Skip to main content

दहा रूपयांची सत्ता

लेखक आतिवास यांनी गुरुवार, 13/11/2014 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
पैशांना किती किंमत असते? हा प्रश्न तसं पाहायला गेल तर चमत्कारिक वाटतो. त्या त्या नाण्यावर किंवा नोटेवर जी काही किंमत लिहिली असेल ती - हे तर चिमुरडी मुलं- मुलीसुद्धा हसत हसत सांगतील. आपल्याच शहरात आपण वावरत असतो तेव्हा हे बरोबर असतं, पण जरा वेगळ्या जगात भटकायला गेल की सगळ चित्र बदलून जात. मी अर्थातच अमेरिका किंवा युरोपच्या सहलीविषयी बोलत नाही. विनिमयाच माध्यम बदललं म्हणून केवळ तिथे आपल्या पैशांची किंमत कमी होते अशातला भाग नाही. तो एक वरवरचा व्यावहारिक मुद्दा झाला. पण त्याच्या खोलात आत्ता नको जायला. आपल्याच देशात वावरतानासुद्धा पैशांची किंमत अनेक वेळा बदलत जाते या गोष्टीवर सहजासहजी कोणाचा विश्वास बसणार नाही हे मला माहिती आहे. माझा तरी कोठे होता विश्वास? उत्तर प्रदेशातील चित्रकूट भागात पहिल्यांदा गेले, तेव्हा राहण्याच्या ठिकाणापासून कामाच्या ठिकाणी रोज ये-जा कशा पद्धतीने करायची हा प्रश्न उपस्थित झाला. चित्रकूट तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असल्याने रस्त्यांवर गर्दी भरपूर, पण माणस तिथे क्वचितच एकटी येतात. माझ राहण्याच ठिकाण आणि कामाच ठिकाण यात किमान पंधरा किलोमीटरच अंतर असल्याने रोजचा प्रवास अटळ होता. इतकी गर्दी या शहरात असूनही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मात्र काहीच पत्ता नाही. लोकांनी आपली आपली काय ती व्यवस्था लावून घ्यावी, त्यातून जे काही हितसंबंध निर्माण होतील, त्यातून आपल्या बळावर मार्ग काढावा असं बहुधा शासनाच्या मनात असावं. लोकांनी पण याचा आनंदाने स्वीकार केला असावा असं दिसतं. कारण जिकडे तिकडे खांद्यावर बंदूक लटकवून लोक - म्हणजे पुरूषवर्ग - रोजच्या व्यवहारात मग्न असतात. बंदूक घेऊन चहा पीत बसलेले पुरूष, एका हातात बंदूक धरून एकमेकांना टाळी देत मनसोक्त हसणारे पुरूष , हे इथलं अगदी नेहमीचचं दृश्य! असल्या असुरक्षित वातावरणाची मला सवय नसेल असं वाटून तिथेले माझे सहकारी माझी फार काळजी घ्यायचे. सकाळी घ्यायला यायचे, संध्याकाळी सोडायला यायचे. पण तीस किलोमीटरचा फेरा म्हणजे आपल्या सहकारी कार्यकर्त्यांच्या वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय असं मला सारखं वाटायला लागलं. तोवर खूप वेळा जाऊन माझ तिथलं पाहुणेपणही संपुष्टात आलं होतं. मग पर्याय निघाला सहा आसनी रिक्षांचा. अर्थात सहा आसनी हे केवळ म्हणण्यापुरतं झालं. या रिक्षात कमीत कमी पंधरा प्रवासी भरायचे, असा तिथला अलिखित नियम. एवढ्या गर्दीत विड्या, दारू, गुटखा यांचे वास अंगावर घेत प्रवास करणं जिवावर यायचं. कितीही अंग चोरून बसलं तरी सहप्रवाशांचे आगंतुक स्पर्श झेलावे लागायचेच. हे सगळं करून मी कामाच्या जागी थेट पोचायचे नाही. त्यासाठी पुन्हा काही अंतर सायकलरिक्षाने काटावं लागायचं. संपूर्ण अंतर सायकलरिक्षाने एकदा गेले, तर भरपूर वेळ लागला. शिवाय सायकलरिक्षावाल्याला लागलेला दम पाहून मला अपराधीपण आलं. स्थानिक प्रवासाच्या या प्रश्नावर उत्तर शोधण्याची मनाची नकळत बरीच धावपळ चालली असणार यात काहीच शंका नाही. एका सकाळी एका रिक्षावाल्या माणसाला मी धीर करून विचारलं, "पुढे तुम्ही किती माणसं बसवता?" त्याने जरा चमत्कारिक नजरेनं पाहिलं. तो म्हणाला, "आहे ना जागा, बसून घ्या." तरी पण मी तोच प्रश्न विचारल्यावर त्याने "तीन" असं उत्तर दिलं. प्रवासी फारसे नसल्यामुळे त्याला थोडा मोकळा वेळ होता. मला कुठे जायच आहे याची त्याने विचारणा केली. "पाच रूपये सीट, पाच रूपये सीट" असं ओरडत तो आणखी प्रवासी शोधू लागला. मी त्याला म्हटलं, "मी पुढे बसते. मी तुम्हाला तीन प्रवाशांचे पैसे देते. तुम्ही कोणालाही पुढे बसवू नका." तो चांगल्यापैकी गोंधळला होता. तीन- चार लोकांनी मिळून प्रवास केला तर वाद घालून कमी पैसे द्यायची इथली पद्धत. अशा स्थितीत कोणी एकटंच प्रवास करून तीन लोकांचे पैसे द्यायला का तयार होतं आहे, हे त्याला समजत नव्हतं. माझा हिशोब सोपा होता. दहा रूपये खर्च करून मी माझी सोय बघत होते. पण त्या भागात दिवसभराचा खर्च भागविण्यासाठी दहा रूपये जवळ असणं ही चैनीची परिसीमा आहे. अशा वेळी कोणी दहा रूपये असे हकनाक कशाला उडवेल? बराच वेळ मी त्याला तेच सांगत होते आणि तो नुसताच हसून दुर्लक्ष करत होता. मी त्यावेळी उत्तर प्रदेश सरकारच्या विश्रामगृहात राहत होते. मी बराच वेळ रिक्षावाल्याशी बोलतेय हे पाहिल्यावर तिथला एक कर्मचारी धावत माझी मदत करायला आला. त्याने मग त्या रिक्षावाल्याला सांगितलं, " मुंबईच्या आहेत मॅडम." स्वत:च्या सोयीसाठी दहा रूपये खर्च करणं म्हणजे फार मोठी चैन झाली तिथल्या हिशोबाने. सहा आसनी रिक्षात मी पुढच्या सीटवर एकटीने बसून केलेला प्रवास हा लोकांच्या कुतुहलाचा आणि चर्चेचा विषय झाला. दर दोन मिनिटांनी रिक्षा प्रवाशांसाठी थांबायची. पुढे मोकळ्या दोन जागा पाहून प्रवासी ऐटीत पुढे यायचे आणि रिक्षावाला त्यांना मागे जायला सांगायचा. पुढे मोकळी जागा असताना मागे का जावं लागत आहे हे त्यांना समजत नसे. मग मागे बसलेल्या प्रवाशांपैकी कोणीतरी स्पष्टीकरण देई, " मॅडम तीन सीट का पैसा दे रही है". माणस अवाक होत. मग आणखी कोणीतरी कुजबुजे," मॅडम बंबई से आयी है". मग हे नेहमीचचं झालं. रिक्षावाल्यांना पण ही व्यवस्था सोयीची होती, कारण त्यांना दोन प्रवासी कमी शोधायला लागायचे. एखाद्या रिक्षात पुढे कोणी प्रवासी बसले असतील तर त्यांना उठवू नका, अशी मी रिक्षावाल्यांना विनंती करायचे. आपल्याकडे त्यांच्यापेक्षा दहा रूपये जास्त आहेत, हा केवळ सुदैवाचा भाग आहे याची मला जाणीव होती. मी दूरवर दिसले की ते पुढे बसलेल्या प्रवाशांना मागे बसवायचे. कधीच कोणा प्रवाशाने " मी उठणार नाही, त्यांच्याकडे पैसे जास्त असले म्हणून काय झालं?" असं प्रत्युत्तर दिलं नाही. "एवढी पैशांची मस्ती असेल तर स्वतःची गाडी घेऊन हिंडा" असा अनाहूत सल्लाही मला कोणी दिला नाही. चार साडेचार वर्षांच्या काळात किमान पंचवीस वेळा मी चित्रकूटला गेले असेन, त्या सगळ्या काळात स्थानिक प्रवास मी असाच केला. दहा रूपयांत घेता येईल तितकं सुख विकत घेण्याचा मी प्रयत्न केला. मी खरे तर दहा रूपयांची सोय घ्यायला गेले, दहा रूपयांच सुख मिळवायला गेले. ते तर मला मिळालच,पण त्याचबरोबर मिळाली दहा रूपयांची सत्तादेखील! ही काही अनिर्बंध सत्ता नव्हती, पण ती ठोस होती. पैशांची किंमत नोटेवरच्या आकडयावरच अवलंबून नसते. इतरांच्या तुलनेत पैसा तुम्हाला काय मिळवून देऊ शकतो, यावर पण ती अवलंबून असते तर! पैसे मिळवताना सत्तेची ही सुप्त प्रेरणा तुमच्या आमच्या सर्वांच्या मनात असणारच. म्हणूनच आपण सारे कदाचित पैशांच्या मागे धावतो. सुखाची प्रेरणा स्वाभाविक आहे, पण सत्तेची ऊर्मी आपल्याला टाळता येईल का? एकदा इतर व्यक्तींच्या मापाने आपण आपल्याला तोलायला लागलो की सुख आणि समाधान हाती लागण्याची शक्यता दुरावणारच....पैसा कितीही असला तरी! म्हणून आपल्यावर पैशांची सता चालणार की नाही हे आपल्यालाच ठरवावं लागतं ---- कितीही कठीण असलं तरी! * अन्यत्र पूर्वप्रकाशित
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16691
प्रतिक्रिया 83

प्रतिक्रिया

In reply to by मारवा

तथाकथित अध्यात्म क्षेत्रातही सत्तेचा हा 'सूक्ष्म' खेळ पाहायला मिळतो - कधीकधी तो उबग आणण्याइतपत उघड असतो याच्याशी सहमत. पण विवेकानंदांची ४०० पानांची पत्रं वाचून तुम्हाला जे वाटलं त्याच्याशी मात्र मी असहमत आहे. अर्थात लेखाचा विषय 'विवेकानंद' नसल्याने अवांतर नको म्हणून थांबते. तुम्ही वेगळा धागा काढा या विषयावर, मग कदाचित लिहीन. पण हा प्रत्येकाच्या भावनेचा प्रश्न असतो त्यामुळे त्यावर काथ्या कुटण्यात मला फारसं स्वारस्य नाही.

In reply to by आतिवास

मला मारवा ह्यांच्या प्रतिसादातून जे समजलं त्यानुसार सत्तेचा खेळ हा बाह्य नसून अंतरंगातला आहे. आखाड्याचे महाराज सत्तेसाठी उघड उघड स्पर्धा करणं हे तर आहेच आणि त्याचा उबगही येणं साहजिकच आहे. योगी, महाराज, साधू, साध्वी म्हणवणारे आमदार खासदार मंत्री असलेले पाहताना त्यातला विरोध चीडच आणतो पण मारवा ह्यांचा प्रतिसाद काहीसा वेगळा वाटतोय. म्हणूनच त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे ते विचारलं होतं.

बहुतेक वेळा पैसा स्वःताबरोबर अनेक वाइट गोष्टी आणतो. विषय फार गहन आहे. प्रतिक्रिया पण चांगल्या आल्या.

व्वा!

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार.

लेखात वापरलेला 'सत्ता' हा, नकारात्मक छटा असणारा, शब्द अयोग्य वाटतो. इथे 'सोय', स्त्रियांच्या बाबतीत 'सुरक्षितता' हे शब्द जास्त योग्य आहेत. मुंबई सारख्या शहरातही गाड्यांना प्रथमवर्ग, द्वितीयवर्ग, वातानुकुलीत वर्ग असे चढत्या क्रमाचे वर्ग तुमच्या सोयीसाठी असतात. रस्त्यातूनही साधी बस, वातानुकुलीत बस, टॅक्सी, रिक्क्षा आणि पायी प्रवास असे अनेक प्रकार आपण रोजच्या आयुष्यात शहरातही अनुभवत असतो. आपल्या सोयी नुसार ह्या सुखांचा वापर केला जातो. कमी गर्दी, स्वच्छता, आसनव्यवस्था आणि आपला वेळ ह्या गोष्टी आपली 'खरेदीक्षमता' जोखून आपण वापरत असतो. दोन ठिकाणांमध्ये करावयाच्या प्रवासाचा वेळ ही सोय, उभे राहून की बसून प्रवास करायचा ही शारीरिक क्षमते संबंधी सोय, उकाड्यातली गर्दीतली घुसमट टाळण्याची सोय आदी सोयी आपण आपल्या ताकदीनुसार पाहात असतो. त्यात 'सत्ता' हा विचार नसतो. जिथून बस सुटते तिथून प्रवास सुरु होणार असेल आणि माझ्या जवळ भरपूर वेळ असेल तर मी टॅक्सीने जात नाही. बसनेच प्रवास करतो. कारण माझी सोय भागत असते. रिकामी बस सोडून मी टॅक्सीने प्रवास केला तर तीथे सत्तेची भावना प्रबळ आहे असे म्हणता येईल. रोजच्या घर ते कचेरीच्या अंतरात सायकल आणि मोटरसायकल दोन्हीचा वापर शक्य असू शकतो. पण सायकलचालविताना होणारे शारीरिक श्रम, घामाघूम अवस्था कचेरीत पोहोचल्यावर माझ्यात त्राण उरणार नसतील तर मोटरसायकलच मला जास्त 'सोयी'ची आहे. समाजात (जगात कुठेही) वेगवेगळ्या आर्थिक स्तराचे लोकं राहात असतात. जी एखाद्याची चैन असते तीच दुसर्‍याची मूलभूत गरज असू शकते. सर्वांना एकाच पातळीवर आणणं शक्य आहे का? प्रत्येक जण शिक्षण, उच्च शिक्षण, व्यवसायभिमुख शिक्षण घेत असतो. का? आपला आर्थिक स्तर वाढावा आणि जास्त सुखासीन आयुष्य जगता यावं. ह्या अवस्थेसाठी कोणी बौद्धीक (शिक्षण) क्षमता वापरतो तर कोणी शारीरिक (श्रमाची कामे) क्षमता वापरतो. एकाचे काम दूसर्‍यासाठी अवघड असते. सायकल रिक्षा किंवा ताकदीने ओढलेली रिक्षा ह्यात बसताना अपराधी वाटतं ही गोष्ट खरी आहे. कारण आपण पैशांकडे 'सत्ता', 'माज' अशा नकारात्मक दृष्टीकोनातून पाहात नसतो. आपल्या स्वभावात ते नसतं. आपण संवेदनशील असतो. दुसर्‍याने आपल्या प्रवासाच्या सोयीसाठी घेतलेल्या श्रमांची आपल्याला जाणीव असते. म्हणूनच ती एक 'सोय' असते. सत्तेचा माज असता तर असे विचार आपल्या मनांत येणार नाहीत.

In reply to by प्रभाकर पेठकर

हाही दृष्टिकोन पटण्यासारखा आहे. त्याच गोष्टीकडे पाहण्याची प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी किंवा सापेक्ष असू शकते. पण डोळे फिरतील एवढा विरोधाभास मात्र नसावा.

In reply to by प्रभाकर पेठकर

सत्ता या शब्दाबाबत आपल्यापैकी अनेकांचा अनुभव बराच नकारात्मक असतो, पण सत्ता तशी सर्वत्र असते (फक्त राजकीय नाही). अनेकदा आपल्याला ती नको असली तरी आपल्याकडे इतरांपेक्षा काहीतरी जास्त असल्याने ती सत्ता मिळते. मी खरे तर दहा रूपयांची सोय घ्यायला गेले, दहा रूपयांच सुख मिळवायला गेले असं म्हटलं आहे मी, पण त्याचा परिणाम म्हणून इतरांपेक्षा विशेष सोय मला मिळवता आली - तीही एका अर्थी सत्ता आहेच!

एक मुलभुत प्रश्नः जिथे पैसे देउन रांग न लावता झटकन दर्शन घेता येते तेथे खरच देव असतो का ?

In reply to by कपिलमुनी

त्याचं उत्तर आम्हांला समजलेलं नाही, परंतु होकारार्थी उत्तर देणारे संशोधन एका गणितज्ञाने प्रसिद्ध केलेय बॉ. पाश्चिमात्य असल्याने त्याच्या विश्वासार्हतेवर कुणी संशयही घेत नाही. http://en.wikipedia.org/wiki/G%F6del%27s_ontological_proof

In reply to by बॅटमॅन

बॅटमुनी , त्या इक्वेशन पाहून झीट येउन पडलो आणि गुमानपणे देव हाये म्हणला .. २-४ पोरांना दाखवल्याबरोबर त्यांनी पण वाद न घालता देव आहे हे मान्य केलाय