✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वाल्मिकीचा वाल्या कोळी होतो तेव्हा ….

च
चिन्मय श्री जोशी यांनी
गुरुवार, 11/13/2014 - 15:27  ·  लेख
लेख
फडणवीस नानांना सोशल मिडिया वरून पडणारे शिव्या शाप बघून खरच वाईट वाटलं … गेली ५ वर्ष स्वतःचे ईमान न विकता सत्ताधार्यांचे वाभाडे काढणारे फडणवीस अक्षरशः केविलवाण्या चेहऱ्याने स्वताचा बचाव करत होते … त्यांच्या चेहऱ्यावरची अगतिकता लपत नव्हती …पण हे सारे असे का घडले ? भाजपला मिळालेल्या यशाचा इतका माज चढला का ? का सेनेचा मूर्खपणा सगळ्यांना नडला ? शरद पवारांचे मुरब्बी राजकारण सगळ्यांना भारी पडले म्हणावे ? का आपमतलबी आणि अप्पलपोटेपणाचा नमुना म्हणायचा ? या सगळ्या प्रश्नांची माझ्या परीने केलेली हि उकल … भाजप ला यश पचवत आले नाही हे तर खरेच आहे… लोकसभेच्या पायऱ्यांवर नतमस्तक होणारे मोदी कुठे आणि बहुजन समाजाला मुख्यमंत्रीपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त करणारे, अजित पवारांना बेड्या ठोकायची भाषा करणारे नेते कुठे ? भाजप ने युती तोडली पण ते एका अर्थी योग्यच होते. सेनेच्या हटवादी आणि एककल्ली नेतृत्वापासून सुटका करून घेणं गरजेच होतंच … लोकसभेला मोदींमुळे निवडून आलेल्या खासदारांच्या बळावर वल्गना करणाऱ्या सेनेला त्यांची जागा दाखवून देण्यात काहीच चूक नव्हतं … पण सेनेने प्रचारात अगदीच खालची पातळी गाठली आणि निकालानंतर सहज एकत्र येऊ शकणारे एक-मेकांचे वैरी झाले… सेनेची तऱ्हाच वेगळी, शिवरायांचा वारसा सांगणाऱ्या उद्धवना (आणि इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या त्यांच्या वारसांना) कोणीतरी स्वाभिमान या शब्दाचा अर्थ सांगणारी डिक्शनरी भेट देण्याची गरज आहे … निकाल लागताच आम्ही भाजप बरोबर जाऊ असे जाहीर न करता स्वाभिमानाची बिरबली थाटाची खिचडी शिजवत बसल्याचे परिणाम आज ते भोगत आहेत … पण हे सगळ असूनही कालचा प्रसंग टाळता आला असता … दिल्लीच्या नेत्यांना राज्याची समीकरणे न समजल्याने सगळाच गोंधळ झाला … फडणवीसांना शिवसेनेला बरोबर घेण्याची मनापासून इच्छा होती असे वाटत होते … राष्ट्रवादीचा पाठींबा म्हणजे असंगाशी संग इतकं तर ते नक्कीच ओळखून आहेत … पण मोदी -शहा जोडीने शत्रूचा(कॉन्ग्रेस ) शत्रू तो आपला मित्र म्हणून राष्ट्रवादी ला जवळ करायचं धोरण आखलं … राज्यातल्या जनतेमध्ये राष्ट्रवादी बद्दल असलेल्या रागाचा आणि संतापाचा अंदाज फडणविसांना नक्कीच असणार … म्हणूनच ते शिवसेनेला बरोबर घेण्याचा प्रयत्न करत राहिले … पण सरकारमध्ये जाण्याचे दरवाजे शिवसेनेने "अफजल खान" आणि "मोदींचा बाप" बरळून स्वतःच बंद केले होते … त्यामुळे सेनेला अद्दल शिकवण्यासाठी मोदी -शहा आतुर झाले असतील तर त्यात चूक काहीच नाही …त्यात भर घातली ती फडणवीस यांच्या दिल्लीतल्या भाजप मधल्याच हितशत्रूंनी …. त्यात सेनेच्या अपरिपक्व नेतृत्वाने तळ्यात मळ्यात करून स्वतःचे हसे करून घेतले आणि असलेली bargain power घालवून ठेवली …. या सगळ्या गोंधळाचा फायदा शरद पवारांनी उचलला नसता तरच नवल … त्यांनी एकाच वेळी किती पक्षी मारले बघा … १. शिवसेना आणि भाजप मध्ये दुरावा निर्माण केला - A divided house is easy to rule.. आणि स्वतःचा खरा शत्रू कोण हे न ओळखता येणाऱ्या, स्वताच्या बळाच्या अवास्तव कल्पना करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी पवारांचं काम अगदीच सोप करून ठेवलं आहे … २. अजित पवार यांचे पक्षातले वाढते वर्चस्व एका झटक्यात कमी केले …. पाठींबा असेपर्यंतच अजित पवार आणि त्यांचे सहकारी चौकशीच्या ससेमिऱ्यापासून वाचतील … पाठिंब्याच्या नाड्या अर्थातच शरद पवारांच्या हातात असतील … त्यांचे निमूट ऐकण्याशिवाय "टगे गैंग"कडे पर्याय नाहीये … ३. भाजप सरकार काम सुरु करायच्या आधीच बदनाम झालं आहे … लोकांच्या रागाला आणि रोषाला त्यांना सामोरं जाव लागणार आहे…. ४. सत्तेचे फायदे असेहि राष्ट्रवादीला (पवारांना) मिळत राहणार आहेत … भाजप मध्ये निवडणुकी आधी गेलेली १०-१५ डोकी आणि बाहेरून दिलेला पाठींबा याच्या बळावर पवार हवे तसे खेळू शकतात … ५. स्थिरते साठी भाजप च्या सरकारला बिनशर्त पाठींबा देऊन त्यांना लोकांपर्यंत त्याचं काम पोचवायची संधीच न देता १-२ वर्षात परत निवडणुका लादायच्या … लोकांचा विश्वास गमावून बसलेला भाजप, केंद्रातला सत्तेतला वाटा गेलेली, स्वाभिमानाचा मुद्दा आणि लढायची उमेद हरवलेली शिवसेना … मोदिंसमोर हतबल काँग्रेस … मग सत्ता कोणाची ?? या जाळ्यामध्ये भाजप आणि सेना अलगद अडकले आहेत … मोदींना सरळ दोन हात करायची माहित आहे … गनिमी कावा हा याच महाराष्ट्राच्या मातीत पिकतो… त्यांना जो पर्यंत हा सापळा कळेल तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल …त्यांच्या पाठीत राष्ट्रवादीचा खंजीर खोलवर रुतलेला असेल…. वाईट याच वाटत कि, या सगळ्यात फडणवीस यांच्या सारख्या अभ्यासू आणि प्रामाणिक माणसाचा बळी जाणार आहे …अशी माणसे आधीच दुर्मिळ होत चालली आहेत… एका वाल्मिकीचा परत वाल्या कोळी झालेला बघणे इतकंच आता महाराष्ट्राच्या हातात आहे … Copied from my Blog: http://kahitariasech.blogspot.in
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9099 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

अंशतः सहमत... वस्तुतः मी असे

आनन्दा
गुरुवार, 11/13/2014 - 15:35 नवीन
अंशतः सहमत... वस्तुतः मी असे म्हणेन की राष्ट्रवदीला संपवायची हीच योग्य संधी आहे.. आणि भाजपा जर समजण्याइतके सूज्ञ असतील, तर ते योग्य तेच करतील. मला देखील शिवसेना-भाजपा चे एकत्रित सरकार न आल्याबद्दल अत्यंत वाईट वाटले होते.. पण नंतर विचार केला, की त्यांनी जर स्वबळावर सत्तेत जायचे स्वप्न पाहिले तर त्यांचे तरी कात चुकले? मी असे म्हणेन की भाजपा अशी खेळी करेल की पवरांना १ वर्षातच पाठिंबा काढून घ्यावा लागेल. जाता जाता - पब्लिक मेमरी इज शॉर्ट, बट गूगल्स आर्काईव्ह इझ नॉट.
  • Log in or register to post comments

छान

माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 11/13/2014 - 15:58 नवीन
चांगले विवेचन रे चिन्मया. " त्यांनी एकाच वेळी किती पक्षी मारले बघा"... क्सले दगड व कसले पक्षी.तो उद्धव पन्नाशी ओलांडली तरी काही मोठा होत नाही.भाजपा मधल्या तरूण फळीला मोठे व्हायला जरा वेळ लागेल पण शिकतील ते हळूहळू.'खळ्ळ खट्याकचे' मतदारांनीच खळ्ळ खट्याक करून टाकले होते.'अनुभवी' कॉन्ग्रेसवाले कोपर्यात उभे राहून गंमत बघता आहेत. अशावेळी कोणीतरी पुढे होवून सरकार स्थापनेला मदत करणे गरजेचे होते.
  • Log in or register to post comments

प्रतिसादाबद्दल धन्यवाद...

चिन्मय श्री जोशी
गुरुवार, 11/13/2014 - 16:21 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद... पण राष्ट्रवदि अगदि बेभरवशाचा आहे... त्यान्च्य नादि न लागणेच बरे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

वर थत्ते यांनी नमूद

पिंपातला उंदीर
गुरुवार, 11/13/2014 - 17:08 नवीन
वर थत्ते यांनी नमूद केल्याप्रमाणे त्या त्या पक्षाचे समर्थक काही झाले तरी आपल्या च पक्षाला मत देतात किंवा पक्षाने कितीही खालची पातळी गाठली तरी पक्षाचे समर्थन करतात . वर भाजप चे अनेक समर्थक तेच करत आहेत . आपल्या पक्षाने अनेक भर्श्टाचारि नेत्याच टोळक असणारया पक्षाच समर्थन घेतलं आहे हि खंत जर त्याना मनातून पण (दाखवायचे दात काहीही वेगळ असले तरी ) वाटत नसली तर या पक्षाच कॉंग्रेस सारखच वेगाने अधपतन का होत आहे याच उत्तर मिळेल . दुर्दैवम्हणजे हेच भाजप समर्थक टोळक इथ कॉंग्रेस कशी नैतिक दृष्ट्या अधपतित आहे , राष्ट्रवादी कशी भ्रष्ट आहे , मनसे नाशिक मध्ये राष्ट्रवादीचा पाठींबा घेणे कसे चूक आहे यावर इतर लोकाना प्रवचन देत होती . बाकी एवढी आंधळी भक्ती असणारे कार्यकर्ते पाहून इतर पक्षांना नक्कीच भाजप चा हेवा वाटत असेल . बाकी झोपलेल्याला जाग करता येत पण झोपेच सोंग घेतलेल्याला कस जाग करणार हा चिरंतन प्रश्नच आहे आंधळ्या समर्थकांची हि वृत्ती पाहून लालू , गडकरी , पवार अशा भ्रष्ट नेत्यांमागे कार्यकर्ते कसे उभे असतात ह्या मध्यमवर्गीय प्रश्नाचे उत्तर पण मिळाले . बाकी चालू द्या . राष्ट्रवादीच्या मागे फरफटत जाऊन या राज्याचे अजून वाटोळे करू नका म्हणजे झाल
  • Log in or register to post comments

रडीचा डाव

तिमा
गुरुवार, 11/13/2014 - 17:42 नवीन
भाजप रडीचा डाव खेळली आहे. मतदान घेतले असते तर शिवसेनेच्या काही खासदारांनी(ज्यांनी हात वर केले होते) सुद्धा त्यांच्या बाजूने मतदान केले असते आणि मग ते उजळ माथ्याने निवडून आले असते. सर्व महाराष्ट्राच्या नजरेतून भाजप पक्ष उतरला आहे. आता पुन्हा तो विश्वास मिळवणे कधीच शक्य नाही.
  • Log in or register to post comments

पुन्हा तो विश्वास मिळवणे कधीच

बोका-ए-आझम
गुरुवार, 11/13/2014 - 18:40 नवीन
पुन्हा तो विश्वास मिळवणे कधीच शक्य नाही याच्याशी असहमत.लोकांची स्मरणशक्ती ही तात्पुरती असते. १९७७ मध्ये काँग्रेसला पाडणा-या जनतेने १९८० मध्ये त्याच काँग्रेसला दणदणीत विजय मिळवून दिला. २००४ मध्ये गोध्राकांड भाजपला नडलं. त्याच भाजपने २०१४ मध्ये स्वबळावर सत्ता मिळवली. ही सगळी उदाहरणं हेच सांगतात की लोकांना काहीही फरक पडत नाही. आपल्या देशात पक्षाला कोणीही मत देत नाही. माणसांना देतात.म्हणूनच नेते आयाराम-गयारामगिरी करु शकतात. आता लोकांची डोकी भडकलेली आहेत आणि प्रसारमाध्यमं ती अजून भडकावत आहेत. शांत झाल्यावर प्रत्येकजण ताळ्यावर येईल आणि परिस्थितीची अपरिहार्यता ओळखून जे काय करायचं ते करेल. आत्ता सगळ्यात जास्त कांगावा हा शिवसेनेचा आहे कारण ते अस्तित्वाची लढाई लढत आहेत आणि आपल्या नेत्याच्या नाकर्तेपणामुळे आपल्यावर ही परिस्थिती आली आहे हे त्यांना दिसतंय पण मान्य करण्याची त्यांची तयारी नाही.
  • Log in or register to post comments

हे सगळ जरा कानाला पकडुन

स्पंदना
Fri, 11/14/2014 - 04:39 नवीन
हे सगळ जरा कानाला पकडुन कुणीतरी त्या उद्ध्वाला वाचायला लावा. उद्ध्वस्त करुन ठेवला त्याने महाराष्ट्र!! सत्तेला चिकटुन रहाणार्‍या पवारांना अशी संधी देण्याच बहुमोल काम त्यान केलयं. खरतर निदान आतातरी शिवसैनिकांनी शहाणं होउन ठाकर्‍यांना हटवौन खरोखर शिवसेना जागृत ठेवणार नेतृत्व निवडावं.
  • Log in or register to post comments

सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणारा

मदनबाण
Fri, 11/14/2014 - 07:17 नवीन
सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणारा मेसेज... ;) नागपुरच्या चड्डीला बारामतीचा नाडा दर सहा महिन्याला बांधा आणि सोडा कमळाबाईंनी दिली परिक्षा अन् घड्याळ झाले पास धनुष्याचा हुकला नेम नशिबी आला वनवास शरदाच्या चांदण्यात देवेंद्र झाला राजा कुठे नेवुन ठेवला मित्रांनो महाराष्ट्र माझा...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आप की कशिश सरफरोश है.... आप का नशा युह मदहोश है ;) {Aashiq Banaya Aapne }
  • Log in or register to post comments

Finally Maharashtra Gets a CM

मृत्युन्जय
Fri, 11/14/2014 - 12:32 नवीन
Finally Maharashtra Gets a CM who has the courage to stand upto his own words DF फडणवीस नानांना सोशल मिडिया वरून पडणारे शिव्या शाप बघून खरच वाईट वाटलं … लोकांनी त्यांची आरती ओवाळावी असे त्यांनी काय केले आहे हे कळाले नाही. गेली ५ वर्ष स्वतःचे ईमान न विकता सत्ताधार्यांचे वाभाडे काढणारे फडणवीस अक्षरशः केविलवाण्या चेहऱ्याने स्वताचा बचाव करत होते … ईमान विकले नाही कारण संधी मिळाली नाही. संधी मिळाल्यानंतर पहिल्या प्रसंगातच ईमान विकणार्‍या माणसाने गेली ५ वर्षे ईमान विकले नाही म्हणुन कसले कौतुक? आणि सत्ताधार्‍यांचे वाभाडे काढले त्याचे कौतुक फक्त ते स्वतः जर एखाद्या सत्तालोलुप राजकारण्यासारखे वागले नाहित तरच. दिल्ली निवडणुकांमध्ये केजरीवालांवर ताशेरे ओढले कारण ज्यांच्याविरुद्ध लढले त्या काँग्रेसचा आधार घेतला म्हणुन. भाजपाची ही कृती त्यापेक्षाही नीच आहे. त्यावेळेस भाजपा बद्दल सहानूभूती वाटली होती आता स्वतःबद्दलच वाटत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरची अगतिकता लपत नव्हती …पण हे सारे असे का घडले ? अर्रे १२२ जागा मिळुनही परत हेच आगतिक? टाळी कधीच एका हाताने वाजत नाही राजा. राष्ट्रवादीच्या पाठिंब्याच्या बळावर युती तोडण्याची हिंमत केली ना? मग ताकाला जाउन भांडे कशाला लपवता? भाजपला मिळालेल्या यशाचा इतका माज चढला का ? मुर्ख आहेत ते. आणी हो. माजले पण आहेत. का सेनेचा मूर्खपणा सगळ्यांना नडला ? खरेच सेनेने मुर्खपणा केला? एका महिन्यापुर्वीपर्यंत मलाही असेच वाटत होते. युती तुटली तेव्हा तर नक्कीच आणि निकाल लागले तेव्हा तर अगदी १००%. पण सेनेला हे पक्के कळाले होते की ते भाजपा बरोबर लढले असते तर आत्ता मिळालेल्या ६६ ऐवजी समजा शतक मारले असते. तरी लोक हेच म्हणाले असते की मोदी होते म्हणुन सेना जिंकली. आता लोकांना हे कळाले आहे की ६६ ही शिवसेनेची ताकद आहे. भुजबळ, राज, राणे इत्यादी सोडुन गेले असले तरीही आज सेनेची ताकद त्यांच्याहून जास्तच आहे. बाळासाहेब जाउन काही काळ लोटला आहे आता. त्यामुळे या ६६ जागा सहानूभुतीवर नाही मिळालेल्या. काही लोकांचा नक्कीच उद्धव ठाकरे यांना पाठिंबा आहे. मनसेला मिळालेल्या १ जागे च्या आणी राणेंच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर (सेनेने त्यांचा पराभव करण्याचा विडा उचलला होता), सेनेचे सामर्थ्य उठुन दिसते. लोकांना हे कळाले आहे की सेना जिवंत आहे, स्वत:च्या पायावर उभी आहे आणि त्यांना कुबड्या नकोत शरद पवारांचे मुरब्बी राजकारण सगळ्यांना भारी पडले म्हणावे ? का आपमतलबी आणि अप्पलपोटेपणाचा नमुना म्हणायचा ? शरद पवार गेली कित्येक दशके सगळ्यांना भारी पडत आलेले आहेत. भाजपा रावा बरोबर गेली म्हणुन मी त्यांच्या विरोधात आहे. पण आता शरद पॉवर साहेब जिवंत असेपर्यंत माझे मत राष्ट्रवादीला कारण भारतात डोक्यात मेंदू आणी मेंदुत अक्कल असलेला एकच राजकारणी आहे बाकी सगळे अकलेच्या नावाने कांदे आहेत. जर सगळेच राजकारणी एकाच माळेचे मणी असतील तर किमान हुषार राजकारण्याला मी मत देइन. अजित पवारांना बेड्या ठोकायची भाषा करणारे नेते कुठे ? बेड्या?? अजित पवार सहा महिन्यात जलसंपदा मंत्री नाही झाले म्हणजे मिळवली. अहो बहुमत सिद्ध झाल्याझाल्या बाजार समित्या बंद करण्याचा निर्णय रद्द करणे हा काय योगायोग आहे काय? आधीच सत्ताधारी पक्षात १७ आमदार राष्ट्रवादीची निर्यात होते. त्यात आता त्यांचा पाठिंबा. म्हणजे सरकार त्यांचेच आहे. सध्या बाहेर बसले आहेत एवढेच. पण हे सगळ असूनही कालचा प्रसंग टाळता आला असता … दिल्लीच्या नेत्यांना राज्याची समीकरणे न समजल्याने सगळाच गोंधळ झाला … फडणवीसांना शिवसेनेला बरोबर घेण्याची मनापासून इच्छा होती असे वाटत होते … राष्ट्रवादीचा पाठींबा म्हणजे असंगाशी संग इतकं तर ते नक्कीच ओळखून आहेत … पण मोदी -शहा जोडीने शत्रूचा(कॉन्ग्रेस ) शत्रू तो आपला मित्र म्हणून राष्ट्रवादी ला जवळ करायचं धोरण आखलं … म्हणजे पहिल्यापासून सेना हे बोंबलत होती की सत्ता मोदींकडेच असणार, फडणवीस केवळ बाहुले आहेत, सत्तेवर येउनही स्थानिक नेते (फडणावीस वगैरे) राज्याच्या हिताचा विचार करु शकणार नाहित आणि केंद्राच्या इशार्‍यावर बुगुबुगु मान हलवणारे बैल असतील वगैरे वगैरे ते खरेच म्हणायचे की काय? वाईट याच वाटत कि, या सगळ्यात फडणवीस यांच्या सारख्या अभ्यासू आणि प्रामाणिक माणसाचा बळी जाणार आहे …अशी माणसे आधीच दुर्मिळ होत चालली आहेत… वा वा. मनमोहन सिंगांवर एकीकडे कठपुतली म्हणुन टीका करायची आणि तिच स्थिती असणार्‍या फडणवीसांबद्दल सहानूभूती? किमाण मनमोहन सिंग स्वतःची परिस्थिती ओळखुन होते म्हणायचे. तोड बंदच ठेवायचे. नंतर अंगलट येतील अशी विधाने तरी नाही करायचे. आधी ड्रामेबाजी करायची आणि मग "आई नाही म्हणाली म्हणून नाहितर ......" टाइप चेहरा करायचा याच्यात काय अर्थ आहे?
  • Log in or register to post comments

सहमत आहे....

चिन्मय श्री जोशी
Fri, 11/14/2014 - 13:40 नवीन
तुमच्या मताशी सहमत आहे पण नविन सरकारला थोडा वेळ द्यावा असे मला वाटते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

नक्की?

सुनील
Sat, 11/15/2014 - 06:42 नवीन
अहो बहुमत सिद्ध झाल्याझाल्या बाजार समित्या बंद करण्याचा निर्णय रद्द करणे हा काय योगायोग आहे काय?
ह्या बातमीचा दुवा मिळू शकेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सह्मत! +१

दुश्यन्त
Mon, 11/17/2014 - 14:51 नवीन
सह्मत! +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मृत्युंजय यांच्याशी सहमत!

दुश्यन्त
Mon, 11/17/2014 - 14:53 नवीन
मृत्युंजय यांच्याशी सहमत! भाजपला हा माज नडणार आहे. एनसीपीबरोबर कुठलाही छुपा/ उघड समझोता 'नाही नाही नाही' असे म्हणत भाजपने जे शेण खाल्ले त्याला लोक माफ करणार नाहीत. एनसीपीने भाजपला असाच पाठींबा दिला, युती तुटली की अर्ध्या तासात आगःडी तुटली याला लोक योगायोग मानत असतील असे भाजपवाले समजत असतील तर ते मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

राष्ट्रवादीवर पण गेम झाली असे वाटत नाही का?

स्वानंद
Fri, 11/14/2014 - 14:04 नवीन
राष्ट्रवादीला जर का सहा महिन्यात काही दिलेच नाही, आणी राष्ट्रवादीच्या लोकावर कारवाइ झाली तर पुन्हा विजय हा भाजपचा असेल ......................... राष्ट्रवादीवर पण गेम झाली असे वाटत नाही का?
  • Log in or register to post comments

उद्दावराव केळीवाले

hitesh
Fri, 11/14/2014 - 16:12 नवीन
केळीवाला बुट्टीभर केळी घेऊन बसला आहे. तुम्ही किती केळी घ्याल ? तुमच्या गरजेपुरतीच ना ? भाजपाला बहुमताला १५ लोकांचीच गरज आहे. सेनेने फक्त १५ च लोक द्यावेत की.. सेनेचे साठ असले तरी तितके केळी भाजपाला नकोचआहेय्त. म्हणजे भाजपाच १२० व सेनेचे १५. ... म्हणजे भाजपाची ताकद सेनेच्या आठपट भरते. उरलेली केळी सेनेने फेकुन द्यावीत. १५ चीच गरज असताना साठ लोक का उरावर बसवुन घ्यावेत ? म्हणुन भाजपाने ही खेळी खेळली.. हा व्यवहार समजायचे शहाणपण ज्याना नाहे ते लोक भाजपा सेना २ ला १ रेशो धरतात
  • Log in or register to post comments

नवीन सरकार मराठा आरक्षणाला हो

बॅटमॅन
Fri, 11/14/2014 - 16:21 नवीन
नवीन सरकार मराठा आरक्षणाला हो म्हणणार म्हणे. बीजेपीचा मतदार आता बहुधा अजूनच दुरावणार ;)
  • Log in or register to post comments

हि बातमी वाचून लैच हहपुवा

पिंपातला उंदीर
Fri, 11/14/2014 - 16:29 नवीन
हि बातमी वाचून लैच हहपुवा . मानल भाऊ काकाना . गुरुजी ऐकता ना वो ! http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/Sharad-Pawar-took-Broom-for-Swachha-Bharat/articleshow/45144863.cms
  • Log in or register to post comments

मला तरी वाटते द्वारकाधीश

विवेकपटाईत
Fri, 11/14/2014 - 20:07 नवीन
मला तरी वाटते द्वारकाधीश कृष्णाचे मनोगत ओळखण्याचे सामर्थ्य महाराष्ट्रातल्या नेत्यांमध्ये नाही, येत्या सहा महिन्यात भा ज प पूर्ण बहुमत वाली सरकार चालविताना दिसत आहे. धनुष्यबाण आणि घड्याळ दोन्ही शेवटी 'शंखच करतील.
  • Log in or register to post comments

.

hitesh
Fri, 11/14/2014 - 20:11 नवीन
घोडा चतुर घोडा चतुर... कृष्ण की अफजलखान ? काय म्हणायचे ते एकदाच ठरवा . एक पे रहना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

.

hitesh
Fri, 11/14/2014 - 20:16 नवीन
द्वारकाधेश कोण ? मोदी की पवार ? भाजपात आधीच तीसभर पवारांचीच माणसे आहेत.. आता ही नवीन पुन्हा दहा वीस भाज्पात जातील. द्वारमाधीश कोण ? मोदी की पवार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hitesh

+१

श्रीगुरुजी
Sat, 11/15/2014 - 15:07 नवीन
सहमत मोदी हे महाराष्ट्रातील प्रतिशिवाजी, जाणता राजा, शूर मावळे, तथाकथित स्वाभिमानी मर्दमराठे इ. सर्वांना गुंडाळून ठेवणार हे निश्चित. ज्या जोडगोळीने उ.प्र. सारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या राज्यात प्रस्थापितांना अक्षरशः धूळ चारली ती जोडगोळी नुसती पोकळ बडबड आणि वल्गना करणार्‍यांची काय पत्रास ठेवणार? भाजपने पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सेनेचा नेम साधलेला आहे. काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद न मिळवून देऊन काँग्रेसला देखील दणका मिळालेला आहे. मनसे संपुष्टात आली आहे. एका झटक्यात ४ पैकी ३ विरोधी पक्षांना धडा शिकविला. आता राष्ट्रवादीची भ्रष्टाचार प्रकरणे बाहेर काढली की तो पक्ष देखील अर्धमेला होईल. भाजपला पाठिंबा दिल्याचा पवारांना जबरदस्त पश्चाताप होईल. सेनेवर नेम साधण्यासाठी पवारांनी स्वतःहून स्वतःचा खांदा पुढे केला होता. सेनेवर नेम तर अचूक बसला आणि बंदुकीचा दणका बसणार तो मात्र पवारांना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

इतकेही सरळ प्रकरण वाटत नाही

बॅटमॅन
Sat, 11/15/2014 - 15:49 नवीन
इतकेही सरळ प्रकरण वाटत नाही हे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

.

hitesh
Sat, 11/15/2014 - 16:41 नवीन
आंधळे भक्त हजारो वर्षे कल्कीची वाट पहात आहेत, त्याना काय समजावुन सांगणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हितेसभाय,

जेपी
Sat, 11/15/2014 - 17:01 नवीन
हितेसभाय, कल्कीचे नाव घेऊ नये.चांगल नसत. आमचा नाना आसच कल्की कल्की करायचा.गल्ती ने त्याला खेटायला गेला आणी गेला तो गेलाच.
  • Log in or register to post comments

.

hitesh
Sat, 11/15/2014 - 19:38 नवीन
२ कल्कि आहेत. १. पुऋष ... १० अवतार. २. स्त्री .. नटी नेमक्या कुनामुले नाना मेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात

नितिन थत्ते
Sat, 11/15/2014 - 19:28 नवीन
एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात आली. लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात (निकालांच्या आधी) माझे खासदार मोदींना पाठिंबा देतील असे विधान राज ठाकरे यांनी केले होते. त्यावेळी राजनाथसिंग यांनी "अरे पण कोणी मागितलाय तुमचा पाठिंबा?" असं जाहीरपणे म्हटलं होतं. यावेळी राष्ट्रवादीने पाठिंबा देऊ केल्यावर कोणी मागितलाय पाठिंबा असं भाजपमधून कोणी म्हटले नाही. :)
  • Log in or register to post comments

>>> यावेळी राष्ट्रवादीने

श्रीगुरुजी
Sat, 11/15/2014 - 20:59 नवीन
>>> यावेळी राष्ट्रवादीने पाठिंबा देऊ केल्यावर कोणी मागितलाय पाठिंबा असं भाजपमधून कोणी म्हटले नाही. शिवसेनेला विरोधी पक्षात ढकलण्यासाठी हा पाठिंबा बागुलबुवा म्हणून वापरायचा होता, म्हणून तसे कोणी म्हटले नाही. समजा राष्ट्रवादीने पाठिंबा दिलाच नसता तर आता निकालानंतर शिवसेनेने केवढा प्रचंड माज करून अडवणूक केली असती याची कल्पना करा. राष्ट्रवादीने न मागताच पाठिंबा दिल्याने शिवसेनेला माज करायची संधीच मिळाली नाही. भाजपने चातुर्याने पाठिंबा न घेता पाठिंब्याचा वापर केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा