मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपा संपादकीय - ही एक इष्टापत्ती ठरो.

संपादक · · विशेष
विशेष
मिपा व्यवस्थापन 'मिपा संपादकीय' हे सदर लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करत आहे. यापूर्वीचे संपादकीय लेखन येथे वाचायला मिळेल! धन्यवाद... हे संपादकीय लिहिणारे क्लिंटन (नामे:विल्यम जेफरसन क्लिंटन) यांना त्यांच्या एका नातेवाईकाच्या अकस्मात निधनामुळे आज दुपारी तातडीने बाहेरगावी जावे लागले. येत्या दोनेक दिवसात ते पुण्यात परतल्यावर वाचकांच्या काही शंका/अभिप्रायांना अवश्य उत्तरे देतील असे कळवण्याची त्यांनी मिपा व्यवस्थापनाला विनंती केली आहे.
ही एक इष्टापत्ती ठरो
मुंबईवर अतिरेक्यांचा अभूतपूर्व हल्ला झाला आणि त्यात आतापर्यंत सुमारे १८३ निरपराध लोकांची कत्तल झाली. तो आकडा २००-२५० पर्यंत जाऊ शकतो. देशात संतापाची लाट उसळली. वेगवेगळ्या न्यूज चॅनेलवर आता 'इनफ इज इनफ' यास्वरूपाच्या चर्चा झाल्या. नेहमीप्रमाणे 'भ्याड' हल्ल्याचा निषेध राष्ट्रपती- पंतप्रधानांपासून मिसळपाववरील सामान्य लोकांपर्यंत सगळ्यांनी केला.परराष्ट्रमंत्री आणि पंतप्रधानांनी हल्ल्यामागे पाकिस्तानातील अतिरेक्यांचा हात आहे असे म्हटले. शेजारी राष्ट्राला 'गंभीर परिणाम होतील' अशी फुकाची धमकी देऊन झाली. २९ नोव्हेंबरच्या दुपारपर्यंत ताजमधील कारवाई संपुष्टात आल्यावर ३० तारखेपर्यंत मुंबई पूर्वपदावर येईल. लोकांच्या मनात प्रचंड भिती आहेच तरीही मुंबईकरांच्या धैर्याचे तोंडदेखले कौतुक होईल. दहशतवादाला धर्म नसतो अशास्वरूपाची पोपटपंची होईल. यापुढील काळात काय करायला पाहिजे यावर अनेक ठिकाणी काथ्याकूट होईल. एखाद्या कडक कायद्याची अंमलबजावणी व्हावी, दहशतवादाविरोधात एका केंद्रिय यंत्रणेची स्थापना व्हावी यासारखे अनेक उपाय सुचवले जातील. पण महिन्याभरात पहिले पाढे पंचावन्न म्हणत आपण भारतीय एकमेकांशी भांडण्यात मश्गुल होऊन जाऊ. मी ब्राम्हण की मराठा की मागासवर्गीय, मी मराठी की बिहारी, मराठ्यांमध्ये मी ९६ कुळी की ९२ कुळी, ब्राम्हणांमध्ये मी कोकणस्थ की देशस्थ इत्यादी अनंत वादविवादांमध्ये आपण इतके गुरफटून जाऊ की अतिरेकी परत येऊन कधी हल्ला करून निघून जातील हे आपल्याला कळणार पण नाही. आपण स्वत: किंवा आपले आप्तस्वकिय अशा कोणत्याही हल्ल्यात सापडणार नाहीत अशी प्रार्थना करण्याशिवाय सामान्य जनतेच्या हातात फारसं काही उरणार नाही. एक प्रश्न पडतो की दरवेळी असा मोठा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर कमीअधिक फरकाने हाच क्रम चालू असतो. आठवा ११ जुलै २००६ च्या रेल्वे बॉम्बस्फोटांनंतर किंवा दिल्लीतील २००५ आणि २००८ च्या स्फोटांनंतर, अहमदाबादमधील जुलै महिन्यातील स्फोटांनंतर,२००१ च्या संसदभवनावरील हल्ल्यानंतर आणि अशा अनेक हल्ल्यांनंतर वेगळे काय चालू होते? राजा शिवछत्रपती पुस्तकात बाबासाहेब पुरंदर्‍यांनी त्यांच्या शैलीत एक वाक्य लिहिले आहे. शिवाजी भोसल्याने पन्हाळगड जिंकला ही बातमी कळताच विजापूर दरबार संतापला. दरवेळी शिवाजीने काहीना काही जिंकायचं आणि विजापूर दरबाराने संतापायचं हा शिरस्ता गेली २५ वर्षे अबाधितपणे चालू होता! आणि त्याच धर्तीवर दुर्दैवाने अतिरेक्यांनी प्रत्येक वेळी हल्ला करायचा आणि भारतीय जनतेने संतापायचे, पंतप्रधान-राष्ट्रपतींनी नेहमीची छापील वाक्य बोलायची, अशा भ्याड हल्ल्यांचा कडक शब्दात निषेध करायचा, मृतात्म्यांना श्रध्दांजली वाहायची आणि पुढच्या हल्ल्याची वाट बघत बसायचे हा शिरस्ता गेली अनेक वर्षे अबाधितपणे चालू आहे. त्यात काहीही बदल नाही. अत्यंत मवाळपणा (किंवा बावळटपणा), अनाठायी मानवता (सावरकरांच्या शब्दात सद्गुणविकृती), इतिहासापासून काहीही न शिकणे आणि घरभेदीपणा या दुर्गुणांचा आपल्या समाजाला शापच लागला आहे. या दुर्गुणांमुळे आपले कमालीचे नुकसान झाले आहे. भारतभूमीवर एकामागून एक आक्रमणे होत राहिली, रणांगणावर विजय मिळवूनही अशा काही दुर्गुणांमुळे परकिय आक्रमणाचा कायमचा बंदोबस्त करणे आपल्याला शक्य झालेले नाही. एकेकाळी आपली संस्कृती सद्यकालीन अफगाणिस्तानापर्यंत होती आणि या दुर्गुणांमुळे त्या प्रदेशाचा संकोच होत होत १००-१५० वर्षांनी सद्यकालीन भारतावर सुध्दा हिरवा रंग चढणार की काय अशी भिती वाटू लागली आहे. 'इतिहासापासून न शिकणे' या एका दुर्गुणाने भारताचे जेवढे नुकसान केले आहे याची मोजदादच नाही. भारतीय सैन्य प्राचीनकाळी हत्तींच्या फौजा घेऊन लढत असे. अनेकदा राजा स्वत: किंवा सरसेनापतींसारखे मोठे अधिकारी हत्तीवर बसून स्वत: लढाईत भाग घेत असत. असे हत्ती पिसाळले तर ते आपल्याच सैन्याला पायदळी तुडवत मोठी अंदाधुंदीची परिस्थिती निर्माण होत असे आणि अत्यंत शौर्याने लढणार्‍या हिंदू सैन्याचा पराभव होत असे. परकिय आक्रमकांनी हे हेरून मुद्दामून हत्तींच्या गंडस्थळावर मादक द्रव्यांनी भरलेले बाण अनेकदा मारले आणि हिंदू सैन्याचा ज्या लढायांमध्ये पराभव झाला त्यापैकी बहुतांश लढायांमध्ये 'हत्ती' हा मुद्दा महत्वाचा होता. अगदी सिंधच्या दाहिर राजापासून (इ.स. ७१२) राणा संगापर्यंत (इ.स. सुमारे १५२८) अनेकांचे पराभव या कारणांमुळे झाले आहेत. अगदी जयपाळ-अनंगपाळ किंवा पृथ्वीराज चौहान यांचे पराभव होण्यात हा एक महत्वाचा मुद्दा होता. ज्या राजांचा या कारणामुळे पराभव झाला त्या राजांच्या नावांच्या यादीत काही त्रुटी किंवा चुका असण्याचा संभव आहे कारण याविषयीचे वाचन करून बरीच वर्षे झाली आहेत. पण सांगायचा मुद्दा म्हणजे ७००-८०० वर्षे आपला पराभव एकाच कारणामुळे होत होता. कोणीही या समस्येवर उपाय शोधून काढायचा आणि आपली रणनिती बदलायचा प्रयत्न केला नाही. कोणीच इतिहासापासून शिकले नाही. घरभेदीपणा तर अगदी अंभीराजापासून भारताच्या कुंडलीतला कालसर्प योगच जणू.तरी अलेक्झांडर खूपच सुसंस्कृत आक्रमक होता. त्याने सामान्य लोकांच्या कत्तली केल्याचे उल्लेख नाहीत. त्यामुळे अंभीराजाचा घरभेदीपणा भारताला तेवढ्या प्रमाणावर नडला नाही.पण जयचंदाने मोहम्मद घौरीला पृथ्वीराज चौहानविरूध्द मदत केली. त्यानंतर दिल्लीवर सुलतानी अंमलाचा काळाकुट्ट अध्याय सुरू झाला.त्या सुलतानांच्या सैन्यात कर्तबगारी दाखवायचा एक मार्ग म्हणजे निरपराधांच्या कत्तली करणे. एस.आर. बक्षींची 'मेडिव्हिएल इंडियन हिस्ट्री' वरील ३ भागांमध्ये ही माहिती आहे. अगदी अल्लाद्दिन खिलजीपासून अनेकांनी अशा कत्तली करून आपली 'कर्तबगारी' सिध्द केलेली आहे.जयचंदाच्या घरभेदीपणामुळे अनेक शतके भारतात सुलतानी अंमल चालला. या अंमलाला राणा प्रताप सारख्यांनी अयशस्वी तर शिवाजी महाराजांनी यशस्वी प्रत्युत्तर दिले.तरीही महाराष्ट्राच्या लाडक्या संभाजीराजांना पकडून देण्यात कोणी महत्वाची भूमिका बजावली? संभाजीराजांच्या पत्नीच्या सख्ख्या भावाने म्हणजेच त्यांच्या सख्ख्या मेहुण्याने-- गणोजी शिर्केने. संभाजीराजांची अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली आणि त्यावेळी पुढाकार घेणारा कोण होता?त्यांच्या सख्ख्या बहिणीचा नवरा-- महादजी निंबाळकर! दुर्दैवाने असे अनेक किस्से आपल्या इतिहासात आहेत. गणोजी शिर्के इतिहासापासून शिकला नाही आणि शिवछत्रपतींचे स्वप्न-- हिंदवी स्वराज्य मोठ्या संकटात सापडले. पुढे शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकावणारा कोण होता? बाळासाहेब नातू! तो तरी शिकला का इतिहासापासून? नाही ना. आणि नेमके हेच आपले दुर्दैव आहे. अती मवाळपणा (किंवा बावळटपणा) आणि गाफीलपणा हे आपल्याला लागलेले काही अजून मोठा शाप आहेत. अतिरेकी संसदभवनापर्यंत पोहोचू शकले आणि केवळ सुदैवाने फार मोठ्या संकटात आपण पडता पडता वाचलो तरीही पुढे काहीही होत नाही. महंमद अफझल अजूनही जिवंतच आहे. कारगीलमध्ये अतिरेकी श्रीनगर-लेह मार्गावर तोफांचा मारा करेपर्यंत आत पोहोचले तेव्हा कुठे आपल्याला खडबडून जाग आली. आणि ती जाग आली ती सुध्दा काही मेंढपाळांनी सुरक्षादलाला सुचना दिल्यावर! कंदाहार विमान अपहरण प्रकरणी सोडलेला मोहम्मद अफझल १९९४ पासून भारत सरकारच्या बिर्याणीवर यथेच्छ ताव मारत होता.इतकेच नव्हे तर तिहार तुरूंगामध्ये त्याच्याकडे मोबाईल फोन होता आणि त्याला सोडविण्यासाठी अतिरेक्यांचे जे काही प्रयत्न चालू होते त्याची बित्तंबातमी त्याला होती. पुरुलियाप्रकरणी विमान २ दिवस भारतभर पाहिजे तिकडे उडत होते आणि त्या विमानाला जबरदस्तीने मुंबई विमानतळावर उतरवल्यानंतर किम पीटर डेव्ही पोलिसांना चकवा देऊन पळून जाऊ शकला. ही सगळी बावळटपणाची उदाहरणे नाहीत तर काय आहे? बरं हा बावळटपणा गेल्या १२-१५ वर्षांत आला आहे का? तर तसे अजिबात नाही. कलकत्यातील प्रत्यक्ष कृतीदिनापासून सुरू झालेला मुस्लीम लीगच्या गुंडांचा हैदोस त्यानंतर वर्ष-सव्वा वर्ष सुरू होता.ज्या पवित्र सिंधू नदीच्या काठावर वेदांची रचना झाली तिथे जिहादची कारस्थाने शिजू लागली.लाखो लोकांना निर्वासित व्हावे लागले, काही अंदाजांप्रमाणे सुमारे ५ लाख लोकांना प्राण गमावावे लागले, हजारो लोकांचे सक्तीचे धर्मांतर झाले. पंजाब-बिहार मध्ये हिंदू-शीखांनी स्वसंरक्षणार्थ लढा दिला तो अपवाद वगळता आपण काय करत होतो? आपण मारणार्‍यांसाठी आणि मरणार्‍यांसाठी प्रार्थना आणि उपवास करत होतो! ३० कोटींच्या भारतावर सुमारे लाखभर इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केले! अभिनव भारत, गदर पार्टी, अनुशीलन समिती यासारख्या संघटनांचे काही शे (किंवा काही हजार) क्रांतीकारक किंवा नेताजी सुभाषचंद्र बोसांची आझाद हिंद सेना यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सर्वात महत्वाचे योगदान होते. पण असे महान क्रांतिकारक बहुदा स्वातंत्र्यचळवळीत ०.१% असतील. ते सोडून आपला स्वातंत्र्यलढा काय होता? या सर्व महान क्रांतीकारकांचे योगदान सोडले तर अमुकअमुक काँग्रेसमध्ये तमुकतमुक ठराव पास झाला (उदाहरणार्थ लाहोर काँग्रेसमध्ये १९२९ साली संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास झाला आणि जवाहरलाल नेहरूंनी रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावला) यापध्दतीचे आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील मोठे महत्वाचे टप्पे होते! भारतीयांनी वाट्टेल ते ठराव पास केले तरी इंग्रजांच्या केसाला तरी धक्का लागणार होता का? क्रूरकर्म्या हिटलरने दुसरे महायुध्द सुरू करून इंग्रजांचे पेकाट मोडले नसते तर आज तरी आपण स्वतंत्र असतो का?कदाचित आजही आपण वेगवेगळे ठरावच पास करत राहिलो असतो आणि एखादा लॉर्ड टोनी ब्लेअर भारताचा व्हॉईसरॉय असता. मूठभर इंग्रजांपासून सुटका करून घेण्यासाठी १५० वर्षांनंतरही दुसर्‍या कोणीतरी आपल्या शत्रूच्या पेकाटात लाथ मारायची आपल्याला वाट बघावी लागते आणि तरीही आपण 'दे दी हमे आजादी बिना खडग् बिना ढाल' असे म्हणत 'आम्ही इंग्रजांना आमच्या देशातून हाकलून दिले' असे म्हणतो! शत्रूला विनाकारण दया दाखवणे हा तर आपल्या समाजाचा स्थायीभावच झाला आहे. खरं म्हणजे शत्रूला कायम लक्षात राहिल असा धडा शिकवणे गरजेचे असते.पण अशी 'किलर इन्स्टिंक्ट' आपण दाखवत नाही. मेनाखेम बेगीन हे इस्त्राएलचे १९७७ ते १९८३ या काळातील पंतप्रधान होते. त्यांनीच इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सदात यांच्याबरोबर ऐतिहासिक कँप डेव्हिड शांतता करारावर सह्या केल्या.याचे कारण इजिप्त यापुढे इस्त्राएलला धोका उत्पन्न करणार नाही याची त्यांना खात्री पटली. १९६७ च्या युध्दात इस्त्राएलने इजिप्तकडून जिंकून घेतलेले सिनाई वाळवंटसुध्दा त्यांनी इजिप्तला परत केले.याबद्दल त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक पण मिळाले. पण नंतरच्या काळात अबु निदाल या अतिरेकी संघटनेने इस्त्राएलच्या इंग्लंडमधील राजदूताची हत्या केली. त्याविरूध्द त्यांनी निषेधाचे खलिते पाठवले नाहीत तर लेबेनॉनवर जबरदस्त आक्रमण केले. इराकने अणुकार्यक्रम सुरू करताच याच मेनाखेम बेगीनने निर्णय घेतला आणि इस्त्राएलच्या हवाईदलाने मधील दोन देशांच्या सीमा ओलांडून १९८३ मध्ये इराकच्या अणुभट्ट्या उडवून दिल्या. त्यांचा शत्रूला इशारा होता की तुम्ही आमच्याबरोबर शांततेत राहायला तयार असाल तर आम्ही तुमचा मित्रत्वाचा प्रस्ताव मान्य करू. पण तुम्ही आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने बघाल तर तुमचे डोळे आम्ही फोडू! असा शत्रूला कायमचा लक्षात राहिल असा धडा कधी आपण शिकवला आहे का? किलर इन्स्टिंक्ट असणे आणि शत्रूचे कायमचे पारिपत्य करणे तर सोडाच पण आपण पहिले आक्रमण करणे हे महान पातक असल्याप्रमाणे आपली वर्तणूक असते. आमच्या छ्त्रपतींनी अफजल खानाचे पोट फाडून त्याला ठार मारले तरीही अनेकांचे म्हणणे असते की महाराजांनी पहिला वार केला नाही तर अफझल खानाने पहिला वार केला त्याला महाराजांनी प्रत्युत्तर केले. अफझल खान महाराजांचा शत्रू म्हणून आला होता ना?मग त्याचे पारिपत्य करण्यासाठी जे जे काही करणे गरजेचे होते ते आमच्या महाराजांनी केले.पहिला वार कोणी केला हे नक्की पुराव्यानिशी सांगणे कठिण आहे पण जर पहिला वार महाराजांनी केला तर त्यात चूक काय?शेवटी तो शत्रूच होता ना? आणि मा.अविनाश धर्माधिकारी यांनी म्हटल्याप्रमाणे अफझल खान हा महाराजांशी पत्ते खेळायला थोडीच आला होता मग त्याला अगदी पहिला वार करून ठार मारले तर त्यात काहीही चूक नाही. ही असली पराभूत मनोवृत्ती आपण का बाळगतो? आपल्याच समाजातील पंचमस्तंभीय अनेकदा इतका बुध्दीभेद करतात की कधी कधी वाटते की अशा मंडळी नक्की कोणाच्या बाजूने आहेत?कुमार केतकर, प्रफुल बिडवाई, मणिशंकर अय्यर यासारख्या अनेकांचे असे म्हणणे असते की भारतात दहशतवाद बाबरी मशिद पाडल्यामुळे वाढला. पण सत्य परिस्थिती आहे की भारतातला दहशतवाद इ.स. ७१२ पासून सुरू आहे. मोहम्मद बीन कासीमने भारतावर पहिले यशस्वी आक्रमण केले. त्यापूर्वी सुध्दा आक्रमणे होत होती पण त्यात त्यांना यश मिळाले नव्हते. मोहम्मद बीन कासीमने पहिल्यांदा मुस्लिम दहशतवाद काय असतो याची चुणुक आपल्याला दाखवली. दाहिर राजा लढाईत मारला गेला हे कळताच सिंधच्या राणीने जोहार केला पण दुर्दैवाने राजकन्या (नक्की नाव आता आठवत नाही) कासीमच्या हातात पडली. आमच्या महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला जशी वागणूक दिली तशी कासीमने वागणूक कासीमने तिला दिली असे कोणता हरिचा लाल म्हणू शकेल? अफगाणिस्तानात बौध्द संस्कृती होती.पण मुस्लिम आक्रमकांनी जवळपास सर्व लोकांना एकतर ठार मारले किंवा सक्तीचे धर्मांतर तरी केले.हिंदूकुश पर्वताचे नाव कसे पडले याला अत्यंत रक्तरंजित इतिहास आहे.तो दहशतवाद नव्हता तर काय होते?औरंगजेबाने संभाजीराजांना ज्या पध्दतीने ठार मारले ती काय मानवता होती? केरळातील मोपल्यांचे बंड, कलकत्त्यातील प्रत्यक्ष कृतीदिन आणि त्यानंतर फाळणीच्या वेळच्या कत्तली वगैरे दहशतवाद नव्हता तर काय होते?त्यावेळी कोणती बाबरी पाडली होती? आणि बाबरी पाडली ती सुध्दा मुस्लिम समाजाच्या आडमुठेपणामुळेच. एकदा प्रवीणभाई तोगाडियांनी विचारले की १९४७ साली इस्लामच्या नावावर आम्ही त्यांना आमच्या देशाची ३०% जमिन दिली. पण ते एक रामजन्मभूमी सोडायला तयार का नाहीत? भारतात मंदिरे पाडून मशिदी अनेक ठिकाणी बांधल्या आहेत. त्यापैकी सगळी ठिकाणे परत मागणे गरजेचे नाही पण जी हिंदूंना परमपवित्र अशी तीन ठिकाणे आहेत ती परत मागितली तर त्यात चूक ती काय?तरीही हिंदू ऐकून घेतात म्हणून सगळ्यांची लेक्चरबाजी हिंदूंनाच चाले की हिंदूंनी राम तिथे जन्मला याचा पुरावा आणावा. पण हीच मंडळी मुस्लिम, ख्रिस्ती धर्मीयांना असे प्रश्न विचारायला जात नाहीत! या अशा आडमुठेपणामुळे आणि दुटप्पीपणामुळे संतापलेल्या हिंदूंनी बाबरी मशीद पाडली त्यात चूक काय?तरीही कुमार केतकरांसारखी मंडळी लोकांचा बुध्दीभेद करतात. प्रवीण स्वामीसारखा पत्रकार तर म्हणतो की लोकमान्य टिळकांपासून हिंदू दहशतवादाची सुरवात झाली. आणि त्याचा हा लेख ज्या 'द हिंदू' या वर्तमानपत्रात प्रसिध्द झाला त्याचे संपादक त्याविषयीचे पत्रसुध्दा प्रसिध्द करायची तसदी घेत नाहित! हे असे कुजलेली विचारसरणी असलेले लोक आपल्याच समाजात जन्माला का येतात? हिंदू समाजाचे एक सुदैव आहे की ज्या ज्या वेळी पाणी नाकातोंडाशी येते त्या त्या वेळी एखादा चंद्रगुप्त मौर्य, छत्रपती शिवाजी, संभाजी यासारखे महान योध्दे जन्माला येतात आणि सर्व पराभूत मनोवृत्ती मुळापासून उखडतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करतात.या संकटानंतर हिंदू समाज आपला तृतीय नेत्र उघडेल, आपण इतिहासापासून धडा शिकू आणि तो नेत्र आपल्यातील दोषांना भस्मसात करेल.नवसंजीवनी घेऊन हिंदू सैन्य पाकिस्तान आणि बांगलादेशाचा खातमा करेल आणि सिंधू नदी भारतात आणेल. सावरकरांचे स्वप्न पूर्ण होईल आणि नथुराम गोडश्यांच्या अस्थी सिंधू नदीत विसर्जित होऊन त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळेल. त्याचबरोबर आपण आपल्या समाजातील जातीभेदांचे पण पूर्णपणे पारिपत्य करू आणि एक समतेवर आधारीत समाज निर्माण करू. आपल्या समाजातील अनेक बांधवांना हिंदू राज्य येणे म्हणजे जातीभेदांचे राज्य येणे अशी भिती वाटते. ती भिती मुळापासून उखडली जाईल आणि आपल्या समाजातील सर्व दोष नाहिसे होतील अशी आशा करू या. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शब्दात मुस्लिमांना आपण सांगू 'आलात तर तुमच्या सह, नाही आलात तर तुमच्या विना, आणि विरोधाल तर उच्छेदून हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही'. या सर्वाची सुरवात मुंबईवरील भीषण हल्ल्यानंतर व्हावी आणि हा हल्ला एक इष्टापत्ती ठरावा आणि भारतीय स्वातंत्र्याच्या शतकाच्या आत ही सर्व स्वप्ने पूर्ण होतील अशी प्रार्थना करू या. आणि तीच या आणि अशा अनेक हल्ल्यांमधील मृतांना खरी श्रध्दांजली ठरेल. जय हिंद! ---विल्यम जेफरसन क्लिंटन. पाहुणा संपादक : क्लिन्टन.

वाचने 29644 वाचनखूण प्रतिक्रिया 54

आजानुकर्ण Sun, 11/30/2008 - 21:53
ज्या प्रसंगी सर्व भारतीयांनी जात धर्म भाषा विसरून एकत्र उभे राहायचे आहे त्या वेळी ही फूट पाडणारी भाषा वापरणाऱ्या अग्रलेखाला प्रसिद्ध करावे याचे फार वाईट वाटते.

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Sun, 11/30/2008 - 22:00
ज्या प्रसंगी सर्व भारतीयांनी जात धर्म भाषा विसरून एकत्र उभे राहायचे आहे हा विचार नेहमी हिंदूच करतात.. अहो साधी क्रिकेटची मॅच जर पाकिस्तानने जिंकली तर भेंडीबाजारात, नळबाजारात फटाके वाजवले जातात ही वस्तुस्थिती आहे! असो, अग्रलेखातल्या बर्‍याचश्या मुद्द्यांशी मी व्यक्तिश: सहमत आहे... तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण Sun, 11/30/2008 - 22:15
इतिहासातील सोयीस्कर दाखले घेऊन हिंदू-मुस्लीम अशी फूट पाडणाऱ्या अग्रलेखाने खालील मुद्देही विचारात घ्यायला हवे होते. शिवाजीचा स्वीय सहाय्यक मौलाना हैदर अली हा होता. सागरी तळांवर सैन्याचे नेतृत्त्व सिद्दी संबाळ याने केले. मदारी मेहतर याने स्वतःच्या जिवाची पर्वा न करता महाराजांना आग्र्यातून सोडवण्यास मदत केली. पेशवाईमध्ये तोफखाना सांभाळण्याची परंपरा इब्राहिम गारदी याच्याकडे होती. जेव्हा इतर मराठे सरदार आणि उत्तरेतील हिंदू राजे हे प्रत्यक्षरीत्या किंवा अप्रत्यक्षरीत्या अब्दाली-नजीबखानाला मदत करत होते तेव्हा हेच गारदी लोक मराठा साम्राज्याशी एकनिष्ठ राहिले. याउलट जावळीचे शिंदे, खंडोजी खोपडे यापासून ते औरंगजेबाच्या सैन्याचे नेतृत्त्व करणारा मिर्झाराजे जयसिंग हे कोण होते हे पाहा.

In reply to by आजानुकर्ण

विसोबा खेचर Sun, 11/30/2008 - 22:31
अपवाद प्रत्येकच ठिकाणी असतात.. परंतु माझ्या माहितीप्रमाणे तरी अलिकडच्या काळात जो अमानवी दहशतवाद घडला त्यातील बहुतांशी आरोपी फक्त अन् फक्त मुसलमान होते, पाकिस्तानी होते..ही वस्तुस्थिती आहे! मुंब्र्याच्या किंवा माझगाव परिसरातील मुस्लिमांच्या/बांग्लादेशींच्या अनधिकृत वस्त्यांचा आरडीएक्स लपवण्याकरता वापर झालेला आहे... अर्थात, मतांच्या राजकारंणामुळे सगळ्याच गोष्टींकडे काणाडोळा केला जातो हा भाग वेगळा! मुंबईत परवा घडलेल्या दहशतसत्राला, 'एवढ्या मोठ्या शहरात अश्या लहानसहान घटना ह्या व्हायच्याच..!' असं म्हणून आबा पाटील मोकळे होतात! खुर्चीची हाव अन् मतांचं राजकारण, समस्त हिंदूं नेत्यांचा नेळभटपणा, आपल्या फिल्मी लेकासोबत अन् राम गोपाल वर्मांसोबत नुकतीच मुख्यमंत्र्यांनी ताजची एक फिल्मी पिकनिक काढून तिथे शहिद झालेल्यांची राख विझण्याआधीच क्रूर चेष्टा केली..! असो, मतांच्या राजकारणाची अनेक कारणं आहेत, अनेक उदाहरणं आहेत...! सदर अग्रलेखात हिंदूं-मुस्लिम मुद्दा जरूर आहे परंतु त्यात हिंदूंचा नेळभटपणाच अधिक अधोरेखीत केला आहे व तो पटण्याजोगा आहे असे मला वाटते..असो.

In reply to by विसोबा खेचर

आजानुकर्ण Mon, 12/01/2008 - 02:08
जोपर्यंत या हल्ल्याला आपण विशिष्ट चष्म्यातून पाहणार आहोत तोपर्यंत तो प्रश्न सुटणे अवघड होणार आहे. हे अतिरेकी मुसलमानांवरील तथाकथित अन्यायाचा बदला घेण्याचे सोंग घेत असले तरी त्यांचा हेतू भारतात अराजक माजवणे, दोन धर्मांमध्ये फूट पाडणे असाही आहे हे स्पष्ट आहे. त्यांनी हल्ला करताना लोकांच्या चड्ड्या काढून हिंदू आहे की मुसलमान हे तपासले नाही. ह्या हल्ल्याला हिंदूंवरचा हल्ला मानणे ही हिंदुत्त्वाची राजकीय दुकानदारी करणाऱ्या पक्षांचे म्हणणे आहे हे समजून घ्या. त्यांना ह्या परिस्थितीचा राजकीय फायदा उठवायचा आहे ज्याला आपल्यासारख्या सुशिक्षित नागरिकांनी विरोध करायला हवा. मुंब्रा किंवा माझगाव परिसरातील अनधिकृत वस्त्यांचा यासाठी वापर झाला असेल तर त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे. किंबहुना या अनधिकृत वस्त्या येथे कशा उभ्या राहिल्या हे तपासून त्याला जबाबदार सर्वांना शिक्षा झाली पाहिजे. पण हे अतिरेकी मुसलमान होते म्हणून भारतातले सर्व मुसलमान हे अतिरेकी आहेत सिद्ध करण्याचा प्रयत्न आपल्या देशाच्या एकात्मतेच्या अंगलट येईल. (पुन्हा एकदा विचारतो एपीजे अब्दुल कलाम किंवा इलाही जमादार यांना आपण कोण मानता? मुंबईच्या हसन गफूर यांनाही अतिरेकी मानता का?) किंबहुना या प्रसंगात मुंबईत येऊन नाटकबाजी करणारे मोदी, सर्वपक्षीय सभेवर बहिष्कार घालणारे अडवाणी, काहीही बरळणारे आबा पाटील आणि नाच्याप्रमाणे वागणारे विलासराव हे सर्वच किती मूर्ख आहेत हे त्यांनीच दाखवून दिले आहे.

In reply to by आजानुकर्ण

कोलबेर Sun, 11/30/2008 - 22:51
अजानुकर्ण ह्यांच्याशी पूर्ण सहमत. अग्रलेख प्रक्षोभक वाटल्याने अजिबात रुचला नाही विशेषतः सद्य परिस्थितीत.

कलंत्री Sun, 11/30/2008 - 22:12
आजच्या काळात सर्वच राष्ट्रे युद्ध कसे टाळता येईल हेच पाहत असतात. भारताचे सैन्यदल वंगप्रांतात आणि सिंधू देशात जातील असे मात्र घडणार नाही. तरीही आपल्या तिनही देशाचे ऐक्य घडावे असे मलाही वाटते. त्यासाठी बरेच मार्ग आहेत. क्लिंटन साहेबांचे वाचन भरपूर आहे असे दिसते, त्यांनी असे अखंडत्व येण्यासाठी पुरक आणि प्रेरक असलेल्या सर्वच साहित्याची यादी द्यावी अशी विनंती. नथूरामाच्या अस्थी अजूनही ठेवल्या आहेत अशी माहिती मिळाली. हिंदू तत्वज्ज्ञानाप्रमाणे माणसाची मूक्ति अस्थिविसर्जनाने होते. नथुरामाला त्याच्या शिक्षेचे प्रायश्चित्य अजूनही फेडावे लागते. परमेश्वर त्याच्या अस्थिला लवकरच मुक्तता देवो.

In reply to by कलंत्री

माझ्या अस्थि या सिंधू नदी स्वतंत्र भारतात आल्यानंतर विसर्जित कराव्या असे सांगणार्‍या नथूरामला कदाचित मुक्ती मिळालिही नसेल. पण तसे असेल तर त्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊन त्याला मुक्ती मिळावी असे मला वाटते आहे. पुण्याचे पेशवे

आता जग जिंकण्याची वेळ आली आहे. नुसते युद्ध करूनच हे साध्य होणार नाही. चारही पुरूषार्थांचा उपयोग केला पाहिजे. शोध घेत रहा ... उत्तमतेचा, नाविन्याचा आणि सत्याचा!

सत्यवादी Mon, 12/01/2008 - 01:54
लेख वाचनिय आहे. मी गांधीला जितका मनतो जितका हिटलरला सुध्दा. या लोकांनी त्या काळात जे योग्य वाटले ते केले. सद्यपरिस्थिती मध्ये ते भले चूक किंवा बरोबर असेल पण त्यांनी जे काही केले ती काळाची गरज होती... आजची परिस्थिती ही वेगळी आहे. आज भारत एक महासत्ता म्हणुन उदयास येतो आहे, तो महासत्ता बनण्यात अडथळे निर्माण करण्याचे कार्य़ बरेच दिवसापासुन शत्रु करत आहे. मुंबई वरील हल्ला हा देखिल त्याच्याच एक भाग आहे. शुत्रुला हवे आहे की भारताने युध्द करावे, त्या मध्ये शत्रुची हार निश्चितच आहे, पण त्याचे राजकारण करुन तो जिवंत राहु शकतो..... पण सध्या गरज आहे ती स्वसंरक्षणाची आणि जेव्हा महासत्ता बनु तेव्हा पहिले काम पाकिस्थानला जगाच्या नकाशातुन नेस्तबुत करणे. सिंधु नदी आज ना उद्या भारतात परत येणारच आहे. (युध्दाची तयारी करत असलेला) सत्यवादी.

मनीषा Mon, 12/01/2008 - 07:59
आज थोड्याफार फरकाने आज सगळ्यांच्याच मनात हेच विचार असतील . असही वाटतं कि लोकशाहीच्या नावाने सामान्य लोकांची फसवणूक तर होत नाहीयेना ... प्रत्येक वेळी त्यांच्याकडून काही कुरापत होईल मग आपण त्यांचा प्रतिकार करु असं का? ते आपली कुरापत काढायला धजावणारच नाहीत अशी जरब आपण का निर्माण करु शकत नाही? (आपल्याकडे तेव्हढी क्षमता नक्कीच आहे ). प्रत्येक घटनेचे राजकीय परिणाम काय होतील याची चिंता करणे जरुरीचे आहे का? सी. एन. एन. वर काही पाकीस्तानी पत्रकारांची मुलाखत बघीतली ... ते म्हणतात कि या अतिरेक्यांचा पाकिस्तान सरकारशी काही संबंध नाही ... म्हणजे पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानातील लो़क वेगळे आहेत का? पाक सरकारचे त्यांच्या नागरिकांवर काही नियंत्रण नाही का? आणि पाक नागरिकांनी केलेल्या कृतीची जबाबदारी पाक सरकारवर नाही का? दरवेळी १००-२०० निरपराध भारतीय (मग ते कुठल्याही धर्माचे किंवा राजकीय विचारसरणीचे असोत) मरतात ... आणि आम्ही काय करतो ? ---फक्त निषेध .. फारच झालं तर कोणाचा तरी राजीनामा ... यातून काय साध्य होत? यातून आपली वैचारिक दिवाळखोरी आणि कृतीशून्यता फक्त दिसते . अफजल खान वधाचे उदाहरण अगदी योग्य आहे ... कुणी विद्वान म्हणतात कि शिवाजीने खानाला भेटीला बोलाउन दगा केला .. तसं असेल तर असं म्हणणार्‍यांनी 'जशास तसे ' हा न्याय आहे हे समजून घ्यावे. "हिंदू समाजाचे एक सुदैव आहे की ज्या ज्या वेळी पाणी नाकातोंडाशी येते त्या त्या वेळी एखादा चंद्रगुप्त मौर्य, छत्रपती शिवाजी, संभाजी यासारखे महान योध्दे जन्माला येतात " पण दरवेळी पाणी नाकातोंडात जायची वाट कशाला बघायची ? आपल्या इतिहासातून खरच खूप काही शिकण्यासारखे आहे. मला वाटतं राजकीय नेता होउ इच्छी णार्‍यांना एक आभ्यासक्रम पूर्ण करण्याची अट ठेवावी आणि त्यात शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस इ. चे चरित्र (आणि चारित्र्य..) तसेच त्यांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय आणि केलेल्या कृती यांचा आभ्यास करायला सांगावे. ---- पण ही वेळ भांडणाची नाही . आपल्याच लोकांवर दोषारोप करुन आपण आपलीच आब्रु (जगाच्या) चव्हाट्यावर टांगतो आहोत. कौरवाच्या घोषयात्रेच्या वेळी चित्ररथ गंधर्वाने त्याना बंदी बनवले होते. धर्मराजाने अर्जुन- भीम यांना त्यांच्या मदतीला जायला सांगीतले , तेव्हा त्यानी विचारले दुर्योधनाने वेळोवेळी आपल्यावर इतके अन्याय केले तर त्याला मदत कशाला करायची? तेव्हा धर्म म्हणाला ... आपल्यात जे वैर आहे ते आपण कायम लक्षात ठेउच तेव्हा ते १०० विरुद्ध आपण ५ असू , पण बाहेरचे जर आपल्या कोणाला त्रास देत असतील तर आपण १०५ असू ... मला वाटतं आपण हे सुद्धा लक्षात ठेवायला हरकत नाही .

In reply to by मनीषा

प्राजु Mon, 12/01/2008 - 08:33
पण.. प्रक्षोभक वाटतो आहे. सी. एन. एन. वर काही पाकीस्तानी पत्रकारांची मुलाखत बघीतली ... ते म्हणतात कि या अतिरेक्यांचा पाकिस्तान सरकारशी काही संबंध नाही ... म्हणजे पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानातील लो़क वेगळे आहेत का? पाक सरकारचे त्यांच्या नागरिकांवर काही नियंत्रण नाही का? आणि पाक नागरिकांनी केलेल्या कृतीची जबाबदारी पाक सरकारवर नाही का? मनिषा, भारत सरकारचं भारतीय नागरिकांवर किती नियंत्रण आहे? पुण्यामध्ये उच्चविद्याविभूषित कुटुबातला एक सॉफ्टवेअर इंजिनिअर जेव्हा एखाद्या संस्थेचा हस्तक निघतो तेव्हा तो भारतीय नागरिकच असतो.. आणि त्याच्या घरच्यांना याची कल्पनाही नसते. भारतातीलच काही लोक या अतिरेक्यांचे हस्तक असतात . किती लोकांना याची कल्पना असते? मी पाकिस्तानची बाजू घेत नाहीये. पण.. पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानातील लोक नक्कीच वेगळे आहेत. कदाचित पाकिस्तान सरकारचा या सगळ्याला पाठिंबा असू शकेल.. पण पाकिस्तानी सामान्य माणसाचा कितपत पाठिंबा असेल याची शंका आहे. राहिला प्रश्न मुस्लिम दहशतीचा.. तर एकदा ब्रेन वॉशिंग केल्यावर पाकिस्तानातीलच काय पण भारतातील मुस्लिम तरूणही जिहादच्या नावाखाली रक्तमांसाचा खेळ खेळायला तयार होतो. कारण धर्म ही एकमेव गोष्ट आहे जिच्या नावाखाली माणुस (खास करून मुस्लिम) स्वतःचा जीवही तळहातावर घेऊन फिरतो. हिटलर, गांधी, छत्रपती शिवाजी महाराज ही त्या त्या काळची प्रतिकं आहेत. त्या त्या वेळी त्यांना जे योग्य वाटलं ते ते त्यांनी केलं. आणि त्यांच्या कार्याने ज्यांच्या मनावर सखोल परिणाम झाला ते लोक त्यांचे पाईक झाले. ज्यांना त्यांची विचार सरणी पटली त्यांनी त्यांचे अनुकरण केले किंवा स्वतःला त्यांच्या कार्यात झोकून दिले. या २१-२५ वर्षांच्या तरूण मुलांचंही जिहादच्या नावाखाली असंच ब्रेन वॉशींग होत नसेल का.. की हे या अतिरेक्यांच्या दहशतवादाच्या कार्यात स्वत:ला अर्पण करत असतील? फाळणीनंतर दहशतीचा मुद्दा जास्ती प्रखर झाला आहे. जरी ही दहशत इ.स. ७०० पासून असली फाळणीनंतर हे प्रकरण चिघळय गेलं. आणि तेव्हा मुख्य मुद्दा होता काश्मिर. आणि भारत सरकारची केवळ निषेध करण्याची भूमिका याला खतपाणी घालत गेली. आणि मग एकदा घराची किल्ली मिळाली की, कुठे काय आहे हे पहायला आणि मोडून काढायला किती वेळ लागतो? एक मात्र नक्की, यात जर पाकिस्तान सरकारचा पाठिंबा असेल आणि आय एस आय ने मदत केली असेल यात.. ..तर पाकिस्तानी सामान्य नागरिक विनाकारण जागतिक द्वेषाला बळी पडणार आहे. इथे कोणी असा विचार अजिबात करू नये की, मी महाराजांची , गांधीजींची तुलना अतिरेक्यांशी करते आहे. अजिबात नाही.. .. माझा तसा हेतूही नाहिये. मी फक्त सामाजाची मानसिकता ही त्या त्या काळच्या प्रभावशाली व्यक्तिंच्या हेतूमुळे कशी बदलते का?? किंवा त्या व्यक्तिंच्या कार्यानुरूप असते का..? या प्रश्नाचे उत्तर स्वत:ला आणि मिपा करांना विचारायचा प्रयत्न करते आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by विसोबा खेचर

प्राजु Mon, 12/01/2008 - 08:49
मी फक्त दहशतवाद्यांच्या मानसिकतेचा विचार करते आहे. फक्त भारतालाच टार्गेट करायचे असते तर ताज आणि ओबेररॉय मधल्या युके आणि युएस च्या लोकांच्या रूमचे नंबर विचारून त्याना कशाला मारले?? त्यांना सोडून द्यायला हवे होते ना. पण तसे नाही केले. एकूणच सर्वच जगावर दहशतवाद माजतो आहे आणि भारत प्रत्युत्तर करण्यात कमी पडतो आहे हेच खर. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

विसोबा खेचर Mon, 12/01/2008 - 08:46
हिटलर, गांधी, छत्रपती शिवाजी महाराज ही त्या त्या काळची प्रतिकं आहेत. त्या त्या वेळी त्यांना जे योग्य वाटलं ते ते त्यांनी केलं. ??????????? हे वाक्य वाचून हसावं की रडावं तेच कळलं नाही! असो. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विसोबा खेचर Mon, 12/01/2008 - 09:05
हिटलर, गांधी, छत्रपती शिवाजी महाराज ही त्या त्या काळची प्रतिकं आहेत. त्या त्या वेळी त्यांना जे योग्य वाटलं ते ते त्यांनी केलं. इतर दोघांबद्दल मला माहीत नाही, परंतु वरील वाक्यातील शिवरायांच्या उल्लेखाला माझा तीव्र आक्षेप आहे! शिवरायांनी जे केलं ते ठराविक एका काळाशी निगडीत नसून त्यांनी जे केलं तो माझ्या मते एक त्रिकालाबधित मानदंड आहे! त्यांचं कार्य हे कुठल्याही काळाच्या, युगाच्या परे आहे! पार आहे, पल्याड आहे! असो, मी या विषयात पुढे वाद घालू इच्छित नाही..! तात्या.

In reply to by प्राजु

मराठी_माणूस Mon, 12/01/2008 - 09:40
हिटलर, गांधी, छत्रपती शिवाजी महाराज ही त्या त्या काळची प्रतिकं आहेत. त्या त्या वेळी त्यांना जे योग्य वाटलं ते ते त्यांनी केलं ज्युंची क्रुर हत्या , त्यांचा अमानुष छळ हे कोणत्या अँगल नी योग्य? महाराजानी आणि गांधींनी असे काय केले की त्याना तुम्ही हीट्लर च्या पंक्तीत बसवले

In reply to by प्राजु

चेतन Mon, 12/01/2008 - 11:36
पाकिस्तानी सामान्य माणसाचा कितपत पाठिंबा असेल याची शंका आहे. कदाचीत तुम्ही म्हणताय ते खर असेलही पण पकिस्तानी जनता म्हणजे कोण जे या दहशतवादाला विरोध करतात ते मूठ्भर लोक म्हणजे पाकिस्तानी जनता आहे का? बहुतांश लोकांच्या पाठीब्याशिवाय हे असले प्रकार घडू शकत नाहीत हे माझे तरी ठाम मत आहे. लेख उत्तम थोडासा भडकावू असेलही पण अग्रलेखाच्या विचारसरणिला साजेसा अभिनंदन सुस्पष्ट चेतन

In reply to by प्राजु

मनीषा Tue, 12/02/2008 - 12:49
तु पुण्यातल्या उल्लेख केलेल्या केस चा संदर्भ मला माहीत नाही पण ज्या अर्थी तु उल्लेख केलास त्या अर्थी ती उघडकीस आलेली आहे म्हणजेच सरकार ने हस्तक्षेप केला आहे . आपल्या कडे अशा कारवायां करणार्‍यांना सरकारी धाक नक्कीच आहे म्हणुन तर सद्ध्या "मालेगाव" प्रकरण चालु आहे. कोणीही हिदू देशाबाहेर अतिरेकी कामं करताना पकडलेला माझ्या माहितीत नाही . आपण कोणाला सक्तीने धर्मांतर करायला भाग पाडत नाही (आता नाही आणि इतिहासात सुद्धा नाही) आपल्या देवळांमधुन हत्यारे सापडत नाहीत . आपल्या धर्मात धर्मासाठी मरण ही संकल्पना आहे ... पण धर्मासाठी कोणाचा जीव घ्यायची शिकवण नाही . भारतात कितीही करप्शन असेल पण भारत सरकार कुठल्याही अतिरेकी संघटनेची पाठराखण करत नाही .. पण पाक च्या बाबत सगळं वेगळच आहे ... त्या देशाचं , आणि तिथल्या सरकारचं अस्तित्वच मुळी या धर्मवेडावर अवलंबून आहे. सर्व पाक नागरिक भारत द्वेष्टे नसतीलही ... पण बहूसंख्य आहेत हिटलर, गांधी, छत्रपती शिवाजी महाराज ही त्या काळाची प्रतिकं नसून त्या काळात त्यांच्या आजूभाजूला जी परिस्थिती होती / जे घडत होतं त्याची प्रतिक्रिया होती ... (तसं हिटलर आणि गांधी हे समकालीनच नव्हते का?) "या २१-२५ वर्षांच्या तरूण मुलांचंही जिहादच्या नावाखाली असंच ब्रेन वॉशींग होत नसेल का.. " नक्कीच होतं ... त्यांच्या मदरसांमधे ह्याच गोष्टी धार्मिक शिक्षणाच्या नावाखाली शिकवल्या जातात ... मुशर्रफ च्या काळात अमेरिकेच्या दबावामुळे या प्रकाराला बंदी घातली होती .. पण ज्या गोष्टी तो पर्यंत उघडपणे होत होत्या त्या आता चोरी-छिपे होतात . भारत दरवेळी अतिरेकी किंवा गुन्हेगार लोकांची लिस्ट पाक कडे देतो ... त्यांच्या तेथिल वास्त्व्याचे पुरावे देतो पण आजपर्यंत कोणालाही भारताच्या हवाली करण्यात आले नाही ... आणि अगदी अंगाशी आले कि कांगावा करणे हे तर नेहमीचेच आहे "पाकिस्तानी सामान्य नागरिक विनाकारण जागतिक द्वेषाला बळी पडणार आहे." --- ओल्याबरोबर सुकं जळणारच .. पण या निरपराध पाक नागरिकांना सहनुभुती दाखवण्याच्या नादात अतिरेकी मोकळे सुटुन केवळ भारतातच नाही तर जगभर किडामुंगी सारखी माणसं मारतायत .. "सामाजाची मानसिकता ही त्या त्या काळच्या प्रभावशाली व्यक्तिंच्या हेतूमुळे कशी बदलते का?? किंवा त्या व्यक्तिंच्या कार्यानुरूप असते का..? " ---समाजाची मानसिकता ही खूप व्यापक संकल्पना आहे ... ती घडायला जसा खूप मोठा काळ लागतो तशी ती बदलायला सुद्धा खूप मोठा काळ जावा लागतो आणि त्यासाठी अनेक घटक (उदा. धर्म, अर्थ, शिक्षण, इतिहास, राजकारण, समाजकारण इ.) एकत्रित पणे जबाबदार असतात असे मला वाटते .

अनिल हटेला Mon, 12/01/2008 - 08:26
अग्रलेख आवडला, मनिषा चा प्रतीसाद ए-१ !! +++१ =D> आता तरी जागे व्हा !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

रामदास Mon, 12/01/2008 - 08:46
मुद्दे पटले.जे पटले नाहीत त्याची चर्चा करणार नाही. इतिहासापासून आपण काहीच शिकलो नाही खरे आहे. राजकीय नेभळटपणा हा जुना आजार आहे . आतंकवादाला हिंदू आणि मुस्लीम असा रंग देउ नये हे खरेच.पण आतापर्यंतचे जवळजवळ सगळेच हल्ले हे मुस्लीम आतंकवाद्यांनी केले असल्यामुळे तो रंग येणे अपरीहार्य आहे असे वाटते.आतंकवाद देशांतर्गत समस्या पण आहे .चिथावणी बाहेरून येते पण खतपाणी इथेच मिळते हे पण वास्तव आहे. या निमीत्ताने एक सशक्त चर्चा व्हावी.

अग्रलेख आवड्ला. पाहुण्या संपादकाने विविध संदर्भाचा चपलख वापर करत त्यांना वाटलेला विचार त्यांनी योग्य पद्धतीने मांडला आहे. लेखन प्रक्षोभक वाटत असले तरी ' दै. सामना'चे रोखठोक बर्‍याचदा असेच असते त्यामुळे त्यावर विशेष लक्ष देण्याची गरज नाही असे वाटते. -दिलीप बिरुटे

खरा डॉन Mon, 12/01/2008 - 09:55
आतापर्यंतचा सर्वात चांगला अग्रलेख. कसलाही ढोंगीपणाचा आव न आणता क्लिंटनने मुसलमान समाजाला अगदी योग्य झोडपले आहे. सर्वच विचार आवडले आणि पटले. प्रतिसाद संपादित. भारतातील कोणत्याही एका समाजाला उद्देशून वेडेवाकडे लेखन करणे टाळावे. धन्यवाद, -चित्रा

ऋषिकेश Mon, 12/01/2008 - 09:56
आशावादी शेवटापर्यंत प्रवास करणारा अग्रलेख आवडला. अभिनंदन. त्यातील प्रत्येक मुद्दा पटो वा ना पटो या घडीला प्रत्येकाने आपल्याला जमतील, पटतील त्या मार्गाने लढा देणे चालु करण्याची गरज आहे. योग्य-अयोग्य यावर चर्चा करण्यापेक्षा कृती महत्त्वाची. तेव्हाच अग्रलेखात म्हटल्या प्रमाणे ही इष्टापत्ती ठरु शकेल बाकी
पण महिन्याभरात पहिले पाढे पंचावन्न म्हणत आपण भारतीय एकमेकांशी भांडण्यात मश्गुल होऊन जाऊ
सध्या येणार्‍या बातम्या बघता हे महिनाभराचं भाकीत सपशेल चुकुन काहि तासांवर आलेलं बघून वाईट वाटतंय.
-(गोंधळलेला) ऋषिकेश

मदनबाण Mon, 12/01/2008 - 09:58
अग्रलेख आवडला.. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर

विसुनाना Mon, 12/01/2008 - 12:27
१. भारतात बाबरी मशीद पाडावानंतर इस्लामी दहशतवाद फोफावला. - ठीक. पण चीन, चेचन्या,स्पेन, फ्रान्स, युके, सोमालिया, इंडोनेशिया या देशात बाबरी मशिदी कुठे होत्या? - असाच न्याय लावायचा तर जगातील प्रत्येक असंतुष्टाने दहशतवादी व्हायला हवे. आणि जगात 'संतुष्ट' कोण आहे? (डिश टिव्ही जाहिरातीतले सोडून) - चला, बाबरी मशीद आपण पुन्हा बांधून देऊ. मुस्लिम समाजाची बिनशर्त माफी मागू. त्यांच्या न्याय्य मागण्याही पूर्ण करू. बास? पण त्यानंतर एकही दहशतवादी, देशद्रोही कारवाई कोणत्याही धर्माकडून होता कामा नये. ही जबाबदारी त्या समाजाच्या धार्मिक नेत्यांची. अन्यथा त्या धर्माच्या सर्व अनुयायांना देशात दुय्यम नागरिकांचा दर्जा देण्यात येईल. करार म्हणजे करार! -'आपला धर्मच तेवढा बरोबर, इतरांचा चुकीचा' इतपत धार्मिक कट्टरता प्रत्येक धर्मात आहे. त्या-त्या धर्माबाहेरील लोकांना आपल्या धर्मात ओढण्यासाठी प्रयत्नही प्रत्येक धर्माकडून होतात. हे थांबले पाहिजे. ज्याला जो धर्म स्विकारायचा असेल त्याने तो स्वखुशीने स्विकारावा किंवा कोणताच धर्म स्विकारू नये. पण 'जो आपल्या धर्मात येत नाही त्याला ठार करावे' असे कोणत्याही धर्मात सांगितले असेल तर त्या धर्मातील लोकांनी ती काळ्या दगडावरची रेघ न समजता त्यांच्या धर्मशास्त्रात कालपरत्वे योग्य ते बदल करून त्या धर्माला अधिक 'मानवी आणि समकालीन' बनवावे अशी अपेक्षा बाळगणे चूक आहे काय? -मुस्लिमांतर्गत विश्वातही दहशतवादी कारवाया आणि युद्धे होतात. त्याला 'शिया आणि सुन्नी' वादाचे दृश्य स्वरूप मानावे लागते. इतर धर्मातही असे विरोधी विचारसरणीचे संप्रदाय आहेत. पण त्यांमध्ये असा रक्तलांच्छित वाद आजच्या काळात तरी होत नसावा. तर, या रक्तपिपासू वृत्तीचे मूळ शोधून त्याचे निर्दालन झाले पाहिजे. ('जे खळांची व्यंकटी' प्रयत्नाने सांडवू.) १.अ. 'मुस्लिम संस्कृती' सुसंस्कृत नाहीच. इतिहासात असंख्य उदाहरणे आहेत. -मुळात अत्यंत क्रूर आणि रानटी अरब टोळ्यांना सुसंस्कृत आणि समंजस बनवण्यासाठी (शांतीचा मार्ग) निर्माण झालेला हा धर्म आहे हे विसरून चालणार नाही. (त्या धर्माला) विरोध करणार्‍याला ठार केले नाही तर तो आपल्याला ठार करेल ही रास्त भीती 'धर्म उद्गात्यांना' होती. म्हणूनच त्यांच्या मूळ शिकवणीत 'तुम्ही आमचे मित्र नाहीतर आमचे शत्रू' या न्यायाने काही सूत्रे दिलेली आहेत. शत्रू म्हणजे केवळ ठारच करायचा लायकीचा! असे समिकरण होते. मग तो प्रत्यक्ष बाप/भाऊ असला तरी. त्या धर्माचे अनुयायी नसतानाही इतरेजन शांततेने नांदू शकतात ही कल्पनाच त्याकाळी नव्हती. परंतु या धर्माचा इतर संस्कृतींशी संबंध आल्यावर त्यांच्या लक्षात आले की असेच काही नाही. म्हणूनच तर भारतात 'जिझिया' कर देऊन का होईना पण इतर धर्मिय जिवंत राहू शकले. शिवाय एकदा हा धर्म स्थिर झाल्यावर इराणी आणि भारतीय संस्कृतींसह अनेक संस्कृतींचे त्यावर संस्कार होत गेले आणि 'धर्म टिकवण्यासाठी हत्या' हा विचार मागे पडला. त्या धर्माची एक संस्कृती निर्माण झाली. तत्त्ववेत्ते, गणिती,स्थापत्यशास्त्री, लेखक, कवी इ. व्यापक पाया निर्माण झाला.इतर धर्मांच्या तुलनेने हे खूपच वेगाने घडले.धर्म समंजस होत गेला. आज 'इस्लामी दहशतवाद' पुन्हा त्या धर्माला अरब टोळ्यांच्या काळात घेऊन जाऊ पहात आहे. याला त्या धर्मातील विचारवंतांनी पायबंद घातला पाहिजे आणि इतर धर्मांनी त्यांना मदत केली पाहिजे. २. इतिहासाला विसरून निर्मळ दृष्टीने जगाकडे पाहिले पाहिजे. -सर्व पक्षांनी तसे करणे अपेक्षित आहे की फक्त समंजस पक्षांनी? ३. अपवादाने नियम सिद्ध होत नसला तरी अपवाद आहेत हे विसरून चालणार नाही. -प्रश्नच नाही. मी तर म्हणतो 'देशद्रोही' हे त्यांच्या-त्यांच्या धर्मांना लांच्छन आहेत. साप म्हणून भुई धोपटायला नकोच! पण जे खर्‍या अर्थाने राष्ट्रप्रेमी आहेत त्यांनी स्वतःहून सुरक्षा यंत्रणेची मदत करण्यास पुढे आले पाहिजे. चला, सगळ्या बांगलादेशीय आणि पाकिस्तानी लोकांना भारतातून एकगट्ठा हाकलून देऊ. त्यांच्या बाजूने कुणीही कोल्हेकुई करायची नाही, त्यांना पाठीशी घालायचे नाही. तसे करणार्‍यास कठोर शिक्षा! हे तरी 'अमुकतमुकधर्मवादी' विधान नाही ना? कुठून तरी सुरुवात केली पाहिजे ना? -चला, एक प्रचंड विदागार बनवू - ज्यात प्रत्येक व्यक्तीचा आगापिछा (पत्ता, नातेवाईकांची नावे-पत्ते) असेल. आधुनिक तंत्रज्ञान वापरून (भारतातील आणि शक्य असेल तर जगातील) प्रत्येक व्यक्तीला जबाबदार (अकाऊंटेबल या मराठी अर्थाने) बनण्यास भाग पाडू. व्यक्तीस्वातंत्र्य आणि अनागोंदी यांच्यात पुसट सीमा आहे. ती आपण पक्की करू. या उपायाला तरी कोणाच्या 'धार्मिक' हक्कांवरचे आक्रमण म्हणता येणार नाही. ४. हिंदूंचा नेभळटपणा नाही. -मान्य आहे. 'हिंदू' आजच्या काळात तरी बहुसंख्येने 'समकालीन' आहेत. चर्चमध्ये लग्न लावण्याइतपत ते पुढारलेले आहेत. निदान आजपर्यंत तरी 'हिंदू'च मुस्लिमांना समजून घेण्याची भाषा करत आहेत. याला नेभळटपणा म्हणता येणार नाही. -पण इतर धर्मांनी खुशाल आक्रमण करायचे आणि फक्त हिंदूंनी समजावून घ्यायचे यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या तर मात्र अधिकाधिक हिंदू आक्रमक बनत जातील. त्यावेळी दोष हिंदूंनाच देऊन कसे चालेल? -निदान या अतिप्रसंगानंतर तरी 'सर्वधर्मसमभाव' या भारताच्या घटनेतील महत्त्वाच्या शब्दाला खरा अर्थ प्राप्त होईल असे वर्तन (मतपेटीवर डोळा ठेऊन किंवा असंतोषाची भीती बाळगून) एकतर्फी धार्मिक कारवायांकडे कानाडोळा करणार्‍या राजकीय पक्षांकडून सुरू होईल तर बरे. ५. संभवामि युगेयुगे| -ही विचारसरणी योग्य नव्हे. आजच्या काळात तर मुळीच नाही. नेहमी एखाद्या अवताराची वाट पहात परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायलाच पाहिजे असे नाही. -पाकिस्तान आणि बांग्लादेश भारताच्या सीमेत समाविष्ट होतील ही अपेक्षा पूर्णपणे चुकीची आहे. इतकेच काय पण आझाद काश्मिर आणि अक्साईचीनही भारताला सहजासहजी परत मिळेल असे नाही. वास्तववादी अपेक्षा एवढीच की 'देशासाठी योग्य काही करताना कोणत्याही धर्माला कसलीही तोशीश लागता कामा नये' ही विचारसरणी सर्वांनीच सोडून दिली पाहिजे. यात अगदी रस्त्यावरही देवळे, मशिदी हालवण्यापर्यंत सारे काही आले. नाहीतर 'आल्ला मालिक'!

क्लिंटन Mon, 12/01/2008 - 19:00
नमस्कार मिसळपाव गावकर्‍यांनो, मी थोड्या वेळापूर्वी पुण्याला परत आलो आणि आता मला माझे उत्तर लिहायची सवड मिळत आहे. थोड्या वेळापूर्वी लिहायला सुरवात करणार होतो पण अचानक दुसरे काम आल्यामुळे लॉगिन करूनही पुढे लिहिता आले नाही. असो. मी सर्वांच्या प्रतिक्रिया वाचल्या आहेत. आपल्या चर्चेतील सहभागाबद्दल धन्यवाद. मी प्रत्येक प्रतिसादाला वैयक्तिक उत्तर न देता माझे सर्व मुद्दे एकत्र मांडत आहे. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे भारतावर मोठे संकट आलेले असताना समाजात फूट पाडणारी भाषा वापरल्याचा आरोप झाला आहे. त्यावर माझे एकच उत्तर आहे ते म्हणजे सावरकरांचे वाक्य-- 'आलात तर तुमच्या सह, नाही आलात तर तुमच्या विना आणि विरोधाल तर उच्छेदून हे हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही'. कोणीही माणूस घरी कोणत्या वेगळ्या देवाला मानतो म्हणून त्याला ठार मारा ही हिंदू संस्कृती अजिबात नाही. उलट 'आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति' असे आपण म्हणतो. भगवद्गीतेतही भगवान कृष्णाने लोकांसाठी कर्मयोग आणि भक्तीयोग असे मार्ग सांगितले आहेत. हे दोन्ही मार्ग ईश्वराकडे जायचे वेगळे मार्ग आहेत यापैकी आपल्याला जो मार्ग पटतो तो आपण निवडायचा. असे असताना जे मुस्लिम ' आमच्याबरोबर येत असतील' (उदा. माजी राष्ट्रपती कलाम, परमवीरचक्र विजेते अब्दुल हमीद वगैरे) त्यांना विरोध करायचे कारण काय? आमच्याबरोबर येणे या म्हणण्याचा अजिबात गैर अर्थ काढू नका. आमच्याबरोबर येणे म्हणजे सक्तीचे धर्मांतर नाही. एक उदाहरण द्यायचे झाले तर मी अमेरिकेत ५.५ वर्षे एक विद्यार्थी म्हणून होतो. त्या देशाने मला खूप काही दिले. शिक्षण आणि संशोधनासाठी मला जे जे काही हवे होते ते दिले, इतकेच नव्हे तर विद्यार्थी असताना माझ्या राहणीसाठी भरपूर पैसे दिले.कधी काळी स्वतःची गाडी असावी हे स्वप्न माझे अमेरिकेत पूर्ण झाले.मला अमेरिका सोडून का यावे लागले यामागची कारणे जरा वेगळी आणि वैयक्तिक आहेत. त्या कारणांचा उल्लेख इथे करायची गरज नाही. पण सांगायचा मुद्दा म्हणजे आजही माझ्या मनात त्या देशाविषयी कृतज्ञताच आहे. मी अमेरिकेत असताना माझी परिने त्या देशासाठी जे जे काही मला करता येईल तेच मी केले. त्या दृष्टीने मी 'अमेरिकनांबरोबर जात होतो'. मला त्या देशात कोणीही धर्म बदलायला सांगितला नाही. त्याच पध्दतीने भारतातील मुस्लिमांकडून आणि सर्वांकडून अपेक्षा अशी की त्यांनी स्वतःला शक्य असेल त्या पध्दतीने आपल्या देशाच्या प्रगतीस हातभार लावावा निदान पाकड्यांना कोणत्याही पध्दतीची मदत करू नये. आमच्या छत्रपतींचे स्वीय सचिव आणि आग्रा प्रकरणात जीवाची बाजी लावणारे आणि इतर अनेक हे धर्माने मुस्लिम होते. त्यांनाच कलामसाहेबांप्रमाणे विरोध करायचा प्रश्नच नाही. अशा मुस्लिमांविषयी कोणालाही काहीही म्हणायचे नाही. पण मागे एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे जर १९४६ च्या निवडणुकींमध्ये बहुतांश मुस्लिम जागांमधून पाकिस्तान हा एककलमी कार्यक्रम राबवणारे मुस्लीम लीगचे उमेदवार निवडून गेले असतील तर याचा अर्थ त्या मुस्लिमांनी आमच्या देशाच्या फाळणीला पाठिंबा दिला आहे असा होतो. हा देशद्रोह नाही का? ज्यांनी ज्यांनी मुस्लीम लीगला मते दिली त्यांना पाकिस्तानात हाकलून दिले पाहिजे अशी मागणी केली तर त्यात काय चुकले? अशापध्दतीने लीगला मते देणे म्हणजे 'विरोध करणे' आणि त्याला आपण दुर्दैवाने उच्छेदले नाही. तसेच गैर मुस्लिमांच्या कत्तली करून आपण गाझी बनून जन्नतमध्ये जाऊ आणि आपल्याला ७२ अप्सरांचा उपभोग घेता येईल असा विचारसुध्दा मनात आणणारा माणूस अत्यंत धोकादायक आहे आणि त्याने कोणत्याही दहशतवादी कृत्यात भाग घेण्याआधीच त्याला जन्नतमध्ये पाठवावे अन्यथा आपला नंबर दहशतवादी हल्ल्यात लागणार नाही यासाठी प्रार्थना करायची तयारी ठेवावी. तेव्हा 'आलात तर तुमच्या सह' या मुद्द्यावर माझे मत हे आहे. दुसरे म्हणजे हिंदू सैन्य पाकिस्तान आणि बांगलादेश कबजात आणेल आणि आपण इतके सामर्थ्यशाली होऊ की तेथे विरोध करणार्‍यांना एकतर त्यांच्या जन्नतमध्ये किंवा कायमचे देशोधडीला लाऊ हे स्वप्न पूर्ण व्हायला किती वेळ लागेल माहित नाही. कदाचित ५० वर्षे, कदाचित २०० वर्षे, कदाचित २००० वर्षे! पण पाकिस्तान आणि बांगलादेश ही राष्ट्रे आमच्या जमिनीवर बेकायदेशीर रित्या स्थापन केलेली आहेत असे म्हटले तर काय चुकले?समजा माझ्या घराची एक खोली गुंडाने बळकावली आहे. ती आज परत घेणे मला शक्य नाही. पण म्हणून मी विसरून जाऊ की माझ्या घरात ती एक खोली होती?कदापि नाही. एक ना एक दिवस जेव्हा अनुकूल परिस्थिती निर्माण होईल तेव्हा ती खोली मी कबजात घेणारच आहे. अगदी शेकडो वर्षे गेली तरी चालतील पण तरीही मी ती खोली विसरणार नाही आणि तोपर्यंत माझे स्वातंत्र्य अपुरे असेल असे माझे मत आहे. पॅलेस्टाईनमधील 'देवाने दिलेल्या' जमिनीवर ज्यूंच्या इस्त्राएल देशाची स्थापना व्हावी म्हणून ज्यू लोकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न राष्ट्राची स्थापना व्हायच्या आधी ५०-६० वर्षांपासून सुरू केले होते. त्यासाठी त्यांची 'झिओनीस्ट काँग्रेस' स्थापन झाली होती. १९३७ काँग्रेसपुढे प्रस्ताव आला की पॅलेस्टाईन सोडून आणखी थोडे पश्चिमेला इस्त्राएल या ज्यूंच्या 'होमलँड' ची स्थापना व्हावी. त्यावर डेव्हिड बेन गुरिओन यांचे उत्तर आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारे आहे. ते म्हणाले की गेली २००० वर्षे आम्ही ज्या जमिनीचा ध्यास धरला आहे त्या जमिनीविषयी कोणतीही तडजोड आम्ही स्विकारणार नाही. पॅलेस्टाईनची फाळणीसुध्दा आम्हाला मंजूर करावी लागली तर ती एक तात्पुरती व्यवस्था असेल. अन्यथा आम्हाला आमच्या पुढील पिढ्या माफ करणार नाहीत! (हेच डेव्हिड बेन गुरिओन पुढे इस्त्राएलचे पहिले पंतप्रधान झाले). हे बोलणे किंवा मुळात इस्त्राएलची स्थापना हे नैतिक दृष्ट्या कितपत योग्य होते हा वेगळा मुद्दा झाला. पण सांगायचे म्हणजे ज्यू लोकांचे ध्येय स्पष्ट होते. त्यासाठी २००० वर्षे गेली तरीही कोणतीही तडजोड स्विकारायला ते तयार नव्हते. आणि आपण ६० वर्षे नाही झाली की विसरूनच जातो की ती जमिन आपली आहे. ६० वर्षे सोडूनच द्या अगदी १६ ऑगस्ट १९४७ ला ती जमिन आपली आहे हे कोणाच्या लक्षात असेल का?याउलट आपल्या प्रतिस्पर्ध्याकडे 'हसके लिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान' ही घोषणा चालते (विशेषतः दंगलींच्या वेळी) असे वाचनात आले आहे. १९४७ मध्ये पूर्व बंगाल, सिंध, बलुचिस्तान, पश्चिम पंजाब आणि वायव्य सरहद्द प्रांत आपल्या हातातून गेला. १९४८ मध्ये पाकव्याप्त काश्मीर गेला. सरदार पटेलांचे खंबीर नेतृत्व नसते तर १९४८ मध्ये हैद्राबाद सुध्दा गेला असता! अरूंधती रॉयसारख्यांचे म्हणणे आहे की २००८ मध्ये काश्मीर खोर्‍याला स्वातंत्र्य देऊन टाकावे. आसामातील परिस्थिती अशीच कायम राहिली तर पुढील २० वर्षांत त्या राज्याचे काय होईल सांगता येत नाही. असे एक एक करून आपल्या भारतमातेचे लचके तोडणार का आपण? बोला. बाबासाहेब पुरंदरे म्हणतात की ज्या देशाची इंचभर जमिनही शत्रूच्या ताब्यात आहे तो देश कायम युध्दमानच राहिला पाहिजे. सध्याच्या काळात आपण सतत युध्दमान राहू शकलो नाही (ते शक्यही नाही) तरी आपला मोठा भूभाग शत्रूच्या ताब्यात आहे हे लक्षात तरी ठेवणार की विसरून जाणार? मान्य आहे की मार्ग सोपा नाही. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे (मुळचा श्लोक आठवत नाही पण अर्थ आठवतो). त्यात म्हटले आहे की हळूहळू चालून मुंगी हजार योजने चालून जाऊ शकेल पण जागेवरून हललाच नाही तर गरूड एक पाऊल सुध्दा पुढे जाणार नाही. आपल्याला कधीतरी सुरवात करायला हवी की नाही? आणि या मार्गात लष्करी बळ महत्वाचे आहेच. पण त्याहूनही अधिक महत्वाचे आहे भारताला सर्व क्षेत्रांमध्ये बलशाली बनवायचे. अर्थकारण, अभियांत्रिकी, संशोधन, वैद्यकिय क्षेत्रांमध्ये भारत हे अग्रेसर राष्ट्र व्हायला हवे. शेवटी जगात बलिष्ठांचीच किंमत केली जाते आणि दुबळ्यांची नाही हे लक्षात घ्यायला हवे. याच बळाच्या जोरावर चीनने तिबेटमध्ये काहीही केले तरी कोणी काही म्हणू शकत नाही. याच बळाच्या जोरावर अमेरिका इराकवर इतर कोणाचीही पर्वा न करता आक्रमण करू शकते. याच बळाच्या जोरावर चीन तियानानमेन चौकात लोकशाही समर्थक विद्यार्थ्यांवर खुशाल रणगाडे घालू शकते.इस्त्राएल पॅलेस्टिनींची दडपशाही करते तरीही त्यांचे का चालते? कारण अमेरिकेत ज्यू लोकांची आर्थिक ताकद प्रचंड आहे. त्याचप्रमाणे भारताचा सर्व क्षेत्रांमध्ये वर्चस्व असला पाहिजे.असा दरारा असेल तरच भविष्यकाळात (कधी ते सांगता येत नाही) आपण सिंधू नदी भारतात परत आणू शकू. कारण असे वर्चेस्व असेल तरच जगाची भारताला काही विचारायची हिंमत राहणार नाही. त्यासाठी खूप काही करायला हवे असे नाही. आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात व्यवस्थित योगदान दिले तरीही एक ना एक दिवस जगात भारताचे वर्चेस्व निर्माण होईल. माझे स्वतःचे सांगायचे झाले तर मी अमेरिकेत असताना पी.एच्.डी. घेऊन भारतात परत येऊन एक संशोधक म्हणून अभियांत्रिकी क्षेत्रात काम करून माझे योगदान येण्याचा निश्चय केला होता. पण काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही. सध्या मी दुसर्‍या एका खटपटीत आहे आणि त्या क्षेत्रात माझे योगदान द्यायचा माझा प्रयत्न असेल. त्या क्षेत्रात माझा प्रवेश झाला की मी मिसळपाववर जाहिर करेनच. (बहुदा पुढील ६ महिन्यांत) मी माझ्या मुळच्या आणि आताच्या लेखातील मते वेगवेगळी पुस्तके वाचून स्वतः त्यावर विचार करून बनविलेली आहेत. आणि जे माझ्या बुध्दीला पटले नाही ते मी कधीच मान्य केले नाही (उदाहरणार्थ हिंदू संस्कृतीतील कर्मकांडे). संतुलित वाचन होण्यासाठी मी जसे सावरकरांचे सहा सोनेरी पाने वाचले तसेच रोमिला थापर यांची पुस्तके सुध्दा वाचलली आहेत. तसेच अमेरिकेतील आमच्या विद्यापीठातील ग्रंथालयातून एस्.आर. बक्षी, ग्रँड डफ यांची मध्ययुगीन भारतावरील पुस्तके वाचली आहेत. तसेच भारताच्या फाळणीवर, स्वातंत्र्यलढ्यावर, इस्त्राएल्-पॅलेस्टाईन प्रश्नावर आणि दुसर्‍या महायुध्दावर मी पुस्तके वाचली आहेत. आणि आणि या सगळ्यांमधून माझी मते मी बनवली आहेत. श्री. कलंत्री यांनी माहितीचे स्त्रोत मागितले म्हणून मुद्दामून लिहित आहे. या सर्व मुद्द्यांवर वैयक्तिक पातळीवर न जाता चर्चा करायला मला आवडेल. माझा प्रतिसाद बराच लांबलचक झाला आहे याची मला कल्पना आहे. पुन्हा एकदा चर्चेत भाग घेतलेल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद ---विल्यम जेफरसन क्लिंटन

In reply to by क्लिंटन

प्राजु Mon, 12/01/2008 - 20:35
माझे म्हणणेही हेच आहे.."घरात झुरळं झाली तर त्यांना मारायलाच हवं. आणि पुन्हा होऊ नयेत .. येऊ नयेत यासाठी वेळच्या वेळी प्रतिबंधक उपायही करायला हवेत. पण आपल्या घरात झुरळं त्रास देतात म्हणून संपूर्ण गावभराच्या झुरळांना मारत सुटायचं याला काय अर्थ आहे. आणि ते शक्य आहे का?" दुसर्‍यांच्या घरात झुरळं येतात ते जर योग्य प्रतिबंध करत असतील तर आपणही नको का करायला?" माझ्या देशाच्या शांततेचा भंग करणारा पाकिस्तानच नव्हे तर कोणताही देश.. अगदी चीन, बांग्लादेश किंवा दुसरा कोणताही देश.. हा माझा शत्रूच आहे. कर्मधर्म संयोगाने या यादित पाकिस्तानचे नाव सर्वात वरती आहे आणि तो देश मुस्लिम आहे म्हणून संपूर्ण मुस्लिम धर्माबद्दल असं बोलणं मला पटत नाही. किंवा इस्लाम वाईटच आहे हे म्हणणं मला मला पटत नाही. पाकिस्तान हे जर मुस्लिम राष्ट्र नसतं तरीही माझा तो शत्रूच असता कारण माझ्या देशाचा तो शत्रू आहे. मी आधीच म्हंटले आहे की, महाराजांची किंवा म. गांधींची तुलना मला कोणाशीच करायची नाही. या व्यक्ती या त्या त्या काळात लोकांच्या मानसिकतेवर प्रभाव टाकणार्‍या होत्या. आणि त्यातून .. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊनच वीर तानाजी, बाजी प्रभूं सारखे योद्धे जन्मले. ज्या व्यक्तीचा आपल्यावर प्रभाव असतो आपण तिच्या विचारांचं आचरण करतो हे जर खरं असेल तर नकळत्या वयात जर इस्लाम हा धर्म केवळ आणि केवळ जिहादसाठी आहे आणि आपल्याला तेच करायचं आहे असं जर एखाद्या बालकाच्या मनावर बिंबवलं जात असेल तर जो कोणी बिंबवणारा गॉडफादर असेल त्याच्या विचारांनी ते बालक प्रेरित होणार नाही का? हाच प्रश्न मला विचारायचा आहे इथल्या चर्चेत भाग घेणार्‍यांना. म्हणजेच काय तर इस्लामचा चुकीचा अर्थ ते घेत आहेत असा होतो का? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वेताळ Mon, 12/01/2008 - 19:24
पण सर्वाच्या डोळ्यात अंजन घालणारा नक्कीच आहे.महाभारतात पांडव कौरवांकडे फक्त जगण्यासाठी पुरेशी भुमी मागत होते .परंतु ती न मिळाल्याने पुढचे सर्व महाभारत घडले. आपला लेख व प्रतिक्रिया खुपच माहितीपुर्ण आहेत्.धन्यवाद वेताळ

सागरलहरी Mon, 12/01/2008 - 19:42
"१.अ. 'मुस्लिम संस्कृती' सुसंस्कृत नाहीच. इतिहासात असंख्य उदाहरणे आहेत. -..........परंतु या धर्माचा इतर संस्कृतींशी संबंध आल्यावर त्यांच्या लक्षात आले की असेच काही नाही. म्हणूनच तर भारतात 'जिझिया' कर देऊन का होईना पण इतर धर्मिय जिवंत राहू शकले. शिवाय एकदा हा धर्म स्थिर झाल्यावर इराणी आणि भारतीय संस्कृतींसह अनेक संस्कृतींचे त्यावर संस्कार होत गेले आणि 'धर्म टिकवण्यासाठी हत्या' हा विचार मागे पडला. त्या धर्माची एक संस्कृती निर्माण झाली. तत्त्ववेत्ते, गणिती,स्थापत्यशास्त्री, लेखक, कवी इ. व्यापक पाया निर्माण झाला.इतर धर्मांच्या तुलनेने हे खूपच वेगाने घडले.धर्म समंजस होत गेला." कुठ्ल्या ... नंदनवनात आहात ? इस्लाम हा मुळातच क्रूर आहे याचे मूळ मदीना काळापासून अवतरलेल्या आयातीत आहे, त्यांच्या संस्थापकाने स्वतः दिलेले अन्य धर्मीयांचे अभय मागे घेतले व कत्त्ली चे आदेश दिले. जिझिया ची सवलत फक्त पुस्तक धारी म्हणजे ज्यू व ख्रिस्तींनाच आहे. आपणा मूर्तीपूजकाना दोनच पर्याय .... इस्लाम किंवा ... क्रूर मरण... जोवर सारे जग गांधीवादी होत नाही तो पर्यंत सावरकर वादच या देशाला तारेल.

यशोधरा Mon, 12/01/2008 - 21:23
अग्रलेख आणि सर्व प्रश्नांना दिलेली समर्पक उत्तरेही अतिशय आवडली! संयत पण रोखठोक भाषेत लिहिलेला सुरेख अग्रलेख.

In reply to by यशोधरा

विसोबा खेचर Mon, 12/01/2008 - 22:06
संयत पण रोखठोक भाषेत लिहिलेला सुरेख अग्रलेख. सहमत.. मलाही हेच म्हणायचे होते.. फुकाचा काँग्रेसी निधर्मीवाद काय कामचा? तात्या.

सर्वसाक्षी Mon, 12/01/2008 - 23:56
मा. क्लिंटनसाहेब, सात्विक संतापाने पण मनापासुन आणि जखमी अंतःकरणाने लिहिलेला अग्रलेख आवडला. गुळ्मुळीतपणाचा लवलेश नसलेला पण प्रक्षोभकही नाही. या देशात गेल्या ६० वर्षांचा विचार केला तर केवळ काँग्रेसचीच सत्ता होती. त्यांना गांधींचे फारसे प्रेम नसले तरी त्या नावाचा वापर करायची एकही संधी त्यांनी सोडली नाही. जवळपास ३ पिढ्यांना सशस्त्र क्रांती व महान हुतात्म्यांच्या बलिदानाचा इतिहास लपवुन केवळ आमच्यामुळे स्वातंत्र्य मिळाले असा प्रचार केला गेला आहे. कळस म्हणजे २ वर्षांपूर्वी एन सी ई आर टी अभ्यासक्रमाच्या पुस्तकात काही क्रांतिकारकांचा उल्लेल्ख 'दहशतवादी' असा केला गेला होता. अर्थातच यावर सरकारने बेशरमपणे सारवासारवी केली. 'दे दी हमे आजादी बिना खडग बिना ढाल' अशा गौरवल्या गेलेल्या महात्म्याने जर उपर्‍या शत्रुला आपल्या महान अहीसेने देश सोडुन जायला भाग पाडले तर याच भूमित जन्मलेल्या व याच देशाला मायभूमी म्हणणार्‍या मुस्लिमांना ते विघटना पासून का बरे रोखु शकले नाहीत? कींवा फाळणीत हिंदुंवर अत्याचार करण्यापासुन परावृत्त का करु शकले नाहीत? बरे या फाळणीमुळे भयानक कत्तली होतीले हे त्यांना माहीत नव्हते? त्या रोखायला त्यांनी काय केले? आणि हे सगळे अट्ळ होते तर एकदा धर्माधिष्ठित विभाजन झाल्यावर मुस्लिमांना अनुनय कौन इथे ठेवुन घेण्याची व त्यांना अल्पसंख्यांक म्हणुन अवास्तव महत्व द्यायची काय गराज होती? सगळे मुस्लिम अतिरेकी नसतात. अगदी मान्य आहे. पण आतापर्यंत कंदाहर, कश्मिर, ते कालच्या हल्ल्यापर्यंत हात असलेले सर्व अतिरेकी मुस्लिम होते हे सत्य आहे आणि ते स्विकारायला काय हरकात आहे? या सत्याचा उच्चार केल्यावर तथाकथीत निधर्मी अस्वस्थ का होतात? दहशतवादाला जात धर्म नाही. उद्या हिंदु अतिरेकी जर असे अंदाधूंद गोळीबार करत रेल्वे स्थानकावर घुसले तर त्यांना गोळ्या घातल्या म्हणुन एकही हिंदु नाराज होणार नाही, निषेध दूरच राहीला. जेव्हा पाकिस्तानने शिखांपैकी काहींना चिथावुन खलिस्थानच्या मागणीसाठी प्रवृत्त केले व जेव्हा दहशतवाद माजला तेव्हा पंजाबात त्या फुटीरता वाद्यांना गोळ्याच घालाव्या लागल्या व त्यासाठी कुणाही हिंदुनी नापसंतीसुद्धा व्यक्त केली नाही. पाकिस्तानच्या बाबतीत आपण अत्यंत बोटचेपे धोरण स्विकारीत आलो आहोत. अनेकदा आपण युद्धात जिंकुनही वाटाघाटीत हरलो. पकिस्तान्च्या प्रत्येल आगळीकीकडे केलेला काणाडोळा म्हणजे देशासाठी युद्धात प्राण दिलेल्या सैनिकांशी प्रतारणा आहे.

In reply to by सर्वसाक्षी

खरा डॉन Tue, 12/02/2008 - 00:45
ओ तुमीपण ते आता जिथं तिथं हुतात्म्यांच तुणतुणं वाजवायचं बंद करा आता. खर्‍या डॉनने सततच्या हुकुमशाहीच्या, अरेरावीची भाषेला आवर घालावा..! अन्यथा, त्यांचे प्रतिसाद येथून उडवून लावले जातील! तात्या.

आजानुकर्ण Tue, 12/02/2008 - 01:23
श्री. क्लिंटन, अनेक प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल धन्यवाद. मात्र खालील दोन संकल्पनांचे अर्थ समजले नाहीत. हिंदू राष्ट्रः "आलात तर तुमच्या सह, नाही आलात तर तुमच्या विना आणि विरोधाल तर उच्छेदून हे हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही" हा देश हिंदू राष्ट्र होईल म्हणजे नक्की काय होईल? हिंदूंचे येथे काय स्थान असेल. आणि हिंदूंव्यतिरिक्त इतर धर्मीयांचे येथे काय स्थान असेल? मुसलमान राष्ट्रांमध्ये जसे शरीयतचे पालन होते तसे इथे काय होणार? (मनुस्मृती की आता आहे तीच राज्यघटना?) आमची जमीनः पाकिस्तान आणि बांग्लादेशाची जमीन आमची आहे असे आपण म्हणता? येथे आमची म्हणजे कोणाची?

क्लिंटन Tue, 12/02/2008 - 18:45
नमस्कार, कालच्या माझ्या प्रतिसादात काही मुद्दे राहून गेले होते. त्या आणि इतर काही मुद्द्यांचा परामर्श आज करत आहे. सर्वप्रथम माझ्या अनुपस्थितीत मला मांडायचे मुद्दे मांडल्याबद्दल तात्यांना धन्यवाद. मते पटणार्‍या सर्वाना धन्यवाद. मते न पटलेल्या आजानुकर्ण यांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याचा परामर्श आजच्या प्रतिसादात करणारच आहे. सर्वांचा नामोल्लेख करत नाही पण मिसळपावच्या माध्यमातून एक सशक्त चर्चा घडवून आणण्यात सर्वांचा महत्वाचा वाटा आहे.तेव्हा मी पाहुणा संपादक या नात्याने सर्वांचा आभारी आहे. आजच वर्तमानपत्रांमध्ये वाचले की अतिरेक्यांना हल्ला करून, मृत्युचे थैमान घालून कराचीला परत जायचे होते. म्हणजे आपण ३-४ तासांत सिंहगडावर जाऊन परत यावे त्यापध्दतीने त्यांना रक्ताचे पाट वाहवून परत जायचे होते. हे सगळे कशामुळे होऊ शकते? कारण एक समाज म्हणून आणि एक देश म्हणून आपण शत्रूच्या मनात भिती निर्माणच करू शकलो नाही. दहशतवादाविरूध्द पॊटापेक्षा जहाल कायद्याची आवश्यकता असताना पोपटपंची चालते की पोटा (त्यापूर्वीच्या वटहुकुम स्वरूपात असताना) संसदभवनावरील हल्ला थांबवू शकला नाही तेव्हा त्याची काही गरज नाही. मला अशा मंडळींना एक प्रश्न विचारायचा आहे. कायदा बयाच अंशी एखाद्या औषधाप्रमाणे असतो.घरी औषधाचा साठा आहे म्हणून रोग व्हायचा थांबत नाही पण रोग झाल्यावर औषध आपल्याजवळ असणे गरजेचे असते.अशा लोकांच्या घरी एखादे अत्यंत प्रभावी किटकनाशक आहे म्हणून त्यांच्या घरी झुरळे यायची थांबतात का? घरी आलेल्या झुरळांवर किटकनाशके फवारणे गरजेचे असेल तर ती आपल्या साठ्यात असली पाहिजेत. कायद्याचे काम अशा किटकनाशकापेक्षा वेगळे आहे का?तरीही पॊटाचे नाव घेतले की यांच्या कपाळावर आठ्या आल्याच म्हणून समजा. अशा अनेक इतर प्रकारचे भ्रम समाजात असतील, आपले ध्येय नक्की नसेल तर आपण काय शत्रूच्या मनात भिती निर्माण करणार? महंमद अफझलला फाशी न देण्यामागे मुस्लिम समाचाची मते गमावण्याची भिती असेल तर ते कसले द्योतक आहे? १३ डिसेंबर २००१ रोजी अतिरेक्यांचा इरादा अत्यंत भयंकर होता. फिजीमध्ये झाले त्याप्रकारे पंतप्रधानांसह सर्व मंत्रीमंडळ आणि खासदार ओलीस ठेऊन आपल्या मागण्या मान्य करून घ्यायचा नाहीतर पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांना ठार मारून देशात अराजक माजविण्याचा त्यांचा उद्देश होता. इतक्या गंभीर गुन्ह्याची आखणी करण्यात मोठा वाटा असलेल्या मोहंमद अफझलला फासावर लटकवले तर त्यामुळे मुस्लिम मते जातील अशी भिती वाटत असेल तर याचा अर्थ काय घ्यावा? तरीही पाकिस्तानी अतिरेक्यांचे दफन भारतात करून भारतभूमी मलिन करण्यास काही मुस्लिम संघटनांचा विरोध असेल तर त्या भावनेचा आदर व्हायला हवा. औरंगजेब महाराष्ट्राच्या भूमीत मेला आणि २५ वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर त्याचे थडगे महाराष्ट्रात खणले गेले यामुळे खुल्ताबादची जमिन मलिन झाली असे एक महाराष्ट्रनिवासी आणि भारताचा नागरिक म्हणून व्यक्तीश: मला वाटत नाही. तरीही अतिरेकी दफन विरोधामुळे का होईना ज्या मुस्लिमांना हा देश आपला वाटतो आणि जे मुस्लिम आपल्याबरोबर यायला तयार असतील त्यांचे स्वागतच आहे. एक प्रश्न काल विचारला होता की प्रस्तावित हिंदू राष्ट्रात इतर धर्मीयांचे स्थान काय असेल/ असावे असे मला वाटते. त्यावर उत्तर एकच-- भगवद्गीतेने सांगितल्याप्रमाणे ईश्वरप्राप्तीचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य सगळ्यांना असावे. पण त्याचबरोबर इतर धर्मियांची कत्तल करून जन्नतमध्ये लवकर जाता येईल अशी विचारसरणी असलेल्या कोणालाच त्यात स्थान नसावे. त्याचबरोबर न स्त्री: स्वातंत्र्यं अर्हति किंवा वेद ज्या शूद्राच्या कानी पडतील त्या शूद्रांच्या कानात खिळे ठोकावेत (किंवा तत्सम काहीतरी भयंकर प्रकार करावा) असे म्हणणारी मनुस्मृती पण नको.पण हा देश हिंदूंचा आहे आणि इतरांना पूर्णपणे त्यांचा धर्म पाळायचे स्वातंत्र्य आहे आणि गुण्यागोविंदाने राहून देशाच्या प्रगतीस हातभार लावल्यास हा देश इतरांचाही होऊ शकतो याचे भान सर्वांना असावे. लिंकनने म्हटले 'With malice toward none, with charity for all....' त्यात आणखी एक ’with appeasement of none' जोडून कारभार व्हावा. आणि सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे हिंदूंनी विज्ञान हा धर्म पाळावा म्हणजे भोंदूगिरी, अनावश्यक कर्मकांडे यांना कायमची रजा मिळावी. अर्थात हे माझे स्वत:चे मत आहे. हा महत्वाचा प्रश्न चर्चेत आणल्याबद्दल आजानुकर्ण यांचा धन्यवाद.कारण आपले ध्येय नक्की काय हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ हवे. नाहीतर समजा सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण झाली आणि पुढे काय हे माहित नसल्यास अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.आमच्या छ्त्रपतींनी सैन्याला स्पष्ट सांगितले होते की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये. त्यापुढील वाक्य महत्वाचे आहे. महाराज म्हणतात ’असा कारभार न केल्यास रयतेला वाटेल हे कसले हिंदवी स्वराज्य यापेक्षा मोंगल बरे’. त्याचप्रमाणे हे कसले हिंदू राष्ट्र यापेक्षा जिहादी दहशतवाद परवडला असे समाजातील कोणालाही वाटले (विशेषत: गरीब आणि मागासवर्गीयांना) तर तो आपला दहशतवाद्यांनी मुंबईत केला त्यापेक्षा मोठा पराभव ठरेल. म्हणूनच माझ्या पहिल्या लेखात शेवटच्या परिच्छेदात समतापूर्ण व्यवस्थेचा उल्लेख मी केला. मान्य आहे की जातीव्यवस्थेचा पाडाव करणे हे मोठे आव्हान आहे. पण एक समाज म्हणून कधीना कधी आपल्याला याचे उत्तर शोधून काढावेच लागणार आहे. दुसरा प्रश्न म्हणजे की जमिन आमची म्हणजे कोणाची?त्याविषयी नि:संदिग्ध उत्तर ती जमिन आम्हा हिंदूंची.मान्य आहे की आपल्या समाजात अनेक दुर्गुण आहेत पण हिंदू म्हणून म्हणवून घ्यायला आपल्याला लाज का वाटते?ज्या भूमीत वेदांची रचना झाली ती जमिन हिंदूंची नाहीतर कोणाची?आमच्या समाजात दोष आहेत म्हणून आमची जमिन स्वत:च्या घशात घालायचा इतर कोणालाही अधिकार नाही. एखादा माणूस सतत जुगार खेळतो आणि इतर अनेक दोष त्याच्यात आहेत म्हणून त्याचे घर बळकावणे समर्थनीय ठरेल का? आणखी काही राहिलेले मुद्दे--- १) हो नथुराम गोडश्यांच्या अस्थी त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणाकडे तरी आहेत. नथुरामने स्वत:च्या अस्थी सिंधू नदी स्वतंत्र भारतात येईल तेव्हा त्यात विसर्जित कराव्यात अशी इच्छा प्रकट केली होती असे पंचावन्न कोटींचे बळी (किंवा गांधीहत्या आणि मी) या पुस्तकात वाचल्याचे आठवत आहे. २) हिंदू समाजाच्या नाकातोंडात पाणी शिरेपर्यंत थांबावे लागते हे आपलेच दुर्दैव.पण एक गोष्ट मात्र खरी की लोकांमध्ये जागृती होत आहे. १९४७ मध्ये आपला ३०% भूभाग जाऊन सुध्दा, काही लाखांची कत्तल होऊनसुध्दा ५५ कोटींची पाकिस्तानला दक्षिणा देणार्‍या गांधींना लोक डोक्यावरच घेत होते. माझा त्यावेळी जन्म झाला नव्हता पण फाळणी आणि भारतीय स्वातंत्र्यावर मी जे काही वाचन केले आहे त्यात त्या कारणावरून देशभरात संतापाची लाट पसरली असे मात्र कुठेही वाचले नाही.माहिती तंत्रज्ञान त्याकाळी प्रगत नव्हते म्हणूनही असेल कदाचित. तरीही त्या मानाने मुंबईत २००-२५० लोकांचे बळी पडल्यावर मात्र देशातील वातावरण आपण सगळे बघतच आहोत. ३) मी अमेरिकेत गेल्यानंतर मला भारतात सहजासहजी मिळणार नाहीत अशी अनेक पुस्तके विद्यापीठाच्या ग्रंथालयात वाचायला मिळाली आणि भारतात असताना पूर्वी कधिही बघितले नव्हते इतके ’फास्ट इंटरनेट कनेक्शन’ मिळाले. त्यामुळे मी आंतरजालावरील अनेक चर्चा व्यासपीठांमध्ये चर्चेत भाग घेतला आहे. अशाच एका चर्चेत माझ्या परिचयात अमेरिकेतील एक मराठी सद्गृहस्थ आले. त्यांना मी भेटलेलो नाही कारण ते माझ्यापासून बरेच लांब राहत होते. त्यांचा इस्लाम या विषयाचा खूपच अभ्यास आहे.त्यांनी प्रख्यात विचारवंत नोम चोम्स्की यांना लिहिलेल्या ई-मेलना स्वत: चोम्स्कींनी उत्तरे देऊन चर्चा केली आहे.हिंदुत्व या विषयावर इतकी तळमळ असलेली दुसरी व्यक्ती बघायला मिळणे अवघड आहे. त्यांच्याशी माझा ई-मेलवर संपर्क असतो. मी त्यांना मिसळपाववर येऊन सागरलहरींच्या चर्चेत भाग घेण्याविषयी विनंती करेन. पण ते स्वत: लिहितील की नाही याविषयी मी खात्री देऊ शकत नाही. ते जर मिसळपाववर आले तर ते सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील.ते जर मिसळपाववर आले नाहीत तरी कोणाला इच्छा असेल तर माझ्याशी व्य.नि वर संपर्क साधावा.मी त्यांचे काही ई-मेल त्यांचे नाव आणि ई-मेल पत्ता न देता जरूर फॉरवर्ड करू शकेन.त्यांची हरकत नसेल तर त्यांचे नाव आणि ई-मेल पत्ता सुध्दा मी व्य. नि. ने देऊ शकेन. स्वत: नोम चोम्स्कींनी त्यांच्या ई-मेलची दखल घेऊन चर्चा केली म्हणजे त्यांच्या लिखाणातील मुद्देसूदपणा आणि प्रभावीपणा याची कल्पना येऊ शकेल. ---विल्यम जेफरसन क्लिंटन

In reply to by क्लिंटन

आजानुकर्ण Tue, 12/02/2008 - 19:18
उत्तराबद्दल धन्यवाद. जर हिंदू राष्ट्र (किंवा फॉर द्याट म्याटर बौद्ध किंवा जैन किंवा शीख राष्ट्र) होऊनही आपल्या आता आहे त्याच राज्यघटनेनुसार कारभार चालणार असेल तर आपल्या राष्ट्राला काय लेबल लावले जाते याची मला फिकीर वाटत नाही. दुसरा प्रश्न म्हणजे की जमिन आमची म्हणजे कोणाची?त्याविषयी नि:संदिग्ध उत्तर ती जमिन आम्हा हिंदूंची.मान्य आहे की आपल्या समाजात अनेक दुर्गुण आहेत पण हिंदू म्हणून म्हणवून घ्यायला आपल्याला लाज का वाटते?ज्या भूमीत वेदांची रचना झाली ती जमिन हिंदूंची नाहीतर कोणाची? ह्याच जमिनीत बुद्धाचा जन्म झाला म्हणून ती बुद्धांची नाही का? ह्याच जमिनीत तीर्थंकरांचा जन्म झाला म्हणून ती जैनांची नाही का? ह्याच जमिनीत ग्रंथसाहिबाचा जन्म झाला म्हणून ती शीखांची नाही का? आणि आता तिथे जे लोक राहत आहेत त्यांचे काय करायचे? काही लाख बांग्लादेशी भारतात आले म्हणून भारतात फुटीरतावादी चळवळी सुरू झाल्या आहेत. हे आख्खे देशच भारतात आले तर त्यांचे काय करायचे? आम्ही तर असे ऐकले आहे की मानव सुसंस्कृत व धार्मिक वगैरे होईपर्यंत ही भारताच्या दक्षिण भागातली सर्व जमीन आदिवासींचीच होती. त्यांचा कोणताही धर्म नाही. (ट्रायबल म्हणूनच त्यांना ओळखले जाते) त्यांचे काय करायचे? [संदर्भः कातकरी विकास की विस्थापन] अफजल गुरुला शिक्षा झालीच पाहिजे. मी तर म्हणतो गुन्हेगार कोणीही असो त्याचा जात धर्म विचारात न घेता शिक्षा झाली पाहिजे. बाबरी मशीद पाडण्यास जबाबदार असणारे लोक, मुंबईत स्फोट घडवणारा दाऊद, श्रीकृष्ण आयोगाने ठपका ठेवलेले दंगली भडकावण्याचे आरोप असणारे बाळ ठाकरे आणि अबू आझमी, ओरिसा, कर्नाटकात चर्चवर हल्ले करणारे लोक, श्रीलंकेतील दहशतवादावरून तामिळनाडूत दहशत पसरवणारे एलटीटीई, गुजरातमध्ये सरकारी दंगली करणारे नरेंद्र मोदी हे गुन्हेगार असतील तर सर्वांनाच शिक्षा ही झालीच पाहिजे.

आजानुकर्ण Tue, 12/02/2008 - 19:33
आणि सावरकरांनी म्हटल्याप्रमाणे हिंदूंनी विज्ञान हा धर्म पाळावा म्हणजे भोंदूगिरी, अनावश्यक कर्मकांडे यांना कायमची रजा मिळावी. संपूर्ण चर्चेत आणि लेखात हेच लाखमोलाचे वाक्य आहे. रामजन्मभूमी झाकी है, काशी मथुरा बाकी है वाले हे जेव्हा शिकतील तो सुदिन. अर्थात सावरकरांनी हा उपदेश हिंदूंना केला आहे म्हणून त्यांनाच उद्देशून लिहिले आहे. गैरसमज नसावा.

चतुरंग Tue, 12/02/2008 - 21:39
लेख आणि त्यावरील चर्चा दोन्ही आवडले. स्पष्ट शब्दात मांडलेली परखड मते आणि त्यावरची सशक्त चर्चा दोन्ही गोष्टी मिपाकरांची मते प्रगल्भ होत असल्याची निदर्शक वाटतात. एकच प्रश्न - (फक्त नथुराम गोडसेचे कृत्य मनाला पटत नाही! गांधींसारख्या व्यक्तीला मारुन टाकणे हे सर्वथा गैर आहे. त्यामुळे ह्या लेखात त्याची भलावण झाली असे मला वाटते. मला वाटते ते बरोबर आहे का? आणि तसे असेल तर त्यामागची भूमिका काय आहे?) चतुरंग

In reply to by चतुरंग

अभिरत भिरभि-या गुरुवार, 12/11/2008 - 10:14
>> गांधींसारख्या व्यक्तीला मारुन टाकणे हे सर्वथा गैर आहे मारुन टाकणे वाईट; पण जे झाले ते बरेच झाले म्हणायचे. सतत आमरण उपोषणाच्या धमक्या देऊन एका व्यक्तीने राष्ट्रसमाजास किती वेळा ब्लॅकमेल करायला हवे होते ?

क्लिंटन Tue, 12/02/2008 - 21:44
जो जो आसेतुहिमाचल पसरलेल्या भारताला आपला मानतो त्याचा हा देश आहे. तसे म्हटले तर पारशी लोक आताच्या इराणमधून भारतात आले. त्या अर्थी ते बाहेरून आले. पण ते या मातीत इतके मिसळून गेले की ते वेगळे आहेत असे वाटतच नाही. भारताच्या भूमीत त्यांच्यावर कसलीही सक्ती झाली नाही. तर त्या समाजातून जमशेदजी टाटा आणि इतर टाटा परिवारातील उद्योगपती, होमी भाभांसारखे वैज्ञानिक देशाला मिळाले.मुंबईतले बरेचसे पारशी लोक गुजराथी बोलतात.माझा जन्म ठाण्यातील आहे. एस.टी. कार्यशाळा परिसरात आमचे काही ओळखीचे लोक आहेत. त्यांच्या इमारतीत एक ज्यू कुटुंब राहते. तसेच मी ज्या मराठी शाळेत शिकलो त्या माझ्या शाळेतील वर्गात एक ज्यू मुलगा होता. इस्त्राएलच्या राज्यघटनेप्रमाणे जगातील कोणीही ज्यू तिथे जाऊन त्या देशाचा नागरिक म्हणून राहू शकतो. तरीही ते तिकडे गेले नाहीत.याचे कारण म्हणजे ’या देशाने आम्हाला इतके दिले आहे की त्या देशाला सोडून आम्हाला जावेसेच वाटत नाही’. जैन, बौध्द आणि शीख मंडळी ही इथलीच आहेत. अशी भारतात एकरूप झालेली अनेक मंडळी मुस्लिम समाजातही असतीलच. भारत देश अशा सगळ्यांचा आहे. अशा लोकांनी झरत्रुष्टाची पूजा केली काय किंवा इतर कोणाची त्याचा काहीही संबंध नाही. म्हणणे एकच की या देशातील प्रत्येकाने ईश्वरप्राप्तीचे अनेक मार्ग आहेत हे मान्य करावे कारण तीच मूळ हिंदू परंपरा आहे. आपलाच मार्ग योग्य हे म्हणणे वाईट आणि आपला मार्ग दुसरा पाळत नाही म्हणून त्याला ठार मारा हे म्हणणे तर त्याहूनही वाईट आणि त्याकारणासाठी खरोखर हत्या करणारे सर्वात वाईट. अवांतर: बौध्द आणि जैन धर्माची स्थापना ही हिंदू धर्मातील पशुबळींसारख्या अनेक अनिष्ट रूढींच्या विरोधात झाली. तसेच सुरवातीच्या काळात शीखांमध्ये हिंदूंमधील कडवे लोक हिंदू धर्माचे मोंगलांपासून संरक्षण करायला सामील झाले होते. तेव्हा बौध्द, जैन आणि शीख हे हिंदूंपासून वेगळे धर्म आहेत असे पुन्हा पुन्हा ठासून सांगण्यामागे इंग्रजांचे ’डिव्हाईड आणि रूल’ हे धोरण तर नसेल?कारण हिंदू परंपरेत अगदी शैव-वैष्णवांपासून आनंदमार्गींपर्यंत असे कित्येक वेगळे पंथ-संप्रदाय आहेत. त्या सगळ्यांमध्ये थोडे फार फरक आहेतच.पण ते सर्व ’देवाकडे जायचे अनेक मार्ग आहेत. त्यातील आपल्याला पाहिजे तो मार्ग आपण निवडावा’ या सर्वात मूलगामी हिंदू परंपरेचे पालन करतात. मागे राजकारणाचा भाग म्हणून स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशननेही ’आम्ही हिंदू नाही’ असे म्हटलेच होते की! मग भारत देश कोणाचा नाही (माझ्या मते)? जे आमच्या देवाला मानले नाहीत तर तुमच्या कत्तली करू किंवा असे करून जन्नतमध्ये जायला मिळेल असे मानणारे लोक. किंवा मूर्तीपूजकांचा नाश करणे आपले धर्मकर्तव्य आहे असे म्हणणारे लोक.मागील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ज्या ज्या मुस्लिमांनी पाकिस्तान हया एक कलमी कार्यक्रमावर निवडणुका लढविणाया मुस्लीम लीगला मते दिली त्यांनी आमच्या देशाच्या फाळणीला पाठिंबा दिला होता आणि अशा लोकांचा भारत देश नक्कीच नाही. मी स्वत:ला एक बुध्दिजीवी म्हणवतो आणि जे माझ्या बुध्दीला पटते तेच स्वीकारतो. मी स्वत: पूजापाठ किंवा इतर कर्मकांडे मानत नाही.पुण्यात गेली ९-१० महिने राहत असूनही मी दगडू शेठ गणपतीच्या दर्शनाला आजपर्यंत गेलेलो नाही.पण महाराजांचा लाडका सिंहगड बघायला मात्र जरूर गेलो.खरं सांगायचं तर सद्यस्वरूपातील गणेशोत्सवालाही माझा पाठिंबा नाही. किंबहुना देव आहे की नाही या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळालेले नाही. माझ्यासारख्या माणसाला अयोध्देत मंदिर झाले काय किंवा झाले नाही काय, फारसा फरक पडणार नाही. पण त्याच बरोबर मला एक गोष्ट माहित आहे की या देशातील जनता धार्मिक आहे.अन्यथा अगदी काळूबाईसारख्या जत्रेला लाखांची गर्दी झाली नसती.पंढरपूर आणि पुरीच्या जगन्नाथ यात्रेची तर बातच करू नका.मंगळवारी मुंबईच्या सिध्दीविनायकासमोर खूप मोठी लाईन असते याचीही मला कल्पना आहे.तेव्हा अशा जनतेसाठी राममंदिर पाडून बाबरी मशीद असणे म्हणजे त्यांच्या हक्कांवर गदा आणणे असे मला वाटते.तसेच बाबरासारख्या परकिय आक्रमकाने आमच्या देशातील मंदिर पाडून दुसरे काही उभारले हा सल मला आहे.मागील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे देशात मंदिरे पाडून मशिदी अनेक ठिकाणी उभारल्या पण ती सर्व ठिकाणे परत मागण्याची गरज नाही. देशात शांतता हवी आहे ना मग आम्ही इतर सर्व ठिकाणांवरील हक्क सोडतो तुम्ही आम्हाला फक्त तीन ठिकाणे द्या. आम्हीपण तडजोड करतो तुम्हीपण करा असे म्हटले तर त्यात काय चुकले?तुमच्यासारख्या अयोध्दा आंदोलनावर टिका करणायांपैकी एकाने तरी मुस्लिमांना ’तुम्ही रामजन्मभूमीवरील हक्क सोडून द्या’ असे आवाहन केले आहे का? नाही ना? ते का? की अयोध्दा आंदोलनावर जो अधिक जहरी टिका करतो तो जास्त धर्मनिरपेक्षतावादी ठरतो म्हणून ही सर्व टिका आहे? मागे मी इतिहासकार रामचंद्र गुहांना एक प्रश्न ई-मेलवर विचारला होता. हिंदू ऐकून घेतात म्हणून सर्व लोकांची लेक्चरबाजी चालते की त्यांनी प्रभू रामचंद्राच्या नावे अयोध्देतील नगरपालिकेचे ’बर्थ सर्टिफिकेट’ आणावे. पण अशी मंडळी येशु ख्रिस्ताचे बेथलेहेम नगरपालिकेचे बर्थ सर्टिफिकेट का मागत नाहीत? ’व्हर्जिन मेरी’ येशुला जन्म कसा देऊ शकली हा प्रश्न कोणीच का विचारत नाही?ईस्टरच्या दिवशी येशूचे पुनरुथ्थान होऊन तो स्वर्गात गेला याला काय पुरावा आहे? तसेच महंमद पैगंबराला देवदूत गॅब्रिएलने मक्केजवळील गुहेत कुराण सांगितले याला काय पुरावा आहे? कशावरून श्रीनगरच्या हजरतबल मशिदीतील केस महंमद पैगंबराचाच आहे?हे सर्व प्रश्न कोणीच विचारत नाही कारण तो एक श्रध्देचा भाग आहे.पण हिंदूंनी म्हटले की तेथे रामाचा जन्म झाला होता तर मात्र तो श्रध्देचा भाग ठरत नाही तर त्याचे पुरावे मागितले जातात. हा दुजाभाव का? बोला, आहे काही उत्तर?रामचंद्र गुहांनी माझ्या प्रश्नाला उत्तर द्यायचे टाळले होते. तुम्ही उत्तर देणार? रामचंद्र गुहांना विचारलेला दुसरा प्रश्न म्हणजे समजा काही गुंडांनी तुमच्या घरावर हल्ला केला आणि तुम्हाला प्रिय असलेल्या एखाद्या गोष्टीची मोडतोड केली आणि त्याजागी दुसरे काहीतरी उभारले. तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?जोपर्यंत तुमच्या प्रिय गोष्टीची स्थापना परत होत नाही तोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला टोचणार नाही?की ज्या पध्दतीने तुम्ही हिंदू समाजाला सांगता की रामजन्मभूमीवरील हक्क सोडावा त्याप्रमाणे तुम्ही ती गोष्ट सोडून देणार?आणि उद्या गुंडाने आणखी दुसरी गोष्ट तोडली तरी त्याचा विषाद तुम्हाला वाटणार की नाही?की आपले जे जे काही असेल ते सोडून द्यायची तुमची तयारी असणार?तसे नसेल तर हिंदू समाजाने सर्व काही सोडून द्यावे असे कोणत्या अधिकारात म्हणता?गुहांनी या प्रश्नाचे पण उत्तर दिले नाही. ते तुम्ही देणार? स्वातंत्र्य मिळूनही इतक्या वर्षांनंतर रामजन्मभूमी मुक्त होत नाही आणि हिंदू ऐकून घेतात म्हणून नेहमी हिंदूंनाच लेक्चरबाजी करणे आणि अशा दुटप्पीपणामुळे हिंदू समाजाचा अंत पाहिला गेला. आंदोलनातील प्रत्येकाने मुस्लिम समाज सहकार्य करायला तयार असेल तर पंचक्रोशीबाहेर एक एक वीट नेऊन बाबरी मशिदीचे स्थलांतर केले जाईल असेही सांगितले पण तरीही त्याविषयीही कोणतेही सहकार्य झाले नाही. त्यातून रोष वाढत गेला आणि त्यातूनच बाबरी मशिद पडली. या सगळ्याकडे दुर्लक्ष करायचे आणि भारताच्या धर्मनिरपेक्ष परंपरेवर घाला घातला गेला हे तुणतुणे सतत वाजवायचे याला अर्थ नाही. कोणत्याही धर्मनिरपेक्षतावादी माणसाने मुस्लिम समाजाला सहकार्य करा असे का सांगितले नाही? आणि अजूनही अयोध्या, काशी आणि मथुरा आंदोलनाला लेक्चरबाजी करायची! २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा हत्याकांड घडले. हत्याकांड पूर्णपणे सुनियोजित होते हे स्पष्ट होते. जर का त्याचा एक पुरावा हवा असेल तर अग्नीशमन दलाच्या गाडया वेळेवर पोहोचू नयेत म्हणून रस्त्यावर अडथळे उभारले होते हा एक पुरावा पुरेसा आहे. इतर पुरावेही आहेत उदाहरणार्थ रेल्वे इंजिनचा व्हॅक्युम पंप तोडून गाडी थांबवली गेली.याचा अर्थ गाडी सिग्नलला उभी असताना कोणीतरी इंजिनखाली पटकन गेले आणि पंप तोडला म्हणजे गाडी हलू शकणार नाही असे म्हटले तर काय चुकले? एवढे पुरावे असूनही चहासाठीच्या सुटट्या पैशाच्या वादावरून गाडी पेटविण्यात आली असे निरनिराळे तर्क लढवले गेले. चहासाठीच्या असे कितीसे पैसे लागणार होते? दहा रुपये? वीस रुपये? त्याहून तर जास्त नाहीत ना. मग म्हणून ५८ लोकांना जाळून ठार मारणे समर्थनीय होते का? आणि सर्वात धक्कादायक म्हणजे २७ तारखेला सर्व दूरचित्रवाणीवरील न्यूज वाहिन्यांवर दुसर्‍या दिवशी सादर केल्या जाणार्‍या अर्थसंकल्पाविषयी चर्चा चालू होती. गोध्रा हत्याकांडाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले गेले. का? कारण मरणारे हिंदू होते म्हणून?कोल्हापुरच्या दैनिक पुढारीमध्ये १० मार्च २००२ रोजी (किंवा त्या आठवड्यातील रविवारी) बहार पुरवणीत यावर एक लेख प्रसिध्द झाला होता. त्यातही हाच मुद्दा मांडला होता. त्यातील काही वाक्ये आठवत आहेत तशीच इथे देतो: "मुस्लिमांच्या केसाला धक्का लागला तर आकाशपाताळ एक करणारे धर्मनिरपेक्षतावादी लोक गोध्रा हत्याकांडानंतर शांत होते जसे काही काही घडलेच नव्हते. अगदी २७ तारखेला गुजरात काही किरकोळ घटना वगळता शांत होता पण २८ तारखेला अहमदाबादमध्ये जळून कोळसा झालेली प्रेतं आणली तेव्हा किती भयंकर प्रकार झाला होता याची कल्पना सगळ्यांना आली.आणि ही घटना दूरवरील काश्मीरमध्ये नाही तर गुजरातमधील अहमदाबादपासून जवळच असलेल्या गोध्रामध्ये झाली होती. सर्वांनी हिंदूंच्या वेदनेकडे दुर्लक्ष केले. आणि अशावेळी आता आपला वाली कोणी नाही तेव्हा घरी बसून मरण्यापेक्षा मारता मारता मरावे अशी धारणा झाली. गुजरातला जातीय दंगलींचा इतिहास आहेच. त्यातून संसदेवरील हल्ल्यामुळे मुस्लिम समाजाविरूध्द पार्श्वभूमी तयार झाली होती. त्यात गोध्रा हत्याकांडाची काडी लागली आणि दंगलीचा भडका उडाला". लेखातील सर्व काही मुद्दे देणे शक्य नाही. इच्छुकांनी शक्य झाल्यास तो लेख मुळातून वाचावा ही विनंती. तेव्हा बाबरी मशिद पाडणे किंवा गुजरात दंगली यासारख्या दुर्दैवी घटनांना ही पार्श्वभूमी असते. तरीही धर्मनिरपेक्षतावाद्यांना हिंदूंना शिव्या घातल्या नाहीत तर चैनच पडत नाही. तेव्हा घातल्या नरेंद्र मोदींना शिव्या की आपण किती मोठे धर्मनिरपेक्ष हे सिध्द होते. सर्व दोषींना त्यांचा धर्म न बघता शिक्षा व्हावी हे एक तत्व म्हणून ठिक आहे. पण मुस्लिम समाजातील दोषींना बाबरी पाडणे इत्यादी अनेक पडद्यांमागे लपविले जाते आणि झोडपताना केवळ हिंदूंनाच का झोडपले का जाते? आणि अशा दुटप्पीपणामुळे हिंदूंमधील कट्टर मंडळींना आपोआपच लोकांचे समर्थन मिळते. नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेमागे हेच कारण आहे. तेव्हा अनावश्यक कर्मकांडांना रजा द्यायच्या आड लोकांच्या श्रध्दांवर प्रहार करू नका ही विनंती. त्यातून तुम्हाला अपेक्षित असा बदल तर होणारच नाही तर त्याच्या बरोबर उलटा परिणाम होईल. --- विल्यम जेफरसन क्लिंटन

In reply to by क्लिंटन

लिखाळ Tue, 12/02/2008 - 22:01
चांगले मुद्दे. जे जे धर्म इतर धर्मांचे असणे मान्य करतात आणि इतर धर्मियांना आपल्यात घेण्यासाठी बळजबरी-ब्रेमवॉशींग करत नाहित ते एकोप्याने नांदतात. भारताच्या भूमीवर असेच व्हावे. सर्वधर्मसमभाव हा धर्माचाच भाग असावा. -- लिखाळ.

In reply to by क्लिंटन

आजानुकर्ण Tue, 12/02/2008 - 22:14
बांग्लादेश-पाकिस्तानमधील जमीन भारतात आल्यावर काय करायचे हे आपण सांगितलेच नाही. असो. जो जो आसेतुहिमाचल पसरलेल्या भारताला आपला मानतो त्याचा हा देश आहे. तसे म्हटले तर पारशी लोक आताच्या इराणमधून भारतात आले. त्या अर्थी ते बाहेरून आले. पण ते या मातीत इतके मिसळून गेले की ते वेगळे आहेत असे वाटतच नाही. हेच मत माझे इथल्या मुसलमानांबद्दल आहे. बांग्लादेश आणि पाकिस्तानमधून अनधिकृतपणे येणारे मुसलमान हे गुन्हेगार आहेत. त्यांना कायद्यानुसार शिक्षा द्या. मात्र मुसलमान या मातीत मिसळून गेलेले नाहीत हे पटण्यासारखे नाही. मी अशा गावात वाढलो की जेथे हिंदू-मुसलमान दोन्ही धर्मीयांची संख्या लक्षणीय असून कधीही दंगल झाली नाही. प्रत्येक गणेशोत्सवात मुसलमान लोक आनंदाने सहभागी होतात आणि हिंदू लोक शमादाराला नवस बोलतात. हा पाहा शमादाराचा फोटो. भारताच्या भूमीत त्यांच्यावर कसलीही सक्ती झाली नाही. तर त्या समाजातून जमशेदजी टाटा आणि इतर टाटा परिवारातील उद्योगपती, होमी भाभांसारखे वैज्ञानिक देशाला मिळाले.मुंबईतले बरेचसे पारशी लोक गुजराथी बोलतात. मुसलमानांनाही एपीजे अब्दुल कलामांसारखे शास्त्रज्ञ, अझीम प्रेमजींसारखे उद्योगपती दिलेले नाहीत का? कित्येक शास्त्रीय, फिल्मी गायक, कलाकार मुसलमान होते. आमच्या गावातले मुसलमान मराठी बोलतात. तामिळनाडूमधले तामिळ आणि केरळमधले मुसलमान मल्याळी भाषा बोलतात. गुजरातमधले मुसलमान जे फाळणीच्या काळात पाकिस्तानात गेले ते तिथेही गुजराती बोलतात. जैन, बौध्द आणि शीख मंडळी ही इथलीच आहेत. इथले मुसलमान बाहेरून आलेले नाहीत. त्यांनी काही कारणास्तव धर्म बदलला असेल पण त्यांची जीवनशैली भारतीयच आहे. अरबस्तानातील नाही. अशी भारतात एकरूप झालेली अनेक मंडळी मुस्लिम समाजातही असतीलच. अर्थातच पण एकरूपतेपेक्षा आपले (म्हणजे माझ्यासकट सर्वांचे) लक्ष वेगळे काय दिसते याकडेच आहे. भारत देश अशा सगळ्यांचा आहे. अशा लोकांनी झरत्रुष्टाची पूजा केली काय किंवा इतर कोणाची त्याचा काहीही संबंध नाही. म्हणणे एकच की या देशातील प्रत्येकाने ईश्वरप्राप्तीचे अनेक मार्ग आहेत हे मान्य करावे कारण तीच मूळ हिंदू परंपरा आहे. आपलाच मार्ग योग्य हे म्हणणे वाईट आणि आपला मार्ग दुसरा पाळत नाही म्हणून त्याला ठार मारा हे म्हणणे तर त्याहूनही वाईट आणि त्याकारणासाठी खरोखर हत्या करणारे सर्वात वाईट. हेच म्हणतो. किंबहुना मुसलमानांप्रमाणेच हिंदूंमधील शैव आणि वैष्णवांमध्ये अशा हत्या झाल्या आहेत. हिंदूंमध्येच तथाकथित खालच्या जातीतल्या लोकांना अगदी कालपरवा खैरलांजीपर्यंत जीवंत जाळले होते. हिंसा हे कोणत्याही एकाच धर्माचे व्यवच्छेदक लक्षण नाही. दुसऱ्याला हीन लेखून होणारी हिंसा वाईटच. मग ती हिंदूंची असो वा मुसलमानांची अवांतर: बौध्द आणि जैन धर्माची स्थापना ही हिंदू धर्मातील पशुबळींसारख्या अनेक अनिष्ट रूढींच्या विरोधात झाली. तसेच सुरवातीच्या काळात शीखांमध्ये हिंदूंमधील कडवे लोक हिंदू धर्माचे मोंगलांपासून संरक्षण करायला सामील झाले होते. तेव्हा बौध्द, जैन आणि शीख हे हिंदूंपासून वेगळे धर्म आहेत असे पुन्हा पुन्हा ठासून सांगण्यामागे इंग्रजांचे ’डिव्हाईड आणि रूल’ हे धोरण तर नसेल? हे इंग्रज सांगत नसून बौद्ध, जैन आणि शीख धर्मीयच सांगत आहेत. कारण हिंदू परंपरेत अगदी शैव-वैष्णवांपासून आनंदमार्गींपर्यंत असे कित्येक वेगळे पंथ-संप्रदाय आहेत. त्या सगळ्यांमध्ये थोडे फार फरक आहेतच.पण ते सर्व ’देवाकडे जायचे अनेक मार्ग आहेत. त्यातील आपल्याला पाहिजे तो मार्ग आपण निवडावा’ या सर्वात मूलगामी हिंदू परंपरेचे पालन करतात. हेच म्हणतो. तेव्हा अनावश्यक कर्मकांडांना रजा द्यायच्या आड लोकांच्या श्रध्दांवर प्रहार करू नका ही विनंती. त्यातून तुम्हाला अपेक्षित असा बदल तर होणारच नाही तर त्याच्या बरोबर उलटा परिणाम होईल. हा टोला मला की सावरकरांना? प्रश्न हा आहे की सावरकरांनी विज्ञानवादी व्हा, कर्मकांड करू नका असे म्हटल्याचे तुम्ही सांगितले जे मला पूर्णपणे मान्य आहे. बाबरी मशीदाच्या मुद्दामध्ये कर्मकांड आहे, विज्ञानवाद आहे की स्वतःचा अहंकार शमविण्याचा कंड?

In reply to by आजानुकर्ण

लिखाळ Tue, 12/02/2008 - 22:20
चटकन दिसले म्हणून लिहित आहे.. > हेच मत माझे इथल्या मुसलमानांबद्दल आहे. आजानुकर्ण >>अशी भारतात एकरूप झालेली अनेक मंडळी मुस्लिम समाजातही असतीलच. भारत देश अशा सगळ्यांचा आहे. >> क्लिंटन आपण दोघे एकच म्हणालात. -- लिखाळ.

In reply to by क्लिंटन

कोलबेर Tue, 12/02/2008 - 22:32
येशु ख्रिस्ताचे बेथलेहेम नगरपालिकेचे बर्थ सर्टिफिकेट का मागत नाहीत? ’व्हर्जिन मेरी’ येशुला जन्म कसा देऊ शकली हा प्रश्न कोणीच का विचारत नाही?ईस्टरच्या दिवशी येशूचे पुनरुथ्थान होऊन तो स्वर्गात गेला याला काय पुरावा आहे?
असे निव्वळ प्रश्नच नाही तर त्याची खिल्ली उडवलेली अनेक कार्यक्रमातुन टिव्हीवर मी बघीतलेली आहे. पाश्चात्य देशामध्ये कडवे ख्रिस्ती लोक भरपूर प्रमाणात असले तरी ख्रिस्ती धर्माची विटंबना वाटेल इतकी जाहीर खिल्ली उडवताना पाहिले आहे. असो.. गोध्रा मध्ये जे घडले निश्चितच माणुसकिला काळिमा फासणारे होते. त्याचे समर्थन कुणीही केल्याचे पाहण्यात नाही. त्यातल्या 'अपराध्यांना' योग्य ते शासन झालेच पाहिजे, पण म्हणून गुजरात मधील आम जनतेला वेठीस धरुन भिषण मृत्यू देण्याचे जस्टीफाय होते का? सुक्या बरोबर ओले जळणारच म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे हा निर्लज्जपणाचा कळस नाही का? उद्या त्यातीलच एखादा जळलेला वा आपल्या कुटुंबीयांना डोळ्यासमोर जळताना बघीतलेला एखादा बुद्धीभ्रष्ट होउन कुठल्यही थराला जाऊ शकतो. इतका सारासार विचार देखिल आपण करु शकत नाही का? पाकिस्तानातुन आलेल्या भाडोत्री अतिरेक्यांना हत्यारे पैसा भरपुर मिळत असला तरी स्थानिक लोकांची साथ असल्या शिवाय इतका सुसज्ज हल्ला करता येणे शक्य नाही. त्यांना हे बुद्धीभ्रष्ट झालेले लोक आयते उपलब्ध कोण करुन देते? गुजरातमध्ये जे अमानुष कृत्य घडले त्याचा ससंदर्भ रिपोर्ट इथे वाचा. तुम्ही ह्या हल्ल्यांचाही भ्याड हल्ले म्हणून निषेध कराल का? धर्माच्या नावाखाली निष्पाप लोकांची कत्तल करणारा जमाव एकाच जातीचा. भले तो बजरंग दलचा असो वा सिमीचा असो. कुठलाही अतिरेक हा तितकाच वाईट असतो. हिंदू काय मुसलमान काय आणि ख्रिश्चन काय सगळ्यांचे कडवे नेते आज जगाला किती मोठी किंमत द्यायला लावत आहे हे रोज दिसत आहे. धर्मनिरपेक्षवादी मात्र ना इकडचे ना तिकडचे असल्याने दोन्ही कडून भरडले जातात. मुसलमानांना वाटत राहते की हे फक्त आम्हालाच धर्म निरपेक्षतेचे डोस देतात तर कडव्या हिंदुना वाटते आमचाच कडवेपणा ह्यांना दिसतो. दोन माणसांचे जोरात भांडण चालु असताना बर्‍याचदा सोडवायला आलेलाच मार खातो तशी काहीशी परिस्थिती
तेव्हा बाबरी मशिद पाडणे किंवा गुजरात दंगली यासारख्या दुर्दैवी घटनांना ही पार्श्वभूमी असते.
ह्याच तालावर ट्रेन ब्लास्ट करणे ताजमध्ये अतिरेकी घुसणे ह्या दुर्दैवी घटनांना पार्श्वभूमी असते असेही म्हणता येईल. हे तुमच्या लक्षात येत नाही का?पार्श्वभुम्या गेल्या गदर्भाच्या **त ह्या सर्व घटना निंदनीय आणि हीन आहेत. जिथे जिथे सामान्य माणसाला वेठीस धरण्यास कारणीभूत होणारी कोणतीही द्वेषमूलक विचारसरणी ही हीनच

क्लिंटन Tue, 12/02/2008 - 23:48
कोणाही निरपराध माणसाच्या कत्तलीचे समर्थन करायचे नाही. गुजरात दंगली निषेधार्ह होत्या. गोध्रा हत्याकांडाचे समर्थन कोणी केले नसले तरी माझा आक्षेप आहे तो धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या ढोंगीपणावर. जर तुम्ही गोध्रा झालेच नाही अशा पध्दतीने गुजरात दंगलींचा मुद्दा वारंवार चघळणार असाल तर नरेंद्र मोदींना आयतीच संधी मिळते आणि ते पुढे काही घडलेच नाही या पध्दतीने गोध्राचा मुद्दा काढतात. आणि अमेरिकन व्हिसा प्रकरणी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकसभेत सांगितले होते की नरेंद्र मोदींविरूध्द आरोप असले तरी एकही आरोप सिध्द झालेला नाही म्हणून अमेरिकेचा मोदींना व्हिसा नाकारायचा निर्णय समर्थनीय नाही. आणि त्यांचाच काँग्रेस पक्ष मोदींवर शरसंधान करतो यावर माझा आक्षेप आहे. अक्षरधाम मंदिरावरील हल्ल्यावरील (सप्टेंबर २००२) फ्रंटलाईन पाक्षिकातील एक वाक्य बघा-- "Terrorist acts like the one unleashed at Akshardham are futile and misguided; they are also tragically inevitable. Unless the Gujarat riot victims are able to see at least some hope of securing justice through the law and the democratic process, more such horrors will, without doubt, visit India." ( http://www.frontlineonnet.com/fl1921/stories/20021025007001200.htm ) जर अक्षरधाम मंदिर हल्ल्याला गुजरात दंगलींची पार्श्वभूमी असेल तर दंगलींना गोध्र्याची पार्श्वभूमी आहे. आणि असे करत मागे गेले तर सर्वप्रथम हल्ला ज्यांनी सुरू केला त्यांनाच जबाबदार धरले जावे. आणि आंतरजालावरील वेगवेगळे दुवे देण्यापूर्वी हा पण एक दुवा बघा " http://www.rediff.com/news/2003/oct/21franc.htm " तेव्हा हिंदूंना लेक्चरबाजी करू नका. तेव्हा नरेंद्र मोदींसारखे कट्टर लोक पुढे येऊ नयेत असे वाटत असेल तर समस्येच्या मुळाशी जायला हवे. आजही आपण मुस्लिम समाजाने अयोध्येवरचा आपला दावा सोडावा असे म्हणत नाही. तो जर दावा त्यांनी सोडला आणि अशा काही इतर पावले उचलली तर दोन्ही समाजात असलेला वैरभाव नाहिसा होणार आहे निदान कमी तरी होणार आहे. देवबंदने दहशतवादाचा निषेध केला ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण बाहेरून येणारे दहशतवादी सदाशिव पेठेमध्ये राहायला येत नाहीत. ते मुंब्रा किंवा नागपाड्याला जातात्.तेव्हा अशा संभावित दहशतवाद्यांविषयी एकदाही पोलिसांना माहिती का दिली गेली नाही?तसे होत नाही म्हणून सर्व प्रश्न आहेत. आपल्यापैकी कोणालाच पुराणातील वांगी उकरून काढण्यात रस नाही.औरंगजेबाने किंवा महंमद गझनीने काही केले म्हणून सद्यकालीन कोणालाही शिक्षा द्यायची नाही. पण तीच मनोवृत्ती पुढे चालू ठेवणार असतील तर मात्र प्रखर विरोध आहे. एक गोष्ट नक्की आहे की फाळणी त्यांनी मागितली आणि अनेक वर्षांपासून असलेल्या अविश्वासात भर पडली. तो अविश्वास दूर व्हावा म्हणून ठोस पावले उचलणे गरजेचे होते ती पाहिजे त्या प्रमाणात उचलली गेली नाहीत. उलट बीड, कोल्हापूर सारख्या ठिकाणांमधून दहशतवादी कारवायांमध्ये स्थानिकांची भरती झाली. अगदी १९ लाखांचे पॅकेज असलेली सुखवस्तू सॉफ्टवेअर इंजिनयर मंडळी मध्यंतरी पुण्यातून दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून पकडली गेली. ती का? आणि आता प्लीज हिंदूंना उपदेशाचे डोस पाजू नका. वीट आला आहे या लेक्चरबाजीचा! इतर कोणीही अनेक महत्वाच्या गोष्टी विसरलं तरी हिटलरला शरमेने मान खाली घालायला लावतील अशी हिंदूंची हत्याकांडे झाली आहेत ती मला तरी विसरता येणे शक्य नाही. That's it. Period. तसेच गणेशोत्सवात मुस्लिम आणि दर्ग्यांवरील उरूसांमध्ये हिंदू सामील होत असतील तर ती एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. त्याचे स्वागत व्हायलाच पाहिजे.ते मुस्लिम नक्कीच आमच्या देशाशी एकरूप झालेले आहेत आणि ते आमच्यापैकीच एक आहेत. पण मुस्लीम लीगला मते देणारे नाही.मला वाटते याबद्दल मी माझा मुद्दा मांडला आहे. सावरकरांनी स्वतः पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेवर कविता लिहिली होती. सहा सोनेरी पाने पुस्तकात ते सोमनाथ मंदिर पाडले त्याविषयी मोठ्या तळमळीने लिहितात. आणि तेच सावरकर म्हणतात की देवाने मला संकटातून बाहेर काढले तर मी सत्यनारायण करणे मूर्खपणाचे आहे कारण पहिल्यांदा तोच सत्यनारायण आपल्याला संकटात ढकलतो. तेव्हा वैयक्तिक जीवनात विज्ञाननिष्ठ असलेल्या सावरकरांनी लोकांच्या श्रध्दांवर प्रहार केला हे मला तरी पटत नाही. तेव्हा तो टोला सावरकरांना नक्कीच नव्हता. माझ्या दैवताला-- सावरकरांना टोला मारण्याऐवजी लकडी पूलावरून नदीत उडी मारणे मी पसंत करेन. बाबरीसंदर्भातील माझी मते हा इतर कोणासाठी अहंकार सुखावणे असेल पण माझासाठी तो आपल्या राष्ट्राच्या अभिमानाचा प्रश्न आहे. पाकिस्तान्-बांगलादेश भारतात आणून अखंड भारत परत बनविण्यासाठी इस्त्राएल जशी पॅलेस्टिनींना वागणूक देते तशी द्यावी लागली तरी चालेल पण ती जमिन आमची आहे हे आपण कधीही विसरू नये असे माझे वैयक्तिक मत आहे. ---विल्यम जेफरसन क्लिंटन

In reply to by क्लिंटन

विकेड बनी Tue, 12/02/2008 - 23:59
भारतात परत आणूच. तिबेट आणि सियाचेनही आणू. नेपाळ तर आपलाच - त्याला आधी घशात घालू. श्रीलंकाही आपलीच - रावण नाही का होता रामायणात... श्रीलंकेला खिशात घालू. द. आशियाई राष्ट्रेही आपलीच संपत्ती, त्यांनाही झोळीत घालू. मग, युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेकडे डोळे वळवूया.

नाखु Wed, 12/03/2008 - 13:58
माझा हा प्रथमच प्रतिसाद आहे तसेच पहिलेच लेखन (मिपवरिल सुद्धा) तरि समजुन घ्यावे हि विनन्ति.. शम्पदकिय प्रक्शोभक वाटन्याचे कारणच काय? चिन मध्ये ओलिम्पिच च्य दर्म्यान झालेल्या तिबेटिन्वरिल अन्न्यायबाबत जगात फ़क्त नारजिचा सूर उमटल. पण चिन बद्दल वावगे बोलन्याचि कुनचिहि हिम्मत झलि नाहि कारन काय, तुम्हि आमचे मित्र आहत तोपरयन्त थिक. नहितर तटस्थ/त्रयस्थ रह, पन आमच्या शत्रुला प्रत्यक्श अप्रत्यक्श मदत करल तर तुम्हि सुद्धा शत्रुच आणि मग त्याचे परिणम भोगा. झ्य राष्ट्राचा जन्मच मुळि भरतद्वेशावर झाला आहे त्यान्च्यकडुन चन्गल्या सम्भधंचि भाबडी अपेक्शा का करवि (पाकिस्तन्च्या एकाहि रश्त्र्प्रमुख भरत द्वेश/कश्मिर प्रश्नचि भलावण करुनच निवदुन्क जिन्कु शकतो हे कटु आसले तरि सत्य आहे. कायद्यातिल फाशिच्या शिक्शेची तर्तूदच मुळि असा गुन्हा केल्यास जबर शिक्षा हौ शकते हा सन्देश समाजात पोहोचवा आणि समाजाने कायद्यचि चौकट पाळवि हा आहे. बाकी जेश्ठ सदस्यांसमोर माज़े विचार मान्डावे वातले म्हणुन ह प्रतिसाद प्रपन्च. मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"