मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नवीन मराठी शब्द- सोपे मराठी शब्द

कौशिक लेले · · काथ्याकूट
ऑनलाईन मराठी शिकवण्याच्या यशस्वी आणि लोकप्रिय उपक्रमानंतर काल गुढीपाडव्याच्या - मराठी नवीन वर्षाच्या - शुभमुहूर्तावर मराठी भाषा विषयक नवीन उपक्रम सुरू केला आहे. जो आहे - "नवीन मराठी शब्द- सोपे मराठी शब्द". चला, नवीन मराठी शब्द घडवूया; असा शब्द सुचला की जास्तित जास्त जणांपर्यंत तो पोचवूया; एकापेक्षा जास्त पर्याय असतील तर कुठला जास्त चांगला वाटतो ते ठरवूया; आणि असे नवीन शब्द मराठी भाषेत रुळवुया. इतका साधा सोपा उपक्रम आहे हा !!. हा उपक्रम माझं एकट्याचं किंवा कोणा एका व्यक्तीचं काम नाही. आपण सर्वांनी हा जगन्नाथाचा रथ ओढायचा आहे. आणि वाटतं तितकं हे काम अवघड नाही. या उपक्रमासाठी वेगळा वेळही काढायची गरज नाही. आपल्या रोजच्या मराठी बोलण्यात/वाचण्यात एखादा इंग्रजी शब्द ऐकला-वाचला की Back of the mind त्याचा सोपा मराठी शब्द काय असेल याचा विचार करायचा. आणि असा काही शब्द सुचला की आपल्या फेसबुक ग्रूप वर इतरांना सांगायचा. लोकांना कदाचित तो आवडून जाईल किंवा त्यातून अजून नवीन कल्पना सुचतील. साध्या मराठीत संगायचे तर तुमच्या "क्रिएटिव्हिटी" ला वाव आणि जरा "ब्रेन्स्टॉर्मिंग". रोजच्या धावपळीत ही "क्रिएटिव्हिटी" तुम्हाला "रिफ्रेशच" करेल. एकदम वैज्ञानिक संज्ञांवर उडी न मारता रोजच्या वापरातल्या, इंटरनेट वर वापरल्या जाणाऱ्या शब्दांपासून सुरूवात करूया. उदा. १) दुकानांवरच्या पाट्या २) टीव्ही वरच्या मराठी मालिकांमधले संवाद. उदा. "मी तुला खूप मिस्‌ करते" ई. ३) मराठी बातम्यांमधले शब्द उदा. ब्रेकिंग न्यूज, बंडखोराला तिकिटाची ऑफर, ई. ४) एफेम रेडीओ वरची रेडिओ-जॉकींची बडबड ५) वर्तमानपत्रांमधल्या. टीव्ही-रेडिओ वरच्या जाहिराती तुम्हाला जाणवलंच असेल की यासाठी भाषातज्ञ, व्याकरणतज्ञ असण्याची काही गरज नाही. साधीसोपी माणसं आणि त्यांचे साधे सोपे शब्द !! तर नक्की या फेसबुक पेजला जॉइन व्हा आपल्या सर्व मित्र-मैत्रिणी नातेवईकांनाही जॉईन करायला सांगा. जितके जास्त सभासद तितक्या जास्त कल्पना आणि तितकी अधिक मजा एखादा ऑनलाईन गेम खेळल्या प्रमाणे ! https://www.facebook.com/groups/494409877351095/ आणि या ग्रूप वर चर्चा झालेले शब्द ह्या ब्लॉगवर टाकत जाईन जेणेकरून सगळे शब्द एकत्र बघता येतील. http://navin-marathi-shabda.blogspot.in/ म्हणतात ना -"देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे". तुमचा हातही त्यातलाच एक नक्की आहे !!

वाचने 93718 वाचनखूण प्रतिक्रिया 123

सचिन Tue, 04/01/2014 - 23:40
स्वैपाक करण्याऐवजी "जेवण बनवतात". .. असो, पण कौशिकभाऊंना इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द हवेत. शोधूया ...!!

आदिजोशी Wed, 04/02/2014 - 12:02
पण ह्या मराठीकरणाच्या नादात भाषेला भयाण आणि अकलेचा खंदक दाखवणारे गचाळ शब्द बहाल करू नका ही नम्र विनंती. उदा: तूनळी - youtube थोबाडपुस्तक - facebook चोप्य-पस्त - copy paste ह्या वरच्या टुकार शब्दांबरोबरच काही चांगले समर्पक शब्दही मराठी भाषेला मिळाले आहेत. उदा: खरडवही - scrapbook जालनिशी - blog

In reply to by आदिजोशी

धन्या Wed, 04/02/2014 - 17:39
तूनळी - youtube थोबाडपुस्तक - facebook चोप्य-पस्त - copy paste
हे अतिउत्साही लोकांचे उपद्व्याप आहेत. ही सारी उदाहरणे "विशेषनामे" आहेत. विशेषनामांचे शब्दशः भाषांतर होत नाही. त्यामुळे इंग्रजीतील "युटयुब" हा शब्द असलेले वाक्य इतर भाषांमध्ये भाषांतरीत होतात "युटयुब" असेच राहायला हवे.

In reply to by प्रचेतस

धन्या Wed, 04/02/2014 - 17:48
"फेसबुक" हे इतर भाषांमध्ये सुद्धा "फेसबुक"च राहायला हवे. ते विशेषनाम आहे. उदा. "अत्रुप्त आत्म्याने ताकाचे भांडे लपवले" हे वाक्य इंग्रजीत भाषांतरीत करताना ते "Atrupt Aatma hid buttermilk pot" असे होईल. "Unsatisfied soul hid buttermilk pot" असे नाही होणार. "Atrupt Aatma" हे विशेषनाम आहे.

In reply to by धन्या

प्रचेतस Wed, 04/02/2014 - 18:03
सहमत आहे. माझा आक्षेप फक्त 'मुखप्रुष्ठाविषयीच' होता.
अत्रुप्त आत्म्याने ताकाचे भांडे लपवले
वाक्य कितीही बरोबर असले तरी प्रत्यक्षात अत्रुत आत्मा भांडे लपवित नसून 'भांडे का लपविता' असे विचारीत असतो

In reply to by धन्या

बॅटमॅन Wed, 04/02/2014 - 19:28
संस्कृतमधील ऋ या स्वराचा मराठीत 'रु' असा उच्चार होतो, इतकाच काय तो फरक. वरिजिनल ऋ चा उच्चार ३ प्रकारे केला तर चालतो. पण पाणिनीचे सूत्र पाहू अगोदर. ऋटुरषाणां मूर्धा| याचा अर्थ असा, की ऋ, ट-ठ-ड-ढ आणि ष या सर्व वर्णांचे उच्चारस्थान मूर्धा आहे. बाकी डीटेल्स जाऊद्यात. वरीलप्रमाणे ऋ चा उच्चार करणे अत्यंत सोपे आहे. आम्रविकन लोकांचे उच्चार ठौक असतीलच. त्यात उदा. we're going there या. वाक्यामध्ये r चा उच्चार कसा असतो? तसाच याचा उच्चार करावा. अन हा उच्चार मराठीत "ऴ" ने दाखवता येतो. "तमिऴ" मध्येही हाच उच्चार आहे.

In reply to by बॅटमॅन

बॅटमॅन Wed, 04/02/2014 - 19:32
किंवा अजून सोपे उदा. "बहुत प्यार करते हैं, तुमको सनम" या गाण्यात "करते" हा शब्द, त्यातही "र" हे अक्षर लांबवलेले आहे. तो र चा उच्चार म्हणजेच संस्कृतचा ऋ म्हटला तरी चालेल.

In reply to by बॅटमॅन

शिद Wed, 04/02/2014 - 20:15
किंवा अजून सोपे उदा. "बहुत प्यार करते हैं, तुमको सनम"
आम्हाला आमच्या बाई/मास्तरांनी अश्या साध्या सोप्या सरळ पद्धतीने समजावले असते तर आमचे पण व्याकरण थोडेफार सुधारले असते. ;)

In reply to by शिद

यसवायजी Wed, 04/02/2014 - 20:51
:) आम्हाला आमच्या बाईंनी अश्या साध्या सोप्या सरळ पद्धतीने समजावले असते तर.. आमचे पंटर म्हन्ले अस्ते.. बहुत प्यार करते हैं, तुमको मॅडम्म.. हंम्महंम्म्..म्म ;)

In reply to by बॅटमॅन

प्यारे१ Wed, 04/02/2014 - 20:52
हे उच्चार कुमार सानूनं म्हटलेले की बाबूजींनी (बाबूजी भक्तांनी हलकं घ्या. कुमार सानूभक्त फारसे नसावेत ;) )

In reply to by बॅटमॅन

बहुत सुंदर ! "बहुत प्यार करते हैं, तुमको सनम" या गाण्यात "करते" हा शब्द, त्यातही "र" हे अक्षर लांबवलेले आहे. तो र चा उच्चार म्हणजेच संस्कृतचा ऋ म्हटला तरी चालेल. अशी उदाहरणे देऊन मराठी शिकवायला सुरुवात केली तर "मराठी भाषेचा वापर कमी होत चालला आहे" किंवा "मराठी भाषा चुकीच्या पद्धतीने लिहिली/बोलली जाते" ही भिती कमी व्हायला मदत होईल ! :)

In reply to by धन्या

बॅटमॅन Wed, 04/02/2014 - 18:19
शाळा कादंबरीतली व्याक्रणाची उदा. आठवली: "सुरेशने महेशला मारिले", "महेश दूध पितो", "महेश मार खातो", इ.इ.इ. =))

In reply to by धन्या

विजुभाऊ गुरुवार, 04/03/2014 - 09:40
धन्या काका तुमचे बरोबर आहे. आत्र एक चूक आहे फेसबुक या नावाचे भाषाम्तर करणे म्हणजे "नील आर्मस्ट्राँग" याचे भाषांतर निळूभाऊ भुजबळ असे किंवा उदा " मायकेल शूमाखर" चे भाषांतर "मायकेल चांभारे" असे भास्।आम्तर करण्यासारखे आहे.

In reply to by प्रचेतस

@मला 'मुखप्रुष्ठ' ऐवजी 'मुखपृष्ठ' हा शब्द बरोबर वाटतो.>>> राम..राम..राम..राम... कहर झाला. :-/ अहो ते मोबॉइल वरून पृ टाइप करता येत न्हाई! तिथे पृ च्या जागी प्रु च टाइप करावं लागतं ! :-/ तरिही खाली आलेलं खाटुकम्यानाचं अप्रतिम विवेचन पहाता.. झालं ते बरच(अवांतर) झालेलं असलं ;) तरी बरच झालं! :D

वेल्लाभट Wed, 04/02/2014 - 22:03
आहे ती मराठी टिकवा त्यापेक्षा..... तू असं का बोलला? (या नंतरचा 'स' नेहमी गाळला जातो. 'बोललास' असं रूप असतं) मी तुला भेटेल. (भेटेल????? तृतीयपुरुष एकवचन आहे का?) मी तिला बोलली, ती मला बोलली..... (अरे काय!!!) अगणित चुका असतात... अगणित...! त्या सुधारायची मोहीम काढली तर बरं. अजून नवीन शब्दांची गरज नाही !

खटपट्या Wed, 04/02/2014 - 23:45
खालील वाक्यांवर स्वतंत्र धागा होऊ शकतो.
मी चहा पिलो / प्यायलो / पिली / प्यायली (?) तो चहा/ती चहा (?)
सद्या मी "मी चहा प्यायलो" असेच म्हणतो/बोलतो. मी ठाण्याचा रहिवासी/रहिवाशी आहे.

गणेश उमाजी पाजवे गुरुवार, 04/03/2014 - 01:14
केसं, दगडं किवा असेच काही .. आणि आजकालची मराठी गाणी सुद्धा याच वाटेने चालली आहेत. उदाहरणार्थ - आयचा घो आयचा घो येडा झाला का रे आयचा घो आयचा घो पागल हुआ है ये आपणच अशी गाणी लिहायची आणि वर मराठी भाषा कशी लोप पावत चालली आहे वगैरे यावर चर्चा झाडायची.

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 04/03/2014 - 12:24
हिंदीच्या अतिप्रचारामुळे आणि सुलभीकरणाच्या भोंगळ कल्पनांमुळे मराठीचा संपूर्ण साचा बदलत चालला आहे आणि माझ्या मते तो योग्य नाही. उदा. मी अकोला जातो. विभक्ती प्रत्यय कुठे गेला? माझा वाढदिवस पुण्यात मनवला. मनवला? साजरा केला असे म्हणतात मराठीत. विभक्ती प्रत्यय तर हरवत चालले आहेत. मी त्याची मदत केली हे आणखी एक उदाहरण. पैसे भेटले. भेटले? पैसे काय मनुष्य आहेत काय भेटायला? असो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बॅटमॅन गुरुवार, 04/03/2014 - 12:28
हिंदीच्या अतिप्रचाराबद्दल अतिशयच सहमत. तदुपरि भेटणे हे कियापद मिळणे या अर्थी वापरणे हे फक्त अलीकडचे नसावे असे वाटते. विदर्भ इ. भागांत अगोदरपासून असेच बोलत असावेत असे वाटते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मारकुटे गुरुवार, 04/03/2014 - 13:15
भाषा सतत बदलत असते. विभक्ती प्रत्ययांची रुपे बदलत असतात. इतर भाषांच्या संपर्कामुळे नवनवे प्रयोग होत असतात. जीभेला ऐकायला बोलायला जे नीट वाटतात ते रुढपावत असतात. असंच आणि असंच हवं या हव्यासापोटी संस्कृत मृत झाली. मराठीबद्दल अजुन आशा आहे. पैसे मिळाले हेच योग्य रुप हे कुणी ठरवल? त्यांना तो हक्क कुणी दिला? समोरचा माणुस पैसे भेटले म्हटल्यावर ज्याला सांगत आहे त्याला समजले ना? संवाद पूर्ण झाला. संवाद होणे महत्वाचे. असो.

In reply to by मारकुटे

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 04/03/2014 - 16:39
असहमत भाषा नवसंपर्क वगैरे वगैरे जरी असले तरी 'अति' वर्ज्य असावे आणि असावेच. मी मुंबईला जातोय च्या ऐवजी मी मुंबई जातोय हे कुठल्याही प्रकारे स्वीकारार्ह नाही. अशा अतिरेकी सुलभीकरणामुळेच मराठीची पिछेहाट होत आहे हे नक्की. एकतर न्यूनगंडापायी इंग्रजीचा केला गेलेला अतिरेकी स्वीकार आणि भाषाभिमान नसल्यामुळे कुठलेही टुकार बदल 'झाला ना संवाद पूर्ण?' अशा मानसिकते पायी स्वीकारणे निव्वळ मूर्खपणाचे आहे. विचारणार्‍याला विचारण्याचा हक्क कोणी दिला हे विचारण्याचा हक्क तुम्हाला कोणी दिला असाही उपप्रश्न विचारला जाऊ शकतो. झालंच तर आपल्या भाषेवर हिंदी, इंग्रजीचा प्रभाव पाडून घेण्यापेक्षा उलटा प्रयत्नही कधी करावा. भले लगेच जमणार नाही किंवा लगेच शक्यही नाही परंतु सुरुवात नक्की व्हावी.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बॅटमॅन गुरुवार, 04/03/2014 - 16:45
पैसे भेटले हा प्रयोग हिंदीच्या प्रभावाखालीच होतोय याला विदा काय? हिंदीचा मराठीशी खूप जवळून संपर्क फारतर गेल्या पन्नासेक वर्षांचा. त्याआधी हा प्रयोग असेल तर काय म्हणणार मग? अन उलटा प्रभाव हिंदीवर थोडासा का होईना, आहेच.

In reply to by बॅटमॅन

llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 04/03/2014 - 17:54
कदाचित हिंदीच्या प्रभावाचा मुद्दा आधी आल्यामुळे भेटणे वर त्याचा प्रादुर्भाव झाल्यासारखा वाटतो आहे. तसे नाही २न्ही मुद्दे स्वतंत्र आहेत. विदाच पहायचा झाला तर पूर्वीचे चित्रपट , झालंच तर आकाशवाणीवरच्या श्रुतीका, नाटके यात पैसे भेटणे या वाक्प्रचाराचा अभाव दिसेल आणि तो मी लहान असल्यापासून अनुभवलाच आहे. झालंच तर विदर्भात तो वापरात असेल तर तो वीर वामनराव जोशी या वैदर्भिय नाट्यकाराच्या नाटकांमधे तो दिसत नाही. आणि हो प्रभावाबद्द्लच बोलायचे झाले तर मराठीतील विभक्ती प्रत्यय बाद करण्याचे कारण मला उमजले नाही. मग भले विदर्भातले लोक "मी नागपूर जातो" म्हणत असतील तरी ते चूकच आहे. मग अशा बोलण्याला कोणी बोलीभाषेचा लेप देऊ पाहत असेल तर त्याला विरोध नक्की करावा. कारण माझे जवळचे नातेवाईक देखील विदर्भातील आहेत परंतु तेही असे बोलताना ऐकले नाही. अर्थात त्याच्याशी तुम्ही आधीच सहमत आहात असे वाटते.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बॅटमॅन गुरुवार, 04/03/2014 - 17:57
विभक्तीच्या मुद्यावर सहमती आहेच. बाकी तुम्ही दिलेली उदा. 'प्रमाण' मराठीची आहेत. नाटककार वैदर्भी असले तरी नाटके वर्‍हाडी बोलीचे प्रतिनिधित्व करतील असे क्वचितच दिसावे. त्यामुळे फक्त बोलीभाषेतली उदा. पाहिजे होती.

In reply to by बॅटमॅन

पैसा गुरुवार, 04/03/2014 - 18:17
असे कोकणातही सर्रास बोलीभाषेत ऐकायला मिळते. प्रमाण मराठीत आहे तसा बोलीभाषेत 'मिळणे' आणि 'भेटणे' यात फारसा फरक नाही. याशिवाय 'गावले नाय' असंही म्हणतात. प्रमाण मराठीत मात्र 'गावले' म्हणजे फक्त 'सापडले'. कोंकणीतही मिळाले आणि भेटले या दोन्हीसाठी 'मेळ्ळे (मेळले)' असंच वापरलं जातं. तेव्हा हे शब्दप्रयोग चूक असं म्हणता येणार नाही. प्रमाण मराठीत वापरले जात नाहीत एवढंच.

In reply to by पैसा

बॅटमॅन गुरुवार, 04/03/2014 - 18:22
सहमत. गावणे हाही शब्द आहेच. प्रमाण मराठी सोडूनही मराठीचे एक प्रचंड मोठे विश्व आहे त्यात काय काय घडतं याची नोंद करून ठेवणे मस्ट आहे.

In reply to by बॅटमॅन

सुहासदवन गुरुवार, 04/03/2014 - 22:43
सध्या मिपावर आणि इतर अनेक संस्थळांवर हे दिसत आहे.....
पूर्ण सहमत!!!!!!! खच्चून निषेध केल्या गेला आहे.
बर्‍याच मालिकांत ऐकू येते - मी काय म्हणली, तू काय म्हणला, ते काय म्हणले....

In reply to by सुहासदवन

बॅटमॅन Fri, 04/04/2014 - 12:29
केल्या गेला आहे इ.इ. ही मिपावरची स्टाईल आहे, मराठवाड्यातल्या मंडळींनी पापिलवार केलेली. ती इतरांनी उचलली, इतकेच. अन म्हणला इ.इ. तर बोलीभाषा आहेच-फक्त त्यांना दरवेळेस अशुद्ध अशुद्ध म्हणून हिणवल्या जाऊ नये.

In reply to by बॅटमॅन

सुहासदवन Fri, 04/04/2014 - 15:02
पण इतर अव्याकरणीय जालीय संस्थळांच्या यादीत आपले मिपा मात्र नसावे हे माझे स्पष्ट मत आहे. ह्या संस्थळावर अनेक सुन्दर आणि अभ्यासपूर्ण लेख / लेखमालिका सातत्याने येत असतात. इस्पीकचा एक्का, ऋषिकेश, क्लिंटन, गवि, बॅटमॅन आणि इतर अनेक मान्यवर लेखक बरीच मेहनत घेऊन हे लेख मांडतात. त्या ले़खांचे प्रयोजन, त्यात असणारी माहिती, शब्दभांडार, व्याकरण, उपमा इत्यादी आम्हा सार्‍या वाचकांसाठी एक पर्वणीच असते. अगदी त्या लेखांखालील असणाऱ्या टिप्पण्या देखील बऱ्याचदा खूप मार्मिक आणि माहितीपूर्ण असतात. आजच्या युगात जिथे छापील पुस्तके आणि त्यातही व्याकरणासारखं काहीतरी कठीण वाचण्यास जेव्हा अजिबात वेळ नसतो त्यावेळी मिपा सारखी संस्थळे दर्जेदार वाचनाची भूक भागावितात. आणि हेच मिपाचे यश देखील आहे. पण ह्या लेखांनी आणि त्या खालील असणाऱ्या टिप्पण्यानी आपल्या दर्जा बरोबरच आपल्या मराठी भाषेची शब्द प्रामाण्यता टिकवली तर किती चांगले होइल... कारण अनेक युवक / युवती हे लेख आणि लेखमालिका आपल्या किंवा मित्रांच्या संदर्भांसाठी उतरवून घेतात, अशा वेळी आपली भाषा किती सशक्त आणि प्रमाणबद्ध हे माहित पडते. अशा वेळी अगदी एखादा चुकीचा शब्द किंवा चुकीचे व्याकरण भाषेचे सौंदर्य नकळत नष्ट करू शकते आणि चुकीच्या व्याकरणाचा पायंडा पाडू शकते. आणि मला वाटते ही आपली सर्वांची जबाबदारी आहे, मराठी भाषा टिकवायची असेल तर… कारण चांगली सवय पटकन लागत नाही पण चटकन सुटते वाईट सवय पटकन सुटत नाही पण चटकन लागते. इथे कोणालाही सुनावण्याचा, दुखावण्याचा काहीही हेतू नाही. कृ. ह. घ्या.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मारकुटे गुरुवार, 04/03/2014 - 18:50
>>>भाषाभिमान नसल्यामुळे कुठलेही टुकार बदल 'झाला ना संवाद पूर्ण?' अशा मानसिकते पायी स्वीकारणे निव्वळ मूर्खपणाचे आहे. भाषाभिमान आणि बदल ( ते सुद्धा म्हणे टुकार..ब्वार) यांची गल्लत होत आहे, पतंजली २००० वर्षांपूर्वी म्हणाला होता जसे कुंभाराकडे जाऊन हवे तसे मडके मागतो, बनवुन घेतो तसे कुणीही वैयाकरण्याकडे जाऊन शब्द पाडून घेऊन वापरत नाही, तर त्याचा वापर सुरु करतो. वैयाकरणी केवळ त्याची नोंद घेत व्याकरण बनवतो (जे दर काही वर्षांनी बदलत असते.) बाकी चालू द्या ... आम्ही मुर्ख आहोत हे मान्य !

राजो गुरुवार, 04/03/2014 - 14:15
नागपुरी मराठी अशीच हिंदाळलेली आहे.. मी आली/गेली/बोल्ली, तो चाल्ला गेला, काहीही काय बोलून राहिला?? वगैरे.. अलीकडे मराठी टीव्ही जाहिरातींत सुद्धा डोक्यात जाणारे शब्दप्रयोग असतात.. उदा. "काय आपल्या टूथपेस्टमधे मीठ आहे?" (कुठ्ल्या मराठी मधे असे वाक्य असते??)

नाखु गुरुवार, 04/03/2014 - 16:49
केलेल्या जाहीराती आणि चित्रपट हे "रेम्या" डोक्याचे असतात त्यामुळे व्याकरणाचे "शिकरण" झालेले आसतेच आसते.

कंजूस गुरुवार, 04/03/2014 - 16:54
मिस करणे =तु नसल्यामुळे चुकल्यासारखं वाटतंय . इक्सपायर झाले =वारले . तुमच्या लुकला सुट होईल =तुम्हाला खुलुन दिसेल .तुम्ही या कपड्यात चमकाल . ट्रेंडी =चलाख चटपटीत तरतरीत . फ्रेश होऊन आलोच =आवरून आलोच . टेंशन घेऊ नका =एवढा ताण देऊ नका . डाइअट करा =पथ्य पाळा . हेल्थी फुड =पौष्टिक खाणं . मेन डिश =पक्वान्न ,स्वीट =गोड पदार्थ . बेसिकली =मुळातच . क्लायमैक्स =टोकच गाठलं अपडेटस =नवीन कळवा . रेंटल अपाटमेंट =महिना भाड्याने . फाटली =फजिती झाली ,वाजंत्री वाजली ,आडवाच झालो ,फरफट झाली . बोअर झालो =अगदी कंटाळलो . ऑफ झालो =सुन्न झालो . टेक इट ऑर लीव इट मिपाशटाईल आइ मिन =मला असं म्हणायचं होतं मिप्पाछाप पटलं तर घ्या हेवेसांन .

यसवायजी गुरुवार, 04/03/2014 - 17:32
लूट, ठग, जंगल, गुरु, अवतार,योगा, डे़कॉईट, चटनी, चड्डी, आलू, देसी, गोरा, यार,अछा, अंग्रेज, बदमाश, धोती सारखे शब्द त्यांनी घेतले. ते लोक पण असाच विचार करतात काय हो ???

राही गुरुवार, 04/03/2014 - 17:34
शेजारच्या घरी मत्स्यपेटिका आणली होती. व्यवस्था ठेवण्यात काहीतरी गडबड झाली आणि काही मासे मेले. तर घरातली छोटी (वय वर्षे पाच) मुलगी दु;खाने सांगू लागली, 'ममा, ते सगळे फिश सँड मध्येच बसलेत. ते वरच येत नाहीयेत. ते सगळे मेले झालेत का?(आर दे डेड?)' सोसायटीमध्ये मांजरांच्या पिल्लांची संख्या खूप झालीय. एकदा त्यातले एक पिल्लू मेले. तर एक चिमखडा धावत येऊन सांगू लागला, 'ती कॅट मेरली. ती पाठीवर पडली, वॉमिट केरली आणि मग ती मेरली' मेली, केली ही मुलांच्या दृष्टीने अनियमित रूपेच आहेत. पडली, बसली, उठली प्रमाणे मरली, करली असे व्हायला पाहिजे. पण आपण मोठी माणसे तर मेली, केली म्हणतो. मग मुलांनी आपल्या मतीने मेली केलीतला 'ए'कार आणि त्यांच्या दृष्टीने योग्य मरली, करली ही रूपे यांचा मेळ घालून मेरली, केरली ही नवी रूपे निर्माण केली!

राही गुरुवार, 04/03/2014 - 17:59
'स्वीकारार्ह' नाही, 'वर्ज्य' असावे हे काही मर्यादेपर्यंत ठीक आहे. म्हणजे असे प्रयोग वापरणार्‍यांना आपण मराठीच्या उत्तरपत्रिकेत कमी गुण देऊन शिक्षा करू शकतो. पण फार मोठ्या प्रमाणातल्या मौखिक मराठीचे काय? तिथे निर्बंध कसे काय आणि कोणाकोणावर घालणार? नवनव्या शब्दांचा आणि शब्दप्रयोगांचा खूप मोठा आणि ताकदवान लोंढा मराठीच्या पात्रात घुसतो आहे. तेव्हा मूळ नदी आपले पात्र बदलणारच. हे पात्र विस्तारणे नव्हे तर एका वेगळ्याच दिशेने वाहू लागणे आहे. ह्याला व्याकरणनियमरूपी धरणांनी किंवा बांधांनी आवरता येण्याजोगे नाही. इफ यु कान्ट रेज़िस्ट, एन्ड्युअर, असे वचन आहे; त्याची आठवण होते. तसे तर नपुंसक लिंगही मराठीतून नामशेष होऊ घातले आहे. 'सर्वांचे धाबे दणाणले आहेत' किंवा 'हे ऋण फेडता येण्याजोगे नाहीत' हे सररास ऐकू येते. बदल हे व्हायचेच. ज्ञानेश्वरी, गाथा, गुरुचरित्र त्यातल्या भाषेमुळे आज दुर्बोध आहे. अगदी निबंधमाला सुद्धा वाचताना मध्ये मध्ये ठेच लागते. पण ती भाषा 'मराठी'च आहे आणि सध्याची आणि भविष्यात बदलणारीसुद्धा 'मराठी'च असेल. तेव्हा काळजीचे कारण नाही.

In reply to by राही

प्रदीप गुरुवार, 04/03/2014 - 18:40
होत रहातात हे खरे,पण त्याला काही विधीविशेष असावा, नाही? मराठीतील रूढ अर्थाचे शब्द (विनाकारण) नव्या अर्थाने येऊ का लागावेत? उदा. 'प्रभावित', 'संपन्न'. ८० च्या दशकापासून 'शासकीय' मराठी, आमच्या भाषेत अगम्य बदल करू लागली. आता तर, माध्यमांच्या परिणामामुळे काही धरबंदच राहिलेला नाही. (जाता जाता, पूर्वी - म्हणजे अगदी सत्तरीच्या दशकाच्या मध्यावर तरी नक्कीच- 'सरकार' हा शब्द खुद्द सरकारच वापरायचे. मग कधीतरी त्याचे 'शासन' झाले). आता मुंबई-पुण्याकडे जी लिहीली व बोलली जाते, ती भाषा मराठी नसून 'हिंदीठी' आहे. येथील मिपावरीलच लेखन पाहिले तर प्रत्यय यावा! भाषा प्रवाही असावी, हे ठीक. पण ह्याचा अर्थ निव्वळ दहा- वीस वर्षात, तिचे रूपडे ओळखू येऊ नये इतकी ती प्रवाही असेल, तर तिच्या प्रवाहाचे स्त्रोत तपासून पहावेत असे वाटते.

In reply to by प्रदीप

राही गुरुवार, 04/03/2014 - 18:49
वेगवेगळ्या स्रोतांमधून 'जीवन' मिळू लागले तर त्यात वावगे काय? बदल सोपे वाटले, सर्वमान्य झाले तर टिकतील, नाही तर उडून जातील. मराठी साहित्याचा उगम स्रोत बदलतो आहे, बदलला आहे, ही वर्गबदलाची प्रक्रिया आम्ही कधी लक्षात घेणार?

In reply to by राही

मारकुटे Sat, 04/05/2014 - 13:09
>>>मराठी साहित्याचा उगम स्रोत बदलतो आहे, बदलला आहे, ही वर्गबदलाची प्रक्रिया आम्ही कधी लक्षात घेणार? सहमत आहे. गेली दोन हजार वर्षे ज्यांना गावकुसाबाहेर ठेवले त्यांच्या हातात आता मराठी आहे. हे सत्य स्विकारणे अनेकांना जड जाते त्यामधुन आम्ही बोलतो तीच मराठी बाकी भुक्कड ही प्रवृत्ती गेल्या पन्नास वर्षांत पुण्यामुंबईतील विशिष्ट वर्गातील लोकांमधे उदयास आलेली आहे. त्याचाच वापर करुन बोलण्यावरुन जात शोधुन त्याच्याशी व्यवहार करण्याचे तंत्र विकसित केले गेले आहे.

In reply to by मारकुटे

प्रदीप Sat, 04/05/2014 - 14:38
गेली दोन हजार वर्षे ज्यांना गावकुसाबाहेर ठेवले त्यांच्या हातात आता मराठी आहे..... हे टाळीवाक्य इथे (म्हणजे सदर उपधाग्याच्या संदर्भात) अगदी गैरलागू आहे. माझा प्रतिसाद नीट वाचलात तर आपल्या लक्षात यावे की माझा आ़क्षेप कुठल्याही मराठी बोलीभाषेला नाहीच. उलट संस्कृताळलेले 'शासकीय मराठी' व हिंदीच्या अतिप्रभावातून आलेल्या बदलांविषयी मी लिहीले आहे. तेव्हा पुणेमुंबई, गावकुसाबाहेरील माणसे इ. इ. ह्या उपधाग्यावर गैरलागू.

In reply to by राही

सुबोध खरे गुरुवार, 04/03/2014 - 19:00
एक प्रमाण भाषा असणे आवश्यक आहे. जसे कायदेशीर इंग्रजी हि अगदी इंग्लंड मध्ये जन्माला आलेल्या माणसाला सुद्धा कठीण जाते म्हणून ती सोडून द्यावी असे कोणी म्हणणार नाही. पण एखाद्या शब्दाचा अचूक अर्थ असण्यासाठी किंवा दुसर्याला सांगण्यासाठी प्रमाण भाषा असणे आवश्यक असते. सर्वसामान्य माणसाला ती अवघड होते हि वस्तुस्थिती आहे. जर आपण law ,act आणि statute याचे भाषांतर कार्याचा प्रयत्न केला तर सर्वसामान्य माणसाला कायदा हा एकाच अर्थ कळतो म्हणूनच अधिनियम, कायदा आणि विधी असे शब्द वापरावे लागतात. मुळात कोणतीही भाषा प्रमाण असो वा बोलीभाषा असो हि शुद्ध स्वरुपातच बोलली जावी. मालवणी भाषा आपल्या मूळ ढंगात जितकी गोड लागते तितकी संकरीत / अर्धवट हिंग्लिश मालवणी कानाला खटकते. हीच गोष्ट कोकणी किंवा वर्हाडी व खानदेशी भाषे बद्दल किंवा हिंदी किंवा कोणत्याही हिंदीच्या बोलीभाषे बाबत( मगधी, मैथिली वा भोजपुरी बद्दलहि) म्हणता येईल. थोडेसे च्या ऐवजी वाईच म्हणले तर कानाला गोड लागते पण "जरासी" हा हिंदी शब्द खटकतो. आपल्याला मराठी चांगली बोलता येत नाही याची लाज वाटायच्या ऐवजी अभिमान वाटू लागला आहे हि काळजीची बाब आहे.

In reply to by सुबोध खरे

बास बास. माझा आक्षेप ज्याला होता ती गोष्ट डॉक्टरांनी अचूक हेरली. आपल्याला मराठी चांगली बोलता येत नाही याची लाज वाटायच्या ऐवजी अभिमान वाटू लागला आहे हि काळजीची बाब आहे.

In reply to by सुबोध खरे

मारकुटे Sat, 04/05/2014 - 13:11
>>>आपल्याला मराठी चांगली बोलता येत नाही भाषाशास्त्रानुसार जी काही जशी काही बोलली जाते ती भाषा चांगलीच असते. त्यामधे शुद्ध अशुद्ध, चांगलं वाईट असं काही नसतं. अशी वर्गवारी कृत्रिम असून गेल्या दोनशे वर्षांत स्वत:चे स्थान डळमळीत झालेल्या वर्गाने इतरांवर कुरघोडी करण्याच्या हव्यासाचा परिपाक आहे.

In reply to by मारकुटे

सुबोध खरे Tue, 04/08/2014 - 10:09
मारकुटे साहेब, भाषेतील किंवा बोलीभाषेतील कोणताही शब्द वापर करण्यास हरकत नसावी पण परभाषेतील दोन शब्द प्रत्येक वाक्यात आणून हीच बोलीभाषा म्हणणार्या बद्दल काय म्हणावे. मला वेळ नाही च्या ऐवजी "टायम" नाही. किंवा वय विचारले तर "ट्वेंटी एट कम्प्लीट" होतील, अद्रक घालून चं पिली असे म्हणणे याला काय म्हणावे. माझे म्हणणे इतकेच कि आपण जी भाषा बोलत असाल तिच्यात सरमिसळ होऊ नये इतकेच. मग अहिराणी असेल तर अहिराणी असावी. हिंदी असेल तर हिंदी असावी किंवा इंग्रजी असेल तर इंग्रजी स्वच्छ असावी. दुर्दैवाने कोणतीही भाषा शुद्धच असते या आग्रहा पायी आपल्यातील काही लोक कोणतीच भाषा धड बोलू शकत नाहीत. आणि याने जेंव्हा आपण मुलाखतीसाठी जाता किंवा लेखी अर्ज करत तेंव्हा आपले अपरिमित नुकसान होते हे आपल्याला( मराठी माणसाना) लक्षात येत नाही. प्रमाण भाषे बद्दल असे आहे कि आपण एखादा प्रश्न माहितीच्या अधीकारात विचारला आणि कोणी आपल्याला अशा सरमिसळ भाषेत उत्तर दिले तर त्याचे नक्की अर्थ काढणे कठीण होते आणि नंतर अशी माणसे कायद्याचा कीस पडून आपल्या मुळ हेतूला हरताळ फासू शकतात. यासाठीच सरकार दरबारी प्रमाण भाषा असणे आवश्यक असते. दुचाकी वाहन चालवताना आपल्याकडे परवाना नसेल तर लोचा होईल /लफडा हो जायेगा असे आपल्याला कळवले तर कसे वाटेल. आपल्याला आपल्या जमिनीचा/ घराचा सात बाराचा उतारा अशा अर्धवट भाषेत मिळाला तर त्यावर येणारे कायदेशीर हक्क किंवा अधिकार आपल्याला सिद्ध करणे फार कठीण होईल आणि आपला लांबचा मावस चुलत भाऊ आपल्या हक्कावर "लोचा" करू शकेल. कोणत्याही भाषेला अधिकृत दर्जा देताना हा विचार करावा लागतो. सरकारी अधिकार्याला विचारलेल्या प्रश्नाला अधिकृत भाषेतच उत्तर देणे बंधनकारक ठरते . मग या प्रमाण भाषेला आपल्याला शुध्द म्हणायचे नसेल तर नसो. जर आपण वादासाठी वाद घालत असाल तर बोलणेच खुंटले.

In reply to by सुबोध खरे

बॅटमॅन Tue, 04/08/2014 - 15:33
सर्कारदर्बारची भाषा अन बोलीभाषा यात फरक नाही काय? मारकुटे यांचे अर्ग्युमेंट बरोबर आहे. शुद्ध-अशुद्ध याचा संबंध तुम्ही कायदेशीर अन कार्यालयीन भाषेशी लावताहात तर मारकुटे भाषाशास्त्राच्या दृष्टिकोनातून बोलताहेत इतकंच. प्रमाणभाषेची गरज कोणीही नाकारत नाहीये, पण कायदेशीर मान्यता आणि व्याकरणाची शुद्धता यांचा संबंध नाही. मी बोलतोय तो तुम्हांला संज्ञांचा फजूलपणे काढलेला कीस वाटत असेल तर त्याला इलाज नाही पण तुम्हां दोघांच्या अर्ग्युमेंटची संदर्भचौकट अंमळ वेगळी असून त्या त्या चौकटीत ते ते अर्ग्युमेंट बरोबर आहे इतकेच सांगायचे होते.

In reply to by बॅटमॅन

बाळ सप्रे Tue, 04/08/2014 - 16:00
कायदेशीर मान्यता आणि व्याकरणाची शुद्धता यांचा संबंध नाही
नक्की शुद्धताच का?? की प्रमाणता.. यावर किती किस पाडु तेवढा कमी आहे.. शुद्ध-अशुद्ध, प्रमाण-प्रमाणेतर, चांगले-वाईट या सगळ्या संज्ञा सापेक्ष (मराठीत - relative terms) आहेत एवढच म्हणू शकतो .. इथे जरा "भावना पोचल्या की झालं" हा नियम लावून पहा !!

In reply to by बाळ सप्रे

बॅटमॅन Tue, 04/08/2014 - 16:09
होय शुद्धताच. कायदेशीर मान्यता असलेल्या एका बोलीत काही वेगळे शब्द असतील, पण मान्यता नसलेल्या दुसर्‍या बोलीत व्याकरणाचे नियम प्रमाणबोलीतल्यासारखेच पाळले जाऊ शकतात. असो.

In reply to by बॅटमॅन

बाळ सप्रे Tue, 04/08/2014 - 17:48
म्हणजे व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध ?? मान्यता नसलेली बोली अशुद्ध?? मागचे काही प्रतिसाद पाहता 'अशुद्ध' शब्द भाषेच्याबाबतीत तुम्हाला निषिद्ध वाटतोय !!

In reply to by बाळ सप्रे

बॅटमॅन Tue, 04/08/2014 - 17:52
मान्यता नसलेली बोली फक्त प्रमाणेतर. व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध. अशुद्ध हा शब्द भाषेबाबतीत पूर्णपणे निषिद्ध नाहीये.

In reply to by बॅटमॅन

बाळ सप्रे Wed, 04/09/2014 - 10:40
शुद्ध आणि अशुद्ध असे म्हणण्यामागे एक अ‍ॅझम्प्शन आहे की शुद्ध नामक काहीएक ऑब्जेक्टिव्ह गोष्ट अस्तित्वात आहे. जे भाषाशास्त्रदृष्ट्या चूक आहे
व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध
वरील दोन्ही विधाने परस्परविरोधी आहेत.. मला दुसरे विधान पटते.. त्याप्रमाणे.. 'त्याची मदत केली' - अशुद्ध 'त्याला मदत केली' - शुद्ध का इथे बोलीभाषेचा संदर्भ लावून प्रमाणेतर म्हणणार?? व्याकरणाप्रमाणे अशुद्ध म्हटल्यास व्याकरणाचे 'अज्ञान' हे कारण स्वीकारण्यास हरकत नसावी.. इथे 'सामाजिक अभिसरणामुळे झालेले बदल अज्ञानातून होतात हे म्हणणे अज्ञानमूलक आहे' ही पळवाट आहे.. काही लोकं व्याकरणाच्या/ भाषेच्या 'अज्ञानामुळे' अशुद्ध बोलतात हे मान्य न करता.. भाषेचा प्रवाहीपणा, सामाजिक अभिसरण वगैरे मुद्दे सांगुन सरसकटपणे पाठराखण होउ नये इतकेच!!

In reply to by बाळ सप्रे

बॅटमॅन Wed, 04/09/2014 - 12:59
अंमळ गफलत झाली वाट्टे. पण
काही लोकं व्याकरणाच्या/ भाषेच्या 'अज्ञानामुळे' अशुद्ध बोलतात हे मान्य न करता.. भाषेचा प्रवाहीपणा, सामाजिक अभिसरण वगैरे मुद्दे सांगुन सरसकटपणे पाठराखण होउ नये इतकेच!!
हे असलं तरी वेगळ्या बोलींना रेकग्निशन देणे हे कधी होणारच नाही. प्रमाणभाषेपुरते ठीक आहे, बाकी वेगळ्या बोलीचं असू नये असं. व्याकरण ही गोष्ट फक्त प्रमाणबोलीपुरती मर्यादित नाही. थोड्या फरकांसहित पाहिले तर साधारणपणे व्याकरणाचा एकच नियम बर्‍याच बोलींना लागू पडतो म्हणून तो शुद्धतेचा मुद्दा काढला इतकेच. ऑब्जेक्टिव्हलि शुद्ध म्हणून जे काही अस्तित्वात असते अथवा असू शकते ते एका प्रमाण बोलीशी निगडित नसते अथवा नसावे इतकाच मुद्दा आहे.

राही गुरुवार, 04/03/2014 - 18:43
प्रचलित नियमांनुसार काही ठिकाणी द्वितीयेचे प्रत्यय 'स', 'ला' हे न लावणे अशुद्ध ठरते. पण तृतीयेचे 'एं','शीं', 'ईं' 'हीं' हे प्रत्यय कालौघात गळून पडले आहेत हे आपल्या लक्षात येत नाही. रायगड जिल्ह्यात बोलीभाषेत अजूनही ते वापरले जातात पण आपण ते बोलणे अशुद्ध समजतो! 'त्यांईं मला हे घड्याळ दिले' किंवा 'तिएं ओवाळले' किंवा 'काकाहीं वाटणी मागितली' ही वाक्ये कानाला कशी वाटतात? शुद्ध असूनही अशुद्ध वाटतात ना? दक्षिण कोंकणात ताणे, तेणा अशी रूपे आहेत. ही संस्कृत 'तेन' ला अधिक जवळची आहेत. पण ही रूपे अशुद्ध आणि 'त्याने' मात्र शुद्ध. जाता जाता : तृतीयेचा 'ने' हा एकवचनी प्रत्यय सध्या अदृश्य होऊ लागला आहे. त्याऐवजी 'नी' च वापरला जातोय.

In reply to by राही

बॅटमॅन गुरुवार, 04/03/2014 - 18:45
पुनरेकवार अतिशयच सहमत. तदुपरि
तृतीयेचा 'ने' हा एकवचनी प्रत्यय सध्या अदृश्य होऊ लागला आहे. त्याऐवजी 'नी' च वापरला जातोय.
एक छोटीशी दुरुस्ती: 'ने' हा प्रत्यय प्रत्यक्ष बोलण्यात कधीच नव्हता, फक्त लेखनात होता. अन नी ऐवजी नं हा जास्त ऐकला आहे.

In reply to by राही

प्रत्ययाबाबत मुद्दा लक्षातच घ्यायचाच नसेल तर ठीक आहे. मुद्दा कोणते प्रत्यय गळून पडले नाही पडले हा नाही तर हिंदीच्या अतिरेकामुळे आपण मराठीतील प्रत्यय गाळतो आहे हा आहे. आणि समजा एखाद्याने ते लक्षात आणून दिले तर प्रवाहीपणा, स्त्रोत, वर्गवारी असली फुसकी कारणे देतो हे आहे. म्हणूनच डॉक्टर खरेंशी सहमती दर्शवली आहे.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

राही Fri, 04/04/2014 - 12:07
ही कारणे अजिबात फुसकी नाहीत. तशी ती मानणे म्हणजे आत्मवंचना करून घेणे आहे. मुद्दा प्रत्ययांचा नाहीच. मराठीच्या स्वरूपात वेगाने होत असलेल्या बदलांचा आहे. हे बदल होतच नाहीयेत असे तर कोणी म्हणत नसावे. हे बदल होऊच नयेत, झालेच तर ते 'वर्ज्य' मानावेत, 'स्वीकारार्ह' नसावेत असे मत दिसते; ज्याचे नियमांत रूपांतर होऊन अंमलबजावणी होणे कठीण वाटते. जे फीज़िबल नाही, त्याच्यामागे आपली शक्ती का दवडावी? त्याऐवजी मराठीच्या विकासाचे अन्य मार्ग का हाताळू नयेत? समजा, सध्या हिंदीच्या प्रभावामुळे मराठी नको इतकी बदलतेय, मग आतापर्यंत जे बदल झाले, ते तेव्हा हिंदीचा प्रभाव नसताना(च) झाले(च) ना? म्हणजे हिंदीचा प्रभाव असो वा नसो, मराठीत बदल हे होतच आहेत. यातून एक अर्थ असाही निघू शकतो, की बिगरहिंदी प्रभावांनी बदल झाले तर चालतील, पण हिंदीमुळे मात्र नको. असो. वाढत्या शिक्षणामुळे आणि अभिसरणामुळे होत असलेले बदल खुल्या मनाने स्वीकारणे हा एकच पर्याय दिसतो आणि तो योग्यही आहे, आपद्धर्म नव्हे, असेही मला वाटते.

In reply to by राही

मारकुटे Sat, 04/05/2014 - 13:14
सहमत आहे. अशाच वृत्तीमुळे संस्कृत लयास गेली. पाणिनी नंतर पतंजली झालेले बदल नोंदवतो पण आम्ही अष्टाध्याचीच घोकत बसलो, महाभाष्य उघडून पण पाहिले नाही. हीच अशीच हेच असेच उच्चार आणि प्रत्यय आणि शब्द असल्या वृत्तीमुळे संस्कृत संपली. बरे आहे मराठीबाबत असली अरेरावी इथला समाज फाट्यावर मारतो.

In reply to by राही

बाळ सप्रे Fri, 04/04/2014 - 12:00
भाषा प्रवाही असते.. नवीन शब्द सामावुन घेतल्याने समृद्ध होते वगैरे मान्य. म्हणून लिहिण्या, बोलण्यातील सर्वच अशुद्धता सामावून घ्यावी आणि तोच नियम व्हावा हे अमान्यच.. आणि जास्त लोक तसे बोलतात म्हणून तो नियम व्हावा हे ही अमान्य.. असे असते तर चायनीज्/इतर लोकांमुळे इंग्लिश भाषा कितीतरी बदलली असती!! बर्‍याच वेळा हे चूक, हे बरोबर हे सांगायला कोणी जात नाही म्हणून काय बरोबर काय चूक हे न समजता ते बोलणे लिहिणे पुढे चालत रहाते.. हे कोणी सांगितल्यास अज्ञान मान्य करून सुधारण्यास काय हरकत आहे.. प्रत्येक चुकीला सामावून घ्यायचे असेल तर व्याकरण तरी कशाला शिकवावे शाळेत.. "भावना समजल्या की झाले" याचाही अतिरेक नको.. भावना कधीकधी भाषेशिवायही पोहोचु शकतात! प्रमाण भाषा ही सर्व बोलीभाषांमधील दुवा असते.. भाषेत बदल सामावून घेताना अपरिहार्यता लक्षात घेणेही गरजेचे आहे.. बदल समृद्ध होण्याइतका असावा .. अस्तित्व/ओळख हरवण्याइतका नसावा..

In reply to by बाळ सप्रे

राही Fri, 04/04/2014 - 13:04
प्रमाण भाषा हवीच पण प्रमाण भाषेचे स्वरूप सर्वकाळ तेच हवे हा आग्रह योग्य नाही. भाषा बदलते आहे याचा अर्थ प्रमाण भाषाच बदलते आहे. सर्वच प्रमाणे बदलली. वाल, रती, गुंज जाऊन तोळा, मासा छटाक,शेर आले. तेही जाऊन ग्राम मिलिग्रॅम आले. प्रहर, घटिका पळे, निमिष जाउन सेकंद् ,मिनिटे आली, टीच-वीत-तसू गेले, योजन-क्रोश गेले, फर्लॉग-माइल गेले, यार्ड-फुट-इंच गेले, मीटर-किलोमीटर आले. हे सर्व बदलले आणि हे बदल व्यक्त करणारी 'प्रमाण'भाषा मात्र तशीच राहिली, असे घडेल काय? चिनी भाषेच्या इंग्लिशवरील प्रभावाचे उदाहरण तितकेसे समर्पक नाही. चिनी भूभागावर जिथे जिथे कोपर्‍या-खबदाडीतून (पॉकेट्स) इंग्लिश बोलली जाते तिथे त्या इंग्लिशवर चिनी भाषेचा प्रभाव पडेलच पडेल. पण जोपर्यंत इंग्लिश मेन लँड म्हणजे यू.के.,अमेरिका वगैरे मध्ये चिनी लोक 'साय्ज़ेबल' प्रमाणात नाहीत तो पर्यंत तिथे चिनी भाषेचा प्रभाव पडणार नाही. घरातले उदाहरण द्यायचे झाले तर पूर्व आणि पश्चिम बंगालमधले बांग्लाभाषक मराठीभाषकांपेक्षा संख्येने अधिक आहेत पण ते मराठी मेन्लँड्मध्ये नाहीत किंवा महाराष्ट्रातल्या माध्यमांवरही त्यांचा प्रभाव नाही त्यामुळे बांग्ला भाषेचा प्रभाव मराठीवर नाही. बृहन्मुंबई भागात मनोरंजन-वाहिन्या आणि बॉलिवुडमुळे हिंदीचा प्रभाव आहे. बाकी वृत्तावाहिन्यांची मुख्य कार्यालये दिल्लीतच आहेत. हां, आपण एक गोष्ट करू शकतो. बॉलिवुड मुंबईत नको अशी चळवळ उभारू शकतो. किंवा मराठी लोकांनी ह्या वाहिन्या-चित्रपट पाहू नयेत असा शुद्ध मराठमोळा नियमही करू शकतो. हिंदी मनोरंजनाचा प्रभाव केवळ महाराष्ट्रातच नाही, तर सर्वत्र, अगदी चेन्नैपासून तुर्कस्तानपर्यंत आहे. चेन्नैमध्ये मुली आजकाल हाफ-साडी (पवडै दवनी) ऐवजी सल्वार-कमीज़ वापरतात हे हिंदी चित्रपटांमुळे झाले असे तेथील लोक खेदाने म्हणतात. या पोशाख-क्रांतीने कितीतरी नवे शब्द तमिळमध्ये घुसवले असतील आणि कितीतरी जुन्या शब्दांना डच्चू दिला असेल. आपल्याकडेसुद्धा लुगडी-पातळे-साड्या-धोतरे-पंचे हे निर्‍या काढून 'नेसायचे' असत. आता पँट-शर्ट-जीन्स-सल्वारकमीज् 'घालतात'. वेणी 'घालायची' असे, आज केस 'बांधतात'. भाजी, कांदे विळीवर चिरायचे असत, आज सुरीने 'कापतात' किंवा प्रोसेसरमध्ये 'फिरवतात'. 'तू टाक चिरुनी ही मान' हे आता अतिजुने झाले. ही एक प्रकारची समृद्धीच नव्हे तर दुसरे काय?

In reply to by राही

बाळ सप्रे Fri, 04/04/2014 - 13:39
लुगडी-पातळे-साड्या-धोतरे-पंचे हे निर्‍या काढून 'नेसायचे' असत. आता पँट-शर्ट-जीन्स-सल्वारकमीज् 'घालतात'. वेणी 'घालायची' असे, आज केस 'बांधतात'
इथे सामाजिक बदलांना अनुसरुन भाषा बदल अपेक्षितच आहे.. पण म्हणून साडी 'घातली' हे अशुद्धच!! तेवढच म्हणायचय मला.. प्रत्येक भाषिक अशुद्धतेची प्रवाहीपणा/समृद्धी याकारणासाठी पाठराखण होउ नये इतकच!! 'त्याला मदत करणे ' हे सुट्सुटित वाक्यरचनेचे रूप माहित नाही म्हणून जास्त हिंदी कानावर पडण्यामुळे 'त्याची मदत करणे' असे केले जाते. इथे सामजिक बदल अथवा कुठल्याही प्रकारची अपरीहार्यता हे कारण नसून अज्ञान आहे हे कारण आहे हे मान्य करायला हरकत नसावी.

In reply to by बाळ सप्रे

राही Fri, 04/04/2014 - 16:25
आता 'घालणे' हेच जर कपड्यांच्या संदर्भातले योग्य क्रियापद ठरले तर नेसणे आणि घालणे हा भेद रहाणारच नाही. कारण 'नेसण्या'ची कृती करण्याची वेळच येणार नाही किंवा कमीत कमी वेळा येईल.(लुगडी धोतरे वापरातून गेल्यामुळे.) त्यामुळे तो शब्द स्मृतीतून जाईल. आणखी वीस वर्षांनी सारी-ड्रेपिंग हा शब्द रूढ झालेला असेल. आता ड्रेप म्हणजे वस्त्रांनी सजवणे, (भरजरी राजवस्त्रे वगैरे) अंगावर व्यवस्थित चढवणे. साडी हा नित्य वापरातला प्रकार राहिला नसून खास सणासुदींचा पोशाख बनल्यामुळे तो काळजीपूर्वक 'ड्रेप'च करावा लागतो. जुन्या मराठीतली 'लेणे', 'माळणे' ही क्रियापदे हद्दपार झाली कारण त्या क्रियांमागच्या कृती बदलल्या. आज कोणी 'मी शर्ट ल्या(य)लो' किंवा 'मी परकर ल्यायले' असे म्हणत नाहीत. आज कोणी फुले 'माळीत' नाहीत.

In reply to by बाळ सप्रे

राही Fri, 04/04/2014 - 16:44
खरे तर साड्या वापरातून जात चालल्या आहेत म्हणूनच 'नेसणे' हा शब्दसुद्धा वापरातून जात चालला आहे. भाषेच्या बाबतीत 'डेड-लाइन' 'डिमार्केशन' वगैरे असे काही नसते की शेवटची साडी शेवटच्या वेळी नेसली जाईल तेव्हाच अमुक एक शब्द बाद होईल. ही हळू हळू चालणारी आणि 'ओवरलॅपिंग' अशी प्रक्रिया असते.

In reply to by प्यारे१

राही Sat, 04/05/2014 - 14:22
"साड्या वापरातून जात चालल्या आहेत" असे म्हटले आहे. 'वापरातून गेल्या आहेत' असे नाही म्हटलेले. अर्थ असा की साड्या वापरण्याचा कल कमी होतो आहे. लोकसंख्यावाढीचा वेग कमी होतो आहे म्हणजे लोकसंख्या कमी होते आहे असे नव्हे; अ‍ॅक्सिलरेशन कमी होते आहे म्हणजे स्पीड कमी होतो आहे असे नव्हे. मुंबईत तरी हा कल स्पष्ट दिसतो. साड्यांची दुकाने जाऊन त्या जागी पंजाबी कपड्यांची (किंवा त्याहूनही पुढे म्हणजे वेस्टर्न आउट्फिट्सची) दुकाने दिसू लागली आहेत. पोलक्याच्या कापडाची अनेक दुकाने बंद झाली आहेत. रेल वे फलाटावर विशेषतः कचेर्‍यांच्या वेळात बायकांच्या डब्याशेजारी उभे राहून निरीक्षण केले (आपापल्या रिस्कवर) तर साडीवाल्या बायका कमी दिसतात. ग्रामीण भागातही कित्येक ठिकाणी नवतरुणी आता पंजाबीसूट किंवा मॅक्सी (खरे तर गाउन, हाउस-कोट) घालतात.

राही Fri, 04/04/2014 - 15:12
सामाजिक अभिसरणामुळे झालेले बदल अज्ञानातून होतात हे म्हणणे अज्ञानमूलक आहे. भिन्न संस्कृतीशी आदानप्रदान (किंवा आपण संघर्ष म्हणू या हवे तर ) होताना मूळ संस्कृतीला समांतर किंवा तिचीच एक शाखा अशी एक संस्कृती जन्म घेत असते आणि ती दोन्ही जनक संस्कृतींना समृद्ध करते. गांधारकला हे एक उत्तम उदाहरण ठरेल. सध्या हिंदीवर बॉलिवुडी प्रभाव नाही असे आपल्याला वाटते का? वाट लग गयी, श्यानपन, कानपट्टी, सुमडी, नक्को (दखनी) हे शब्द कुठून आले? हे शब्द तर पाकिस्तानी उर्दूतही शिरले आहेत. आज हिंदीवर मराठीचा प्रभाव गुजरातीपेक्षाही जास्त आहे तो बॉलिवुडमुळेच. खरे तर जुनी गुजरातीभाखा ही मुळापासूनच राजस्थानीशी आणि पर्यायाने हिंदीशी साधर्म्य राखते. पण आज मात्र हिंदीवरचा मराठी प्रभाव जाणवण्याजोगा आहे. मुंबईमध्ये हिंदी चित्रपट-उद्योग भरभराटीस येणे ही घटना आर्थिक, भाषिक आणि सामाजिक अंगांनी तपासता येण्याजोगी आहे. भाषेवर या सर्व बलांचे कार्य चालते. यात भाषा कधी या अंगाने झुकते तर कधी त्या. अशी मुरडत, वळसे घेत चाललेली भाषा स्वतःचा एक वेव्ह फॉर्म किंवा पॅटर्न स्थापन करीत पुढे वाटचाल करीत असते. ही गति सरासरीने एकदिक् मानता येईल पण काळाच्या एखाद्या छोट्या तुकड्यात ती हेलकावे खाताना दिसू शकते. असो. मराठी बिघडत नाहीय आणि मराठीची अधोगती होत नाहीय हे मात्र नक्की.

In reply to by राही

बाळ सप्रे Fri, 04/04/2014 - 15:33
मराठी बिघडत नाहीय आणि मराठीची अधोगती होत नाहीय हे मात्र नक्की
हे मान्य.. पण बरेच शब्दप्रयोग डोक्यात जातात हे मात्र खरं.. पण शुद्ध आणि अशुद्ध हा फरक राहाणारच.. प्रत्येक जण आपल्याला वाटेल तसेच बोलणार .. पण त्यात चूक दाखवल्यास वाईट वाटून घेउ नये.. 'शुद्ध आणि अशुद्ध असं काहिच भाषेत नसतं' असं म्हणणं हे देखिल आत्मवंचना करणेच ठरेल.

In reply to by बॅटमॅन

बाळ सप्रे Fri, 04/04/2014 - 15:56
भाषेबाबत जास्त आग्रही असणार्‍यांना "शुद्ध आणि अशुद्ध" जास्त योग्य वाटेल.. पण "प्रमाण-प्रमाणेतर" ला सर्वसंमती मिळू शकेल.. :-)

In reply to by बाळ सप्रे

बॅटमॅन Fri, 04/04/2014 - 16:03
शुद्ध आणि अशुद्ध असे म्हणण्यामागे एक अ‍ॅझम्प्शन आहे की शुद्ध नामक काहीएक ऑब्जेक्टिव्ह गोष्ट अस्तित्वात आहे. जे भाषाशास्त्रदृष्ट्या चूक आहे. त्यामुळे प्रमाण आणि प्रमाणेतर हे वर्गीकरण बरोबर आहे.

In reply to by बॅटमॅन

बाळ सप्रे Fri, 04/04/2014 - 16:23
शुद्ध आणि अशुद्ध असे म्हणण्यामागे एक अ‍ॅझम्प्शन आहे की शुद्ध नामक काहीएक ऑब्जेक्टिव्ह गोष्ट अस्तित्वात आहे. जे भाषाशास्त्रदृष्ट्या चूक आहे
भाषाशास्त्र असेदेखिल ऑब्जेक्टीव्ह काही नसते (कारण प्रमाण काय आणि प्रमाणेतर काय यावरदेखिल वाद होउ शकतात) .. मुद्दा एवढाच.. अशुद्ध भाषा म्हटल्यावर राग येउ शकतो.. प्रमाणेतर म्हटल्यास ती शक्यता कमी.. म्हणूनच म्हटलं "प्रमाण - प्रमाणेतर" ला सर्वसंमती मिळू शकेल.. पण हे डावंउजवं राहायचचं..

In reply to by बाळ सप्रे

बॅटमॅन Fri, 04/04/2014 - 16:34
भाषाशास्त्र असेदेखिल ऑब्जेक्टीव्ह काही नसते
पिशी अबोलीबै, ऐकताहात का ;) एनीवेज, हे विधान चूक आहे. ऑब्जेक्टिव्ह कंटेंट भाषाशास्त्रात खच्चून भरला आहे. ते न पाहता प्रमाण भाषेलाच शुद्ध म्हणण्याचा आग्रह रोचक वाटला.

In reply to by बॅटमॅन

राही Fri, 04/04/2014 - 16:00
अगदी सहमत. खरे तर ह्याच संज्ञा वापरून प्रतिवाद करायला हवा होता पण शुद्ध-अशुद्धाच्या मुद्द्याआधीचे विवेचन करण्यात माझ्याकडून जास्त जागा (वाया) गेली.

In reply to by राही

प्रदीप Sat, 04/05/2014 - 15:19
सध्या हिंदीवर बॉलिवुडी प्रभाव नाही असे आपल्याला वाटते का? वाट लग गयी, श्यानपन, कानपट्टी, सुमडी, नक्को (दखनी) हे शब्द कुठून आले? हे शब्द तर पाकिस्तानी उर्दूतही शिरले आहेत. पाकिस्तानी उर्दूबद्दल माहिती नाही. हिंदी चित्रपटांत हे शब्द सर्रास येत असल्याने, व पाकिस्तानीही ते बर्‍यापैकी बघत असावेत, त्यामुळे अशा एका शब्दाचा मीच अलिकडे येथील एका पाकिस्तान्याशी बोलतांना वापर केला आणि मला काय म्हणायचे आहे ते त्याला अगदी झटकन समजले. पण हा anecdotal evidence झाला. ह्यापुढे प्रत्यक्ष आपापसात बोलतांना हे लोक असे, मराठीतून हिंदी चित्रपटांपुरते गेलेले शब्द वापरतात का, ह्याबद्दल काही माहिती नाही. पण हे शब्द आता सर्रास हिंदी भाषेत गेले आहेत व हिंदीभाषिक जनताही ते नियमीत वापरते, ह्याविषयी मात्र मी साशंक आहे. पुन्हा माझा anecdotal evidence तरी मला हे दर्शवत नाही. वास्तविक हिंदी चित्रपटांचा आपल्या सर्वांगीण जीवनावर प्रभाव अगदी चाळीशीच्या दशकापासून आहे. पण गेल्या पंधरा-वीस वर्षातच आपले पुण्या- मुंबईकडील लोक इतके हिंदाळलेले का बोलू लागले, आणि तसेच लिहूही लागले, ह्याचे मात्र मलातरी सखेदाश्चर्य वाटत राहिले आहे. इतर भाषांतून आपण पूर्वापार शब्द स्वीकारत आलेलो आहोत. पण, ती प्रक्रिया इतक्या वेगाने झालेली नाही. तसेच आपल्या अंवतीभोवती जे असते, त्याचा आपल्या बोलण्याचालण्यावर परिणाम होणे साहजिक आहे. पण तरीही आपले म्हणून जे काही असते ते अगदी 'पातळ' करून टाकायचे का, हा प्रश्न आहे. मला वाटते ह्याला थोडी शिस्त, व आपल्याच भाषेचा रास्त अभिमान असणे जरूरीचे आहे. माझा मुलगा वयाच्या आठव्या वर्षापासून परदेशी वाढला,इंटरनॅशनल शाळेत जावयास लागल्यानंतर त्याच्या मराठीत कधीमधी चुकीच्या वाकरचना येऊ लागल्या, उदा. 'तो मला बसवर भेटला'. अशा वेळी त्याला सौम्यपणे 'मराठीत आपण असे म्हणत नाही,' असे सांगून आपण ते मराठीत कसे म्हणतो, हे सांगून सुधारणा करत राहिलो. माझ्याप्रमाणेच आमच्या येथील अनेक मराठी कुटुंबियांतील मुले अगदी नीट मराठी बोलू शकतात, ते बहुधा अशाच शिस्तीमुळे असावे. इतर भाषेतील विशेषनामे उगाच चमत्कारीक मराठीकरण करून वापरावीत (उदा. 'चेपू', 'तूनळी' इत्यादी) हे मलातरी खुळचटपणाचे वाटते. तसेच ज्या संकल्पनाच परकी आहेत, त्यांना त्या त्या भाषांतील मूळ नावांनीच संबोधावे, ह्याविषयी अजिबात वाद नाही. त्याचबरोबर मराठीतील काही शब्दांना नवे अर्थ देऊन ते वापरणे हेही बेजबाबदारपणाचे वाटते. फार पूर्वीचे सांगत नाही, अगदी ऐशीच्या दशकापर्यंत कुठलाही दर्जेदार कार्यक्रमही 'समाप्त' व्हायचा. (आठवा: "आजचा 'आपली आवड' हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूयात पुढल्या मंगळवारी, रात्रौ दहा वाजता"). आता गल्लीबोळातला कार्यक्रमही 'संपन्न' होतो. (पूर्वी आमची जीवने कुठल्या ना कुठल्या कारणाने संपन्न व्हायची). हीच गोष्ट 'प्रभावित' ची! 'आलेल्या पुराने अमूकेक क्षेत्र 'प्रभावित' झालेले आहे' म्हणे! तेव्हा भाषेच्या प्रवाही असण्याबद्दल तक्रार नाही. मात्र बेजबाबदार राहून आपण आपली कात भर्र्कन टाकणे कितपत रास्त आहे, ह्याविषयी दुमत आहे.

In reply to by प्रदीप

पैसा Sat, 04/05/2014 - 19:04
प्रतिसाद आवडला. मराठीत हिंदी शब्द घुसण्याचं कारण मराठी मानसिकता असावी. तुम्ही तमिळनाडूत गेलात तर तिथले लोक तुमच्याशी हिंदी/मराठी बोलायला येणार नाहीत. पण मुंबईतला मराठी माणूस दुसरा माणूस कुठला आहे हे शोधून त्याच्याशी हिंदी/गुजराती इ. बोलायचा प्रयत्न करतो. गंमत म्हणजे मुंबईत हल्ली सार्वजनिक जागी २ मराठी माणसे भेटली तर हिंदीत बोलतात असे ऐकून आहे. या प्रकारात एक ना धड, भाराभर चिंध्या असली गत होत जाते. सरकारी मराठीबद्दल लिहिलंत तेही पटलं.

In reply to by पैसा

प्रदीप Sat, 04/05/2014 - 19:53
गंमत म्हणजे मुंबईत हल्ली सार्वजनिक जागी २ मराठी माणसे भेटली तर हिम्दीत बोलतात असे ऐकून आहे. माझा असाच अनुभव आहे. एका मुंबईच्या मित्राशी ह्या विषयावर अलिकडेच बोलत होतो. त्याने त्याचा मुंबईच्या आसपासच्या काही गावांतील स्वतःचा अनुभव सांगितला. त्याच्या अनुभवानुसार तिथेही, तेथील स्थानिक गांवकरी, आपण मराठीरून प्रश्न विचरल्यावर, आपणास हिंदीतून उत्तरे देतात. मित्राचे म्हणणे असे की असे हिंदीतून बोलणे, हे आता गावांतून प्रतिष्ठेचे होऊ लागले आहे.

In reply to by राही

पैसा Sat, 04/05/2014 - 19:16
राही, तुमचेही बरेच प्रतिसाद आवडले. भाषा बिघडत नाही आणि अधोगती होत नाही हे पटले. मात्र अशाच वेगाने मराठी आणि हिंदीचे मिश्रण होत राहिले तर मात्र एका मोठ्या कालखंडाचा विचार केला तर आजचे मराठी साहित्य ४००/५०० वर्षांनी तेव्हाच्या मराठी लोकांना दुर्बोध वाटेल, ज्ञानेश्वरीतली मराठी आज लोकांना कठीण वाटते तशीच. गंमत म्हणजे ज्ञानेश्वरीची भाषा अनेक ठिकाणी आज कोंकणीला जवळची वाटते. काही कोंकणी ग्रुप्स तर ज्ञानेश्वरी कोंकणीत आहे असे ठासून सांगतात. तसेच विचार करा, २५५० सालात कुसुमाग्रजांचे साहित्य तेव्हाच्या एखाद्या मुंबईत रहाणार्‍या तथाकथित मराठी माणसाला अजिबात समजणार नाही. ते पुणेरी बोलीला जवळचे आहे असे तो कदाचित म्हणेल! संस्कृत आणि अनेक प्राकृत भाषांमधून एके काळी अनेक भाषांची उत्पत्ती झाली. आता परत सगळ्या भाषांचे एकीकरण होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे असे म्हणता येईल का? या सगळ्या गदारोळात द्रविड भाषा आपले अस्तित्व टिकवून ठेवतील का त्यांचीही अशी सरमिसळ होत आहे?

In reply to by पैसा

बॅटमॅन Sat, 04/05/2014 - 22:37
या सगळ्या गदारोळात द्रविड भाषा आपले अस्तित्व टिकवून ठेवतील का त्यांचीही अशी सरमिसळ होत आहे?
सरमिसळ त्यांच्यातही होत आहे. पण मुळात फरक बराच असल्याने त्यांच्या वेगळ्या अस्तित्वाला तितका फरक पडणार नै. मराठीत हिंदी प्रमाणाबाहेर मिसळली तर कदाचित एक वेगळीच भाषा तयार होईल, पण द्राविडी भाषांची मूळ शब्दसंपदा वेगळी असल्याने तसे होण्याची शक्यता कमीच. अर्थात लाँग रेंजमध्ये काय होईल कुणी सांगावे? मराठीची उत्पत्ती हीच मुळात प्राकृत + द्राविडी भाषांचे मिश्रण म्हणून झाली असे म्हंटात. तसेही होईल.

In reply to by पैसा

राही Sat, 04/05/2014 - 22:59
गंमत अशी आहे की भाषेच्या विकासाच्या एका विवक्षित टप्प्यावर जेव्हा बदलाचा वेग वाढतो आणि ती भाषा एक वेगळे वळण घेऊन मूळ भाषेहून वेगळी दिसू लागते, तेव्हा त्या संधिकाळात किंवा मेटॅमॉर्फसिसच्या काळात निर्माण झालेल्या साहित्यावर त्या वेळी निर्मितीअवस्थेत असलेल्या आणि पुढे स्वतंत्र बनलेल्या अनेक भाषा हक्क सांगू शकतात. मीरेच्या भजनांवर गुजराती, राजस्थानी, हिंदी या भाषा हक्क सांगतात. तुलसीरामायणाचेही तसेच. भोजपुरी, मैथिली या सारख्या बोलींना भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे एका सामाईक साहित्यठेव्याचा वारसा या सर्वांनाच मिळाला आहे. कोंकणी आणि मराठीचेही तसेच आहे. 'चामुण्डराजें करवियले' हे वाक्य कोंकणी लोक आपले मानतात. त्यासाठी 'वियले' या क्रियारूपाचा दाखला देतात की ही कोंकणीची टेंडन्सी आहे. पण अशी रूपे तर विसाव्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांपर्यंत मराठीत प्रचलित होती आणि अजूनही कधी कधी काव्यरूपात दिसतात. जसे : लावियलें नंदादीपा, तुवां मंदिरात' किंवा 'बहुत छळियलें, नाथा' वगैरे. उद्या पुणे-सातारा परिसरातली घाटी बोली जर भाषारूप पावली तर शंकर पाटलांच्या कथा हा मराठी आणि ही नवी भाषा यांचा सामाईक वारसा ठरेल.

भाषा हे केवळ संवादाचे साधन असल्याने आपला कोणत्याच भाषेबद्दल / शब्दांबद्दल ह्ट्ट नाही ... जेव्हा जसे जे शब्द सुचतील तेव्हा ते तसे वापरावेत :) अर्थ कळाल्याशी मतलब !! असो. (मराठी भाशेचा पेपर संपल्यावर ) चंगु : अरे तिसर्‍या प्रश्नात , "सात्विक " चा विरुध्द अर्थी शब्द विचारला होता त्याचे तु काय उत्तर लोहिलेस ? मंगु : का रे ? तु काय लिहिलेस ? चंगु : मी लिहिले "सातस्ट्राँग" ... :D मंगु : अरे नाही यार , त्याचे उत्तर आहे "सात खरेदी कर" =)) चंगु : हां .... तरी मी म्हणत होतोच की मराठीच्या पेपरात इंग्लिश प्रश्न कसा काय विचारला ते =))))

कौशिक लेले Sat, 04/05/2014 - 18:28
बरीच चर्चा झाली. पण इथे नवीन शब्द काही हाती लागले नाहीत. ते असो. ज्यांना इच्छा आहे त्यांनी वर दिलेला फेसबुक गटाचे नक्की सदस्य व्हावे.

युरेका...युरेका...युरेका...! http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-dancing.gif मला इंटरनेट कनेक्शनला जो मराठी म्हणून संस्कृतनिष्ठ जालंजोडणी ,हा शब्द वापरतात..त्याऐवजी येक सहजशब्द सुचला!!!

जोडजाळं

अता या शब्दावर माझा कॉपिराइट हां!!! http://www.sherv.net/cm/emoticons/hand-gestures/winking-victory-sign-smiley-emoticon.gif

समीरसूर Tue, 04/08/2014 - 15:21
उपक्रम चांगला आहे. शुभेच्छा! एका प्रतिसादात म्हटले आहे की आहे ती मराठी नीट बोलणे महत्वाचे आहे. हे देखील बरोबर वाटते. मी एका आठवड्यासाठी बाहेर गावी जातोय >> मी एक वीकसाठी बाहेर जातोय. किंमत आहे एक कोटी रुपये >> किंमत आहे एक करोड रुपये वारांची नावे सहसा इंग्रजीतूनच घेतली जातात आज-काल. "मी संडेला गेलो होतो; मंडेला वापस आलो." बाकी हिंदाळलेले मराठी ऐकायला विचित्र वाटते. "बर्थडे मनवला...", "जेवण बनवले...", "चहा बनवली..", "या, तुमचीच कमी होती..." (अशा नावाचे बहुधा एक नाटकदेखील होते. 'कमतरता' शब्द मोठा म्हणून 'कमी' ला कामाला लावले बहुधा), "तिथे गुफा आहेत" (गुहा हा मराठी शब्द तर जवळ-जवळ आटोपला आहे; सगळेच 'गुफा' म्हणतात), "तिथे मोठी खाई होती" (दरी गेली आणि खाई आली), "त्याला शक आला..." (हे नि:संशय हिंदीच्).....अशी अगणित उदाहरणे आहेत. आणि हे पुन्हा मूळ शुद्ध मराठीवर ओढून आणणे जवळ-जवळ अशक्य आहे. इतका वेळ आहे का असं मराठी बोलणार्‍यांकडे? वाचतात का ते?

In reply to by प्रसाद गोडबोले

पैसा Wed, 04/09/2014 - 11:02
=)) मोबाईलला भ्रमणध्वनी असा श्ब्द वापरतात की. आता सेलफोनला काय म्हणायचं ते बघा! बाकी पर्याय एकदम भारीतले आहेत! मॅनेजरला कामलाव्या पेक्षा वाटलाव्या शब्द जास्त बरोबर आहे.

मान्यता नसलेली बोली फक्त प्रमाणेतर. व्याकरणाचे नियम न पाळल्यास अशुद्ध. अशुद्ध हा शब्द भाषेबाबतीत पूर्णपणे निषिद्ध नाहीये. आशयाशी सहमत. पण खालील फरकासहः प्रमाणित भाषा: सांविधिक संस्थेने (statutory body) मान्यता दिलेल्या नियमाप्रमाणे वापरलेली वापरलेली भाषा. अप्रमाणित भाषा: प्रचलित असलेली पण प्रमाणित भाषेशी सुसंगत नसलेली भाषा. अशुद्ध भाषा: सांविधिक संस्थेने मान्यता दिलेले नियम पाळण्याचा प्रयत्न/दावा करून त्या बाबतीतल्या चुका असलेली भाषा. या संदर्भात माझे दोन पैसे: १. बोलीभाषा बोलीभाषा ही रोजच्या वापरातली आणि म्हणून अत्यंत प्रवाही असते. ती वापरली जाण्यार्‍या लोकांत रुजलेल्या सवयी, तत्कालीन प्रचलित आवडी-निवडी (इन थिंग,फॅड, इ); बोलण्याच्या सवयी (हेल, च/ज इ उच्चारण्याच्या पद्धती,इ); इ ने प्रचंड प्रभावित असते. या सर्व गोष्टी काळाबरोबर सतत बदलत असतात आणि त्यामुळेच बोलीभाषा प्रवाही (सतत बदलत राहणारी) होते. एक प्रकारे बोली भाषा ही सतत चालू अवस्थेतले काम (वर्क इन प्रोग्रेस) आणि त्याबरोबर होणारा प्रत्येक बदल त्वरित वापरात आणणारे काम असते. लोकांना पसंत पडलेले / उपयोगी वाटणारे बदल प्रचारात राहतात आणि तसे नसलेले आपोआप कमी कमी वापर झाल्याने प्रचारातून निघून जातात. वरच्या वस्थुस्थितीमुळे कोणतीही बोलीभाषा नियमांच्या एका चौकटीत बसवणे शक्य नाही ... तो एक निष्फळ प्रयत्न आहे. लोक तुमचे मत ऐकतील न ऐकतील, पण त्यांना सोयीचे / आवडेल तसेच बोलतील/ लिहितील. म्हणूनच, अ) बोलीभाषा दर २०-३० किलोमीटरवर वेगळी असते. (याचा अर्थ ती नकाश्यांवर आखलेल्या रेषांच्या पुढेमागे एकदम बदलत नाही, तर एकीतून दुसरीत लोकांच्या गरजेनुरूप सहजपणे रूपांतरित होत जाते.) तसेच, ब) ती कोणत्याही एका स्थानावरही कालप्रवाहाबरोबर सतत बदलत जाणारी असते. क) एवढेच काय तर एकाच स्थानावर (उदा गाव, शहर, भौगोलिक विभाग, इ) आणि एकाच काळी वेगवेगळ्या लोकसमूहातली बोलीभाषा वेगळी असणे सामान्य आहे. हे जाती-धर्माच्या विविधतेने भरलेल्या भारतात प्रकर्षाने दिसत असले तरी तितकीशी विविधता नसलेल्या इतर ठिकाणीही फार अभावाने आहे असे नाही. २. प्रमाण भाषा ही एखाद्या भाषेसाठी नेमलेल्या सांविधिक संस्थेने सद्य काळाकरिता नक्की केलेले नियम वापरून लिहिली-बोललेली स्थिर भाषा असते. याची काही प्रमाणात सॉफ्टवेअर प्रणालीच्या व्हर्शनशी तुलना होऊ शकते. आज जाहीर केलेले व्हर्शन त्यापुढचे व्हर्शन जाहीर होईपर्यंत स्थिर असते. याचा अर्थ भाषेची बदलण्याची प्रक्रिया थांबली असे नाही... ती सतत चालूच राहते. काही काळाने, बहुसंख्य लोकांनी बदललेल्या लिहिण्याच्या-बोलण्याच्या सवयींप्रमाणे झालेले बदल जेव्हा लक्षणीय प्रमाणात होतात तेव्हा प्रमाणित भाषेचे नवीनं व्हर्शन बनविणे भाग पडते. हे मराठीसकट सर्व वापरात असलेल्या भाषांच्या बाबतीत घडले आहे, घडत राहील. उदा. मराठीतले बदललेले र्‍हस्व-दीर्घ आणि अनुस्वारांचे नियम. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीच्या गेल्या काही दशकांतील आवृत्त्या नजरेखालून घातल्या तरी इंग्लिश मध्ये झालेल्या अनेक बदलांचा पुरेसा पुरावा मिळेल. ३. भाषेचा वापर कशासाठी भाषा वापरली जाते यावर कोणती बोलीभाषा / प्रमाणित भाषा वापरायची आणि त्यांचे कोणते (प्रमाणित / अप्रमाणित) व्हर्शन वापरायचे हे बहुतेक वेळा नैसर्गिकपणे ठरते... आणि तेच योग्य आहे. उदा: कट्ट्यात मित्रांबरोबर गंमत म्हणून अप्रमाणित गावरान मराठी वापरणारा माणूस वरिष्ठ अधिकार्‍याबरोबर मराठी बोलताना प्रमाणित मराठी बोलला नाही तर आश्चर्य वाटेल नाही का? साधारणपणे भाषेच्या वापराचे खालील प्रमाणे दंडक आहेत / असावेतः अ) शासकीय / औपचारिक लेखन / बोलणे : प्रमाणित भाषा. ब) खाजगी / अनौपचारिक लेखन / बोलणे : योग्य परिणाम साधण्यासाठी आवश्यक ती बोलीभाषा अथवा प्रमाणित भाषा. क) साहित्य : योग्य परिणाम साधण्यासाठी आवश्यक तसे बदल करत बोलीभाषा अथवा प्रमाणित भाषा. उदा. जुन्या संस्कृत नाटकांत सामान्य पात्रांच्या तोंडी (संस्कृत नाही तर) प्राकृत भाषा आहे... तसे नसते तर ते हास्यास्पद वाटले असते. कारण जगात कोणत्याही काळी कोणत्याही प्रदेशात १००% लोक प्रमाणित भाषा वापरत नव्हते / नाहीत / नसतील. तसेच ग्रामीण कादंबरीतल्या अशिक्षित पात्रांच्या तोंडी संस्कृतप्रचुर / प्रमाणित भाषा अवास्तविकच वाटेल. ३. परकीय भाषेचा हल्ला परकीय भाषेचा आपल्या भाषेवर हल्ला ही बहुदा "कोल्हा आला रे सारखी" आवई असते. मात्र या आवईमुळे काहीही फरक पडत नाही... तिचे महत्त्व फुसका समस्तरिय दबाव (इनइफेक्टीव्ह पियर प्रेशर) पेक्षा फार जास्त नाही. अ) आज इंग्लिश जगभरात ताकदवान भाषा म्हणून प्रचारात आहे ती तिचे उत्तम विपणन केल्यामुळे नाही किंवा तिच्या संरक्षणासाठी भाषामार्तंडांची फौज असल्यामुळे नाही तर तिच्या योग्य वापरामुळे होणार्‍या निर्विवादी आर्थिक-सामाजिक-व्यावसायिक फायद्यांमुळे आहे. जर उद्या मराठीच्या बाबतीत असेच झाले तर मराठीच्या प्रचारासाठी दुसरे काही विशेष करणे जरूरीचे नसेल. ब) परक्या भाषेतले शब्द / शब्दरचना आपल्या भाषेने अंगीकृत करण्यात सारासारविवेकबुद्धी वापरणे नक्कीच आवश्यक आहे, पण हा मुद्दाही इतर काहीपेक्षा भावनिकच जास्त आहे. भाषा-भाषा प्रक्रिया सर्व भाषांत सर्वकाळ होत आलेली आहे व आर्थिक-सामाजिक-व्यावसायिक फायद्यांच्या वस्तुस्थितीवर आधारितच ती सर्वस्वी अवलंबून आहे. दुसर्‍या भाषेमुळे आपली भाषा मलिन होईल हा दावाही तसा फोल आहे. कारण भाषा ही ती भाषा वापरणार्‍या लोकांची मालमत्ता आणि ती कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार सर्वस्वी त्यांचाच आहे. एखाद्या अनिष्ट गोष्टीची काही काळासाठी "हवा" तयार होऊ शकते. पण सर्वसाधारणपणे, ना लोक त्यांना अयोग्य वाटणारे बदल स्वीकारतील, ना कोणी त्यांच्यावर ते लादू शकेल... लोकांना आवडतील / फायद्याचे असतील तेच बदल जीव धरतील / फोफावतील / शिल्लक राहतील. क) आजच्या जगतील कोणतीच भाषा स्वयंभू असल्याचा दावा करू शकणार नाही. जिला अनभिषिक्त जागतिक भाषा असे समजले जाते, त्या इंग्लिश भाषेत ८०% पेक्षा जास्त शब्द परकीय भाषांतून आलेले आहेत आणि त्यामुळे तिला "उधार-उसनवार भाषा (borrowed language) असे म्हटले जाते. cola (कोला) हा सर्वव्यापी आणि सर्वमान्य शब्द इंग्लिशने पश्चिम आफ्रिकेतील Temne (kola) आणि Mandinka (kolo) या भाषांतून उचलेला आहे. आश्चर्यचकित व्हायचे असेल तर, पुढचा दुवा नुसता वरवर चाळून पहा : इंग्लिशमध्ये उसने घेतलेले शब्द आणि त्यांचा मूळ भाषा इथे सापडतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बॅटमॅन Wed, 04/09/2014 - 17:31
लैवेळा सहमत. अतिविस्तृत प्रतिसादासाठी खूप धन्यवाद! इंग्लिशसारखे अनेक शब्द मराठी पचवत गेली तर काय बिशाद आहे मराठी मरेल असे म्हणायची? फक्त तो जोर तूर्तास मराठीभाषकांत नाही, इतकेच. तो आला की फरक पडेलच!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

राही Wed, 04/09/2014 - 18:23
प्रतिसाद अतिशय आवडला. विशेषतः 'परकी भाषेचा हल्ला' विषयीचा परिच्छेद. भाषेची ताकद त्या त्या भाषकांच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय ताकदीवर अवलंबून असते याच्याशी जोरदार सहमति. समृद्ध समाजाची भाषाही समृद्धच असते. कारण समृद्ध समाजात दैनंदिन व्यवहार अनेक परींनी होतात. एक साच्याचे नसतात. (म्हणजे एक पिढी कारकुनी तर कारकुनीच करते असे नसते.) वेगवेगळ्या क्षेत्रांत उलाढाल वाढली की ती व्यक्त करणारे शब्दही वाढतात. आणि ह्या उलाढाली जर अभिजनसंमत असल्या (म्हणजे अभिजन वर्गात ह्या उलाढाली/व्यवसाय लोकप्रिय झाले) तर ते शब्दही अभिजनांच्या भाषेत/प्रमाण भाषेत शिरतात. पुन्हा एकदा, प्रतिसादासाठी जोरदार टाळ्या.