Skip to main content

वाट्सअ‍ॅप एक डोकेदुखी ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 31/03/2014 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. आंतरजाल (इंटरनेट) युगात आपण सतत नाविन्याच्या शोधात असतो आणि आज त्याला प्रचंड महत्त्व आलं आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वेग इतका अफाट वाढलाय की आपण काही काळ जर यापासुन दूर राहीलो तर आपल्याला बरीच माहिती कळणार नाही, आपण अज्ञानी राहू की काय म्हणन्यापेक्षा दैनिकातील बातम्यांवर आपल्याला विसंबून राहावे लागेल. एका मोठ्या माणसाने असं म्हटलं होतं की ''How You manage your information determines whether you win or lose'' आपण आपल्याकडील माहितीचं व्यवस्थापन कसे करतो त्यावरच आपलं यश अपयश अवलंबून असते. माहिती विचारांची देवाण-घेवाण हा सर्व प्रकारच्या विकासाचा आधार असतो. आणि म्हणून आपल्याला सतत माहितीच्या-संवादाच्या क्षेत्राशी सतत जोडलेलो असले पाहिजे असे वाटायला लागते. मंडळी, ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअ‍ॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अ‍ॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. मग ते राजकारण,समाजकारण आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या तिथे तिथे संवादाच्या माध्यमाने अनेकांना जखडून टाकलं आहे. वाट्सॅप हे स्मार्टफोनवरचं Android वरील लोकप्रिय अ‍ॅप्लिकेशन. (नै सर आता टेलीग्राम जोरात चालतंय असं म्ह्टलं तरी माझी हरकत नाही) लाखो करोडो लोक नेट कनेक्टेड असतील तर एकमेकांशी क्षणात जोडल्या जातात. जालजोडणी (इंटरनेट कनेक्शन) भ्रमनध्वनीवर सहज मिळू लागली. आणि खेड्यापाड्यापासून ते अगदी जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहराशी माणसं जोडल्या जाऊ लागली. आणि क्षणात संदेश पाठविता येऊ लागल्याने त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. मंडळी, संवादाचं माध्यम मग ते कोणतंही असो त्याचं एकदा व्यसन लागलं की ते सुटणं अवघड होत जातं. वाट्सअ‍ॅपवर एकदा आपल्याला संदेश यायला लागले की नवीननवीन खूप आनंद वाटायला लागतो. आणि मग तेच तेच सुरु झालं की त्याचा कंटाळा यायला लागतो. राजकीय लोकांची, चित्रपट कलाकारांची, कोणा व्यक्तीची चांगली, व्यंगात्मक चलचित्र, चित्र, किंवा काही अश्लिल तसेच उत्तम माहितीपूर्ण गोष्टीही वाट्सॅपवर यायला लागल्या. विविध गृप निर्माण झाले आणि मग लक्षात यायला लागतं की हे अति होत आहे, हे थांबवलं पाहिजे. उदाहरण म्हणुन सांगतो. आमचा एक गृप होता विविध राजकारणी, नगरसेवक, व्यापारी,शिक्षक, जिल्हापरिषद सदस्य,आमदार, असा गच्च थोरामोठ्यांनी भरलेला गृप होता. सुरुवाती सुरुवातील गुड मॉनिंग पासून 'गोड गोड' असा संवाद व्हायचा. टोन वाजला की काय लिहिलं त्याची प्रचंड उत्सुकता. वाचने लिहिणे सुरु झाले. मग हळुहळु आमचा पक्ष, तुमचा पक्ष सुरु झाला. जातीपाती आल्या. आमचा नेता तुमचा नेता सुरु झालं, आमचा महापुरुष तुमचा महापुरुष असं सुरु झालं. शेतक-यांचा चर्चा सुरु झाल्या. एकदा तर शेतक-यांच्या चर्चेत एका थोरामोठ्याने मला तुम्हाला काय कळतं शेतक-यांचं दु:ख. असेल इतका कळवळा तर द्या ना तुमचा एक पगार इथपर्यंत पोहचला होता. एकदा तर एका नेत्याने एका व्यापा-याला आमची फक्त सत्ता येऊ दे मग पाहतो तुला. इथपर्यंत चर्चा झाल्या. एक दिवस अ‍ॅडमिनने हा गृप बंद करत आहे असे सांगितले. आणि सुटलो. पण एकमेकांविषयीची जी मतं बनली ती कशी एक्झीट करणार. वाट्सअ‍ॅपवर सर्वच वाईट नाही. काही गृप चांगले असतील. काहींना खूप चांगले अनुभव असतील तर कोणाला वाईट अनुभव असतील. कोणी म्हणेल सरळ संदेश म्युट करा, कोणी म्हणेल सरळ अ‍ॅप्लीकेशन भ्रमनध्वनीतून काढून टा़का. कोणी म्हणेल वाईट लोक असतील तर त्यांना ब्लॉक करा, मंडळी, या सर्वच विषयावर मुक्त आणि भलीबुरी चर्चा, आणि एकमेकांचे अनुभव, उपाय, किस्से, एकमेकांना कळावे, म्हणुन हा प्रपंच. विनंती : आमच्याकडे वाट्सअ‍ॅप नाही, हलके भारीतले मोबाईल नाही. वगैरे टाळता आले तर टाळावे. :) ''अधर्माची अवधी तोडी । दोषांची लिहिली फाडी । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।। श्री संत ज्ञानेश्वर.

वाचने 33533
प्रतिक्रिया 78

प्रतिक्रिया

In reply to by आजानुकर्ण

महिला सदस्य असे म्हणायचे होते. बाकी, कर्णा तुमचा काय अनुभव वाट्सअ‍ॅपचा ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चहा टाक, ऑफिसातून निघालोय. चपात्या वातड लागताहेत. भाजीत मीठ नाही. वगैरे संदेशाची देवाणघेवाण बायकोबरोबर करण्यासाठी व्हॉट्सॅपचा चांगला उपयोग होतो.

In reply to by आजानुकर्ण

छ्या, हे लै खासगी झालं. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आखाडे आणि उघडे-पाघडे चित्र याबद्दल विचारतोय. एकच चित्र ते गुडमॉर्निंग आणि गुडनाईट. आपण लै हुशार आहोत या थाटातले ग्रूपवरचे विचार. आणि दिवस रात्र मेसेजे जे टॉ टॉ वाजत असतात. असे मेसेजे पाहावं तरी ताप आणि पाहु नये तरी ताप ? बाकी, रावसाहेब आणि तुमचं हाय हॅलो चालू आहे की बंद आहे ? ;) (ह.घ्या) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रात्री उठून पहावे लागावेत इतके महत्वाचे काहीही व्हॉटसअ‍ॅपवर येत नसते. महत्वाचे असेलच तर फोन करु शकतात माणसे. रात्रीचे सरळ बंद ठेवतो नेट. डोक्याला तापच नको. :) दिवसा नको तेव्हा म्युट करा ग्रुप्स. काही ग्रुपचे याक्टीव येडंमीन तुमची इनअ‍ॅक्टीवीटी पाहून स्वतःच काढतील तुम्हाला, चिंता नसावी. ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी आधीपासूनच कोणत्या ग्रुप मध्ये सामील झालो नाही. कुणी रिक्वेस्ट केली तर नम्रपणे टाळली. त्यामुळे योग्य तोच वापर होता. पुढे व्यवसायासंबंधी वापर सुरु झाला. मग त्यातला धोका लक्षात आला. क्लायंट लोक बेधडक whatsapp वापरून कम्युनिकेशन करत होते. अर्थात जे ओफिशियल ठरत नव्हते. उदा. एखादे डिझाईन whatsapp वर मागवणे क्लायंटसाठी सोपे असले तरी माझ्यासाठी वेळखाऊ होते. तसेच whatsapp वरुन दिलेल्या निर्णयांची जबाबदारी कुणीही कधीही टाळू शकत होते. शिवाय मोबाईलवर असल्याने २४ तास उपलब्ध असा काहीसा समज होत होता. त्यामुळे अनेक संभाव्य धोक्यांना टाळण्यासाठी whatsapp बंद केले. फ्री एसेमेस आहेत त्यात भागतं.

माझं म्हणाल तर मी वैतागलोय आणि एकीकडे मला ते हवंही आहे, अशी द्विधा अवस्था. कोणीही परस्पर ग्रूप मधे अ‍ॅड करतं. ग्रूपमधून निघून गेलो की पुन्हा मित्रांची नाराजी, अशा अनेक गोष्टी. आपण काय करताय ते नक्की कळवा
मीसुद्धा या सगळ्याला कंटाळून शेवटी व्हाट्सएप लैपटॉप वर वापरायला लागले आहे. वेळ मिळेल तेव्हा आनंदाने ऑनलाइन जाते. ;) जास्त कटकट नाही ,डोक शांत रहातं :) हल्ली घरच्यांसाठी म्हणून नवीन नंबर घेउन मोबाइल वर वापरते (अर्थात सक्त ताकीद देऊन की १७ जणाकडून फिरत आलेले विडियो/फोटो पाठवू नयेत)

व्हॉट्सअ‍ॅप आता डेस्कटॉपसाठी उपलब्ध झाले आहे ! https://web.whatsapp.com/ { हे फक्त क्रोमवर चालते, अजुन मी वापरुन पाहिले नाहीये. } बाकी ग्रूप मुळे फार घोळ होतात... बर्‍याचदा नको ते मेसेज नको त्या मंडळींना / ग्रुपला चुकुन पाठवले जातात... माझ्या कंपनीतल्या मंडळींच्या ३ ग्रूप मधे आहे, यातले एक सिनियर मॅनेजर्स मंडळीवाले आहेत... त्यांनी इतके ग्रूप बनवले की मी मोजायचे सोडुन दिले ! प्रत्येक ग्रुप मधे मला अ‍ॅड केल्यामुळे कोण मला कशासाठी अ‍ॅड करतो तेच कळेनासे झाले आहे, बर अनेक ग्रुपची नावे पण सारखी ठेवली ! परवा मीच शेवटी मेसेज केला... " माझा गझनी झाला आहे ! इतना सन्नाटा क्यों है भाई ? " एक ग्रुप चमत्कारी झाला आहे, कारण त्यातला प्रत्येक अ‍ॅडमिन दिसतो ! व्हॉट्सअ‍ॅप मधला हा बग आहे की असेही करता येते जे मला ठावूक नसावे ! नातेवाईक मंडळींचे ग्रुप आहेत... तिकडेही मी अधुन मधुन बागडुन येतो... {व्हर्चूअली तिळगुळ वाटले गेले,आणि पाखरं मंडळींनी देखील व्हर्चूअली लुटालुट { वाण } केली. } व्हॉट्अ‍ॅपवर वेगवेगळे ट्रेंड येत असतात... मग कधी रजनीकांत... कधी आलोकनाथ, कधी सनी लिऑनी...कधी आलिया भट, होउ दे खर्च तर व्हॉट्सअ‍ॅप मधे वळवळणार्‍या किड्याचा { हा अधुन मधुन जागॄत होत असतो.} ट्रेंड. सध्या जग प्रसिद्ध आठवले जाणारे कवी यांचा ट्रेंड जोरात आहे ! ;) तर वायफाय सुरु केल्यावर आणि व्हॉट्सअ‍ॅप ऑन केल्यावर मी १५-२० मिनीट फोनकडे पाहत नाही... तितका वेळ मेसेजचा पुर येत राहतो... मग काही वेळाने मोबल्याचा स्कीन पाहतो... प्रत्येक ग्रुपचे, व्यक्तींचे आकडे दिसतात...{म्हणजे किती मेसेज रिसीव्ह झाले त्याचे} वेळ मिळेल तसे वाचतो... कोण फोटो पाठवतो.कोण गाणी कोण तर कोण व्हिडीयो... हे सगळं झाल्यावर मग याचा माल त्याला आणि त्याचा माल याला... हे शक्योतो १५ मिनीटात आवरते घेतो... व्हॉट्सॅपवर कमीत कमी वेळ देण्याचा प्रयत्न करण्याचा नविन वर्षाचा संकल्प राहुनच गेला बघा... पण प्रयत्न करतो. ;) जाता जाता:- हल्लीच प्यारेला आमच्या ग्रुप मधे अ‍ॅडवला ! त्याने अ‍ॅड होण्याच्या आधी मला विचारले अ‍ॅडमिन कोण आहे ? मी उत्तर दिले :- मला नाही ठावूक ! { माझा गझनी झाला आहे हे त्याला कसे समजणार म्हणा ! } प्यारे :- अरे ज्या ग्रुप मधे आहेस त्या ग्रुपचा अ‍ॅडमिन कोण हे माहित नाही तुला ? मी :- नाही, विसरलो. पण सगळी चांगली मंडळी आहेत. डॉक पण आहेत { डॉकला माझा गझनी घाबरुन आहे, त्यामुळे ते बरोबर लक्षात ठेवतो. ;) } बिनधास्त ये आणि रहा... प्यारे :- पण... मी:- अ‍ॅडमिनला सांगितले अ‍ॅडवला तुला... आता बघ. प्यारे :- ठीक. ता.क :- प्यारे अजुन ग्रुपमधे आहे... हा प्रतिसाद देण्याच्या आधी मॄत्युंजयचा व्यनी आला आहे अ‍ॅडकरण्यासाठी आणि खटपट्या साहेबांनी अजुन त्यांना का अ‍ॅडवले गेले नाही याची विचारणा केली आहे... गझनी मोड "ऑन" :- कैसे मुझे तुम मिल गयी...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- दिल जान जिगर तुझपे निसार किया है... { Saajan Chale Sasural }