Skip to main content

मी उपवर तरुण असतो तर

लेखक श्रीरंग_जोशी यांनी रविवार, 22/03/2015 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
ब्राह्मण समाजातील उपवर मुलींची कमतरता आणी त्यावर उपाय हा धागा पाहिला अन विषयाची मांडणी पाहून हसूच आले. यावर आता एकाहून एक प्रतिक्रिया येणार असा विचार करत असतानाच वाटले की मांडणी कशीही असो सध्याच्या एका ज्वलंत विषयाला हात घातला आहे. जात, धर्म, समाज अन नोकरी वा व्यवसाय कुठलाही असो अनेक उपवर पुरुषांना स्वतःचे लग्न जुळवणे आव्हानात्मक होऊ लागले आहे. प्रश्न कितीही अवघड असला तरी उपाय शोधण्याचे प्रामाणिक प्रयत्न करायला हवेतच. कुठलीही समस्येवर उपाय शोधण्याची एक पद्धत म्हणजे स्वतःला त्या समस्येच्या केंद्रस्थानी ठेवून बघणे. जसे आपल्याला शाळेत असताना निबंधाचे विषय असत, 'मी मुख्यमंत्री झालो तर' त्याचप्रमाणे 'मी उपवर तरुण असतो तर' मी काय केले असते या दिशेने विचार करू लागलो. तर सर्वप्रथम समस्येला शब्दबद्ध करूया. मी व्यवस्थित शिकून अन बऱ्यापैकी ठीकठाक नोकरी मिळवूनही लग्नाच्या बाजारामध्ये दुर्लक्षित आहे. कारणे बरीच असू शकतात जशी
  • माझ्या सध्याच्या उत्पन्नापेक्षा अनेक उमेदवारांचे उत्पन्न अधिक असणे.
  • माझे बाह्यरूप सामान्य असल्याने माझे पटकन नजरेत न भरणे.
याखेरीज इतर अनेक कारणे जी तार्किकदृष्ट्या स्वतःला पटत नसली तरी त्यांच्याबद्दल बाऊ करून माझी समस्या कदापिही सुटणार नाही (उदा. लग्न जुळवताना पत्रिका बघणे, रोटीबेटी व्यवहारांमधला अतिरेक इत्यादी). तर ज्या गोष्टी माझ्या हातात नाहीत त्या सोडून मी असे काय करू शकतो ज्याने मी या स्पर्धेत पुढे जाऊ शकेल? मी स्वतःमध्ये बदल करताना नेमके कोणते बदल करणे फायदेशीर ठरेल हा प्रश्न मनात आला. चांगली नोकरी, आर्थिक स्थैर्य यापलीकडे जाऊन उपवर तरुणींना काय आवडू शकेल हा प्रश्न महत्त्वाचा वाटला. गेल्या एकदोन दशकातली विवाहित जोडप्यांची उदाहरणे डोळ्यासमोर आणताच काही गोष्टी स्पष्टपणे जाणवू लागल्या. नवरा बायको दोघेही पूर्णवेळ नोकरी करतात अन चांगले पैसे कमावतात. पण घरातली कामे करताना बायकोवर पडणारा ताण कितीतरी अधिक असतो. घराची साफसफाई, स्वयंपाक अन मुलं सांभाळणे यात बहुतांश नवऱ्यांचा सहभाग त्यांच्या बायकांना खूपच कमी वाटतो. या बाबतीत जर मी काही आश्वासक गुण दाखवू शकत असेल तर कदाचित लग्नाच्या बाजारामधली माझी किंमत वाढू शकते. तर सर्वप्रथम कधी कधी उपाशी राहावे लागू नये म्हणून थोडाबहुत स्वयंपाक करणे यापासून आठवड्यातले पाच ते सहा दिवस संध्याकाळी तरी नियमितपणे स्वयंपाकाची सवय करणे. नेहमीच्या साध्या घरगुती पदार्थ बनवण्याचा व्यवस्थित सराव झाल्यानंतर बनवायला जरा अवघड पण बहुतांश खवय्यांना आकर्षण वाटेल. असे पदार्थ जमेल तेव्हा बनवून पाहणे. यूट्यूबवरील या विषयावरचे व्हिडिओजतर खूपच मार्गदर्शक ठरू शकतात. स्वतःचे घर टापटीप ठेवणे व जुजबी का होईना सजावट करणे (येथे मी नोकरीनिमित्त आईवडीलापासून लांब दुसऱ्या शहरात भाड्याचे घर घेऊन राहतोय हे अध्याहृत आहे). याबाबतीत स्वतःला शिस्त लावून घेणे सर्वाधिक महत्त्वाचे. स्वच्छतेच्या कामाचे दडपण येईल इतकी वेळ येऊ न देणे हे केव्हाही इष्ट. मुले सांभाळण्याची सवय - या गोष्टीचा सराव मिळणे तसे सोपे नाही पण शक्य झाल्यास जवळच्या नातेवाइकांच्या बाळांचे अन लहान मुलांचे बेबीसिटींग करणे. या गोष्टीची संधी नेहमी मिळणार नाही पण जेव्हाही मिळेल गमवू नये. याखेरीज उपवर तरुणींच्या प्राथमिक अपेक्षांमध्ये नसतील पण अशी कौशल्ये विकसीत करणे ज्याने आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.
  • जसे स्वतःचे काटोकोर आर्थिक नियोजन.
  • घरातील खर्चांची संगणकीकृत नोंद ठेवणे अन ठराविक काळानंतर त्या आकडेवारीचे विश्लेषण करणे.
  • घरातील नेहमी न लागणाऱ्या वस्तू, कागदपत्रे या ठराविक ठिकाणीच ठेवून शक्य तेवढे त्यांचे वर्गीकरण करणे म्हणजे गरजेच्या वेळी एखादी वस्तू चटकन हाती लागेल.
हे सर्व करताना नोकरीतील कामावर दुर्लक्ष होऊ न देणे हे फार महत्त्वाचे. अन या गोष्टी आपल्याला आयुष्यभरच करायच्या आहेत अशी मानसिकता बनवणे. कारण केवळ दिखाव्यापुरते केल्यास विवाह तर जुळेल पण संसार सुरळीत चालण्याची शक्यता फारच कमी. कसंही करून लग्नाच्या बंधनात अडकण्याचा काळ कधीच गेला. लग्नानंतर पटले नाही म्हणून काडीमोड घेण्याकडे आजकाल पूर्वीसारखे नकारात्मकतेने पाहिले जात नाही. त्यामुळे स्वतःतले हे बदल केवळ लग्नाच्या बाजारात स्पर्धकांच्या पुढे जाण्यापेक्षा यशस्वी संसार करण्याच्या उद्देशाने केल्यास कायमस्वरूपी लाभ होईल. कारण संसार अयशस्वी होण्यासाठी कितीतरी घटक महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात ज्यामध्ये आपण फारसे काही करू शकत नाही. अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्यामध्ये व जोडीदारामध्ये पुरेपूर सामंजस्य निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी आपला जोडीदार इतर सर्वसाधारण नवऱ्यांपेक्षा अधिक गंभीर आहे ही भावना निर्माण करता येणे गरजेचे आहे. माझ्या सुदैवाने या सगळ्या अग्निदिव्यातून मला जावे लागले नसले तरी एक आश्वासक जोडीदार म्हणून स्वतःमध्ये कायमस्वरूपी सुधारणा करत राहणे हे माझे परम कर्तव्य आहेच. तर मंडळी तुम्ही स्वतःला या आव्हानाच्या केंद्रस्थानी ठेवून बघा अन सांगा काय उपाय सुचतात ते. या निमित्ताने या आव्हानाला सामोरे जाणाऱ्या सर्व उपवर तरुण तरुणींना मनपूर्वक शुभेच्छा!!

वाचने 27809
प्रतिक्रिया 89

प्रतिक्रिया

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ड्यूआयडी नाही. व्हर्जिनल आहे. आपल्या गुप्त हालचाली बायकोपासून लपूनच कराव्यात. नाहीतर आपण नाक्यावर उभे असताना बाजूला येउन म्हणायची ''च्यायला सत्या, आजकाल शिवाजी बिडीमध्ये दम नाही राहिला''. *lol*

In reply to by सतीश कुडतरकर

भारी टोला हाणलाय. खी खी खी. आमच्या बघण्यात एक आहेत त्यांनी मुलीला सासरी पाठवताना नवर्‍यामुलाला "आता तुझं काही खरं नाही" असं म्हटलं होतं. मुलगी, तिची आई, आजी असे सगळेजण रडे विसरून हसत बसले होते.

हाफ शेंच्युरी निमीत्त रंगाशेठ आणी श्री.प्रथम म्हात्रे यांचा सत्कार एक एक वर देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते

In reply to by जेपी

'स्वयं'वरातला की ते ब्रम्हा, विष्णू इ. लोक्स गाफिलपणे (बव्लत कुठले) नको तेव्हा नको त्या असुरांना देतात तो ? रच्याकने, तुमचं वरांचं होल्सेल दुकान आहे काय ?

In reply to by जेपी

ओ जेपी जागे व्हा ! त्येन्ला 'वर' कश्याला द्येता ? आँ... जमलं तर 'वधू'चं काय ते बगा. का डप्पल शेंच्युरीची सुप्पारी घ्येत्ल्येय ;)

In reply to by सस्नेह

लेखशिर्षक : मी उपवर तरुण असतो तर... हा सगळा उपवर तरूणांच्या जर, तर वरचा लेख आहे... तेव्हा त्यांना 'वर' देणे गैरकायदेशीर नसले (आणि माझी त्याला हरकतही असू शकत नसली) तरी ते समस्यापूर्ण असू शकते... इतकेच म्हणायचे होते :) ;)

उपवर हा शब्द येथे विशेषण म्हणून वापरला आहे. त्याचा सरळ साधा अर्थ म्हणजे विवाहास योग्य. उपवर हे विशेषण केवळ मुलींसाठीच लागू होते असे अजिबात नाही. त्याखेरीज उपवर तरुण असे स्पष्ट लिहिलेले असल्याने त्याच्या वापरावरून उपस्थित केलेले प्रश्न गैरलागू आहेत. शब्दकोशाचा दुवा. नगरीनिरंजन यांनी मांडलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. नव्या संसारात घरात सासू सासरे असणे हे बहुतांश विवाहितांना नकोसे वाटते. त्यामुळे वेगळे घर असणे हे खूपच गरजेचे होऊन जाते. त्यांचाच दुसरा मुद्दा म्हणजे भाड्याचे घर असणे. आपल्या देशात खाजगी क्षेत्रांत नोकरी करणाऱ्यांना सुरुवातीची काही वर्षे पगार खूपच कमी असतो. त्यामुळे मोठ्या शहरांमध्ये स्वकमाईवर घर घेऊ शकणे परदेशात जाऊन पैसा कमावल्याखेरीज पहिल्या पाच सहा वर्षांत जवळजवळ अशक्य आहे. कुठल्याही गोष्टीचे सोंग आणता येते पण पैशाचे नाही. त्यामुळे संपत्ती निर्माण करण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहण्याखेरीज पर्याय नाही. स्नेहांकिता व कहर यांनी स्वतःमधले बदल केव्हा करावे याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. खरं तर घरातली कामे करण्याची सवय लहानपणापासूनच हवी. परंतु आपल्याकडला शिक्षणातला ताण यातला फार मोठा अडसर आहे. त्यामुळे पहिल्या नोकरीत पहिले काही महिने स्थिर स्थावर झाल्यावर गंभीरपणे यावर प्रयत्न सुरू करायला हवेत. घरातल्या कामांची सवय नसणाऱ्यांना लग्नानंतर घरातल्या कामांचा ताण जाचक वाटू लागतो अन संसाराची सुरुवातच कटुतेने होण्याची शक्यता निर्माण होते. कहर यांनी विचारले आहे की या गोष्टींचा उपयोग लग्न जुळवण्यासाठी कसा करायचा. यावर मी मूळ लेखात भाष्य करणे टाळले कारण
  • ठरवून विवाह करण्याच्या प्रक्रियेचा मला शून्य अनुभव आहे.
  • अन माझ्या मते क्षमता निर्माण करणे अधिक महत्त्वाचे एकदा ती निर्माण झाल्यावर त्याबाबत प्रसिद्धी करण्याचे मार्ग शोधणे फारसे अवघड नसते. कष्टाने जे कौशल्य मिळवले असते त्याची लक्षणे वागण्याबोलण्यातून अन सकारात्मक देहबोलीतून आपोआपच दिसू लागतात.
बाकी या प्रक्रियेत जे मार्ग वापरले जातात जसे बायोडाटा, मॅट्रिमोनियल साइटसवरच्या प्रोफाइलमध्ये उल्लेख करणे वगैरे हा पर्याय आहेच. बाकी मला जे स्वतःला करायला जमलं असतं तेच मी सुचवलं आहे. हे प्रत्येकासाठी उपयोगी ठरेलच असे काही आवश्यक नाही. एकाही प्रतिसादात इतर कुणी स्वतः काय केले असते हे लिहिण्यास प्रवृत्त झाले नाही हे या लेखनाचे अपयश आहे.

लग्न आणि उपवर्/वधू यांच्या अपेक्षा यांमध्ये इतरेजनांचा नको इतका हस्तक्षेप आणि अवाजवी अटींचा समावेश असतोच. कुठलीही वधू वर जाहीरात-सूच्क केंद्र पहा आणि पडताळा करा.

In reply to by नाखु

इतर जनांच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मान्य आहेच पण या सर्व परिस्थितीत उपवर तरुणांना वेगळे काय करता येईल यावर चर्चा घडवून आणण्याचा उद्देश होता.

In reply to by श्रीरंग_जोशी

पण उपवर तरूण या सल्ल्यांनी आणि जसे जसे वय वाढत जाते तसे निश्चय मेरू रहात नाहीत (अपेक्षांकरीता) आणि स्वतःला ही बदलत नाहीत. आपल्या अवतीभवती उपवर्-होऊ घातलेले उपवर्-आणि थोडे जुने उपवर यांची संभाषण सुभाषीते : "मी स्पष्ट सांगणार आहे मुलीला आहे मी असा आहे पटंत असेल ठीक आहे नाहीतर काय भेंडी या मुलींसाठी आपण आपली दुनियादारी सोडायची का ?????" बरोबर तुझं आपण काय ओझाचे बैल आणी शाळेतली पोरं सम्जतात काय वळण लावायला ! (स्वतः शिस्तीत घरी सगळी कामे विनातक्रार करून कट्ट्यावर व्यक्ती स्वतंत्रेतेचे धडे देणारे सुमडी-सोपान )====== आप्ल्याला नाही जमणार असलं वेळ पाळायला !चार दोस्त भेटले झाला उशीर तर काय चूक झाली काय ? === तात्पर्य : आपल्या आयुष्यात येणारी मुलगी (प्रेमविवाह असो की जनरीत विवाह असो) जर तीचे घरदाराच्या चालीरिती आणि काही सवयींना मुरड घालून (बदलून) सहजीवनात येत असेल तर आपणही बदलावे, किमान गोष्टींकरीता बदलले पाहीजे आणि त्यात वावगे नाही असे मनापासून वाटणे हे उपवर तरुणांनांच्या गावीही नसते ना त्यांना त्यांचे जेष्ठ सांगतात.

In reply to by नाखु

सदर निरीक्षणे इथे लिहून तुम्ही एकदम वर्मावरच बोट ठेवले आहे. ज्या व्यक्तीबरोबर आपल्याला संपूर्ण आयुष्य घालवायचे आहे तिच्याबरोबरचे नाते रुजत असताना इतका निष्काळजीपणा किंवा गृहीत धरण्याची भावना ठेवून आपण आपलेही दीर्घकालिन नुकसान करून हे अशा तरुणांच्या गावीही नसते. उमेदीच्या काळात स्वतःला प्रयत्नपूर्वक बदलून आपण स्वतःच्याच फायद्यासाठी गुंतवणुक करण्याची संधी नकळत गमावली जात असते याची जाणीव असणे खूप महत्वाचे.

ब्राह्मण मुलांना wider acceptance पाहिजे असेल तर कर्मठ विचार सर्दी सोडून खाण्या आणि "पिंण्या " च्या सवई बदलायला पाहिजेत. कारण इकडे तुम्हाला wider चोइस मिळेल. पिणे चांगले समजणाऱ्या मुली ते पारंपारिक मुली ..