वनविहार -सिंहावलोकन क्यामेरा- मुलुंड ते कशेळे….
येणार येणार म्हणता म्हणता १५ फेब्रुवारी उजाडलाच …. दोनच गोष्टींसाठी ह्या दिवसाकडे डोळे लावून बसलो होतो…. एक म्हणजे म्याच आणि दुसरा मिपा महाकट्टा संमेलन ! दोन्हीपैकी एकच काहीतरी करता येण्यासारखे होते म्हणून मग कट्ट्याला पसंती दिली …. (म्याचचे समालोचन करणारे तिथेही असणार हे माहिती होतेच ) …. कट्ट्याचा धागा रोज पाहत असताना त्यावर येणारे प्रतिसाद वाचून कशेळेला मिपाकरांचा महामोर्चा वगैरे निघतो की काय अशीही शंका आली होती (परंतु ऐनवेळी मोर्चाचे रुपांतर भूमिगत चळवळीत झाले ! ). मी जाणार आहे असे जाहीर केल्यावर सौ. ने "मीसुद्धा येणार आहे… बघू तरी काय प्रकार असतो ते " असे म्हणत माझ्याकडे पहिले (तसेही ती मिपावर खार खाउन असते… मूवी उवाच- "मिपा तिची सवत आहे" ). कसे जायचे काय करायचे हे ठरवत असताना असे कळले की डॉ. खरे आणि सौ खरे त्यांच्या कारने जाणार आहेत. मग त्यांच्याबरोबरच जावे म्हणजे बरे पडेल असे ठरवले. विजुभौ येणार आहेत असेही कळले होते त्यामुळे जर उत्सुकता वाटली. टकाला विचारले होते तेव्हा आधी होकार आला आणि मग नकार आला. टकाचा शनिवारी रात्री फोन आला आणि त्याने मी येऊ शकत नाही असे जाहीर केले (अनहिता: ऐकताय ना…. ऐनवेळी दौर्यातून माघार का घेतली असावी टकाने- धाग्याचा विषय होऊ शकतो !)
रविवारी सकाळी ७ वाजता मुलुंड स्टेशनला भेटायचे ठरले होते पण ऐन वेळी पाण्याने सकाळी दगा दिला आणि डॉकना "उशीर होईल …चालेल न" असे जर बिचकतच विचारले. अखेर आम्ही सकाळी ८ वाजता मुलुंडला पोचलो तर डॉक गाडीत एकटेच ( मनातल्या मनात त्यांनी मला बरीच इंजेक्शन दिलेली असणार !) नंतर कळले की काही घरगुती समारंभामुळे त्यांच्या सौ येऊ शकणार नाहीत. विजुभौ सकाळी त्या वेळी नुकतेच जागृत झालेले असल्याने त्यांनीही येणे रहित केले असे डॉकनी सांगितले. गाडीत बसलो आणि गाडी सुसाट पुणे मुंबई एक्प्रेसवे कडे धावू लागली. रस्त्यात डॉक बरोबर अगणित गप्पा झाल्या. कट्ट्याला येण्याचा अर्ध्याहून अधिक आनंद तिथेच मिळाला. डॉक यांचे चौफेर अनुभव ऐकता ऐकता शेडुंग कधी आले ते कळलेच नाही. मग टोलवाटोलवीचा खेळ सुरु झाला. प्रत्येक नाक्याला आम्ही सार्वभौम राजे असल्यासारखे खिरापत वाटत निघालो. रस्त्यातल्या टपर्या बघून चहा आणि भजी यांची इच्छा अनावर होत असतानाही आम्ही पुढे सरकत होतो. नक्की कोण कोण येणार ह्याचे अंदाज बांधत असताना असाही विचार केला की जे असेल त्याचा आनंद घेणे अधिक महत्वाचे आहे.
मुख्य रस्ता सोडून आम्ही अंतर्गत रस्त्याने कोठीम्बेच्या दिशेने जात होतो. एकाला पत्ता विचारला तर तो चुकीचा रस्ता सांगेल म्हणून लगेच त्याच्या पुढे दुसर्यालाही विचारणे हा क्रम चालू ठेवला ( गावकरी लबाड हो लेकाचे ! ) रस्त्यात आमच्यासारखेच काहीजण पत्ता शोधत होते . त्यांना पाहून ते ही मिपाकर असावेत म्हणून आम्ही त्यांच्या जवळ जाउन विचारले पण मिपाचे नाव ऐकून आम्ही परग्रहावरून आल्यासारखे ते आमच्याकडे बघू लागले तसा तिथून काढता पाय घेतला. त्याक्षणी जाणवले कि मिपाच्या नावाचा टी शर्ट किंवा टोपी काढणे गरजेचे आहे (तश्या टोप्या खूप लोकांनी घातल्यात मिपाच्या नावाने !!). शेवटी १०.३० ला वनविहारच्या फाटकासमोर गाडी पोचली. परिसराचा एकूण थाट , गर्द झाडी , निरामय शांतता आणि त्यामुळे कानात येणारा सुन्नपणा ( हो… सतत कोलाहल आणि हॉर्न ऐकायची सवय असलेले कान आमचे !) ह्यांना अनुभवत आतमध्ये घुसलो. तिथे अगोदर १-२ गाड्या येउन ठेपल्या होत्या. आतमध्ये जाउन पहिले असता बरीच मंडळी एका ठिकाणी बसलेली आढळली. एका सिमेंटच्या कट्ट्यावर मिपा संमेलन म्हणून रांगोळी काढून झाडाची पाने उलटी ठेवून त्यावर स्थानिक झाडावरचा चिकू "विडा आणि फळ" म्हणून ठेवलेले दिसले तेव्हाच आजूबाजूला एखादी "अत्रुप्त जिल्बिशक्ती" वावरत आहे हे जाणवले आणि प्रत्यक्ष दर्शनही झाले . मूवी, चौराकाका ,कंजूस काका, ५० फक्त , अन्या दातार आणि समीर हेही भेटले. मुविंनी त्यांच्या सौ शी आमच्या सौ ची भेट घडवून आणली.
पुण्य नगरीतून आलेले लोक पाहून धन्य वाटले. गुर्जींची अंगावर विजयखुणा मिरवणारी गाडी पाहून डोळेच दिपले. अजून बरीच मंडळी येणार आहेत असे कळले. पोहोचेपर्यंत नाश्ता हा प्रकार संपुष्टात आला होता मग चहा घेतला (जोडीला लाडू चिवडा होताच ). हळू हळू एकएक जण येत होते. श्री व सौ किणकिणाट, अजयाताई , मीतान ताई व त्रिवेणी ताई सहकुटुंब आल्या होत्या. सुहास झेले पण पोहोचले. सगळे जमल्यावर एकमेकांची ओळख करून देण्यात आली. मग सगळी मंडळी जेवणाची ऑर्डर देऊन पांडव लेण्यांच्या दिशेने निघाली. गुरजींनी पहिला थांबा घेतला तोच मुळात मोक्षधामचा ! आजूबाजूचे अनेक अतृप्त आत्मे मिपाच्या माहिती भांडाराच्या पठणाने मुक्त करत आम्ही लेण्यात पोचलो. आतमध्ये गेल्यानंतर प्रत्येक जण इतस्तत: पांगला. आतमध्ये तसे विशेष काहीच नव्हते. दगडात खोदलेली गुफा सोडली तर सगळ्या मूर्ती नवीन आणून ठेवल्या आहेत हे कळल्यानंतर सगळेच जुने दिवस आठवून शाळेच्या पिकनिकला आल्यासारखे बागडत होते. दरम्यान अभिप्राय वही हातात पडली आणि मिपाकरांच्या सृजनशीलतेला उधाण आले. संपादकांपासून सगळे समरसून एक एक अभिप्राय वाचत होते. त्याचे जाहीर वाचन झाल्यावर त्यात आपली भर टाकली नाही तर इथून जात येणार नाही ह्या निरागस भावनेने सगळे मिपाकर पेन घेऊन तुटून पडले. पांडव लेण्यात यथेच्छ तांडव घालून झाल्यावर सगळे समूह छायाचित्रासाठी जमा झाले( छायाचित्रे कशी आली ते आपल्या चक्षूंसमोर आहेच ). त्यानंतर पाण्यात पाय सोडणे,गप्पागोष्टी वगैरे सगळे यथासांग झाले. कंजूस काकांनी भीमाशंकरला कसे जावे याची सुंदर माहिती दिली. गुरजींनी अत्तरे आणि इतरही बरीच उपयुक्त माहिती दिली. येताना भीमकाय पायऱ्यांची चढाई करून आल्यामुळे पायाचा प्रत्येक स्नायू आपले शरीरातले अस्तित्व दाखवून देत होता. एक कान म्याचच्या माहितीवर ठेवून आमचे मार्गक्रमण चालू होते.
परत आल्यानंतर चुलीवरच्या जेवणाच्या घमघमाटाने जीव अस्वस्थ झाला.निरामिष आणि सामिष अश्या दोन्ही प्रकारचे आकंठ भोजन करून मंडळी तृप्त झाली. कंजूस काकांनी सुचवलेले हे ठिकाण आणि मुविंचे नियोजन याची मुक्त कंठाने स्तुती झाली. शिवाजीने आग्रह करकरून सगळ्यांना पोटभर जेवू घातले. जेवणे आटपल्यानंतर ताकाचा राउंड झाला. हिशोब ठीशोब करून जो अंतिम आकडा ऐकला त्यावर विश्वास ठेवणे महाकठीण होते. माणशी फक्त १७० रुपये !!… त्यातही सामिष भोजनवाल्या मंडळींची चांदी झाली होती. त्यानंतर सगळेच जण भारताची उंचावलेली खेळी ऐकून म्याच आपल्या पदरात पडेल ह्या आशेने मार्गस्थ होण्याची तयारी करू लागले. मात्र झालेला कट्टा पुढच्या वेळी अजून सविस्तर आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर व्हावा ही सगळ्यांचीच इच्छा होती त्यानुसार नवीन कट्टा लवकरच जाहिर करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली आहे.
निघताना आम्ही दोघे तसेच श्री व सौ मूवी डॉक यांच्या गाडीतून परतीच्या प्रवासाला लागलो. डॉक यांचे वाहनावरील अफाट प्रभुत्व पाहून आम्ही सगळे फारच प्रभावित झालो. येतानाही आमचा छोटा उपकट्टा झाला आणि अगणित गप्पाही झाल्या. त्यांनी हा हा म्हणता कधी मुलुंडला आणले ते कळलेच नाही. वाटेत भारताने म्याच मारली ही बातमी कळली आणि एकच जल्लोष झाला. झालेल्या कट्ट्याच्या रम्य आठवणी आणि पुढच्या कट्ट्याची स्वप्नं पाहत असतानाच मध्य रेल्वेने आम्हाला आमच्या जगात परत आणून सोडले आणि वास्तवात आणले !!
प्रतिक्रिया
मस्त आणि चटपटीत वर्णन.शेवटी
मिपाचा एक नवीन सभासद वाढणार आहे
पुढचा कट्टा ठाण्यात मामलेदार
आम्हाला चालेल....
ठाणे हे फार्फार तर मुंबैमधले
जागतिक मध्यवर्ती केंद्राचा
एकाला पत्ता विचारला तर तो
हल्ली गावात लाईट जाते ह्या
झकास
टका.... हे कारण नव्हे न येण्याचे....
(No subject)
बाकी पंखीला मजा आली हे वाचून
तुमचाही वृत्तांत आवडला. एकूण
मस्त लिहिलंय!
.
मस्त वृत्तांत !!
सुंदर
हा वृत्तांत पण आवडला.
मस्त!