Skip to main content

शिवसेना - युद्धात हरले आणि तहातही हरले

लेखक श्रीगुरुजी यांनी बुधवार, 12/11/2014 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
सुरूवातीपासून शेवटपर्यंत उद्धव ठाकर्‍यांनी व पर्यायाने शिवसेनेने अत्यंत चुकीची पावले टाकली आणि त्यातूनच आज शिवसेनेची अवस्था 'युद्धात हरले आणि तहातही हरले' अशी केविलवाणी झाली आहे. १५ वर्षे सत्तेपासून लांब राहिल्यावर सत्ता अगदी हातातोंडाशी येऊनही आपल्याच चुकीमुळे घास तोंडात जाताजाता हातातून पडून मातीत मिळावा आणि पुन्हा एकदा उपाशी रहावे लागण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे. आणि ही वेळ शिवसेनेनेच स्वतःवर ओढवून घेतली आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेचच भाजपने जागावाटपाचा फॉर्म्युला बदलण्याची मागणी करायला सुरूवात केली होती. 'महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री मीच असणार' असे त्यावेळी कै. गोपीनाथ मुंड्यांनी जाहीररित्या सांगितले होते. केंद्रात सेनेला अत्यंत बिनमहत्त्वाचं फक्त १ मंत्रीपद देऊन भाजपने आपलं भविष्यातील धोरण स्पष्ट केलं होतं. भाजपचे धोरण ओळखूनच शिवसेनेने आपल्या चाली आखायला हव्या होत्या. परंतु सेना नेते आपल्याच अहंकारात, भ्रमात व नसलेल्या ताकदीच्या जोषात राहिले. भाजप जास्त जागा लढविण्यासाठी दबाव आणणार हे मे २०१४ मध्येच स्पष्ट झाले होते. अशावेळी मे ते सप्टेंबर या काळात शिवसेनेने धोरणीपणे विचारमंथन करून आपले डावपेच आखायला हवे होते. ११९ पेक्षा थोड्या जास्त जागा देऊन भाजपचे समाधान करावे, आपण कधीच निवडून आलो नाही व ज्या जागा भाजपलाही जिंकणे अशक्य आहे अशा जागा देऊन त्याग केल्याचा आव आणावा, ११९ पेक्षा थोड्या जास्त जागा देऊन त्या बदल्यात महत्त्वाची मंत्रिपदे देण्याचे जाहीर आश्वासन भाजपकडून घ्यावे व त्या बदल्यात केंद्रात जास्त व महत्त्वाची मंत्रिपदे मागून घ्यावीत, हे सुरू असतानाच मनसे व इतर काही स्थानिक पक्षांशी बोलणी करून भाजपविरूद्ध पर्यायी आघाडी तयार करावी असे अनेक पर्यात शिवसेनेला उपलब्ध असताना शिवसेना नेते गाफील राहिले. भाजप कदापिही युती तोडणार नाही, ज्या भाजपला आपण २५ वर्षे आपल्या तालावर नाचविले आहे तो भाजप यापुढेही आपल्याच तालावर नाचत राहील, आपण म्हणू तसेच होईल या भ्रमात शिवसेना नेते राहिले. सुरेश प्रभू, मनोहर जोशी इ. समंजस नेत्यांना वाळीत टाकून उद्धव ठाकरे अत्यंत उथळ, वाचाळ, अविचारी असलेल्या व अजिबात दूरदृष्टी नसलेल्या संजय राऊत, रामदास कदम, रावते, प्रेम शुक्ला इ. नेत्यांवर विसंबून राहिले व त्याची फळे शिवसेनेला मिळाली. ४ सप्टेंबरला अमित शहा मुंबईत येणार होते. त्यांनी स्वतःहून मातोश्रीवर येऊन आपली भेट घ्यावी अशी उद्धव ठाकर्‍यांची इच्छा होती. परंतु त्यांनी अमित शहा व मोदी या जोडगोळीला ओळखण्यात चूक केली. हे दोघे भाजपच्या पूर्वीच्या नेत्यांप्रमाणे प्रादेशिक पक्षांपुढे झुकणारे नसून अत्यंत धोरणी व प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व सहन न करणारे आहेत हे त्यांच्या लक्षातच आले नाहीत. अमित शहा मुंबईत येऊन उद्धव ठाकर्‍यांना भेटणार नाहीत हे समजल्यावर तिळपापड होऊन शिवसेनेने 'शहाणा हो' ही पोस्टर्स सोशल मिडियातून पाठवायला सुरूवात करून त्यांना डिवचले. अमित शहांना डिवचणे म्हणजे थेट मोदींनाच डिवचण्यासारखं होतं हे सेना नेतृत्वाला कधी समजलंच नाही. अमित शहांनी शहाणपणा दाखवून याकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्यावर शेवटी उद्धव ठाकर्‍यांना अमित शहांना मातोश्री भेटीचे सन्मानपूर्वक निमंत्रण पाठवावं लागलं आणि इथेच शिवसेना झुकायला आणि डाव हरायला सुरूवात झाली. नंतर प्रत्यक्ष जागावाटपाची बोलणी सुरू असताना सुरवातीला भाजपने १३५-१३५-१८ असा फॉर्म्युला सुचविला होता. भाजपची ताकद शिवसेनेच्या तुलनेत दीडपट होती. त्यानुसार भाजप १६०-१७०, शिवसेना १००-११० व मित्रपक्ष १८ असेच जागावाटप हवे होते. असे असतानाही भाजपची मागणी जास्तीत जास्त १३५ जागांची होती. नंतरच्या चर्चेत भाजप १३०-१४०-१८ व त्यानंतर १२५-१४५-१८ इतका खाली उतरला होती. शिवसेनेला ही उत्कृष्ट संधी होती. भाजप १२५ जागा लढवत असल्याने भाजपला जास्तीत जास्त १०० जागा जिंकता आल्या असत्या व त्यामुळे भाजप बहुमतापासून खूप दूर राहिला असता (आता भाजपने १२२ जागा जिंकल्याने फार थोड्या जागांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज आहे.). शिवसेनेला १४५ जागा लढवून कदाचित भाजपपेक्षा जास्त जागा जिंकण्याची व पर्यायाने मुख्यमंत्रीपद मिळविण्याची संधी होती. जरी भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या तरी उपमुख्यमंत्रीपद व इतर अनेक महत्त्वाची मंत्रिपदे मिळाली असती. युती करून एकत्र लढल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी ला प्रत्येकी ३० पेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या व राष्ट्रवादीला खूप कमी जागा मिळाल्यामुळे भाजपला पाठिंबा देउन उपयोगच झाला नसता. पर्यायाने भाजपला सर्वार्थाने शिवसेनेवरच अवलंबून रहावे लागले असते. दुर्दैवाने उद्धव ठाकरे स्वतःच्या अहंकाराचे बळी ठरले. युती तुटल्यावर सुद्धा स्वतःच्या अहंकारामुळे मनसेबरोबर नवीन आघाडी त्यांना करता आली नाही. भाजपने आधीच योजना आखून सर्व मित्रपक्षांना स्वतःच्या बाजूला वळवून शिवसेनेला पूर्ण एकाकी पाडले. युती तुटली ही वस्तुस्थिती मान्य करून हे वास्तव समंजसपणे स्वीकारण्याऐवजी शिवसेनेने प्रचारात असभ्य पातळी गाठली. सामनातून व सभांमधून सातत्याने अमित शहा व मोदींना लक्ष्य करून त्यांच्याविरूद्ध अत्यंत असभ्य व नकारात्मक प्रचार केला गेला. त्यांच्याबरोबरीने मित्रपक्षांचे राजू शेट्टी, रामदास आठवले, जानकर इ. ना ही लक्ष्य केले. शेवटी खडसेंविरूद्धही अत्यंत नकारात्मक प्रचार केला. महाराष्ट्रातील लोकांना मोदी हवे आहेत व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभारातून मुक्ती हवी आहे हे सेनेने न ओळखता काँग्रेस-राष्ट्रवादी ऐवजी भाजपलाच आपला मुख्य शत्रू मानण्याची घोडचूक केली. मोदींना अफझलखानाची उपमा देणे, अमित शहांना आदिलशहा-कुतुबशहाची उपमा देणे, मोदींच्या तीर्थरूपांचा उद्धार करणे, आदित्य ठाकरे सारख्या पोराला चर्चेसाठी पाठविणे अशा अनेक घोडचुका सेनेने केल्या. याउलट भाजपने समंजसपणे शिवसेनेच्या प्रचाराकडे दुर्लक्ष करून आपला सकारात्मक प्रचार सुरू ठेवला व सेनेचे आपोआप खच्चीकरण होत गेले. त्याचेच परीणाम निकालात दिसले. भाजपच्या तुलनेत जेमतेम निम्म्या जागा मिळवून युतीतला मोठा भाऊ खरोखर कोण होता याचे जनतेनेच उत्तर दिले. तरीही भाजपला स्पष्ट बहुमत न मिळणे व आपल्याकडे तब्बल ६३ आमदार असणे हे शिवसेनेकडे हुकमी एक्के होते. त्यांनी आपली पाने नीट खेळली असती तर त्यांना बर्‍याच गोष्टी मिळविता आल्या असत्या. कदाचित सेनेला अडीच वर्षांकरता मुख्यमंत्रीपदही मिळविता आले असते. ज्या दिवशी निकाल लागले त्याच दिवशी सेनेने भाजपला पाठिंबा जाहीर करून सर्वप्रथम भाजपला मिळू शकणारी राष्ट्रवादीची रसद रोखायला हवी होती. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही हे एकदा नक्की करून नंतर भाजपकडून आपल्याला हवे ते सेनेला मिळविता आले असते. एकदा सेनेचा पाठिंबा घेतल्यावर त्यांना लाथाडून नंतर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणे भाजपला अत्यंत अवघड झाले असते. हे न करता शिवसेना पुन्हा एकदा गाफील राहिली. भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार नाही व शेवटी त्यांना आपलेच पाय धरावे लागतील या भ्रमात सेना नेते राहिले. भाजपने चातुर्याने सेनेला बोलण्यात गुंतवून अपक्ष व इतर लहान पक्षांचा पाठिंबा मिळवून आपली गरज जेमतेम ७-८ आमदारांवर आणली व राज्यपाल व सभापती आपल्याच पाठीशी राहणार असे धोरण आखून शिवसेनेच्या मदतीशिवात विश्वासदर्शक ठराव मंजूर करुन घेऊन शिवसेनेचे मानेवरील जोखड कायमचे उतरविले. भारतीय मतदार व्यक्तिगत असभ्य टीका व नकारात्मक प्रचार कायमच नाकारतो हे शिवसेनेच्या पराभवामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले. शिवसेनेच्या जागी मायावती असती तर तिने अत्यंत चातुर्याने पत्ते खेळून स्वत:च्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद मिळविले असते. किंवा राकाँ, काँ बरोबर मोट बांधून स्वतःचाच मुख्यमंत्री बनविला असता. दुर्दैवाने शिवसेना नेत्यांकडे धोरणीपणाचा संपूर्ण अभाव व अहंकार, स्वतःच्या नसलेल्या ताकदीबद्दल भ्रम, उर्मटपणा, अविचारीपणा, प्रक्षोभक शब्द, उथळ्पणा व असंमजपणा याशिवाय दुसरे काहीच नसल्याने शिवसेना युद्ध हरलीच पण तहातही हरली. ही निवडणुक शिवसेनेच्या अंताचा प्रारंभ ठरणार असे आता वाटत आहे.

वाचने 122342
प्रतिक्रिया 256

प्रतिक्रिया

In reply to by कपिलमुनी

पेपर ला आले होते. बिधीमंडळाची बैठक चालू होयच्या सकाळी मीटी़ंग झाली होती. त्यात ठरल्या प्रमाणे शिवसेनेचे लोक मतदानाची मागणी करायच्या ऐवजी सभागृह सोडुन गेले. मग आवाजी मतदान झाल्यानंतर आत आले. मधल्या मधे काँग्रेस ला पूर्ण मूर्ख बनवण्यात आले. त्यांचे ५ आमदार मात्र निलंबित झाले. मी आधी लिहल्या प्रमाणे, शिवसेनेला झाकली मुठ झाकलीच ठेवायची होती. नाहीतर १०-१२ मते कमी दिसली असती तर लाज निघाली असती. भाजपला पण उघडपणे राष्ट्रवादीचा पाठींबा घ्यायचा असे दाखवायचे होते. सगळ्यांनी त्यांना जे मिळवायचे ते मिळवले, काँग्रेस मात्र मूर्ख बनली.

राज्यात वस्तू आणि सेवा कर(जीएसटी) लागू झाल्याशिवाय स्थानिक संस्था करप्रणाली (एलबीटी) रद्द न करण्याच्या पावित्र्यात राज्य सरकार असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. त्यामुळे निवडणूक काळात एलबीटी रद्द करण्याच्या आश्वासनावर फडणवीस सरकारने घुमजाव केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्याची सध्याची आर्थिक स्थिती पाहून एलबीटी आणि जकात कर रद्द करण्यामागच्या तांत्रिक अडचणींची सविस्तर माहिती व्यापारी संघटनांना देणार असून राज्यात जीएसटी लागू होईपर्यंत एलबीटी रद्द करता येणार नाही याबाबत त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही फडणवीस पुढे म्हणाले जाग्यावर पलटी. प्रचारात तर म्हणाले होते की सत्तामिळाल्यावर ५ दिवसात एलबीटी काढुन टाकु? आता काय ?

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/BJP-Governer/… आवाजी मतदानाच्या बळावर विश्वासदर्शक ठराव जिंकणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारने सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेली संख्याबळाची आकडेवारीच राज्यपालांकडे दिली नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे सत्ता सिंहासनावर बसलेल्या भाजपासोबत नेमके किती आमदार आहेत, याविषयी राज्यपालसुद्धा अंधारात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ------------ राज्यपाल भले अंधारात असतील परंतु

इथले भक्त आणि भगत यांना नक्कीच आकडा माहीत असेल खरतर माहिती इथे मिपावर विचारायला हवी होती गुरुजींनी नक्कीच सांगितली असती. गुरुजी तर बहुमत आहे असे छातीठोकपणे सांगत आहे इतके तर फडणवीस साहेब देखील कधी सांगत नसतील


In reply to by दिवाकर देशमुख

पवारांनी राष्ट्रवादी तटस्थ होती असे सांगितले आहे , म्हणून सद्य परीस्थितीमधे भाजपा कडे बहुमत आहे

पण मी म्हणतो कोण तुम्ही ? अरे संख्याबळ काय? तुम्ही बोलताय किती ? वाघनख कोथळा आईभवानी असल्या फालतू शब्दांना भुलून यांना अजूनही महाराष्ट्रात मते मिळतात हेच आश्चर्य. रिकामटेकडी पोरे जमवून छत्रपती महाराजांच्या नावाने घाणेरडे राजकारण करणारा खंडणी बहाद्दरांचा पक्ष हा … महाराष्ट्राला गुंडांचा प्रदेश म्हणून ओळख मिळवून देण्यात यांचा बहुमोल वाटा आहे । खळ-खट्यक हे यांचच चुलत घराणं. खरेच याच्यासमोर १० मंत्रीपदांचे तुकडे फेकायला हवे होते म्हणजे यांच्या ह्या डरकाळ्या (!!) थांबल्या असत्या । तसे जाहले असते तर मात्र भाजप यांच्यासाठी मित्रपक्ष ठरला असता ना ? आणि भाजप ने पाठींबा घेतला राष्ट्रवादीचा म्हणून राष्ट्रवादी ची प्रकारणे बाहेर पडणार नाहीत हा जावईशोध कसा लावला ? सत्ता मिळवण्यासाठी आणि काम करण्यासाठी हा पाठींबा घेतला असे गृहीत धरले तरी सत्ता टिकवण्यासाठी भाजपेई लाचारी करतील हे गृहीतक कुणाच्या सुपीक डोक्यातून आले ? का सगळीकडे कोन्ग्रेसी चष्म्याने बघायची सवयच लागली आहे आपल्याला ? बडे साहेब … अभी खेल शुरू हुआ नाही और आपने खात्म भी कर दिया ??

अचानक उद्भवलेल्या प्रकृतीच्या एका गंभीर समस्येमुळे ७-८ दिवस मिपावर यायला जमले नाही. दरम्यान या धाग्याने द्विशतकी मजल मारलेली दिसतेय. काही दिवसांनी परत आल्यावर प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करेन.

In reply to by श्रीगुरुजी

प्रकृती स्वास्थासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. लवकरात लवकर औषधांचा गुण येऊन प्रकृतीस आराम पडो हिच सदिच्छा...!

In reply to by कपिलमुनी

प्रभाकर पेठकर, कपिलमुनी, शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आता बराच बरा झालोय. परंतु तलवार परजण्याचे त्राण नाहीत. या धाग्यावर बरेच प्रतिसाद आलेले दिसताहेत. परंतु सध्या उत्तर देण्याएवढे त्राण नाहीत. नंतर कधीतरी उत्तर देईन.

भाजप-शिवसेना चर्चेचे गुर्‍हाळ अजून सुरू दिसतेय. यातून फारसे काही भरीव निष्पन्न होण्याची शक्यता नाही. एखादा तोडगा निघाला तरी तो फार काळ टिकणार नाही व महाराष्ट्रात काही काळातच मुदतपूर्व निवडणुक होईल असं वाटतंय. भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी एक ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे. आपल्याला शिवसेनेचा पाठिंबा हवा आहे की नको हे एकदा भाजपने नक्की ठरवावे. जर पाठिंबा नको असेल तर सर्व बोलणी बंद करून आहे त्या अवस्थेत जितके दिवस सरकार चालेल तितके दिवस चालवावे व नंतर नाही जमल्यास राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे. जर पाठिंबा हवा असेल तर शिवसेनेच्या मागण्या मान्य करून युतीचे सरकार चालवावे. आपण भाजपला पाठिंबा देणार की नाही हे शिवसेनेने देखील नक्की ठरवावे. जर पाठिंबा द्यायचा नसेल तर आपण विरोधी पक्षात बसणार हे जाहीर करून सर्व बोलणी थांबवावीत व भाजपला स्वतःच्या नशीबावर सोडून देऊन सकारात्मक विरोधी पक्षाची भूमिका पार पाडावी. जर पाठिंबा द्यायचा असेल तर बिनशर्त पाठिंबा द्यावा. काहीही झाले तरी राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या पाठिंब्यावर हे सरकार फार काळ चालणार नाही हे नक्की. दोन्ही पक्ष अत्यंत उपद्रवी व सत्तेसाठी हपापलेले असून फडणवीसांना त्रस्त करून सोडतील हे नक्की. स्वाभिमानी मावळ्यांची भाषा करणारी शिवसेना प्रत्यक्षात सत्तेसाठी कासावीस झालेली आहे असेच दिसून येत आहे. अशा परिस्थितीत फडणविसांनी राजीनामा देऊन पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे हे उत्तम.

In reply to by श्रीगुरुजी

शिवसेना सत्तेत भागिदार झाले तर सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. किमान साडेचार वर्षे तरी... जागा वाटपावरुन नवीन घोळ त्यानंतर सुरु होतील.

In reply to by रघुपती.राज

भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण, दुसरे काय? ऑल सेड अँड डन, त्यातल्या त्यात सोपा, कमी क्लिष्ट, दूरवरचा महत्वाचा मोठा फायदा करून देणारा निर्णय घेणेच इष्ट होते. निरर्थक राजकारणाच्या भोवर्‍यात अडकून भाजपने स्वतःचे हसे करून घेतले. शेवटी त्यांना ही समज खूप उशीरा आली. तोपर्यंत अब्रूचे धिंडवडे निघालेच होते. एनीवे, देर आये, दुरुस्त आये असंच म्हणावं लागेल. आता बघू हे लग्न किती टिकतंय ते...

In reply to by समीरसूर

भाजपचे हसे झाले का अब्रूचे धिंडवडे निघाले हे माहीत नाही, परंतु शिवसेनेचे हसे झाले हे मात्र नक्की. भाजपने सर्व आघाड्यांवर सेनेला झुकविले. अगदी शेवटच्या तहात सुद्धा शिवसेना हरली. शिवसेनेला अफझलखानाच्या सैन्यात साध्या शिपुरड्याची भूमिका मिळाली.

In reply to by श्रीगुरुजी

भाजपचे हसे झाले का अब्रूचे धिंडवडे निघाले हे माहीत नाही
परंतु
शिवसेनेचे हसे झाले हे मात्र नक्की

In reply to by श्रीगुरुजी

शिवसेनेचे हसे झाल्यासारखे वाटले नाही. ज्यांचा विरोधी पक्ष नेता होता तो आता मंत्री होतोय यातच शिवसेनेला सत्तेत सामावून घेणे ही भाजपची गरज होती हे स्पष्ट करते. त्याआधी राष्ट्रवादीला हाताशी धरून मात्र भाजप मुबलक टीकेची धनी झाली. फडणवीसांनी जाहीर कबुली दिली की त्यांना राष्ट्रवादीचा संग घेतल्याने किती टीका सहन करावी लागली. शिवसेनेला जितकी सत्तेची गरज होती त्यापेक्षा जास्त गरज भाजपला सेनेची होती हेच या नाट्यावरून दिसले. शिवसेनेला झुकवणे हा भाजपचा पूर्वीचा सूर नव्हता. शिवसेना नकोच असा त्यांचा अविर्भाव होता. त्यांना वाटलं काहीतरी युक्ती करून शिवसेनेला बाहेर ठेवता येईल; पण तसे झाले नाही. मी आधीच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे काकांनी भाजपची हवा टाईट केल्यावर भाजपला चूक उमगली; म्हणूनच तर भाजप बोलणी सोडून द्यायला तयार नव्हती. तोपर्यंत लोकांनी भाजपवर येथेच्छ टीका केली होती. आता जे त्यांनी केले हेच त्यांनी जर आधी केले असते तर भाजप एवढी टीकेची धनी झाली नसती. शिवसेनेच्या जागा कमीच होत्या; नेतृत्व बालिशच होते आणि तरीही त्यांच्याशी जुळवून घेणे भाजपला क्रमपाप्त होते कारण त्यांच्याजवळ दुसरा पर्यायच नव्हता. शिवाय शिवसेनेला विरोधात ठेवणे भाजपला परवडणारे नव्हते. शिवसेनेने भाजपला पळता भुई थोडी करून सोडले असते. तसा अधिकार काँग्रेसला नव्हता आणि राष्ट्रवादीला तर अजिबातच नव्हता. त्यामुळे शिवसेनेने आडमुठेपणा केलाच यात शंका नाही पण तसा तो आधीपासूनच करत आलेत. भाजपने मात्र चूक केली आणि शेवटी त्यांना शिवसेनेकडेच धाव घ्यावी लागली. त्यामुळे शिवसेनेचे काही नुकसान होणार नाही मात्र भाजपने मात्र आपली प्रतिमा मलिन करून घेतली.

In reply to by समीरसूर

पण त्यामुळे शिवसेना भाजपच्या "डोक्यावर" बसली असती...अगदी नाना पाटेकरांच्या डायलॉगमधे सांगायचे तर "कंधेपे बैठके .... ...."

In reply to by समीरसूर

>>> ज्यांचा विरोधी पक्ष नेता होता तो आता मंत्री होतोय यातच शिवसेनेला सत्तेत सामावून घेणे ही भाजपची गरज होती हे स्पष्ट करते. शिवसेनेला सत्तेत सामावून घेणे ही भाजपची गरज असण्यापेक्षा येनेकेनप्रकारेण सत्तेत जाणे ही शिवसेनेची जास्त गरज होती. १५ वर्षे उपासमार झाल्यावर समोर सत्तेचे ताट वाढून ठेवलेले असताना आडमुठेपणाने पंगतीत न बसणे हे शिवसेनेला फार काळ परवडणारे नव्हते. शिवसेनेने विरोधी पक्षात बसायचा ठाम निर्णय घेतल्याक्षणी पक्षात फूट पडली असती. हे ओळखूनच उधोजी कोणतीही ठाम भूमिका घेण्यास कचरत होते. १९९१ मध्ये एकदा व नंतर २००५ मध्ये दोनदा पक्षात फूट पडल्यावर अजून एकदा पक्ष फुटणे शिवसेनेला पूर्ण संपवून गेले असते. हे ओळखूनच भाजपने ठंडा करके खाओ ही युक्ती वापरून सेनेला घायकुतीला आणले व सेनेला सभापतीपद, उपमुख्यमंत्रीपद, गृह, अर्थ व महसूल मंत्रीपद, केंद्रात अजून २ मंत्रीपदे इ. सर्व मागण्यांवर माघार घेऊन भाजप देतेय ते निमूटपणे स्वीकारावे लागले. आता सांगा कोणाची गरज जास्त होती? आपल्या मर्जीप्रमाणे दुय्यम खाती सेनेला देणार्‍या भाजपची का पदरात पडलेले निमूटपणे स्वीकारणार्‍या शिवसेनेची? >>> त्याआधी राष्ट्रवादीला हाताशी धरून मात्र भाजप मुबलक टीकेची धनी झाली. फडणवीसांनी जाहीर कबुली दिली की त्यांना राष्ट्रवादीचा संग घेतल्याने किती टीका सहन करावी लागली. भाजपने राष्ट्रवादीला हाताशी धरले नव्हते. राष्ट्रवादीने न मागता स्वतःहून भाजपला पाठिंबा दिला. भाजपने धूर्तपणे त्या पाठिंब्याचा उपयोग सेनेला झुकविण्यासाठी केला. भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा झिडकारला असता तर शिवसेनेने ताठरपणे आपल्याला हवे ते पदरात पाडून घेतले असते. परंतु भाजपने राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या बाबतीत नरो वा कुंजरो वा अशी भूमिका घेऊन शेवटी आपण देऊ तेच शिवसेनेला स्वीकारण्यास भाग पाडले. >>> शिवसेनेला जितकी सत्तेची गरज होती त्यापेक्षा जास्त गरज भाजपला सेनेची होती हेच या नाट्यावरून दिसले. याचे उत्तर वर दिले आहे. भाजपपेक्षा सेनेलाच जास्त गरज होती. >>> शिवसेनेला झुकवणे हा भाजपचा पूर्वीचा सूर नव्हता. शिवसेना नकोच असा त्यांचा अविर्भाव होता. त्यांना वाटलं काहीतरी युक्ती करून शिवसेनेला बाहेर ठेवता येईल; पण तसे झाले नाही. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचा वापर करून शिवसेनेला झुकविणे हीच भाजपची भूमिका होती. भाजपला राष्ट्रवादीपेक्षा सेनेचाच पाठिंबा हवा होता, पण तो आपल्या अटींवर हवा होता. सेनेला दादागिरी करण्याची संधी न देता त्यांचा पाठिंबा हवा होता. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचा योग्य तो वापर करून भाजपने आपले इप्सित साध्य केले. एकही महत्त्वाचे मंत्रीपद न देता सरकार स्थिर केले. >>> मी आधीच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे काकांनी भाजपची हवा टाईट केल्यावर भाजपला चूक उमगली; म्हणूनच तर भाजप बोलणी सोडून द्यायला तयार नव्हती. शरद पवार व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा बेभरवशाचा आहे हे लक्षात न येण्याइतका भाजप दूधखुळा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा उघड पाठिंबा घेतला तर बदनामी तर होईलच शिवाय पवार हा पाठिंबा कधी काढून घेतील याचा नेम नाही हे भाजपवाले आधीपासूनच ओळखून होते. म्हणून तर भाजपने स्पष्टपणे राष्ट्रवादीचा पाठिंबा न स्वीकारता शिवसेनेला चुचकारत ठेवले व स्पष्टपणे राष्ट्रवादीचा पाठिंबा न झिडकारता शिवसेनेला घायकुतीला आणून आपल्याला हवे ते साध्य केले. बिचार्‍या शिवसेनेला भाजपच्या खेळ्या शेवटपर्यंत समजल्या नाहीत. हातात ६३ आमदार असून व भाजपकडे स्पष्ट बहुमत नसूनसुद्धा सेनेला आपले पत्ते नीट खेळता आले नाहीत. >>> तोपर्यंत लोकांनी भाजपवर येथेच्छ टीका केली होती. आता जे त्यांनी केले हेच त्यांनी जर आधी केले असते तर भाजप एवढी टीकेची धनी झाली नसती. शिवसेनेच्या जागा कमीच होत्या; नेतृत्व बालिशच होते आणि तरीही त्यांच्याशी जुळवून घेणे भाजपला क्रमपाप्त होते कारण त्यांच्याजवळ दुसरा पर्यायच नव्हता. शिवाय शिवसेनेला विरोधात ठेवणे भाजपला परवडणारे नव्हते. भाजपला सेनेचा पाठिंबा हवाच होता, पण तो आपल्या अटींवर व सेनेच्या दरडावणीला बळी न पडता. भाजपने ते चातुर्याने साध्य केले. >>> शिवसेनेने भाजपला पळता भुई थोडी करून सोडले असते. हहपुवा शिवसेनेला मॅनेज करणे अत्यंत सोपे आहे. हातात हुकुमाची सर्व पाने असून सुद्धा सेना डाव हरली यातच सगळे आले. अगदीच वेळ आली असती तर मुंबई महापालिकेत सेनेचे नाक दाबता आले असते. >>> त्यामुळे शिवसेनेचे काही नुकसान होणार नाही मात्र भाजपने मात्र आपली प्रतिमा मलिन करून घेतली. भाजपला मुख्यमंत्रीपद, महत्ताची मंत्रीपदे, ६३ आमदारांचा पाठिंबा असे बरेच काही मिळाले. सेनेला किरकोळ खात्यांवर समाधान मानावे लागणार आहे. भाजपची प्रतिमा अजिबात मलीन झालेली नाही.

In reply to by श्रीगुरुजी

अगदी स्वच्छ चित्र आहे. शरद पवारांनी ज्या दिवशी बिनशर्त पाठींबा जाहीर केला त्याच दिवशी शिवसेनेची भयंकर कोंडी झाली आहे हे स्पष्ट झाले होते.

In reply to by रघुपती.राज

लग्न नाही म्हणता येणार. कंत्राटी पुनर्विवाह असे म्हणता येईल किंवा दोन्ही पक्ष काही काळ रिलेशनशिपमध्ये येताहेत असे म्हणता येईल. हा नवीन नातेसंबंध एकमेकांविषयीचा संशय व सत्तेची लालसा या ठिसूळ पायावर उभा आहे. यामागे कोणतीही तात्विक बैठक नाही. ही रिलेशनशिप किती काळ टिकेल हे सांगता येणे अवघड आहे.

निवडणुकांचे निकाल लागल्यापासुन सर्व मराठी वाहिन्यांवर एक दिवसाआड 'भाजपा शिवसेना पुन्हा एकदा एकत्र येणार' अशी ब्रेकिंग न्यूज येते. दुसऱ्या दिवशी 'वाटाघाटी बंद. बोलणी फिस्कटली' ही ब्रेकिंग न्यूज येते. परत येरे माझ्या मागल्या. गेले दिड महिना हेच चालु आहे. ज्यांनी विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपद पदरात पाडुन घेतले ते आता सरकार मध्ये सामिल होऊन मंत्री होणार आहेत. ज्यांनी निवडणुकांचे पुर्ण निकाल येण्याआधीच 'स्थिर सरकारसाठी' बाहेरून पाठिंबा दिला ते आता विरोधी पक्ष नेतेपदावर दावा सांगत आहेत. महाराष्ट्रातली जनता इतकी दुधखुळी आहे असा गैरसमज या सर्वच राजकिय पक्षांनी करून घेतला आहे!

गुर्जी तुम्ही भाजप च्या कोलांटी उडी वर लांब लांब प्रतिसाद टंकून घेतलेली मेहनत पार वाया गेली बघा . ; )

आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे, सेना-कॉंग्रेस- एनसीपीचे काही आमदार संपर्कात आहेत वगैरे गप्पा भाजपने मारून घेतल्या मात्र खरी परिश्तिती सगळ्यांना माहित होती. १२२ आमदारांवर सरकार चालवता येत नसते, लहान पक्षांनी साथ दिली तरी त्यांना काही पदे द्यावीच लागणार तरीही बहुमत जमतच नव्हते. एकूण एनसीपीच्या बाहेरून (?) टेकूवरच हे सरकार तरले आहे त्यामुळे जनतेत व्हायची ती बेअब्रू झाली आहे इथून पुढे तरी आपली प्रतिमा उजळ करता यावी म्हणून भाजपला सेनेला बरोबर घ्यायची उपरती झाली आहे. सेनेने विरोधात बसून भाजपची पंचाईत केली होती अजूनही सेनेने विरोधातच बसायचे होते. भाजपला ते महागात पडले असते, सरकार जास्त दिवस चाललेच नसते मात्र स्थिरतेसाठी शेवटी सेना सहभागी झाली आहे असे दिसतेय.

In reply to by दुश्यन्त

पक्षातील फूट टाळण्यासाठीच सेनेला कमी महत्त्वाच्या खात्यांवर तडजोड करून भाजपला पाठिंबा द्यावा लागला. भाजपने सेनेला बरोबर घेतले नसून सेनेला स्वतःहून भाजपबरोबर जावे लागले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आपला प्रत्येक रिप्लाय हा खुप भाजपा समर्थनार्थ वाटतो आहे. कुठल्याच पक्षाचा चाहता नसताना त्रयस्थ असा विचार केल्यावर आपल्या बर्याच रिप्लाय मधील काही मुद्देचुकीचे ठरतील. परंतु फक्त भाजप जे करेन ते बरोबर आणि योग्य असे असेन तर शिवसेने ने काहीही केले तरी किंवा उलट काहीही केले नाही तरी सुद्धा ती तुमच्या म्हणण्याने "युद्धात आणि तहात हरलीच असणार आहे का ? आणि कसली फुट आणि काय ? फुट पडायची असती तर ती पडली असती केंव्हाच. जो आमदार फुटला असता, त्याला राजीनामा द्यावा लागला असता आणि पुन्हा पोट्निवडनुकीत त्याला निवडुन यावे लागले असते, भले तो निवडुन येवु पण शकला तरी स्वार्थी..दगाबाज आणि पुन्हा खर्चात पाडल्यामुळॅ त्याची नाचक्की झाली असती आणि तसे करण्यास कोणी धजावले नसते. भाजप हे जाणुन होता.. तुम्ही म्हणता तसे दुधखुळे कोणी नाहीये येथे.. भाजप सत्तेत राहुन ही शिवसेनेचे काही वाकडे करु शकला नसता.. जर शिवसेनेचेच नेते फुटले असते असे जे आपण म्हणतो मग भाजप जे १२२+१ वर उड्या मारत होती, त्यातील २३ हे राष्ट्रवादी -कॉंग्रेस चेच नेते आहेत, ते शरद पवार फोडुच शकत नव्हते हे तुम्ही कसे म्हणु शकताल. का फुट फक्त सत्ता नसलेल्यातच पडते.. असे असते तर राष्ट्रवादीचे पण नेते का फुटु शकत नव्हते .. हे सगळे बोलण्याचे भाग आहे, राजकारण ते करतात सामान्य माणुस आपल्या विचारांनी निर्मान केलेल्या आभासी चित्राला चिकटुन राहतो बस्स. शिवसेना- राष्ट्रवादी ला उपद्रवी म्हंटल्याने, भाजपाची कुट निती झाकोळली थोडीच जाते. उलट राष्ट्रवादी जो ४ नंबर ला गेला आहे, त्याचे कार्यकर्ते फुटले असते, परंतु उआ खेळीमुळे त्यांना पुन्हा उमेद मिळाली असेन.. आणि भाजप हा राष्ट्रवादी बरोबर पण जावु शकतो हे सिद्ध झाल्याने महानगर पालिकेतील असंख्य फुट वाचलेली आहे. या सर्व राजकिय खेळीत राष्ट्रवादीचा फायदा झाला आहे कारण त्यांच्याकडे काहीच नव्हते.. त्यांच्यामुळॅ भाजपाने स्वताची इमेज मलीन केली आहे, शिवसेनेला ही त्यांनी हतबल केले आणि कॉन्ग्रेस चे नाव ही कोठे नाही वरती विरोधी पक्ष म्हणुन आम्हीच असा दावा ही त्यांनी सुरु केला आहे. जर शिवसेने युद्धात हरली असेन तर उलट युद्धात जिंकुनही भाजप ला तह करावा लागतोय हे त्यांचे दुर्दैव नाही का ? जर ते जिंकले आहेत तर कशाला पाहिजे असल्या गोष्टी.. आणि जर या शिवाय पर्याय नाही तर ते जिंकले आहेत हे का म्हणायचे ?

In reply to by श्रीगुरुजी

आणि असांख्य रिप्लाय मध्ये असे आहे की, राष्ट्रवादी फक्त सत्तेची लालची आहे. तर मग त्यांनी भाजप - शिवसेनेची बोलणॅए चालु असतानाच आम्ही पाठिंबा सर्व मुद्द्याला देणाअर नाही असे बोलले असते का ? का शरद प्वार ही बालीश वाटतात ? ही सगळी भाजप - राष्ट्रवादीची चाल होती आणि आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरें प्रमाणे आक्रमक पणा दाखवुन जर पहिल्यांदाच जाहिर केल्के असतेना की तुम्ही राष्ट्रवादीची जर मदत घेणार असला तर हा घ्या आमच्या गितेंचा राजिनामा आणि येथे ही आम्ही विरोधी बाकावर बसणार तर शिवसेनेचीमुंबईत गोची करता येईल हे भाजप जे बोलते आहे ना ते पुढच्या निवडनुकीत कळाले असते. मला एक कळत नाही भाजप शेवटचीच निवडनुक जिंकल्या सारखी का वागत आहे, इतरांना इतके कमी लेखने ही भाजपची सर्वात मोठी चुक ठरणार आहे.. नरेंद्र मोदींमुळे भाजपाला चांगले दिवस आले आहेत, परंतु कॉन्ग्रेस च्या नेत्यांना दिल्लीत पाय धरुन येण्याबद्दल जे बोलले जात होते ते भाजपाच्या नेत्याला सुद्धा बोलले जावु शकते हे का लक्षात येत नाहीये.. जर मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष यांच्याशी बोललेच पाहिजे प्रत्येक निर्णयासाठी तर मग कॉन्ग्रेस च्या वेळेस आपण बोलत होतो ते चुक होते का ? जर भाजपा समान नागरी कायदा आणणार असेन तर आणि तरच ती वेगळी आणि देशाला प्रगती पथावर न्हेण्यासाठी झटत आहे असे माझे वयक्तिक मत आहे. आणि असे केले तर मी कायम भाजप ला मत देईन, पण या मुद्द्याप्रमाणे भाजप सोयीने, ३७० कलम, टोल मुद्दा, एलबीटीच्या मुद्दा सोडत आहे. फक्त व्यापारातुन आता भरभराट दिसत असली तरी सामान्य माणसाला व्यापारात आणि शहरात काहीच थारा उअरणार नाही भविश्यात, ज्या एफ डी आय साठी भाज्प विरोध करत होता त्याचीच कास ते धरणार आहेत तर मग कॉम्ग्रेस ला तरी त्यावेळॅस विरोधाला विरोध केला गेला का एफ डी आय साठी. असो बरेच मुद्दे आहेत, थांबतो.. मान्य भाजप शांत.. प्रगती शील पक्ष आहे परंतु म्हणु इतर सर्व तुच्छ आहेत.. असे वाटुन घेणे चांगले नव्हे असे वाटले म्हणुन येव्हदे लिहिले. धन्यवाद

भाजपला सरकार चालवण्यासाठी शिवसेना किंवा एनसीपी यांचा पाठींबा लागणारच होता. एनसीपी बरोबर संग केल्याने लोकांनी २-३ दिवसातच इतक्या शिव्या भाजपला घातल्या कि त्यांना पुढच्या धोक्याची जाणीव झाली असावी त्यात पवार साहेब बाहेरून पाठींबा देणार म्हणजे त्याची किंमत पण घेणारच आणि सरकार किती दिवस टिकेल हा सगळा गुंता होताच. सेनेला खिजवण्याच्या भाजपा आपल्याकडे अल्पमत नाही हे विसरली. सेना फुटणार अश्या वावड्या महिनाभर पसरवून पण कुणी फुटले नाही, उलट खडसे सारखे वाचाळ नेते आपल्याच पक्षाचे सरकार अस्थिर करतात कि काय अशी अवस्था झाली म्हणून जनतेत आपली प्रतिमा अजून डागाळू नये म्हणून भाजपला हे उशोरिअचे शहाणपण सुचले आहे बाकी काही नाही. मात्र भाजप-एनसीपी यांची सुरुवातीच्या काळातली मिलीभगत पब्लिकला दिसून आलेली आहेच.

भाजपला अफझलखान संबोधून आणि प्रत्यक्ष मोदींचा बाप काढूनपण भाजपला सेनेची मदत घाय्वीच लागली यात भाजपच्या चाणक्यांचे पितळ उघडे पडले. सेना तर विरोधात बसली होतीच, केंद्रातल्या विस्तारावर पण बहिष्कार टाकला होता. मग जर भाजपकडे बहुमत (?) होते तर अफझलखान तसेच मोदींचा बाप काढणार्यांना सत्तेत सहभागी करवण्यासाठी धर्मेंद्र प्रधान, चंद्रकांत पाटील, डॉ स्वामी वगैरेंना मातोश्रीवर का पाठवावे लागले?

In reply to by दुश्यन्त

>>> भाजपला अफझलखान संबोधून आणि प्रत्यक्ष मोदींचा बाप काढूनपण भाजपला सेनेची मदत घाय्वीच लागली यात भाजपच्या चाणक्यांचे पितळ उघडे पडले. सेना तर विरोधात बसली होतीच, केंद्रातल्या विस्तारावर पण बहिष्कार टाकला होता. मग जर भाजपकडे बहुमत (?) होते तर अफझलखान तसेच मोदींचा बाप काढणार्यांना सत्तेत सहभागी करवण्यासाठी धर्मेंद्र प्रधान, चंद्रकांत पाटील, डॉ स्वामी वगैरेंना मातोश्रीवर का पाठवावे लागले? भाजपला अफझलखान संबोधून आणि प्रत्यक्ष मोदींचा बाप काढूनपण सेनेला भाजपला मदत द्यावीच लागली यातच मर्दमराठ्यांच्या स्वाभिमानाच्या गप्पा मारणार्‍या सेनेच्या मावळ्यांचे पितळ उघडे पडले. सेना चरफडत विरोधात बसली आणि केंद्रातल्या विस्तारावर बहिष्कार टाकूनसुद्धा भाजपने हिंग लावून सुद्धा विचारले नाही. >>> मग जर भाजपकडे बहुमत (?) होते तर अफझलखान तसेच मोदींचा बाप काढणार्यांना सत्तेत सहभागी करवण्यासाठी धर्मेंद्र प्रधान, चंद्रकांत पाटील, डॉ स्वामी वगैरेंना मातोश्रीवर का पाठवावे लागले? आधी देसाई बंधू सारख्या दिल्लीच्या फेर्‍या का मारत होते? शिवसेनेसारखे अहंकारी व राजकीय चातुर्यात कमी पडणारे पक्ष आपल्याला कोणी भेटायला आले की हा आपलाच विजय आहे अशी मनोमन गैरसमजूत करून घेऊन खूष होतात. भाजपने हे ओळखूनच सेनेच्या हाताला काहीही लागून न देता केवळ उधोजींचा अहंकार कुरवाळून आपल्याला हवे ते साध्य करून घेतले.

In reply to by श्रीगुरुजी

बाकी बरेच मुद्दे मान्य केले तरी काही गोष्टी लोक विसरतात. १) भाजपच्या दृष्टीने महाराष्ट्र हे फार तर एक महत्वाचे राज्य आहे त्यामुळे येथे भाजप तळागाळात गेला( अगदि एकही आमदार निवडून आला नाही) तरी राष्ट्रीय नेतृत्वाला फार फरक पडणार नाही पण शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या दृष्टीने हा त्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे. त्यांच्या हातात शून्य पडले तर नामशेष होण्याची भीती आहे. पवार साहेबांनी दिलेला बिनशर्त पाठींबा हा त्यांचा धूर्तपणा नसून हि त्यांची अगतिकता आहे. कारण पाठींबा दिला तर एखादेवेळी शिवसेनेशी भाजपचे फाटले तर किमान पक्षी आपल्या विरुद्धची प्रकरणे बासनात ठेवता येतील आणि नंतर जमलेच तर सत्तेचा लोण्याचा गोल बाजूबाजूने थोडा चाटता येईल हा हेतू होता. २) शिवसेनेची दाढी धरणे हे मोदी आणि अमित शाह यांची आवश्यकता नसून फडणवीस आणि तावडे यांची होती. ( एका राज्यात सत्ता न आल्याने त्यांना फरक पडत नव्हता आणि ६ महिन्यांनी परत निवडणूक झाली तर पूर्ण बहुमत मिळेल अशी खात्री अमित शह यांची होती ( भले ती अनाठायी असेलही). आजच आवाजी मतदानाच्या प्रक्रियेवर काहीही निकाल देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे म्हणजेच भाजपची हि खेळी यशस्वी झाली असे म्हणायला हरकत नाही. म्हणजे आता राष्ट्रवादीला ६ महिने फाट्यावर मारायला भाजपला काहीच अडचण नाही. सहा महिन्यात जनता बारीकसारीक गोष्टी सर्व विसरते हा अनुभव आहे ३) तसेच सत्तेत सहभागी होणे हि उद्धवजींची गरज होती. कारण शिव्सेनेत डावलले गेलेले नेते जर सत्ता मिळणार नसेल तर राष्ट्रवादी मनसे किंवा भाजप कुठेही जाण्याची तयारी करण्याची शक्यता होती. त्यांना उद्धवजींच्या किंवा मराठी माणसाच्या मानापमानाशी/ अस्मितेशी काहीही घेणे देणे नव्हते. अशा परिस्थितीत आपल पक्ष सांभाळून ठेवण्यात उद्धवजीनी परिपक्वपणा दाखवला असेच म्हणता येईल मग त्याला तुम्ही यशस्वी माघार म्हणा किंवा लोटांगण म्हणा. शेवटी सत्ता माणसाला भ्रष्ट बनवते हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

http://www.loksatta.com/sampadkiya-news/shiv-sena-keeps-away-self-respe… गिरीष कुबेर यांचा सेना व भाजपच्या सद्यस्थितीचे अचूक विश्लेषण करणारा लेख गायकाने आपली पट्टी ओळखून स्वर लावायचा असतो. ही बाब राजकारण्यांनाही लागू पडते. शिवसेनेचे जे काही झाले त्यावरून हे कळेल. भाजप हा परप्रांतीय शत्रू आहे आणि आपल्या मर्द वगरे मराठी मावळ्यांना घेऊन त्यापासून महाराष्ट्रास वाचवणे हे जणू आपले कर्तव्य आहे, असा शिवसेनेचा आव, आविर्भाव आणि समजही होता. या मुद्दय़ावर शिवसेनेने जरा अतीच ताणले. इतके की भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची संभावना अफझलखान अशी करण्यापर्यंत सेनेची मजल गेली. जे झाले ते अगदीच बालिश होते. राजकारणातला शत्रू हा वैयक्तिक आयुष्यातही वैरी असायला हवा असे नाही. कारण राजकारण हे मुळातच प्रवाही असते आणि सत्ताकारण म्हणजे तर अळवावरचे पाणीच. कोणत्या मुद्दय़ावर स्थर्यास धक्का लागेल याचे आडाखे भल्याभल्यांना बांधता येत नाहीत. तेथे तुलनेने नवख्या सेना नेतृत्वाची काय कथा? हे समजून घेण्यासाठी सेना नेतृत्वास फार काही दूरवर जाण्याचीही गरज नव्हती. सेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे अशा बेरजेच्या राजकारणासाठी ओळखले जात होते. तेव्हा त्यांचे स्मरण करीत जरी सेनेने राजकारण केले असते तरी आज जी आली ती हास्यास्पद वेळ आली नसती. तशी ती आली कारण वास्तवाचे नसलेले भान. गेल्या लोकसभा निवडणुकीची हवा झाल्यापासून देशातील राजकारणात एकच नाणे चलनी होते. ते म्हणजे नरेंद्र मोदी यांचे. बाकीची सारी नाणी हे टांकसाळीत मोडीत निघालेली होती. हे अप्रिय, आणि अयोग्यही, असले तरी वास्तव होते, हे नाकारता येणार नाही. त्यामुळे या नाण्याच्या आधारे ज्यांनी ज्यांनी निवडणुका लढल्या ते सर्व विजयी झाले. एरवी नगरसेवकदेखील होण्याची ज्यांची कुवत नाही, ते थेट संसदेत गेले. शिवसेनेला याचा विसर पडला. आपल्या पक्षाला मिळालेले यश हे शुद्ध आपलेच आहे, असे त्या पक्षास वाटू लागले आणि ते खरेच आहे, अशी त्यांची खात्रीच होती. ती इतरांनीही बाळगावी असा सेना नेतृत्वाचा आग्रह होता. तो ज्यांनी अमान्य केला, त्यांची रवानगी सेनेने शत्रू या गटात केली. सेनेच्या दुर्दैवाने आज हे कथित शत्रू खरे ठरले आणि भाजप जे काही समोर ताटात टाकणार आहे, ते गोड मानून घेण्याची वेळ आली. हे असेच होणार होते ही काळ्या दगडावरची रेघ होती. ती आखूड झाली ती भाजपचे पूर्ण बहुमताचे प्रयत्न अपयशी ठरले म्हणून. भाजपला जर पूर्ण बहुमत मिळाले असते तर त्या पक्षाने सेनेस हिंग लावून विचारले नसते, असे मानण्यास जागा आहे. याचे कारण भाजपचे राजकारण निश्चित अशा एका दिशेने सुरू आहे. देशभर सर्व राज्यांत एक मध्यवर्ती पक्ष म्हणून त्या पक्षास उभे राहायचे आहे. काँग्रेसची झालेली वाताहत पाहता त्या दिशेने भाजपला आव्हान मिळण्याची शक्यता नाही. तेव्हा भाजपच्या या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे तो फक्त प्रादेशिक पक्षांचा. हे एकदा समजून घेतले की भाजप हा पुढील राजकारणात सेनाच काय पण अन्य प्रादेशिक पक्षांनादेखील कस्पटासमान वागवणार हे लक्षात येणे अवघड नव्हते. त्यात सेनेवर भाजपचा विशेष राग असावयाचे कारण म्हणजे या पक्षाच्या नेत्यांकडून भाजपला मिळालेली वागणूक. भाजपच्या नेत्यांना ताटकळत ठेवणे, त्यांचे फोनच न घेणे, महत्त्वाच्या राजकीय चच्रेस कु. आदित्य यालाच पाठवणे आदी बालिश चाळ्यांना भाजप नेते वैतागले होते. त्यात सेनेच्या मदतीने सत्ता आली तर पुन्हा मातोश्रीच्या तालावर नाचावे लागणार हे भाजपला ठाऊक होते. त्याचमुळे कोणत्याही परिस्थितीत सेनेच्या नाकदुऱ्या काढायच्या नाहीत हा भाजपचा निर्धार होता आणि तो त्यांनी शेवटपर्यंत पाळला. आश्चर्य होते ते उद्धव ठाकरे यांच्या वागण्याचे. स्वबळावर सत्ता मिळणार नाही, याचा अंदाज त्यांना अखेपर्यंत आला नाही. हे एक वेळ समजून घेण्यासारखे. परंतु आपण बहुमतापासून कित्येक योजने दूर आहोत, हे स्पष्ट झाल्यानंतरही ते आपली भूमिका सोडावयास तयार नव्हते. आपण आणि आपला पक्ष पुढील पाच वष्रे विरोधी बाकांवर बसू शकतो असे त्यांना वाटत होते. पण हा त्यांचा आत्मविश्वास अस्थानी होता. याची पूर्ण जाणीव भाजपला होती. त्यामागील आणखी एक कारण म्हणजे इतके झाले तरी केंद्रीय मंत्रिमंडळातून आपल्या एकमेव मंत्र्याला माघारी बोलावण्याची िहमत काही सेना दाखवू शकली नाही. तेथेच सेनेचा विरोध किती तकलादू आहे, हे दिसून येत होते. त्याचमुळे भाजपचे राज्य आणि केंद्रीय नेतृत्व आपल्या भूमिकेपासून तसूभरही ढळण्यास तयार नव्हते. त्याचमुळे काही काळ विरोधी पक्ष नेतेपदी बसण्याची सेनेची हौसदेखील भाजपने पूर्ण होऊ दिली. सेनेने साथ दिली नाही तरी भाजपसाठी राष्ट्रवादीची फौज राखीव होतीच. त्याच जोरावर भाजपने चातुर्याने विश्वासदर्शक ठराव पदरात पाडून घेतला आणि तो पक्ष सेनेच्या झुकण्याची वाट पाहत बसला. आज ना उद्या सेनेला यावेच लागेल याची पूर्ण खात्री भाजपला होती. अखेर ती खरी ठरली आणि पांढरे निशाण फडकावत, हात बांधून सेना नेते सरकारात सहभागासाठी तयार झाले. गेली १५ वष्रे विरोधी पक्षात काढल्यावर आणखी पुन्हा पाच वष्रे विरोधी बाकांवर बसणे सेनेस 'परवडणारे' नाही याची पूर्ण खात्री भाजपला होती. खेरीज, सोन्याची अंडी देणारी मुंबई महापालिकेची कोंबडी सेनेच्या हाती आहे तीदेखील भाजपमुळे, याची जाणीव सेना नेत्यांना नसली तरी भाजपला होती. तेव्हा सेना नेते आपल्या दारी येणार याबद्दल भाजप पूर्णपणे नि:शंक होता. दरम्यान सेनेचे विरोधी पक्षात बसणे किती बेगडी आहे हे काँग्रेसने दाखवून दिलेच होते. राज्यपालांविरोधात अभूतपूर्व गोंधळ घालून काँग्रेस आमदारांनी विरोधी पक्षाचा अवकाश पूर्णपणे व्यापून टाकला. या जागेत राष्ट्रवादीस कधीच रस नव्हता. त्या पक्षाने हळूच देवेंद्र फडणवीस सरकारला पाठिंबा जाहीर करून सेनेची तिकडेही पंचाईत केली होती. म्हणजे विरोध करण्याचा आनंद नाही आणि सत्तेचेही समाधान नाही अशी सेनेची अवस्था झाली. अशा परिस्थितीत असमाधानीच राहायचे तर सत्तेत तरी सहभागी होऊ या असा विचार सेनेने केला आणि गुमानपणे भाजप देईल ते स्वीकारायचे ठरवले. म्हणजे उपमुख्यमंत्रिपद नाही आणि गृहखातेही नाही अशी सेनेची केविलवाणी अवस्था झाली असून त्यास पक्षाचे नेतृत्वच जबाबदार आहे. याचे काही परिणाम संभवतात. या उलटसुलट भूमिकांमुळे सेनेविषयी जनतेत मुदलातच कमी असलेला आदर अधिकच कमी होईल. सत्तेत सहभागी व्हायचेच होते तर निवडणुकीच्या निकालानंतर गेले दोन महिने चालवलेली तणातणी कशासाठी? इतके आढेवेढे न घेता सेनेने आधीच भाजपशी हातमिळवणी केली असती तर कोणालाही त्यात काहीही आक्षेपार्ह वाटले नसते. कारण सेना गरज पडल्यास भाजपबरोबरच जाणार हे लोकांनी गृहीतच धरले होते. परंतु प्रश्न निर्माण झाला तो सेनेच्या मोडेन पण वाकणार नाही, भूमिकेमुळे. सेनेने अशी भूमिका घेतली खरी. पण ती नुसती वाकूनच थांबली नाही, तर ती रांगायलादेखील तयार झाली. राजकारणात अस्मिता आणली आणि अस्मितेचेच राजकारण केले की हे असे होते. राजकारण हा व्यवहार आहे आणि व्यवहार आला की तेथे अस्मितेस स्थान नसते. आणि ही अस्मिता अप्रामाणिकांची असेल तर तिला काहीच किंमत नसते. हे आता दिसून आले. तेव्हा आता यापुढे तरी सेनेने आपल्या धोरणाशी प्रामाणिक राहावे आणि जैतापूर वीज प्रकल्प आदी मुद्दय़ांना तिलांजली द्यावी. सेना ज्याचा दाखला देत होती तो स्वाभिमान वामकुक्षीस गेल्याचे स्वीकारण्यास जनता तयार आहे.

In reply to by श्रीगुरुजी

गुरुजी, तुमच्या सिलेक्टीव्ह रीडींगचा , समोरच्याच्या सोयीस्कर तेवढ्याच मुद्द्यांचा प्रतिवाद आणि काहीही झाले तरी भाजपाच बरोबर याचा कंटाळा आला आहे. माझा या धाग्यावरचा शेवटचा प्रतिसाद !

In reply to by कपिलमुनी

अहो तो लेख गिरिश कुबेरांचा आहे. श्रीगुर्जी फारच कट्टर समर्थक आहेत हे खरेच पण कुबेरांच्या लेखाबद्दल त्यांना का दोषी धरता?

In reply to by मृत्युन्जय

हा प्रतिसाद फक्त त्या पेस्टवलेल्या लेखाला नसून एकंदरीतच होता. लोकसत्तेच्या अनेक लेखांपैकी सिलेक्टीव्ह रीडींग करण्याबद्दल होता. असो.

In reply to by कपिलमुनी

मी गाळले असतील तर तुम्ही टाका लोकसत्ता किंवा इतरत्र पसिद्ध झालेले तुम्हाला आवडलेले लेख. कोणी अडवलं आहे?

अवघ्या राज्यात गाजलेल्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार, तटकरे आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी भुजबळ यांची लाचलुचपत विभागामार्फत (ऍण्टी करप्शन ब्युरो) चौकशी करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या आव्हाडला अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. भाजप व राष्ट्रवादीचे साटेलोटे आहे आणि भाजप राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी नेत्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे हा आरोप धडधडीत खोटा होता हे यामुळे सिद्ध होत आहे.

In reply to by श्रीगुरुजी

हे व्ह्यायला युतीचे सरकार यायला लागले . राष्ट्रवादीच्या कुबड्यांवर हे शक्यच झाले नसते ( नव्हते).

In reply to by कपिलमुनी

राष्ट्रवादीच्या कुबड्या घेतलेल्याच नव्हत्या. युतीचे सरकार येण्याआधीच (शिवसेनेबरोबर बोलणी पूर्ण होण्याआधीच) देवेंद्र फडणविसांनी चौकशीला मान्यता दिलेली होती.

In reply to by श्रीगुरुजी

चौकशी इमानदारीने पूर्ण करुन दोषींना शिक्षा होणं महत्वाचं...आणि साटंलोटं तर आहेच...पक्ष पातळीवर नसेल तरी नेतृत्व पातळीवर नक्कीच. पवार आणि शहा एकमेकांचं मुल्य ओळखुन आहेत.

श्रीगूर्जिना बोलवा राव कुणीतरी. भाजप समर्थ असूनही अंधभक्त नसलेले ते एकमेव. मीपाने अधिकृत जाहीरनामा काढावा. जो श्रीगूर्जिना मीपावर परत आणेल त्याला माझ्या कडून १०१ रुपये बक्षीस. शाल श्रीफळ वेगळे.