मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उडदांमाजी....

सस्नेह · · जनातलं, मनातलं
‘मॅडम, बाहेर काळे म्हणून एकजण भेटायला आलेत. येऊ देत का ?’ दहा मिनिटापूर्वीच मी शिपायाला बजावलं होतं, मिटिंगचं काम आहे, एक तास कुणाला आत सोडू नको. आणि दहाच मिनिटात कोण काळे उगवला ? मी कपाळाला दोन सुरकुत्या पडून विचार केला. काळे नावाची कुणी व्यक्ती डोळ्यासमोर येईना. ‘थोडा वेळ थांबा म्हणावे..’ मी म्हटले. इतक्यात शिपायाच्या मागून एक ओळखीचा चेहेरा उगवला. ‘मॅडम, येऊ का आत ?’ ‘अरे, तुम्ही होय, काळे ? या, या ना !’ काळेला बघितल्याबरोब्बर माझी बत्ती पेटली. तीन वर्षापूर्वी माझे सोलापुरातल्या एका तालुक्याच्या गावी पोस्टिंग झाले असताना तिथे माझ्या हाताखाली दोन शाखा अधिकारी होते. हा काळे आणि दुसरा गोरे. फार तर एक वर्ष असेन मी तिथे. पण आयुष्यात लक्षात राहतील असे नमुने तिथे अनुभवायला मिळालेले. ‘काय काळे, कसं काय ? कसे आहात ?’ ‘एकदम मजेत, मॅडम. इकडे सगळं आबादीआबाद आहे बघा ! गावाकडच्या सारखं झेंगट नाही ! एकदम क्लीन कारभार. सगळे ग्राहक वेळच्यावेळी बिलं भरतात, स्टाफ फुल आणि शहाणा आहे..’ ‘छोकरी काय म्हणते ?’ ‘नवीन शाळेत रमलीये मस्त ! मिसेस पण सर्विसला लागली !’ ‘अरे वा ! गाव सोडल्यावर चांगलीच प्रगती झालीय की तुमची !’ ‘तुमची कृपा मॅडम !’ ...आणि काळे इब्लिसपणे हसला. मीही हसू लागले ! ! तीन वर्षे झाली त्या गोष्टीला. सर्विसमध्ये प्रथमच इतक्या दूर गावी बदली झालेली. त्यातून मी पहिलीच महिला अधिकारी म्हणून हाताखालचे कर्मचारी जरा बेदरकार ! वरून बेफिकीर पण आतून ईगो टवकारलेले. तालुक्याच्या शहराचे शहर-अ आणि शहर-ब असे दोन भाग केलेले. काळे, गोरे हे फिल्डवरचे इंजिनिअर्स त्या दोन भागांचे प्रत्यक्ष काम बघत. शिवाय ऑफिसचे इतर दोन असे चार इंजिनिअर्स आणि मी त्यांची इन्चार्ज असे आम्ही इतर 70 स्टाफसह तालुक्याच्या शहराचा गाडा चालवत असू. काळे २६-२७ वर्षाचा असेल तेव्हा. तालुक्याच्या गावापासून ७-८ किमीवर त्याचे गाव. तिथे भक्कमशा दहा बारा एकर शेतीसह एकत्र कुटुंबात पत्नी आणि तीन वर्षाच्या मुलीसह तो रहात असे. कार्यालयाच्या मोठ्या इमारतीला लागून एक बैठी दोन खोल्यांची इमारत होती त्यात त्याचे ऑफिस. कार्यालयात काळे किमान दोन तास उशिरा येणार. त्याच्या भागातले ग्राहक सकाळी नऊपासून त्याच्या कार्यालयाच्या दारात ठिय्या देउन बसलेले, मला दहा वाजता ऑफिसात येताना दिसत. काही वैतागलेले ग्राहक थेट माझ्या केबिनीत येऊन धरणे धरत. काही दिवस पाहिले अन एक दिवशी काळेच्या मुख्य टेक्निशियनला मी बोलावले. ‘काय माने, कुठायत काळेसाहेब ?’ ‘हे, आपलं, लायनीवरून आत्ताच घराकडं ग्येले.’ ‘लावा बघू फोन !’ टेक्निशियनने मोबाईलची बटनं दाबली. काही वेळ कानाला लावला अन ओशाळं हसत म्हणाला, ‘मॅडम, गाडीवर हायेत वाटतं, उचलत नाहीत फोन !’ मग मी माझ्या मोबाईलवर काळेला घेतलं. सातव्या की आठव्या रिंगला काळेन फोन घेतला. ‘येस मॅडम.. ‘ ‘कुठे आहात काळे ?’ ‘ऑफिसकडेच येतोय..’ ‘अहो, तुमचे ग्राहक आता माझ्या ऑफिसात घुसू लागलेत !’ ‘आलोच मॅडम,’ अर्ध्या तासानं काळे उगवला तोवर ग्राहकांची कामा-धंद्यासाठी, चहा-नाश्त्यासाठी पांगापांग झाली होती. ‘अहो काळे, ग्राहक खोली भरून बाहेर ओसंडायला लागलेत की तुमचे !’ ‘मॅडम, ग्राहक काय चोवीस तास असतातच हो पाठी , मग काम कधी करायचं ?’ काळेन मलाच प्रश्न केला. असा हा काळे. उर्मटपणा, लाचखोरी, कार्यालयात मोक्याच्या वेळी हजर नसणे, वरिष्ठांचे फोन न घेणे इ. सर्व गुणांनी युक्त. त्याच्या भागात सदैव तक्रारी. गोरगरीब ग्राहक खेटे घालघालून अखेर कंटाळून कार्यालयाची वाट डोळ्याआड करत. काही जण तंत्रज्ञ लोकांशी लाडीगोडी करून कामे करून घेत. अगदीच नडलेले माझ्याकडे येत किंवा वरती चाव्या मारून कामे करून घेत. पालकमंत्र्यांपासून खात्यातल्या झाडून सगळ्या वरिष्ठांपर्यंत सगळ्यानी काळेला जोडे हाणून झालेले. त्याच्या चेहेऱ्यावरची सुरकुतीपण हलली नव्हती. कार्यालयात एकही कागद जागेवर सापडत नसे. अर्जंट असे लेबल असलेल्या कामाकडे किमान सहा महिने ढुंकून बघणार नाही. त्याच्या प्रगतीचा आलेख नेहमी उतरणीला लागलेला. इतक्या लहान वयातल्या त्याच्या मख्खपणाचे मला आश्चर्य वाटत असे. एकदा मी त्याला बोलूनही दाखवले. ‘काळे, वरिष्ठ लोकांच्या गैरमर्जीचे तुम्हाला भय वाटत नाही “ ‘मॅडम, करून करून काय करतील ते ? पगार कापतील ? बदली करतील ? सी आर खराब करतील ? यांना काय घाबरायचं ? कंत्राटदाराचे त्यांचे हप्ते मीच पोच करत असतो. आणि असं बघा, माझी वरकमाई पगारापेक्षा जास्त आहे, तेव्हा पगार कापला तरी फरक पडत नाय. बदली ? या बेक्कार गावातून माझी बदली जगाच्या पाठीवर कुठेही झाली तर मीच पहिले पेढे वाटेन ! आहे काय या गावात ? ग्राहक जोडे हाणतात, बिलं भरत नाहीत, वरिष्ठ म्हणतात पैसे आणा, फडतुसातला फडतूस पुढारीसुद्धा दाब देत येतो. स्टाफ अपुरा ! या गावात काम करायला कोणच मागत नाय. घरी मुलगीला इंग्लिश मिडीयमला घालयचंय तर चांगली शाळा मिळेना. कुठेतरी चांगल्या गावात बदली झाली तर तिचं शिक्षण मार्गी लागेल. मी तर कंटाळलोय इथं, मॅडम ! लौकर बदली झाली तर बरं ! राहता राहिलं सी आरचं. आयला, इथं कुणाला प्रमोशन पायजे आहे ? आहे हे झकास चाललंय !’ त्याचं तत्वज्ञान ऐकून माझ्या मध्यमवर्गीय पांढरपेशा नीतिमत्तेला किमान पंधरा रिश्टर स्केलचे धक्के बसले ! ..एकंदरीत काय तर काळे हा आमचा नामांकित ‘ढ’ विद्यार्थी होता ! याच्या बरोबर उलट गोरे. पंचविशीचा स्वप्नाळू तरुण, दूरवर आपल गाव सोडून पोटासाठी अन कुटुंबासाठी इथे आलेला. विशीतच वडिलांचं निधन झालं आणि आई व धाकट्या बहिणीची जबाबदारी याच्यावर पडलेली. परिस्थितीचे चटके खाऊन सोशिक झालेला स्वभाव. ग्राहकांशी तो गोड समजावणीच्या स्वरात बोले. रात्री अपरात्री लाईनवर काम करून तक्रारी ताबडतोब निकालात काढी. इतके करून नऊच्या ठोक्याला ऑफिसात हजर ! कार्यालयात सगळे कागद जागच्याजागी. सगळे काम अगदी सर्क्युलरप्रमाणे असे. वरिष्ठांची सरबराई हसतमुखाने करी. ग्राहकाना समाधान केल्याशिवाय माघारी पाठवणार नाही कधी. गोरेचे सगळे काम संगणकीकृत होते. कुठलाही कागद, महत्वाची पत्रे दोन मिनिटात आणून देई. मार्गदर्शकपत्रे, संदर्भपत्रे शोधून शोधून काम अगदी त्याबरहुकुम दोषविरहित होईल याची काळजी घेई. मला गोरेचं नेहमी कौतुक वाटे. एक दिवशी मी विचारलं, ‘गोरे, तुम्ही फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट आहात. इथे या गावंढ्या गावात का बुद्धी वाया घालवताय ? मोठी कंपनी जॉईन करा !’ ‘नाही मॅडम. तिकडे ट्राय करून पाहिलंय. इथल्यापेक्षा पगार जास्त आहे खरा, पण मेहनतही जबरदस्त लागते. माझा एक पाय अधू आहे. वडील नाहीत. बहिण शिकतेय. आई अडाणी. मला कॉम्पिटीशनचा जॉब सूट होत नाही. इथे स्कोप नाही, पण सिक्युरिटी आहे. ..गावी आई आणि बहिण दोघीच असतात. मला एक वर्ष पूर्ण होईल आता. मी गावाकडे बदली मागितलीय मॅडम. तुम्हीपण रेकमेंड करा बरं का.’ ‘नक्कीच !!’ लहान वयातला त्याचा सोशिकपणा अन समज पाहून मी थक्क झाले. पुढच्या महिन्यात गोरेचं लग्न ठरलं ! भावी वधू त्याच्या गावचीच. तीही जॉब करत होती. तिला जॉब सोडणे शक्य नव्हते. आता गोरेची बदलीची गरज शंभरपटीने वाढली. वरिष्ठांच्या दारात खेटे घालून त्याचे बूट फाटले. पण कामातली तडफ कमी झाली नाही ! बदल्यांचा सीझन सुरु झाला. झाडून सगळ्या वरिष्ठांनी जोरदार प्रस्ताव दिल्यामुळे आणि मंत्रीमहोदयांचा त्याला हात लागल्याने काळेच्या बदलीची ऑर्डर पहिल्या फटक्यातच आली ! तसा हा तालुका इब्लिसच ! असंतसं कुणाला सोडायचं नाही, हा इथला खाक्या ! बदली झाली तरी सुटका होण्यासाठी वरिष्ठांना दहादा अजीजीने सांगावे लागे आणि नाना खटपटी कराव्या लागत. पण काळेचा महिमाच असा की त्याची बदली झाल्याचे समजल्यावर गावातले उच्चभ्रू लोक आमच्या जिल्ह्याच्या वरिष्ठांकडे गेले आणि काळेला ताबडतोब सोडावे अशी जोरदार मागणी केली. काळेच्या जागी दुसरा माणूस दिलेला नसतानाही त्याचा चार्ज ऑफिस इंजिनिअरकडे द्यावा व त्याला ताबडतोब सोडावे असा फतवा दुसऱ्याच दिवशी वरिष्ठांकडून आला. काळे सुटला. तीन दिवसांनी रीतसर पश्चिमेकडच्या सुपीक जिल्ह्यातल्या धनाढ्य तालुक्यात हजर झाला ! तो गेला अन गोरे अस्वस्थ झाला. ऑफिस बंद झाल्यावर माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘मॅडम, दोन दिवस सुट्टी पाहिजे.’ ‘का हो ? आई बरी आहे ना ?’ ‘हो. पण मीच बरा नाही.’ ‘म्हणजे?’ ‘जातो हेडऑफिसला आणि कायतरी वशिला लावून ऑर्डर काढून आणतो माझी !’ मला त्यःच्याबद्दल सहानुभूती होतीच. रजा दिली. गोरेनं खरोखरच जबरा वशिला काढला. आठवड्यातच त्याची गावी बदली झाल्याची ऑर्डर आली ! गोरेनं पेढे वाटले. लग्नाची तारीख दोन महिन्यानंतरची ठरवून टाकली. ऑर्डर आली खरी, पण कागदावरच ! त्याच्या जागी कुणाचं पोस्टिंग अजून झाले नसल्याने त्याची सुटका होईना. महिना झाला, दोन महिने झाले तरी गोरेची सुटका नाही झाली. वशिल्याच्या तट्टाची पुण्याईसुद्धा इथे उणी पडली. वरिष्ठांना लोणी लावून लावून गोरे घायकुतीला आला. स्वत:ची ऑर्डर काढण्यासाठी भगीरथ प्रयत्न करून झाल्यावर आता बदली माणूस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. लग्नाचा मुहूर्त जवळ येऊ लागला. त्याच्या तोंडचे पाणी पळाले ! अखेर त्याच तालुक्यांतला एक इंजिनिअर जो दुसऱ्या गावी बदलून गेलेला, तो गोरेच्या जागी यायला तयार झाला, आणि मग आमच्या हुशार विद्यार्थ्याची सुटका झाली ! जै हो, आकाशातल्या बापा तुझी, आणि जमिनीवरल्या मायबापा तुमची ! !

वाचने 7353 वाचनखूण प्रतिक्रिया 36

सौंदाळा 26/05/2015 - 18:15
हम्म अशा विभागात काम करुन भावना / संवेदना जिवंत कशा राहतात? परिस्थितीमुळे कोडगेपणा येत नाही का?

सौन्दर्य 27/05/2015 - 00:12
एकीकडे काळेसारख्या कोडग्यांवर काहीच कारवाई होत नाही, काळे सगळ्यांना भरडून काढतात आणि दुसरीकडे गोरे सगळीकडे भरडून निघतात. कित्येक वेळा इमानदारी, कामावरची निष्ठा, व्यवस्थितपणा, वगैरे गुण देखील 'अवगुण' ठरतात. गोरेंच्या केसमध्ये देखील असेच झालेले आढळते. फार सुबक लिहिले आहे.

नाखु 27/05/2015 - 09:46
आणि ही साठा उत्तरांची सुफळ कहाणी आवडली! सरकारी व्रत कहाण्यांचा वाचक नाखु

प्रचेतस 27/05/2015 - 16:26
नेहमीप्रमाणेच सुरेख लेख. उत्तमप्रकारे संवाद फुलवणे हे तुमच्या लेखणीचे कौशल्य आहे. बाकी शीर्षक 'उडिदांमाजी' च्या ऐवजी 'उडदांमाजी' असे हवे.

hitesh 29/05/2015 - 17:31
कोकणात्य्न गावी बदलीचा अनुभव आहे. ... अर्धा गोरा अधा काळा