मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कमल घर (एक वात्रटपणा)

शरद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कमल घर चार एक वर्षांपूर्वी मी "उपक्रम"वर हायकूवर एक लेख लिहला होता.नेहमीच्या ५-७-५ या तंत्राची माहिती दिल्यावर कवी श्री. राजेश घासकडबी यांनी एक पृच्छा केली कमल घर बघ कमल घर कमल बघ ह्याला हायकू म्हणावयाचे का ? माझा यावरचा प्रतिसाद थोडा दीर्घ व अवांतर असल्याने प्रतिसाद म्हणून न देता एक नवीन चर्चा विषय म्हणून मांडला होता. चर्चा का हे पुढे वाचल्यावर लक्षात येईल. फारा वर्षांपूर्वी सत्यकथेत एका लेखिकेची एक कविता प्रसिद्ध झाली. त्यावेळी कवीमंडळात ही एक फार मानाची गोष्ट होती. आता आम्हाला कळली नाही, पण हे काही नवीन नव्हते. नेहमीचीच ओरड. खरी गंमत पुढील अंकात. त्या लेखिकेने पत्रच लिहले. " माझ्या अनेक कविता सत्यकथेने साभार परत पाठवल्या म्हणून मी पुरुष असून एक कविता स्त्रीचे नावाने पाठवली. या कवितेला काहीही अर्थ नाही. केवल स्त्रीचे नाव आहे म्हणून ही कविता छापली गेली." भागवत-पटवर्धन ही पोचलेली माणसे. त्यांनी पत्र छापले व त्याखाली खुलासा केला. "सत्यकथेकडे इतक्या स्त्रीलेखिकांच्या कविता दरमहा येतात की केवळ लेखिका म्हणून त्यांच्या कविता छापावयाच्या ठरवले तर तेवढाच उद्योग करावा लागेल. बाकी सर्व बंद. तेव्हा ते सोडा. आता कवीची कविता सर्वांना कळली पाहिजेच असे नाही. नाहीतर मर्ढेकर-पु.शि.रेगे अजून अप्रकाशितच राहिले असते. पण तरीही आम्हाला लागलेला कवितेचा अर्थ 'हा." त्यांनी कवितेचे रसाळ रसग्रहण खाली दिले. मागे एका लेखात मी लिहले होते की कवितेचा तुम्हाला लागलेला अर्थ तुमच्यापुरता तरी बरोबरच. ( हे मी अनेक लेखकांच्या लेखनाचे कॉपीराईट भंग करून काढलेले सार) तेव्हा श्री. राजेश यांच्या ५-७-५, तीन ओळी, या हायकूच्या फॉर्मात बसविलेल्या रचनेला हायकू म्हणावयास हरकत नसावी. आता दुसरे रसीक तज्ञ श्री. धम्मकलाडू यांना ती रचना सपाट वाटली व "भावगर्भ साक्षात्कार" झाला नाही म्हणून त्यांनी ही हायकू नव्हे असा निर्णय देऊन टाकला. मी श्री. धम्मकलाडू यांना प्रेमळ फुस (फुकट सल्ला) देऊ इच्छितो की " मित्रा, तुझे म्हणणे असे मांड "ही रचना सपाट आहे व त्यातून मला कोणताही भावगर्भ साक्षात्कार झाला नाही म्हणून या रचनेला मी हायकू म्हणावयास तयार नाही ".Quits. श्री. धम्मकलाडू एकदम तमाम थोर मराठी टीकाकारांच्या (म्हणजे कुलकर्ण्यांच्या) पंक्तीत पळी-पंचपात्र टाकावयास मोकळे. हायकूचे लक्षण " चित्र" व "भावगर्भ साक्षात्कार" पाहिजे . आता मी माझ्या कुवतीने एक अर्थ लावून चित्र उभे करतो. कमल घर... समोर सगळा राडाच राडा, पण त्याकडे दुर्लक्ष करू नकोस, तोही बघ., पण तो बघतांना त्यातील कमल, तेही बघ, हे झाले चित्र. आता "भावगर्भ साक्षात्कार" बघा. . आज आपल्या आजच्या जीवनात आपण आजुबाजुला नजर टाकली तर काय दिसते ? भ्रष्टाचार, बलात्कार, असल्या क्लेशकारक गोष्टीच समोर येतात. हा राडाच नाही कां ? आणि डोळे बंद करून घ्यावयाचे म्हटले तरी ते डोळ्यासमोरून हटणार नाही. मग जरा उघड्या डोळ्यांनीच त्याकडे बघा ना. यात काही सुधारणा करण्यासाठी आपण थोडातरी हातभर लावू शकतो याचा विचार करा. बघावयाचे ठरविल्यावर आपल्या लक्षात येईल की काही माणसे चांगले करण्यासाठी धडपडत आहेत. वृद्धांकरिता, अनाथ बालकांकरिता, निरपेक्ष वृत्तीने काम करणार्‍या व्यक्ती दिसतील. हीच या राड्यातील कमळे ! त्यांच्याकडे एकदा लक्ष गेले की आपणही यथाशक्ती मदत करू शकतो हेही वाटू लागेल. हा हायकू केवळ ५-७-५ शब्दात एवढे समोर उभे करू शकतो "कमल घर" व "कळकट कंदील" या दोन हायकूंवरील/ कवितांवरील माझ्या लेखांवरून वाचकांना कल्पना आली असेलच की अकलेचे तारे तोडावयाची तुमची तयारी असेल तर कोणत्याही निरर्थक हायकूचा वा निरर्थक कवितेचा सुसंगत अर्थ लावता येतो. मी लावलेल्या अर्थ कवीवर्य समीरसूर यांच्या अर्थाशी जुळणारा होता हे त्यांनी मान्य केले, छान ! पण नसते केले तरी काय बिघडणार होते ? मी लावलेला अर्थ (माझ्या दृष्टीने) योग्यच ठरणार. तुम्ही दुसरा लावा, कवीवर्य त्याला आतला खोल अर्थ म्हणून मान्यता देतील. त्यांचे काय जाते ? त्यांचा खरा मतलब तिसर्‍या followed by dinner सेमिनारशी आहे. थोडक्यात यशस्वी उद्योजक होण्यापेक्षा " consultant " होणे जसे सोपे तसे कवी होण्यापेक्षा टीकाकार होणे सोपे. अर्थात हे सिक्रेट येथील सर्वांना माहीत आहे हे प्रत्येक लेखावर येणार्‍या उदंड प्रतिसादांवरून सळ्यांना ज्ञात आहेच. पण आपण सांगून टाकलेले बरे.(प्राध्यापक. नाहीत कां मुलांनी, गाईडमधले सोडवलेले गणित आधीच वाचले असले तरी फळ्यावर सोडवून दाखवतात) तर मित्रहो, आपण एक नवीन उपक्रम सुरू करू या कां ?. कवीबृवांनी (त्यांच्या मते) निरर्थक हायकू लिहावी. इथले यशस्वी टीकाकार त्याचा सुसंगत अर्थ लावतील. अनेक अर्थ मिळण्याची शक्यता असल्याने कुणीही माझ्यामुळे तुम्हाला अर्थ कळला असे म्हणण्याचे कारण नाही. माझाच अर्थ बरोबर असेही कोणी म्हणणार नाही. कोणाचा डोलाराही कोसळणार नाही. वात्रटपणाचा व्हायरस डेंग्युच्या साथीसारखा मिपावर पसरेल. शरद .

वाचने 3235 वाचनखूण प्रतिक्रिया 7

सतिश गावडे 29/10/2014 - 08:05
तुझं रुसणं माझं हसणं झाली काशी पालक सुप आवाज खुप मोकळे आभाळ एक खटका बसतो झटका मन रीते !! आता इतक्याच. यांचे "रसग्रहण" झाले तर अजून लिहिन.

In reply to by सतिश गावडे

अत्रुप्त आत्मा 29/10/2014 - 10:03
@पालक सुप आवाज खुप मोकळे आभाळ >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling.gif आगोबा आला गणेशा आला कट्टा झाला! ;)

राजेश घासकडवी 29/10/2014 - 10:48
अहाहा, ती कविता पुन्हा वाचून त्या लेखावर झालेल्या चर्चेच्या रम्य आठवणी जाग्या झाल्या. हायकू लिहिताना पहिल्या ओळीत पाच, दुसऱ्या ओळीत सात आणि तिसऱ्या ओळीत सात अक्षरं असावीत असा संकेत आहे. त्याला धरून एक नवीन हायकू लिहितो माजयाशी तू मयतरी कर की! करनर क?

विजुभाऊ 29/10/2014 - 11:58
बद्कातला ब येताना पाहुनच मी घाबरलो. ( ५ + ७ + ५ ) तुझा हायकू वाचायका कायकू नकोच डोकेफोड ( ५ + ७ + ५ ) ते फुलपाखरु फुलावर बसलं स्वप्नं मोडलं....

सुनील 29/10/2014 - 12:17
वाटलं बाँब उडवल्या टिकल्या पचका झाला!

मित्रहो 29/10/2014 - 19:34
भारत बंद मी नशेतच धुंद प्रेम बकरा झालेत बहु होतीलही बहु आता आवरा शोधतो अर्थ अर्थातही निरर्थ भिंगाचा नंबर अरीगातो कशाला रे गातो बेसुर बरा

रामपुरी 29/10/2014 - 23:42
"अकलेचे तारे तोडावयाची तुमची तयारी असेल तर कोणत्याही निरर्थक हायकूचा वा निरर्थक कवितेचा सुसंगत अर्थ लावता येत" तरीच हल्ली रसग्रहणाच्या जिल्ब्या बदाबदा पडतायत