मुंबई - पुणे - मुंबई
लेखनविषय (Tags)
मित्र मंडळी हो, आज मी तुम्हाला एक ष्टोरी सांगणार आहे. अनुभवकथन का काय म्हणतात तसलीच थोडीशी .
टायटलवर जाऊ नका . त्या सिनेमाशी (आणि मुक्त बर्वेशी ) माझ्या ब्लॉगचा (आणि माझा सुद्धा) काहीही संबंध नाही .
तरी स्टोरी म्हणलं कि काहीतरी भारी असणारच कि नाही ?? तसं बघायला गेल तर आपण सगळे (भारतीय लोक ) स्टोऱ्या ऐकण्यात आणि सांगण्यात इतके पटाईत असतो, कि विचारता सोय नाही. आणि मी सुद्धा त्यातलाच एक..
तर नमनाचे तेल संपवून आपण त्या स्टोरी कडे वळू .
मित्रहो हि ष्टोरी आहे मी आणि मुंबई नावाच्या शहरातल्या माझ्या अनुभवांची ..
तसं बघायचं तर मुंबईमध्ये माझा मामा राहतो आणि फिरायला म्हणून मुंबईला बरेच वेळा जायचा योग आला . पण ते म्हणजे तुळशीबागेतली खरेदी २ मिनिटात आटोपती घेण्यासारखंच होतं .
तर मला मुंबई ला जायचा प्रसंग आला कारण आम्ही चार टाळकी (पक्षी : घोडे, उडाणटप्पू इ.) पदवीधर झालो . आमचा नम्बर Accenture नावाच्या एका IT कंपनी मध्ये campus selection मध्ये लागला (हल्ली campus selection ला वधू परीक्षे इतकेच महत्व आले आहे ). आमच्या मागच्या ७ पिढ्या स्वर्गात धाडल्याचे पुण्य आमच्या गाठी (स्त्रियांनी पदरी असे वाचण्यास हरकत नाही) बांधले गेले. आणि तीर्थरूपांनी आम्हाला (दुर्मिळ अशा) कृतज्ञ नजरेने बघितले ..
तर या कंपनी ने आम्हास आमचे मूळ स्थान (पक्षी: कर्मभूमी ) पुण्यनगरीचा निरोप घेऊन मुंबा नगरीत आमच्या कर्तुत्वाचे झेंडे गाडण्यास पाचारण केले ..
(वरील वाक्य हे शिवकालीन बखरीच्या भाषाप्रभावाखाली लिहिले आहे - इति इतिहासकार बुडकुळे )
खर तर मी जन्माचा, हाडाचा आणि जिभेचा पुणेकर आहे (पुणेरी लोक पंचेन्द्रीयांमध्ये सर्वाधिक वापर जिभेचा करतात आणि सर्वात कमी कानाचा हे मी affidevit वर लिहून द्यायला तयार आहे - टीप: स्टैम्प पेपर चा खर्च वगळून) .
पुणे आणि मुंबई या दोन शहरांमध्ये माधुरी दीक्षित आणि ओमपुरीच्या सौंदर्याइतकंच साम्य आहे . त्यामुळे मला हवं तर मद्रासला पाठवा पण मुंबई ला नको असा माझा आग्रह. गरज पडलीच तर वेळ प्रसंगी धोतर लुंगी सारखे गुंडाळायची मी मनाची तयारी केली होती .. पण तिकडे लेहमन ब्रदर्स नि माती (खरं तर पैसे) खाल्ली आणि रिसेशनच्या भीतीने आम्ही मुंबानगरीस जाण्यास तयार झालो .
(एक शंका - आपल्या इथल्या पतसंस्थांपासून प्रेरणा घेऊनच लेहमन ब्रदर्स चा घोटाळा झाला असेल का ?? कोणीतरी PHD ला घ्यायला विषय बराय)
मुंबई नगरी मध्ये अस्मादिकांनी नोकरीच्या निमिताने पाउल ठेवले आणि IT नावाच्या एका जादुई नगरीशी परिचय झाला . MNC मध्ये असल्या मुळे आमची सुरवातीच्या दिवसात चांगलीच बडदास्त ठेवली होती . राहायला AC रूम आणि जायला रिक्षा असल्याने लोकल नावाच्या अवघड पेपरशी अजून सामना झालाच नव्हता . पुण्यात अभावानेच दिसणार मुला-मुलींमधल मोकळं वातावरण . सदैव घाई गडबड आणि पळापळ . हे सगळ वेगळच वाटत होतं .
सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपले आणि हळू हळू या शहराच्या वैशिष्ट्यांची जाणीव होऊ लागली. त्यातलीच काही (पुणेरी) निरीक्षणे पुढीलप्रमाणे .
१. पुण्यातल्या भगिनी समाज हा मुंबई च्या तुलनेत खूपच मागासलेला आहे
(चाणाक्ष पुणेकरांनी नोंद केली असेलच कि मुंबई साठी भगिनी हा शब्द वगळण्यात आला आहे )
मुंबईमध्ये समस्त महिला मंडळ पुरुषांना लाजवेल (शब्दशः अर्थ घेणे ) अशा प्रकारे कर्तुत्व (??) गाजवून दाखवीत असते .
२. पुण्यातील रिक्षामध्ये मीटर नावाची शोभेची वस्तू असते . परंतु मुंबई मध्ये वेळ हि गोष्ट चितळ्यांच्या बाकरवडी इतकीच प्रत्येकाला प्रिय असल्या मुळे; मीटर चा उपयोग मुंबई मध्ये रिक्षातून उतरल्यावर( वाद घालण्याचा) वेळ वाचावा म्हणून भाडे ठरवण्यासाठी करतात ..
३. मुंबईकर अत्यंत उधळपट्टी करणारे असून रात्री ११ वाजे पर्यंत दुकाने, सिग्नल इ. गोष्टी चालू ठेऊन विजेचा प्रचंड अपव्यय करतात .
यावर सगळ्या मुंबई मध्ये सुद्धा महाराष्ट्राप्रमाणेच लोड शेडींग चालू करावे असे पत्र मंत्रालयात पाठवायचा क्रांतिकारी विचार स्फुरला होता, परंतु आमच्या बिल्डींग चे ९ व मंत्रालयाचे १० असे १९ मजले विजेशिवाय चढाई करायच्या कल्पनेनी तो बेत रहित झाला . असो.
४. पानिपतच्या लढाई मध्ये लढायला गेलेले सगळे सैनिक एकाच विरार फास्ट लोकल मध्ये सामान, घोडे इ. सहित मावू शकले असते . परंतु त्या काळी पेशवाई मध्ये हत्ती पॉप्युलर असल्याने मराठ्यांचा पराभव झाला . असो .
५. पूर्वीच्या काळी ज्या लोकांनी तप करून क्रोध जिंकून घेतला होता त्यांचे वंशज हल्ली मुंबई मध्ये दुकान चालवतात . त्यामुळे पुणेकरांना, मुंबईमध्ये खरेदी करताना "खेकसणे" या खरेदीच्या अविभाज्य आणि मनोरंजनात्मक अंगाला मुकावे लागते .. . (याला पुण्यातील मॉल सुद्धा अपवाद नाहीत)
६. पुण्यातील दुचाकीस्वाराच्या अंगी जन्मजात असणारे गुण (जसे अष्टावधान, multi-tasking व चपळता ) हे मुंबईकरांकडे नसल्याने ते बहुधा वाहतुकीचे नियम पाळतात किंवा सरळ "बेस्ट/लोकल "सारख्या पर्यायांचा वापर करतात .
७. मुंबई च्या प्रदूषित व खाऱ्या हवेचा मराठी भाषिकांना मानसिक त्रास होतो व ते घराबाहेर पडले कि मराठी विसरून (तोडकं-मोडकं ) हिंदी बोलू लागतात .. परंतु असे कोणी जाहीर बोलून दाखवल्यास त्यांना राग येतो व तो राग शमवण्यासाठी ते थेट शिववडा ष्टॉल वर किंवा झुणका भाकर केंद्रावर जातात आणि आपण मराठी असल्याचे सिद्ध करून दाखवतात ..
८. मुंबईच्या लोकल मध्ये समस्त महिलावर्ग सर्व घरगुती कामे (आंघोळ व १/२ नंबर सोडून) मोठ्या उत्साहाने सामुदायिक रित्या पार पाडतो .
९. मुंबई मध्ये उकाडा खूप असल्याने तेथे कपड्यांचा वापर (खर तर आकार) कमी असणे हि अगदी सामान्य गोष्ट आहे . (सुज्ञ वाचकांना अधिक सांगणे न लगे ).
असे असले तरी सुद्धा मुंबईकरांना स्वेटरची खूप हौस आहे व ते दिवाळीच्या शॉपिंग मध्ये स्वेटर खरेदी करून थंडी आली अशी स्वताची समजूत घालून घेतात.
(हे म्हणजे अमेरिकेत बिन ढोल ताशांचा गणेशोत्सव साजरा करण्यासारखेच आहे . असू दे, असते एका एका शहराची मजबुरी)
१०. बस, रिक्षा किंवा लोकलचा संप असेल तेव्हा मुंबईकर शक्यतो सुट्टी टाकून संपाला नैतिक पाठींबा देतात.
(पुणेकर मुळात स्वावलंबी असल्याने पुण्यात संप नसताना आणि असताना विशेष फरक जाणवत नाही .)
११. मुंबईचा पाउस आणि पुण्याची PMT हे ब्रम्हदेवाने एकाच वेळी जन्माला घातले असावेत .
( इतके बेभरवशी प्रकार जगात शोधून सापडणार नाहीत .)
१२. सर्वसामान्य मुंबईकर एका वर्षाच्या लोकल पास वर पृथ्वी प्रदक्षिणे इतके अंतर प्रवास करून त्याची किंमत पुरती वसूल करतो . व वाचवलेल्या पैशातून चौपाटी वर भेळपुरी खाउन celebration करतो.
असो . जास्त लांबड न लावता माझे मुंबईपुराण इथेच थांबवतो . . ३ वर्षांच्या माझ्या अनुभवातून दिसलेली मुंबई इथे सांगायचा प्रयत्न केला आहे . मुंबईकरांना त्यांच्या शहराविषयी विशेष अभिमान नसल्याने मी हा लेख प्रसिद्ध करू शकलो . (असलाच अभिमान एखाद्याला, तरी माझ्याशी वाद घालायला वेळ मात्र नक्की नसेल अशी माझी खात्री आहे )
टीप: पुण्या साठी सुद्धा लेख लिहून तयार आहे .. पण सुरक्षिततेच्या कारणामुळे मी पुण्यापासून किमान हजार मैल लांब गेल्याशिवाय तो प्रसिद्ध करू इच्छित नाही ..
सुज्ञ वाचकांनी मला माफ करावे हि विनंती .
प्रतिक्रिया
लोडशेडिंग साठी फक्त वीजचोरीच
लोड शेडींग हे त्यात्या
आता आमचं डोम्बोली मध्यवर्ती
प्रतिसाद वाचून मजा वाटली ….
स्वतः काही न लिहिता दुसर्याने
हीच का ती तुमच्या मुंबईची
मी नीट वाचलाय हो ...
कै च्या कै...
शिद, वाण लागला असेल की
पुणेकर कात्रज, हडपसर करांना
काय ठरलं मग? मुंबई, पुणे की
येवढी सगळी चर्चा वाचून मुंबई
(No subject)
प्यारीस आणि शिर्डी असं ठरलय
भांडून झालं?
ठाणेकर
बरंच
+१
डावाने मात ???
मुंबईकरांना एका डावाने मात खावी लागायची.ज्या मुंबईने देशाला गावस्कर, तेंडुलकर, वेंगसरकर, साळसकर सारखे शैलीदार आणि फटकेबाज फलंदाज दिले त्याची डावाने मात, कसे शक्य आहे ;)अभिषेक, मनावर नको घेउस.
माझेही दोन पैसे !
रिक्षावाल्यांचं म्हणाल तर
तुमच्यासारखा रिक्षाचा अगदी
दोन रिक्षानुभव माझेही !
विचार येतो की सचीन, बाबा रे हाफ चड्डीत लंडनला जातोस पण पुण्याला जाऊन दाखव एकदा.*lol* मात्र पुण्याच्या रिक्षावाल्यांचा मलाही आलेला अनुभव हा वाईटच होता. अनुभव १) पंधरा वीस मिनिटाच्या अंतराचे मला दोनशे रुपये सांगितले होते, जायला तासभर लागतो असेही सांगितले होते, आणि तब्बल वीस किलोमीटर लांब आहे असेही सांगितले होते. वीस किलोमीटर अंतर कोणी रिक्षाने जाते का, हास्यास्पद ! प्रत्यक्षात मात्र मी गूगाळून गेलो असल्याने फसलो नाही, तर बस पकडून दोघांचे ७+७ चौदा रुपयांचे तिकीट काढून गेलो. चौदा रुपयांत काम झाले. आणि हो, चौकशी करायच्या आधी या रिक्षावाल्याला मी शंभरचे सुट्टे देऊन एक छोटीशी मदतच केली होती. भाऊ त्याची तरी जाण ठेवायची, जरा कमीचाच चुना लावायचा प्रयत्न करायचा होतास. कि हाच रेट कमी करून होता ? *shok* अनुभव २) मुंबईहून खाजगी बसने जाताना चुकून एक स्टॉप अलीकडे की पलीकडे उतरलो. त्या ठिकाणी दुसर्यांदा आणि या रूटने पहिल्यांदाच जात असल्याने गोंधळलो आणि अलीकडे की पलीकडे हे पण समजत नव्हते. एका रिक्षावाल्याला मदत म्हणून विचारले तर म्हणाला, अहो खूप दूर निघून आलात, बसा मी पोहोचवतो. आता त्या रटरटीत उन्हात विचार केला जाऊ दे एखाद मीटरचे दहा-पंधरा रुपये. पण मीटर हा प्रकार नसल्याने नशीब बुद्दी झाली भाडे विचारायचे तर त्याने काय बोलावे? चक्क साठ रुपये. त्याला वाटले मी अलिबाग वरून आलोय (ही म्हण आहे हा, कोणी अलिबागकर भांडायला येऊ नका प्लीज) पण मी आलेलो मुंबईवरून, मी लागलीच रिक्षा सोडून उतरलो. तर त्याने दुसर्या रिक्षावाल्याला हाक मारून बोलायला सुरुवात केली. तो पण बोलला, की साठ रुपये बरोबर आहेत. मी मनातल्या मनात म्हणालो या आता. पुढे जाऊन चौकशी करूया म्हटले तर निव्वळ शंभरेक पावले चालताच मला पहिल्या वेळचा ओळखीचा परीसर दिसू लागला आणि बस पुढे आणखी शंभर पावले चालून इच्छित स्थळी पोहोचलो देखील. असो, वरचे किस्से वाचून हे आठवले, शीतावरून भाताची परीक्षा करायची नाही, वा पुण्यातले रिक्षावाले भामटे म्हणून पुणेकर भामटे असा निष्कर्शही काढायचा नाहीये. पण हे असे घडले खरे. त्यामुळे पुण्याला जाणार्या पर्यटकांना एक सल्ला - आपल्या स्मार्टफोनमध्ये नकाशे वगैरे गूगाळायची सोय नेहमी हाताशी ठेवा.मुटकेसाहेब, सूड आणि सखी
हो गं
आणि तुम्ही फक्त पुण्यातल्याच
बंगलोरचे रिक्षावाले लै
बंगलोरचे रिक्षावाले
चेन्नै आणि दिल्लीतील
कहर आहेस तु रेवाक्का!
बरं झालं तूच बोल्लीस हो आज्जे
काय गं बाई! काही बरं बोलायचं
हम्म्म्...
धागा मुंबईचा असो वा डोंबोलीचा
धागा मुंबईचा असो वा डोंबोलीचा, कुठल्याही शहराचा एक साधा धागादेखिल पुण्याच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होतच नाही.अहो असे काय करता, (निदान या) धाग्याच्या (तरी) नावातच पुणे आहे, पुण्याचा उल्लेख होणारच, आणि मुंबईचे नावही असल्याने मुंबईकरही इथे येणारच .. आता मुंबईचे नाव दोनदा असल्याने मुंबईचे थोडे वेटेज जास्त आहे इतकेच ;)जाने दो
अवांतर - बाकी मला व्यक्तिशः
अवांतर - बाकी मला व्यक्तिशः मुंबई मनापासून आवडते.या आधी अवांतर लिहिले नसते तरी चालले असते, धाग्यावर दुसर्या शहराचे नावडत्याच गोष्टी लिहाव्यात असा नियम नाहीये ;) बाकी मला स्वताला पुण्याला राहण्याचा अनुभव नाही त्यामुळे पुण्याबद्दल नेमके लिहू शकत नाही. पण इतर सामान्य जणांप्रमाणे पुणे म्हटले की विद्येचे माहेरघर, मानाचे गणपती, पुणेरी पाट्या आणि चितळेंच्या बाकरवड्या या चार गोष्टी एकालगोलग डोक्यात येतात.अवांतर - बाकी मला व्यक्तिशः
मलाही तेच समजत नाही की पुणेकर
काल टिळक रोड कि लक्ष्मी रोडवर
दुकानाच्यावर???
काढला असता राव, पण त्यासाठी
हमखास शतकी-दीडशतकी धागा
Pagination