त्याला फाशीची शिक्षा होते. फाशीला जायच्या आधी तो आईला काहीतरी सांगायचे म्हणून जवळ येतो आणि तीच्या कानाला जोरात चावतो. आई कळवळते आणि म्हणते, "अरे मी आयुष्यभर तुझ्यावर प्रेम केले, कधी ओरडले नाहीत, तुझ्या चुका पदरात घालून घेतल्या, आणि तू मला असे मरणप्राय यातना होतील असे चावतोस?" मुलगा एकीकडे त्राग्याने आणि दुसरीकडे खिन्न होऊन म्हणाला की "म्हणूनच चावलो... जर वेळेवर मला शिस्त लावली असतीस, प्रसंगी ओरडून, रागवून, आणि गोड बोलून, तर आज मी असा मरणाच्या दारात नसतो. आजच्या परीस्थितीला कारण तू आहेस" मला कुठेतरी अशीच भिती वाटते की ह्या संपूर्ण समाजातील पुढची पिढी एकदा चवताळून अशा "विचारांना" आणि ते पाळणार्‍यांना म्हणणार आहे, की "आमच्या आधीच्या पिढ्यांना तुम्ही गोंजारत राहीलात, जसे इतर समाजाशी वागलात तसे वागला नाहीत, कुठेतरी "स्पेशल ट्रीटमेंट" दिलीत, परीणामी त्यांना कधी ते भारतीय समाजाचा भाग वाटण्यापेक्षा वेगळेच समजत आले, लाडावत गेले आणि आज त्याची फळे आम्ही भोगत आहोत... आजच्या परीस्थितीला म्हणून खरे कारण तुम्हीच आहात!"

X( लढके लिया पाकिस्तान और हसके लेंगे हिंदुस्थान. अशी जर घोषणा असती तर? अर्थातच हसके लेंगे साठी पाकिस्तान्यांनी अथवा मुस्लिमांनी आदर्श वागण्याची काही तत्त्वे पाळली असती तर कदाचित अतिरेकाकडे त्यांना जावेही लागले नसते आणि त्यांचा कार्यभागही साधला गेला असता. X( X( X( X( >>३.भारतात पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांना उच्चशि़क्षणासाठी बोलावले पाहिजे, त्यासाठी असलेले विद्यावेतन, शिष्यवृती दिली पाहिजे. हो ..म्हणजे अजुन उच्चशिक्शित अतिरेकि तयार झाले पाहीजे..मागे पुन्यात एका अतिरेक्याला पकडले होते तो चांगला शिकलेलाच होता..आणि एक चांगल्या आय. टी. कंपनी मध्ये काम करत होता..हे आठवत नाही का? संसदेवरच्या हल्ल्यात शिकवनारा लेक्चरर जबाबदार होता ना...जे पकडले गेलेत त्यतले बहुतेक शिकलेलेच होते.. जीथे शाळेत असल्यापासुन हेच शिकवले जाते..त्यांना सुधारण्याच्या गोष्ती.. http://en.wikipedia.org/wiki/Anti-Hindu#Pakistan >>५.भारत / पाक शासनाकडे प्रवाश्यांची देवाणघेवाण सुलभ आणि जलद होईल अशी प्रक्रिया राबवली पाहिजे. मागच्या ५० वर्षांपासुन हेच करतोय..तरी कित्येकदा अतिरेकी हल्ले आणि ४ युद्धे झालीत.. >> आजही अनेक मंदिरे, गुरुद्वारे पाकिस्तानात आहे. खालील दुवे बघा..मग समजेन http://en.wikipedia.org/wiki/Hinduism_in_Pakistan http://en.wikipedia.org/wiki/Persecution_of_Hindus#Pakistan अजुन बरच कहि लिहिता आलं असत..पण सध्या थांबतो...पण आपले विचार पटन्यासारखे नाही आहेत.. बाकी टारयाशी पुर्णपने सहमत... स्वप्निल

आत्ता गांधींनी स्वतः हे वाचलं असतं तर तेही चक्रावले असते. असो. जोक्स अपार्ट, सध्याच्या परिस्थितीत गांधीवादाचा नको इतका खिस पाडला आहे असं वाटतंय. - अभिजीत

३.भारतात पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांना उच्चशि़क्षणासाठी बोलावले पाहिजे, त्यासाठी असलेले विद्यावेतन, शिष्यवृती दिली पाहिजे. वरील वाक्य असे असावे बहुतेक.. भारतात पाकिस्तानच्या अतिरेक्यांना उच्चशि़क्षणासाठी (थैमान माजवण्यासाठी) बोलावले पाहिजे, त्यासाठी असलेले विद्यावेतन (दारुगोळा, ए़के ४७) , शिष्यवृती (पैसा, जमिन जुमला ) दिली पाहिजे. त्यांना माणसांना मारण्याची पुर्ण तयारी व्हावी म्हणून आपली मोक्याची ठिकाणे सुद्धा त्यांच्या ताब्यात द्यावीत. माझे हि इथे परदेशात दोन/तीन पाकिस्तानी चांगले (असे मी समजत होतो) दोस्त आहेत ...पण एकानेही माझ्याकडे येउन या घटनेविषयी अजुनपर्यंत खेद व्यक्त केलेला नाही. आणि हो..महेश भट, शबाना, जावेद यांची काय दातखिळ बसली आहे का? अजुनपर्यत एक ही प्रतिक्रिया नाही. कोणी वाचले आहेत का त्यांचे विचार? खादाडमाऊ.

महेश भट, शबाना, जावेद यांची काय दातखिळ बसली आहे का? अजुनपर्यत एक ही प्रतिक्रिया नाही. कोणी वाचले आहेत का त्यांचे विचार? सॉरी तात्या पण डोक्यात तिडीकच गेली माझ्या. एव्हढे दिवस काही भलते सलते शब्द जायला नको म्हणून काही लिहीले नाही पण आता मात्र हा धागा वाचून संयमच सुटला. काय पण लिहीले आहे. सावरकर जर असते तर माझी अंतयात्रा रणगाड्यावरुन काढा म्हणण्याऐवजी मला रणगाड्याच्या तोंडी द्या असेच म्हणाले असते.. - नाटक्या प्रतिसाद संपादित.

हा लेख उपहासात्मक आहे का, केतकरी शैलीतला वगैरे?

द्वारकानाथजी, अतिशय विखारी आणि वैयक्तिक टिकेची झोड उठवली असताना देखिल तुम्ही चालवलेल्या ह्या प्रयत्नांना दाद दिल्या शिवाय राहवले नाही. सध्या परिस्थिती अतिशय स्फोटक आहे आणि जनतेच्या संतापाचा उद्रेक उसळला आहे, अश्या परिस्थित कटू प्रतिसाद येणार ह्याची तयारी ठेउनच तुम्ही हे लिखाण लिहिलेले असणार ह्यात शंका नाही. तुमचे २०ही मुद्दे वाचले. मलातरी त्यातील बरेच मुद्दे विचार करण्याजोगे आणि काही आचरणात आणण्याजोगे देखिल वाटले. हळू हळू धुरळा बसेल तेव्हा बर्‍याच लोकांना शांत चित्ताने हा लेख पुन्हा वाचता येईल आणि बर्‍याच मुद्द्यांवर निदान विचार तरी करता येइल अशी आशा करतो. पुन्हा एकदा तुमच्या ह्या अथक प्रयत्नांना माझ्या शुभेच्छा!

In reply to by कोलबेर

पहिल्या दोन भागांपेक्षा हा भाग आवडला. अतिरेक्यांना धर्म नसतो. मात्र असे धर्माचा आधार घेऊन असे अतिरेकी तयार होऊ नयेत म्हणून तुम्ही सुचवलेले मार्ग वापरावेत असे वाटते. माझे कॉलेज संपल्यानंतर मी बजरंग दलाचे काम फार जवळून बघितले. माझा एक मित्र पुणे जिल्हा संघटक होता. दीपक गायकवाड आणि शरद गोंयकर नावाच्या त्यांच्या राज्य संघटकांशी अनेकजा भेटी झाल्या होत्या. त्यांचे कार्य आणि आता पेपरात वाचतो ते सिमीचे कार्य यामध्ये फार फरक नाही. अशी देशभक्ती दाखवण्यापेक्षा हिंदू-मुस्लिम मोहल्ला कमिट्या, गणेशोत्सवासारख्या कार्यक्रमांमध्ये मुसलमानांनी पुढाकार घेणे, हिंदूंनी ईद वगैरे कार्यक्रमात सहभागी होणे असे कार्यक्रम केल्यास वातावरणात फरक पडेल. उदा. अनेक गावांमध्ये गणपतीप्रमाणेच मोहरमच्या ताबूतांसमोरही दारू पिऊन हिंदू मुसलमान नाचतात. मी काही वर्षे अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वर येथे हा प्रकार पाहिला होता.

In reply to by आजानुकर्ण

त्यांचे कार्य आणि आता पेपरात वाचतो ते सिमीचे कार्य यामध्ये फार फरक नाही. कर्णसाहेब - तुम्हाला ना बजरंग दल माहिती आहे की सिमि. असो... तो स्वतंत्र विषय आहे पण कलंत्रीसाहेबांनी सुचविलेले उपाय योग्य दिशेने आहेत हे म्हणण्याऐवजी बजरंग दलाविषयी एक फुसकुली सोडून देण्यात काय हशील आहे ते कळत नाही.

In reply to by एकलव्य

बजरंग दलाची कार्यपद्धती मी सांगितली आहे त्यापेक्षा वेगळी आहे का? त्यांच्या पद्धतीची देशभक्ती करण्यापेक्षा वेगळ्या स्वरूपाचीही देशभक्ती असू शकते असे मला म्हणायचे होते. गैरसमज नसावा. सिमीविषयी मला फक्त ऐकीव आणि वाचीव माहिती आहे. मात्र बजरंग दलाचे कार्य मी १९९९ ते २००४ असे ५ वर्षे खूप जवळून पाहिले आहे. असो. अनेक ठिकाणी अवांतर किंवा विषयांतर स्वरूपाचे प्रतिसाद येतात त्यापैकीच हा एक समजावा. विषयांतराबद्दल क्षमस्व.

In reply to by कोलबेर

गांधीवाद्यांचा आवडता समज असा की, ते नेहमी शांत डोक्याने आणि सारासार विचार करुनच बोलतात, लिहितात. आणि विरोध करणारे आवेशात असतात, संतापलेले असतात म्हणून ते सध्या विरोध करता आहेत, नंतर विरोधकांनाही पटेल आपली बाजु ! आपल्याला असे वाटते का, वरील २० मुद्दे पूर्वी कुणी मांडले नसतील? संदर्भांची शोधाधोध न करता मी स्टॅंपपेपरवर लिहून द्यायला तयार आहे की याच आशयाचे लिखाण किंबहुना असे प्रयत्न १९५० सालापासून आजतागायत दरवर्षी झाले असतील. बस, रेल्वे सुरु करुन झाल्या, मैत्रीगट स्थापन झाले, एकत्र सामने खेळून झाले. तरीपण पुन्हा आज ह्याच आशयाचे विचार तुम्हाला का मांडावे लागले ? वारंवार असे प्रयत्न करुन सुध्दा निष्पाप माणसे मरतात ते थांबविण्यासाठी काय करावे हे कृपया २१ व्या मुद्यात सांगा. गांधीवादाला अनुसरुनच आपण कायमच संयंमित प्रतिक्रिया दिली आहे, लाहोरमधून सैन्य मागे घेतले, कारगिलच्या वेळी पण आपला गेलेला भाग परत घेतला तोसुधा त्यांच्या भूमीत प्रवेश न करता, ह्याच्याहून जास्त चांगुलपणा काय दाखवावा? जोपर्यंत आपली जरब बसत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीच गंभीरपणे घेणार नाही. पूर्ण युध्द करा असे म्हणणार नाही मी, पण अतिरेक्यांचे तळ नक्कीच उध्वस्त केले पाहिजेत, त्याच्यानंतर भले २०ही मुद्दे अंमलात आणा. बाकी सगळे सोडा हो, १/४ तळ जरी पाकने स्वत:हून बंद केले तरी मी मान्य करायला तयार आहे गांधीवादाने अतिरेक्यांचे कायमचे निर्मूलन होउ शकते. ११.माझ्या एका मित्राने सुचविले आहे की भारत आणि पाकिस्तानाची चलनव्यवस्था एक केली तरी बराच फरक पडू शकतो.>> पटते मला, पाकिस्तानला पण पटत असावे - खरेखोटे माहित नाही पण ते भारताला फुकट नोटा छापून देतात असे ऐकुन आहे ;)

भारत, पाकिस्तान यांमध्ये सहकार्य आणि समरसता असणे गरजेचे नक्कीच आहे. कलंत्रीसाहेबांनी सुचविलेल्या उपायांमधील क्रमांक ११ (भारतपाकचे एकच चलन) ला माझा अर्थशास्त्राच्या भूमिकेतून विरोध राहील. तसेच क्रमांक २० (राजा-प्रधान वगैरे) थोडे नाजूक प्रकरण आहे आणि भलतीकडेच जाऊ शकते असे म्हणावे लागेल. बाकी उपायांना कमीअधिक प्रमाणात नक्कीच सहमती आहे. असो... भारतातील वेगवेगळ्या सरकारांनी हे आणि असे प्रयत्न केलेले आहेतच. ते वाढीला लागण्याचीही गरज आहे. अतिरेक्यांशी सामना करण्याचा आणि त्याचा अप्रत्यक्ष संबंध नक्कीच आहे. पण आज भारतीय नेतृत्व कमी पडते आहे ते कणखरपणे जे देशविघातक कृत्य करणारे आहेत त्यांच्याविरुद्ध काही ठोस कारवाई करण्यासाठी. लाहोरला बस नेताना कारगिल होता उपयोगी नाही. अतिरेक्यांचे निर्मूलन करायचे असेल तर झपाट्याने हालचाल करू शकणारे सैन्य हवे, त्यांना न डगमगता आदेश देणारे नेते हवेत, गरज पडल्यास प्रार्थनास्थळांमध्ये शिरण्याची तयारी हवी आणि गुन्हेगाराला जबर शिक्षा देण्याची धमक हवी. (मुंबईवर झालेले हल्ले पाहता अतिरेक्यांच्या खुल्या आणि छुप्या साथीदारांना यमसदनाला पाठवायला हवेच पण काही लष्करी आणि पोलिस अधिकार्‍यांवरही निष्काळजीपणाचे खटले चालायला हवेत.)

सर्व मिपाकर, सर्वात प्रथम मी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझे मत पटो अथवा न पटो आपण मनापासून वाचली, प्रतिसाद दिले आणि आपापले मत व्यक्त केले. परत एकदा मी मान्य करतो की आजपर्यंत असे अनेक हल्ले झाले त्यापेक्षा यावेळचा हल्ला हा माझ्या मनावरच हल्ला करुन गेला. अशा वेळेस नकळतच आपल्यामनातील सर्व विचार समोर उभे राहतात. माझी परत एकदा सर्वांना विनंते आहे की कृपया शांतपणे विचार करा. आज कोणाच्या जीवावर आपण निर्धास्त असावे? गुप्तचर संघटना, भ्रस्टाचारी प्रशासन, शासन, अपुरे असलेली साधन सामुग्री असलेली पोलिस यंत्रणा, बेवकुफ राजकारणी ( विलासराव, अच्युतानंद ) अशा वेळेस दुरगामी विचार आणि आचार करावयाला काय हरकत आहे? सद्याचे युद्ध / दहशतवाद अशा एका टप्प्यावर आले आहे की मला तरी रात्री परत घरी येईलच याची खात्री राहीलेली नाही. कधीही आणि कोठेही हल्ला होऊ शकतो. अशा वेळेस या समस्येला समोर जाऊनच, त्या (पाक) देशात जाऊनच आणि शांततेचे प्रयत्न करण्यात थोडासा वेडेपणा दिसत असलाच तर तो समजुन घेतला पाहिजे, योग्य वाटल्यास त्यावर कार्य केले पाहिजे. आपण मिपावर बरेच लेख लिहित असालच. विचार, शब्द आणि ओघ यांचा समन्वय साधणे किती अवघड असते याची कल्पना आपणास असेलच. आपल्याला जे काही पटत आहे ते स्विकारा आणि जे त्याज्य वाटते ते निषेधा. कृपया कार्यान्वित व्हा. कोरडे प्रतिसाद आपला वेळ वाया घालवतील याबद्दल निशंक रहा. द्वारकानाथ

In reply to by कलंत्री

हा लेख मला पटला किंवा नाही पटला... हा भाग पूर्णपणे सोडून मला एका गोष्टीचं खूप कौतुक वाटतं... ती म्हणजे, आलेल्या प्रतिसादांपैकी ९०% प्रतिसाद नकारात्मक आणि टीकेची झोड उठवणारे आहेत.. तरीही आपला शेवटचा प्रतिसाद अतिशय संयमी, शांत आणि निर्विवादपणे विचार करून लिहिलेला आहे. याबद्दल तुम्हाला मानलच पाहिजे. धन्यवाद. थोडे दिवसांनी पुन्हा एकदा हा लेख वाचून पाहीन.. आणि मग पुन्हा आपल्याला कळवेन. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

कलंत्री तुम्ही लेख माला चुकीच्या वेळेला प्रसिद्ध केली आहे , नाहीतर मिपा वर गांधी प्रेमाचा पुर आला आसता. प्रत्येकाने काळाचे भान ठेवले पाहिजे. गांधीचा काल वेगळा होता हा वेगळा आहे. आपल्यात काल बदल्याची ताकत असेल तर खुशाल गांधी वादी बना !! सत्यवादी

सदर लेखात तुम्ही गांधीवादाचा अतिरेक करत आहात. ह्याच अतिरेकी गांधीवादामुळेच महात्मा गांधींचा बळी गेला होता.ज्याअहिंसेचा जनक म्हणुन बुध्दाला ओळखले जाते त्याला पण प्रत्येक व्यक्तिचा स्वःसंरक्षणाचा हक्क मान्य होता. इथे तुम्ही उलटच लिहता आहे.आजच्या काळात गांधीवाद एक इतिहास आहे,तो वापरात कसा आणणार?जर खरोखर गांधीवाद इतका पावरबाज असता तर गांधीजीच्या अनुयायानी तो जगभर पसरवला असता. गांधीवाद हे एक स्वप्न आहे. जे कधीही सत्यात येण्याची शक्यता नाही. बौध्दपंथ सर्व जगात पसरला गेला कारण तसा तो व्यापक आहे. पण तुमच्या गांधीवादाची आज त्याच्या जन्मस्थळीच कबर बांधली गेली आहे असे का? वरील लेखात तुम्ही जे जे मुद्दे मांडले आहेत त्यातले निम्मेअधिक मुद्दे वापरले गेले आहेत,पाकिस्तानी लोकाना उपचार,दळणवळण सुविधा इत्यादी पण त्याने काय फरक पडला? काही नाही उलत ते आता दवाखान्यांवर हल्ले करु लागले आहेत.एकत्र चलन आणणे हे शक्य नाही कारण ते आता दिवाळखोरीत आहेत. तसे करणे आता आत्महत्या करण्यासारखे आहे. बाकी तुमच्या गांधीवादाच्या ओवर डोसामुळे डोके जाग्यावरच राहिले नाही :T तसेच तुम्ही तुमच्या अतिरेकी गांधीवादामुळे समाजाला तुमच्या विरुध्द हिंसेला प्रवृत्त करत आहात :| त्याबद्दल तुमचा जाहिर निषेध. वेताळ

माझ्या लेखमालेच्या संदर्भात मी या ४/५ दिवसात बराच उलट सुलट विचार करीत होतो, प्रश्न विचारत होतो, उत्तरे शोधत होतो, एका प्रश्नाचे उत्तर मात्र मला मिळाले नाही, मला एकही मुस्लिम मित्र का नाही? कदाचित नोकरीमध्ये मुस्लिमांची संख्या कमी असावी, सांस्कृतिक जीवनात त्यांचा प्रभाव कमी असावा, नेमके कारण काहीही असो, मात्र आपणाला मुस्लिम मित्र नाही हे सत्य मला स्वीकारावेच लागले. ( अपवाद एक मुलगी आहे की तिला मी बहीण मानलेली आहे.) परतू जसे मला हिंदू मित्र आहे, ज्यांच्याशी मी चेष्टा, मस्करी, गप्पा, गुजगोष्टी करू शकतो तसा मात्र मुस्लिम मित्र मला नाही. मी गेल्या काही दिवसांपासुन तुमची लेखमाला वाचत आहे. एका ठिकाणी हलकासा एक प्रतिसाद याव्यतिरिक्त मी काहीही भाष्य केले नाही. सुदैवाने (!) मला अनेक मुस्लिम मित्र असुन माझे अनेक वेळेस त्यांच्याकडे जाणे येणे असते. अजुनही आहे. गेल्या पंधरावीस वर्षांपासुन हिंदु धर्मग्रंथांचा अभ्यास करतांना उत्सुकतेपोटी मी इतरही अनेक धर्मांचे ग्रंथ / पुस्तके यांचे आवर्जुन वाचन केले आहे. कुरआन किंवा हादिस यांचा अभ्यास करतांना आलेल्या शंका मी प्रत्यक्ष त्यांच्या धर्मगुरुंना विचारल्या आहेत. गांधीजींचे लेखन किंवा विचार यांचा सुद्धा मी अभ्यास केला आहे. या सर्व अभ्यासावरुन एक गोष्ट मी ठामपणे सांगु शकतो की, गांधीवाद हा या समस्येवर उपाय नाही. भारतातील इतर अंतर्गत गोष्टींसाठी गांधीवाद वापरण्यास माझी हरकत नाही. परंतु भारत आणि पाकिस्तान ही आता दोन भिन्न राष्ट्रे स्वखुशीने झाली आहेत हे सत्य आपण स्विकारलेच पाहिजे. स्वप्नभंग करण्याचा दोष पत्करुन मी तुम्हाला 'जागे व्हा' असे सांगतो. एकांगी दृष्टीकोन ठेवुन चालणार नाही. समोरचा एके ४७ घेवुन चाल करुन येत असतांना व त्याला दिसेल त्यांना मारुन टाक किंवा मर म्हणजे तुला स्वर्गप्राप्ती होईल अशा विचारांनी भारुन टाकलेले असतांना, आपण आपला जीव वाचवणे हे पहिले व नंतर त्याचा खातमा करणे हेच करु शकतो. गांधींचे विचार चांगले आहेत. वैयक्तिक आचरणासाठी अतिशय चांगले आहेत. परंतु राजकारण ते ही जेव्हा समोरचा कोणत्याही थराला जावुन करत असेल तेव्हा नाही उपयोगी ठरत. मागे प्रतिसादात मी विचारले होते, आता परत विचारतो. कमांडोच्या ऐवजी तुम्ही गुलाबपुष्प घेवुन का नाही गेले ताज मधे‍? -- अवलिया अवलियाची अनुदिनी

आत्ता कुठलेही आक्रमण न करता, फक्त वीस अतिशय मोठ्या अतिरेक्यांना भारताच्या हवाली करा अशी मागणी केल्यावर कालपर्यंत मदत करू, दहशत वादाचा एकत्र मुकाबला करु म्हणणारे झरदारी म्हणतात आम्ही देणार नाही. आणि पुरावे असले तर इथे पाकिस्तानात कोर्ट केस करु. आता मुंबई बॉम्बस्फोटाचा खटला ज्यात आरोप सिद्ध झाले आहेत ( १२ -१५ वर्षांनी) तो खटला हे तिथे कसा चालवणार? कलंत्री साहेब, गांधी वादा प्रमाणे आता पुढे झरदारी यांना कसे पटवून द्यावे ? की ज्यामुळे त्यांचे ह्रूदय परिवर्तन होइल व ते स्वतः हून या सर्वांना भारतीय न्यायालयाकडे सोपवतील. एक प्रवासी विमान पळवून ते अफगाणिस्तान ला नेऊन (तालिबान कडे) ज्या तीन लोकांची सुटका झाली त्या महान व्यक्तींबद्द्ल हे झरदारी पुरावे मागतायत. त्यांना तुम्ही समजावून सांगाल का? की हे वीस लोक गेल्या वीस वर्षातल्या सर्व मोठ्या अतिरेकी कारवायांचे मेंदू आहेत. पण ते कसे देणार परत ? - जर खरोखर कोर्ट केस झाली तर जगाला कळेल की या मेंदूच्या मागे एक मोठा मेंदू आणि हात होता - आय एस आय, या झरदारींची बायको बेनझीर ( जी सर्व पाकिस्तानी नेत्यात सर्वात कडवी होती - वेळेला झियांपेक्षाही) आणि हे सर्व लोक पाकिस्तानात नाहीतच असे नेहमी जाहीर करतात हे मुशर्रफ आणि झरदारी आणि या वीस जणांवर खटले भरायला हे स्वतः अचानक पाकिस्तानी पोलिसांसमोर हजर होणार आहेत का? पण खरेच यावर गांधीवादी पद्धतीने काय करता येइल हे सांगाल का? तुमच्या विचारांची आणि अशा परिस्थितीत कसे वागावे हे तरी कळेल. तुमचे सर्व मुद्दे १० - २० - ४० वर्षांच्या योजना आहेत. या समोर असलेल्या प्रॉब्लेम ला कसं सोडवावं ?

हे बघा कलंत्रीसाहेब पाकिस्तानात आश्रय घेऊन असलेल्या २० अट्टल गुन्हेगारांची यादी भारताने पाकिस्तानला देऊन त्यांना आपल्या हवाली करण्याची मागणी नुकतीच केली होती ती पाकने फेटाळली आहे. हे गुन्हेगार पाकिस्तानात आहेत हे जगजाहीर आहे. आता अशा स्थितीत तुम्ही गांधीवादीमार्गाने उपोषण करून पाकला हे गुन्हेगार भारताच्या हवाली करण्यास भाग पाडा पाहू. पाहूया काय होते ते पाक तुच्या उपासापुढे मान तुकवतो, की उपाशी राहून की तुम्ही गांधींच्या भेटीला जाता हे लगेच कळेल आणि तुमचा गांधीवाद अतिरेक्यांच्या आणि पाकिस्तानच्या बाबतीत कितपत परिणामकारक हे देखील लोकांना कळून चुकेल. फुकट तात्विक चर्चा करून काथ्याकूट करणे सोपे असते, बाकीचे सोडा पण गांधीवादाने अतिरेक्यांचे मन पालटू पाहणारे तुम्ही दोन दिवस सलग उपोषणही करू शकणार नाही! उगाच असल्या भंपक चर्चा करून भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळू नका. तुमच्यासारखे अवसानघातकी या देशात आहेत हे देशाचे दुर्दैव, दुसरे काय?

In reply to by अनंत छंदी

>>>>गांधीवादीमार्गाने उपोषण करून पाकला हे गुन्हेगार भारताच्या हवाली करण्यास भाग पाडा पाहू. अनंत छंदी साहेब हे अज्याबात जमनार न्हाई. आपण फकस्त गांधीवादाचे गोडवे गायचे. ते सुद्धा अशा क्षणी की जेणे करून आपल्याला विद्वत्तेची जास्तीत जास्त प्रसिद्धी होईल. आम्ही येथे पडीक असतो!

In reply to by रम्या

सर्वपक्षिय नेत्यांना आमरण उपोषणाला बसवू या. एकदम विन-विन कंडीशन... पाकने अतिरेकी परत केले तर जिंकले आणि केले नाहीत तर नवीन नेतृत्वाला वाट मो़कळी होऊ शकेल.

In reply to by विकास

भारत सरकार मुत्सदीपणात अतिशय कमी पडत आहे असाच अर्थ मी काढेन. अशा गोष्टीमूळे सर्वसामान्याचे मनोबल कमी होते हे सरकारला समझयाला हवे. गांधीवादाला सूद्धा पूर्वतयारी / प्रतिमा लागते. आज या क्षणी अशी प्रतिमा गांधीवादी लोकाकडे आहे काय?

धागा,धागा अखंड विणुया विट्ठल विट्ठल मुखे म्हणुया.

आपण म्हणता ते सर्व भारतसरकारने याआधी सुद्धा काही प्रमाणात केले आहेच. आणि ते करत राहावेच लागणार आहे. कारण कायम द्वेश आणि युद्धमान परिस्थिती कुणालाच परवडण्याजोगी नाही. पण हे सर्व करण्याआधी आपण किती कणखर आहोत ते दाखवायची वेळ गेली ५० वर्षे (आणि त्या आधी) पासून आहे. क्षमा हे सशक्तांचे भूषण असते. त्याबद्दल आता रान उठवायला हवे. -- लिखाळ.

आपण एवढा मोठा गांधीवाद फक्त चारच भागात संपवू नये अशी नम्र विनंती. तुमचे विचार साधारण ९९धाग्यापर्यंत तुमच्या विरोधकांना कळतील. मी स्वःत दर १०भागानंतर वेगवेगळे स्ट्रेस बस्टर उपाय टाकुन त्यांच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेईन्.एवढे पुण्य मिळ्वुन दिल्याबद्द्ल मी वेगळा धागा टाकुन आपले जाहीर आभार मानीन. आपला नम्र मनाने सिक विप्र.

In reply to by विनायक प्रभू

धागे ९९ च का हवे? जास्त का नको? कोठेतरी कृतीपण करावयाला हवी ना? एखादी पणती छोटी असेल पण ती तिच्या परीने अंधारावर काहीतरी मात करतेच ना?

१. उर्दूला राष्ट्रभाषा घोषित करणे २. बिगरमुस्लिम लोकांना जिझिया कर लावावा. तो पैसा मुस्लिमांना द्यावा. ३. सगळ्या हिंदुत्ववादी अतिरेक्यांना ताबडतोब फाशी द्यावे. मुस्लिम बिचारे कुराणात लिहिले आहे म्हणून अतिरेकी बनतात. हिंदुंच्या कुठल्याही धर्मग्रंथात तसे लिहिलेले नाही. त्यामुळे खटला, चौकशी न करता त्यांचा नुसता संशय आला तरी फाशी द्या. ४. निदान डझनभार पदयात्रा वाजतगाजत भारतातून पाकच्या कुठल्याशा मोठ्या शहराकडे काढाव्यात. निव्वळ अहिंसा, सत्य, प्रेम ह्याच उद्देशाने ह्या यात्रा निघाव्यात. पाकविषयी वा मुस्लिमांविषयी कुठलीही कटुता असू नये. भले अतिरेक्यांनी गोळीबार केला तरी तो हसत हसत झेलावा. किमानपक्षी हजार दहा हजार हिंदूंच्या बलिदानानंतर त्यांना पश्चात्ताप होऊ शकेल. इतका लहान त्याग तरी हिंदूंनी करावाच! ५.शक्य तितक्या हिंदूंनी इस्लाम स्वीकारावा. सरकारने चिठ्ठया टाकून कोण कोण मुस्लिम होणार ते ठरवावे. कदाचित त्यानेही अतिरेक्यान्ची क्रुद्ध मने शांत होतील. कुणी सांगावे? ६. सगळ्या मुस्लिमधर्मीय अतिरेक्यांची तुरुंगातून सुटका. त्यांना दरडोई निदान दहा लाख मदत द्यावी आणि सरकारी इतमामाने त्यांना हवे तिथे नेऊन सोडावे. मग ते पाकिस्तान असो, सौदी अरेबिया असो वा अन्य कुठे. ७. मुंबईतील हल्ल्यात जे मुस्लिम बळी गेले आहेत त्यांना बिगरमुस्लिमांपेक्षा दुप्पट मदत द्यावी. त्यांना चुकीने मारले गेले. त्या चुकीची भरपाई सरकारने द्यावी. म्हणजे मुस्लिम लोकांना हा देश आपला वाटेल. (लक्षात आलेच असेल की हे उपरोधाने लिहीत आहे!)

मला तर लेखमाला वाचून जाणवले ...नो होप्स. लेखकाचा एवढाच दृष्टिकोन आहे कि, "२०० निष्पाप नागरिक मेले तरि चालतील, गांधीवाद तरला पाहिजे." अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

आज २०० मेले तेंव्हा कोणीच अशा हल्ल्याची कल्पना कोणीच केली नव्हती. यापूढे एकाही निरपराधाचे रक्त सांडावयाला नको.

>>गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मूलन होऊ शकते काय? --नाही भगवत गीता सांगताना साक्षात भगवान श्रीकृष्णाने 'माझ्या आप्तांवरच वार कसे करू' असे म्हणुन हातपाय गाळणार्‍या अर्जुनाला काय सांगितले आहे - समोर दिसणारे तुझे आप्त आणि मित्र हे आता शत्रू म्हणुन तुझ्यासमोर उभे ठाकले आहेत त्यामुळे त्यांच्याशी युध्द करून त्यांचा बिमोड करणे हे तुझे कर्तव्य आहे.

In reply to by पक्या

गीतेचा माझ्या माहितीतील अन्वनार्थ. अर्जुन उवाच : मी माझ्या नातलगांना मारण्यापेक्षा भिक मागणे पसंद करेन. कृष्ण उवाच : मी मारतो हा तुझा अहंकार आहे. बघ, हे सर्व काळाच्या उदरात गडप होत आहे. तु फक्त निमित्त्यमात्र आहे. त्यामूळे क्षत्रीयाला उचित असलेले कर्तव्य तू पार पाड. जिंकला तर पृथ्वीचे राज्य आणि मारला गेलास तर स्वर्गाची प्राप्ती. ( अध्याय १ ते ९ वा विश्वर्रुप दर्शन चुभुदेघे)

बर्‍याच दिवसांनी मिपावर आलो आणि श्री. कलंत्री ह्यांचे तिन्ही भागातील लेखन (आणि त्यावरील प्रतिसाद) वाचून काढले. 'हल्ला करणार्‍या अतिरेक्यांच्या शस्त्रांना शस्त्रांनीच उत्तर द्यावे आणि नवीन अतिरेकी निर्माण होऊ नयेत म्हणून गांधीवादाचा आधार घ्यावा' असे कांहीसे लेखकाचे म्हणणे असावे, असे दिसते. गांधी आणि गांधीवादावर ह्या पुर्वीही मिपावर बरीऽऽऽऽऽच चर्चा झालेली आहे. त्यामुळे त्या वादात मी नवीन काही भर टाकू शकणार नाही. पण गांधीजींच्या तत्त्वांवर चालून शत्रूचे हृदय परिवर्तन होईल हा आशावाद भाबडा आहे. हे म्हणजे, कर्करोगासारख्या दुर्धर रोगावर होमिओपॅथीच्या गोळ्यांची नुसती बाटली 'दाखवून' रोग काबूत आणण्याचा प्रयत्न केल्यासारखे होईल. मुळात, भारताला स्वातंत्र्य मिळाले ते गांधीजींच्या आंदोलनांमुळे इंग्रजांचे हृदय परिवर्तन होऊन मिळाले, हा काँग्रेसचा प्रचार आणि प्रसार आहे. ह्या प्रचाराने, ज्या ज्या संघटनांनी जहाल मार्ग अनुसरले आणि इंग्रजांना त्राही भगवान करून सोडले त्या सर्व संघटनांचा, आंदोलकांचा, हुतात्म्यांचा आणि ज्यानी ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या कुटुंबाची राखरांगोळी करून देशकार्याला वाहून घेतले त्या सर्वांच्या त्यागाचा अपमान आणि त्यांच्यावर घोर अन्याय आहे. स्वातंत्र्य प्राप्तीतील श्रेयाचा त्यांचा वाटा त्यांना द्यायलाच हवा. गांधीजी कितीही महान असले तरीही काँग्रेस व्यतिरिक्त इतर आंदोलकांना श्रेय नाकारण्याचा त्यांना हक्क पोहोचत नाही. आणि काँग्रेस इतकेच इतर आंदोलकांनाही श्रेय द्यायचे झाले तर निव्वळ गांधीवादाने, अहिंसेच्या मार्गानेच भारताला स्वातंत्र्य मिळाले असे म्हणता येणार नाही. म्हणजेच गांधीवादानेच इंग्रजांचे हृदयपरिवर्तन झाले हे सिद्ध होत नाही. मग आता, गांधीवादात हृदयपरिवर्तनाची ताकद, किमया नसेल तर ते अतिरेकी निर्मितीच्या प्रक्रियेविरुद्धही कुचकामीच म्हणावे लागेल. मुळात दिडशे वर्ष राज्य करणार्‍या इंग्रजांना भारताला स्वातंत्र्य बहाल करण्याची उपरती नक्की कशामुळे झाली ह्यावर उहापोह होऊन त्या चर्चेच्या निष्कर्षांवर गाधीवादाची ताकद (असेलच काही तर....)तपासून पाहावी. गांधीजींना काँग्रेसने आणि इंग्रजांनीही स्वार्थासाठी 'मोठे' केले असावे असे मला वाटते. ह्याचा अर्थ गांधीजींना कमी लेखणे असा नाही. त्यांची बलस्थाने म्हणजे त्यांची पक्की राजकारणी विचारसरणी, हेकटपणा (चांगल्या ठिकाणी वापरला तेवढाच), सभेच्या हृदयाला हात घालण्याची हातोटी. (म्हणून जनाधार) हे सर्व गुण त्यांच्यापाशी होते. काँग्रेस अंतर्गत गांधीजींच्या शब्दाला असणारा मान हेरून इंग्रजांनी त्याचा वापर देश विभाजनात केला आणि भारताच्या उरावर पाकिस्तान बसविला हा त्यांचा (इंग्रजांचा) स्वार्थ. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर जी सत्तेची हाव काँग्रसला सुटली त्यात त्यांनी त्यांच्याच ह्या महान आत्म्याला किनार्‍याला उभं केलं. हा काँग्रेसचा स्वार्थ होता. मुळात आपला वाद हा, गांधीवादाचा अतिरेक्यांविरुद्ध वापर करून त्यांचे हृदय परिवर्तन शक्य आहे की नाही, हा आहे. आजकालच्या बदललेल्या निती मुल्यांच्या पार्श्वभूमीवर गल्ली गुंडाचेही हृदयपरिवर्तन होणार नाही तिथे अतिरेक्यांचा विचारच करायला नको. आणि खरोखर गांधीवादाने असे होत असेल तर सगळे तुरूंग बंद करून आश्रम काढावे लागतील. ज्या ज्या गुन्हेगारांना न्यायालय सजा देईल त्यांना त्या आश्रमात 'हृदय परिवर्तना'साठी ठेवावे आणि झाले हृदय परिवर्तन की सोडून द्यावे. 'मुन्नाभाई' चित्रपटानंतर गांधीवादाचे खूळ पुन्हा वर आले होते. रहदारीचे नियम तोडणार्‍यांना कांही सेवाभावी संस्था गुलाबाचे फुल देत होत्या. काही सरकार विरोधकांनी सरकारी खात्यातल्या भ्रष्टाचाराविरुद्ध गुलाब पुष्पाचा उपाय करून पेपरात आपले फोटो छापून आणले. काय झाले पुढे? काही काळा करीता गुलाबाच्या फुलांची विक्री छान झाली ह्या पलीकडे काही नाही. 'फुलही रुतावे असा दैवयोग' हल्लीच्या काळी नाही.

In reply to by प्रभाकर पेठकर

'फुलही रुतावे असा दैवयोग' हल्लीच्या काळी नाही. सुंदर..! प्रभाकरपंत, एका वाक्यात अगदी नेमके बोललात...! आपला, मोहनदास अभ्यंकर.

कलंत्री साहेबांचे हे गांधीवादी पुराण वाचून आता माझ्या मनात अतिरेकी विचार येऊ लागले आहेत. एकंदरीत पाहाता कलंत्रींना गांधीवादाचा बुरखा घेऊन पाकिस्तानी अतिरेक्यांचे समर्थन करण्याची हौस आलेली दिसते. तसे असेल तर हे लिखाण भारतात राहून पाकिस्तानी अतिरेक्यांची भलामण करणारे, अर्थात भारतातील कोट्यवधी लोकांच्या देशप्रेमाच्या भावनेशी खेळणारे म्हणजेच राष्ट्रद्रोही ठरते म्हणूनच असल्या अवसानघातकी लिखाणावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, व त्यांचे गांधीवादी विचारांचा गोंधळ घालणारे सर्व धागे तात्काळ बंद करण्यात यावेत अशी माझी विनंती आहे. कलंत्रीसाहेब आणि त्यांचा गांधीवाद त्यांनाच लखलाभ असो. शेवटी जाताजाता ... "जातो तिथे उपदेश आम्हा सांगतो कुणीतरी किर्तने सारीकडे ..सारीकडे ज्ञानेश्वरी काळ्जी आमच्या हिताची एवढी घेवू नका जावू सुखे नरकात तेथे तरी येवू नका." (या ओळी भाऊसाहेब पाटणकरांच्या शायरीविषयी सुरू असलेल्या धाग्यातून साभार!) (त्या येथे चपखल बसतात असे वाटते म्हणून देण्याचा मोह आवरला नाही.)

गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मूलन होऊ शकते काय? नाही. अरे, सर्व विचार आपणच करायचा का? असे लेख पाकड्यांकडुन किती आले ते दाखवा मग गप्पा मारा अश्या. ("कुत्र्याचे" शेपुट "ऑप्रेशननेच" "सरळ" करता येते. ) -( सणकी )पाषाणभेद