Skip to main content

न्यायदेवतेसमोर सारे सारखे हवेत...

लेखक sudhir_kale यांनी मंगळवार, 18/09/2007 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
अलिस्टेर परेराने २००६च्या नव्हेंबर महिन्यात दारूच्या धुंदीत बेफामपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्या कांहीं निष्पाप लोकांना चिरडून मारले. त्याच्यावर रीतसर खटला झाला, तो दोषी सिद्ध झाला व त्याला तीन वर्षे मुदतीची सक्त मजूरीची शिक्षाही झाली. एवढेच नव्हे तर त्याने केलेला जामिनाचा अर्जही सुनावणीसाठी आला व नाकारलाही गेला. असाच गुन्हा "सुपरर्ब्रॅट" समजल्या जाणार्‍या"सलमान खानने कांहीं वर्षापूर्वी केला, तोही त्याच्या शेजारी बसलेल्या पोलीसखात्याने दिलेल्या शरीर संरक्षकाच्या उपस्थितीत. पण त्या गुन्ह्याचा खटला अजून न्यायालयासमोर आलेला नाहीं, मग शिक्षा होणे दूरच. हे सलमान खानला कसे साध्य झालेले आहे? बडे-बडे वकील देऊन तो सारख्या तारखा "पाडत" असतो कीं पोलीस पुरावा असूनसुद्धा गप्प बसले आहेत? म्हणजे इथेही शेवटी त्याची सिलेब्रिटी स्टेटस त्याला तुरुंगाबाहेर राहू देते आहे का? हे सपशेल चूक आहे. दारूच्या नशेत गाडी चालवून पोलिसाच्या उपस्थितीत निरपराधी लोकांना जिवे मारणार्‍या नराधम सलमानला शिक्षा झालीच पाहिजे व तीही विनाविलंब! नाहीं तर लोक म्हणतील कीं न्यायदेवतेसमोर सारे सारखे नाहींत. सुधीर काळे

वाचने 12034
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

हे सपशेल चूक आहे. दारूच्या नशेत गाडी चालवून पोलिसाच्या उपस्थितीत निरपराधी लोकांना जिवे मारणार्‍या नराधम सलमानला शिक्षा झालीच पाहिजे व तीही विनाविलंब! पूर्णपणे सहमत आहे. हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे... तात्या.

गुन्हा सिद्ध झाला, की शिक्षा ही हवीच. त्याबद्दल चर्चा कशाला ? - सर्किट

ह्या केस चा काय निक्काल लागला? की अजूनही केस चालू आहे? वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद

सलमानला सेलिब्रिटि म्हणून जी वागणुक दिलि जाते ती ख्ररोखर चुकिची आहे. सलमानसारखाच 'पराक्रम' आपल्या काजोलच्या मातोश्रिंनी म्हणजेच तनुजानेदेखिल केला होता. असो. बहुतेक तो त्यांचा 'पब्लीसिटि स्टंट' असेल. पण आपला लेख आवड्ला.

आपण सगळे लोक एक गोष्ट नक्कीच करु शकतो. १.सलमानचे सिनेमे न पहाणे. २. टी व्ही वर सलमानचे गाणे किंवा सिनेमा दिसल्यास लगेच दुसरीकडे जाणे. एकदा त्याचे सेलेब्रिटी पण गेले की लोक त्याच्याकडे बघणारही नाहीत. त्याला सेलेब्रिटी कोण बनवितो ? तुम्ही आम्हीच ना?

काळेसाहेब, आपल्याविषयी पुर्ण आदर आहे पण कृपया न्यायालय / न्यायदेवता इ. इ. शब्द वापरणे सोडा. कोर्टाला मराठीत न्यायालय म्हणणे एकदम चुकीचे आहे. कारण न्यायालय म्हटले की तिथे न्याय मिळणेच अपेक्षित असते तसा तो मिळतोच असे नाही. किंवा देवता म्हटले की तिच्या हातून चूक होणे शक्य नाही. कोर्टात फक्त पुराव्याच्या आधारे निकाल मिळतो. त्याला फार्फार तर निकालालय किंवा निवाडागृह म्हणणे ठीक. मी सुचविलेले मराठी शब्द योग्य नसतील तर इतर शब्द शोधा किंवा सरळ कोर्ट असा शब्द वापरा.

In reply to by धर्मराजमुटके

न्यायालय म्हटले की तिथे न्याय मिळणेच अपेक्षित असते तसा तो मिळतोच असे नाही.
आईला आई म्हटले की तीने आईसारखेच वागणे अपेक्षीत असते पण प्रत्येक क्षणी प्रत्येक आई आदर्श वागतच असेल असे नाही; म्हणून आईला आई म्हणणे सोडा हे म्हणणे तर्कसुसंगत रहात नाही. तसेच न्यायालय म्हटले की तिथे न्याय मिळणेच अपेक्षित असते तसा तो मिळतोच असे नाही. म्हणून न्यायालय म्हणणे सोडा हे तर्कसुसंग असेल का या बद्दल मी साशंक आहे. आईही हाक एका आईला जसे कर्तव्याच्या जबाबदारीचे भान देते तसेच न्यायालय/न्यायाधीश शब्द एका न्यायाधिशाला जबाबदारीचे भान देऊ शकतो. काही कर्तव्यचुकार सर्वत्रच असतात म्हणून त्याक्षेत्रातील सर्वांना सरसकट नाकारणे यथा योग्य होईल का ? जगातल्या कोणत्याही व्यवस्था/नाती ट्रस्ट/विश्वास यावरच चालत असतात. संशय अथवा अविश्वासाच प्रमाण जेवणातल्या मीठा प्रमाणे हव म्हणजे विश्वास आंधळेपणाने ठेवले जाणार नाहीत पण मीठ/संषयातून येणारा अविश्वास अती झाला तर जेवण खारट होत न्यायायालयाचा तुमच्या शब्दात निवाडागृहाचा) प्रत्येक निवाडा कुणान कुणाला चूकीचा वाटेल आणि सर्वजण निवाडागृहांची व्यवस्थाच नाकारू लागतील याने अराजकात केवळ भरच पडेल. आईने भावंडात निवाडा देताना कमी जास्त जरी केले तरी तेवढ्यापुरते दुखी: होऊन आपण जसे विसरून जातो तसेच निवाडागृहाचा निवाडा न्याय्य म्हणून स्विकारणे डिनायलिझम मधून बाहेर पडून जो काही निवाडा पुढ्यात आहे तो स्विकारण्यास मनाची तयारी करतो. न्यायालय भारतातले असो अथवा सौदी आरेबीयातले ते त्यांच्या समोर असलेल्या कायदा आणि नियमांना अनुसरून निवाडा करते आहे का हे महत्वाचे. सहसा त्रुटी या कायदा आणि व्यवस्थेत असतात. न्यायाधीश ही व्यक्ती त्रयस्थ असते म्हणून तीचा निवाडा तटस्थ आणि म्हणून न्याय्य असण्याची शक्यता अधीक असते. एक न्यायाधीशही चुकू शकतो म्हणून भारतात त्रीस्तरीय व्यव्स्था उपलब्ध केली आहे. सर्वोच्च न्यायालय सहसा प्रारंभिक निवाडा देत नाही तुम्हाला कंपलसरीली जिल्हास्तर, उच्चन्यायालय आणि मग सर्वोच्चन्यायालय अशा पायर्‍या घ्याव्या लागतात. भारतात न्यायालयीन व्यवस्थेत उशीर/दिरंगाई तंत्रज्ञानाचा अभाव/ आर्थीक सबळांना अधीक चांगले वकील मिळणे असे प्रश्न आहेत नाही असे नाही. पण यातील न्यायाधीशांच्या नेमणूकांकरता तंत्रज्ञानासाठी अधीक कोर्टरूम्स साठी आर्थीक व्यवस्था शासनाची असते हे शासन लोकनियूक्त आहेत आणि या लोकनियूक्त शासनावर पुरेशी आर्थीक व्यवस्थेकरता दबाव न टाकण्याची जबाबदारी शेवटी आमजनतेवर येते हे इथे लक्षात घेतले पाहीजे. जेवढी प्रोग्रेसीव्ह लोकशाही व्यवस्था नाही त्यापेक्षा अधीक प्रोग्रेसीव्ह राहण्याचा प्रयास भारतीय न्यायव्यवस्थेने बर्‍यापैकी केला आहे. भारतीय न्यायप्रक्रीयेची समीक्षा होऊ नये असे नाही पण तीला सरसकट नाकारणे न्यायव्यवस्थेच्या सकारात्मक यशप्राप्तींबद्दल अन्याय्यकारक होते असे वाटते.

मी निकालव्यवस्थेला नाकारत नाही आहे. फक्त त्यात न्यायालय, न्याय, न्यायव्यवस्था, न्यायाधीश, न्यायदेवता अशा शब्दांना आक्षेप घेत आहे. इंग्रजी शब्दांचे मराठी रुप देतांना फारच भावनाप्रधान होऊन भाषांतर केले आहे. खाली सुचवलेले शब्द योग्य वाटतात. न्यायालय = निवाडागृह (Court) न्याय = निकाल / निवाडा (Judgement) न्यायव्यवस्था = निकालव्यवस्था न्यायाधीश = निवाडाकार / निवाडा करणारा अधिकारी (judge) न्यायदेवता = हा शब्दच असू नये.

In reply to by धर्मराजमुटके

इंग्रजी शब्दांचे मराठी रुप देतांना फारच भावनाप्रधान होऊन भाषांतर केले आहे.
मी असहमत आहे फारतर श्रद्धावान होऊन अनुवाद केला असे म्हणा श्रद्धा हि विश्वासाची जननी आहे आणि संस्कृती विश्वासावर चालते अविश्वासावर नाही. न्याय हा शब्द निवाडागृहांवर अंशतः का होईना नैतीक जबाबदारी टाकणारा शब्द आहे भावनीकतेतून नाही तर न्याय हा शब्द निवाडागृहांवर जी महत्वपूर्ण नैतीक जबाबदारी टाकतो त्या करता महत्वाचा आणि समर्थनीय आहे. न्याय हा शब्द केवळ मराठीत वापरला जातो का हिंदीतही ? दुसरेतर तो इंग्रजीचा अनुवादच आहे ? का न्याय या शब्दाची संकल्पना भारतात पुर्वपरंपार आहे हे तपासण्याची गरज अहे.

In reply to by माहितगार

नैतिक जबाबदारी कशाला म्हणतात ? ज्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मोबदला मिळत नाही पण जी गोष्ट केल्याने तुम्हाला आत्मिक आनंद / समाधान मिळते. न्यायनिवाडा ही नैतिक जबाबदारी कशी ? ती एक जनतेला मिळणारी सरकारी सेवा आहे. जज / वकीलांना त्याचा मोबदला मिळतो. का न्याय या शब्दाची संकल्पना भारतात पुर्वपरंपार आहे हे तपासण्याची गरज आहे. दोघांच्या भांडणात त्या दोघांना मान्य असलेल्या तिसर्‍या व्यक्तीकडून / संस्थेकडून निवाडा मिळविणे ही संकल्पना केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात फार फार काळापासून चालत आलेली आहे. फक्त त्या निवाडयाला / निकालाला "न्याय" असे संबोधून आपण फारच भावनाप्रधान होतो. मग आम्हाला न्याय मिळाला नाही म्ह्णून आपण गळे काढायला मोकळे ! म्हणून त्याला न्यायव्यवस्था न म्हणता निवाडाव्यवस्था असे रुक्ष (आणि योग्य) संबोधन दिले की की पुढची दु:खे टळू शकतात. कारण निवाडा / निकाल हा समोर उपलब्ध असलेल्या पुराव्यांवर होत असतो. रामायण / महाभारत कालात किंवा राजेशाही पद्धतीत न्याय / अन्याय होत असावा कारण तेथे केवळ पुरावा हाच एक घटक निवाडा करण्यासाठी ग्राह्य धरला जात नसे.

In reply to by धर्मराजमुटके

न्याय मिळाला नाही म्ह्णून आपण गळे काढायला मोकळे !
तुम्ही निवाडा म्हटले तरी निवाडा न्याय्य नाही म्हणून लोक गळे काढणारच ना ? माझे म्हणणे श्रद्धा असली म्हणजे गळे काढणार्‍यांचे प्रमाण त्यातल्या त्यात कमी राहते.

In reply to by धर्मराजमुटके

नैतिक जबाबदारी
तुमच्यात आणि माझ्यात वाद झाला आणि तो सोडवण्या साठी आपण मिपा संपादकाकडे गेलो तर त्या मिपा संपादकास त्याच्या सेवेकरीता आर्थीक मोबदला मिळतोच असे नाही तरीही त्रयस्थ मिपा संपादक निष्पक्षतेची जी जबाबदारी त्याच्या मनावर वागवत असतो ती त्याच्या मनाने स्विकारलेल्या नैतीकतेच्या मुल्यांनीच येत असते. न्यायालयांमध्ये त्रिस्तरीय व्यवस्था असली तरी निष्पक्षता न दाखवल्यास दंडात्मक तरतूद नसते, न्यायाधीश तेथे व्यक्तीगत नितीमत्तेच्या आधारेच स्वत;ची निष्पक्षता टिकवून असतात. (अशी चर्चा माझ्या करताही नवीन आहे पण इंटरेस्टींंग, धागाकर्त्यास अनुषंगिक विषयांतराबद्दल क्षमस्व )

In reply to by धर्मराजमुटके

रामायण / महाभारत कालात किंवा राजेशाही पद्धतीत न्याय / अन्याय होत असावा कारण तेथे केवळ पुरावा हाच एक घटक निवाडा करण्यासाठी ग्राह्य धरला जात नसे.
भारतात राजाचा न्याय शेवटचा हे खरे परंतु तो तत्कालीन अभिप्रेत संकेतांनुसार न्याय्य असणे अभिप्रेत असे हाच भारती संस्कृतीतून येणार्‍या न्याय या शब्दाचा वेगळे पणा. मुल्य व्यवस्था काळानुरूप बदलते त्यामुळे त्या काळात दिलेले मुल्य आणि तदनुषंगिक न्याय आजच्या काळात न्याय्य वाटतीलच असे नव्हे. महाभारताच्या काळात युद्धात कंबरे खाली (पायावर) वार करणे चांगले समजले जात नव्हते कारण अपंग झालेली व्यक्ती अन्नाकरता धावूही शकणार नाही असे काही कारण असावे, शिवरायांच्या मध्ययूगीन काळात अपराध्याचा चौरंग करणे जरब बसवण्याच्या दृष्टीने योग्य आणि न्याय्य समजले जात होते, आजच्या काळात पोलीसांना गोळीबार करावाच लागला तर पायावर करण्यास सांगतात कारण जीव वाचला पाहीजे. म्हणजे मुल्य व्यवस्था काळानुरूप बदलत असते अभिप्रेत न्यायाची संकल्पनाही बदलत असते म्हत्वाचे काय तर न्याय्यतेचे मुल्य भारतीय संस्कृतीत परंपरेनेही तेवढेच जपले जाते. याकडे आपण दुर्लक्ष करून चालेल का म्हणून न्याय हा शब्द नाकारणे मला श्रेयस्कर वाटत नाही.

दळवी च्या पुरूष नाटकात असेच वर्णन आहे. "कोर्टात न्याय मिळत नाही तर कोर्टात जे मिळते त्याला न्याय म्हणतात".