Skip to main content

पाळणाघर की ....

लेखक शि बि आय यांनी बुधवार, 01/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
सिनियर केजी मध्ये जाणारी ५ वर्षाची अनघा शाळा सुटताच पाळणाघरच्या काकूंकडे गेली. तिथे पोचल्यावर लगेच आपल्या लहान भावाशी खेळू लागली. काकूंनी आवाज दिल्यावर कपडे बदलून, हात-पाय धुवून परत अक्षयशी खेळायला सुरुवात केली. दुपारचे १२.३० झाले तसे काकूंनी अनघाला वाढले आणि ३ वर्षाच्या अक्षयला भरवण्यासाठी बसल्या. जेवणे झाली. अजूनही अनघाला नीट जेवत येत नव्हते. जेवताना अंगावर सांडत होते पण ती कधीही भरवायला सांगत नव्हती की तक्रार करत नव्हती, कारण तशी सोयच नव्हती. आईकडे केलेली तक्रार ऐकून घ्यायला आईला अजिबात वेळ नव्हता आणि काकूला सांगितले तर त्या आईला सांगतील आणि मग आईचा मार बसेल ह्या धाकापाई ती तिला जमेल तसे खात होती. आजही तिने फ्रॉक वर सांडून ठेवले होते पण सवयीने तिने पाणी लावून साफ देखील करून टाकले पण गुलाबी फ्रॉकवर पिवळे डाग मात्र दिसत होते. ती तशीच खेळू लागली. त्या दोघांना झोपवता झोपवता काकू स्वतःच झोपल्या. तशी दोन्ही भावंड बाहेरच्या खोलीत येउन मस्ती करू लागली. तेवढयात बेल वाजली बेलचा आवाज ऐकून काकू उठल्या. कॉलेजला जाणारा अमरदादाही आला. झालं ! आता धम्माल येणार होती म्हणून अनघा खुश होती. त्यांनी अमरला जेवायला वाढले. जेवून अमरदादा, अनघा आणि अक्षय असे खेळत बसले. आज ४ वाजता काकूंना भिशीला जायचे होते. त्या जाण्यासाठी छान साडी नेसून तयार झाल्या. ती साडी अनघाला आवडायची. आज ती काकूंच्या मागे लागली की मलाही घेऊन चला पण काकूंनी परत आल्यावर त्यांना फिरायला न्यायचे प्रॉमिस केल्यावर तिची कळी खुलली. अमरला लक्ष ठेवायला सांगून त्या भिशीसाठी गेल्या. ती आणि अक्षय खेळत असताना अमर तिथे आला, "अनु तुझ्या फ्रॉकवर किती डाग पडले आहेत चल बदल तो फ्रॉक" म्हणत बेडरूम मध्ये घेऊन गेला. त्याने तिचा फ्रॉक काढला. तिच्या कोमल शरीराला तो जागोजागी स्पर्श करू लागला. चालले आहे ते नक्की काय आहे हे कळण्याचे तिचे नक्कीच वय नव्हते पण जे चालले आहे ते चूक आहे हे मात्र कळत होते. तिने त्याला विरोध केला. पण त्याच्या शक्तीपुढे तिचे काहीच चालत नव्हते. हा आज असा का वागत आहे ? हा आपला अमर दादा नाही हे मात्र तिला कळून चुकले होते. बालबुद्धीनुसार ती अमरला म्हणाली देखील की, " माझा नवीन घेतलेला छोटा भीम तू घे पण माझ्या अंगावर नको नं पडूस मला कसं तरी चं होत आहे. मला घरी जाऊ दे नं रे " तिचा आवाज बंद बेडरूमच्या बाहेर येत नव्हता. हळूहळू विनंतीचे रुपांतर रडण्यात झाले, " नको ना दादाssss ... शीsss .... मला दुखतंय…. नको… सोड मला … मला आई हवी…. नको नं … मला टोचतंयssss " आवाज वाढत जात होता. आपल्या मदतीला कोणी येत नाही हे बघून त्या छोट्या जीवाने निकराचा प्रतिकार सुरु केला. जमेल तिथे चावणे, लाथा मारणे, ओरबाडणे पण फारसा उपयोग झाला नाही. शेवटी त्याला वाटले तेव्हाच तो उठला. उठल्यावर अनघाला जवळ घेतले शरीरावर कुठे वळ, जखम नाही ना ह्याची खात्री केली आणि बाथरूम मध्ये नेउन तिला स्वच्छ करून दुसरा फ्रॉक घातला आणि काही झालेच नसल्यासारखा पुस्तक वाचत बसला. अनघा बाहेरच्या खोलीत दरवाज्याजवळ भेदरून बसून राहिली. आपण अजून काही केले तर अमर दादा आपल्याला परत शिक्षा करेल म्हणून अंगभर दुखत असतानासुद्धा बिचारी गपचूप बसून होती. काकू आल्या. आज अनघा सतत त्यांच्या मागे मागे करत होती. तिला त्यांना काहीतरी सांगायचे होते पण सतत अमरदादा कोणत्यातरी कारणाने तिच्यावर नजर रोखून होता. अनघाच्या मनात एकच प्रश्न येत होता कि, आपण असे काय केले होते? अमर दादाने आपल्याला अशी शिक्षा का केली? पण त्यादिवशी ती काही काकूंना सांगू शकली नाही. आई ऑफिसहून आली. अक्षय आणि अनघाला घेऊन आई घेरी गेली. रात्री अनघाने आईला सांगायचा प्रयत्न केला पण आईने नीट लक्ष दिले नाही कारण घरीदेखील ती ऑफिसचे काम करत होती ना ती. ती बाबांजवळ गेली. बाबांनी सगळे ऐकले. तिला जवळ घेतले पण काही बोलले नाहीत. आईने अंग दुखते म्हणून चेपून दिले. दुसर्या दिवशी बाबा स्वतः काकूंकडे आले तेव्हा अमर घरी होता. बाबांनी झालेला प्रकार काकूंच्या कानावर घातला आणि त्यांच्या देखतच अमरला जाब विचारला. अमर शांत होता कारण त्याच्याकडे काही उत्तर नव्हते. काकूंनी अमरला खूप सुनावले आणि त्याच्यावर हात हि उचलला. अनघाला मनातून खूप बरे वाटले. तिनेहि जाऊन त्याला आपल्या बालशक्तीचे गुद्दे लगावले मनातला कालचा राग त्याच्यावर काढला. अनघा आणि अक्षयचे ते पाळणाघर कायमचे बंद झाले. वरील घटना सत्य असून हि घटना मला कळल्यापासून खालील प्रश्न माझ्या मनात येऊ लागले आहेत. १) आत्ता वेळेत गोष्टी पुढे आल्यामुळे अनघा सुटली होती पण अशा कित्येक अनघा अजूनही अशा पाळणाघरात जात आहेत त्यांचे काय ? २) "गुड टच" आणि "बॅड टच" ह्या गोष्टी आता वयाच्या ५ व्या वर्षी त्यांनी शिकाव्या का ? ३) ज्याप्रमाणे सरकारने स्कूल बससाठी नियम केले आहेत त्याप्रमाणे पाळणाघरासाठी देखील नियम करावे का ? ४) अनघाचे बोलणे सिरीयसली न घेणाऱ्या आईची कितपत चूक आहे ?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 14014
प्रतिक्रिया 52

प्रतिक्रिया

कुठे कुठे नक्की जीव जाळायचा हेच कळत नाहीये आताशा.. स्कुल बस मध्ये कॅमेरे आहेत आता, तर रोज पोरगा जाता येता ऑफिसात त्याला मॉनिटर करत असते. पण वाटतं हेच शाळेत वर्गातही असतं तर बरं झालं असतं. काल मुलाला पाठीला जखम झालेली दिसली. नीट सांगेना, मध्येच म्हणतो बेंच लागला. हुरहुर वाटत रहाते, पाळणाघर तर कॅमेरे असलेलच, नाही तर नाहीच. आणि शिवाय रोज घरी गेले की खोदुन खोदुन आज काय काय झालं रे विचारत असते ते वेगळेच.. अजिबात लक्ष देणंही बरोबर नाही आणि असं शंकासुर बनुन फिरत रहाणंही.. पण असे लेख येतात आणि मी घरी फोन लावुन पोरगा कसाय.. बराय ना चेक करत बसते...

बाकी जर मी असते तर "जाब विचारणे" एवढ्या साध्या पातळीवर गोष्टी राहिल्या नसत्या हे नक्की. मुस्काडला असताच.. पण कायदा पण वापरला असता. चार घरात कार्ट्याचे "प्रताप" कसे कळतील हे ही पाहिलं असतं.. माझ्या लेकरावर आयुष्यभराचा ओरखडा उमटवणार्‍याला जन्माची अद्दल घडवली असती.

In reply to by पिलीयन रायडर

किती भयानक आहे हे खरच..... >>बाकी जर मी असते तर "जाब विचारणे" एवढ्या साध्या पातळीवर गोष्टी राहिल्या नसत्या हे नक्की. मुस्काडला असताच.. पण कायदा पण वापरला असता. चार घरात कार्ट्याचे "प्रताप" कसे कळतील हे ही पाहिलं असतं.. माझ्या लेकरावर आयुष्यभराचा ओरखडा उमटवणार्‍याला जन्माची अद्दल घडवली असती.>> पिरा शी हजारोवेळा सहमत....

हो हे लौकर होत आहे पण शिकवलेच पाहिजे. आणि मुख्य म्हणजे सर्व पालकांनी मुलांशी रोज भरपूर बोलले पाहिजे. याने बरेच प्रश्न सुटतात. पाळणाघराला लंच टाईम मधे , ऑफिसमधून लौकर येउन , हाफ डे घेउन सरप्राइज व्हिजिट देत रहावे. यामुळे तुम्ही कधीही येउ शकता हा धाक राहतो. बाकी सीसीटीव्ही हा सुद्धा उत्तम ऑप्शन आहे. आजकाल मुलांच्या मनगटावर बांधता येतील अशे बँडस निघाले आहेत त्यांचा सुद्धा उपयोग करुन अशा गोष्टी घडण्याच्या शक्यता कमी करता येतील.

पोलिस कम्प्लेंट सगळीकडे बदनामी सगळे झालेच आहे. पण त्याचा सगळ्यात जास्त परिणाम अनघावर झाला आहे. "मनगटावर बांधता येतील अशे बँडस निघाले आहेत" ते कसे हो काम करतात ?

पोलिस कम्प्लेंट सगळीकडे बदनामी सगळे झालेच आहे. पण त्याचा सगळ्यात जास्त परिणाम अनघावर झाला आहे.>>> ह्याच भीतीमुळे तर असल्या लोकांचं फावतं ना . अमर ची आणि त्याच्या घरच्यांची सुधा बदनामी होऊ दे कि . केवळ जाब विचारून पाळणाघर बंद करण एवढी छोटी गोष्ट नाहीये हि .

काय बोलावे हे सुचत नाही. अशा व्हिक्टिम्सच्या मनावर पडलेले ओरखडे कसे पुसावेत हे फार मोठे अन् जन्मभर न संपणारे आव्हान आहे. कुठलेही पालक कुठल्याच परिस्थितीत आपल्या मुलांना अशा परिस्थितींपासून सदासर्वकाळ वाचवू शकत नाहीत. त्यातून येणारा वैताग, संताप, हुरहूर कसे सांभाळावे हे स्वतःसाठी तर त्याहून मोठे आव्हान. लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी खरेच काय करता येईल ह्यावर या क्षेत्रातील जाणकारांनी प्रकाश टाकावा. मितानताई ह्या बालमानसशास्त्रातील तज्ञ आहेत. त्यांनीही ह्या विषयावर लिहावे अशी विनंती. मिपावर कुणी वकिल असतील तर या प्रश्नाची कायदेशीर बाजू उलगडून दाखवावी. तंत्रज्ञानाचा वापर करून आणि मुलांना 'गुड टच-बॅड टच' अशा पद्धतीने किंवा इतर मार्गाने शिकवून या प्रकारांपासून कसे वाचवता येईल हे जाहिरपणे चर्चिले गेले पाहिजे.

मुलांना आपल्या जवळ येऊन मनातली बाब कुठलीही अढी न ठेवता सांगता येण्या इतपत आपला विश्वास वाटलाच पाहिजे. तसे नसेल तर आपण नक्कीच कशात तरी कमी पडतो आहोत हे वेळीच लक्षात घेतले पाहिजे. तसेच अश्या एखाद्या पाळणाघरामुळे सगळी (सरसकट) वाईट आहेत असे समजणे चांगले नाही (टीप माझे पाळणाघर नाही तसेच माझी मुले कुठल्याही पाळ्णाघरात नाहीत तरीही हेच मत आहे) यांची त्या भागात पुरेशी बदनामी होणे फार गरजेचे कारण ही विक्रुती+प्रव्रुत्ती आहे. वेळीच ठेचणे गरजेचे आहे. अगदी त्यांना तिथले घर सोडावे लागले तरी बेहत्तर इतक्या टोकाचे मत आहे माझे. ताई दादाचा मित्र राहण्याचा प्रयत्न असलेला नाखुस.(एकल पालक)

कठीण समस्या आहे. जाणकार यावर उपाय सुचवतीलच. मला तरी असे वाटते की मुलांना एखाद्या घरगुती पाळणाघरात न ठेवता एखाद्या व्यावसायिक, मोठ्या पाळणाघरात ठेवले तर जास्तं बरे होईल का? म्हणजे घरगुती पाळणाघरात मुलं कमी, त्यावर लक्ष ठेवणारे ही कमी. जे तिथल्या मावशी किंवा काकू असतात त्या कुणालाही अन्सरेबल ( याला मराठी प्रतिशब्द सुचत नाहीये) नसतात. त्या जर पाळणाघराच्या वेळेत स्वत:च्या मुलावर जबाबदारी टाकून बाहेर जात असतील तर आधी चुक त्यांची आहे आणि त्यांना बाहेर जाण्यापासून रोकणार कोण? त्यांना कोण जाब विचारणार? त्यापेक्षा मोठ्या पाळणाघरात अनेक काम करणार्‍या ताया, मावशी असतील तर त्या जरा जबाबदारीने वागतील कारण त्यांच्यावर थोडाफार तरी अंकुश असेल. त्यांच्या संचालकांचा तरी किंवा एकेमेकींचा तरी. वाईट काम करतांना माणूस दहा वेळा तरी विचार करेल की आपल्यावर कुणाचं तरी लक्ष आहे .

In reply to by पद्मावति

असेच म्हणते. खासगी पाळणाघरात, जेथे एकच मनुष्य मुलांना सांभाळणारे असते तिथे नेहमीच जास्त धोका असतो. अगदी आपल्याच घरी मुलांना सांभाळायला नॅनी असली तरी भीती वाटते. आपले मूल एकटे (पालकांशिवाय) कोणत्याही अ‍ॅडल्टसोबत एकटे सोडणे यालाच विरोध आहे. अगदी कॉलेजवयीन मुलींसोबतही एकटे सोडणे नाही. चार लोक आजूबाजूला असतील तिथेच मूल असायला हवे. सांभाळणार्‍या लोकांच्या हलगर्जीपणामुळे एकवेळ जेवणखाणे देण्यात कधी दुर्लक्ष झाले तर परवडते. घरी आल्यावर योग्य आहार देण्यावर आपण भर देऊ शकतो पण विकृतीमुळे जर मुलांवर प्रसंग ओढवला तर बाकीचे कर्मचारी मदतीला असण्याची शक्यता तेथेच अधिक असते. सगळ्यात चांगले म्हणजे बाळाने आपल्या घरीच सांभाळायला येणार्‍या बाईंबरोबर राहणे व देखरेखीला जबाबदार नातेवाईक सोबतीला असणे.

पहिले म्हणजे मुलीला मुलांच्या मानस शात्राज्ञाकडे न्यायला सांगा … हा धक्का फार मोठा असू शक्तो. बाकी तो अमर मात्र स्वस्तात सुटला … मी ( किवा बायको , सासरे … आई आणि सासूबाई सुद्धा ) कोणीही असते तरी तुडवला असता . ते पण माणसे बोलवून …पोलिस केस ??? पैसे दिले आस्ते , ओळख काढली असती आणि अधिक पैसे देवून अमर ला तर टायर मध्ये घालायला सांगितला असता . तसेच अनेकदा पोलिस अशा विकृत माणसांच्या विरुद्ध असतात . आणि हे विकृत काय तोंडाने तक्रार करणार - मी "असे " काम केले म्हणून मला तुडवले ? मुलीचे पालक फार सोशिक दिसतात मीही ऎक लहान मुलीचा बाप असल्याने अनेक गोश्तीना घाबरतो …पण किती घाबरायचे ??? अशी माणसे बदनाम झालीच पाहिजेत!

वाचुन सुन्न झालं. मुलांना गुड टच बॅड टच शिकवलंच पाहीजे.मुलगा मुलगी दोघानाही. त्यांना रोजच्या पाळणाघरातल्या ,शाळेतल्या घडामोडी विचारुन घेतल्या पाहिजेत. अशा घटना त्यांना समजतील अशा प्रकाराने सांगुन अशा प्रकारचे वर्तन त्यांच्याशी, त्यांच्या बरोबरच्या मुलांशी कोणी करत नाही ना हे ते सांगतील हे पहावे लागेल.कारण त्यांना वयामुळे अशा प्रकारच्या वागण्याची संगतीच लागत नसेल. माॅलमध्ये पाच सहा वर्षाच्या लहान मुलांना विशेषतः एकटा मुलगा आणि आई असतात तेव्हा काही आया उगाचच जेन्ट्स टाॅयलेटमध्ये एकटे सोडतात.मला भिती वाटते तिथेही कोणी त्या लहान मुलाशी गैरवर्तन केले तर :(

या धाग्यावर पण चर्चा झालि होती

आणि त्याच्या घरच्यांची बदनामी झालीच आहे पोलिस कम्प्लेंट केली होती त्याचे पुढे काय झाले मी जाऊन विचारले नाही कारण असे विचारणे मला योग्य नाही वाटले पण मदत लागेल तिथे सांगा आम्ही येऊ असे नक्की सांगितले आहे. अनघाच्या बिल्डींग मधील पोरांनी त्याला मरेस्तोवर मारले असे ऐकिवात आहे. पण अनघाला मानसशात्रीय उपचारांची गरज लागणार आहे असे दिसते. कारण झोपेत ओरडणे, दचकून उठणे, अंथरूण ऒले करणे असे प्रकार सुरु झाले आहेत. आणि सगळ्यात कडी म्हणजे ती आधी सारखी बोलायची बंदच झाली आहे. त्यांच्या एकूणच बोलण्यातून समजले कि ते अनघाच्या आजीच्या ( अनघाच्या आईची आई) घराजवळ शिफ्ट होणार आहेत. म्हणजे परत कोणत्याही पाळणाघराची रिस्क नको. ह्या सगळ्या प्रकारात जास्त मनस्ताप आणि मानसिक खच्चीकरण त्या लहानग्या जीवाचे झाले आहे.

तुडवा हरामखोराला.. बलात्काराची केसपण करायला हवी. मुलीचं नाव काही खराब-बिराब होत नाही. मुलांना गुड टच - बॅड टच शिकवायलाच हवं. किंचाळायलापण शिकवावं. कसले @#र$द, हरामखोर असतात साले हे विकृत लोक..

लहान मुलांना गुड टच बॅड टच शिकवले गेलेचं पाहिजेत. ह्या मुलीची जी कोण आई आहे तिला आपल्या मुलीपेक्षा ऑफिसचं काम जास्तं महत्त्वाचं कसं वाटु शकतं? घरामधे म्हातारी सावली असावी ना ती एवढ्यासाठीचं. बेभरवशी परक्याच्या सामील करायला कसं मन धजावु शकतं :( बाकी त्या डुकराला ठेचायला हवा होता. साला स्वस्तात सुटला. त्या बिचार्‍या लहान मुलीच्या जीवाला आणि मनाला किती त्रास झाला असेल ह्याची कल्पना करवत नाही.

बलात्काराचा यशस्वी प्रयत्न करणार्‍या ९० % बलात्कार्‍यांनी आधी तो प्रकार लहान मुलांबद्दल करुन पाहिलेला असतो. असे कुठेतरी वाचले होते. म्हणजे बलात्काराचे जे गुन्हे आज उघडकीझ आले आहेत त्यांच्याइतकेच बाल लैंगिक छळही झालेले असतात. ते उघडकीस आलेले नसतात. त्या मुलावरही लक्ष ठेवण्याची गरज आहे.

In reply to by dadadarekar

सहमत. याची माईल्ड व्हर्जन आजूबाजूला पाहिलेली आहे.

गुड टच बॅड टच शिकवलं म्हणजे झालं का? वरच्या किश्शात त्या मुलीला कळलं की वाईट होतंय पण तोवर वेळ गेलेली असते ना? शिवाय तसं करणार्‍याला तुडवून राग शांत होईल एकवेळ पण भविष्यात होणारे प्रकार थांबणार का?

म्हणा कुणी डिपेंडेंट आहे म्हणून। वापरा डिपेंडेंट व्हिसा हा शब्द बोचरे पणाने। पण एक लहानगा गोळा जो माझ्या रक्त मासाचा होता, त्याच्या गराजेच्या काळात, जेंव्हा तो बोलू ही शकत नाही तेंव्हा त्याला टाकून पैसे कमावण मला तरी जमल नाही. दोन मूल आई होऊन संभाळाली। त्यांच्तवर अश्या दुष्ट छाया पडू दिल्या नाहीत। बाहेरचा थकवा राग त्यांच्तवर लादला नाही। अजुबाजुला हे सगळ घडताना समजत होत. एक ३ वर्षाच बाळ तर चक्क १० वर्षाच्या मुलाला संभलायला ठेवल होत . तो मुलगा विंडो त चढला आणि ७ मजले खली पडला. नाही जंगला नेहमीची बाई नाही पण जॉब महत्वाचा ठरला होता तेंव्हा. म्हणो कुणी कुत्तस्तित् पणे डिपेंडेंट। माझ्या घरी राहण्याने माझ्या मुलांवर ओरखड़े नाहीत।

In reply to by स्पंदना

माझंही मत अगदी तुमच्या सारखंच आहे. आम्ही आमच्या मुलांना कुणासोबतही एकटं ठेवू शकत नाही. मुलांना पाळणाघरात ठेवायला लागणे ही फार संवेदनशील बाब आहे. त्यामुळे यावर जास्त काही बोलू इच्छित नाही. ज्या मुलांसाठी आइ-बाप रात्रीचा दिवस करतात, त्यांना आई-बाप मिळत नसतील आणि असले भयानक अनुभव मिळत असतील तर उपयोग काय? मुलांसाठी आई-वडील एक सुरक्षित जग असतं, त्यात आई-वडील जवळ नसतांना हे असं कुणी वागत असेल तर मुलांच्या त्या परिस्थितीतल्या मनस्थितीला व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत.

भिकार*ट साले.... कायद्याची कठोर अंमलबजावणी हेच उत्तर आहे याला. 2 4 मेले की धाक बसेल असल्या लोकांना!

हे कुठेतरी संपले पाहिजे. एक बाप या नात्याने मलाही या गोष्टींची भिती वाटते. डायरेक्ट लैंगीक शिक्षण नाही तर निदान सेफ व्यक्ती कोण व बॅड टच कुठ्ला हे समजण्यापर्यंत मुलांना सांगणे महत्वाचे. आजकाल या घटना समाजात, ओळखीच्या लोकांमधुन खुप ऐकतो आहे. एक उपयोगी व्हिडीयो.

काय बोलावे काही कळत नाही राव.. :(

काय भयानक प्रकार आहे! त्या हलकटाला खरंच आयुष्यभर काही करू शकणार नाही असा निकामी करून टाकायला पाहिजे होता. स्पर्शाबद्दल शिकवणे आवश्यक आहे खरेच. पण या प्रसंगात त्या बिचार्‍या बाळाला माहीत असते तरी ती काय करू शकत होती? वाईट आहे सगळं. भयाण.

कायदा कठोर हवा. दुसरा काही उपाय नाही. ज्या प्रसंगात अनेक मोठ्या बायका काही करू शकत नाहीत तिथे मुले काय करणार? असा प्रसंग कधीही कुठेही येऊ शकतो हे लक्षात घेऊन, मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवणे इतकेच आपल्या हातात आहे. खरे तर कायदा कठोर होण्यासाठीच काही प्रयत्न करता येतायत का हे पाहायला हवय....

आईबाबांच्या, आजीआजोबांच्या छायेत मुल सुरक्षित असे जरी म्हटले तरी सगळ्याच कुटुंबात मुलाच्या संगोपनासाठी आजीआजोबा असतील असे नाही. पालकांपैकी एकाने घरी रहाणेही नेहमीच शक्य होइल असे नाही. काहींना ते आर्थिक दृष्ट्या खरोखर परवडणारे नसते. तसेच मुलाच्या संगोपनाचा आनंद मिळावा म्हणून काही काळ नोकरी सोडून घरी रहाणे वेगळे आणि मुलाच्या सुरक्षिततेबद्दल भीती वाटल्याने नोकरी/करीयर सोडून घरी रहाणे वेगळे. यात निव्वळ नोकरी असेल आर्थिक दृष्ट्या नुकसान आणि करीयर असेल तर व्यावसायिक्/सामाजिक पातळीवरही नुकसान. हे योग्य नाही. यात वाईट प्रवृत्तीच्या माणसांनी तुम्हाला वेठीला धरणे आले. हे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था नाही म्हणून सातच्या आत घरात सारखे! तसेच मुल शाळेत जावू लागे पर्यंतचा हा तात्पुरता उपाय. एकदा मुल शाळे जावू लागले की बाहेरच्या जगाशी संपर्क आहेच. अशा परीस्थितीत मुलांना बॅड टच वगैरे शिकवणे हे आवश्यकच पण त्या जोडीला कठोर कायदे , नियम,फास्ट ट्रॅक कोर्ट आणि योग्य समुपदेशनाची सोयही हवी. कुणीही उठते आणि घरगुती पाळणाघर सुरु करते. त्याला काहीही नियम नाहित. पाळणाघर चालवणार्‍या काकू बरेचदा मुलांचे प्रेमाने करतात हे जरी खरे असले तरी घर बेबी प्रुफ नसणे ते मूळ केअरगिवरने ते मूल दुसर्‍याच कुणावरतरी सोपवणे(इथे दिलेल्या केसमधे) वगैरे प्रकार सर्रास चालतात. काही ठिकाणी किती गोड आहे मुलगी म्हणून त्या काकूंच्या शेजारचेही उचलून नेतात. थोड्या मोठ्या मुलांच्या ताब्यात लहान मुल देणे, मोठ्या मुलांना सोसायटीच्या जवळच्या दुकानातुन सामान आणायला सांगणे, मुले लिफ्टमधे खेळतायत आणि काकू सिरीयलमधे दंग वगैरे प्रकार गेल्यावर्षी भारतभेटीत बघितले. साधी, सोपी नियमावली सर्वच पाळणाघरांना लागू केली तर ते पालक आणि पाळणाघर वाल्या काकू या दोघांच्याही हिताचे राहील. त्याच बरोबर अशा गुन्ह्यांकरता पोलीसांनाही रिफ्रेशर कोर्ससह ट्रेनिंग हवे. असे गुन्हे करणार्‍यांची माहिती सर्वांना उपलब्ध हवी. बरेचदा एका ठिकाणी गुन्हा होतो. त्यावेळेपुरता आरडाओरडा होतो. ते लोकं तिथून दुसरी कडे जातात. नव्या ठिकाणी पुन्हा नवे विक्टिम. कंपल्सरी नोंदणी हवी. असे झाल्यास जरब राहील आणि लोकांनाही माहिती असल्याने योग्य ती काळजी घेता येइल. नोकरदार मध्यमवर्गाने संघटीतपणे प्रयत्न केल्यास हे साध्य होवू शकते.

In reply to by स्वाती२

उत्तम प्रतिसाद! पाळणाघरांना योग्य अटींवर कायदेशीर नोंदणी करून परवाना देणे आणि वेळोवेळी अटी-शर्तींचं पालन होतंय की नाही याच त्रीसूत्री संघाकडून (पालक-पोलिस-समाजसेवक) ऑडीटींग होणे आवश्यक आहे. भले पाळणाघरांकडून याबद्दल कुठलेही शुल्क आकारू नये पण त्यांना कुठल्याच अटींमधे सवलत देऊ नये. हा एकच प्रॅक्टीकल उपाय वाटतो.

अगदी बरोबर बोललात. मी माझे अनुभव सांगते... माझी मुलगी जेव्हा लहान होती तेव्हा आम्ही पण ह्याच वळणावर येउन ठेपलेलो. एखादी भारतीय नॅनी/ आँटी ठेवायची का सरळ डे केअर मध्ये टाकायचं. तेव्हा बर्‍याच मैत्रिणींचे सल्ले मोलाचे ठरले. एकंदरीत इथे (अमेरिकेत) कायदे कडक असुनही राजरोस पणे अनेक भारतीय घरां मध्ये गुजुराथी/ अनेक मध्यमवयीन बायका घरच्या घरी एक दोन मुलं सांभाळुन पा़ळणाघरं चालवतात किंवा मुलं सांभाळयला कुणाकडे तरी जातात. खरतरं इथे डे केअर चा चांगला पर्याय उपल्ब्ध असताना देखील लोकं हा पर्याय निवडतात. सगळा व्यवहार मोस्टली नगद पैश्यात चालतो. चेक्स, क्रेडीट कार्डचा काही प्रश्नच येत नाही कारण कायदेशीर परवाना नाही. म्हणजे हे पुर्णपणे चुकीचं आहे असं मी म्हणत नाहीये. डे केअर चे तोटे म्हणजे संसर्गजन्य आजारपणाचा प्रादुर्भाव अतिशय वेगाने आणि दिर्घ काळ चालतो. त्यामानाने घरांतल्या पाळणाघरा मध्ये त्याची तिव्रता थोडी कमी असते. मुलं -केअर टेकर रेश्यो कमी असल्यामुळे १:१ लक्ष देता येते. पण कायद्याचा बडगा जवळपास शुन्य. तुम्ही तुमच्या जबाबदारी वर तुमची मुलं पाठवा असं त्यांच धोरण. एकमेकांच्या सामंज्यस्यावर आधारलेला व्ययसाय असं त्याचं वर्णन करता येइल. पण आमचं डेरिंगच झालं नाही आणि आम्ही आपला डे केअर ह्या पर्याय निवडला. स्वच्छता, आरोग्य, देखभाल, मुलभुत शिक्षण ह्या पैकी कुठल्याही गोष्टींसाठी आपण रितसर तक्रार नोंदवुन डे केअर चा परवानाही रद्द होउ शकतो ही जाणीव आमच्यासाठी खूप दिलासादायक आहे. आता ह्या सगळ्या झाल्या बाह्य बाबींची पूर्तता. मुख्य...सगळ्यात मोठी आणि भरपुर वेळ लागणारी बाब घरातली आहे. माझ्या अनुभवानुसार मुलांची आणि मुलींची आपण एकमेकांपेक्षा वेगळे आहोत ही प्रक्रिया ३-४ वर्ष वयापासुन चालु होते. गुड ट्च- बॅड ट्च ह्या जरा अवजड व्याख्या वाटल्या तरी सांगयला सुरुवात करावी असं माझं मत आहे. बरेच वेळा कदाचीत मुलांच्या वयामुळे ते लगेच एक झटक्यात ऐकणार नाहीतच, म्हणुन सतत सांगत राहणं हा एकमेव उपाय आहे. लाँग वे टु गो.... ---मयुरा.

In reply to by मयुरा गुप्ते

अशाच एका घरात चालणार्‍या व (अर्थात) रीतसर परवानगी नसलेल्या ठिकाणी एका मैत्रिणीच्या मुलाला प्रश्न आला व आईवडीलांनी पोलिसांकडे जाऊन अशा ठिकाणी मुलाला ठेवण्याची आपली चूक कबूल केली त्या चुकीची शिक्षा भोगली पण त्या बाईला तुरुंगात पाठवली. काही उदाहरणे पाहून डे केअरचा पर्याय हाच त्यातल्यात्यात चांगला सिद्ध होतोय.

In reply to by मयुरा गुप्ते

अमेरीकेत घरात चालवल्या जाणार्‍या डेकेअरलाही परवानगी लागते. नियमानुसार चालवली जाणारी अशी घरगुती पाळणाघरे आमच्या गावात आहेत. फॅमिली सर्विसेसकडे अशा लायसन्स्ड पाळणाघरांची यादी असते. अशा पाळणघरांच्या बाबतीत घराचे इन्स्पेक्शन, घरातील सर्व सदस्यांचे बॅकग्राउंड चेक, पोलीस क्लिअरन्स , काही ठिकाणी फायर क्लिअरन्स वगैरे केलेले असते. नियमांचे उल्लंघन होत नाही ना हे नियमितपणे तपासले जाते. भारतीय लोकं नियम धाब्यावर बसवून सर्टिफाईड किचन नसताना डबे पुरवणे, केटरिंगच्या ऑर्डर घेणे करतात तसेच हे डेकेअरचे प्रकारही चालतात. सगळ्यात कहर म्हणजे मी नोकरी करत नाही तेव्हा नुसत्या उनाडक्या करण्यापेक्षा असे काही का करत नाही असे विचारणारे भारतीय लोकं! मग हे सगळे नियमबाह्य आहे हे ऐकवले की उडवाउडवी चालते. अमेरीकेत लहान मुलांशी संबंध येणार असेल तर वॉलंटरी वर्कसाठी देखील पोलिस क्लिअरंस लागतो. दरवर्षी त्याचे फॉर्म भरावे लागतात. मी आणि माझा नवरा वेळोवेळी असे फॉर्म भरतो. क्रिमिनल रेकॉर्ड, सेक्शुअल प्रिडेटर रजिस्ट्री वगैरे कडून क्लिअरन्स आल्याशिवाय संस्था मान्यता देत नाही.

In reply to by स्वाती२

स्थानिक मराठी मंडळात काम करताना याबाबत थोडी ओळख झाली आहे. मंडळाच्या काही कार्यक्रमांच्या वेळी तीन वर्षांहून अधिक वयाचा मुलांना बेबीसिटिंगची सुविधा पुरवली जाते. मंडळातील सदस्यांच्या तरुण मुली बरेचदा हे काम करतात. त्यासाठी त्यांनी अधिकृत प्रशिक्षण घेतले असते व त्यांच्याकडे हे काम करण्यासाठी लायसन्स असते (बहुधा किमान वय १५ वर्षे). या लायसन्सचे वेळोवेळी नूतनीकरण करावे लागते. त्याच वेळी हायस्कुलमध्ये शिकणारे तरुण मुलगे ५ वर्षांवरील मुलांसाठी गेम्स वगैरेचे आयोजन करतात. पण त्या वेळी कुणीतरी मोठे लक्ष ठेवून असतात.

In reply to by स्वाती२

नुसत्या उनाडक्या करण्यापेक्षा असे काही का करत नाही असे विचारणारे भारतीय लोकं! अतिषय सहमत. हाच अनुभव!

In reply to by रेवती

जसा नियम डे केअरबाबतीत आहे. तसाच नियम किती वर्षांच्या मुलांना घरात एकटे सोडू शकता याबद्दलही असताना अनेक भारतीय सर्रास सात ते बारा वर्षांपर्यंतच्या मुलांना रोजच्या रोज घरात एकटे सोडून जातात. आमच्या राज्यात १३ वर्षांचा नियम आहे. कारमध्ये बाळे सोडून दुकानात जाण्याबद्दल एकीला पोलिसांना पकडले होते पण काही फरक पडला नाही. तिला हवे तसेच ती करते, नाहीतर मला म्हणते की एवढे असेल तू सांभाळ माझी मुले! दोन चारवेळा सांभाळली, पण आणखी किती? शेवटी ज्याची जबाबदारी त्याने घ्यायला हवी म्हणून बंद केले. याबाबतीत निष्काळाजीपणाची परिसिमा असलेले पुस्तक लिहावे लागेल पण लोक सुधारत नाहीत. आपणच गप्प बसायचे.

मी पैसाताई आणि स्पंद्नाशी सहमत आहे. अतिशय कठोर शिक्षेची आवश्यकता आहे. त्या मुलीलाही बॅड टच कळत होताच की,पण काय उपयोग झाला?आजूबाजूल दखल घ्यायला कोणी असेल तरच ओरडणे,किंचाळणे योग्य ठरते.पण असे हरामखोर एकटेपणाचाच फायदा घेतात. त्या मुलीविषयी वाईट वाटतेच पण त्या मूर्ख आईलाही समुपदेशनाची गरज आहे.

मी पैसाताई आणि स्पंद्नाशी सहमत आहे. अतिशय कठोर शिक्षेची आवश्यकता आहे. त्या मुलीलाही बॅड टच कळत होताच की,पण काय उपयोग झाला?आजूबाजूल दखल घ्यायला कोणी असेल तरच ओरडणे,किंचाळणे योग्य ठरते.पण असे हरामखोर एकटेपणाचाच फायदा घेतात. त्या मुलीविषयी वाईट वाटतेच पण त्या मूर्ख आईलाही समुपदेशनाची गरज आहे.

त्या मुलीविषयी वाईट वाटतेच पण त्या मूर्ख आईलाही समुपदेशनाची गरज आहे.>>> आणि बापाला ? मुल फक्त आईचं आहे का ? बापाची काही जबाबदारी नाही का ? आणि मुलीची आई घरी बसल्यावर जे आर्थिक नुकसान होणार आहे ते त्या आईला शिव्या घालणारे भरून देणार आहेत का ? आपल्या समाजाची मानसिकताच भिकार आहे . काहीही झालं कि बाईच्या नावाने बोंब मारायची .