Skip to main content

वाट्सअ‍ॅप एक डोकेदुखी ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी सोमवार, 31/03/2014 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. आंतरजाल (इंटरनेट) युगात आपण सतत नाविन्याच्या शोधात असतो आणि आज त्याला प्रचंड महत्त्व आलं आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वेग इतका अफाट वाढलाय की आपण काही काळ जर यापासुन दूर राहीलो तर आपल्याला बरीच माहिती कळणार नाही, आपण अज्ञानी राहू की काय म्हणन्यापेक्षा दैनिकातील बातम्यांवर आपल्याला विसंबून राहावे लागेल. एका मोठ्या माणसाने असं म्हटलं होतं की ''How You manage your information determines whether you win or lose'' आपण आपल्याकडील माहितीचं व्यवस्थापन कसे करतो त्यावरच आपलं यश अपयश अवलंबून असते. माहिती विचारांची देवाण-घेवाण हा सर्व प्रकारच्या विकासाचा आधार असतो. आणि म्हणून आपल्याला सतत माहितीच्या-संवादाच्या क्षेत्राशी सतत जोडलेलो असले पाहिजे असे वाटायला लागते. मंडळी, ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअ‍ॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अ‍ॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. मग ते राजकारण,समाजकारण आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या तिथे तिथे संवादाच्या माध्यमाने अनेकांना जखडून टाकलं आहे. वाट्सॅप हे स्मार्टफोनवरचं Android वरील लोकप्रिय अ‍ॅप्लिकेशन. (नै सर आता टेलीग्राम जोरात चालतंय असं म्ह्टलं तरी माझी हरकत नाही) लाखो करोडो लोक नेट कनेक्टेड असतील तर एकमेकांशी क्षणात जोडल्या जातात. जालजोडणी (इंटरनेट कनेक्शन) भ्रमनध्वनीवर सहज मिळू लागली. आणि खेड्यापाड्यापासून ते अगदी जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहराशी माणसं जोडल्या जाऊ लागली. आणि क्षणात संदेश पाठविता येऊ लागल्याने त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. मंडळी, संवादाचं माध्यम मग ते कोणतंही असो त्याचं एकदा व्यसन लागलं की ते सुटणं अवघड होत जातं. वाट्सअ‍ॅपवर एकदा आपल्याला संदेश यायला लागले की नवीननवीन खूप आनंद वाटायला लागतो. आणि मग तेच तेच सुरु झालं की त्याचा कंटाळा यायला लागतो. राजकीय लोकांची, चित्रपट कलाकारांची, कोणा व्यक्तीची चांगली, व्यंगात्मक चलचित्र, चित्र, किंवा काही अश्लिल तसेच उत्तम माहितीपूर्ण गोष्टीही वाट्सॅपवर यायला लागल्या. विविध गृप निर्माण झाले आणि मग लक्षात यायला लागतं की हे अति होत आहे, हे थांबवलं पाहिजे. उदाहरण म्हणुन सांगतो. आमचा एक गृप होता विविध राजकारणी, नगरसेवक, व्यापारी,शिक्षक, जिल्हापरिषद सदस्य,आमदार, असा गच्च थोरामोठ्यांनी भरलेला गृप होता. सुरुवाती सुरुवातील गुड मॉनिंग पासून 'गोड गोड' असा संवाद व्हायचा. टोन वाजला की काय लिहिलं त्याची प्रचंड उत्सुकता. वाचने लिहिणे सुरु झाले. मग हळुहळु आमचा पक्ष, तुमचा पक्ष सुरु झाला. जातीपाती आल्या. आमचा नेता तुमचा नेता सुरु झालं, आमचा महापुरुष तुमचा महापुरुष असं सुरु झालं. शेतक-यांचा चर्चा सुरु झाल्या. एकदा तर शेतक-यांच्या चर्चेत एका थोरामोठ्याने मला तुम्हाला काय कळतं शेतक-यांचं दु:ख. असेल इतका कळवळा तर द्या ना तुमचा एक पगार इथपर्यंत पोहचला होता. एकदा तर एका नेत्याने एका व्यापा-याला आमची फक्त सत्ता येऊ दे मग पाहतो तुला. इथपर्यंत चर्चा झाल्या. एक दिवस अ‍ॅडमिनने हा गृप बंद करत आहे असे सांगितले. आणि सुटलो. पण एकमेकांविषयीची जी मतं बनली ती कशी एक्झीट करणार. वाट्सअ‍ॅपवर सर्वच वाईट नाही. काही गृप चांगले असतील. काहींना खूप चांगले अनुभव असतील तर कोणाला वाईट अनुभव असतील. कोणी म्हणेल सरळ संदेश म्युट करा, कोणी म्हणेल सरळ अ‍ॅप्लीकेशन भ्रमनध्वनीतून काढून टा़का. कोणी म्हणेल वाईट लोक असतील तर त्यांना ब्लॉक करा, मंडळी, या सर्वच विषयावर मुक्त आणि भलीबुरी चर्चा, आणि एकमेकांचे अनुभव, उपाय, किस्से, एकमेकांना कळावे, म्हणुन हा प्रपंच. विनंती : आमच्याकडे वाट्सअ‍ॅप नाही, हलके भारीतले मोबाईल नाही. वगैरे टाळता आले तर टाळावे. :) ''अधर्माची अवधी तोडी । दोषांची लिहिली फाडी । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।। श्री संत ज्ञानेश्वर.

वाचने 33533
प्रतिक्रिया 78

प्रतिक्रिया

वाट्सअ‍ॅपवर सर्वच वाईट नाही. काही गृप चांगले असतील. >> ह्याच्याशी सहमत. काही खूप चांगले ग्रूप मिळालेत. १-२ ग्रूपमधून मी बाहेर पडलेय कारण ग्रूपमध्ये मी काही योगदान देऊ शकत नाही आणि गॄपमधूनही काही फारसे हाती लागत नाहीये हे जाणवलेय. जुन्या कंपनीतल्या एक्स कलीग्जचा ग्रूप मिळालाय - जिथे खूप धमाल चालते, एक समानधर्मी वॉटरकलर्स वाल्यांचा गृप आहे. एक कोकणचा गृप आहे. आपल्याला काय हवे आणि कितपत हवे हे आपण ठरवायचे.

व्हॉट्स अप हा काय प्रकार आहे? झुकरबर्ग 20 अब्ज डॉलर मोजतो याचा अर्थ ते नक्कीच कायतरी भारी असणार एवढेच कळले आहे.

अनेक ठिकाणी पसरलेल्या मित्रांशी संपर्क ठेवायला, किंवा नुसता संपर्क नाही तर एकत्र असताना ज्या गप्पा चालतात त्याचीही बर्‍याच प्रमाणात मजा घ्यायला या/यासारख्या अ‍ॅपशिवाय पर्याय नाही.

हम्म्म.... असे काय काय चालते (चांगले आणि वाईट) याबद्दल नुकतेच पैतै व माऊशी बोलणे झाले आहे. लेखन पटले. मी अशा कोणत्याही पक्षात, सॉरी, गृपमध्ये नाही.

सद्यस्थितीत वाट्सअ‍ॅप हे २०% चांगले म्हणता येईल व ८०% त्रासदायक म्हणता येईल. चांगल्या आणि वाईट या दोन्हीसाठीची कारणे तुम्ही आधीच वर दिलेली आहेत. गृपमधून बाहेर पडणं म्हणजे तिथल्या लोकांवर/गृपवर निषेध व्यक्त करणं हा एक नविन प्रकार सध्या फार वाढीस लागला आहे. काही मोजके गृप वगळता मी ही बरेचश्या गृपमधून बाहेर पडलोय.

In reply to by किसन शिंदे

ह्या निमित्ताने , आपण अजुन घारापुरी मित्रमंडळाचा गृप सोडला नाहीये , ह्या बद्दल आपले आभार व्यक्त करीत आहे :D

मला तरी वॉटस अ‍ॅप आणि तत्सम अ‍ॅप खूप आवडतात. ग्रूप कोणता ठेवावा ठेऊ नये आपल्या हाती असतं. आमच्या कॉलेजच्या मित्रांचा मस्तं ग्रूप आहे. पेशंटचे डायग्नोसिस/ मॅनेजमेंट वैगेरे डिस्कस करतो. आई वडिलांना आमच्या मुलांचे फोटो/ अचिवमेंटस लग्गेच दाखविता येतात नाहीतर सहा सहा महिने आई बाबा भेटायची वाट पहावी लागते.

In reply to by साती

असेच म्हणतो.
पेशंटचे डायग्नोसिस/ मॅनेजमेंट वैगेरे डिस्कस करतो.
येवढं वगळुन. ;) बाकी मिपावरिल गुरुजनांच्या कृपेने नको असलेल्यांना फाट्यावर कसे मारावे हे अवगत झाल्याने वॉट्सप हे सध्या तरी वरदानच वाटतय. ;)

In reply to by गणपा

अगदी अगदी !!

कुठलेही तंत्रज्ञान स्वतः काहीच चांगले किंवा वाईट करत नाही... अणुतंत्रज्ञान घ्या किंवा व्हॉट्सअ‍ॅप घ्या... त्याचा वापर करणारी माणसं त्याचा चांगला किंवा वाईट उपयोग करतात. व्हॉट्सअ‍ॅप सारख्या तंत्रज्ञानाबाबतीत एक फार बरे आहे... त्याला वापरणे, न वापरणे, वापरल्यावर न पटल्यास वापर बंद करणे वगैरे वापरणार्‍याच्या हातात असत; त्यामुळे तो हवे असल्यास त्यापासून दूर राहू शकतो.

तंत्रज्ञान वाईट नाही, वापर कसा करता यावर सगळं अवलंबून आहे. काही फायदे, तर काही तोटे. लगेच संदेश पाठवण्यासाठी उपयोग होतो हे खरे, पण अनेकदा अगदी काही संबंध नसलेल्या ३/४ ग्रुप्समधे एकच चित्र/विनोद येत रहातो. त्याचा वैताग येतो. मी सहसा कामासाठीच याचा वापर करते. पण डेटा आता फेसबुकच्या ताब्यात गेला असणार. तेव्हा सिक्युरिटीबद्दल विचार व्हावा. कधी कधी दिवसभर मोबाईल बघत सुद्धा नाही. गावाला गेलं की २/३ दिवस नेटवर्क अ‍ॅक्सेस नसतो. मग तेव्हा काहीवेळा १०० २०० मेसेज येऊन पडतात. ते सगळे वाचणे शक्य नसते. कधी कधी मित्रमंडळीनी सांगितलेल्या चांगल्या बातम्या पण त्यात वाहून जातात. तेव्हा सगळ्यांनीच वापर जरा मर्यादित केला आणि फेसबुक स्टाईल फॉरवर्ड्स कमी केले तर बरे होईल. काही विशिष्ट हेतूने काढलेल्या ग्रुप्समधे नंतर इतर चर्चा/वाद/भांडणे होणे हे प्रकारही होतात. इन्स्टंट मेसेज असल्याने समोर बोलत असल्यासारखे वाद-विवाद वाढत जाऊ शकतात. असे प्रकार टाळून तंत्रज्ञान आपल्या फायद्याचे कसे होईल हे सगळ्यांनी पहावे.

In reply to by पैसा

कधी कधी मित्रमंडळीनी सांगितलेल्या चांगल्या बातम्या पण त्यात वाहून जातात. तेव्हा सगळ्यांनीच वापर जरा मर्यादित केला आणि फेसबुक स्टाईल फॉरवर्ड्स कमी केले तर बरे होईल.
मलापण असच वाटतं. अति तेथे माती. उगा उठुन नुसते फॉरवर्ड नका करु त्या ऐवजी काही तरी स्वतः लिहा. आपल मत समवैचारिकांसमोर मांडा. (भांडा नव्हे) फोर्वर्ड काय येतच असतात चेपूवर. तेथे निदान आपला डाटा वापरला जात नाही पण मोबाइलवर उगा पाठवलेली चित्रे अन व्हिडीओज (ते ही चार साईट्वरुन तेच तेच आलेले) आपली मेमरी अडवुन ठेवतात. दिवसाला काहीतरी डिलीट करावे लागते. कोणतीही गोष्ट तिचा योग्य वापर झाला तर वरदान अन अयोग्य वापराने डोकेदुखी ठरु शकते याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे व्हॉटस अप.

In reply to by पैसा

कधी कधी एकच एक जोक / फॉरवर्ड वेगवेगळ्या ग्रूप्समधून येतो, तेव्हा वैताग येतो..
पण डेटा आता फेसबुकच्या ताब्यात गेला असणार. तेव्हा सिक्युरिटीबद्दल विचार व्हावा.
मी पण हाच विचार करुन टेलिग्रामवर शिफ्ट झालो. पण मग म्हटलं, जाऊ दे ना.. आपण कोणते तोफ आहोत की कोट्यावधी युजर्समधून फेसबूक आपल्यावर विशेष लक्ष ठेवणार? ;-) म्हणून मग व्हॉट्सॅप पण ठेवलं. आता आमचा डाटा दोघेपण चोरतात.. ;-) :D

व्हाॅट्सअॅप मुळे खुप जुने मित्रांशी संवाद होतो, एरवी फोन करायला वेळ नसतो किंवा कंटाळा येतो पण व्हाॅट्सअॅप मुळे संपर्कात राहणे सोपे झालेय तेच ग्रुप्स मुळे चांगल्या गप्पा होतात, डोक्याला ताप न घेन्याचं कौशल्य असेल तर अशा चर्चांचा मनस्ताप होत नाहि.. :-) तसे मी पण काहि ग्रुप्स सोडलेत ;-) काहित अॅक्टिव्ह आहे. बाकि व्हाट्सअॅप मुळे मोठी मोठी भांडणे पाहिलीत, कटुताही अनुभवलीय व काहि समंजस ग्रुप्स धमाल एंजायतोय :-)

In reply to by जोशी 'ले'

व्हाट्सअॅप मुळे मोठी मोठी भांडणे पाहिलीत, कटुताही अनुभवलीय व काहि समंजस ग्रुप्स धमाल एंजायतोय :) ;-)

सर्वप्रथम लेख आणि चर्चाप्रस्ताव आवडला! ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअ‍ॅप आणि इतर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अ‍ॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. यातील ऑर्कूट फेसबुक, त्याआधी याहू ग्रूप्स, याहू मेसेंजर, स्काईप, मग गुगल हँग आउट असे करत करत नंतर व्हॉट्सअ‍ॅपने भौगोलीक सीमारेषा तोडत संवाद करणे सोपे केले. ज्या पध्दतीने विशेष करून भारतीय पण बाकी इतरत्र इतर समुह देखील यातील प्रत्येकाचा वापर करत एकीकडून दुसरीकडे जातात त्यावरून मला दोन गाणी आठवतातः एक म्हणजे "इथेच टाका तंबू, जाता जाता जरा विसावा, एक रात्र थांबू!" आणि वर लेखात आलेली भांडणे आणि नंतर ग्रुप बंद होणे (अनुभवले नसले तरी) वाचले की, "हम बंजारोंकी बात मत पुछोजी, जो प्यार कीया, तो प्यार कीया, जो नफरत की, तो नफरत की!" :) पण एकंदरीत आपण सगळेच या समुहातले भटके असतो! तरी देखील व्हॉट्सअ‍ॅपमुळे शाळेतले बरेच मित्र-मैत्रिणी अनेक वर्षांनी संवादात आले आहेत हे नक्कीच जास्त वैशिष्ठ्य वाटते.

माझ्यासाठी हे अ‍ॅप फारच उपयोगी आहे. सर्वीस इंजीनियर असल्याने, साईटवरुनच फटाफट फोटो आणी व्हिडिओ शेअर करणे वगैरे इतके सोपे होतंय की त्यासमोर असली डोकेदुखी वाटत नाही. बाकी, एकमेकांविषयीची जी मतं बनली ती कशी एक्झीट करणार अशीच भांडणं व्हॉटसअ‍ॅप, बागेत, कट्ट्यावर किंवा ऑनलाईन फोरम/साईटवर सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे या केसमधे अ‍ॅपपेक्षा जास्त प्रॉब्लेम, गॄप युझर्सचा होता असं वाटलं. बरं झालं, बंद केलात तो गॄप.

आपण इ मेल जसे दिवसातून एकदा तपासतो तशा प्रकारे वॉट्स आप वापरल्यास ते आनंद देते. अन्यथा तापदाय्क आहे.

मग हळुहळु आमचा पक्ष, तुमचा पक्ष सुरु झाला. जातीपाती आल्या. आमचा नेता तुमचा नेता सुरु झालं, आमचा महापुरुष तुमचा महापुरुष असं सुरु झालं. शेतक-यांचा चर्चा सुरु झाल्या. एकदा तर शेतक-यांच्या चर्चेत एका थोरामोठ्याने मला तुम्हाला काय कळतं शेतक-यांचं दु:ख. असेल इतका कळवळा तर द्या ना तुमचा एक पगार इथपर्यंत पोहचला होता. एकदा तर एका नेत्याने एका व्यापा-याला आमची फक्त सत्ता येऊ दे मग पाहतो तुला. इथपर्यंत चर्चा झाल्या.
एखादं उपकरण किंवा तंत्रज्ञान वापरायला पण लायकी लागते. सामान्यकरून भारताच्या आणि खासकरून महाराष्ट्राच्या जनतेला ती लायकी नाही. ही जनता व त्यांचे नेते फक्त गुलामगिरी करायलाच लायक आहेत. टेक्नॉलोजी स्वस्त झाल्यानं माकडाच्या हातात कोलीत मिळालंय झालं. पण शेवटी माकडंच. दलाली करून, जमिनी वगैरे विकून आलेल्या पैशात "शाम्संग" पासून "आयफोन" पर्यंत काहीही घेता येतंय. पण ते वापरायचं कसं ते कळायला शाळेत शिकलेलं हवं. अभ्यास सोडून जाती वरून मतं देणार्‍या या अडाणचोट जनतेला एटीकेट नावाचा शब्द कुठला ठाऊक असायला? अजून हे लोक शिवाजी मराठयांचा आणि बाबासाहेब महारांचे यातच अडकलेले आहेत. आणि तेच बरंय. कारण आता नोकर्‍या कष्टाळू अशा चायनीज, व्हिएट्नामीज लोकांकडे जातायत. हे महाराष्ट्रीय लोक पुढचे काही वर्ष अशीच भांडणं करत बसतील. भारतातून मल्टी नॅशनल कंपन्यांनी काढता पाय घेतला की आपण नायजेरियी, सोमालिया या देशांप्रमाणं सरंजामशाहीचा स्विकार करूच. मग मराठा सेना, महार सेना, माळी सेना, शेतकरी सेना आदी सशस्त्र सेना तयार होतील. भारतातल्या शहाण्या लोकांनी त्याआधीच देश सोडला असेल. मुघल काळात शिवाजीचा उदय होण्यापूर्वी मराठ्यांचा (मराठा जात नव्हे तर प्रदेशवाचक अर्थाने वापरलाय हा शब्द याचे कृपया दखल घ्यावी) मुख्य व्यवसाय काय होता याचा सुज्ञ जनांनी जर शोध घेतला तर ही जनता शेवटी तिथेच पोचणार आहे हे सांगयला भविष्य् वेत्याची गरज नसावी. बाकी चालू दे.

मी पहिल्यांदा जेंव्हा हे अ‍ॅप फोनवर लावलं तेंव्हा, सुरवातीला छान..आणि नंतर प्रचंड त्रासदायक! अशी माझी अवस्था झाली.सालं जरा इंटरनेट चालू केलं की लगेच्च,"हाय..नमस्कार..कसे आहात..जेवलात का?.. काय खाल्लत? " असे १ ना २ शेकडो (एका दृष्टीनी) निरर्थक मेसेज सारखे वहान चालवताना डोळ्यात चिलटं जावी तसे मधे मधे यायला लागले. आणि मी व्हॉट्स अप उडवून टाकलं.(फेसबुक मेसेंजर आणि जी टॉकही याच डोकेदुखि मुळे बंद ठेवले आहे.) पण आता व्यवसाया निमित्ताने मला ते परत वापरावं लागतय. पुणे,पिंपरी-चिंचवड,बाणेर-पाषाण-औंध,हडपसर या विभागातील आमच्या सर्व पुरोहित मंडळींनी व्हॉट्स अप वर व्यवसाय अनुषंगाने मोठाले ग्रुप केलेत.त्यामुळे १ लाइव्ह बिझनेस मिटिंग कायमची सुरु असते. म्हणून हल्ली आमचे ते ग्रुप आणि २ मित्रांचे ग्रुप सोडता...अन्यत्र मी कुठेच नसतो. :)

तसं एक बरं अ‍ॅप आहे. पण बर्‍याच गृपवर लोक उगा निरर्थ फॉरवर्ड्स, चित्रे वैग्रे टाकून वात आणत असतात शेवटी मी इमेज ऑटो डाऊनलोड आणि सर्व तर्‍हेची साऊंड नोटिफिकेशन्स बंद केल्यामुळे बर्‍यापैकी शांत जीवन जगत आहे.

In reply to by प्रचेतस

मी कालच आयुष्यातील पहिला अँड्रॉईड फोन घेतला आणि आज व्हॉटसप इंस्टॉल केले आहे. सरांच्या या लेखाने माझ्या ओसंडून वाहणार्‍या उत्साहावर पाणी फिरले आहे. :(

हा स्टेटस टाकला होता. एका गावाकडच्या पैलवानाने नुकतच एंड्रोइड घेतले होते अन वाट्सप ज्वाइन केले. कॉंटेक्ट नंबर सोबत स्टेटस आपोआप शेअर झालेले होते. माताय, दोन मिनिटात मला फोन.. काय रं बैला, फुकनिच्या शाना झाला का रे तु ? फुल शिव्या... आइभ्न्न एक. मला कळेना मी काय घोडं मारलय त्याचं ? म्हटल पावनं दमान घ्या... काय झालं ते तर बोला ? त्याच पुन्हा तेचसुरु.. तु बा लागुन गेलास व्हयं रं माझा, समोर तर ये हिथच तंगड तोडतो ? मी म्हटल काय झाले ते तर सांग ? मग, मग भेंचो* मला मेसेज का केला आय अ‍ॅम युअर डॅड् म्हनुन, स्वारी प्रचंड घुश्यात... मी दहा वेळा चेक करतोय टचस्क्रीनने चुकुन काही गोंधळ तर कुठे घातला नाहीये ना... मग लक्षात आलं आणी त्याला समजवले अरे बाबा ते स्टेटस आहे, तुला वयक्तीक/सार्वजनीक मेसेज नाही. म्हणूनच तुला उद्देशुन ते अजिबात नाही. तसही तु येवडा मोठा गडी, तुझी लेवल वेगळी, मोठ्या लोकांच्यात उठबस तुझी भाउ, कशाला, आम्हा लहान पोरांच्यात लक्ष घालतोस, आमचा दंगा चालुदेना आमच्यात ? तरी त्याचा वाद चालुच आपण कोणाचे असं कधीच ऐकुन्/खपुन घेत नाय. अमक्या ढमक्याला मी ओळखतो म्हणून आधी फोन तरी केला, नायतर पहिला आवाज काढला असता नंतर सांगीतले असते का वाजवले ते. तसेच ताबडतोप मी स्टेटस बदलावे म्हणून त्याची १० मिनीटे अरेरावी सुरुच. त्याला अतिशय परिश्रमाने समजावले बाबा स्टेटस हा निरोप नसतो. तु मोठा आहेस, तुझा अपमान करायचे मला कारण व गरज नाही. माझ्याकडे एक तर दुर्लक्ष कर अथवा मला ब्यान कर. आणी मग लगेच जरा एक दोन ठीकाण होउन त्याला समजेपर्यंत समजावतील अशा लोकांना घडलेला प्रकार सांगीतल्यावर मग तो शांत झाला. आता त्याची स्टेटस कशी वाटतात म्हणून अधुन मधुन हसत हसत विचारणा करत असतो. :) पण अजुन त्याचा गावी जायची हिंमत केली नाहीये.. बघुया कधी योग येतोय ते :) थोडक्यात काय वाट्सप म्हंजे लय डेंजर प्रकरन हाय.

In reply to by आत्मशून्य

बाबौ! सातीअम्मांचा प्रतिसाद वाचून क्षणभर का होईना माझा विचार बदलला होता.

In reply to by आत्मशून्य

जर हा पैलवान मिपावर वाचनमात्र असेल आणि त्याने हा धागा वाचला असेल तर? *acute*

In reply to by विकास

 ????? काय हुतंय, आँ??!!!

संध्याकाळी ट्रेनच्या ट्रॅव्हलिंगचा एक तास, सध्या बायको माहेरी असल्याने रात्री झोपायच्या आधी अर्धा-पाऊण तास, ऑफिसमध्ये टॉयलेटला गेल्यास तिथे अर्धा तास, असा टोटल दोन-सव्वादोन तास किंवा एवरेज काढल्यास सव्वा तास तरी रोजचा आपला टाईमपास आहे व्हॉट्सअप .. अर्थात पुढे मागे याला बोअर होऊ शकतो.

काही नग वॉट्स अ‍ॅपवर मिपा सदस्यांचेच ग्रुप्स करतात. तिथे दिवसभर मिपा + संपादक यांना शिव्या घालत बसतात, आणि "आम्ही हल्ली मिपावर येत नै" हे सांगत बसतात. "हल्ली आम्ही मिपावर येत नाही" असं सांगायची फ्याशन आहे वाट्टे! वॉट्स अ‍ॅपवर दिवसभर टवाळक्या आणि फॉरवर्ड करत बसण्यापेक्षा मिपावर येऊन ४ प्रतिक्रिया टाकल्यात तर जसे काही आमच्यावर उपकार होतील! शिवाय तुम्हाला काही बरं वाचायला मिळेल हा पण आमचाच स्वार्थ!!

In reply to by पैसा

जाऊन्द्याहो पैसा ताई , लोकांना फक्त अभिव्यक्त व्हायचं असतं , त्याच साठी तर मिपावर ( किंव्वा तत्त्सम संकेतस्थळांवर येत असतात ) आता मिपावर संपादक मंडळ आणि त्या निमित्ताने मॉनिटरिंग चालु असते म्हणुन त्यांच्या अभिव्यक्तीवर बंधने येतात ...मग तेही कोठे तरी व्यक्त करायला नको का ? त्यामानाने व्हॉट्सॅप मुक्त असल्याने तेथे त्यांना व्यक्त व्हायला बंधने येत नाहीत... तेवढंच त्या बिचर्‍यांच्या आत्म्याला समाधान :D जाऊनदे ...आपण त्यांना माफ करुन टाकु :)

In reply to by पैसा

काही नग वॉट्स अ‍ॅपवर मिपा सदस्यांचेच ग्रुप्स करतात. तिथे दिवसभर मिपा + संपादक यांना शिव्या घालत बसतात, आणि "आम्ही हल्ली मिपावर येत नै" हे सांगत बसतात. "हल्ली आम्ही मिपावर येत नाही" असं सांगायची फ्याशन आहे वाट्टे!
अगदी अगदी... उगा फुकाचा अभिमान दाखवायचा. ;-)

In reply to by पैसा

>>>तिथे दिवसभर मिपा + संपादक यांना शिव्या घालत बसतात, याच्याइतकं सोपं काम दुसरं नाही. कॉग्रेस आणि मिपासंपादक यांना शिव्या देण्यासाठी कारण लागत नही.

वॉट्स अ‍ॅप ला खरच वैतागलो आहे, नविन ग्रुप सुरु होतो, आणि येरे मा़झ्या मागल्या करत प्रत्येक ग्रुपवर थोड्याफार फरकाने तेच ते विनोद, फोटो, (सध्या केमो थेर ) सुरु असतात. कंटाल गया मै तर...मी तर प्रत्येक ग्रुपला एकदा रिक्वेस्ट करतोच.. बाबांनो नका करु रे फोरवर्ड.. पण ऐकते कोन म्हणा... शेवटी ग्रुप सोडलेत.. :(

मी फक्त माझ्याकडे जेवढे मि.पा. सदस्यांचे दुरध्वनी क्रमांक आहेत त्याच्या माझ्या पुरता एक ग्रुप बनवला आहे पण अजुन पर्यंत एकाला पण निरोप पाठवलेला नाहीये. मि.पा. चा पण व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप आहे हे माहिती नव्हते. त्या साठी कोणाला व्य.नि. करायचा.


In reply to by पैसा

>>>लोकांनीच आपापल्या मिपावरच्या मित्रांचे चुकून चुकलंय का चुकून बरोबर का बरोबर असून चुकीचं झालंय का आणखी कसं? -(फक्त ५० चा मित्र ;) ) प्यारे बाकी मिपा आपापल्या माणसांपुरतंच असतं हे अगदी मान्य हो! ;)

वॉटसप फोन नंबरवर अवलंबुन आहे .फेसबुक ओळखीच्या लोकांचे संपर्काचे साधन आहे फोन नंबरशी काही देणेघेणे नाही .मिपा समविचारी जगातल्या कुणाशीही उघड संपर्काचे साधन आहे .फोन नंबर आणि ओळखीशी काही संबंध नाही .लेखन हीच प्रत्येकाची ओळख . याव्यतिरिक्त यांचा उपयोग त्रासदायक होणारच . परदेशातल्या नातेवाईकांशी संपर्कासाठी वॉटसप उत्तम आहे हे खरं आहे .

In reply to by मारकुटे

आणि सरांची सारखी काळजी करायची तुमची सवय एक जाता जाणार नाही! कसे अगदी सारख्याला वारखे आहात, की नै? ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

दोन मोठी माणसं बोलत असतांना मधे बोलायची सवय काही जाणार नाही तुमची !!! मोठे व्हा (आतातरी)

In reply to by मारकुटे

सतरा वेळा डूआयडी घेऊन परत परत येणार्यांनी शहाणपणाचे बोल ऎकवणे हे कल्पनेपलीकडचे आहे अवलिया उर्फ नाना उर्फ मारकुटेसाहेब. तुम्हीच शहाणे व्हा(आतातरी)

In reply to by किसन शिंदे

सहमत आहे. नवीन आयडी करण्याचे धोरण काय आहे? असे करणे चुकीचे असेल तर अशा लोकांवर ताबडतोब कारवाई करावी. काय म्हणता? बर पण तुम्ही नक्की कोणाबद्दल बोलत आहात? हल्लीकायनवनवे शोध लावत आहात. शहाणे होणार नाहीत याचीखात्री असल्याने सल्ला देत नाही ;) लोभ नाहीच वाढावा अशी इच्छा सुद्धा नाही.

In reply to by मारकुटे

शहाणे होणार नाहीत याचीखात्री असल्याने सल्ला देत नाही लोभ नाहीच वाढावा अशी इच्छा सुद्धा नाही.
धन्यवाद! :-)

I fear the day that technology will surpass our human interaction. The world will have a generation of idiots. - Albert Einstein

वाट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर अशा अ‍ॅपस डिजाईन करताना मानवी भावनांचा (राग, लोभ, द्वेष, इर्षा, मत्सर, प्रेम, दिखाऊ वृत्ती, कौतुक, अहंकार) विचार आणि वापर केला जातो. Design for emotions 'मानवी भावनेसाठी रचना' असा खास विषय जगातल्या बऱ्याच डिजाईन संस्थात शिकवला जातो. सुरुवातीला छान वाटणारं वाट्सअ‍ॅप फोरवर्ड होणाऱ्या मेसेजेसमुळे, उगाच गुडमोर्निंग-गुडनाईट लिहिणाऱ्या लोकांमुळे, त्रासदायक वाटतं हे खरंच आहे. पण त्यावर आपण चांगलं, सकारात्मक, माहितीपूर्ण, नाविन्यपूर्ण शेअर करणं आणि इतरांना अशीच सवय/गोडी लावणं असा उपाय होऊ शकतो. आम्ही सातत्याने चांगले लेख, चांगल्या बातम्या, गाणी, मुलाखती, नवीन शोध अशी माहिती वाट्सअ‍ॅपवरून शेअर करत असतो. असाच प्रयोग फेसबुक आणि ट्विटरवर सुद्धा करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आमचा (पूर्वी एकाच कंपनीत काम केलेल्या) डिजाईनर लोकांचा एक ग्रुप आहे त्यावर आम्ही डिजाईनमधील नवीन ट्रेंड, चांगले दुवे शेअर करत असतो. एखादा आठवडा एका डिजाईनविषयक संकल्पनेला (उदा: निसर्गाभिमुख आणि सामान्य लोकांसाठी होणारे प्रोडक्ट डिजाईनमधील प्रयोग) वाहिलेला असतो, त्या आठवड्यात सगळेजण त्या संकल्पनेवर आपले अनुभव, विचार, संदर्भ शेअर करतात. निर्बुद्धपणे फोरवर्ड होणारे मेसेजेस किवा द्वेष-इर्षा यांनी भरलेले मेसेजेस अशा गोष्टी टाळून रोज काहीतरी नवीन, सकारात्मक, माहितीपूर्ण, सर्जनशील, प्रगतीशील शेअर करता आलं तर हि माध्यमं खऱ्या अर्थाने सगळ्यांनाच उपयोगी आणि रंजक वाटतील.

योग्य वापर केल्यास त्रास नाही, नविन माहिती,बातम्या मिळायला आणि शेअर करायला उत्तम साधन. सध्या चेपु ने विकत घेतल्यावर याचा वापर फारच कमी केला असुन टेलिग्रामला पसंती दिली आहे. फालतुच्या ग्रुप मधे पडिक राहिल्यास टाळक्याला ताप होणार नाही तर काय ? योग्य वेळीच अश्या ग्रुप पासुन तोबा करावी. काही दिवसांनी सोशन नेटवर्क रोबर्ट आले तरी नवल वाटावयाचे नाही.कुठल्ह्याही गोष्टींच्या आहारी जाउ नये अशी काळजी घेतल्यास त्रास होणार नाही.

'सामना'मधली अनेक सदरं अलीकडे अभावितपणे विनोदी होत चालली आहेत. (उदा. मुजफ्फर हुसैन यांनी क्रिमियावर लिहिलेला लेख). पण साप्ताहिक भविष्यात व्हॉट्सअ‍ॅपचा उल्लेख पाहून गंमत वाटली :) मेष : सावध रहा, आज दिवसभर ‘एप्रिल फूल’ व्हाल. वृषभ : पाडव्याचा गोडवा कायम ठेवा. मिथुन : उन्हाळा कडक आहे, उगाच भटकंती करू नका. कर्क : उगाच टाईमपास नको, अभ्यास करा. सिंह : सोनं स्वस्त झालंय. आता वाजवा रे वाजवा. कन्या : व्हॉटस् अप बंद करून बघा, शांत झोप लागेल. तूळ : कुठं कुठं जायचं पिकनिकला, आजच बेत आखा. वृश्‍चिक : निवडणुकीचे वारे आहे, ‘मत’ विकू नका. धनु : जिभेवर साखर ठेवा, कामे होतील. मकर : गाफील राहू नका, धोका होईल. कुंभ : आज गाल्यावरची खळी खुलेल. मीन : टेन्शन नको, हेही क्षण जातील.

In reply to by खबो जाप

@ एक ग्रूप बनवू आपण (व्हॉट्स अप वर) >>> =)) ये लो...कल्लो बात! रोग,औषधाच्याही वरचा उतारा! =))

सर्वात मजा तेव्हा येते जेव्हा तुम्ही चुकिच्या ग्रुप वर मेसेज टाकता, आणि त्यातून होणारे गैरसमज. आमच्या कौलेजच्या वर्गाचा एक ग्रुप आणि आम्हा मित्रांचा एक ग्रुप आहे. तेव्हा काही मेसेज करण्यापूर्वी खात्री करावी लागते की आपण बरोबर ग्रुप वर टाकत आहोत ना !

मंडळी माझ्या वाट्सॅप एक डोकेदुखीच्या धाग्याला आता पुढील काही दिवसात वर्ष होईल मिपाकरांचा काय नवीन अनुभव, काही गोष्टी यावर चर्चा व्हावी म्हणुन हा प्रपंच. आज मटावर व्हाट्सअ‍ॅप ग्रूप थंडावलेतका या लेखावरुन काय नवं जुनं घडतंय. खर्र्च ग्रूप थंडावलेत का ? की मजा येतेय त्यासाठी हा उकरप्रपंच. सध्या लातुरच्या तरुण प्रेमीयुगलचा व्हिडियो सर्वत्र फिरतोय. सुधारकाच्या नावाखाली त्या तरुणीला ज्या पद्धतीने मारहाण झाली तो व्हिडियो आपण पाहु शकत नाही. तसेच, काही गोपनिय क्यामेर्‍याने आलेले 'अश्लिल' व्हिडियो हाही चिंतेचा आणि चिंतनाचा विषय होत आहे. वाट्सपवर एखादी गोष्ट टाकायची इतकी घाई होते की विचारु नका. चुक की बरोबर त्याचे भान राहात नाही. महिला स्त्रीयांचे प्रोफाइल विनाकारण एकमेकांना पाठविले जात आहेत, प्रोफाईल चित्र टाकावेत की टाकू नये, अशी अवस्था झाली आहे. आम्ही वाट्सप अ‍ॅक्टीव्ह करत नाही, आम्ही वाचत नाही, आम्ही ग्रुप सोडलेत. आम्ही केवळ कुटुंबासाठीच वाट्सअ‍ॅप वापरतो. आमचा ग्रूप केव्ळ ग्रेट आहे, एकाच सदस्याला दहा ठिकाणाहुन दहा ग्रूपमधे एकच मेसेज येतो. कंटाळा आलाय ? अशा विविध गोष्टी कळाव्यात म्हणुन हा अट्टाहास ? काही ग्रूप अ‍ॅडमिन जेलात गेलेत ? काही मेंबर्सला वैतागले आहेत ? काही नवीन उपाय ? असं काही सूचलं तर मिपाकरहो जरुर कळवा. वाचायला आवडेल. माझं म्हणाल तर मी वैतागलोय आणि एकीकडे मला ते हवंही आहे, अशी द्विधा अवस्था. कोणीही परस्पर ग्रूप मधे अ‍ॅड करतं. ग्रूपमधून निघून गेलो की पुन्हा मित्रांची नाराजी, अशा अनेक गोष्टी. आपण काय करताय ते नक्की कळवा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

. महिला स्त्रीयांचे प्रोफाइल विनाकारण एकमेकांना पाठविले जात आहेत,
आम्ही काय करतो ते सांगतो पण आधी महिला स्त्रीया म्हणजे नक्की कोण ते सांगा? इतर दुसऱ्या कोणत्या प्रकारच्या स्त्रीया असतात?