आदि कैलास,ओमपर्वतदर्शन आणि पार्वती सरोवर परिक्रमा.भाग-७
सहावा दिवस.
गालागढ ते बुधी. २२ किमी. उंची १०६०० फूट.
आजही कालच्याप्रमाणेच नाश्त्याचे पार्सल घेऊन प्रस्थान ठेवले. आज हवा कुंद होती, ढगाळ वातावरण होते. पण निसर्ग इतका सुंदर की त्रास अजिबात वाटत नव्हता. थोड्याच वेळात त्या सुप्रसिद्ध ४४४४ खडांज्या समोर ठाकल्या. सुरुवातीला छोट्या टेकडीवर एक सुबकसे मंदिर होते. दर्शन घेतले. तिथे एक गंमत दिसली. देवळाच्या मागच्या बाजूला एका उंचवट्यावर दोन खांबांना एक आडवी तुळई बांधलेली होती आणि तिला मोठी घंटा टांगली होती. तिचे प्रयोजन समजले नाही. कदाचित गावकर्यांशी संपर्क साधण्यासाठी ती योजना असावी.
खडांज्या उतरायला सुरुवात केली. मोठे कठीण होते ते उतरणे! एका बाजूला खोल दरी आणि एका बाजूला डोंगर. काही ठिकाणी रेलिंग लावलेले आहे, पण त्याची अवस्था यथातथाच आहे. जीव मुठीत धरुन उतरलो त्या खडांज्या. पायवाटेला लागलो. डोंगरातून वाट होती. उजव्या हाताला खोल दरीत कालीमैय्या संतापाने रोंरावत सुसाट धावत होती. तिचे हे रुप पाहून भीतीने गाळण उडाली होती. काही ठिकाणी डोक्याला लागतील अशा उंचीचा कातळ फोडून रस्ता तयार केलेला होता. ठिकठिकाणी डोंगरावरुन कोसळणारे प्रचंड जलप्रपात कालीच्या संतापात भर घालत असतात. काही ठिकाणी अशा जल प्रपाताखालून काढलेल्या रस्त्याने जावे लागते. कानठळ्या बसवणारा कालीच्या पाण्याचा आवाज प्रतिध्वनीरुपाने आपल्या डोक्यावरुनही प्रचंड प्रवाह वाहतो आहे असा आभास निर्माण करतो. एका ठिकाणी डोंगराच्या आधाराने फळ्यांचा पूल असाच एक जलप्रताप पार करण्यासाठी केलेला होता. तो पार करताना खूप भीती वाटत होती. जरासा तोल गेला असता तर त्या प्रवाहात नखही दृष्टीस पडले नसते. पार झालो आणि लगेच असे झाले की आमच्यासोबतच्या पटवर्धनांची हातातील पिशवी पडली आणि क्षणार्धात कालीमध्ये कुठे गडप झाली ते दिसलेही नाही.
याच प्रवासात जिथे १९९८ मध्ये डोंगर ढासळण्याची जी भयानक दुर्घटना घडली होती ते मालपा गाव लागते. त्यात प्रोतिमा बेदी या प्रसिद्ध न्रुत्यांगना-अभिनेत्रीसह त्यावेळचे कैलास यात्रेकरु, घोडेवाले, घोडे, सर्व तंबू, निगमचे कर्मचारी आणि गावकरी, त्यांची घरे, गुरेढोरे, आख्खे मालपा गाव दगडा-धोंड्यांच्या ढिगाखाली गाडले गेले होते. या दुर्घटनेला कारणीभूत झालेला जलप्रपात आणि तो ढिगारा ओलांडून जाताना जीव अगदी गलबलुन गेला. आपण आपल्याच भाऊबंदांच्या उरावर पाय ठेवुन त्यांना तुडवत जात आहोत या विचाराने कसेतरीच वाटत होते. जवळच त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारलेले शिवशिल्प आहे. तिथे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली आणि पुढे निघालो.
वाटेत दोन-तीन घरेवजा क्षुधाशांतीगृहे लागली. तिथेच एका ठिकाणी नाश्ता केला. गावकरी हसतमुखाने स्वागत करत होते.
लामारी हे त्यातल्यात्यात मोठे गाव आले. या गावापासून प्लास्टिक-फ्री झोन सुरू होतो. तसेच इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस चौक्या सुरू होतात. आमच्यातील एका बंधूंनी बिस्किटे खाऊन कागद सवयीने रस्त्यात टाकून दिला. डोंगरात कुठेतरी उभ्या असलेल्या सैनिकाने ते पाहिले आणि खाली आला. बरोबर कागद टाकलेल्या बंधूंजवळ येउन त्यांच्या हातातच तो कागद देऊन शांतपणे म्हणाला, "ये आपने फेका। थैली में रखो और मुकाम पर जाने के बाद डस्टबिन में डालो। ये प्लास्टिक-फ्री झोन है। आपने बोर्ड पढा नही शायद।" किती कर्तव्य तत्परता आणि विनम्रता!
गाला ते बुधी या प्रवासाला लागले बारा तास. बुधीचे मुक्कामाचे तंबू उंच डोंगरावर आहेत. खूप वेळ आधीपासून दिसत होते, पण तिथे पोहोचता पोहोचता नाकी नऊ आले. हा डोंगर खचण्याच्या अवस्थेत आहे. कधीही एखादी दुर्घटना घडू शकेल. पण आहे मात्र खूप सुंदर. हवा थंड. ऑक्सिजनची थोडी कमतरता जाणवते. तंबूंभोवती सुंदर बाग-बगीचा आहे. छान सुखद मुक्काम असतो बुधीचा.
बुधी म्हणजे बुद्धीवान लोकांचा गाव. गावात सगळे शिकलेले. घरटी दोन-तीन जण तरी पदवीधर म्हणजे डॉक्टर, इंजिनियर आहेत. मोठमोठे हुद्देदार आहेत. अर्थात सर्व शहरात राहतात. कधीतरी सणासुदीला येतात आपल्या गावाला. या गावाच्या खोर्यात निर्माण होते आहे एक मोठे स्पोर्टग्राउंड. तिथे हॉकी, क्रिक्रेट यांसारखे आंतरराष्ट्रीय खेळ खेळले जातील.
------
क्रमशः
वाचने
4271
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
हे अस्म सगळं वाचलं की या अशा
प्रगती आहे! :-)
आले एकदाची धावत पळत बरोबर.
In reply to आले एकदाची धावत पळत बरोबर. by स्पंदना
pikasa web album-vandana
खुशिताई
मस्तच