Skip to main content

सापुतारा (गुजरात मधील थंड हवेचे ठिकाण) आणि प्रवासातला अनुभव

लेखक Hrushikesh Marathe यांनी बुधवार, 03/06/2015 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्या दगदगीतुन एखादा long weekend आला की छान वाटतं. काहीजण ती सुट्टी घरी घालवतात तर आमच्यासाराखे काहीजण तीन दिवसात कुठे दौरा करता येईल याचा विचार करायला लागतात. असाच एक वीकेंडला धरून सोमवार १३ एप्रिलला ऑफिस मध्यला एकाच लग्न होतं. ते ही नाशिकमधे. सुजय, सुरेश, मोहित, धुम्रवर्ण आणि मी लग्नाला जायचा प्लान नक्की केला. आता सोमवारच्या लग्नाला लागुन आलेल्या वीकेंडला करायचं काय? जो तो आपल्या डोक्यातुन वेगवेगळे प्लान सुचवु लागला. शेवटी सर्वानुमते "सापुतारा..!" गुजरात मधलं एक थंड हवेच्या ठिकाण. तिकडे जायचे पक्कं झालं.
तसं हिल स्टेशनला जाण्यात आमच्यासाठी काही नवीन नव्हतं. पण गुजरात मधल्या टूरिस्ट पॉइंटला जाण्याबाबत आम्ही जरा जास्तच उत्साही होतो. कदाचित टीव्ही वरल्या "Gujarat Tourism" च्या जाहिरातीचा परिणाम असेल. अमिताभच्या रुबाबदार आवाजाने आणि पंतप्रधान मा.नरेंद्र मोदींच्या आत्मविश्वासाने आम्हाला जरा जास्तच भुरळ घातली होती.
शुक्रवारी रात्री पुण्यातुन आम्ही नाशिकला प्रस्थान केले आणि आमच्या सापुतारा कम लग्न अशा प्रवासाला सुरुवात झाली. पहाटे ५ ला नाशिकला पोहोचल्यावर आम्ही सापुताऱ्याला जाणाऱ्या गाडयांची चौकशी केली. तेव्हा आम्हाला वणी पर्यन्त जा तिथून सारख्या गाडया चालू असतात असा सल्ला देण्यात आला. आम्ही खुशिखुशित वणीच्या बसमधे चढलो. एक-दिड तासांच्या प्रवासानंतर साधारण ७ वाजता आम्ही वणीला उतरलो. थोड़ा वेळ प्रतिक्षा केली असता असं जाणवलं की पहाटे पहाटे आम्हाला चौकशीवाल्याने शेंड़ी लावली होती. सारख्या गाडया चालू असतात हा सल्ला आम्हाला महागात पडला कारण वणीवरुन सापुताऱ्याला जाणाऱ्या सर्व गाडया नाशिकवरुन किंवा नाशिकमार्गे येतात. साधारण तास दोन तास वाट पहात आम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आणि गुजरात टुरिसमच्या नावाने शंख करत होतो. अखेर ९.४५ ला GSRTC ची नाशिक - गोधरा बस आली. आम्ही पटकन मागच्या ५ सीट्स पकडल्या. वणीवरून सापुतारा दिड तासाचा प्रवास सुरु झाला.
आता गुजरात म्हटलं माझ्यासारख्याच्या डोक्यात सर्वसोईयुक्त, सर्वगुणसंपन्न, बेरोजगारी नसलेलं, दारुबंदी असलेलं एक आदर्श राज्य हीच संकल्पना. मोदिंची प्रचारसभेतली भाषणं, वेळोवेळी गुजरातच्या चांगुलपणाचे दिलेले दाखले ह्यामुळे या गुजरात बद्दल जरा जास्तच आकर्षण होत.
पण "दुरुन डोंगर साजरे" ही म्हणीचा वास्तवात उपयोग करता येईल असा एक अनुभव आम्हाला आला. गुजरात परिवहन मंडळाची बस महाराष्ट्राच्या हद्दीत एका थांब्यावर थांबली. गाडीचा वाहक अर्थात "कंडक्टर" मस्तपैकी थांब्यावर उतरून एका दारुच्या दुकानात गेला. ५-७ मिनीटांच्या प्रतिक्षेनंतर तो परत बस मधे आला, त्याचा वेश पहाता रस्त्यावरचे रस्ता कामगार पण व्यवस्थित असतात असा विचार आला. त्याने दारुसक्षम जे काही प्यायलं होतं त्याचे काही थेंब त्याने अंगावरही उडवून घेतले असावेत असा कयास आम्ही केला कारण प्रथमदर्शनी त्याच्या यूनिफ़ॉर्मवर त्याचे डाग दिसत होते. तिकिट काढ़ायला तो जेव्हा जवळ आला तेव्हा त्याच्या खिशात दारुची बॉटल सहज ओळखु येत होती. दोन मिनीटांच्या संवादात दारूच्या येणाऱ्या दर्पाने आमच्या शंकेवर शिक्कामोर्तब झाले. असो, पुढे गाडी एका ठिकाणी थांबली तिथे स्ट्रॉबेरी विकणारे बसले होते. गाडी आपल्या घरची असल्याप्रमाणे बराच वेळ थांबली होती. वणी ते सापुतारा रस्ताही काहीसा दुर्लक्षित होता. त्यात या बसला काहीच कंफर्ट नव्हता, चालक एखादा ट्रक चालवावा तसा बेडरपणे गाडी चालवत होता. अशा या नशेत असणारा वाहक आणि प्रवाश्यांचा जराही विचार न करता अतिशय विचित्र गाडी चालवणारया चालकासह या प्रवासाला दयावे लागले ६०₹.
अखेर आम्ही सापुताऱ्यात पोचलो, हवा एकदम थंडगार जाणवत होती. दोन तीन हॉटेल शोधल्यावर एक आमच्या बजेट मधलं हॉटेल मिळालं. प्रवासाचा थकवा जाणवत होता, एक एक डूलकी काढून आंघोळ उरकुन दुपारचं जेवणानंतर आम्ही सापुतारा दर्शन सुरु केलं. रोप वे, बोटिंग, होर्स राइडिंग, अशा ठेवणीतल्या एक्टिविटीज आम्ही खुप एन्जॉय केल्या. इको पॉइंट, रोज़ गार्डन असे काही पॉइंट्स पहिले आणि शेवटी आलो सनसेट पॉइंटला.. वडापाव आणि चहाचा आस्वाद घेत मावळतीचा सूर्य आम्ही पहात होतो. एखाद्या गोष्टीचा अस्त पाहण्यात असा कोणता आनंद आपल्याला मिळतो कोणास ठाऊक तरीही सनसेट पहायाला माझ्यासारखेच अनेक लोक जमले होते. सूर्यास्तासोबत आमच्या सापुतारा दर्शन ही जवळपास झाले होते. रात्रीच्या जेवणाने जरा आमचा हिरमोड केला खरा पण आइस क्रीम, बटाटा पोहे अशा सप्लिमेट्री फूड आणि गप्पा गोष्टी यामुळे त्याचा विसर पडला. लोकल मार्केट मधे फेरी मारत जेली चोकोलेट्स, स्ट्रॉबेरी, वेताच्या काठयांचे शो-पीस अश्या छोटेखानी खरेदीनंतर आम्ही हॉटेलवर परतलो. सकाळी घाईघाईत आवरुन आम्ही बसस्थानक गाठलं. MSRTC ची गाडी लागलेलीच होती. जाताना वणीच्या देवीच्या दर्शनासाठी जाण्याचा बेत होता म्हणून वणीचचं तिकीट काढ़लं. लाल रंगाच्या परिवर्तन बसमधे बसल्यावर कालची गोधरा बस आठवली. कडक इस्त्रीतले खाकी कपडे, पॉलिश केलेले काळे बुट अशा नीतनेटक्या पोशाखातला वाहक पाहुन आम्ही धन्य झालो. प्रवाशांशी बोलण्याची रीत थोडक्यात त्याची Body Language एखाद्या वाहकाला साजेशी अशी होती. चालकानेसुद्धा मागे बसलेल्यांचा विचार करत गाड़ी चालवणे पसंत केले होते आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व GSRTC पेक्षा कमी किमतीत ५-१० नव्हे तब्बल १४₹ कमी तिकीटात. वणी सापुतारा अंतर ४३किमीचे त्यासाठी MSRTC ने घ्यावे ४४₹ आणि GSRTC ने घ्यावे ६०₹. १४₹ जास्त तिकिट घेऊनही पदरी काय तर दारूबाज वाहक आणि लो कंफर्ट बस?? पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी गुजरातमध्ये, सर्वगुणसंपन्न गुजरात, दारुबंदी गुजरात, साऱ्या पोकळ गर्जना. GSRTC आणि MSRTC च्या उदाहरणावरुन मी महाराष्ट्रात असल्याचा अभिमान वाटला.
मला कळलं नाही की मोदिजींनी केलेल्या गुजरातच्या वर्णनामधे ते अशा छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला विसरले की काय. दारू पिणारा कंडक्टर असेल तर महिलांनी कोणाच्या भरवश्यावर प्रवास करायचा. एका बाजुला विकासाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे बारीकसारीक गोष्टीकड़े कानाडोळा करायचा. कदाचित मोदीजी राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाल्यामुळे त्यांचे गुजरातकडे दुर्लक्ष तर नसेल झाले? गुजरातला मोदींच्या सुशासनची पुन्हा गरज आहे का?असे अनेक प्रश्न एका दिवसात डोकावुन गेले. एका वाईट अनुभवावरुन थेट मोदीना लक्ष करणं म्हणजे अतिशयोक्ति जरी असली तरी गुजरात बद्दल आकर्षण ज्यांमुळे तयार झालं त्याना गृहीत धरण्यात काही वावगं आहे असं मला वाटत नाही. एका मद्यधुंद कंडक्टर वरुन आपण जसं पूर्ण व्यवस्थेला लक्ष नाही केलं तरी गुजरातबद्दल माझ्या मनात जी प्रतिमा होती त्याला काही अंशी तडा हा गेलाच. म्हणतात ना First Impression is Last Impression असचं काहीसं.

वाचने 16607
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

गुजरात बसचा वाईट अनुभव आला खरा! थोडे फोटोही टाका.गुजरातमध्ये हे ठिकाणअसलं तरी गुजरातपेक्षा इकडचेच पर्यटक इथे खूप असतात.

मला पहिल्यांदा वाटले भटकंतीचा धागा असावा. असो. सापुतार्‍यामध्ये बघण्यासारखे काही नाही असे माझे तरी मत आहे. एवढे ऐसे खर्च करुन तिकडे जाण्यापेक्षा महाबळेश्वर बरेच बरे.

मित्राच्या लग्नाचे काय झाले?

"बघण्यासारखे काही नाही" असं म्हणनार्‍या लोकांना नक्की काय बघायचं असतं असा मला नेहमी प्रश्न पडतो. डांग अभयारण्य, अहावा, विल्सन डोंगर, किल्लड अशा अनेक जागा आहेत. डांग भागाचा इतिहास वाचा म्हणजे कुतुहल आपोआप जाग्रुत होइल.

इतका सगळा प्रवास असा हवेत ठरवण्यापेक्षा गुजरात टुरीझम ला एक फोन केला असता तरी त्यांनी धो धो माहिती दिली असती.

In reply to by Hrushikesh Marathe

१) बस कंडक्टरचा बिल्ला नंबर टिपून घेवून गुजरात टुरीझमला कळवलेत का..? २) बस थांबली तेथे / तुम्ही उतरलात तेथे डेपोमध्ये जावून तक्रार केली का..?

मी चुकुन पहिल्यांदा सापुतारा च्या जागी सातपुडा असे वाचले होते... जमल्यास पुढच्यावेळी भटकंतीचे फोटो सुद्धा टाकत चला...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Blank Space... :- Taylor Swift

बस कंडक्टर दारू प्याला हे तर कुठेही घडू शकतं ना. त्यात मुख्यमंत्र्याचा काय संबंध नाय. ज्यांना काही बघायचं असतं ते रस्ता कसला आहे, बस कसली आहे काही न बघता चालू पडतात.

In reply to by पैसा

बस कंडक्टर दारू प्याला हे तर कुठेही घडू शकतं ना.
जाणवण्याइतपत दारु प्यायलेला 'एम एस आर टी सी' चा एकही कंडक्टर पाहिल्याचं मला आठवत नाही...आपण कधी पाहिला आहे काय?

In reply to by असंका

कोल्हापूर सांगली रूटवर भेटलाय एकदा. मात्र फुल्ल टाईट नव्हता. जरा वास येत होता. पण शुद्धीवर होता. आणि कर्नाटक किंवा गोव्यात या. खाजगी बसवर पाहिजे त्या प्रकारचे नमुने मिळतील.

In reply to by पैसा

खासगी जाऊद्या पण निदान सरकारी बसेस कडून ही अपेक्षा नसते... आणि कमाल म्हणजे गाड़ी थांबवुन दारू पिणे याहुन लाजिरवाणी गोष्ट ती काय!

In reply to by पैसा

माझ्या तरी आजपर्यन्तच्या बघण्यात दारू पिलेला कंडक्टर मी नाही पहिला... आणि आज कंडक्टर होता उदया चालक दारू पिऊन गाडी चालवेल.बस प्रायवेट नसते गवर्नमेंटची असते.संबंध नाही कसा??

In reply to by Hrushikesh Marathe

बस कंडक्टर दारू प्याला किंवा ड्रायव्हरने दारू पिऊन बस न्याशनल हायवेवर चालवली तर त्याला मुख्यमंत्री काय करू शकणार आहे? तो तिथे येऊन त्याला बसमधून बाहेर काढील अशी तुमची अपेक्षा आहे का? मला वाटते बहुतेक ठिकाणी बसेस या महामंडळांच्या अखत्यारीत येतात. ते लोक काही थेट सरकारी नोकर नसतात.

In reply to by Hrushikesh Marathe

वाहक दारू महाराष्ट्रात प्याला, गुजरातेत नव्हे. गुजरातेत दारूबंदी असली तरी गुजराती गुजरात बाहेर दारू पितात का नाही यावर राज्य सरकारचे नियंत्रण नाही. असो. पण कामावर असताना वाहकाने दारू पिणे पूर्ण चुकीचे आहे.

१)सापुतारा ओगस्ट,सप्टेंबरात उत्तम. २)यष्टि सर्वांनाच धार्जिणी नसते. ३)हिल स्टेशन वगैरे पिकनिक फक्त कुटुंबासहच काढावी.साडू ,मेव्हणे,मित्राचा परिवार यांना टाळावे.मनस्ताप कमी होतो.नंतर फोटु दाखवून जळवावे आणि। अचानक ठरवे हे सांगावे.

मी बरोबर १ वर्षापूर्वी जून २०१४ च्या पहिल्या आठवड्यात पुण्याहून सहकुटुंब सापुतार्‍याला गेलो होतो. स्वतःची गाडी घेऊन गेल्यामुळे परिवहन मंडळाच्या बसेसचा अनुभव नाही. तिथे ३ दिवस राहिलो. सापुतारा एकंदरीत बरे वाटले. फारसे पाहण्यासारखे काही नसले तरी रोपवे व बोटिंग उत्तम आहे. महाराष्ट्राच्या सीमेपासून जेमतेम ४ किमी अंतरावर सापुतारा आहे. ज्या हॉटेलात राहिलो ते डोंगराच्या एकदम माथ्यावर होते. त्याच्या शेजारीच रोपवे होते. सापुतार्‍याला थंड हवेचे ठिकाण म्हणता येणार नाही. जूनमध्ये तिथे बर्‍यापैकी गरम होते. महाराष्ट्राची हद्द संपून गुजरात सुरू झाल्यावर चांगले रस्ते होते. सापुतार्‍यात देखील चांगले रस्ते आहेत. नाशिक ते सापुतारा हा रस्ता महाराष्ट्राची हद्द असेपर्यंत फारसा चांगला नाही. तुम्हाला जो वाईट अनुभव आला आहे तो परिवहन मंडळाच्या कर्मचार्‍यांचा आहे. वाहकाने मद्यपान केले ते महाराष्ट्राच्या हद्दीत, गुजरातच्या नव्हे कारण गुजरातमध्ये दारूबंदी आहे. वाहकाने मद्यपान करणे वाईटच. परंतु त्याचा थेट मोदींशी संबंध येत नाही. सापुतारा एकदम सीमेवर असल्याने तिकडे राज्यशासनाचे फारसे लक्षही नसावे.

In reply to by श्रीगुरुजी

सापुतारा आहे छान.. पण नैसर्गिक सौंदर्यापेक्षा तिकडे ते ठिकाण develope केलयं. आपल्या महाबळेश्वरची सर नाही.. :)

In reply to by Hrushikesh Marathe

जेव्हा राज्यांच्या सीमा ठरवण्यात आल्या तेव्हा खरे म्हणजे सापुतारा महाराष्ट्रात समाविष्ट केले जाणार होते. पण तसे केले असते तर गुजरातमध्ये एकही हिल स्टेशन उरले नसते म्हणुन सापुतारा गुजरातमध्ये गेले. गुजरातमध्ये इतर कुठलेही हिल स्टेशन नसल्याने सापुतारा डेव्हलप केले गेले.

In reply to by Hrushikesh Marathe

कोणी केले डेव्हलप? त्याचे काहीच कौतुक नाही. एक वाहक दारू पिउन असला तर लागले लगेच मोदींच्या मागे. रेल्वे चे काही ड्रायव्हर पण दारु पिऊन चालवणारे आहेत. माझ्या माहीतीतलेच एक काका पुणे मुंबई थोडी ( त्यांच्या मते थोडी )लावून डेक्कन एक्स्प्रेस घेउन यायचे. काय करणार? पण तेंव्हा आम्ही म्हणले नाही की राजीव गांधी काय करतात म्हणुन.

आम्ही बडोद्याला एका हॉटेलमधे उतरलो असता बाथरूमचा नळ सुरू नाही असे लक्षात आले. जाताना हॉटेलच्या अभिप्राय पुस्तिकेत 'आम्ही सेवा सुधारण्यासाठी काय करू शकतो' ह्या रकान्यात 'मोदींचा राजिनामा मागा' असे लिहून आलो. आपला पुरोगामी, आदि जोशी

In reply to by आदिजोशी

आमच्या घराच्या बाल्कनीतला नळ देखील चालु नाही. फडणवीसांचा राजीनामा मागायला हवा. तसे बघता तो नळ चव्हाणांच्या काळात बसवला होता. त्यांच्या खासदारकीचा राजीनामा मागावा काय? असेही ते एकटेच काय करणार?

In reply to by मोदक

तीव्र कुचंबणा आहे . मंगला सिनेमासमोरचा पुलाला पिंपळाचे झाडाने धोका आहे आता तो ब्रिटिशकालीन असल्याने इंग्लड्मध्ये सर्कारला जबाब्दार धरावे कि मुनिसिपालटीला का राज्यसरकारला का केंद्रसरकारला. विचारवंत जाणकारांनी विजेरी झोत टाकावा. स दा खाल्मुंडीकर