Skip to main content

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा (२०१४-१५) - यावेळी तरी लाज राखणार का?

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 08/12/2014 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
_________________________________________________________________________________ मंगळवार २५ नोव्हेंबर २०१४ या दिवशी ऑस्ट्रेलियाचा तरूण व भरवशाचा फलंदाज फिल ह्यूज स्थानिक सामना खेळताना एक उसळता चेंडू हेल्मेटच्या खाली कानाच्या मागे लागून मैदानावरच कोसळला व दोनच दिवसांनी गुरूवार २७ नोव्हेंबर २०१४ या दिवशी कोमातच वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्याचे दु:खद निधन झाले. :sad:

फिल ह्यूजला भावपूर्ण श्रद्धांजली! :sorry: _________________________________________________________________________________ भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियात २४ नोव्हेंबर २०१४ ते १० जानेवारी २०१५ या दरम्यान कसोटी क्रिकेट मालिका आयोजित करण्यात आली आहे. कसोटी मालिका संपल्यावर १६ जानेवारी २०१५ ते ३० जानेवारी २०१५ या दरम्यान भारत-इंग्लंड्-ऑस्ट्रेलिया हे ऑस्ट्रेलियात एकदिवसीय तिरंगी मालिकेत खेळतील. फिल ह्यूजच्या दु:खद अपघाती निधनामुळे मालिकेच्या वेळापत्रकात थोडासा बदल करण्यात आला आहे. या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा आहे. (त्यानंतर १४ फेब्रुवारी २०१५ पासून ११ वी मर्यादित षटकांची एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँड मध्ये होणार आहे. भारताचा पहिलाच सामना १५ फेब्रुवारीला पाकड्यांबरोबर आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी नंतर स्वतंत्र धागा उघडता येईल.) ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाविरूद्ध ४ कसोटी सामने सामने खेळेल. तत्पूर्वी भारत २ सराव सामने खेळेल. कसोटी मालिका संपल्यावर भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया तिरंगी मालिकेत एकमेकांबरोबर २-२ सामने खेळतील. ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारताचा कसोटी संघ असा आहे. धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), विराट कोहली, शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहीत शर्मा, सुरेश रैना, वृद्धिमान साहा, नमन ओझा, रविचंद्रन अश्विन, कर्ण शर्मा, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, वरूण एरॉन - लोकेश राहुल, नमन ओझा व कर्ण शर्मा यांना भारतीय संघात प्रथमच संधी मिळाली आहे. - २०११ च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात रहाणेला फक्त २ स्थानिक सामन्यात खेळविले होते. प्रत्यक्षात एकही कसोटी व एकदिवसीय सामन्यात त्याला खेळविले नव्हते. यावेळी तो दोन्ही प्रकारच्या सामन्यात नक्की खेळेल. - सध्या सुरू असलेल्या श्रीलंका विरूद्धच्या एकदिवसीय सामन्यात चांगली कामगिरी करत असलेल्या फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला न घेतल्याचे आश्चर्य वाटत आहे. तो फलंदाजी देखील बर्‍यापैकी करतो. कर्ण शर्माऐवजी तो उपयुक्त ठरला असता. - भारताची वेगवान गोलंदाजी भक्कम वाटते (भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, वरूण एरॉन ). त्या तुलनेत फलंदाजी तितकीशी भक्कम वाटत नाही. भारतीय खेळपट्ट्यांवर भीमपराक्रम करणारे फलंदाज ऑस्ट्रेलियातील जलद खेळपट्ट्यांवर कसे टिकतात ते बघायचं. - भारताने धोनी, साहा व ओझा असे ३ यष्टीरक्षक घेतलेले आहेत. - ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन तुफान फॉर्मात आहे. तो अत्यंत वेगवान व शरीरवेधी गोलंदाजी टाकतो. त्याच्या जोडीला पीटर सिड्ल, पॅटीन्सन, स्टार्क, बॉलिंजर, रायन हॅरीस इ. गोलंदाज असतीलच. जॉश हॅझलवूड हा नवा वेगवान गोलंदाज नुकत्याच संपलेल्या द. आफ्रिकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगलाच चमकला होता. तो देखील संघात असण्याची शक्यता आहे. या वेगवान मार्‍यासमोर ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर खेळणे अवघड आहे. - या दौर्‍यात पर्थच्या अत्यंत वेगवान खेळपट्टीवर कसोटी सामना आयोजित केलेला नाही. हे भारतासाठी सुचिन्ह आहे. पर्थवर भारत इतिहासात एकच सामना जिंकलेला आहे. - उजव्या मनगटाच्या दुखापतीमुळे धोनी अ‍ॅडलेडमधील पहिल्या कसोटीत कदाचित खेळणार नाही. त्याच्याऐवजी कोहली कर्णधार असेल. धोनीऐवजी बहुतेक वृद्धीमान साहा यष्टीरक्षक असेल. भुवनेश्वर कुमार देखील दुखापतीमुळे पहिले दोन कसोटी सामने खेळणार नाही. - भारत १९८६ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात सचिनशिवाय खेळणार आहे. सचिन यापूर्वी ऑस्ट्रेलियातील १९९२, १९९९, २००३, २००८ व २०११ या सर्व मालिकेत खेळला होता. - २०११-१२ च्या दौर्‍यातील बहुसंख्य खेळाडू आता भारतीय संघात नाहीत. सेहवाग, गंभीर, द्रविड, सचिन, लक्ष्मण, झहीर, हरभजन, विनयकुमार असे अनेक खेळाडू या संघात नाहीत. _________________________________________________________________________________ दौर्‍याचे सुधारीत वेळापत्रक सराव सामने २४ नोव्हेंबर - २५ नोव्हेंबर वि. क्रिकेट ऑस्ट्रेलिया इंटरनॅशनल इलेव्हन (स्थळ - अ‍ॅडलेड) ०४ डिसेंबर - ०५ डिसेंबर वि. क्रिकेट ऑस्ट्रेलिया इंटरनॅशनल इलेव्हन (स्थळ - अ‍ॅडलेड) कसोटी सामने (पहिले २ कसोटी सामने भा.प्र.वे. नुसार पहाटे ५:३० वाजता सुरू होतील व उर्वरीत २ कसोटी सामने पहाटे ५:०० वाजता सुरू होतील) पहिला कसोटी सामना : मंगळवार ९ डिसेंबर - शनिवार १३ डिसेंबर (स्थळ - अ‍ॅडलेड ओव्हल) दुसरा कसोटी सामना : बुधवार १७ डिसेंबर - रविवार २१ डिसेंबर (स्थळ - ब्रिस्बेन) तिसरा कसोटी सामना (खोकेदिन कसोटी सामना): शुक्रवार २६ डिसेंबर - मंगळवार ३० डिसेंबर (स्थळ - मेलबर्न) चौथा कसोटी सामना : मंगळवार ०६ जानेवारी - शनिवार १० जानेवारी (स्थळ - सिडने) ५० षटकांचे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (सर्व सामने भा.प्र.वे. नुसार सकाळी ८:५० वाजता सुरू होतील) (१) शुक्रवार १६ जानेवारी इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया (सिडने) (२) रविवार १८ जानेवारी भारत वि. ऑस्ट्रेलिया (मेलबोर्न) (३) मंगळवार २० जानेवारी भारत वि. इंग्लंड (ब्रिस्बेन) (४) शुक्रवार २३ जानेवारी इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया (टास्मेनिया) (५) सोमवार २६ जानेवारी भारत वि. ऑस्ट्रेलिया(सिडने) (६) शुक्रवार ३० जानेवारी भारत वि. इंग्लंड (पर्थ) (७) रविवार ०१ फेब्रुवारी - अंतिम सामना (पर्थ) _________________________________________________________________________________ भारताच्या ऑस्ट्रेलियातील २०११-१२ मधील मालिकेतील कटू आठवणी अजून ताज्या आहेत. या मालिकेत भारत सर्व ४ कसोटी सामने हरला होता. भारताचे बहुतेक सर्व स्टार खेळाडू (सेहवाग, गंभीर, लक्ष्मण, द्रविड, सचिन, कोहली, धोनी इ.) अपयशी ठरले होते. सचिनने पहिल्या दोन कसोटीत चांगली फलंदाजी केल्यावर उर्वरीत दोन कसोटीत तो अपयशी होता, तर कोहली पहिल्या दोन कसोटीत अपयशी व शेवटच्या दोन कसोटीच चांगला खेळला होता. उर्वरीत फलंदा़ज बहुतेक सर्व सामन्यात अपयशी होते. त्यामुळेच भारताचा सपाटून पराभव झाला होता. ऑस्ट्रेलियाच्या मायकेल क्लार्क (१ द्विशतक व १ त्रिशतक), पाँटिंग (१ शतक व ४ अर्धशतके), मायकेल हसी, डेव्हीड वॉर्नर यांनी फलंदाजीत चंगळ केली होती. गोलंदाजीत पॅटिन्सनने भारतीय फलंदाजांची हवा केली होती. श्रीलंका, ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या तिरंगी मालिकेत देखील भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळविता आला नव्हता. त्या मालिकेतील श्रीलंकेविरूद्ध शेवटचा सामना भारताच्या विशेषतः विराट कोहलीच्या तुफान फलंदाजीमुळे गाजला होता. अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्याचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी भारताला बोनस गुण आवश्यक होता. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करून ५० षटकात तब्बल ३२० धावा केल्यावर बोनस गुणासाठी भारताला ते आव्हान ४० षटकात पार करणे आवश्यक होते. भारताने ते आव्हान फक्त ३६.४ षटकात पूर्ण करून इतिहास घडविला होता. सेहवाग (२० चेंडूत ३०), सचिन (३० चेंडूत ३९), गंभीर (६१) आणि कोहली (१२० चेंडूत १४०) यांच्या तुफान फलंदाजीमुळे भारताने तो सामना बोनस गुणासह जिंकला. त्या सामन्यात मलिंगाचे पृथ्थकरण ७.२-०-९६-० इतके वाईट होते. त्या संघातील फारच थोडे खेळाडू आताच्या संघात आहेत. त्या दु:खद मालिकेनंतर गतवर्षी भारताने ऑस्ट्रेलियाला मायदेशात ४-० अशी जबरदस्त मात दिली होती. अश्विन (२९ बळी) व जडेजा (२२ बळी) यांनी ती मालिका गाजविली होती. आताचा भारतीय संघ तरूण आहे. कोहली, रहाणे, पुजारा इ. कडून खूप आशा आहेत. लोकेश राहुलला देखील संधी मिळावी. रोहीत शर्माने भारतातला फॉर्म तिथे टिकवून धरावा ही सदिच्छा. मुरली विजय, शिखर धवन आणि स्वतः धोनी ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर कसे खेळतात ते बघणे मनोरंजक ठरेल. कोहली ६ महिन्यांपूर्वी झालेल्या इंग्लंडमधील मालिकेत संपूर्ण अपयशी ठरला होता. हे अपयश धुवून टाकण्याची संधी त्याला आहे. भुवनेश्वर कुमार, शमी, उमेश यादव, वरूण एरॉन इ. वेगवान गोलंदाज ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर नक्की खूष होतील. उमेश यादवने मागील दौर्‍यात पर्थच्या खेळपट्टीवर ५ बळी मिळवून आपला दर्जा दाखवून दिला होता. या दौर्‍यानंतर लगेचच १४ फेब्रुवारीपासून विश्वचषक स्पर्धा सुरू होत आहे. या दौर्‍यातील कामगिरीवरच विश्वचषक संघातील खेळाडू निवडले जातील. त्याचेही दडपण खेळाडूंवर असेल. फिल ह्यूजच्या धक्कादायक मृत्युमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूदेखील चांगल्या मन:स्थितीत नाहीत. जेव्हा फिल ह्यूज मैदानावर कोसळला तेव्हा शेन वॉटसन, ब्रॅड हॅडिन, शॉन मार्श हे प्रत्यक्ष मैदानात क्षेत्ररक्षण करीत होते व त्यांच्या डोळ्यादेखत त्यांनी फिल ह्यूजला कोसळताना बघितल्यामुळे त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसलेला आहे. फिल ह्यूजचा जवळचा मित्र व मार्गदर्शक असलेल्या मायकेल क्लार्कला अश्रू अनावर झाले होते. अशा परिस्थितीत काहीशा दडपणाखालीच ऑस्ट्रेलियन्स पहिले १-२ कसोटी सामने खेळतील. परंतु कांगारू अत्यंत लढवय्ये आहेत व या परिस्थितीतून लवकरात लवकर बाहेर येऊन आपली नैसर्गिक लढवय्यी वृत्ती दाखवतील हे निश्चित. ऑस्ट्रेलियन भूमीवर गेल्या ३०-४० वर्षातील भारताविरूद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकांचा इतिहास भारताच्या दृष्टीने फारसा चांगला नाही. - १९७७-७८ मधील दुय्यम ऑस्ट्रेलियन संघाविरूद्ध खेळलेली ५ सामन्यांची मालिका भारत २-३ असा हरला होता. या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व ५ सामने निर्णायक ठरले व ऑस्ट्रेलियाने निवृत्तीनंतर ९ वर्षांनंतर परत बोलावून कर्णधारपद सोपविलेल्या बॉबी सिम्प्सनने दुय्यम संघ हाताशी घेऊन ही मालिका ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली. - १९८०-८१ मधील ३ सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. या मालिकेतील ६ डावांपैकी पहिल्या ५ डावात ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजविले होते. या मालिकेत संदीप पाटीलची तुफान फटकेबाजी पहायला मिळाली. ३ र्‍या कसोटीतील शेवटच्या डावात खोटा बाद दिल्याने संतापून कर्णधार गावसकर मैदान व सामना सोडून निघाल्यामुळे खळबळ माजली होती. याच डावात कपिलने अंगात ताप असताना जबरदस्त गोलंदाजी करून ५ बळी मिळवून कांगारूंना केवळ ८३ धावात गुंडाळून सामना जिंकून दिला होता. - १९८५-८६ मधील ३ सामन्यांची मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. या मालिकेत ३ र्‍या सामन्यात सामना जिंकून ऑस्ट्रेलियात प्रथमच मालिका जिंकण्याची भारताला उत्कृष्ट संधी होती. ५ व्या दिवशी विजयासाठी केवळ १२६ धावा करायच्या होत्या. भारताकडे श्रीकांत, शास्त्री, वेंगसरकर, अझरूद्दीन, मोहिंदर, गावसकर, कपिल, मोरे असे अनेक फलंदाज होते. त्या दिवशी शेवटच्या सत्रात पाऊस येईल असा देखील अंदाज होता. पावसाची शक्यत गृहीत धरून भारताने वेगात फलंदाजी करून १२६ धावा करून सामना जिंकायला पाहिजे होता. प्रत्यक्षात भारताच्या फलंदाजांनी अत्यंत संथ फलंदाजी केली. पाऊस अपेक्षेपेक्षा थोडा लवकर आल्यामुळे सामना थांबून अनिर्णित राहिला. पाऊस सुरू झाला तेव्हा भारताने २५ षटकात फक्त २ बाद ५८ धावा केल्या होत्या. खरं तर २५ षटकात १२६ धावा सहज झाल्या असत्या. अत्यंत ढिसाळ नियोजनामुळे भारताने सामना व मालिका जिंकण्याची दुर्मिळ संधी घालविली. भारताने आजतगायत ऑस्ट्रेलियात कधीही मालिका जिंकलेली नाही हे लक्षात घेता भारताने ही सुवर्णसंधी अक्षरशः वाया घालविली. - १९९१-९२ ची ५ सामन्यांची मालिका अत्यंत एकतर्फी झाली. भारताने ही मालिका ०-४ अशी गमाविली. ही मालिका वेंगसरकरच्या जीवनातील शेवटची मालिका ठरली. या मालिकेनंतर लगेचच होणार्‍या विश्वचषक स्पर्धेत संघात निवड न झाल्यामुळे वेंगसरकर क्रिकेटमधून निवृत्त झाला. या मालिकेतील ३ रा सामना अनिर्णित राहिला. त्यात शास्त्रीने द्विशतक व ४ बळी अशी अष्टपैलू कामगिरी केली होती. - १९९९-२००० ची ३ सामन्यांची मालिका हे एक दु:खद स्वप्न आहे. सचिनच्या नेतृत्वाखाली भारताने ही मालिका ०-३ अशी गमाविली. या मालिकेसाठी भारताचा निवडलेला संघ हा भारताच्या इतिहासातील सर्वात वाईट संघ होता. सचिन, द्रविड व लक्ष्मण वगळता उरलेले जवळपास सर्व खेळाडू अत्यंत सुमार होते. द्रविड व लक्ष्मण सुद्धा मालिकेत अपयशी होते. आगरकर या मालिकेत लागोपाठ ७ डावात शून्यावर बाद झाला होता. या मालिकेनंतर सचिनने कर्णधारपद कायमचे सोडले. - २००३-०४ ची ४ सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसरा सामना भारताने जिंकून आघाडी घेतली होती. परंतु तिसरा सामना हरल्यामुळे व चौथा अनिर्णित राहिल्यामुळे मालिका बरोबरीत सुटली. या मालिकेनंतर स्टीव्ह वॉ निवृत्त झाला. दुसर्‍या कसोटीत द्रविडने २४८ व नाबाद ७० अशी जबरद्स्त कामगिरी केली होती. आगरकरने देखील दुसर्‍या डावात ६ बळी मिळवून ऑसीजना २०० धावांच्या आत रोखून विजयाचे दार उघडले होते. - २००७-०८ ची मालिका पंच स्टीव्ह बकनर यांच्या अत्यंत खराब कामगिरीमुळे व सायमंड्स व हरभजन यांच्यातील वादावादीने गाजली. भारताने ही मालिका १-२ अशी गमाविली. दुसर्‍या कसोटीत बकनर यांनी अनेक चुकीचे निर्णय दिले व ते सर्व निर्णय भारताविरूद्ध गेले. त्याच सामन्यात सामन्याची केवळ २ षटके राहिली असताना भारताचे ७ गडी बाद होते व केवळ २ षटके खेळून काढायची होती. परंतु मायकेल क्लार्कने शेवटून दुसरे षटक टाकताना त्या षटकात ३ बळी मिळवून ऑस्ट्रेलियाला विजय प्राप्त करून दिला होता. या मालिकेतील पर्थमधील तिसर्‍या सामन्यात इशांत शर्माने एक जबरदस्त स्पेल टाकून पॉंटिंगला अक्षरशः घाम फोडला होता. या मालिकेत कुंबळे अत्यंत सभ्य व प्रगल्भ कर्णधार या स्वरूपात दिसला होता. - २०११-१२ ची मालिका अत्यंत वाईट गेली. भारत या मालिकेतील सर्व ४ सामने हरला. सचिन, सेहवाग, द्रविड, लक्ष्मण असे दिग्गज फलंदाज असूनही भारत अत्यंत वाईट पद्धतीने हरला. या मालिकेनंतर त्याच वर्षात द्रविड व लक्ष्मण निवृत्त झाले. गंभीर, द्रविड, लक्ष्मण व सेहवागची कामगिरी पूर्णपणे ढासळली. सचिन पहिल्या दोन सामन्यात तर कोहली शेवटच्या दोन सामन्यात चांगला खेळला. परंतु संघ म्हणून भारताची पूर्ण वाट लागली. सचिनशिवाय खेळली जाणारी गेल्या २३ वर्षातील ही पहिलीच मालिका. सचिनची उणीव अजून भासते आहे. सचिन निवृत्त झाल्यावर देव्हारा अजून रिकामाच आहे. आता नवीन देव शोधायचा. या सर्व कटूगोड आठवणींच्या पार्श्वभूमीवर २०१४-१५ मधील या दौर्‍यात भारत विजयी व्हावा हीच अपेक्षा आणि सदिच्छा!

वाचने 27656
प्रतिक्रिया 138

प्रतिक्रिया

उद्यापासून पहिला कसोटी सामना पहाटे ५:३० वाजता सुरू होणार आहे. ही मालिका संपल्यावर लगेचच १४ फेब्रूवारी पासून जवळपास मार्च अखेरीपर्यंत विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलँडमध्ये खेळविली जाणार आहे. पुढील जवळपास पावणेचार महिने क्रिकेटप्रेमींना पर्वणी आहे. रोज पहाटे उठावे लागणार.

सचिनची उणीव अजून भासते आहे. सचिन निवृत्त झाल्यावर देव्हारा अजून रिकामाच आहे. आता नवीन देव शोधायचा.
तो देव्हारा रिकामाच राहूदे...ती जागा फक्त खेळाडूच्या कौशल्यावर नसते मिळत त्यासाठी खरेपणा आणि सचोटीची तपश्चर्यासुध्धा लागते...पुढच्या सगळ्या पिढ्यातील खेळाडूंना तो देव्हारा रिकामा दिसला तरच त्या देव्हार्याचे महत्व त्यांना कळेल

In reply to by टवाळ कार्टा

१९८७ पर्यंत देव्हार्‍यात सुनील गावकरची प्रतिष्ठापना केलेली होती. त्याच्या निवृत्तीनंतर २ वर्षे देव्हारा रिकामा होता. १९८९ पासून २०१३ पर्यंत सचिन देव्हार्‍यात होता. आता गेले वर्षभर देव्हारा रिकामा आहे. आगामी काळात सचिन/सुनील सारखा एखादा झपाटून टाकणारा खेळाडू निर्माण व्हावा हीच आकाशातल्या बापाकडे प्रार्थना.

भुवनेश्वरकुमार पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधुन बाहेर (घोट्याच्या दुखापतीमुळे) :(

१९९१-९२ मधील दौर्‍याच्या काही विस्कळीत आठवणी १.
- १९९१-९२ ची ५ सामन्यांची मालिका अत्यंत एकतर्फी झाली.
हो या मालिकेतले ५ पैकी ४ कसोटी सामने आपण मोठ्या फरकाने गमावले होते. तिसरा सामना अनिर्णित राहिला होता. खरे म्हणजे आपण सिडनीमधला हा सामना जिंकणारच होतो. चांगली १७० धावांची आघाडी होती आपल्याकडे. दुसर्‍या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळलाच जाऊन आपण चक्क ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्येच डावाने मात देणार होतो. पण ऑस्ट्रेलियाने अ‍ॅलन बॉर्डरच्या ९१ धावांच्या मदतीने पाचवा दिवस रेटला आणि दिवसाच्या शेवटी ८ बाद १७३ अशी धावसंख्या आणत सामना बचावला. शेवटी पंचांनी अपुर्‍या प्रकाशामुळे शेवटची पाचेक षटके बाकी असतानाच खेळ थांबविला आणि या निर्णयावरून थोडा वादही झाला होता हे पण आठवले.या सामन्यानंतर 'आम्ही थोडक्यात वाचलो' अशी प्रतिक्रिया अ‍ॅलन बॉर्डरने दिली होती. २. याच दौर्‍यात वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाबरोबर तिरंगी सामनेही झाले होते.त्यावेळी रवी शास्त्री अगदी प्रचंड डोक्यात जायचा राव.टुकू टुकू करून इतके चेंडू खायचा की काही विचारू नका.या एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीला यायचे शास्त्री आणि श्रीकांत. श्रीकांत फटकेबाजी करायच्या नादात बाद व्हायचा. त्यानंतर संजय मांजरेकर हा कागदावर सर्वात तंत्रशुध्द पण तितकाच प्रचंड डोक्यात जाणारा दुसरा मनुष्य यायचा.शास्त्री आणि मांजरेकर ही जोडगोळी इतके चेंडू खायची की त्यानंतर विजय मिळणे बरेच कठिण होऊन बसायचे.त्याकाळी सचिन तीन विकेट झाल्यानंतर यायचा. १९९२ च्या विश्वचषकातील ऑस्ट्रेलियाविरूध्दच्याच सामन्यात रवी शास्त्रीने ६७ चेंडूंमध्ये २५ धावा काढल्या आणि तो सामना आपण एका धावेने गमावला होता.त्यानंतर रवी शास्त्रीविरूध्द संतापाची लाट उसळली होती आम्हा मित्रमंडळींमध्ये :) आणि त्यानंतरच्या पाकिस्तानविरूध्दच्या सामन्यात रवी शास्त्रीला वगळले होते याचाही आनंद वाटला होता :) ३. याच तिरंगी लढतीतला पहिला वेस्ट इंडिजविरूध्दचा सामना टाय झाला होता.आपण १२६ धावांमध्ये गुंडाळले गेल्यानंतर उपाहारानंतर दुपारी सामना बराच वेळ लावलाच नव्हता.पण नंतर वेस्ट इंडिजच्या ५०-६० धावांमध्ये ५ विकेट गेल्या हे कळल्यानंतर अगदी शेवटपर्यंत सामना बघितला होता हे पण आठवते. खूप मजा आली.

In reply to by क्लिंटन

ही मालिका व नंतरचा विश्वचषक अजून आठवतो. या तिरंगी मालिकेतच लारा या महान फलंदाजाचा उदय झाला होता. विश्वचषक स्पर्धेत एक अत्यंत विचित्र व अन्यायकारक नियम केला होता. जर प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाचा डाव संपल्यावर पावसामुळे वा इतर कोणत्याही कारणामुळे नंतर फलंदाजी करणार्‍या संघासाठी सामन्याची षटके कमी केली तर जितकी षटके कमी झाली आहेत तर प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाच्या धावातून कमीत कमी धावा केलेली तितकी षटके वगळण्यात येऊन उर्वरीत षटकात केलेल्या धावा गृहीत धरल्या जात असत. हा नियम शेवटी फलंदाजी करणार्‍या संघासाठी अत्यंत अन्यायकारक होता. भारत वि. ऑस्ट्रेलिया सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करून २४० धावा केल्या होत्या. नंतर पावसामुळे ३ षटके कमी होऊन भारताला फक्त ४७ षटके खेळायला मिळाली. या नियमानुसार ऑस्ट्रेलियाने आपल्या डावात कमीत कमी धावा केलेल्या ३ षटकातल्या धावा वगळून उरलेल्या ४७ षटकात केलेल्या धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक धावा केलेया ४७ षटकात २३८ धावा केल्या होत्या व सर्वात कमी धावा केलेल्या ३ षटकात फक्त २ धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या २४० धावातून फक्त २ धावा कमी होऊन २३८ धावा धरल्या गेल्या व भारतासाठी २३९ धावांचे लक्ष्य ठेवले गेले. परंतु भारताची तब्बल ३ षटके कमी झाली. त्यामुळे ५० षटकात २४१ धावांऐवजी भारताला ४७ षटकांत २३९ चे लक्ष्य दिले गेले. भारताचा डाव २३७ धावांत शेवटच्या चेंडूवर संपून फक्त १ धावेने भारत पराभूत झाला. रवी शास्त्रीने अत्यंत कूर्मगती फलंदाजी करून ६७ चेंडूत फक्त २५ धावा करून भारताच्या पराभवात सिंहाचा वाटा उचलला. या सामन्यानंतर भारतात शास्त्रीविरूद्ध संतापाची लाट उसळून त्याच्या घरावर दगडफेक झाल्याने पुढील सर्व सामन्यात त्याला वगळले होते. याच नियमाचा सर्वात जबरदस्त फटका द. आफ्रिकेला बसला होता. इंग्लंडविरूद्ध उपांत्य फेरीत धावांचा पाठलाग करताना शेवटच्या १३ चेंडूत २१ धावा करायच्या असताना पाऊस आला व सामना थांबला. सामना परत सुरू झाल्यावर २ षटके कमी झाल्याने आफ्रिकेला फक्त एकच चेंडू खेळायला मिळाला व लक्ष्य फक्त १ धावेने कमी झाल्याने १ चेंडूत २० धावा असे अशक्य समीकरण निर्माण होऊन आफ्रिका सामना हरले. या स्पर्धेत भारत पावसामुळे षटके कमी झालेल्या झिंबाब्वेविरूद्धच्या सामन्यात कसाबसा जिंकला. नंतर पाकड्यांविरूद्ध दणदणीत विजय मिळविला. परंतु उर्वरीत सर्व ६ सामने भारत हरल्यामुळे कामगिरी एकंदरीत निराशाजनक ठरली. ही स्पर्धा पाकिस्तानने केवळ नशीबाच्या जोरावर जिंकली. ८ पैकी पहिल्या ५ सामन्यात पाकडे ४ सामने हरले होते व एक सामना अनिर्णित राहून केवळ १ गुण मिळाला होता. परंतु उर्वरीत ३ सामने जिंकून ते उपांत्य फेरीत पोहोचून नंतर विश्वविजेते झाले. त्यांचा इंग्लंडविरूद्धचा सामना केवळ नशिबाने अनिर्णित राहिला. प्रथम फलंदाजी करताना पाकड्यांची धावसंख्या सर्वबाद ८३ होती. परंतु नंतर पावसामुळे खेळच न झाल्यामुळे सामना अनिर्णित राहून पाकड्यांना १ गुण मिळाला. हा गुण मिळाला नसता तर पाकडे उपांत्य फेरीत गेलेच नसते.

धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), विराट कोहली, शिखर धवन, मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहीत शर्मा, सुरेश रैना, वृद्धिमान साहा, नमन ओझा, रविचंद्रन अश्विन, कर्ण शर्मा, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, वरूण एरॉन
बापरे यापैकी एखाद-दोघांचा अपवाद वगळता इतर कोणालाही ओळखताही येणार नाही. कर्ण शर्मा, वृध्दिमान साहा, वरूण एरॉन, लोकेश राहुल ही नावे आयुष्यात पहिल्यांदाच ऐकली. सध्या भारतीय क्रिकेटमध्ये काय चालू आहे याविषयी प्रतिसादांमधून काही कळले तर गेल्या ७-८ वर्षात २०११ च्या विश्वचषकातील उपांत्य आणि अंतिम सामने हे दोन सामने सोडून इतर एकही सामना न बघितलेल्या माझ्यासारख्याला काहीतरी कळेल :) एकेकाळी क्रिकेट आणि राजकारण हे दोन पॅशन्स होते.आता एकच राहिले आहे :)

In reply to by क्लिंटन

कर्ण शर्मा हा एक नवीन फिरकी गोलंदाज आहे. नुकत्याच संपलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत तो खेळला होता. वृद्धिमान साहा हा यष्टीरक्षक गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघात आतबाहेर आहे. त्याला फारशी संधी मिळालेली नाही. वरूण एरॉन व उमेश यादव हे भारतातील सध्याचे सर्वात वेगवान गोलंदाज आहेत. दोघेही १४७-१४८ किमी वेगाने गोलंदाजी टाकतात. वरूण एरॉन गेल्या दोन वर्षांपासून भारतीय संघात आतबाहेर आहे. दुखापतीमुळे त्याला फारशी संधी मिळालेली नाही. लोकेश राहुल हा कर्नाटकचा तंत्रशुद्ध सलामीचा फलंदाज आहे. मागील वर्षी रणजी करंडक स्पर्धेत त्याने धावांचा रतीब टाकला होता. काही दिवसांपूर्वीच दुलीप करंडकाच्या सामन्यात त्याने दोन्ही डावात शतके केली होती. नमन ओझा हा यष्टीरक्षक अनेक वर्षे राजस्थान रॉयल्स संघाकडून आयपीएलमध्ये खेळत आहे. २ वर्षांपूर्वी त्याला भारतीय संघात काही एकदिवसीय सामन्यांसाठी घेतले होते, परंतु त्याला फारसे काही करता आले नव्हते. आता पुन्हा संधी मिळाली आहे. उर्वरीत खेळाडू गेल्या अनेक दिवसांपासून संघात आहेत.

लेख एक नंबर... फक्त ते जरा " अक्षर पटेल"च्या जागी "अक्षय पटेल" असे हवे होते का? कुणातरी आमची शंका-निरसन नक्कीच करेल. सध्या आम्ही, सचिनच्या निव्रुत्तीनंतर क्रिकेट न बघण्याची "मिपा-प्रतिज्ञा" घेतली आहे.

नाही नाही म्हणता ऑस्ट्रेलीयाची दमदार सुरवात झाली आहे. क्लार्क तर असा खेळत होता की जर दुखापत झाली नसती तर त्याने शतक नक्की केले असते. सद्यातरी विराट्ची देहबोली भांबावलेली दिसतेय. बघुया काय होतेय.

बाबौ ४.७६ ची धावगती आहे. ऑस्ट्रेलियाने ४०० चा आकडा पार केला तर आपल्याला सरळ सरळ कसोटी वाचवण्यासाठी खेळावे लागेल. इशांत सोडुन बाकी सगळे धावांचा रतीब घालतायत. धवनला परदेशातील कसोटींमधे अत्यंत सुमार कामगिरी करुन परत संधी मिळाली. माझे मतः धवन भारतीय खेळपट्ट्यांवरचा फलंदाज आहे आणि इशांत परदेशी खेळपट्ट्यांवरचा गोलंदाज आहे

@मुवि तो अक्ष पटेलच आहे अक्ष नव्हे!! @ सौंदाळा ते ४०० च्या वर गेल्यावर कसोटी वाचवायला खेळले तर पराजय नक्की.. पण त्यांनी ५५० करुनही आपण जिंकु शकतो (जे २००३ मधे घडलय) हा विश्वास ठेवल्यास ड्रॉ किंवा विजयाची शक्यता आहे!

In reply to by बाळ सप्रे

शंका निरसन केल्याबद्दल धन्यवाद.. सचिनने आणि मी क्रिकेट एकदमच सोडले... त्याने खेळणे आणि मला त्याला खेळतांना बघणे... हे एकूण तुमच्या आता लक्षांत आलेच असेल.

पहिला दिवस बरा गेला. शेवटच्या सत्रात भारताने चांगली कामगिरी केली (३९.२ षटकात ११६ धावा देऊन ४ बळी). पहिल्या दोन सत्रात कांगारूंनी वर्चस्व गाजविले. वॉर्नर पहिल्या चेंडूपासूनच सुटला होता. अर्थात त्याला सुरवातीला अनेक फुलपिच चेंडू ऑफस्टंपवर मिळाल्यावर त्याने ऑफसाईडला बदाबदा चौकार मारले. अजून स्टीव्हन स्मिथ नाबाद आहे आणि उद्या कारकून परत खेळायला येईल. सीड्ल् आणि मिचेल जॉन्सनही चांगली फलंदाजी करतात. खेळपट्टी बरीच ठणठणीत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया ५०० च्या पुढे नक्की जाईल असं वाटतंय. कर्ण शर्माऐवजी अश्विन हवा होता. ईशांत शर्माचे क्षेत्ररक्षण खतरनाक आहे. तो सीमारेषेवर चेंडू अडवताना वाकतच नाही. चेंडूच्या पाठीमागेही खूप हळू पळतो.

दुसर्‍या दिवशी पावसाने जवळपास ६० षटकांचा खेळ झाला नाही. आज दिवसाखेर ऑसीज ७ बाद ५१७ आहेत. उद्या सकाळी याच धावसंख्येवर डाव घोषित करून भारताला फलंदाजी करायला देतील. भारताला उर्वरीत ३ दिवसांपैकी दोन्ही डावात मिळून किमान अडीच दिवस (किमान २२५ षटके) तरी फलंदाजी केली पाहिजे. इंग्लंडमध्ये भारताचे शेवटचे ४ डाव एकूण १८० षटकात संपले होते. एक डाव अक्षरशः दिड सत्रात संपत होता. हे लक्षात घेता एकंदरीत परिस्थिती अवघड आहे.

गोलंदाजाच्या निराशाजनक (?)* कामगिरीनंतर भारतीय फलंदाजांनी पहिल्या दोन विकेट वगळता आतापर्यंत तरी चोख प्रत्युत्तर दिलेय. पहिल्या दोन विकेट कशा गेल्या ते पहायला मिळाले नाही. विराट तर चेतेश्वर पुजाराकडून धावा करून घेतोय असे वाटतेय. सचिन, सेहवाग, गंभीर, धोनी विना खेळणारा भारतीय संघ मार खाणार या टीकेला दोघांनी चोख प्रत्युत्तर दिलेय. दोन्ही संघांचे फलंदाज वर्चस्व गाजवतील असे सद्यातरी दिसतंय. एक मात्र दिसतंय कि भारतीय गोलान्दाजान्सारखी स्वैर गोलंदाजी ऑस्ट्रेलियन करत नाहीयेत. वोट्सन सुद्धा पूर्ण जोमात दिसत नाहीये. थोडक्यात हम भी कुछ कम नाही है. चेतेश्वर आणि विराट असेच खेळत राहिले तर गेलेला (?)" आत्मविश्वास बऱ्याच प्रमाणात परत येईल. * खेळपट्टी पाहता नवख्या भारतीय गोलंदाजांनी सुरवात तरी बरी केली होती म्हणायला जागा आहे. * नवख्या संघाने धीर नक्कीच सोडला नाहीये धवनने चेंडू शरीरापासून दूर खेळल्यामुळे यष्ट्यांवर ओढवून घेतला. (रिप्लाय मध्ये तरी असे दिसतेय) ऑस्ट्रेलियाने आक्रमक क्षेत्ररक्षण लावून फिरकीचा मारा सुरु केलाय. सामना अनिर्णीत राहील असे सद्यातरी दिसतेय

तिसर्‍या दिवसाखेर पहिल्या डावात भारत ५ बाद ३६९. तिघांची अर्धशतके व कोहलीचे शतक. खूप दिवसांनी परदेशात इतकी मोठी धावसंख्या आणि इतकी चांगली फलंदाजी बघायला मिळाली. ४ महिन्यांपूर्वीच इंग्लंडविरूद्ध इंग्लंडमध्ये भारत शेवटच्या दोन कसोटीतल्या ४ डावात मिळून एकूण १८० षटके खेळला होता. प्रत्येक डाव सरासरी ४५ षटके म्हणजे जेमतेम ३ तास टिकला होता. आज भारतीय फलंदाज परदेशात एकाच डावात चक्क ९७ षटके खेळले आणि अजून निम्मा संघ बाद व्हायचा आहे!

In reply to by श्रीगुरुजी

तरीही भीती कायम आहे. उद्या किमान ५० षटके खेळुन धावा समान किंवा आघाडी मिळवायला हवी. साहाकडुन खुप अपेक्षा आहेत. उद्या २०/३० षटकात डाव आटोपुन कांगारुंना ८०-१०० धावांची आघाडी मिळाली तर पारडे त्यांच्या बाजुने झुकेल. अ‍ॅडलेड्चा पहिल्या दोन डावांच्या धावांची सरासरी ५०० तर शेवटच्या दोन डावांच्या धावांची सरासरी दोनशे आहे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

बरोबर आहे. आपला डाव केव्हाही कोसळू शकतो. अजून भारत १४८ धावांनी मागे आहे. उर्वरीत १२ तासांपैकी भारताने दोन्ही डावात मिळून (दुसर्‍या डावात फलंदाजी करायला मिळाली तर) किमान ८ तास फलंदाजी केली पाहिजे. अन्यथा अवघड आहे.

घोटा दुखविलेल्या भुवनेश्वरकुमार ऐवजी भारतातून मुंबईच्या धवल कुलकर्णीला बोलाविण्यात आले आहे. उमेश यादवदेखील तंदुरूस्त नाही.

कोहलीचे शतक दमदार ,रोहित शर्मा आताच ४३ वर कॅच देउन बाद झाला... ड्रॉ होणार .... कोहलीचे कर्णधार म्हणून पदार्पणात शतक आणि सन्मानजनक ड्रॉ ... दौर्याची सुरुवात चांगली झालेय असे वाटते

ऑस्ट्रेलियाची पहीली विकेट गेली. ऑस्ट्रेलियाला सामना निकाली काढायचा असेल तर झट्पट धावा जमवून शक्य वाटेल असे टार्गेट भातासमोर ठेवतील. झटपट धावा जमवण्याच्या नादात ऑस्ट्रेलिया विकेट गमावू शकतो. संध्याकाळ्पर्यंत जर अजुन ३/४ विकेट गेल्या तर सामना रंगतदार अवस्थेत असेल.

अख्ख्या सामन्यातला परफेक्ट इनस्विंगर वर मोहमद शामी ने वॉट्सन चा त्रिफाळा उडवला !! सामन्यातला सर्वोत्तम चेंडू !! अरे महमदा कुठे लपवून ठेवला होतास हा स्वप्नवत इनस्वींगर

४ थ्या दिवसाखेर कांगारूंना ५ गडी गमावून ३६३ धावांचे आधिक्य मिळालेले आहे. आजची गोलंदाजी बरीचशी स्वैर होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने वेगवान खेळ केला. वॉर्नर, मार्श, स्टिव्हन स्मिथ असे सर्वजण लाँगऑफ, लॉंगऑन ला उचलून मारत होते, तरी बराच वेळ त्या भागात कोहलीने क्षेत्ररक्षक का लावला नव्हता कोणास ठाऊक? उद्या ७ तासांचा खेळ होईल. बहुतेक पुढे न खेळता ऑस्ट्रेलिया याच धावसंख्येवर डाव घोषित करतील. विजयाची आशा ठेवली तर फार मोठा अपेक्षाभंग होण्याची भीति वाटते. ५ व्या दिवशी पूर्ण दिवस खेळून पराभव वाचविणे हीच अपेक्षा आहे. अर्थात खेळपट्टी बरीचशी निर्जीव असल्याने ७ तासात ३६४ धावा करणे फारसे अवघड नाही. परंतु परदेशातील गेल्या काही कसोटीतील भारताची कामगिरी वाईट असल्याने हे आव्हान अशक्य वाटते. उद्या कोहलीने एक प्रयोग करून पहावा. धवनच्या जागी सलामीला रहाणेला पाठवावे व धवनला ५ व्या/६ व्या क्रमांकावर खेळवून पहावे.

ज्याची भिती होती तेच झाले. अवघड आहे. कसोटी अनिर्णयित राहिली तरी खुप बरं वाटेल भारताचे फलंदाज कोणत्याही खेळपट्टीवर चौथ्या डावात नांगी टाकतात.

उद्या भा.प्र.वे. नुसार पहाटे ५ वा. सामना सुरू होईल व १ वाजेपर्यंत चालेल. अंदाजे ९७ षटकांचा खेळ होईल. उद्या पावणेपाचला उठायला लागणार.

अखेर सामना हरलो. पण पराभवाचे फारसे दु:ख नाही. सामना खूपच रंगतदार झाला. भारताने, विशेषतः कोहली व विजयने खूपच सकारात्मक फलंदाजी करून भारताला विजयाच्या दिशेने नेले होते. चहापानाला भारत २ बाद २०५ असताना विजयाची चाहूल लागली होती. चहापानानंतर भारताला अंदाजे ३७ षटके मिळणार होती व विजयासाठी अंदाजे ४.३० प्रतिषटके या वेगाने १५९ धावा करायच्या होत्या व ८ गडी बाद व्हायचे होते. चहापानानंतर सुद्धा कोहली व विजयने सावध परंतु निश्चितपणे विजयाच्या दिशेने नेणारा खेळ केला. २ बाद २४२ पर्यंत पोहोचल्यावर कांगारूंच्या गटात चिंतेचे वातावरण पसरायला लागले होते. शतक करण्याच्या दबाबात विजय दुर्दैवीरित्या ९९ धावांवर पायचित झाला व तोच सामन्याला निर्णायक देणारा क्षण ठरला. त्याच षटकात रहाणेला चुकीचे बाद देण्यात आले. आधी धवनलाही असेच चुकीचे बाद देण्यात आले होते. याउलट विजय २४ धावांवर खेळत असताना लायनच्या गोलंदाजी अगदी व्यवस्थित पायचित झालेला असताना पंचांनी त्याला बाद दिले नव्हते. एकंदरीत भारताच्या दुसर्‍या डावात पंचांची कामगिरी सदोष ठरली. नंतर रोहीत शर्माही फार काळ टिकला नाही. रोहीत शर्मा हा कसोटीत खेळण्याच्या दर्जाचा खेळाडू नाही असे माझे पूर्वीपासूनच मत आहे. इंग्लंडमधील १ कसोटीत आणि या कसोटीत त्याला फारसे काही करता आलेले नाही. भारताचे ५ गडी बाद होऊन सुद्धा भारताने व कोहलीने आपले प्रयत्न सोडले नव्हते. १९ षटके शिल्लक असताना भारताला विजयासाठी ८० धावा हव्या होत्या. कांगारूंनी वेळकाढूपणा करून ४-५ षटके कमी टाकली असती तरी १४-१५ षटकात ८० धावा करणे शक्य होते. आणि इथेच घात झाला. लायनच्या षटकात कोहलीने पहिल्या २ चेंडूंवर ५ धावा केल्यावर पुढील ३ चेंडूंवर साहाने १ षटकार व १ चौकार मारून १० धावा घेतल्या व आवश्यक धावा १८.१ षटकात ६५ इतक्या कमी झाल्या. षटकातला शेवटचा चेंडू साहाने नुसता खेळून काढणे आवश्यक होते. आपल्यानंतर खाली एकही फलंदा़ज शिल्लक नाही हे लक्षात घेऊन घाई करायला नको होती. परंतु आधीच्या २ चेंडूंवर ६ व ४ अशा धावा केल्यामुळे त्याच भरात तो लायनचा आखूड टप्प्याचा चेंडू पुढे जाउन मारायला गेला व त्रिफळाबाद झाला. भारत ६ बाद २९९. आता फक्त शेपूट शिल्लक होते. कर्ण शर्माने एका बाजूने साथ द्यायचा प्रयत्न केला. परंतु दुसर्‍या बाजूने खेळणार्‍या कोहलीचा पूलचा फटका फसला व बॅटच्या वरच्या बाजूला लागून मिडविकेटच्या मागे झेल उडाला व तो बाद झाला आणि तिथेच भारताच्या विजयाच्या आशा पूर्ण संपल्या. सामना अचानक फिरला. हरता हरता अचानक कांगारूंना विजयाची चाहूल लागली. पुढच्या खेळाडूंनी चक्क हाराकिरी केली. अजून १४-१५ षटके शिल्लक होती. सामन्याची अधिकृत वेळ संपेपर्यंत ८-९ षटकेच पडली असती. कोणताही बेजबाबदार फटका न मारता निव्वळ टिकून रहाने आवश्यक होते. अशा वेळी शमीने काही कारण नसताना उचलून फटका मारला व झेलबाद झाला. नंतर आलेल्या वरूण एरॉनसमोर कांगारूंनी नवीन चेंडू घेऊन मिचेल जॉन्सनने पहिल्याच चेंडूवर त्याला पायचित करून ९ वा गडी बाद केला. शेवटचा इशांत शर्मा आला तेव्हा अंदाजे सामना संपायला अंदाजे २२-२३ मिनिटे शिल्लक होती. अधिकृतरित्या १२-१३ षटके शिल्लक असली तरी उर्वरीत २२-२३ मिनिटात जास्तीत जास्त ६ षटकेच झाली असती. एका बाजूने कर्ण शर्मा किल्ला लढवत होता. अशा वेळी इशांत शर्माला लायनचा चेंडू काही कारण नसताना पुढे जाऊन खेळण्याची अवदसा आठवली. तो वळलेला चेंडू शर्माला खेळताच आला नाही व हॅडीनने कोणतीही चूक न करता त्याला यष्टीचित करून सामना जिंकला. भारताने चहापानानंतरच्या एकाच सत्रात अंदाजे २७ षटकांत व १३० मिनिटांच्या खेळात ८ गडी गमावून जिंकत आलेला सामना घालविला. भारताच्या दुसर्‍या डावात धवन व रहाणे चुकीच्या निर्णयाचे बळी ठरले तर विजयला पंचाच्या चुकीचा फायदा मिळाला. साहा, शमी व ईशांत शर्माने बेजबाबदार खेळाचे प्रदर्शन केले. पण भारत हरला असला तरी भारताने सकारात्मक खेळ करून न डगमगता सामना जिंकायचा प्रयत्न केला याचा आनंद आहे. यापूर्वी २०११ पासून किमान ३ वेळा धोनी कर्णधार असताना ५ व्या दिवशी धावांचा पाठलाग करून सामना जिंकण्याचा प्रयत्न करण्याऐवजी धोनीच्या सूचनेनुसार टुकुटुकु खेळून भारताने सामना अनिर्णित ठेवण्यात धन्यता मानली होती (२०११ मध्ये द. आफ्रिकेत द. आफ्रिकेविरूद्ध, २०११ मध्येच वेस्टइंडिजमध्ये विंडीजविरूद्ध व २०१३ मध्ये भारतात विंडीजविरूद्ध). धोनी हा कसोटी सामन्यात अत्यंत बचावात्मक प्रकारचा कर्णधार आहे. त्या तुलनेत कोहलीने आपण नेतृत्व करीत असलेल्या पहिल्याच सामन्यात दोन्ही डावात शतक केले व त्याचवेळी सकारात्मक खेळ करून हातपाय न गाळता सहकार्‍यांना बरोबर घेऊन सामना जिंकण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला हे विशेष! खरं तर भारताने कसोटीसाठी कोहलीला कर्णधार करून धोनीला फक्त मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी कर्णधार करावे. दुसरा कसोटी सामना १७ डिसेंबरपासून ब्रिस्बेनला आहे. त्या सामन्यासाठी साहाच्या जागी धोनी येईल. त्या व्यतिरिक्त रोहीत शर्मा व ईशांत शर्माच्या जागी अश्विन/जडेजा व उमेश यादवची निवड करावी असे वाटते.

In reply to by श्रीगुरुजी

पण हाराकिरीची सवय जात नाही. जिंकायला साठ धावा हव्या होत्या, विराट सेट झालेला होता. धावा येत होत्या. एक चौकार मारल्यानंतर दूसरा चेंडुवर हवेत चेंडू मारायची काय गरज नव्हती. मारला तर तब्यतीने चेंडू फटकावयाला पाहिजे होता. सरळ मैदानाच्या बाहेर. पण अतिशय सोपा झेल दिला. मिडऑनला एकच क्षेत्ररक्षक होता आणि ग्याप मधे खेळायाला जागाही होती पण थकलेला असतांना रिस्क फटक्याची गरज नव्हती तिथेच आपला सामना गेला. -दिलीप बिरुटे (दुःखी)

In reply to by श्रीगुरुजी

मूळ लेख व हे विश्लेषण दोन्हीही खूप आवडले. कालच्या दिवशीची हाराकिरी तशी काही नवी नाही पण यावरून एक जुनी आठवणी वर आली. ९९ च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध सामना संपत आलेला असताना श्रीनाथ तारणहाराप्रमाणे फलंदाजी करत होता. तो आक्रमक (अति) आक्रमकणे फटके खेळू लागल्यावर माझ्या धाकट्या भावाने काकूळतीला येऊन म्हंटले, "श्रीनाथने काळजीपूर्वक खेळायला हवे, कारण नंतर सर्व सुरदासच आहेत". अन दुर्दैवाने हेन्री ओलोंगाच्या एका षटकातच आपला आपला खेळ खलास झाला. वर्षामागोन वर्षे गेली तरी सुरदासांची परंपरा दुर्दैवाने अबाधित आहे.

१. सतत ग्लोव्हज बदलणे २. पाठीमध्ये क्रँपस येउन डॉ़क्टरची मदत मागणे ३. बॉल बद्दल ( शेप ,साईझ, साईझ) तक्रार करणे ४. भांडण उकरून काढणे ५. २ बॉलच्या मधे वेळ खाणे ६ बॅड लाईट अपील करणे अशा गोष्टी करून १० मिनिटे तर सहज खाता आली असती. कोहली बाद झाल्यावर असे टॅक्तीक वापरायला हवे होते. बादवे साहा ला आपण टेस्ट खेळत आहोत याची जाणीव करून द्यायला हवी होती . अत्यंत बेजबाबदार फटका !

In reply to by कपिलमुनी

+ १ शमी आणि ईशांत शर्मा सुद्धा अत्यंत बेजबाबदारपणे खेळले.

खरे तर भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजी खेळण्यात पटाइत आहेत . त्यांनी इथे असे फिरकी गोलंदाजी समोर गळायला नको होते .

In reply to by सिरुसेरि

>>> खरे तर भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजी खेळण्यात पटाइत आहेत . त्यांनी इथे असे फिरकी गोलंदाजी समोर गळायला नको होते . भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजी खेळण्यात पटाईत आहेत हा एक भ्रम आहे. २०१२ मध्ये भारतात इंग्लंडविरूद्ध इंग्लंडच्या मधूसुदन पानसरे या फिरकी गोलंदाजाने भारताची हवा केली होती व भारत ती मालिका १-२ अशी हरला होता. याचवर्षी इंग्लंडमध्ये इंग्लंडचा दुय्यम फिरकी गोलंदाज मोईन अलीने ५ सामन्यात १९ बळी घेऊन भारताला १-३ असे हरविण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्याच मालिकेत भारताचे फिरकी गोलंदाज अश्विन व जडेजा पूर्ण अपयशी होते. आजच्या सामन्यात सुद्धा भारताच्या २० बळींपैकी १२ बळी लायन या फिरकी गोलंदाजाने मिळविले आहेत. फिरकी गोलंदाजी खेळण्यासाठी फलंदाजीचे तंत्र निर्दोष असावे लागते. दुर्दैवाने झटपट क्रिकेट व आयपीएल सारख्या तमाशात कसेही करून धावा करणे आवश्यक असल्याने तंत्राकडे लक्ष द्यायला कोणाकडेही फारसा वेळ नाही. पूर्वी गावसकर दोनदोन दिवस फलंदाजी करून नाबाद रहात असे. आता पूर्ण दिवस फलंदाजी करणारे फलंदाज फार थोडे दिसतात. कालांतराने तेही दिसेनासे होतील.

"त्याच षटकात रहाणेला चुकीचे बाद देण्यात आले. आधी धवनलाही असेच चुकीचे बाद देण्यात आले होते. याउलट विजय २४ धावांवर खेळत असताना लायनच्या गोलंदाजी अगदी व्यवस्थित पायचित झालेला असताना पंचांनी त्याला बाद दिले नव्हते. एकंदरीत भारताच्या दुसर्‍या डावात पंचांची कामगिरी सदोष ठरली. " ----- UDRS ची गरज आहे .

In reply to by सिरुसेरि

>>> UDRS ची गरज आहे . भारत या तंत्रज्ञानाला का विरोध करीत आहे हे अनाकलनीय आहे. दुर्दैवाने बीसीसीआय व सर्व क्रीडाक्षेत्रामध्ये निर्णयाचे अधिकार हे हातात कधीही बॅट न धरलेल्या राजकारणी व उद्योगपतींकडे असल्याने त्यांना याची आवश्यकता उमगत नाही. नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरूध्दच्या मालिकेत देखील पंचांच्या अनेक चुकीच्या निर्णयांचा फटका भारताला बसला होता. ज्या दिवशी बीसीसीआय आणि भारतीय क्रीडाक्षेत्र राजकारणी व उद्योगपती यांच्या अभद्र युतीतून मुक्त होईल तेव्हाच भारताची क्रीडाक्षेत्रात प्रगती व्हायला सुरूवात होईल.

धोनी हा एकदिवसीय व ट-२० सामन्यांसाठी जितका चांगला कर्णधार आहे, कसोटी सामन्यांसाठी तो तितकाच वाईट कर्णधार आहे. एकदिवसीय सामन्यात तो आक्रमक व कल्पक नेतृत्व करतो, परंतु कसोटी सामन्यात तो अत्यंत बचावात्मक व पराभूत मनोवृत्तीत नेतृत्व करतो. कालच्या सामन्यात तो कर्णधार असता तर सामना जिंकण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याने आपल्या संघाला नांगर टाकायला सांगून सामना अनिर्णित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले असते. यापुढे कसोटी सामन्यांसाठी कोहली व इतर सामन्यांसाठी धोनी अशी कर्णधारपदाची वाटणी करावी.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. कदाचित त्याला क्रिकेटला कायमचा रामराम ठोकावा लागेल. त्याच्या जागी २५ वर्षीय अष्टपैलू स्टीव्हन स्मिथची कर्णधारपदी नेमणू़क झाली आहे. इतक्या लहान वयात ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधारपद भूषविणारा स्टिव्हन स्मिथ हा किम व्ह्यूज नंतरचा पहिलाच कर्णधार. किम ह्यूज देखील वयाच्या २५ व्या वर्षी १९७९ मध्ये भारत दौर्‍यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार होता. परंतु त्याची कारकीर्द फार लवकर संपली. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द १९७७-८५ इतक्याच काळात होती.

उद्यापासून ब्रिस्बेन गॅबा येथे दुसरा कसोटी सामना भा.प्र. वेळेनुसार पहाटे ५:३० वाजता सुरू होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघात काही बदल आहेत. ऑस्ट्रेलियाचा मायकेल क्लार्क व रायन हॅरीस दुखापतीमुळे खेळणार नाहीत व पीटर सीडल् ला बाहेर ठेवण्यात आले आहे. क्लार्कच्या जागी शॉन मार्श आत येईल व स्टीव्हन स्मिथ कर्णधार असेल. मिचेल स्टार्क व जॉश हॅझलवूड हे हॅरिस व सिडल् ची जागा घेतील. भारतीय संघात साहाची जागा धोनी घेईल. कर्ण शर्माच्या जागी अश्विन व कदाचित ईशांत/शमी/वरूण च्या जागी उमेश यादव यायची शक्यता आहे. अ‍ॅडलेडची खेळपट्टी संथ व फलंदाजीला अनुकूल होती. परंतु गॅबाच्या खेळपट्टीवर हिरवे गवत असून खेळपट्टी वेगवान आहे. त्यामुळे या कसोटीत भारतीय फलंदाजांचा नक्की कस लागेल. अ‍ॅडलेड कसोटीमुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास नक्की उंचावलेला असेल. बघू उद्यापासून काय होतंय ते.

धोनी शेट हेलीकॉप्टरवाले आलेले आहेत...

In reply to by बाळ सप्रे

ते कप्तान म्हणून लिहायचे राहीलेच की, रात्र-पाळी चढली आम्हाला.... असो, तुम्ही खेळी-मेळीत घेतलेत त्याबद्दल मंडळ आभारी आहे...

धवनचे लै बिल झाले राव. हाकला आता त्याला गाबा सारख्या खेळपट्टीवर भारताची आश्वासक सुरुवात. बाकी इरास्मस या कसोटीलापण कासोटा खोचुन पंच म्हणुन उभा आहे हे पाहुन धक्का बसला.

आतापर्यंत चांगली फलंदाजी झालीये. धवन परदेशात फारसा टिकाव धरू शकत नाही. पुढील कसोटीत त्याच्याऐवजी लोकेश राहुलला संधी देऊन बघावी. आज पुजाराला पंचांनी ढापला. चेंडू हेल्मेटला लागून गेला होता तरी बाद दिला.

आजचा दिवस चांगला गेला. मिचेल मार्श व हॅझलवूड हे दोघेही जायबंदी झाल्याने उद्या कांगारूंच्या गोलंदाजीवर कदाचित मर्यादा येतील. आजच्यासारखीच उद्या फलंदाजी झाली तर ५०० नक्की.

In reply to by श्रीगुरुजी

मानलं आपल्याला! भविष्यात काय होइल याचा थोडाफार अंदाज प्रत्येक जण बांधतोच. बहुतेकांचे बहुतेक अंदाज चुकतातच. कसेही असले तरी आपले अंदाज जाहिर करणारे मात्र अगदीच थोडे असतात. सातत्याने असे अंदाज बांधून ते आपण इथे मांडत आहात - आणि त्यातील बरेचसे खरेही ठरतात. त्याबद्दल आपले अभिनंदन...

In reply to by असंका

तुम्ही उपरोधाने लिहिलंय का प्रामाणिकपणे लिहिलंय ते समजत नाहीय्ये. परंतु भारतीय फलंदाजांनी आज परत तोंडघशी पाडलं. केवळ ९७ धावात उरलेले ६ गडी गेले. रोहीत शर्मा हा कसोटीत खेळण्याच्या लायकीचा खेळाडू नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. तो झटपट ३०-४० धावा करून जातो हे योग्य नाही. पुढील कसोटीसाठी धवन, रोहित शर्मा व इशांत शर्माला बाहेर ठेवले पाहिजे. सामना अजून तरी दोन्ही बाजूंसाठी समसमान आहे. बघूया उद्या काय होतंय ते.

In reply to by श्रीगुरुजी

सहमत रैनाने आखुड ट्प्प्याच्या चेंडुवर बरीच मेह्नत आणि प्रगती केली आहे असे वाचले होते. रोहीत शर्माच्या जागी त्याचा समावेश व्हायला पाहिजे किंवा रायडु पण मधल्या फळीतला चांगला फलंदाज आहे. आजची भारताची गोलंदाजी आतापर्यंत तरी ठिक झाली आहे. १०० धावांच्या आसपास आघाडी मिळाली तर मज्जा येईल

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मिळाली मिळाली १०० ची आघाडी मिळाली! मायला ३ वाजता उठलो जरा ब्याटिंग बघायला मिळेल म्हणून, कसलं काय. मेल्यांनी डिवचलं बाउंसर आपटून आपटून, कांगारूचं शेपूटच मेलं धडाएवढं झालं. शेवटच्या चार पोरासोरांनी २०० कराव्यात.. ??

In reply to by मेघवेडा

भारतीय टीम बाबत आम्ही २/३ वर्षांपुर्वीच लिहून ठेवले आहे... (https://full2dhamaal.wordpress.com/2012/01/26/%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a4%…)

In reply to by श्रीगुरुजी

मनापासून...मागे आपण म्हणला होतात की उद्या आहे असाच डाव ऑस्ट्रेलिया डिक्लेअर करेल आणि तसेच झाले याचा संदर्भ माझ्या मनात होता.

In reply to by असंका

*OK* उद्या उपाहारापर्यंत भारत कांगारूंना ३२५ पर्यंत गुंडाळेल असं वाटतंय. कांगारु कदाचित ३५० पर्यंत जातील. परंतु भारताला आघाडी मिळणार हे नक्की. अर्थात हे दिवास्वप्न ठरण्याची देखील मोठी शक्यता आहे किंवा हे माझं विशफुल थिंकिंग असावं. असो.

In reply to by श्रीगुरुजी

दिवास्वप्नच ठरलय तुमचं गुरुजी.. ५०० चा टप्पा ओलांडलाय कांगारुंनी !! पुन्हा एकदा पराभवापासून वाचण्याची धडपड.. आणि सरतेशेवटी आणखी एक पराभव दिसु लागलाय !! २०११ च्या ईंग्लंड दौर्‍यापासून सुरु झालेली वाताहात संपण्याची चिन्हे दिसत नाहियेत.. :-(

In reply to by बाळ सप्रे

अशक्यप्राय अंदाज वर्तविल्याबद्दल स्वतःलाच दोन थोतरीत मारून घेतल्या. भारतीय गोलंदाज अत्यंत फालतू आहेत हे असा कसा विसरलो मी? लागोपाठ दुसर्‍या पराभवाची चिन्हे आहेत (असे वाईट अंदाज कधीही चुकत नाहीत).

बाहर कुत्ताभी नही यांना हाकललेच पाहिजे.

शेवटी पुन्हा एकदा लाजिरवाणा पराभव. वाईट वाटतंय आणि रागही येतोय. आता माझी सटकली, मला राग येतोय अशी अवस्था झालीये. पहिल्या डावात ६ बाद २४७ नंतर मिचेल जॉन्सनला जितकी खराब गोलंदाजी केली तशी इतर कोणत्याही देशाने केली नसती. आखूड टप्प्याचे चेंडू टाकून त्याला लॉलीपॉप दिले. याही डावात अश्विन पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. भारताचा डीआरएस ला असलेला अतार्किक विरोध अजून किती काळ चालणार आहे? पुढच्या कसोटीसाठी काढायचं तरी कोणाला? धवन, ईशांत शर्मा, रहाणे, अश्विन यांनी एकेका डावात बर्‍यापैकी कामगिरी करून आपली जागा पक्की करून ठेवलीये. धोनी, विजयचा तर प्रश्नच नाही. यादवने चांगली गोलंदाजी केलीये. वरूण एरॉन २-३ बळी घेतोय. रोहीत शर्मा मात्र सर्व ४ डावात अपयशी ठरलाय. पुजारा जम बसल्यावर बाद होतोय. कोहलीला काढण्याचं धाडस नाही (कोहली मागील ७ कसोटीतील १४ डावांपैकी १२ डावात अपयशी ठरला आहे). पुढील कसोटीसाठी रोहीतच्या जागी जडेजा किंवा रैना आत यावा. एरॉनच्या जागी शमी व धाडस करून पुजारा किंवा कोहलीच्या जागी लोकेश राहुलला संधी द्यावी असं वाटतंय. इतके बदल करूनही फार काही फरक पडेल असं वाटत नाही. पत्त्याच्या कॅटमध्ये सगळे ५२ पत्ते जोकरच असतील तर कितीही वेळा पिसून पत्ते वाटले तरी काय फरक पडणार आहे!

धोनी आता पराभवाची फुसकी कारणे देतोय. सकाळी सरावासाठी दिलेली खेळपट्टी म्हणे चांगली नव्हती. तिथे सराव करताना धवनच्या हातावर चेंडू लागला. सामना सुरू व्हायच्या जेमतेम ५-७ मिनिटे त्याने सांगितले की आपण खेळू शकणार नाही व त्यामुळे ड्रेसिंग रूममधील वातावरण अस्वस्थ झाले व कोहलीला बॅटिंगची मानसिक पूर्वतयारी करण्यासाठी जेमतेम ५-७ मिनिटे मिळाली. त्यामुळे सकाळच्या सत्रात फलंदाजी कोलमडली म्हणे. काय चाललंय हे. कोणत्याही क्षणी मैदानावर फलंदाजी करणार्‍या खेळाडूंव्यतिरिक्त अजून २ फलंदाज पॅड घालून तयार असतात. कोहली ४ थ्या क्रमांकावर खेळतो. तिसर्‍या दिवसअखेर भारताचा एक गडी बाद झाला होता. धवन व पुजारा नाबाद होते. त्यामुळे ४ थ्या क्रमांकावरील कोहली व ५ व्या क्रमांकावरील रहाणे पॅड बांधून तयार असणारच होते. दिवसाच्या पहिल्या षटकात किंवा पहिल्या चेंडूवर बळी गेला असता तर कोहलीला फलंदाजीला यावेच लागले असते. त्यामुळे त्याला मानसिक तयारी करायला फक्त ५-७ मिनिटे मिळाली हे कारण हास्यास्पद आहे. हाच धोनी जॉन्सनला टाकलेल्या ढीगभर आखूड टप्प्यांच्या चेंडूंचे आणि डीआरएस ला असलेल्या विरोधाचेही समर्थन करत होता. खराब गोलंदाजी आणि फलंदाजी केली हे कबूल करा ना. उगाच फुसकी आणि हास्यास्पद कारणे कशाला देता.

In reply to by प्यारे१

+ १.. तरी पण.... लिहायला काही हरकत नाही. निदान ४ लोकं वाचतात, चर्चा करतात, एक मानसिक समाधान मिळते. खेळीमेळीच्या अंगाने जाणारी कुठलीही चर्चा उत्तमच. असे माझे मत आहे.

उद्या खोकेदिनाच्या दिवशी (किंवा खोके उघडीप दिनाच्या दिवशी) भा.प्र. वेळेनुसार पहाटे ५:०० वाजता मेलबोर्न येथे तिसरा कसोटी सामना सुरू होत आहे. उद्या पहाटे साडेचारलाच उठायला लागणार. भारताने मेलबोर्नवर फेब्रुवारी १९८१ मध्ये ऐतिहासिक विजय मिळविला होता. पहिल्या डावात १८२ धावांनी मागे पडल्यावर भारताने दुसर्‍या डावात बर्‍यापैकी फलंदाजी करून ३२४ धावा केल्या होत्या. भारताचा दुसरा डाव वादग्रस्त ठरला. आधीच्या ५ डावात अपयशी ठरलेल्या गावसकरने एकाग्रतेची पराकाष्ठा करून दुसर्‍या डावात संयमी फलंदाजी केली होती. परंतु तो ७० धावांवर असताना पायचित बाद दिल्यावर गावसकरचा संताप अनावर झाला. चेंडू आपल्या बॅटची कड घेऊन पॅडवर गेला आहे अशी त्याची ठाम समजूत होती. त्यामुळे बाद नसताना बाद दिल्याच्या संतापात गावसकर सामना सोडून द्यायला निघाला होता. परंतु भारतीय संघ व्यवस्थापकांनी परिस्थिती संयमाने हाताळून वाद थांबविला. विजयासाठी दुसर्‍या डावात जेमतेम १४३ धावा करायच्या असताना कांगारूंचा डाव फक्त ८३ डावात आटोपला होता. कपिलने अंगात ताप असताना तुफान गोलंदाजी करून २८ धावात ५ बळी मिळविले. घावरीने २ व दोशीने २ बळी घेतले होते. घावरीने तुफान फॉर्मात असलेल्या ग्रेग चॅपेलला पायामागे चेंडू टाकून पहिल्याच चेंडूवर शून्यावर त्रिफळा बाद केले होते. त्यानंतर गेल्या ३३ वर्षात खेळल्या गेलेल्या ६ मालिकांमध्ये भारताला मेलबोर्नमध्ये क्सोटी सामन्यात विजय मिळविता आलेला नाही. उद्याच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघात जायबंदी मिचेल मार्शच्या जागी मधल्या फळीचा व सलामीचा फलंदाज जो बर्न्स पदार्पण करण्याची शक्यता आहे. भारतीय संघात रविंद्र जडेजा जायबंदी झाल्याने त्याच्या जागी तरूण अष्टपैलू फिरकी गोलंदाज अक्षर पटेलचा समावेश करण्यात आला आहे. अक्षर पटेलपेक्षा प्रग्यान ओझाला घ्यायला हवे होते. उद्याच्या सामन्यात खरं तर रोहीत शर्माच्या जागी अक्षर पटेलला घ्यायला हवे. परंतु ईशांत शर्माप्रमाणे रोहीत शर्मादेखील धोनीचा "नीलाक्ष तनय" असल्याने रोहीत शर्मा बाहेर जायची शक्यता कमी आहे. भारताने धाडस करून पुजाराऐवजी लोकेश राहुलला खेळविण्याचाही विचार करावा. फारसा आशा नाहीतच. निदान भारताने हा सामना एकतर्फी न करता चांगली लढत द्यावी व सामना रोमहर्षक करावा हीच किमान अपेक्षा आहे.