Skip to main content

माझी केरळ आणि तामिळनाडु सहल भाग-१

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शुक्रवार, 05/06/2015 या दिवशी प्रकाशित केले.
"फिराला जायाचं , फिराला जायाचं" "पण कुठं जायाचं " "केरळला" "का? तिकडेच का?" तो आहे ना जळावु गणेशा त्याने त्याच्या केरळच्या धाग्यात जे काही फोटो टाकलेत त्यानं अशी जळजळ झाली की २ इनो पाकिटे घेवुनही जाईना, तेव्हा म्हंटले की तिकडे जावुनच यावे. मगच जीव शांत होईल. तरी एका नातेवाईकांनी पाय ओढलाच. वाss जावुन जावुन केरळलाच जाताय का? "अरे केरळांत आणि आपल्या कोकणांत फरक तो काय? आपल्या गावी जसे डोंगर तसेच तिकडचे त्यात विशेष ते काय? आणि हो छत्री घ्या नाहीतर पाऊस गाठेल. " म्हंटले येवुदे की, इथे उकाड्याने हैराण आहे म्हणुन तर भिजायला जातोय. आणि येताना तुमच्यासाठी घेवुनच येतो त्याला. मग एका यात्रा कंपनीकडे जावुन बुकिंग करुन आलो. आणि २१ ते १ जुन असा कार्यक्रम ठरला. या सहलीत श्री. गणेशा आणि श्री. कंजुश काका यांचे छान मार्गदर्शन मिळाले. या यात्रेत मी महाभारताची वेगळी कथा.. या धाग्यावरिल "महाभारतयुद्धानंतर शकुनी स्वर्गाला व्हाया केरळ गेला." या श्री.विकासच्या प्रतिसादानुसार ते देऊळ कुठे सापडते का ते पहात होतो. अनेक देवाळांना भेटी दिल्या तेव्हा तिथल्या पुजार्‍यांना विचारले असता काही माहिती मिळाली नाही. यात्रा सुरु- २१ तारखेला सकाळी ८. ३५ ला मंगला एक्र्पेसने कल्याण सोडले आणि गाडी केरळला पोहोचायच्या आधीच गणेशाच्या फोटोसारखे केरळचे दर्शन होईल असे दृष्य नजरे समोरुन जायला लागले. गाडीने जसे पनवेल सोडले तसा बाजुचा निसर्ग हिरवागार झाला. संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत आम्ही राजापुरला पोहचलो. आणि सकाळ होईस्तोवर गाडीने संपुर्ण गोवा आणि कर्नाटक पार केले होते. सकाळी उठलो तर पहिल्या केरळच्या स्टेशनचे दर्शन झाले नाव होते कोयिलांडी. लोहमार्गाच्या दोन्ही बाजुला सगळी नारळाच्या झाडांची माडी होती. या झाडांच्या माडीत तिथल्या लोकांची टुमदार एकमजली बंगले आहेत. तर थिरुरला केळीच्या बागा पहायला मिळाल्या. काही ठिकाणी मोठ्या नद्या समुद्रला जावुन मिळत होत्या. धावत्या गाडीतुन त्याचे काही फोटो घेतले.1 अखेर सकाळी १०.४५ ला एर्नाकुलमला गाडी पोहचली. तिथुन पुढे मग मलाबार पर्ल हॉटेल. तेव्हा या सहलीत ४० जण सहभागी असल्याचे लक्षात आले. पण सगळेच जण एकमेकांना अनोळखी होतो. पुढे ओळख झाली. आजचा दिवस पुर्ण विश्रांतीचा होता. पण आम्ही दुपारी थोडीशी वामकुक्षी घेवुन संध्याकाळी ५.०० वाजता जवळच असलेल्या एका पावाकुमलम या महादेवाच्या देवळात गेलो. संपुर्ण देवळात आतमध्ये आणि बाहेरच्या भिंतींना दर ६ इंचावर चौरसाकृती लाकडी पट्ट्यांमध्ये पणत्या ठेवण्यासाठी जागा केली होती. दररोज त्यातल्या काही तर सणासुदीला सगळ्याच पणत्या तेवत असतात असे तिथल्या पुजार्‍यांनी सांगितले. पावाकुमलम देवूळ. 1 पणत्या ठेवण्यासाठी केलेली खास योजना. 1 पणत्या ठेवण्यासाठी केलेली खास योजना जवळुन. 1 एव देवळासमोर एक धातुचा खांब होता. तो ऊंच आकाशात गेला होता. नंतर तेथिल प्रत्येक मंदिरात असे खांब देवळाच्या दाराशी उभे केलेले आढळले. 1 1 तिथून पुढे मग आपल्या मुंबईसारखे तिथेही मरिन ड्राईव्ह आहे तिकडे फिरायला जा अशी माहिती मिळाली. तेव्हा तिथल्या स्थानिक बसने प्रावास केला. या बसच्या खिडक्यांना मुंबईच्या बेस्टच्या बससारखी लोखंडी जाळी नव्हती. खिडकी संपुर्णपणे उघडी होती. पावसाळा आला की वर बांधलेली कापडी कनात खाली सोडायची की झालं काम. 2 मरिन ड्राईव्ह ही खुप सुंदर जागा आहे. विशेष म्हणजे समुद्र किनारा स्वच्छ आहे. (नंतर हीच स्वच्छता सगळीकडेच पहायला मिळाली कोणत्याही नदीत एकही प्लास्टीकची पिशवी तंरंगताना पहायला मिळाली नाही की कुठेही रस्त्यावर घाणीचे ढिगारे पाहिले नाहीत.) इथे पेरियार आणि एक कोणती तरी नदी येवुन मिळते. पण मुंबईच्या मानाने गर्दी कमी होती. या ड्राईव्हच्या फुटपाथवर एक बोटीच्या आकाराचे हॉटेल होते. पण ते पुर्णपणे रिकामे होते. 1 किनार्‍यावरुन परताना संध्याकाळी केरळची प्रसिध्द केळ्याची भजी, अननस आणि कैरी यांचे कॉकटेल सरबत घेतले. फिरत फिरत हॉटेल वर आलो. तिकडे ८.३० नंतर रस्याला तुऱळक गर्दी होती. रात्री ९.०० वाजता जेवताना दुसर्‍या दिवसाच्या कार्यक्रमाची टुर मॅनेजरकडुन माहिती मिळाली. तेव्हा कळले की याच मरिन ड्राईव्हला जावुन तिथुन बोटीने शिपयार्ड, डचपॅलेस, पाहुन संध्याकाळी मुन्नारसाठी रवाना व्हायचे आहे. अशा रितीने पहिला दिवस पार पडला. क्रमशः

वाचने 6528
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

पुढचे भाग लवकर टाका आता. बाकी २ महीने केरळात काढलेत तेही पावसाळ्यात तेव्हा या बसवरच्या पडद्यांची फार भीती वाटायची. एकदाका पाऊस सुरू झाला आणी पडदे पडलेत की आत भयंकर उकडतं, सोबतीला अंधार बाहेरचं काहीच दिसत नाही आणि कुठे उतरायचं हे काळायला मार्ग नसतो. सगळाच आनंदी आनंद. वरून मलयाली लोकांना नीट हींदी कळत नाही.

वाह, सुरुवात उत्तम झालेली आहे. पुढचे भाग पटापट येउद्या. तिथल्या राज्य परिवहन मंडळाच्या बसचा फोटो पाहून अन खिडकीचे वर्णन वाचून वीस वर्षांपूर्वी केरळची सहल करणार्‍या एका नातलगाचा अभिप्राय आठवला. पावसाळ्यात भिजल्यामुळे त्या पडद्यांचा घाण वास येतो. माझ्या मते ही रचना प्रवासी सुरक्षिततेच्या बाबतीत धोकादायक आहे. अवांतर - गणेशाचे केरळ प्रवासवर्णन: मुन्नार, अ‍ॅलेप्पी, पूवार.

@ अमृत :- बरोबर आहे तुमचे त्यांना हिंदी कळत नाही. पण साक्षरेतेच्या बाबतीत एवढा डोंगारा पिटतात त्याचा काहीही फायदा नाही. कारण त्याचे इंग्रजीही कच्चे आहे. अनुभव सांगतो. ते मंदिर आहे ना तेथुन मरिन ड्राइव्ह हा रस्ता म्हणजे १ क.मी अंतर असेल तेव्हा म्हंटलं की जरा इकडे आलोय तर स्थानिक बसेने जावुया म्हणजे खरं केरळ कळेल. बसमध्ये चढलो तर वाहकाला सांगितले कुठे जायचे आहे आणि पुन्हा याच ठिकाणी येण्यासाठी कोणती बस पकडु असे विचारले. तर त्याच्या भाषेत बोलायला लागला. मला काहिच कळेना बसमध्ये इतर प्रवाशांची मदतीने कोणी इंग्रजीमध्ये भाषांतर करायला मिळतंय का ते बघितले तर कोणीच तयार नाही. सगळा गोंधळ. त्यांचे इंग्रजी म्हणजे येस नो एवढंच. म्हंटलं हेच महाराष्ट्रातले एसटी ड्राईव्हर असले असते तर एकवेळ इंग्रजी नाही पण हिंदी मध्ये तरी नक्कीच छान समजावुन सांगतात. बाकी पावसाळ्यात बाहेरचं काहीच दिसत नाही आणि कुठे उतरायचं हे काळायला मार्ग नसतो. >> स्थानिक लोकांना रोजचे रस्ते मग कुठे उतरायचं ते माहित असणार. शिवाय ड्रायव्हर हाळी देतच असेल की. आणि रंगाशेठ हा बस प्रवास सुरक्षिततेच्या बाबतीत धोकादायक आहे याबाबतीत सहमत. टवाळ कार्टा:- जल्ला आमच्या बस ड्राईव्हरची ही हात साफ करणारी पहिली फेरी होती. म्हणुन तो ४० च्या पुढे गाडीच चालवत नसायाचा. अरे रिक्षा तर सोड स्कुटीने याला ओव्हरटेक केलंय. आता बोल.

मस्तच.. लिखान पण ओघवते आहेच.. पुढील सर्व सहल .. फोटो.. यांच्या प्रतिक्षेत आहेच ... तुमच्या आनंदात सहभागी झाल्याचाच जास्त आनंद आहे.. मार्गदर्शन हा मोठा शब्द आहे... मला पहिल्यांदा थोडी धाकधुक होती की गर्मी जास्त असेल याची... कारण मी डिसेंबर ला गेलो होतो .. मुन्नार २ डिग्री होते.. पण कुट्टनाड( अल्लेपी) तरीही उष्ण वाटले होते.. म्हणुन ... पण तुमची ट्रीप यशस्वी झाली आणि मलाखुप बरे वाटले... पेरियार जंगल सफारी माझी राहिली.. तुम्ही ती केली मस्त वाटले... लिहित रहा.. फिरत रहा.. निसर्गाच्या सुखद कलाकृती पाहने म्हणजे खुप मस्त असते...

In reply to by गणेशा

सुंदर फोटो आणि ओघवते वर्णन. जुन्या आठवणी (मे २०००) जाग्या झाल्या. विषेशकरून मुन्नारच्या प्रतिक्षेत. येऊदे पुढचा भाग लवकर. रच्याकने - गणेशा - अल्लेप्पीचे दुसरे नाव अलपुझ्झा ऐकले आहे. कुट्टनाड हेही तिसरे नाव आहे का?

In reply to by किणकिनाट

कुट्टनाड हा अल्लेपी( नविन नावाप्रमाणे अलपुझ्झा) जिल्ह्यातील तालुका आहे... आपण जे अल्लेपी ला जातो येथे खुप गर्दी असते.... कुट्ट्नाड तालुका थोड्या ह्या गर्दीपासुन लांब आणि मस्त आहे

फोटो आवडले आणि वर्णन मस्तच ,उत्सुकता वाढवणारे. बसच्या शर्यती त्रिशुर ते गुरुवायुर,तिरु०पुरम ते कन्या०रि या रस्त्यावर कारण तमिळ ड्राइवर असतात-मड्राशी( कोल्हापुर ट्रकवाल्यांचा शब्द) शंभरच्या खाली चालवतच नाही.केरळवाले चांगले चालवतात-तिरु०पुरम ते पोनमुडी.

मस्त सुरुवात... पुभाप्र.

स्वतंत्र प्रवासासाठी "लोनली प्लॅनिट"पुस्तकातले नकाशे फार उपयोगी पडतात.आम्हाला त्यांच्या बस कंडक्टरांचा आणि सहप्रवाशांचा बय्राचवेळा चांगला अनुभव आला.खुप उपयुक्त माहिती देत.मुळात मल्लु बडबडे फार.

बाकी ते बसच्या खिडकीचे पावसाळ्यातले वर्णन भयंकर वाटले. पुढील भाग लवकर टाका.