Skip to main content

कारचे सेफ्टी फीचर्स कसे मोजतात ?

रविवार, 24/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच ग्लोबल एनसीएपी क्रॅश टेस्टचे व्हिडीओ पाहिले. त्यात टाटा नॅनो, आल्टो ८००, फोर्ड फिगो सारख्या कार्स टेस्टमधे फेल झालेल्या दाखविल्या. जालावर बर्‍याचशा ठिकाणी कार्सचे रीव्ह्यू सापडतात. पण मला खालील काही प्रश्न पडले आहेत. १. एकंदरीत कार्सची सुरक्षितता कशी मोजतात ? २. विविध ठिकाणी कार्सच्या चर्चा रंगतात पण अमूक एका कार जास्त सुरक्षित आहे हे कसे समजावे ? विशेषतः एखाद्याला जुनी कार घ्यायची असेल तर (म्हणजे एअरबॅग्स, एबीएस ह्या फिचर्सच्या जन्मापुर्वीच्या) तर ती कार किती सुरक्षित आहे हे कसे कळावे ? उदा. मला जुनी होंडा सिटी, जुनी ह्युंदाई अ‍ॅसेंट व जुनी मारुती एस्टीम यांच्या सुरक्षिततेची तुलना करायची असेल तर ती कशी करावी ? की ज्या कारचा पत्रा जास्त जाड आहे ती सुरक्षित समजतात ? ३. डिकी आणि बॉनेट असलेली कार डिकी आणि बॉनेट नसलेल्या कार्सपेक्षा जास्त सुरक्षित असते काय ? ४. एसयुव्ही मॉडेल्समधे (उदा. टाटा सुमो, महिंद्रा बोलेरो वगैरे) हाय व्हिजीबीलीटी असते. बिल्ड क्वालिटी सोडल्यास हाय व्हिजीबिलीटीमुळे गाडी चालवितांना जास्त सुरक्षिततेचा अनुभव येतो काय ? अजूनही काही मुद्दे असतील (सुरक्षेविषयी) तर माहितीत भर घालावी हि विनंती.

वाचने 7091
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

कार क्रॅश टेस्ट विषयी सवडीनी लिहिन. प्रत्येक देशाच्या नियमावलीप्रमाणे सुरक्षाचाचणीची यादी कमी जास्तं होतं जाते. पॅरामीटर्स गाडीच्या प्रकाराप्रमाणे बदलत जातात. अपघाताचेचं जवळजवळ १२ ते १५ वेगवेगळे सिनारिओज असतात. प्रत्येक सिनारिओप्रमाणे टेस्ट पॅरामीटर्स बदलत असतात. ह्याविषयी विटेकर काका अधिक चांगल्या पद्धतीने सांगु शकतील असं वाटतं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रत्येक देशाच्या नियमावलीप्रमाणे सुरक्षाचाचणीची यादी कमी जास्तं होतं जाते
पुर्न सहमत . लवकर सवड कडवी ..वाचायला आवडेल ( आवडीचा विषय, मीपण त्याच शाळेचा विद्याथी )

भारतात जीवाला फार किंमत नाही म्हणून एयर बॅग्स,अ‍ॅन्टीलॉक ब्रेकिंग सिस्टिम बंधन्कारक नाहीत असे हे म्हणतात. लोकप्रिय मारुती गाडीच्या पातळ पत्र्याबद्दल न बोललेले बरे.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब, भारतात लोक जीवापेक्षा पैश्याला किंमत देतात. सर्व सुरक्षा-उपकरणे वापरली तर कुठल्याही गाडीची किंमत सहज १.५ ते २ लाखाने वाढेल मग नॅनो असो वा स्कॉर्पीओ. एवढे पैसे पब्लिक द्यायला तयार असेल तर कार-उत्पादक काय वेडे झालेत का सुविधा न द्यायला? नुसतं बंधनकारक करून भागत नाही, पब्लिकची तयारी पण पाहिजे की.

In reply to by संदीप डांगे

पब्लिकची तयारी नाही कशावरून ?सर्वच गाड्या उत्पादकांनी तसे केले तर ग्राहक कोणतीतरी गाडी घेईलच ना? कप होल्डर्स्,सिगारेट अ‍ॅस्ट्रे..सहा ते आठ स्पीकर्स..असल्या सुविधा पब्लिकला विचारून गाडीत ठेवतात का ? असल्या सुविधांनीही गाडीची किंमत वाढत असेलच ना?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माईसाहेब, अभ्यास वाढवा असे नाईलाजाने सांगावे लागते आहे. तुम्ही 'कायद्याने बंधनकारक' असा उल्लेख केला तेव्हा लग्जरी गाड्या आणि स्वस्त गाड्या असा विचार त्यात होत नसतो. तसे ते बंधनकारक झाले तर कमी किंमतीच्या गाड्यांचा ग्राहक वर्ग झपाट्याने कमी होईल. कारण गाड्या आजही चैनीच्या वस्तूंमधे येतात, जीवनावश्यक नाही. दोन-चार लाखाचा बजेट असणारा एकदम ६-७ लाखावर उडी मारू शकत नाही. जिथे आज दहा ग्राहक आहेत तिथे चारच असतील आणि याचा कंपन्यांना काही फायदा नाही. कारण वाढवलेली किंमत नफा नसून खर्च आहे. पॉपकॉर्न विकत घेण्यासारखे कार विकत घेणे सहज आणि सोपे नाहिय भारतात. आजही.

In reply to by संदीप डांगे

तसेच ज्या कोणाला जीवाची काळजी पैशापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी सर्व-सुरक्षा-उपकरणे-युक्त गाड्या आहेत. तेव्हा इथे वादाचा प्रश्न नसावा. वाहन-निर्मिती क्षेत्र कोसळू द्यावे का सुरक्षा नियम वेशीवर टांगावे यातले एक तुम्हास निवडायला सांगितले तर तुम्ही काय निवडाल? प्रश्नाची रेंज खूप लांबवर आहे त्यामुळे विचार करून उत्तर द्या.

In reply to by संदीप डांगे

आपल्याकडे एअरबॅग्स आणि एबीएस बंधनकारक नाही. नेमक्या ह्याचाच फायदा कंपन्या घेतात आणि एअरबॅग्स आणि एबीएस टॉप व्हेरिएंट मधेच देतात जेणेकरून फीचर्स च्या नावाखाली जास्त किंमतीचं व्हेरिएंट विकलं जावं !

In reply to by गुंड्या

तुमचा सूर जरा नकारात्मक आहे. लक्षात घ्या एअरबॅग्स आणि एबीएस स्वस्त तंत्रज्ञान नाही. त्याची किंमत कंपन्या लावणारच. यात कायद्याने बंधनकारक नाही म्हणून कंपन्या फायदा घेतात म्हणण्यासारखे काय आहे? जास्त किमतीचं वेरिएंट घेणे न घेणे याची ग्राहकांवर कुणीच सक्ती करत नाही. ज्याचा जो बजेट असेल ते तो घेईल. वाहन-निर्मिती करणार्‍या कंपन्यांना चोर-लुटारू अशा दृष्टीने बघणे जरा पटत नाही. हे म्हणजे साम्यवादी ष्टाईल झाले, आमची ऐपत नसेल तरी आम्हाला चैनीच्या सुविधा पाहिजेत. ग्राहकाला सुरक्षीत वाहन पाहिजे तर कायदा असो वा नसो जास्त पैसे मोजावेच लागतील. कायदा झाला तरी ज्यांना वाढीव किंमत परवडेल तेच ग्राहक घेतील. तेव्हा गरिबांना कारचेही सुख नशीबी नाही म्हणून साम्यवादी ओरडा करण्यात अर्थ नाही. पण उद्या असे काही झालेच तर वाहन-उदयोग धडाधड कोसळून हजारो लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न उभा राहील. त्यामुळे जर ग्राहकाला सुरक्षीत वाहन हवे तर त्याने जास्त पैसे मोजणे हे मला तरी लूट वाटत नाही. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.

In reply to by संदीप डांगे

ऑक्टोबर २०१५पासून एअरबॅग्स आणि एबीएस बंधनकारक होणार आहे म्हणतात. बघू काय होतं ते. असे होत असेल तर उत्तमच आहे.

In reply to by संदीप डांगे

स्विफ्टसाठी: ३५,००० रुपये (चालकाच्या बाजूला); ४५,००० रुपये (सहप्रवाश्याच्या बाजूला); संवेदक व इतर यंत्रणा मिळून एकूण खर्च अंदाजे १,२५,००० रुपये हा खर्च २००९ चा आहे, मारुतीच्या अधिकृत सेवाकेंद्रामधला. दुवा: http://www.team-bhp.com/forum/technical-stuff/64336-swift-zxi-airbag-replacement-do-not-do.html (अनुभव दुसर्‍याचा आहे, अनोळखी व्यक्ती, सर्च करून सापडलेले वेबपेज) (स्विफ्टच्या एअरबॅग्ज या 'तुलनेने' कमी दर्जाच्या व कमी किंमतीच्या असतात, अ‍ॅज कंपेअर्ड टू अदर युरोपिअन मॅन्युफॅक्चरर्स लाइक फोक्स्वॅगन) (मिपावर कुणाला एअरबॅगच्या खर्चाचा अनुभव आहे का?) दुचाकीवर स्वतःच्या सुरक्षेसाठी १००० रुपयांचं हेल्मेट घेण्याला कचरणारे भारतीय, आवर्जून दोन लाख अतिरिक्त देऊन एअरबॅग्ज असलेली कार घेतील का? (जर कायद्याचे बंधन नसेल तर) दुसर्‍या शब्दात मांडायचा प्रयत्न करतो: जर एकाच कारच्या मॉडेलचे २ व्हेरियांट्स आहेतः ५ लाख एअरबॅग शिवाय व ७-८ लाख एअरबॅगसहित,(एअरबॅग्ज सोडून दुसरा कसलाही फरक नाही असे समजा) तर किती लोक सेफ्टी फर्स्ट म्हणून (फक्त सुरक्षेसाठी म्हणून) ७ लाखाची गाडी घेतील? ज्यांना खरोखर स्वतःच्या जीवाची किंमत/पर्वा आहे व ज्यांना २-३ लाख अतिरिक्त देणे परवडते असे लोक.

In reply to by संदीप डांगे

मी कार कंपन्यांना चोर मुळीच म्हणत नाहीये. गैरसमज नसावा. त्यांना जो काही फायदा होतोय तो नियमांच्या आधारे आहे. माझं म्हणणं आहे की लोअर व्हेरिएंट मधे एबीएस आणि एअरबॅग्स न देता फक्त टॉप व्हेरिएंट मधेच देणं यामागं जास्ती नफा हे(च) कारण आहे. ह्या गोष्टी रेट्रोफिट करता येत नाहीत त्यामुळं गाडी घेणारा (आणि सेफ्टी चा विचार करणारा) झक मारत टॉप व्हेरिएंटच घेतो. एबीएस आणि एअरबॅग्स मला फुकट नकोच आहेत.

In reply to by गुंड्या

जास्त नफा काढण्यासाठी लोअर वेरीएंटमधे देत नाहीत असं काही नाहीये ह्या बाबतीत. १.५ ते २ लाख किंमत आहेच सर्व सुविधांची. तुम्ही बाजारातून याची माहिती काढू शकता. आपल्याकडे वेरीएंट हे सुविधेनुसार आणि त्याला लागणार्‍या वाढीव किंमतीनुसार विकले जातात. त्यात लबाडीसारखं काय आहे? साधं उदाहरण आहे: अलॉय व्हील हे रेगूलर व्हीलपेक्षा महाग असतं ते कंपनीला नफा काढायचा असतो म्हणून नाही. तसंच साध्या कापडाचं सीट कवर आणि लेदर सीट कवर यात किंमतीत फरक असणारंच. फॉग लाईट लावले की त्याचे पैसेही कंपनी लावणारच. लक्षात घ्या जगात फुकट काहीच मिळत नसतं. चैनीच्या वस्तुंमधे तर नाहीच नाही. साधा टॉप-एन्ड फोन ५० हजाराचा असतो. जी लोकं अशा महागड्या गाड्या घेतात त्या फॅमिलीत सर्वांकडे गरज नसतांनाही २-३ लाखाचे इलेक्ट्रोनिक गॅजेट्स असतात. तिथे कुणीच हात आखडता घेत नाही आणि सेफ्टीसाठी जास्त पैसे मोजावे लागले तर तणतण होते. आता कडक नियम आले तरी एवढे पैसे द्यावेच लागतील. त्यात सरकारने सबसीडी वैगेरे द्यावी की काय? म्हणजे गाडी न वापरणार्‍यांच्या खिशातून गाडी वापरणार्‍यांच्या सुरक्षेसाठी सरकार पैसे काढून देणार. नियम आल्यावर, गाडी महाग झाल्यावर, मार्केट कोसळल्यावर या क्षेत्राला सरकार स्टीमुलस पॅकेज घोषीत करणार तेही असल्या कार न वापरणार्‍या नागरिकांच्या खिशातून पैसे काढून. हे कितपत पटण्यासारखे आहे? सेफ्टीसाठी टॉप वेरीएंट घेणारा झक मारत घेतो, म्हणजे नाईलाजाने घेतो, म्हणजे गरज नसतांना जास्त पैसे मोजतो, म्हणजे कंपन्या ग्राहकाच्या असहाय्यतेचा, भीतीचा, अज्ञानाचा गैरफायदा घेतात असा काही अर्थ होत आहे तुमच्या प्रतिसादाचा. अक्सेसरीजमधे कंपन्या जाम लुटतात हे पण १००% खरे आहेच. पण आफ्टर-मार्केट अक्सेसरीज आणि सेफ्टी-फीचर्स-एकीपमेंट यांच्या मूळ संकल्पनेत खूप फरक आहे. त्यामुळे एकावरून दुसर्‍याचा अंदाज लावणे चुकीचे आहे. हा धागा परत 'डॉक्टर लोक एवढे पैसे का घेतात' पद्धतीचा होऊ नये.

In reply to by संदीप डांगे

समजा एका कंपनीच्या एका ठराविक मॉडेलच्या कार मध्ये सर्वात बेसिक व्हेरियांट ची किंमत ४ लाख आहे. आणि ती कंपनी त्याच मॉडेलमध्ये सर्वात टॉप एण्ड व्हेरियांट ६.५ लाखाला विकते. आता जर एअरबॅग्स, एबीएस इत्यादी सुरक्षा फीचर्स बेसिक व्हेरियांटमध्ये टाकले, तर तिची किंमत ५.५ ते ६ लाख होईल. मग ही "लूट" आहे का? मग जर कंपनी ने अजून ४ अतिरिक्त गोष्टी देऊन (बेसिक+सेफ्टी+४ अतिरिक्त गोष्टी ) कारची किंमत ६.५ लाख ठेवली तर काय बिघडले? (कंपनीच्या दृष्टीकोनातूनः कार घेणारा (बेसिक+सेफ्टी) अशी कार ६ लाखाला घेईल, की (बेसिक+सेफ्टी+४ अतिरिक्त गोष्टी ) अशी कार ६.५ लाखाला घेईल? )

In reply to by संदीप डांगे

"सेफ्टीसाठी टॉप वेरीएंट घेणारा झक मारत घेतो, म्हणजे नाईलाजाने घेतो, म्हणजे गरज नसतांना जास्त पैसे मोजतो" हेच बरोबर आहे मालक... कारण टॉप वेरीएंट मध्ये ज्या इतर फालतू गोष्टी असतात त्या गिर्‍हाईकाला "झक मारत, विनाकारण, नाईलाजानेच" घ्याव्या लागतात. ज्याची किंमत अव्वाच्या सव्वा लावलेली असते म्हणजेच लोअर मॉडेल मध्ये सुरक्षा सुविधा न देऊन कंपनी लूटच करत असते.

माझ्या मागील लेखात मी त्या तपशिलात गेलो नाही, कारण मालिकेचे उद्दिष्ट जास्त तांत्रिक माहिती न देता फक्त सर्वांसाठी रंजक तेवढीच माहिती देणे हा आहे. सुरक्षितता मोजायाचीच म्हटली तर एसिल रेटिंग ने मोजतात. एसिल 'अ' ते 'ड, मधील ' एसिल ड' दर्जाच्या गाड्या सर्वात सुरक्षित मानल्या जातात पण त्यामुळे विकसन, तपासण्या आणि पर्यायाने गाडीची किंमत वाढत जाते. तुम्ही वर म्हटलेली बातमी बरीच जुनी आहे. त्यानंतर काही उत्पादकांनी सुरक्षितता वाढवली आहे. युरो एन्क्याप च्या पुढील चाचण्या कधी करणार आहेत ते पहावे लागेल. बाकी सुझुकी, टाटा, महिंद्र हे नेहमीच या यादीत खाली रहाणार कारण त्यांचा मार्केट सेगमेंट वेगळा आहे. सुरक्षित गाडी हवी म्हणायचे आणि या तीन कंपन्यांच्या शोधायच्या यात विरोधाभास आहे ! येत्या दहा वर्षांत तेही या मानांकनात येतील- कारण वाढलेल्या व्हॉल्यूममुळे कमी किमतीला ते इलेक्ट्रोनिक भाग भारतातही मिळतील.

In reply to by खेडूत

संपूर्ण असहामत , सज़ूकी , टाटा आणि महिंद्रा ह्या सगळ्या कंपन्या टॉप varient मध्ये abs , ebs आणि airbags देतातच तसेच पूर्वीची मारुती आणि आताची सुझूकी ह्यात जाणकारांनी गल्लत करून नये , सुझूकीने build quality खुपच सुधारली आहे रच्याकणे एकदा ciaz kiva Zest top varient चालवून पाहा !

एकुणात चर्चा कार कंपन्या सेफ्टी फिचर्स वाढवुन लुटतात का इकडे झुकली आहे तर सांगु इच्छीतो की कंपन्या या फिचर्समागे व क्रॅश टेस्टींगमागे खुप पैसा खर्च करते व त्यांना या सर्व ग्लोबल टेस्ट पार करण्यासाठी खुप प्रयत्न करावे लागतात. शेवटी तो खर्च गाडीच्या विक्रीतुनच त्यांना मिळतो. मग किंमत वाढणार नायतर काय होणार? कारचा पत्रा जाड म्हणुन ती कार जास्त सुऱक्षीत असे कधीही नसते. कारचे पुर्ण प्लॅटफॉर्म डिझाईन, क्रंपल झोन, सेफ्टी फीचर्स, वापरलेले मटेरियल्स वगैरे यावर अवलंबुन असते. तसेच आजकाल या कंपन्यांसाठी एमिशन नॉर्म्स सुद्धा कडक केलेत. कमी एमिशन साठी कमीत कमी गाडीचे वजन करण्यामागे कल असतो. यासाठी high tensile strenght steels, alloy steels, compostie materials या कंपन्या वापरत आहेत. यामुळे कमी वजन पण जास्त मजबुत गाड्या तयार करत आहेत. हे सर्व करताना किंम्मत सुद्धा स्पर्धात्मक ठेवावी लागते.

ज्यांना सेफ्टी फिचर्स वाल्या गाड्या देउन कंपन्या लुटतात अश्या लोकांसाठी खालची माहिती पहिली गोष्ट काही सेफ्टी फिचर्स जसं की एअर बॅग्ज म्हणा हे महागडं तंत्रज्ञान आहे. तुम्हाला जर फक्त वाटत असेल की एअर बॅग्ज मधे फक्त हवेनी भरलेल्या किंवा भरल्या जाणार्‍या पिशव्या असतात तर तो एक गोड गैरसमज आहे. एक विचार करा तुमची गाडी साधारण ८० किमीप्रतीतास वेगानी आहे आणि समोरुन येणारा १०० किमी प्रतीतासानी येतोय आणि अपघात होणारे. (टचवुड). त्या एअर बॅग्ज रेटेड प्रेशरला भरल्या जायला १३/१०० सेकंद एवढा कमी वेळ मिळेल. एवढ्या भयानक स्पीडमधे असणार्‍या गाड्यांमधे ह्यापे़क्षा कमी रिस्पॉन्स टाईम असणारी सिस्टीम बसवायची आणि तिही ९९.९९% वेळा कार्यरत झालीचं पाहिजे ह्या रिलायबलिटीची तर त्याला काय क्षमतेचे संवेदक (सेस्नर्स) लागतील? ज्या केमिकल रिअ‍ॅक्शननी एअर बॅग्ज फुगवल्या जातात त्या केमिकल्स अतिशुद्ध अवस्थेमधे असणं किती आवश्यक असेल? एवढ्या दर्जाच्या तंत्रज्ञानाच्या किंमती अजुनही स्वस्तः नाहित. हे झालं फक्तं एअर बॅग्ज बद्दल. तुम्हाला दिसत नसणार्‍या कितीतरी गोष्टी गाडीच्या हुड खाली असतात. उदा. गाडीची फ्रेम. तुम्हाला नॅनो स्वस्तात मिळेल पण तिची फ्रेम एका स्विफ्ट पे़क्षा जास्तं क्रंबल अ‍ॅबसॉर्ब करु शकेल असं वाटतय का तुम्हाला? एक स्विफ्ट एका पोलो एवढी दर्जा ठेवते असं वाटतय का तुम्हाला? आपल्याकडे अजुन ही सेफ्टी डिव्हाईसेस सक्तीची केलेली नाहित कारण भारतीय मानसिकता. सुरक्षित आहे का ह्या पेक्षा कितनेकी है किंवा कितना देती है हेचं दोन प्रश्ण गाडी घेताना विचारात घेतले जातात. जर का सक्तीची केली तर किती जणं वरचे दिड ते दोन लाख रुपये घालुन गाडी घेतील किंवा घेउ शकतील? ह्याचा गाड्यांच्या विक्रीवर किती वाईट परिणाम होईल? ऑटोमोबाईल मार्केट किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रिमधल्या उलाढालीवरती प्रत्यक्षरित्या इतर इंडस्ट्रीज म्हणजे आय-टी सॉफ्टवेअर्स म्हणा, स्पेअर पार्ट्स म्हणा, बँकिंग म्हणा किंवा गृहबांधणी म्हणा असे व्यवसाय अवलंबुन असतात. एक ऑटोमोबाईल इंडस्ट्री झोपली तर त्याचा खुप दुरगामी वाईट परिणाम दिसुन येतो. किती जणं गाळात जातील असं झालं तर? सरकार ही बाब विचारात घेउन ह्या बाबी सक्तीच्या करु शकेल? शेवटी तुम्हाला गाडी हवीये का सुरक्षित गाडी हवीये हा निर्णय तुमचा आहे. परवडत नसेल आणि गरज असेल तर चक्क गाडी रेंट करावी. इएमआय पेक्षा कमी खर्च होतो. जाता जाता एक माहिती म्हणुन सांगतो. एक ८ वर्षांपुर्वी निगडीच्या मधुकरराव पवळे ब्रिजवर एका बिल्डरच्या मर्सिडिझ ला अति भयानक अपघात झालेला. सिक्स वे एअरबॅग्ज असुन, सगळ्या डिप्लॉय होउनही कोणीही वाचलं नाही. पाण्याच्या टँकरनी आख्खया गाडीचा चुराडा केला. कोटीभर रुपयाची गाडी सुद्धा एवढ्या भयानक अपघाताला तोंड देउ शकली नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

इथे अमेरिकेत नव्या चारचाकी गाडीच्या मालकांसाठी कार डिलरतर्फे अधून मधून वर्कशॉप असते. काही महिन्यांपूर्वी मी अशा वर्कशॉपला हजेरी लावली. त्यावेळी एअर बॅगचा डेमो देण्यात आला. एक नुसती एअर बॅग कमी ताकदीच्या नियंत्रीत स्फोटाद्वारे इन्फ्लेट करून दाखवण्यात आली.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

सुरक्षितता गंभिरपणे घेतली जात नाही कारण भारतीय मानसिकता हेच खरे. हेल्मेट वापरणे न वापरणे यावर खुप वाद आहेत पण ज्याला स्वतच्या जीवाची काळजी आहे तो वापारतोच. सीट बेल्टचेही तसेच. तो वापरल्यास 30% इंजुरिजपासून माणूस वाचू शकतो. पण सक्ती केल्याशिवाय वापरणारच नाही. तर मुळात ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. आणि हो फक्त महागड्या गाड्या घेऊन मी अपघातापासून वाचू शकतो हाही एक गैरसमजच आहे. जर बेसिक सेफ्टी सिस्टिम्स वापरल्या नाहीत तर देवहि तुम्हाला वचवू शकत नाही.

In reply to by मोहनराव

आमचे एक प्रोफेसर सांगायचे - सिक्युरिटी इस अ‍ॅन इल्युजन. सुरक्षाव्यवस्था एक भ्रम आहे. अपघातापासून होणार्‍या गंभीर जखमांपासून व तसेच जीव जाण्याइतक्या भयंकर जखमांपासून वाचवण्याचा 'प्रयत्न करणे' हेच सेफ्टी-फिचर्सचे काम असते. जीव वाचेलच याची कोणीही खात्री देऊ शकत नाही. त्यामुळेच लोक रिस्क घेत असावेत. तरीपण किंमत हा मोठाच भाग आहे डीसीजन-मेकिंगचा. सुरक्षा साधनांचा वापर करून १००% इंज्युरीचा चान्स वेगवेगळे फीचर्सनुसार टक्क्यांमधे कमी कमी होत जातो. पण सर्व सुरक्षासाधने ज्या संकल्पित घटनेसाठी तयार केली आहेत त्याबाहेर जाऊन अपघात होत असेल तर कितीही महागडी यंत्रणा असली तरी ती कुचकामी ठरते. जसे ९-११ चे ट्वीनटॉवर अटॅक्स. त्यामुळे भारतीय जास्त हुशारी दाखवून रिस्कचा चान्स घेत असावेत आणि पैसेही वाचवत असावेत. याउलट सरकारने-कंपन्यांनी सुरक्षा-साधनांच्या वापरामुळे अमुक अपघातात झालेले नुकसान आणि न वापरल्यामुळे झालेले नुकसान याचा तौलनिक अभ्यास मांडला तर कदाचित मानसिकता बदलण्याचा प्रयत्न होईल. स्वस्त गाड्यांना स्टीलचे बंपर-प्रोटेक्टर लावलेले आपल्याकडे सर्रास दिसते. त्या बंपर-प्रोटेक्टरमुळे गाडीचे क्रंपलझोन्स निकामी होऊन अपघातात ती गाडी जास्त धोकादायक होते हे आपल्याकडे कुणीही सांगत नाही. सगळ्यांची प्राथमिकता बॉडीस्क्रॅचेसपासून सुरक्षा व्हावी हीच असते. स्वत:चा जीव धोक्यात घालून पेंटस्क्रॅचेस वाचवणे हे फारच मनोरंजक असले तरी धोकादायक आहे हे सामान्य जनतेस कळत नाही. क्रंपलझोन्स ही एक न दिसणारी पण फार मोठी सुरक्षाव्यवस्था आहे याचा मला स्वतःला चांगला अनुभव आहे. एका सिग्नलवर समोरच्या ट्रकच्या इंडीकेटरच्या चुकीने अगदी १०-१५ च्या स्पीडला त्याच्या बॅकसाईडला कार ठोकली होती. पुढचा भाग तेव्हढ्याशा धक्क्यानेही आत गेल्याने आणि सीटबेल्ट मुळे शष्प त्रास झाला नाही. पण तीथेच बंपर प्रोटेक्टर असते तर कपाळमोक्ष ठरलेलाच. त्यामुळे मी कार कितीही मोडली तरी ती तीचे नुकसान आपल्यासाठी फायदेशीर आहे हे समजून त्रास करून घेत नाही. बरेच लोक हे समजून घेत नाहीत.

मला काही मुलभूत प्रश्न पडले आहेत. ज्या देशात फक्त ४ % लोक आयुर्विमा करतात तेथे जास्त पैसे देऊन एअर बॅग्ज कोण विकत घेणार? त्यातून ती एअर बॅग एकदा उघडली कि परत नवी विकत आणायला लागते. पन्नास हजारापासून ते एक लाख पर्यंत मोटार सायकल विकत घेणारे स्वार पाचशे रुपयाचे नवीन हेल्मेट विकत घेत नाहीत (आणि घेतले तर वापरत नाहीत.) पुण्यासारख्या शहरात( जेथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नावालाच आहे)तेथे केवळ ८-९ % लोक हेल्मेट घातलेले दिसतात. तेथे या सर्व "सुखसोयी"म्हणूनच बघितल्या जातात "आवश्यक" म्हणून नाही. माझे एक गृहीतक आहे. एखाद्या देशात एका माणसाची किंमत हि एक भागिले त्या देशातील लोकसंख्या गुणिले त्यादेशाचे क्षेत्रफळ अशी आहे. किंवा क्षेत्रफळ भागिले लोकसंख्या (A /P) म्हणजे जितकी लोकसंख्या जास्त तितकी मानवी जीवनाची किंमत कमी आणि जितकी जमीन जास्त तितकी मानवी जीवनाची किंमत जास्त. या गृहीतकाप्रमाणे भारतात मानवी जीवनाची किंमत कवडी मोल आहे.

सर्व प्रतिसादकांचे आभार ! चांगली चर्चा चालू आहे. पण तरीही माझा एक मुद्दा दुर्लक्षीत झाल्यासारखा वाटतो. एकंदरीत कमीत कमी पैशात गाडी खरेदी करणे ही भारतीय ग्राहकाची मानसिकता आहेच. पण याच कारणामुळे जुन्या गाड्यांचे मार्केट बहुधा नवीन गाड्यांच्या मार्केटपेक्षा जास्त जोरात चालते. (चुक असेल तर दुरुस्त केल्यास आनंदच आहे.) आत्तापर्यंत जी चर्चा चालू आहे ती नवीन गाड्यांची सुरक्षितता किंवा टॉप व्हेरीएंटमधे असलेल्या सेफ्टी फीचर्सबद्दल. माझा मुद्दा हा आहे की जुन्या गाड्यांना काही सुरक्षिततेचे उपाय करता येतील काय ? किंवा गाड्यांमधे काही बदल करायचे नसल्यास (करता येत नसल्यास) ड्रायव्हर किंवा सहप्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काहि प्रयत्न करता येणे शक्य आहे काय ? उदाहरणार्थ १. एअर बॅग ऐवजी एखाद्या संरक्षक प्रकारचे जॅकेट बनविता येईल काय जे काहि विशीष्ट दाबाला फुगू शकेल. किंवा काहि विशिष्ट केमीकल्सपासून एखादे तंतूमय जॅकेट बनविता येईल काय ? जे एक ठराविक मर्यादेपर्यंतचा धक्का पचवू शकेल ? २. डोक्यात घालण्यासाठी हेल्मेट. हे नेहमीच्या दुचाकी हेल्मेटपे़क्षा वजनाने हलके असावे व त्याने आजूबाजूला बघण्यावर मर्यादा येऊ नयेत. ३. गाडीच्या पुढे मागे जे स्टीलचे बंपर प्रोटेक्टर लावले जातात त्यामुळे गाडीचे नुकसान होते. पण अशा एखाद्या धातुचे प्रोटेक्टर्स बनविता येऊ शकतात काय जे एका ठराविक मर्यादेपर्यंतची धडक सहन करु शकतील व नंतर मोडून पडतील. याने गाडीत बसलेल्या प्रवाशांचा धक्का जीवघेणा या पातळीवरुन कमीतकमी दुखापत होऊ शकेल असा करता येईल काय ? कोणी अशाप्रकारे वेगळा (किंवा मुर्खपणाचा) विचार करुन काही नवीन शोध लावू शकतो काय ? त्यातून तो दोन पैसे कमवू शकतो व काही प्रमाणात जीवहानी टाळू शकतो. तुर्तास इतकेच. जसे सुचेल तसे लिहीत जाईन.

In reply to by धर्मराजमुटके

जुन्या गाड्यांना काही सुरक्षिततेचे उपाय करता येतील काय ? >> जुन्या गाड्या घ्यायच्या झाल्याच तर शक्यतो जापनीज, जर्मनमेक हायेन्ड लग्जरी कार्स घ्याव्या. सुमारे दहा वर्ष ते पंधरा वर्ष जुनी ७५ हजार ते १ लाख किमी चाललेली चांगल्या कंडीशनची जुनी गाडी, नव्या लो-एन्ड असुरक्षीत कार्सपेक्षा, कमी किमतीत मिळू शकते. तीचे किमान अजून एक लाख किमीचे आयुष्य बाकी असते. पण मायलेजचा प्रश्न असेल. जुन्या कार्स आजच्या कार्सएवढ्या फ्युएल एफीशियंट नाहीत. १. एअर बॅग ऐवजी एखाद्या संरक्षक प्रकारचे जॅकेट बनविता येईल काय जे काहि विशीष्ट दाबाला फुगू शकेल. किंवा काहि विशिष्ट केमीकल्सपासून एखादे तंतूमय जॅकेट बनविता येईल काय ? जे एक ठराविक मर्यादेपर्यंतचा धक्का पचवू शकेल ? >> असे तंत्रज्ञान महागच असेल. त्यापेक्षा नवी सुरक्षीत गाडी स्वस्त पडेल. २. डोक्यात घालण्यासाठी हेल्मेट. हे नेहमीच्या दुचाकी हेल्मेटपे़क्षा वजनाने हलके असावे व त्याने आजूबाजूला बघण्यावर मर्यादा येऊ नयेत. >> यात एक अभिनव प्रकार आला आहे. एअरबॅगसारखे हे धक्का लागल्यावर चटकन फुगते. सामान्य परिस्थितीत कॉलरभोवती गुंडाळता येते. mm mm अधिक माहिती इथे ३. गाडीच्या पुढे मागे जे स्टीलचे बंपर प्रोटेक्टर लावले जातात त्यामुळे गाडीचे नुकसान होते. पण अशा एखाद्या धातुचे प्रोटेक्टर्स बनविता येऊ शकतात काय जे एका ठराविक मर्यादेपर्यंतची धडक सहन करु शकतील व नंतर मोडून पडतील. याने गाडीत बसलेल्या प्रवाशांचा धक्का जीवघेणा या पातळीवरुन कमीतकमी दुखापत होऊ शकेल असा करता येईल काय ? >> असे बंपर प्रोटेक्टर आहेत. हेही नेहमीच्या स्टील बंपरपेक्षा महागच असेल. mm अधिक माहिती इथे

१. एकंदरीत कार्सची सुरक्षितता कशी मोजतात ? >> संकल्पित अपघात घटनांमधे प्रवासी किती सुरक्षित राहण्याची "शक्यता" आहे हेच बघितले जाते. नविन गाड्यांच्या क्रॅशटेस्टवरून हे कळू शकते. १५ वर्षे किंवा त्यापेक्षा जुन्या गाड्यांचे खात्रीलायक काही सांगू शकणार नाही. २. विविध ठिकाणी कार्सच्या चर्चा रंगतात पण अमूक एका कार जास्त सुरक्षित आहे हे कसे समजावे ? विशेषतः एखाद्याला जुनी कार घ्यायची असेल तर (म्हणजे एअरबॅग्स, एबीएस ह्या फिचर्सच्या जन्मापुर्वीच्या) तर ती कार किती सुरक्षित आहे हे कसे कळावे ? उदा. मला जुनी होंडा सिटी, जुनी ह्युंदाई अ‍ॅसेंट व जुनी मारुती एस्टीम यांच्या सुरक्षिततेची तुलना करायची असेल तर ती कशी करावी ? की ज्या कारचा पत्रा जास्त जाड आहे ती सुरक्षित समजतात ? >> जुन्या गाड्या घेतांना त्यांचे माहितीपत्रक, युजर मॅन्युअल मिळवून वाचावे. सुरक्षेसाठी कंपनीने काय उपाययोजना केल्यात ते लिहिलेले असते. जुन्या गाड्यांमधे शक्यतो क्रंपलझोन्स आणि बिल्ड-मटेरीअल याच गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. वरील नमूद तीनही गाड्यांमधे कोणती अधिक सुरक्षित अशी तुलना करता येणार नाही कारण तीनही कार्स एकाच कंडीशनमधे मिळणार नाहीत. मिळाल्यास किंमत भाव खाईल. तरीही लक्ष देण्यासारखे काही मुद्दे आहेत. जसे की गाडीचे किती आणि कसे अ‍ॅक्सीडंट्स झालेत, टायर नवे की जुने, इत्यादी. अपघातात गाडी प्रवाशांना कितपत सुरक्षित ठेवते हे कंपनीने त्यात काय उपाय दिले त्यावर आणि आतापर्यंत त्यातले किती उरलेत ह्यावर अवलंबून आहे. सामान्य ग्राहकांस अशी माहिती काढणे अशक्य आहे. कारण अ‍ॅक्सीडेंट झालेल्या कारच्या डागडुजीमधे बर्‍याच गोष्टी बदलल्या जाऊ शकतात ज्या मूळ उत्पादनाच्या अप्रूव्ह्ड मानांकनाप्रमाणे नसू शकतात. कोलॅप्सीबल स्टील रॉड्सच्या ठीकाणी स्वस्तातले किंवा कोलाप्सिबल नसलेले रॉड्स लावले जाऊ शकतात. ३. डिकी आणि बॉनेट असलेली कार डिकी आणि बॉनेट नसलेल्या कार्सपेक्षा जास्त सुरक्षित असते काय ? >> असू शकते. डीकी बॉनेट क्रंपलझोन्स, इम्पॅक्ट अब्जॉर्बर म्हणून काम करतात. पण अपघाताची तीव्रता किती आहे यावर सगळं अवलंबून आहे. मागच्याच आठवड्यात नाशिकमधे एक्स्युव्ही ५०० च्या भीषण अपघातात पाच जण मृत्यूमुखी पडले. एवढ्या मोठ्या एसयुव्ही गाडीचा अगदी मारुती ८०० प्रमाणे चक्काचूर झाला. तेही ती स्वतः कंटेनरवर जाऊन आदळली असतांना. त्यामुळे सुरक्षा हा एक भ्रम आहे असं माझं मत आहे. अपघात होण्याच्या शक्यता जास्तीत जास्त कमी करणे हेच एक प्रवासी आणि चालक म्हणून आपल्या हातात असते. बाकी देवाक काळजी! ४. एसयुव्ही मॉडेल्समधे (उदा. टाटा सुमो, महिंद्रा बोलेरो वगैरे) हाय व्हिजीबीलीटी असते. बिल्ड क्वालिटी सोडल्यास हाय व्हिजीबिलीटीमुळे गाडी चालवितांना जास्त सुरक्षिततेचा अनुभव येतो काय? >> गाड्यांचे वेगवेगळे मॉडेल्स हे वाहनाच्या अपेक्षीत उपयोगासाठी तयार केले जातात. प्रकारानुसार त्याच्या सुरक्षितपणावर काहीही परिणाम होत नाही. सुरक्षितता वाहनचालकाच्या कौशल्यावर आणि प्रसंगावधानावर जास्त अवलंबून असते. बिल्ड क्वालिटी, हाय-विजिबिलिटीचा किंवा इतर वैशिष्ट्यांचा वाहनातल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेशी काही संबंध नाही. जुनी कार घेत असाल तर आधीच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे जर्मन, जापनीजमेक ची हायएन्ड लग्जरी कार घ्या. कमी किंमतीत चांगली कम्फर्टेबल, लग्जरीयस राईड मिळेल. बाकी इतरही पॉइंटर्स असतात खरेदीच्या निर्णयाचे. प्रत्येकाच्या गरज आणि प्राथमिकतेनुसार ते बदलतात.