Skip to main content

ह्या कॅन्सरवर इलाज आहे का?

लेखक मार्मिक गोडसे यांनी बुधवार, 18/03/2015 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी महिनाभर राहून मनसोक्त हुंदडायचे,मामेभाऊ व त्याच्या मित्रांबरोबर खेळायचे , टिंगलटवाळ्या करायच्या व सुट्टी संपली की ही आठवणींची शिदोरी घेवून आपल्या घरी परतायचे हा माझा दरवर्षीचा कार्यक्रम असे. अकरावीची वार्षिक परिक्षा संपल्यावर दरवर्षीप्रमाणे आजोळी गेलो. दुपारची वेळ असूनही घरात आजी आजोबांव्यतिरिक्त कोणीच नव्हते. मामेभाऊ-बहीण कोणीही घरात नव्ह्ते, प्रत्येकाने स्वतःला अभ्यासापासून ते पोहण्यापर्यंतच्या क्लासेसमध्ये गुंतवून घेतले होते. हातपाय धूवून फ्रेश होवून आजी-आजोंबांबरोबर थोडावेळ गप्पा मारल्या व बाहेर सटकलो. शेजारी मित्राच्या घरी गेलो तर तोही असाच कुठल्यातरी क्लासला गेला होता, बरोबरीचे कोणीही आजुबाजुला खेळताना दिसत नव्हते, फक्त चिल्लिपिल्ली मुले भर उन्हात खेळत होती. ते रखरखीत ऊन व आजुबाजूचे वातावरण मला अधिक उदास वाटू लागले,ह्याच उन्हात मित्रांबरोबर खेळताना असे कधीही जाणवले नव्हते. संध्याकाळी भावंडांबरोबर बाहेर मॉलमध्ये खरेदी,खादाडणे, इ.व्हायचे. एखाद दोन दिवस हे ठिक वाटले नंतर त्याचाही कंटाळा येवू लागला. अशी मजा मला माझ्या शहरातही मिळत होती. आजोळी मी ज्यासाठी आलो होतो त्या मजेला यंदा मी मुकलो होतो, पहिल्यांदा मी आजोळी कंटाळलो होतो. आजीआजोबांच्या आग्रहामुळे मी कसाबसा एक आठवडा आजोळी काढला. दरवर्षीप्रमाणे मला निरोप देण्यासाठी बस स्टँडवर आज कोणीही उपस्थीत नव्हते. गर्दी भरपूर होती. मुंबईला जाणारी बस आली. जो तो बसमध्ये चढण्यासाठी दरवाज्यात गर्दी करत होता, मीही त्यात सामील झालो. एव्हाना अर्धी गाडी भरली होती. मी पायरीवर पाय ठेवणार तितक्यात एका उंचपूर्‍या मजबूत देहयष्टीच्या माणसाने माझ्यासकट सगळ्यांना मागे ढकलून गाडीत शिरकाव केला. मी पुन्हा गाडीत चढण्याचा नाद सोडला व मागे जाऊन हताशपणे गाडीकडे बघत उभा राहिलो. तितक्यात त्या गाडीतील मागून दोन नंबरच्या खिडकीतून कोणीतरी हात काढून मला बोलवत होते. ते दूसरे तिसरे कोणीही नसून ज्यांनी मला ढकलले होते तेच गृह्स्थ होते. त्यांनी माझ्यासाठी जागा पकडली होती. गाडीत पाय ठेवायला जागा नव्हती कसाबसा मी मागे पोहोचलो. ए पोराला रस्ता द्या असे त्या गृह्स्थाने आपल्या खणखणीत आवाजात लोकांना फटकारले. आजुबाजुच्या प्रवाशांच्या चेहर्‍यावर नाराजीचे भाव स्पष्ट दिसत होते इतक्या गर्दीतही आपल्याला विनासायास बसायला मिळते ह्यामुळे मनातल्या मनात सुखावलो होतो. थँक्यु आजोबा असे म्हणुन मी बसलो. पांढरी टोपी, पांढरा सदरा व पायजामा वय अंदाजे ६५ च्या पुढे असावे. कोण लागत होते हे आजोबा आपले? का आपल्यासाठी जागा पकडली असेल? कंडक्टरने बेल वाजवली व गाडी सुरू झाली. गर्दीमुळे कंडक्टरला मागे यायला बराच वेळ लागणार होता. तरीही मी पाकिटातून तिकिटाचे नेमके पैसे काढून शर्टच्या खिशात ठेवणार तिततक्यात आजोबा म्हणाले तू तिकिट काढू नकोस तू माझ्याबरोबर आहे असे मी कंडक्टरला सांगीन. तू काळजी करू नकोस. स्वातंत्र्यसैनिकाबरोबर एक व्यक्ति मोफत प्रवास करू शकते हे माहित होते. परंतू आजोबांचे वय ८० च्या आसपासही वाटत नव्हते. मला तर लॉटरीच लागली असे वाटले. बाळ तू काय करतोस ? आजोबांनी विचारले. ११ वी कॉमर्सची परिक्षा दिली.- मी. कॉमर्स?? दहावीला कमी मार्क मिळाले का?- आजोबा. नाही- मी. मग सायन्सला का गेला नाही, करीअरच्या संधी इ. आजोबांचे लेक्चर सूरू झाले. त्यांच्या बोलण्यातून मला समजले की आजोबा एका खेड्यात जि.प. च्या शाळेत मुख्याध्यापक होते. गावी बर्‍यापैकी जमीन आहे. निवृत्तीनंतर शेतीत लक्ष घालू लागले. दोन मुले म.रा.वि.म मध्ये इंजिनिअर आहेत. एक मुलगा बी.एस्सी. अ‍ॅग्री. शेती करतो व एका साखर कारखान्याच्या बॉडीवर कुठल्याश्या मोठ्या पदावर आहे. हे सर्व ते मोठ्या अभिमानाने सांगत होते. आजोबांचे भारदस्त व्यक्तिमत्व व स्पष्टवक्तेपणामुळे मी भारावून गेलो होतो त्यांच्याविषयी आदर वाटू लागला होता. तुम्हाला कुठे जायचे आहे? सहज चौकशी म्हणून मी आजोबांना विचारले. आजोबा म्हणाले मुंबईला. मुंबईला कोणाकडे ? मी विचारले. आजोबांनी माझा डावा हात पकडला व त्यांच्या पोटाच्या उजव्या बाजूवर ठेवला. कडक झाकणासारखा हाताला स्पर्श झाला. मला काही समजले नाही हे आजोबांन कळाले. व त्याणीच सांगायला सुरवात केली. मला पोटाचा कॅन्सर आहे. टाटामध्ये ऑपरेशन करुन खराब झालेले आतडे काढून टाकले. मलविसर्जनाचा नैसर्गीक मार्ग नसल्यामुळे पोटाला छेद घेउन एक छोटी नळी आतड्याला जोडुन शरिराच्या बाहेर जोडली आहे. एक सक्शन पंप जोडून मल बाहेर काढून व नळी साफ करुन त्याला झाकण लावावे लागते. अधून मधून टाटाला यावे लागते उपचारासाठी. हे ऐकल्यावर मला आजोबांविषयी आदराबरोबर सहानुभूती वाटू लागली. मग तुम्ही प्रवासात सोबतीला कोणाला का नाही घेतले? मी विचारले. मला काय गरज कोणाला सोबतीला घ्यायची. मी ठणठणीत आहे, मला कोणाच्या आधाराची गरज नाही, थोड्या घुश्यातच आजोबा गरजले. गाडीत चढताना अनुभव घेतला होताच मी त्यांच्या फिटनेसचा. आजोबांनी बॅगेतून एक फाईल काढली. त्यात उपचारांची अनेक कागदपत्रे होती त्याच बरोबर अनेक राजकीय व्यक्तिंची शिफरसपत्रे होती. मुलाच्या ओळखीमुळे अल्पभुधारक असल्याचा दाखला होता. ज्यामुळे त्यांचे ऑपरेशनपासून औषधौपचार मोफत मिळाले होते. हे सर्व एक माजी शिक्षक मोठ्या अभिमानाने मला सांगत होते. कॅन्सरचा रुग्ण असल्यामुळे रुग्णाबरोबर एका व्यक्तीला मुळ गावापासून टाटा हॉस्पिटल पर्यंत एस.टी. प्रवास मोफत असल्याचे एक सवलतपत्र माझ्यापुढे धरले. माझ्यामुळे तुझे तिकिटाचे पैसे वाचतील त्यातील थोडे म्हणजे ४० रुपये तू मला दे. टॅक्सिवाला फुकटात थोडाच नेणार आहे मला? आजोबा म्हणाले. आता मला माझ्या मोफत प्रवासाचे गुपित उलगडले.मी एकटा आहे हे आजोबांनी (धूर्त) हेरले होते. मी सहज नकार देवू शकणार नाही सोपी शिकार आहे असेही वाटू शकले असेल. मी ह्या आमीषाला बळी पडलो तर एक प्रकारे मी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले असे होइल. घरातून झालेल्या संस्काराचा अवमान केल्यासरखे होइल. कंडक्टर जवळ आला मी एक ठाण्याचे तिकिट काढले. ठाण्याचा का तू? म्हणुनच असा वेडेपणा केलास तू. आजोबांनी संतापाने मला टोमणा मारला. मी उठलो व बाजूच्या प्रवाशाला बसायला जागा दिली. त्या जागेवर बसण्याचा मला काहीही नैतिक अधिकार नव्हता.बाजूच्या प्रवाशांच्या नजरेतून ते मला जाणवत होते. थोड्याच वेळेपूर्वी ज्या वक्तीबद्दल मला आदर व सहनुभूती होती ती आता पुर्णपणे नष्ट पावली होती. कदाचीत मोफत उपचारांमुळे आजोबांना आजाराचे गांभिर्य समजले नसेल नाहीतर एक शिक्षक असूनही ते जर कॅन्सरसारख्या आजारातही लोभीपणा सोडू शकत नसतील व उलट भ्रष्टाचाराला जन्म देत असतील तर भावी पिढीला ते नक्किच चुकीचा संदेश देत आहेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13721
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

In reply to by मार्मिक गोडसे

तुम्हाला मुद्दाच समजून घ्यायचा नसेल तर राहीलं राव. उगा आकांडतांडव करून काय उपयोग?

In reply to by मार्मिक गोडसे

Anti Corruption Bureau ला तक्रार>> भाऊ तुम्हाला ह्याचा काही अनुभव? तक्रार करून पुढे तुम्ही त्या ठिकाणी लागल्यावर तुम्हाला डावलले आणि बसवले मास्तर म्हणून तर? असो. आपला अनुभव सांगा.

In reply to by मार्मिक गोडसे

Anti Corruption Bureau ला तक्रार करता येत नसेल तर काय उपयोग त्या सुवर्णपदकाचा व उच्च शिक्षणाचा.
बळंच =))

तुम्हाला मुद्दाच समजून घ्यायचा नसेल तर राहीलं राव. उगा आकांडतांडव करून काय उपयोग? ८. ठार स्वार्थी समाजात शिक्षक, डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी, सरकारी नोकर ह्यांनीच प्रामाणिकतेचे पुतळे असावे अशी अवास्तव अपेक्षा कशासाठी? मग आपण कोणाकडून प्रामाणिकतेची अपेक्षा करायची ? का करूच नये ? असा मी काढलेला अर्थ आहे. चुकत असल्यास समजाउन द्यावे. तुमच्या प्राध्यापक मित्राला एवीतेवी (पैशाच्या मागणीमुळे) ती नोकरी मिळणारच नव्हती तर काय हरकत होती Anti Corruption Bureau ला तक्रार करायला. आपल्यावर अन्याय होत असेल, सरकारी कामे वेळेवर होत नसतील तर माहीतीच्या अधिकारासारखी कायदेशीर आयुधे असताना त्याचा वापर केला तर अनेक बेकायदेशीर घटना कमी होण्यास मदत होइल. आता जे आदर्शवादाची शिकवण देतात त्यांच्यात खरेच काही आदर्श असते तर सगळे जग आदर्श दिसले असते. जर प्रत्येकाला आपले आई-वडील-शिक्षक आदर्श आहेत असे वाटते तर ते इतरांनाही अनुभवास यायला हवे मूळ लेखात मी असे का वागलो ह्याचे श्रेय घरातून झालेल्या संस्कारांना दिले आहे. तुम्हाला मान्य असो व नसो परंतू जेव्हा अनावधानाने किंवा नेणीवेतून माझ्याकडून चुकीची कृती होत असेल तर त्यातून सावरण्यामध्ये घरातील संस्कार, आदर्श ह्यांचा वाटा मोठा असतो त्यात सद्सद्विवेकबुद्धी ही आलीच. माझे पालक हे प्रत्यक्ष आयुष्यात आदर्श-प्रामाणिकच आहेत ह्याची मला खात्री आहे. तुमचे समाजाचे निरिक्षण खरे तर कमी पडले असे म्हणावे लागेल. असे तुम्हाला वाटत असेल तर ते तुम्ही माझ्या भल्याकरताच सांगत असाल. परंतु तुमच्या माहितीकरीत सांगतो, मी ग्रॅजुएट झाल्यावर माझ्याकडे जितके व्यावहारीक ज्ञान होते त्याच्या कैकपट अधिक व्यावहारीक ज्ञान रेल्वे स्टेशनवरील माझ्यापेक्षा वयाने लहान अशा बुटपॉलिवाल्या मुलाकडे होते, हे सर्व निरिक्षण असल्यामुळेच मला समजले असावे. असो, मला समाजातील अनैतीक व्यवहारांचे चिलखत घेउन खोटे आयुष्य जगण्यापेक्षा नैतिकतेने भोंगळे परंतू स्वाभिमानाने व ताठ मानेने जगण्यात अधिक समाधान वाटेल. नैतिकता पतिव्रतेसारखी असते व अनैतिकता छीनालीसारखी असते. उगाच नाही म्हणत 'सतीच्या दारी बत्ती अन छीनालीच्या दारी हत्ती'. दोघींपैकी कोण आयुष्यात अधीक समाधानी असते? तक्रार करून पुढे तुम्ही त्या ठिकाणी लागल्यावर तुम्हाला डावलले आणि बसवले मास्तर म्हणून तर? प्राध्यापकाच्या नोकरीसाठी ७-८ लाख मागितल्याचे उदाहरण हे ऐकिव आहे. सुवर्णपदकाचा व प्रत्यक्ष मुलाखतीचा काहीही संबंध नाही. दुसरे उदाहरण लेखातिल आजोबांचे हायपोथेटिकल प्रकारचे आहे. अहो आपले अपयश झाकण्यासाठी व अशांचे समर्थन करण्यासाथी रचलेल्या ह्या क्लुप्त्या आहेत. अशी लोकं डोक्यात जातात अगदी. अनेक अशिक्षीत शेतकर्‍यांनी तलाठ्यांना लाच घेताना पकडून दिलेले आहे त्यांनाही आयुष्याभर तलाठ्याशी संबंध येत असतो, त्यांनाही भीती असतेच म्हणुन ते हतबल होत नाही. त्यामुळे अशा सुशिक्षित भेकड लोकापेक्षा अशिक्षीत शेतकर्‍यांचा मला अभिमान आहे.

बंधो, तुम्हास मुद्दा खरंच कळलेला नाहीयेहो. प्रत्येक विधानात तुमचे तुम्हीच व्यक्तिगत घुसणार तर कसं चालेल? तुम्ही परत एकदा माझा मूळ प्रतिसाद शांतपणे वाचा. तिथे कुठेही वैयक्तिक टिप्पणी केली आहे का ते सांगा. तुमच्या आई-वडीलांच्या आदर्श-प्रामाणिकतेबद्दल कुणी शंका घेतली ज्यामुळे तुम्हाला खात्री द्यावी लागते? असो. ती खात्री देऊन तुम्ही हे तरी सिद्ध केले की इतरांचे आई-वडील प्रामाणिक-आदर्श असतीलच अशी खात्री नाही. माझाही मुद्दा तोच आहे हो. मला एक तरी माणूस दाखवा जो म्हणेल माझ्या आई-वडीलांकडून मी खोटेपणा-बेईमानी शिकलोय म्हणून. मग समाजात इतका सगळा भ्रष्टाचार बोकाळला आहे तो कुणाच्या आई-वडीलांच्या संस्कारांमुळे? तुम्ही तुमच्या घराचे आदर्श-संस्कार वैगेरे सांगताय. असे कुठले घर आहे की जे आदर्श-संस्कार करत नाही? दाऊद इब्राहिमनेही आपल्या मुलाला 'बेटा, हमेशा सच बोला करो' अशीच शिकवण दिली असेल. असो. नोकरीसाठी लाच मागणारे-देणारे एकाच माळेचे मणी असतात. जिथे माझ्या मित्राला लाच मागितली ते खाजगी कॉलेज होते. 'तिथेही' एसीबी चालते हे माहित नव्हतं. माहितीच्या अधिकारात सगळ्या खाजगी संस्थांमधले भ्रष्टाचारांविरुद्ध माहिती मिळते हे ही नवीनच समजले. की फक्त सरकारी यंत्रणेशी संबधीत लोकांनी भ्रष्टाचार करू नये अशी आपली अपेक्षा आहे? बरं एसीबीचेच काही लोक भ्रष्टाचार करतांना पकडल्या गेलेत त्यांचं काय? तुम्ही इतके वैयक्तिक घेतलेच आहे तर तुमचेही भ्रष्टाचार-विरोधी लढ्याचे अनुभव सांगा. कारण भ्रष्टाचाराशी अजिबात संबंध आलेला नसेल तर ती व्यक्ती या ग्रहावरची तरी नाही किंवा चार भिंतीबाहेर पडून कधी व्यवहार करायची गरज पडणार नाही इतकी संरक्षित असेल. कृपया वाईट वाटून घेऊ नका पण मला तरी तुमचे सगळे विचार बाळबोध आणि शाळकरी वाटतात. तुम्ही लोकलच्या गर्दीतही शिस्तीने रांगेत चढत असाल. सत्य स्विकारणे हे तुम्हाला जमत नाही आहे असे दिसत आहे. यात तुम्हीही भ्रष्टाचारी, अप्रामाणिक व्हा असं कुणीच म्हणत नाही आहे. पण अभ्यास, चिंतन वाढवा. ग्रॅजुएट होईपर्यंतच काय कित्येकांना रिटायर होईपर्यंत चपला शिवणार्‍या पोराइतकं व्यवहार-चातुर्य येत नाही असं निरिक्षण आहे. मानवी व्यवहारांचं जग अगम्य आहे. त्याला आदर्शाच्या कॅलिडोस्कोपमधून पाहण्याचा प्रयत्न करणे चूक आहे. भ्रमनिरासच होईल. परिस्थितीत बदल घडवून आणण्याच्या इच्छेचा, प्रयत्नांचा मला नेहमीच आदर आहे. पण त्यासाठी आधी परिस्थिती समजून घ्यावी लागते. समजून न घेता फक्त तोंडाची वाफ दवडत 'हे बरोबर नाही', 'असे कुठे असते का' ह्याला उंटावरून शेळ्या हाकलणे म्हणतात. तुम्ही भ्रष्टाचाराचे पीडीत लोकांना ज्या प्रकारे सल्ले देताय त्यावरून तर तुम्ही अजून तंबूतच आहात असे वाटत आहे. अधिक काही बोलण्याची गरज भासत नाही. इथेच थांबतो. धन्यवाद. जाता जाता एक सल्ला: एकूणच भारतात इतका भ्रष्टाचार का आहे याचा जरा मध्ययुगीन काळापासून अभ्यास कराच. आम्हालाही सांगा काही कळलं तर. (सगळ्या जगात भ्रष्टाचार आहे. पण असं बोलत नसतात)

प्रत्येक विधानात तुमचे तुम्हीच व्यक्तिगत घुसणार तर कसं चालेल? तुमचे समाजाचे निरिक्षण खरे तर कमी पडले असे म्हणावे लागेल. ह्या तुमच्या विधानामुळे मला तसे स्पष्टीकरण करावे लागले. तुम्ही म्हणता तसे मी कोषात नक्किच नाही. तुमच्या सर्व प्रतिसादात मी विचारलेल्या प्रश्नांना मला समजेल अशा भाषेत उत्तर दिले नाही किंवा गोल गोल फिरवत बगल दिली. उगाचच विषय दुसरिकडे फिरवत राहीले. मी लेखात माझ्या पालकांशिवाय इतरांच्या पालकांच्या आदर्शांवर भाष्य केलेले नाही. तरी तुम्ही बळेच कोणाचे पालक मुलांना चोरी करायला किंवा वाईट गोष्टी करायला शिकवतात असे मला विचारता. वजनात काटा मारायला वाण्याच्या मुलापासून ते रद्दीवाल्याच्या मुलापर्यंत सगळे त्यांच्या बापापासूनच शिकतात. भंगारवाल्यापासून ते कचरा वेचणार्‍या बायकांची मुले सोसायटितील वस्तू त्यांच्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली कसे चोरतात हे तुम्ही कदाचीत पाहिलेले नसेल. उदाहरणांची भलीमोठी यादी तयार होईल. विद्यापिठात सुवर्ण मिळवणार्‍या माझ्या मित्राला प्राध्यापकाच्या नोकरीसाठी ७-८ लाख मागितले होते. हा तुमचाच प्रतिसाद जिथे माझ्या मित्राला लाच मागितली ते खाजगी कॉलेज होते. 'तिथेही' एसीबी चालते हे माहित नव्हतं. पहिल्या प्रतिसादात खाजगी कॉलेज होते असा स्पष्ट उल्लेख केला असता तर असा प्रश्न पडला नसता. माहितीच्या अधिकारात सगळ्या खाजगी संस्थांमधले भ्रष्टाचारांविरुद्ध माहिती मिळते हे ही नवीनच समजले. असे मी कुठे म्हणले आहे ? आपल्यावर अन्याय होत असेल, सरकारी कामे वेळेवर होत नसतील तर माहीतीच्या अधिकारासारखी कायदेशीर आयुधे असताना त्याचा वापर केला तर अनेक बेकायदेशीर घटना कमी होण्यास मदत होइल असा माझा प्रतिसाद होता. निट वाचत जा. बरं एसीबीचेच काही लोक भ्रष्टाचार करतांना पकडल्या गेलेत त्यांचं काय? कसं बोललात ? जसा बागुलबुवा नसतो तसेच हे कुणीही पूर्ण आदर्श नसतात. आता का तुम्ही त्यांच्याकडून प्रामाणिकतेची अपेक्षा करता? तुम्ही लोकलच्या गर्दीतही शिस्तीने रांगेत चढत असाल. असे मी कुठे म्हणले आहे ? तुमचा गैरसमज होतोय समजण्यात. खरे तर आपण वयस्करांना गाडीत चढण्यास प्राधान्य दिले पाहीजे असे मी वेगळ्या संदर्भात म्हणले होते. तुम्ही इतके वैयक्तिक घेतलेच आहे तर तुमचेही भ्रष्टाचार-विरोधी लढ्याचे अनुभव सांगा. नक्किच सांगीन. तुम्ही असे किती स्वतःचे अनुभव ह्या धाग्यावर सांगितले. जे काही सांगितले ते ऐकीवच होते. व माझे भ्रष्टाचार-विरोधी लढ्याचे अनुभव जाणुन घेण्यामागील तुमचा हेतू स्पष्ट करा. जाता जाता माझ्या शेवटच्या प्रश्नाचे उतार द्या. तुम्ही कधी कोणाकडूनही आयुष्यात प्रामाणिक सल्ल्याची मागणी केली आहे का? मागितला असल्यास त्याच्याकडून प्रामाणिक सल्ला मिळेल असे आपल्याला का वाटले ? त्यासाठी तुम्ही काय क्रायटेरिआ वापरता?