Skip to main content

दिल्ली मतमोजणीपूर्व धागा

लेखक क्लिंटन यांनी शनिवार, 07/02/2015 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आजच दिल्ली विधानसभेसाठीचे मतदान पार पडले.मतमोजणी १० फेब्रुवारीला होईल.बहुतांश एक्झिट पोलच्या अंदाजांप्रमाणे आआपला जबरदस्त यश मिळायची शक्यता आहे.एक एक्झिट पोल भाजपला २७ ते ३५ तर आआपला ३१ ते ३९ अशा जागा देत आहे तर अन्य एक एक्झिट पोल भाजपला काठावरचे बहुमत देत आहे.अजून मतमोजणी झालेली नाही तेव्हा प्रत्यक्ष निकाल काहीही लागला तरी दोन्ही परिस्थितीत माझे निकालांनंतरचे मत कसे असेल हे लिहिणे हा या धाग्याचा उद्देश आहे.यापैकी आआप जिंकल्यास माझे मत काय असेल हे या लेखात आणि भाजप जिंकल्यास माझे मत काय असेल हे नंतर प्रतिसादात लिहेन. दोन्ही मला लेखातच लिहायचे होते पण विस्तारभयास्तव ते टाळतो. प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी शक्य झाल्यास रजा घेऊन निकालांसाठी नवा धागा चालू करेन. कोणत्याही परिस्थितीत अरविंद केजरीवालांनी ज्या हिंमतीने हा सामना लढविला आहे त्याबद्दल ते नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत.विशेषत: एप्रिल २०१४ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये आआपचा दिल्लीत मोठा पराभव झाला होता, नंतरच्या काळात अनेक महत्वाचे साथीदार सोडून गेले, योगेन्द्र यादव यांच्याबरोबरही मतभेद आहेत असे चित्र होते आणि मतदानाला १५ दिवस राहिलेले असताना शांती भूषण या आआपच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या महत्वाच्या नेत्याने केजरीवालांनाच बदला अशी मागणी केली या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार केला तर इतक्या प्रतिकूल परिस्थितीत लढणे ही सोपी गोष्ट नक्कीच नव्हती.तसेच दिल्लीसारख्या राज्यात कॉंग्रेस आणि भाजप अशी दुरंगी लढत काही दशके होत असताना तिसऱ्या पक्षाला चंचूप्रवेश करणेच मुळात कठिण होते.ते त्यांनी केलेच.आणि आता सर्व एक्झिट पोल्स कॉंग्रेसला ५ पेक्षाही कमी जागा देत आहेत (काही शून्य जागा सुध्दा देत आहेत) म्हणजे केजरीवालांनी कॉंग्रेसला दिल्लीतून जवळपास हद्दपार केले आणि परत दिल्लीचे राजकारण दुरंगी केले या दाखविलेल्या हिंमतीबद्दल केजरीवालांना माझ्यासारख्या आआपविरोधकाकडूनही १०० पैकी ११० मार्क. जर आआपला यश मिळाले तर १. आआप: हा विजय नक्कीच आआपसाठी मोठा मनोबल उंचाविणारा असेल.सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे केंद्रात नरेंद्र मोदींना सामोरे जायला लागणार आहे त्याच गोष्टीला (लोकांच्या आपणच वाढविलेल्या अपेक्षांना सामोरे जाणे) भविष्यात केजरीवालांनाही सामोरे जावे लागणार आहे हे लक्षात घेऊन त्या दृष्टीने कारभार करायला हवा. धरणे धरणे आणि राज्यकारभार या दोन गोष्टींमधला मूलभूत फरक समजून घ्यायला हवा. असे रस्त्यावरचे राजकारण करणे हे बेजबाबदारपणाचे आहे हे नक्कीच लक्षात घ्यायला हवे. तसेच दिल्ली हे अजूनही पूर्ण राज्य नाही आणि दिल्ली सरकारच्या अधिकारांवर मर्यादा आहेत त्या चौकटीतच राहून काम केले पाहिजे.इतर राज्यांप्रमाणे दिल्लीलाही अधिकार द्या ही मागणी रास्त आहे आणि त्यासाठी घटनात्मक मार्ग अवलंबल्यास कोणाचीही हरकत त्याला असेल असे वाटत नाही.पण मागच्या वेळी जो आक्रस्ताळेपणा त्यांनी दाखविला तो हद्दपार करावा ही अपेक्षा नक्कीच आहे.आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यावेळी स्वबळावर सरकार येणार आहे तर दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आले तर दोष इतर कोणावरही ढकलता येणार नाही ही परिस्थिती नाकारून चालणार नाही. तसेच दिल्ली म्हणजे सगळा देश नाही हे पण केजरीवालांनी (आणि त्यांच्या समर्थकांनी) लक्षात घ्यायला हवे. दिल्ली हे ९५% पेक्षा जास्त शहरी राज्य आहे.दिल्लीत ज्या मार्गांचा पक्ष वाढवायला उपयोग झाला तेच मार्ग सगळ्या देशात उपयोगी पडणार नाहीत हे लक्षात घेऊन त्या प्रमाणातच अपेक्षा ठेवाव्यात.मागच्या वेळी विधानसभेत यश मिळाल्यानंतर लोकसभेत १०० जागा जिंकणार अशा अपेक्षा, कोणी कोणी तर केजरीवालांना पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवायला निघाले होते.असल्या अपेक्षा ठेवायला योग्य वातावरण दिल्लीतील विजयामुळे निर्माण होईल असे वाटत नाही. सगळ्यात महत्वाचे म्हणजे केजरीवालांना पक्ष एकत्र ठेवता आला पाहिजे.शेवटी आम आदमी पक्ष म्हणजे ’चळवळ्या’ लोकांचा पक्ष आहे.त्यात विविध मतेमतांतरे असलेल्यांचा समावेश आहे.गेल्या वर्षभरात आपापसातल्या भांडणांचे जाहिर प्रदर्शन इतक्या वेळा आआपने केले होते तरीही त्याकडे दुर्लक्ष करून मतदार केजरीवालांना परत संधी द्यायला तयार झाले असतील तर त्या लोकभावनेवर स्वार होऊन पक्ष एकत्र ठेवणे आणि राज्यकारभार करणे ही कौशल्याची गोष्ट आहे.ती केजरीवालांना साधता यायला हवी. २. भाजप: पक्षासाठी हा पराभव नक्कीच धक्कादायक असेल.विशेषत: २०१४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर मोदींचा विजयरथ जो चौफेर उधळला होता त्याला अटकाव नक्कीच बसला असे चित्र या पराभवातून उभे राहिल.मतदान व्हायच्याही आधी ही निवडणुक म्हणजे मोदी सरकारवरील सार्वमत नाही अशी पूर्वी कॉंग्रेसचे नेते भाषा करायचे ती भाषा भाजपवाले करत होते ती नक्कीच धक्कादायक आहे.हा पराभव झाल्यास सर्वात पहिल्यांदा मोदी आणि अमित शहांनी त्या पराभवाची जबाबदारी जाहिरपणे स्विकारायला हवी.अन्यथा कॉंग्रेसमध्ये चालायचे तसे-- जिंकल्यास श्रेय गांधी घराण्याचे आणि पराभव झाल्यास दोष इतर कोणाचा अशी परिस्थिती भाजपमध्ये मोदी-शहांच्या नावाने उभी राहिल्यास ते योग्य नाही.असे करणे म्हणजे परिस्थितीपासून दूर पळून आत्मवंचना करणे हा त्याचा अर्थ होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे हा पराभव नक्की का झाला हे आत्मपरिक्षण करणे योग्य ठरेल.लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळी लोकांच्या अपेक्षा प्रचंड वाढवून ठेवलेल्या आहेत. त्या अपेक्षा एका रात्रीत पूर्ण होतील अशी कोणाचीच अपेक्षा नाही.पण निदान त्या दिशेने पावले पडत आहेत हे चित्र निदान वरकरणी नाही.धोरणे बनविण्याच्या दृष्टीने पावले पडत असतीलही कदाचित पण अजून ’अच्छे दिन’ अजून आलेले नाहीत तेव्हा लोक कुठे आहेत ’अच्छे दिन’ हा प्रश्न नक्कीच विचारणार आहेत.तेव्हा मतदारांना गृहित धरून चालायचे नाही. मोदींच्या सुदैवाने हा पराभव त्या मानाने कारिकिर्दीत बराच लवकर आलेला असेल.त्यामुळे कारभारात सुधारणा करून त्याची फळे दिसायला पुरेसा वेळ आहे.त्या संधीचा पूर्ण फायदा पक्षाने उठवायला हवा. दिल्लीत पराभव झाला असला तरी आभाळ कोसळलेले नाही.शेवटी दिल्ली म्हणजे लोकसभेत अवघ्या सात जागा असलेले छोटे राज्य आहे.पण या पराभवानंतर कोषात जाऊन यानंतरच्या काळात होणाऱ्या इतर निवडणुकांमध्ये (विशेषत: बिहारमध्ये) पराभव झाल्यास मात्र त्याचे परिणाम नक्कीच वाईट होतील.२०१६ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये (केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल,आसाम) भाजपला आसाम सोडून इतर राज्यांमध्ये फार चमकदार कामगिरी करता येणे कठिण आहे.तेव्हा बिहारनंतर थेट मार्च २०१७ मध्ये गोवा,पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड याच निवडणुका असतील.तेव्हा मधल्या काळात नरेंद्र मोदींची पकड ढिली होत आहे हे चित्र उभे राहणे भाजपला परवडणार नाही. त्या दृष्टीने बिहारमधील निवडणुकांचे महत्व लक्षात यावे. दुसरे म्हणजे दिल्ली भाजप हे एक दुभंगलेले घर गेली कित्येक वर्षे आहे ही परिस्थिती बदलायला हवी. सतत एकमेकांशी भांडणार्‍या स्थानिक नेत्यांना नारळ देऊन मीनाक्षी लेखींसारख्या नव्या नेत्याच्या नेतृत्वाखाली पक्षबांधणी केली तर ते चांगले ठरेल. दुभंगलेले सैन्य घेऊन आयत्या वेळी सेनापती बदलून युध्द जिंकता येत नाही हे भाजपने दिल्लीत १९९८ मध्ये अनुभवले तेच २०१५ मध्ये अनुभवले असे चित्र उभे राहिल.त्या दृष्टीने निदान पुढच्या निवडणुकांसाठी तरी भाजपने आतापासून लोकांसमोर एकजुटीने सामोरे जावे हे इष्ट. ३. कॉंग्रेस: हे निकाल मात्र कॉंग्रेस पक्षाची झोप उडवतील हे नक्कीच.दिल्लीमध्ये ७० पैकी ५ पेक्षा कमी जागा मिळणे म्हणजे पक्षाची मोठीच वाताहत झालेली असेल.पक्षाला राहुल गांधी नवी दिशा देऊ शकणार नाहीत हे परत एकदा सिध्द होईल.अजय माकनसारखा चेहरा पुढे करूनही आणि दिल्लीमध्ये १५ वर्षे काम करूनही इतका मोठा पराभव का पदरी पडला याचे आत्मपरिक्षण करणे नक्कीच गरजेचे असेल.१९७९ ते १९९७ या काळात विरोधी पक्षात असताना इंग्लंडमधील लेबर पक्षाने टोनी ब्लेअर हे नवेच नेतृत्व पुढे आणले आणि मग सलग तीन निवडणुका जिंकल्या होत्या त्याप्रमाणे कॉंग्रेसला नक्कीच स्वत:ला रिइन्व्हेंट करायला हवे.

वाचने 16233
प्रतिक्रिया 107

प्रतिक्रिया

मते आवडली.. आनखिन विस्तारीत पणे लिहिले असते तरी चालले असते. पण १० तारखे पर्यंत वाट पाहुन आनखिन छान पद्धतीने ठोस लिहिले तर जास्त आवडले असतेच.

In reply to by गणेशा

धन्यवाद. इतर प्रतिसादांना नंतर उत्तर देतो. मलाही १० तारखेनंतर धागा काढायला आवडले असते. पण त्या धाग्यात मुद्द्यांऐवजी 'मोदीभक्तांची' कशी जिरली यावर भर जास्त असता. म्हणून मतमोजणीपूर्व धागा काढत आहे कारण अवांतरापेक्षा मुद्द्यांवर चर्चा घडावी अशी इच्छा आहे. मग भले वीसच प्रतिसाद आले तरी चालतील.

In reply to by क्लिंटन

>>> मलाही १० तारखेनंतर धागा काढायला आवडले असते. पण त्या धाग्यात मुद्द्यांऐवजी 'मोदीभक्तांची' कशी जिरली यावर भर जास्त असता. याविषयी सहमत.

In reply to by क्लिंटन

मलाही १० तारखेनंतर धागा काढायला आवडले असते. पण त्या धाग्यात मुद्द्यांऐवजी 'मोदीभक्तांची' कशी जिरली यावर भर जास्त असता.
नाही .. कदाचीत असे नसते झाले. तसे व्हायचे असते तर येथे पण झाले असते. धागा कर्ता नक्की कोणात्या गोष्टी अधोरेखित करतो यावर पण रिप्लाय बरेच अवलंबुन असतात. जरी तुम्ही आप विरोधी असला तरी तुम्ही विश्लेषण योग्य केले आहे. त्यात वावगे काही नाही. झालेल्या चुका पुन्हा होता कामा नये हे नक्कीच झाले पाहिजे

In reply to by गणेशा

श्रीगुरुजी यांनी काढलेल्या धाग्यातच केजरीवाल हे कसे उंटाच्या एका विशिष्ट अवयवाचा मुका घ्यायला निघाले आहेत असा एक अतिशय हीन उल्लेख होता . राजकीय विरोध समजू शकतो पण वैयक्तिक अनुचित विधान अयोग्य होते . आपची बाजू घेणारया लोकांची बुद्धिमत्ता कशी कमी आहे असे म्हणून त्यांचा आप्टार्ड वैगेरे अनावश्यक उल्लेख केले गेले . Backlash तर होणार होताच तसा तो झालाच . या धाग्यावर समयोचित आणि चांगली चर्चा (वैयक्तिक अभिनिवेष न बाळगता ) झाली तर स्वागतच आहे . तिथे माझ्या वकुबानुसार सहभाग देण्याचा प्रयत्न करेल . कारण दिल्ली ची निवडणूक राष्ट्रीय राजकारणाला वेगळे वळण देऊ शकते . त्याची उचित चर्चा होणे अतिशय आवश्यक आहे .

In reply to by पिंपातला उंदीर

>>> श्रीगुरुजी यांनी काढलेल्या धाग्यातच केजरीवाल हे कसे उंटाच्या एका विशिष्ट अवयवाचा मुका घ्यायला निघाले आहेत असा एक अतिशय हीन उल्लेख होता . राजकीय विरोध समजू शकतो पण वैयक्तिक अनुचित विधान अयोग्य होते . अहो, हा नेहमी व सढळपणे जाणारा मराठी वाक्प्रचार आहे. त्यात हीन काहीही नाही. शरद पवारांनी सुद्धा एका जाहीर सभेत हा वाक्प्रचार वापरला होता. अनेक प्रतिष्ठित मराठी वृत्तपत्रातील लेखात या वाक्प्रचाराचा उल्लेख केलेला असतो. खालील काही उदाहरणे वाचा आणि या वाक्प्रचाराचा कसा नेहमी उपयोग केला जातो ते वाचा. (१) http://www.lokprabha.com/20110527/fulya.htm (२) http://www.sureshbhat.in/node/1780 (३) http://lokpatra.in/index.php/archives/211 (४) http://www.esakal.com/esakal/20140420/5412253461667452573.htm (५) http://www.misalpav.com/node/28493 (६) http://72.78.249.126/esakal/20130619/5445061294239123191.htm हा जर वाक्प्रचार खरोखरच हीन असेल तर संपादकांनी तो माझ्या लेखातून काढून टाकावा असेही मी त्या धाग्यातल्या एका प्रतिक्रियेत लिहिले होते. संपादकांनी तो अजूनही काढलेला नाही. कदाचित तो वाक्प्रचार हीन नसावा किंवा मिपावर हीन लेखनाला परवानगी असावी असे दिसते. संपादकांना त्यात काहीही हीन किंवा आक्षेपार्ह वाटलं नसेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? असो. मूळ धाग्याशी काहीही संबंध नसलेले प्रतिसाद लिहायची तुम्हाला सवय आहे त्यातलाच हा एक प्रतिसाद. >>> आपची बाजू घेणारया लोकांची बुद्धिमत्ता कशी कमी आहे असे म्हणून त्यांचा आप्टार्ड वैगेरे अनावश्यक उल्लेख केले गेले . Backlash तर होणार होताच तसा तो झालाच . पुन्हा एकदा अपप्रचार. स्वतःचा उल्लेख करताना "Proud to be an AAPtard !" हा उल्लेख मिपावरील एका आआपभक्तानेच कोण जिंकणार दिल्ली या धाग्यात केला होता. अनेक सामाजिक संकेतस्थळावर आआपभक्त अभिमानाने स्वतःचा उल्लेख आपटार्ड असा करतात. मी तोच उल्लेख केला तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? >>> या धाग्यावर समयोचित आणि चांगली चर्चा (वैयक्तिक अभिनिवेष न बाळगता ) झाली तर स्वागतच आहे . तिथे माझ्या वकुबानुसार सहभाग देण्याचा प्रयत्न करेल . कारण दिल्ली ची निवडणूक राष्ट्रीय राजकारणाला वेगळे वळण देऊ शकते . त्याची उचित चर्चा होणे अतिशय आवश्यक आहे . बरोबर आहे. पण त्यासाठी तुम्ही, नानांनी व काही इतरांनी धाग्याच्या मूळ विषयाशी संबंधित नसणारे आणि धागा भरकटविण्यासाठी काड्या टाकणारे वन-लाईनर प्रतिसाद टाकणे थांबविले पाहिजे. कोण जिंकणार दिल्ली या धाग्यात जेव्हा जेव्हा तुमचे मुद्दे खोडून काढले तेव्हा तेव्हा तुमच्याकडे नवीन मुद्दे नसल्याने तुम्ही, नाना आणि इतर काही जणांनी धाग्याच्या मूळ विषयाशी संबंधित नसलेले आणि विषय भरकटविण्यासाठी काड्या टाकणारे वन-लाईनर प्रतिसाद टाकले होते. धाग्याचा मूळ विषय भरकटू नये यासाठी मी तसल्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष केल्यानेच धागा मूळ विषयापासून भरकटला नव्हता. तुमच्यासारखे काही जण 'मोदीभक्तांची कशी जिरली' या थाटात प्रतिसाद टाकून मूळ धागा भरकटत नेतील यासाठीच हा धागा निकालाच्या २ दिवस आधी काढला असे या धाग्यात क्लिंटन यांनी लिहिले आहे. माझ्या धाग्यात मतदानोत्तर चाचणीचे निकाल येताच तसे प्रतिसाद सुरू झाले होते, हे लक्षात घेता क्लिंटन यांनी घेतलेली भूमिका बरोबरच आहे. असो. मी लिहिलंय त्यावर जरा अंतर्मुख होऊन विचार करा आणि मगच उत्तर द्या. या किंवा इतर कोणत्याची धाग्यावर मूळ विषयाशी संबंधित नसलेले आणि विषय भरकटविण्यासाठी काड्या टाकणारे वन-लाईनर प्रतिसाद टाकणे थांबवा. जरी तसे प्रतिसाद टाकले तरी फाट्यावर मारले जाईल हे लक्षात आले असेलच. सूज्ञांस अधिक सांगणे न लगे!

In reply to by श्रीगुरुजी

प्रतिसाद द्यायची लई इच्छा आहे पण हा धागा भरकटू नये म्हणून हा प्रतिसादच फाट्यावर मारत आहे .

In reply to by श्रीगुरुजी

दिल्लीच्या दुसर्या धाग्यावर कोण पळाल आणि तिथे फिरकत पण नाही हे तिथे गेल्यावर कळेलच . लेखनसीमा .

In reply to by पिंपातला उंदीर

निवडणुक झाल्यावर मतमोजणी ३ दिवसांनी होती. दरम्यानच्या काळात लिहिण्यासारखे काही नव्हतेच. उद्या मतमोजणी झाल्यावर परत धागा सुरू होईल. अर्थात धाग्याच्या विषयाशी संबंधित प्रतिसाद असेल तरच उत्तर दिले जाईल हा डोस आधी दिलेला आहेच.

In reply to by श्रीगुरुजी

श्री गुरुजी, जास्त वयक्तीक मनाला लावुन घेवु नये असे वाटते. तुम्ही तुमच्या मतांवर ठाम होता हे मान्य, परंतु तुमच्या म्हणण्याला वेळ मिळेल तसे योग्य उत्तरे दिलेली आहेत. परंतु तुम्ही काहीही झाले तरी भाजपच योग्य असेच म्हणुन राहता हे खरेच योग्य नाही. असो बाकी वयक्तीक द्वेष नसावा. आणि आपल्याल रिप्लायला डोस म्हणु नये असे वाटते. ते हाश्यास्पद वाटते. आणि ह्याने धागे रिप्लाय दुषित होतात. मान्य एकोळी रिप्लाय आणि भरकटवणारे एकोळॅए रिप्लाय योग्य नाही. परंतु आपले मत मोठे लिहिले म्हणजे तेच योग्य आणि तसेच हे सुद्धा आतातायी पणाचे वाटते. असो

चांगले विश्लेषण. भाजपने आआपला शह देण्यासाठी किरण बेदींना आणले खरे, पण फासे उलटले असं शेवटच्या चरणात तरी दिसले. आआप येणं ही तशी चांगली बातमी आहे. भाजपला आता असा धक्का बसण्याची गरज आहे. त्यामुळे ते थोडे जमिनीवर येतील आणि anarchy कडे वळणाऱ्या केजरीवालांवर जबाबदारी येऊन पडेल.

मस्त मुद्दे मांडलेत क्लिंटनभौ. मोदि वि. केजरीवाल अशी निवडणुक होऊन आप बहुमतात आल्यास दिल्लीकरांसारखे करंटे कोणि नाहि. प्रस्थापीत राजकारणाला समर्थ पर्याय म्हणुन आप निवडुन आलं तर दिल्लीकर अत्याभिनंदनास पात्र. भाजप समर्थीत आप किंवा आप समर्थीत भाजप सत्तेत आल्यास एक अत्यंत वेगळा प्रयोग पहायला मिळेल. शहा आणि कंपनीने निवडणुका जिंकण्याच्या नवीन टेक्नीक्स शोधणे आवश्यक आहे. हा धडा भाजपने शिकल्यास गुड फॉर देम. मागिल निवडणुकांशी तुलना करता यंदा केजरीसाहेब खुप परिपक्व वाटले. इतर कुणि नाहि तरी यांनी जर मोदिंच्या अतुलनीय कामचं महत्व ओळखलं तर बेस्ट फॉर इंडीया.

चांगला लेख... मला वाटते (काहीसे लेखात म्हणल्याप्रमाणेच) आप जिंकल्यास केजरीवाल आणि आपच्या चळवळ्यांना एक सुवर्णसंधी मतदारांनी दिली असेल. त्याचा फायदा घेतल्यास एक चांगला पक्ष तयार होईल. देशाला आणि देशातील राजकीय परीस्थितीला त्याची गरज आहे. पण तसे घडते का हे ब॑घण्यासाठी मात्र दिल्ली अजून दूरच आहे! तुर्तास परत रस्त्यावरील तीन पैशाचा तमाशा चालू होईल का ही भिती आहेच. त्या व्यतिरीक्त केजरीवालांवरील खटल्याचे काय झाले? बरोबर-चूक जे काही असेल पण जर निकाल विरोधात लागला तर काय होईल? भाजपा च्या संदर्भात, क्लिंटन यांच्या "मोदींच्या सुदैवाने हा पराभव त्या मानाने कारिकिर्दीत बराच लवकर आलेला असेल." पूर्णपणे सहमत. इंग्रजीत ज्याला blessing in disguise म्हणतात तसेच काहीसे पक्षाच्या बाबतीत आणि राज्यकर्ते आहेत म्हणून देशाच्या बाबतीत होईल. काँग्रेसच्या बाबतीत काय म्हणावे? शेवटी गांधीजींचे स्वप्न सत्य होणार असे दिसते. स्वातंत्र्यापूर्वी जी एक स्वातंत्र्यासाठीची चळवळ होती त्याच्या नावाचा पॉलीटीकल ब्रँडींगसाठी वापर केला गेला. अर्धशतक चालला... पण मला वाटते आता सोनीया आणि राहूल गांधी तसेच तमाम काँग्रेसजनांसाठी "अब तुम्हारे हवाले, वतन साथीयो" इतकेच म्हणणे बाकी राहीले आहे. :)

In reply to by विकास

काँग्रेसच्या बाबतीत काय म्हणावे? शेवटी गांधीजींचे स्वप्न सत्य होणार असे दिसते. स्वातंत्र्यापूर्वी जी एक स्वातंत्र्यासाठीची चळवळ होती त्याच्या नावाचा पॉलीटीकल ब्रँडींगसाठी वापर केला गेला. अर्धशतक चालला... पण मला वाटते आता सोनीया आणि राहूल गांधी तसेच तमाम काँग्रेसजनांसाठी "अब तुम्हारे हवाले, वतन साथीयो" इतकेच म्हणणे बाकी राहीले आहे.
सध्या काँग्रेसमध्ये स्वतःचा जनाधार असलेले फार नेते शिल्लक नाहीत.याचे कारण काँग्रेसची हायकमांड संस्कृती हे नक्कीच आहे.या प्रकारामुळे सामुहिक नेतृत्व आणि दुसरी फळी हे प्रकार काँग्रेस पक्षात कधी उदयास आलेच नाही.भाजपमध्ये पूर्वी असे केंद्रिकरण कधीच नव्हते. वाजपेयी-अडवाणींबरोबरच त्यांच्याइतक्याच ज्येष्ठतेचे मुरली मनोहर जोशी, भैरोसिंग शेखावत, कुशाभाऊ ठाकरे इत्यादी नेत्यांचे सामुहिक नेतृत्व होते.कुणी एक पक्षाध्यक्ष असला तरी तोच सगळे निर्णय घेत आहे आणि बाकी कोणाला काही महत्व नाही असे चित्र पक्षात नव्हते.तसेच वाजपेयी आणि अडवाणींनी जाणीवपूर्वक दुसरी फळी तयार केली होती.तशी दुसरी फळी काँग्रेसमध्ये कधी उभीच राहिली नाही.त्यात राजेश पायलट, माधवराव शिंदे अशा सारख्यांचा अकाली मृत्यू झाला.आज भाजपमध्ये चौहान, रमणसिंग, पर्रिकर असे राज्य पातळीवर जनाधार असलेले नेते आहेत तसे काँग्रेसकडे कोणीच नाही.असो. भिती एवढीच वाटते की काँग्रेसच्या पडझडीबरोबर विरोधी पक्षात जी पोकळी निर्माण होत आहे त्या जागेत आम आदमी पक्षासारखा पक्ष जायला नको. आणि दुसरे म्हणजे वाजपेयी आणि अडवाणींनी दुसरी फळी जाणीवपूर्वक उभी केली आणि सामुहिक नेतृत्व आणले तसे नरेंद्र मोदींनी केलीच पाहिजे.अन्यथा भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे भाजप असा काँग्रेसप्रमाणे एकखांबी तंबू उभा राहिला तर कधीतरी भाजपची सुध्दा सध्या काँग्रेसची आहे तशी अवस्था होईल.भाजपमध्ये काँग्रेसचे ते हायकमांड कल्चर आले आहे असे आताचे तरी चित्र आहे ते वाईट आहे.

In reply to by क्लिंटन

दुसर्‍या फळीबद्दल अतिशय योग्य विश्लेषण ! ज्या पक्षांमध्ये , कोणत्याही टीम वर्कमध्ये सक्षम दुसरी फळी असणे फार गरजेचे आहे . एकखांबी तंबू फार काळ टिकून राहू शकत नाही ! भाजपा मध्ये सुद्धा सध्या हीच भिती वाटत आहे ! सबकुछ मोदी ला सध्या यश लाभला आहे पण योजना राबवायला आणि लोकाभिमुख सरकारसाठी शिवराज चौहान , पर्रीकर , फडणवीस यां सारख्या नेत्यांना येत्या काळात राष्ट्रीय पातळीवर एक्सपोजर मिळणे गरजेचे आहे . पक्षार्तगत विरोधाला स्विकारला पहिजे . प्रत्येकाचा संजय जोशी करून चालणार नाही.. नाहीतर भाजपा काँग्रेसच्या वाटेने जायचा .

In reply to by क्लिंटन

आणि दुसरे म्हणजे वाजपेयी आणि अडवाणींनी दुसरी फळी जाणीवपूर्वक उभी केली आणि सामुहिक नेतृत्व आणले तसे नरेंद्र मोदींनी केलीच पाहिजे.अन्यथा भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे भाजप असा काँग्रेसप्रमाणे एकखांबी तंबू उभा राहिला तर कधीतरी भाजपची सुध्दा सध्या काँग्रेसची आहे तशी अवस्था होईल.भाजपमध्ये काँग्रेसचे ते हायकमांड कल्चर आले आहे असे आताचे तरी चित्र आहे ते वाईट आहे.
सगळ्याच प्रतिसादाशी सहमत असलो तरी.. हा मुद्दा अगदी चपखल. दुसर्‍याने आधी केलेल्या चुका पाहूनदेखील आपण त्याच चुका करायला लागावं, याला काय म्हणायचं ?

In reply to by हाडक्या

पहील्या फळीतल्या सो कॉल्ड नेत्यांना कमीत कमी एका मतदारसंघातुन नक्की निवडुन येण्याच्या गॅरेंटी हवी तर त्यांना पहील्या फळीतले म्हणता येइल. अडवानींना तर मोदींनी ठरवले असते तर ५० हजार मते पण मिळू दीली नसती गांधीनगर मधे. बाजपाई तर बोलुन चालुन कॉग्रेस चाच माणुस, भाजपला नुकसान करण्यासाठी सोडलेला.

In reply to by क्लिंटन

भाजपत ह्या पूर्वी पहील्या फळीचेच नेतृत्व कधी नव्हते तर दुसर्‍या फळीतले कुठुन असणार? भाजपचे उमेदवार जिंकायचे ते बिचार्‍या कार्यकर्त्यांच्या आणि स्वयंसेवकांच्या जोरावर. पहील्या फळीतले नेतृत्व म्हणजे ज्याच्या फक्त नावावर देशभरात काही टक्के तरी मते मिळतील. जे पूर्वी इंदीरा बाईंचे होते आणि आता मोदींचे

In reply to by प्रसाद१९७१

मान्य आहे. पण मला वाटते तुम्ही १९९१ च्या आधीच्या काळाबद्दल बोलत आहात. त्यानंतर अडवाणी - वाजपेयी ही द्वयी राष्ट्रीय नेतृत्वच होती.

In reply to by क्लिंटन

>>> भिती एवढीच वाटते की काँग्रेसच्या पडझडीबरोबर विरोधी पक्षात जी पोकळी निर्माण होत आहे त्या जागेत आम आदमी पक्षासारखा पक्ष जायला नको. भारतात एकूण ३ विचारधारा असलेले पक्ष आहेत. डाव्या विचारसरणीचे पक्ष, उजव्या विचारसरणीचे पक्ष आणि काँग्रेस विचारसरणीचे पक्ष. यातले काँग्रेस विचारसरणीचे पक्ष (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दलाचे अनेक तुकडे, अनेक प्रादेशिक पक्ष इ.) हे डाव्या विचारसरणीचा बुरखा पांघरलेले परंतु प्रत्यक्षात उजवी विचारसरणी असलेले पक्ष आहेत. हे पक्ष आणि डावे पक्ष यात अनेकवेळा साटंलोटं झालेलं आहे. परंतु उजवे पक्ष आणि डावे पक्ष हे कायमच एकमेकांच्या विरोधात असतात. उजवे पक्ष आणि काँग्रेस कधीच एकत्र येत नाहीत. परंतु काँग्रेस विचारसरणी असलेल्या उर्वरीत पक्षांनी वेळोवेळी डाव्या व उजव्या पक्षांशी युती केलेली आहे. २००९ पासून डावे पक्ष नामशेष व्हायला सुरूवात झाली. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत तब्बल ६२ खासदार निवडूण आणणार्‍या डाव्या पक्षांना २००९ मध्ये फक्त २४ तर २०१४ मध्ये फक्त १२ जागा मिळाल्या. सलग ३४ वर्षे सत्ता भोगलेल्या डाव्या पक्षांचा २०११ मधील प. बंगालमधील विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला. या डाव्या पक्षांच्या अस्तंगतामुळे निर्माण झालेली पोकळी दिल्लीत आआप भरून काढत आहे. काँग्रेसने सत्ता गमाविली असली तरी काँग्रेसचे स्थान अबाधित आहे. तिथे पोकळी अजून निर्माण झालेली नाही. त्यामुळे आआप काँग्रेसच्या जागी जाऊ शकत नाही. परंतु आआप डाव्या पक्षांना पर्याय म्हणून दिल्लीत पुढे आलेला आहे. अर्थात दिल्लीच्या बाहेर आआपला अजूनही शून्य स्थान आहे. तसं पाहिलं तर केरळ, प. बंगाल व त्रिपुरा ही तीन राज्ये सोडली तर डाव्या पक्षांनाही उर्वरीत भारतात नगण्य स्थान होते. आआपचे सध्याचे स्थान फक्त दिल्लीपुरते मर्यादीत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

भारतात एकूण ३ विचारधारा असलेले पक्ष आहेत. डाव्या विचारसरणीचे पक्ष, उजव्या विचारसरणीचे पक्ष आणि काँग्रेस विचारसरणीचे पक्ष. यातले काँग्रेस विचारसरणीचे पक्ष (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दलाचे अनेक तुकडे, अनेक प्रादेशिक पक्ष इ.) हे डाव्या विचारसरणीचा बुरखा पांघरलेले परंतु प्रत्यक्षात उजवी विचारसरणी असलेले पक्ष आहेत
इथे किंचित असहमत श्रीगुरुजी, डावे, उजवे याच्यामध्ये centre left आणि centre right अशा दोन विचारसरणी गृहित धरल्या जातात. काँग्रेसला पहिल्यापासून centre left म्हणून ओळखले जाते. क्लिंटनने कुठेतरी म्हटल्याप्रमाणे आपल्या देशाला सबळ अशा centre right पक्षाची गरज आहे असे त्यांचे मत आहे. माझ्यामते गेल्या वीस वर्षात काँग्रेस centre left कडून centre right कडे संक्रमित होत आहे असे वाटते पण प्रत्यक्षात दिसत मात्र नाही तसे.. जनता दल (सगळेच) बराचसा डावाच आहे फक्त मान्य करत नाही, तृणमूलसारखे स्वतःला centre left म्हणून मांडू पाहतात पण ते आणि राष्ट्रवादीसारखे पक्ष संधिसाधू म्हणायला हवेत त्यापलिकडे त्यांना कोणतीही विचारधारा नाही आणि विशेष म्हणजे त्यांना कोणी त्यांच्या धोरणांबद्दल विचारत पण नाही. :)

In reply to by क्लिंटन

प्रतिसादाशी सहमत. जेथे दुसरी फळी तयार झाली नाही तेथे दुफळी झाली आणि मग त्रिफळा उडला. हे कुणाबाबतही सत्यच आहे.

भाजपचे सरकार आले नाही तरी एकवेळ चालेल पण काँग्रेस ला ५ किंवा ठाहून कमी जागा मिळाल्या पाहिजे, राजधानीतून हा पक्ष हद्दपार झालेला पाहायला मी आतुर झालो आहे. भाजपला आतच बिहार मध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी मिळू शकते. निदान त्या दृष्टीने तयारी म्हणून तेथील राजकीय घडामोडीतून स्वतःच्या फायद्याचे राजकारण पडद्याआड शहा करू शकतात. माझ्यामते ह्यावेळीही बहुमत कोणत्याही पक्षाला मिळणार नाही तेव्हा पुढचे पाढे पंच्चावन्न

दिल्ली आप जिंकणार अशी लक्षणे दिसत आहेत. दुसर्‍या संधीचे तरी त्यांनी सोने करावे अशी अपेक्षा. पहिली संधी गमावल्यामुळे विश्वासार्हता गेली ती पुन्हा प्रचंड प्रयत्नांनी मिळवता आली. पण हे पुन्हा पुन्हा करता येणार नाही. त्यामुळे नीट कारभार करावा लागेल. म्हणजे भाजपाला धाक राहिल आणि त्यांना काहीतरी ठोस करून दाखवावे लागेल. सध्या नुसती बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असे वाटावे अशी परिस्थिती आहे. मोदींचा नामांकित सूट वगैरे दिखाऊपणा आता नको वाटू लागला आहे. सामान्य लोकांपर्यंत पोचणारा चांगला बदल हळूहळू दिसायलाच हवा. हनीमून संपायला हवा. काँग्रेसचा धुव्वा उडणार हे अपेक्षित होतेच. पण आता आप आणि भाजपा ह्यांनी एकमेकावर कुरघोडी करण्याकरता का होईना शीला दीक्षित, कलमाडी, राज, जमाईराजा आणि ह्या माळेतले अन्य मणी ह्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करायला सुरवात करावी. तसे झाले तरच काँग्रेसचे उच्चाटन होईल नाहीतर पुन्हा उत्थापन होईल.

In reply to by हुप्प्या

दिल्ली आप जिंकणार अशी लक्षणे दिसत आहेत. दुसर्‍या संधीचे तरी त्यांनी सोने करावे अशी अपेक्षा. पहिली संधी गमावल्यामुळे विश्वासार्हता गेली ती पुन्हा प्रचंड प्रयत्नांनी मिळवता आली. पण हे पुन्हा पुन्हा करता येणार नाही. त्यामुळे नीट कारभार करावा लागेल. सहमत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मुळ लेखात क्लिंटन यांनी म्हटल्याप्रमाणे केजरीवाल यांना सगळ्या सहकार्‍यांना प़क्षाशी बांधून ठेवण्याचे काम करावे लागणार आहे. शुभेच्छा !

आप, सप, जनता द्ल, MIM, या सर्वानि जवळ जवळ एक्त्रित येउन हि निवद्नुक लढलि आहे... या सर्वाना आत कसहि करुन BJP ला रोखायच आहे.

एक वर्तूळ पूर्ण व्हायच्या मार्गावर असल्याचं दिसतय. लोकशाहीचा रथ दौडत निघालाय. दिवसेंदिवस अधिक परिपक्वतेकडे जाण्याचा कल दिसतोय तिचा. इंग्रजी राज्य गेलं. लोकशाही आलि. पण हे नेमकं काय आहे हेच लोकांना माहित नव्हतं. या नव्या राज्यव्यवस्थेत सत्ताप्राप्ती अजीबात अवघड नव्हती. म्हणुन तिची प्रायोरिटी देखील नव्हती. तेंव्हा सर्वप्रथम लोकसहभागाची आवष्यकता होती. गेल्या ६ दशकात हा लोकसहभाग चांगल्यापैकी अचिव्ह झाला. हा लोकसहभाग जसा जसा वाढत गेला तसं तसं सत्ताप्राप्ती आव्हानात्मक बनत गेली. केवळ लोकसहभाग आणि सत्ता पुरेशी नसुन लोकांच्या सुखी जीवनाच्या अपेक्षा पूर्ण करणारं सरकार हि नवि मागणी आकाराला येऊ लागली. व त्याला उत्तर द्यायला विशिष्ट तत्वज्ञानाधारीत राजकीय प्रवाहं समोर येऊ लागले. साम्यवाद, समाजवाद, परंपराप्रीयता, भाषीक व प्रादेशीक अस्मीता वगैरे आपापल्या पद्धतीने सत्ता व समृद्धीची सांगड घालायचा प्रयत्न करु लागल्या. या सर्व प्रयोगातुन अगदी सुरुवातीला जे लोकसहभागाचं टार्गेट अचीव्ह करायचं होतं ते झालं. पिढीजात चालुन येणारं सत्तांतर बंद झालं, व पूर्ण लोकसहभातुन सत्ताप्राप्तीचा पहिला टप्पा पूर्ण झाला. धर्माधारीत राजवटीपेक्षा लोकसहभागाधारीत राजवटीवर विश्वास ठेवणारे सर्व अल्पसंख्यांक, बर्‍यापैकी लवचीक बहुसंख्यक, समाजातले दोष जाळायला आपल्या जीवनाची होळी करणारे समाज सुधारक, विज्ञानाचं महत्व उमगलेले पुढारी अशा अनेकांच्या प्रयत्नाने लोकशाही देशात चांगली रुजली. आता दुसरा अंक आकाराला येतोय कि काय असं वाटायला लागलय. विभीन्न तत्वज्ञानाधारीत राजकीय पक्ष लोकांच्या अपेक्षा पूर्ण का करु शकल्या नाहित? कदाचीत त्या तत्वज्ञानंच्या मर्यादा असतील, त्या पक्षातील लोकांच्या मर्यादा असतील, झपाट्याने बदलणारं विज्ञानयुग कारणीभूत असेल... काहि का असेना, पोकळी जाणवतच राहिली. आपसारख्या पक्षाच्या उदयाची हि नांदी असावी. कुठल्याही तत्वज्ञानावर अधारीत नसलेला व केवळ समोर दिसणार्‍या समस्या सोडवण्याचं वचन देणारा हा पक्ष लोकांना बराच आवडलेला दिसतोय. त्या पक्षातल्या लोकांच्या उणिवा पक्ष संवर्धनाला आघात करत गेल्या हे खरं असलं तर तो पक्ष मूळ धरुन तगलाच. आता हिच कहाणि पुढे सरकणार काय? सरकली तरी कशी असेल ति? आज ना उद्या त्या पक्षाचं स्वतःचं तत्वज्ञान तयार होणारच. त्याशिवाय हा पक्ष एका विशिष्ट मर्यादेपलिकडे वाढु शकणार नाहि. फक्त या तत्वज्ञानात सो कॉल्ड सर्वधर्मसमभाव, साम्यवाद आणि समाजवादाचे समाजाला भिकेचे डोहाळे लावणारे अर्क न उतरो म्हणजे झालं.

In reply to by अर्धवटराव

प्रतिसाद आवडला आणि सहमत... सध्या मला सावरकरांनी केलेली "क्रांती" या शब्दाची व्याख्या आठवते आहे: "गतीशून्य माणसाच्या किंवा कुजू पहाणार्‍या राष्ट्राच्या पायात बद्ध असलेल्या शृंखला, प्रगतीच्या घणाखाली तुटू लागतात, तेंव्हा होणार्‍या आवाजाला क्रांती असे म्हणतात." (तुर्तास काँग्रेसमुक्त भारत ही प्रगतीची सुरवात समजत आहे. ;) )

In reply to by विकास

राजकारणावरचा धागा असूनही चांगल्या विवेचनात्मक मुद्देसूद प्रतिसादांनी सजलेला धागा. अलिकडची एक चांगली चर्चा (आणि हा ओघ असाच रहावा ही इच्छा ) सकाळचे १०.४५ झाले आहे ऐकूया समूह गान "हम होंगे कामयाब हम होंगे कामयाब एक दिन"

In reply to by अर्धवटराव

या सर्व प्रयोगातुन अगदी सुरुवातीला जे लोकसहभागाचं टार्गेट अचीव्ह करायचं होतं ते झालं. पिढीजात चालुन येणारं सत्तांतर बंद झालं, व पूर्ण लोकसहभातुन सत्ताप्राप्तीचा पहिला टप्पा पूर्ण झाला.
लोकसहभागावरून आठवले. यावेळी आआपने मोहल्ला समित्यांवर विशेष भर दिला नव्हता.तो मागच्या वेळी होता. मोहल्ला समिती ही संकल्पना ती एक सूचना करणारी यंत्रणा असेल तरच योग्य आहे असे वाटते. त्या व्यतिरिक्त अधिकार मोहल्ला समित्यांना देणे (विशेषतः पैसे खर्च करायचे) मला तरी अजिबात मान्य नाही.

In reply to by क्लिंटन

प्रशासनाशी मोहल्लासमित्या अधिकृतपणे जोडल्या जाण्याचा केजरीसाहेबांचा मूळ प्लॅन मलापण अजीबात नाहि पटला. इथे लोकसहभाग म्हणजे लोकांना मतदानाचं महत्व कळणे व त्यांनी सत्तास्थापनेच्या प्रोसेसमधे त्याचा उपयोग करणे या अर्थाने म्हटलं आहे.

सत्त्ता मिळवणे सोपे, राखणे कठीण. केजरीवालांनी ५ वर्षे राज्य करून दाखवले पाहीजे (जे कठीण वाटतंय). यावेळेला जर आआप ला सत्ता मिळाली आणि त्यांना ती टीकवता आली नाही तर त्यांच्यासारखे करंटे तेच असतील. कदाचित भाजप धूरीणांना हेच हवे असेल की सत्ता आआप ला मिळावी आणि ती अंतर्गत कलहामुळे कींवा अन्य कारणामुळे जास्त दीवस चालू नये. पुढे काय होतंय हे पहाणे मनोरंजक असेल.

In reply to by खटपट्या

सत्त्ता मिळवणे सोपे, राखणे कठीण. केजरीवालांनी ५ वर्षे राज्य करून दाखवले पाहीजे (जे कठीण वाटतंय). प्रचंड सह्मत

मस्तं विवेचन. आआप येउ दे नाही तर भाजपा. पळपुटेपणा केला नाही म्हणजे मिळवलं. देशाच्या राजधानीला एवढे दिवसं स्थिर सरकार नसणं ही शरमेची गोष्टं आहे.

दिल्ली निवडणूका तोंडावर आल्यानंतर भाजपने चाली केल्या.पण निवडणूक होणारच अाहेत,त्यासाठी मोर्चेबांधणी,पक्षातली अंतर्गत वाद,यातल्या कुठल्याच गोष्टीवर भाजपने फारसे गांभीर्याने काम केल्यासारखे वाटले नाही.किरण बेंदींसारखे चमको नाव शेवटी अाणून दाखवणे यापलिकडे भाजपची लोकसभेच्या वेळेसारखी किलर रणनीतीही दिसली नाही. केजरीवाल आरंभशूर ठरु नये ही अपेक्षा!नाहीतर दिल्लीकरांना असमानसे गिरे,खजूरपें अटके चा प्रत्यय नक्कीच येईल!

कांग्रेस पक्ष हरला नाही आहे, आक्रमण करण्यापूर्वी वाघ जसा दोन पाऊले मागे जातो तसे केले आहे, प्रचार आणि पैसा दोन्ही ही खर्च केला नाही. याचा वापर पुढच्या लोक सभेच्या निवडणूकीत कॉंग्रेस भरपूर करेल आणि दिल्लीत ही पाच वर्षानंतर पुन्हा पुढे १५ वर्षे तरी राज्य करेल. या निवडणूकीत एका वोट ची किंमत हजार रुपये होती. आमच्या उत्तम नगरच्या आपच्या उम्मेद्वाराच्या गोदामातून ८८०० बाटल्या पोलिसांनी जब्त केल्या तरी ही दारू वाहत होती. बहुतेक निवडणूक जिंकेल. बाकी: गेल्या वर्षी आमच्या गल्लीत (२० घरांपैकी ६ वीज चोरी करताना पकडल्या गेले होते. त्यांचे वोट आपलाच गेले. अनधिकृत कोलोनितले सर्व घर मलिक (दिल्लीतले ७०% मतदाता अनिधिकृत कोलोनीत राहतात) जे भाडेकर्यांकडून १० रुपये युनिट घेतात आणि वीज ही चोरी करतात, आता पाणी चोरी ही सुरु केली आहे. संपती कर इत्यादी सर्व प्रकारच्या करांमध्ये घट येईल. सर्व प्रकरचे कार्य बंद पडतील. उदा. दिल्लीत १२००० बसेस ची गरज आहे, सध्या ५५०० बसेस आणि ३००० मिनी (निजी १६ SEATER ज्यात ४० लोक भरले जातात), नव्या बसेस येणार नाही. बाकी सर्वांचे खापर केंद्र सरकार वर फोडून अराजकता माजविली जाईल. आणि याचा फायदा कॉंग्रेस पक्ष घेईलच यात नवल नाही. कारण आम्ही भ्रष्ट असलो तरी कारभार आम्हाला करता येतो. किरण बेदी आल्यावर ईमांदारीचे राज्य येईल , जे कुणालाच नको होते. दिल्ली विजयाचा उपयोग केजरीवाल, देशात अस्थिरतेचे वातावरण पसरविण्या साठी करतील. जो प्रधानमंत्री राजधानी सांभाळू शकत नाही तो देश काय सांभाळणार.

In reply to by विवेकपटाईत

पटाईत साहेबांशी सर्वार्थाने सहमत. यानी टॅक्स बंद वगैरे सारखी आंदोलने नाही केली म्हणजे मिळवली. बाकी फुकटच्या गोष्टीमुंळे लोक लिथर्जिक होतात असे माझे वैयक्तिक मत. त्यामुळे फुकट गोष्टी देण्यापेक्षा त्या जनतेला थोड्या कमी किमतीत देण्याचा मार्ग मला पटतो. तसेच एक विशिष्ठ मर्यादेच्यावरचा वापर अशा सब्सिडाईझ्ड गोष्टीचा झाला तर मर्यादेच्यावरील सर्व मात्रा ही पूर्ण बाजारभावाप्रमाणेच दिली जावी.

In reply to by विवेकपटाईत

जो प्रधानमंत्री राजधानी सांभाळू शकत नाही तो देश काय सांभाळणार. हे विधान अनावश्यक आहे असे वाटते. एका सम्भाव्य पराभवाने कुठला नेता छोटा होत नाहि

In reply to by पिंपातला उंदीर

आपण कांग्रेसच्या दृष्टीकोनातून विचार करा - त्यांना चांगला मुद्दा सापडला आहे, हे निश्चित

In reply to by विवेकपटाईत

पाण्यात रहाणार्‍याला काठावरच्या माणसापेक्षा पाण्याचे तापमान अधिक जाणवत असावे... :) असेच काहीसे हा प्रतिसाद वाचताना जाणवले. तरी देखील कधी कधी त्यातून एकतर्फी विचार होण्याचे भय देखील असते. (ही आपल्यावर अथवा इतरांवर टिका आहे असे कृपया समजू नयेत). आपला सर्व प्रतिसाद एक लॉजिक म्हणून पटला. मोदींना चॅलेंज देयचे असेल तर केजरीवालांना नुसती अस्थिरता आणून चालणार नाही. तर काहीतरी भरीव करून दाखवावे लागेल. नाहीतर ते दिल्लीपुरतेच मर्यादीत राहतील.... काँग्रेस केवळ पैशाच्या जोरावर परत येऊ शकेल असे वाटत नाही. त्यांना नेतृत्व लागेल. ते देखील सर्वमान्य - म्हणजे गांधी घराण्याचेच. काँग्रेसच्या दृष्टीने विचार कराल तर, सोनीया आता सक्रीय राजकारण किती करू शकतील यावर शंका आहे. राहूल गांधी पुढच्या मिनिटाला काय करतील याची भिती आहे. प्रियांका गांधींमधे आजीचे नेतृत्व गूण असतीलही कदाचीत... पण नवर्‍याने जरा जास्तच गूण उधळले आहेत आणि मोदी सरकारने ते हुकमाचे पान अजून राखून ठेवले आहे. त्यामुळे काँग्रेसला घरघर लागली आहे असेच आज तरी दृष्य आहे.

In reply to by विवेकपटाईत

राजकारण कोळून पिणे म्हणतात तो प्रकार काँग्रेसने नक्कीच केला आहे.काँग्रेस पक्ष अशाप्रकारची खेळी नक्कीच करू शकतो. एकतर काहीही झाले तरी यावेळी काँग्रेसला निवडणुक जिंकता येणार नाही हे त्यांना सुध्दा माहित आहे.तेव्हा पडद्याआड राहून आआपच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भाजपवर हल्ला करणे (आणि तेही पडद्याआड राहून) आणि आआपने दिलेली भरमसाठ आश्वासने पूर्ण करता आली नाहीत की--"बघा दिल्लीत सरकार आम्हीच चालवू शकतो" असे म्हणत आआपला गेलेली भाजपविरोधी मते परत आपल्याकडे खेचून आणणे ही खेळी असू शकेल ही शक्यता आहेच. पण यात केजरीवाल अपयशी ठरतील हे मोठे गृहितक आहे आणि तो एक प्रकारचा जुगार आहे.तो जुगार खेळायला काँग्रेस पक्ष तयार आहे असे दिसते. काँग्रेसला भाजप जिंकण्याऐवजी आआप जिंकलेला कधीही परवडेल आणि आवडेलही.

In reply to by विवेकपटाईत

मला आप आवडत नाही पण तुमचे प्रतिसाद विचित्र आहेत आणि खासकरून हा तुमचा प्रतिसाद कुठेतरी खटकतोय असे नाही का वाटत हो पटाईत साहेब ? म्हणजे बघा,
दिल्लीतले ७०% मतदाता अनिधिकृत कोलोनीत राहतात)
ज्या राज्यातील (शहरातील) ७०% मतदार अनधिकृत घरांत राहतात तिथे अनधिकृतताच अधिकृत म्हणावी लागेल की नै ? आणि आधीची सगळीच प्रशासने/ विरोधी पक्ष हे होईपर्यंत झोपली होती काय ?
२० घरांपैकी ६ वीज चोरी करताना पकडल्या गेले होते. त्यांचे वोट आपलाच गेले.
म्हणजे सगळे चोर आपला वोट करतात आणि ते जाहीरपणे सांगत पण फिरतात ! भारीये बाबा.
किरण बेदी आल्यावर ईमांदारीचे राज्य येईल , जे कुणालाच नको होते.
इथे आपमध्ये आल्यावर लोक स्वच्छ/पवित्र होतात तसेच तुम्ही भाजपामध्ये पवित्र करायला लागलात की. त्या आल्या तर इमानदारीचे राज्य, ते पण जिथली बहुसंख्य जनता भ्रष्टाचारी आहे! बिचारीची वाईट अवस्था झाली असती की हो मग.
दिल्ली विजयाचा उपयोग केजरीवाल, देशात अस्थिरतेचे वातावरण पसरविण्या साठी करतील.
आधी कुठेतरी बोलल्याप्रमाणे, केजरीवालला कसलीही सहानुभुती नाही आणि तो किंवा त्याचा पक्ष देशात अस्थिरतेचे वातावरण पसरवू शकतात असे वाटत नाही. जनता तुम्हाला वाटते त्यापेक्षा जास्त शहाणी आहे. काँग्रेसला घरी बसवून त्यांनी त्याचा प्रत्यय दिलाय हे पण लक्षात घ्या.
बाकी सर्वांचे खापर केंद्र सरकार वर फोडून अराजकता माजविली जाईल. आणि याचा फायदा कॉंग्रेस पक्ष घेईलच यात नवल नाही
इतर काही दूध-धुले नाहीत आणि असल्या गोष्टी सगळ्यांनीच केल्यात आणि करतात. इतरांनी फायदा घेतला तसाच काँग्रेसपण घेईल. काँग्रेसला परत परत संधी मिळते त्यातच समजून घेतले पाहिजे. (निवडून येत असतील तर ती तशी मिळावी, त्यात गैर काही नाही. ही लोकशाही आहे, कोणाला अस्पृश्य करण्यात काही हशील नाही.) तटस्थ असलो तरी हा "आप"परभाव पटला नाही. त्यामुळे तुम्ही मांडत असलेल्या इतर वस्तुस्थितीजन्य मुद्द्यांच्या (फॅक्ट्स) विश्वासार्हतेस धोका निर्माण होतो. तुम्ही म्हणता तसे बहुसंख्य दिल्लीकर अनधिकृत घरांत रहात असतील, चोरी (वीज्/पाणी) करत असतील तर त्यांना तसेच सरकार मिळणार. तुमच्यासारखे आणि इतर अल्पसंख्य प्रामाणिक नागरिक फार फार तर त्याविरुद्ध लढा देऊ शकता नंतर.

In reply to by विवेकपटाईत

या निवडणूकीत एका वोट ची किंमत हजार रुपये होती. आमच्या उत्तम नगरच्या आपच्या उम्मेद्वाराच्या गोदामातून ८८०० बाटल्या पोलिसांनी जब्त केल्या तरी ही दारू वाहत होती. बहुतेक निवडणूक जिंकेल. मुद्दाम आठवण ठेऊन या उमेदवाराची बातमी फॉलो केली, नरेश बालियन हा "आप"चा उमेदवार निवडून आलाच पटाईत साहेबांच्या होर्‍याप्रमाणे, आणि त्याची दिल्ली पोलिस कमिशनरने दोन तास चौकशीही केली आज असं दिसतं. पुढे काय होतं ते पहायला हवं. या 'आप'च्या उडदामाजी काळे किती हे कळायला हवेच. शुक्रवारी म्हणे 'आप'च्या संजय सिंग, आशुतोष आणि आशीष खैतान यांनी याच कमिशनरला भेटून नरेश बालियान याची चौकशी निवडणुकीनंतर करा अशी विनंती केली होती. या सर्वावर (आणि या नवनिर्वाचित आमदारास अटक झाल्यास) अरविंद केजरीवाल, आणि आतापर्यंत मलातरी प्रामाणिक आणि संयमी वाटणारे योगेंद्र यादव, यांची प्रतिक्रिया काय असेल ते नक्कीच लक्ष ठेवण्यासारखं असेल.

In reply to by बहुगुणी

बापरे! (का आपरे?) हे काँग्रेसकडून झाले असते तर काही वाटले नसते.. कारण की: १९८५ साली ठाण्यात काँग्रेसच कडून निवडून आलेल्या खासदारांच्या हापिसच्या बाहेर एक असाच मदीरायुक्त पिंप जनतेला आनंद लुटण्यासाठी म्हणून ठेवला होता. त्या पिंपाचा नळ किंचीत गळत असल्याने ती मदीरा थेंब थेंब बाहेर पडत होती. कर्मधर्मसंयोगाने त्याच्याच वर भिंतीवर काही महीनेच आधी शहीद झालेल्या इंदीराजींचे पोस्टर होते आणि त्यावर घोषणा होती, "इंदिराजी की अंतिम इच्छा बूंद बूंद से देश की रक्षा!" (हा विनोद नाही, त्या वेळेस माध्यमात आले होते. पण गुड ओल्ड डेज... त्यावेळेस असल्या गोष्टींकडे कोणी लक्ष देत नसे!)

In reply to by बहुगुणी


मुद्दाम आठवण ठेऊन या उमेदवाराची बातमी फॉलो केली, नरेश बालियन हा "आप"चा उमेदवार निवडून आलाच पटाईत साहेबांच्या होर्‍याप्रमाणे, आणि त्याची दिल्ली पोलिस कमिशनरने दोन तास चौकशीही केली आज असं दिसतं. पुढे काय होतं ते पहायला हवं. या 'आप'च्या उडदामाजी काळे किती हे कळायला हवेच. शुक्रवारी म्हणे 'आप'च्या संजय सिंग, आशुतोष आणि आशीष खैतान यांनी याच कमिशनरला भेटून नरेश बालियान याची चौकशी निवडणुकीनंतर करा अशी विनंती केली होती. या सर्वावर (आणि या नवनिर्वाचित आमदारास अटक झाल्यास) अरविंद केजरीवाल, आणि आतापर्यंत मलातरी प्रामाणिक आणि संयमी वाटणारे योगेंद्र यादव, यांची प्रतिक्रिया काय असेल ते नक्कीच लक्ष ठेवण्यासारखं असेल.

दारू जिथून जप्त केलीये, ते गोदाम मुकेश बाल्यान (भाजपाचा कार्यकर्ता) यांचे आहे अशीही एक बातमी आली होती. TOI ने चुकीची बातमी छापल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून Clarification सुद्धा छापले होते. इलेक्शन कमिशननेसुद्धा कुठेही नरेश बाल्यान यांचे नाव घेतल्याचे मला आठवत नाही. I answered all questions I was asked, in future also if I'll be summoned I will extend full cooperation. - Naresh Balyan ‍^ ANI ची बातमी एखाद्या जागी दारू पकडल्या गेली तर स्वतः पोलिस कमिशनर कॅमेर्‍यापुढे येऊन बाईट देतांना आजवर मी तरी पाहिले नव्हते. दिल्ली पोलिस कुणाच्या ऑर्डवर काम करते हे जाणून घेण्यासाठी राज्यघटना वाचण्याचीसुद्धा गरज नाही. त्यामुळे फक्त ‘आप’ च्या उमेदवारावर आरोप का लावल्या गेले असतील हे सहज समजण्यासारखे आहे. कॉंग्रेस-भाजपच्या उमेदवरांचे दारू वाटतांनाचे व्हिडिओ यूट्युबर उपलब्ध आहेत, पण त्याबद्दल कुणी बोलत नाही यातच सगळे आले. समजा चौकशीअंती स्पष्ट झाले की दारू नरेश बाल्यान यांचीच होती, आणि तरीही आम आदमी पार्टी जर तेव्हा त्यांचा बचाव करताना दिसून आली तर ते निषेधार्हच असेल ! आप असा एकमेव पक्ष आहे ज्याला अधिकृत विपक्ष नाही, पण त्यांचे लाखो कार्यकर्तेच त्यांच्यासाठी विपक्षाचे काम करतात. अवांतर - दिल्लीचे सध्याचे पोलिस कमिशनर भिम बस्सी मला निरज कुमार यांच्यासारखेच वाटतात. इंडिया टुडे च्या कार्यक्रमात या निरज कुमारांनी अरविंद केजरीवालची टिंगल उडवतांना स्वतःची पातळी दाखवून दिली होती.

In reply to by नांदेडीअन

दारू जिथून जप्त केलीये, ते गोदाम मुकेश बाल्यान (भाजपाचा कार्यकर्ता) यांचे आहे अशीही एक बातमी आली होती. दि हिंदू मधे आलेल्या कालच्या बातमीनुसारः "The land records show the godown as an inherited property owned by the Balyan family, but the electric meter on the premise is issued in the name of the wife of Naresh’s cousin Leela Ram." याच बातमी नुसार, त्याने आपला काही संबंध नाही म्हणून सांगितले, जे देखील खरे असू शकते. पण मग पोलीसांकडे जायला वेळ का लावला? हा प्रश्न राहतोच. असो.

लेखातल्या बहुतांश मतांशी सहमत आहे. काही गोष्टीत मला जे वेगळे वाटते असे, १. हा पराभव म्हणजे मोदींचा/अमित शहांचा पराभव आहे का? -असेलही कदाचित, पण तसे नाही. दिल्लीतली अनेक मित्रांचे मत असे की दिल्लीत केजरीवाल आणि पार्लिमेंट मधे नरेंद्र अशी घोषणा दिल्ली निवडणूकीत आपवालेच देत होते. त्यामूळे दिल्लीतल्या यशामुळे जरी केजरीवाल मोदिंशी टक्कर घेउ पाहत होते त्या साफ आपटले. त्याच्या बरोबर उलटा न्याय जो दिल्लीकरांनी आधीच निर्धारीत केलेला होता तो इथे व्यक्त होताना दिसत आहे. म्हणजे उठवळ मिडीया देखील जे काही दाखवत आहे की मोदीनी वचने पाळली नाहीत म्हणून हा पराभव दिल्लीत होत आहे; असे मला वाटत नाही. २. क्र १ चा कदाचित भाजप धुरीणाना अंदाज असल्याने त्यानी शेवटपर्यंत निवडणूका पुढे ढकलून आप फुटेल कसा हे पाहीले. जरी तेव्हाचे (लोकसभा २०१४ नंतरचे दिल्ली विधानसभेचे) ओपिनियन पोल काहीही म्हणत असले तरी)क्र १ मुळे भाजप पिछाडीवर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र, हरियाणा इत्यादी निवडणूकांवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून कदाचित निवडणूक टाळली असेल. अन्यथा हमखास विजय मिळेल अशी खात्री असलेली निवडणूक मोदी-शहा सोडतील असे वाटत नाही. अन्यथा शिवसेनेला सोडून एकट्याने लढण्याचा धाडसी निर्णय देखील या नेतृत्वानेच घेतला होता. हे ही विसरता उपयोगी नाही. असो. पुष्कळ वाद-प्रतिवाद होतील पण जनता जे ठरवेल ते खरे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

पहिला मुद्दा शक्य आहे. विशेषतः २०१३ डिसेंबरनंतर केजरीवाल मुख्यमंत्री असतानाही आआपचे बरेच मतदार लोकसभेत नरेंद्र मोदींच्या नावावर भाजपला मते देतील ही शक्यता व्यक्त करण्यात येत होतीच.लोकसभेच्या वेळी त्याचा भाजपला फायदा झाला पण यावेळी फटका बसणार असे दिसते. तरीही महाराष्ट्र आणि हरियाणाबरोबर दिल्लीत मतदान झाले तर त्याचा महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यांमधील मतदानावर कसा काय परिणाम झाला असता? शेवटी मतदान एकत्रच झाले असते ना. कदाचित त्याचा झारखंड आणि काश्मीरमधील मतदानावर परिणाम झाला असता.तरीही ऑक्टोबरमध्ये नाही तरी डिसेंबरमध्ये झारखंड आणि काश्मीरबरोबर दिल्लीत मतदान घेता आलेच असते. जुनी विधानसभा बरखास्त करायला इतका वेळ का लावला हे न उलगडलेले कोडे आहे.
अन्यथा शिवसेनेला सोडून एकट्याने लढण्याचा धाडसी निर्णय देखील या नेतृत्वानेच घेतला होता. हे ही विसरता उपयोगी नाही.
याला अगदी +१००.

आप जिंकेल असे वाटते आणि आपचा विजय कदाचित भारतात लोकशाही आहे हे दाखवून देणारा असेल. माढे दोन सहकारी दिल्लीचे आहेत ते आणि त्यांचे कुटुंब केजरीवालने ४९ दिवसात राज्य सोडले तरी केजरीवलांना संधी द्यायला संधी द्यायला हवी हे लोकसभेत झालेल्या तमाशानंतरही म्हणत होते. गेली कित्येक वर्षे भारतातल्या निवडणुकात दोनच मुद्दे आहेत १)तू माझ्यापेक्षा आधिक भ्रष्ट २) कोण आधिकसेक्यलर. पुढे जाउन भारतातील निवडणकांमधे धोरणे आणि मुद्दे यांची चर्चा होइल ही अपेक्षा. आजतरी आपकडे धोरणे नाहीत फक्त चांगल्या माणसांचा पक्ष येवढेच. लोकांनी मोदींना विकासपुरुष म्हणून निवडून दिले हेही भाजपने ध्यानात ठेवावे लागेल.

In reply to by मित्रहो

गेली कित्येक वर्षे भारतातल्या निवडणुकात दोनच मुद्दे आहेत १)तू माझ्यापेक्षा आधिक भ्रष्ट २) कोण आधिकसेक्यलर. पुढे जाउन भारतातील निवडणकांमधे धोरणे आणि मुद्दे यांची चर्चा होइल ही अपेक्षा./blockquote> हो बरोबर. तू माझ्यापेक्षा जास्त भ्रष्ट आणि जास्त जातीयवादी हेच दोन मुद्दे जास्त प्रमाणावर राजकारणात राहिले आहेत. पण शेवटी लोकशाहीमध्ये लोक जसे असतात तसेच त्यांचे नेतेही असतात.आपण स्वतः कुठल्या ना कुठल्या प्रकारे भ्रष्ट असतानाही (भले ते सिग्नल मोडल्याबद्दल पोलिसाने पकडल्यावर ५०-१०० रूपयात पटविणे असो की ऑफिसमध्ये खोटी मेडिकलची बिले देणे असो) इतरांकडून स्वच्छ असायची अपेक्षा करणे असा दुटप्पीपणा आपण सगळेच करत असतो. तसेच कुणाही नव्याने ओळख झालेल्या व्यक्तीचे अडनाव मुद्दामून विचारणे (म्हणजे त्या आडून अप्रत्यक्षपणे नक्की जात कुठची हे विचारणे) हे पण काही कमी कॉमन नाही.तरीही आपल्या नेत्यांनी मात्र जातीपातींना फाट्यावर मारवे अशी अपेक्षा आपण ठेवतो. तेव्हा आपल्यासारख्या समाजात हे होणे अपेक्षित आहेच.
आजतरी आपकडे धोरणे नाहीत फक्त चांगल्या माणसांचा पक्ष येवढेच.
आआप चांगल्या माणसांचा पक्ष असे म्हणणे मला तरी जड जाते.त्याविषयी पूर्वी खूप चर्चा मिसळपाववरच झालेली आहे.त्यामुळे त्यावर जास्त लिहित नाही.
लोकांनी मोदींना विकासपुरुष म्हणून निवडून दिले हेही भाजपने ध्यानात ठेवावे लागेल.
पण भाजपमधीलच कट्टर हिंदुत्ववादी मंडळींकडे बघून त्यांना हे भान असेल असे दिसत नाही.

In reply to by क्लिंटन

हा यथा राजा तथा प्रजा किंवा त्याच्या अगदी उलट you deserve the ruler the way you are हा नाही. मी भ्रष्ट की तू भ्रष्ट या प्रकारामुळे राजकारण वैयक्तीक पातळीवर येत मुळ मुद्द्यावर चर्चा होत नाही. आजतागायात हेच होत आले आहे. आजतागायात भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचा फायदा भाजप(जनसंघ)ला झाला मग ते जेपीचे असो किंवा व्ही पी सिंगांची बोफोर्स तोफ असो. यावेळेस कुणीतरी दुसराच त्याचा फायदा घेतोय. प्रथमच बीजेपी विरुद्ध सारे हे चित्र उभे राहीले आहे. ज्यांना बीजेपी नकोय ते काँग्रेसकडून आआपकडे वळलेय. एक्झीट पोलचेच आकडे घेतले तर काँग्रेसचे आठ ते दहा टक्के मत आआपकडे वळलेय. असेच ध्रुवीकरण इतर राज्यांच्या निवडणुकात पण होउ शकते.

In reply to by मित्रहो

आपले म्हणणे बरोबर वाटते आहे. आप कडे धोरणे नाहीत म्हणण्यापेक्षा, ते धोरणे कसे पुर्णत्वास न्हेतील असे प्लॅन नाहीये असे वाटते. बघु या काय होयील ते पण जर आप ने दिलेले मुद्दे व्यव्स्थीत पुर्णत्वास न्हेले नाहे तर आप साठी ते कायम स्वरुपी धोकादायक असेन.

According to Today’s Chanakya—the survey agency that the entire BJP loves for its accurate prediction of the Lok Sabha results—Kejriwal is the overwhelming favourite of every caste, class, community and religion in Delhi. Muslims, Sikhs, Brahmins, Banias, Dalits, OBCs have all voted for him in near-identical numbers. Kejriwal is also the favourite of the youth, middle-aged and the old. This is a truly representative government; his victory would be a triumph of Indianness, a feat Sonia Gandhi loyalist Janardhan Dwivedi had recently attributed to Modi.
^ FirstPostवरील एका आर्टिकलमधून साभार.

प्रतिक्रिया द्यायला आवडेल. परंतु निकालापर्यंत थांबतो आणि निकालावर आधारीत नंतर प्रतिक्रिया देतो.

मला वाटते की टॅक्स पेअर्स अ‍ॅसोसिएशन स्थापन करण्याची नितांत गरज आता आहे. कारण निवडणूका जिंकण्यासाठी काही लोकांच्या खिशातून पैसे लाटायचे आणि खिरापतीसारखे वाटायचे हे किती काळ चालणार. जे लोक, कंपन्या पैसे देतात त्यांना ते खर्च कसे करावेत यात काही मत आहे की नाही....हा खरा प्रष्न काही काळानंतर ऐरणीवर येणार हे निश्चित.... हेन्री डेव्हिड थोरोच्या एका लेखाचे मी येथे भाषांतर केले होते त्यात तो म्हणतो....... "सर्व मतदान हे एखाद्या खेळासारखे असते. फक्त त्याला एक नैतिकतेचा मुलामा दिलेला असतो. या खेळात आपल्याला चांगले आणि वाईट या दोन्हीपैकी एकाची बाजू घ्यायची असते आणि हा एक प्रकारचा जूगारच असतो. मी चांगल्याच्या बाजूने मत टाकतो पण विजय चांगल्याचाच होईल का या बाबतीत मी बेफिकीर असतो. ते मात्र मी बहूमतावर सोडतो. म्हणजे मला जे चांगले वाटते, व जे चांगले आहे हे इतरांना चांगले वाटले नाही किंवा त्यांना तसे पटवले गेले की संपले. यामुळे होते काय की जर त्यांच्या उपयोगी एखादा उमेदवार पडला तर तो चांगला असे समिकरण तयार होते. याचा दुर्दैवाने असा अर्थ होतो की तुम्ही अत्यंत दुबळ्या आवाजात एका मताद्वारे सांगत असता की चांगले काय आणि वाईट काय ! आणि दुबळ्यांच्या मताला तीच किंमत मिळते जी मिळायला पाहिजे.''

टॅक्स पेअर्स अ‍ॅसोसिएशन म्हणजे नक्की कुणाची संघटना ? अप्रत्यक्ष कर तर मला वाटते सर्वच लोक (गरीब/ श्रीमंत ) भरत असतात. आपल्याकडे काही लोकांना उगाचच वाटते कि खास करून मध्यमवर्गीय उच्च -मध्यमवर्गीय नोकरदार वगैरे लोक जो प्रत्यक्ष कर भारतात त्यावर देश चालत असतो. गरिबांसाठी कल्याणकारी योजना म्हणजे पैश्याचा अपव्यय नव्हे. सर्वाना प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे. देशाच्या साधन संपत्तीवर पहिला हक्क गरीबांचा असायला हवा हे तत्व समाजवादी वाटत असले तरी तेच योग्य आहे मात्र सगळी सरकारे गरिबांच्या उत्थानाच्या गप्पा मारतात त्यांना प्रगतीच्या संधी, कल्याणकारी योजना यावर पाहिजे तेवढे लक्ष कुणीच देत नहि.

In reply to by दुश्यन्त

खर्च केल्यास टॅक्स भरावा लागतो त्या करदात्यांविषयी मी बोलत नाही. अर्थात मी म्हणतो आहे ते डे ड्रिमिंग आहे याची मला कल्पना आहे. एक कल्पना म्हणा हवी तर......